दंगलच्या निमित्ताने ..... जगा आणि जगू द्या !

Submitted by ऋन्मेऽऽष on 26 December, 2016 - 16:07

सोशलसाईटवर मेसेज फिरतोय. थ्री ईडियट्समध्ये मुलांना त्यांच्या आवडीचे जे हवे ते करू द्या असे सांगणारा, आणि तारे जमीन पर मध्ये मुलांवर आपल्या अपेक्षा लादू नका, त्यांना आपल्या पद्धतीने फुलू द्या असे सांगणारा आमीर खान दंगलमध्ये मात्र आपले कुस्तीत मेडल जिंकायचे स्वप्न आपल्या मुलींवर त्यांच्या मनाविरुद्ध लादताना दाखवला आहे.

चित्रपट मी अजून पाहिला नाहीये. नक्की बघणार आहे. कदाचित चित्रपट बघताना हे जाणवणारही नाही. कारण त्या मुलींनी मेडल मिळवले आहे. शेवट गोड तर सारे गोड नाही का? अर्थात हा शेवट गोड आहे हे देखील आपणच ठरवले आहे ती गोष्ट वेगळी. पण जर तो शेवट तसा झाला नसता तर? जर त्या मुलींना पदक पटकावता आले नसते तर? थोडक्यासाठी हरणार्‍यांना ईतिहास लक्षात ठेवत नाही. त्या देखील विसरल्या गेल्या असत्या. त्यांची स्टोरी मोठ्या पडद्यावर आलीच नसती. आणि त्यांनी आयुष्यभर आपले बालपण गमावत जी किंमत मोजली तिची मोजदाद कधी झालीच नसती. कोणी नुकसानभरपाई देखील दिली नसती.

या देशात क्रिकेटचे एवढे वेड आहे की प्रत्येक गल्लीचा एक तेंडुलकर असतो. पण पुढे जाऊन प्रत्येक जण सचिन तेंडुलकरच काय, अजिंक्य रहाणे वा गेला बाजार अमोल मुझुमदार सुद्धा होऊ शकत नाही. हे पालकांना समजायला हवे. किती ताणायचे आणि कुठे थांबायचे हे समजायला हवे. कारण एकदा गेलेला काळ आणि आयुष्य परत येत नाही.

चित्रपट बघून प्रभावित झालेले मित्र म्हणाले की त्याकाळी हरयाणासारख्या राज्यात एका छोट्या गावात एक बाप आपल्या मुलींसाठी कसा उभा राहतो हे दाखवले आहे. तिथेच मग हा प्रश्नही मनात येतो की त्या मुली त्या बापाचे स्वप्न नाही तर आपले स्वत:चे स्वप्न पुरे करायला रिंगणात ऊतरल्या असत्या तर त्यावेळीही त्या बापाची नेमकी हीच भुमिका असती? अर्थात हे जर तर झाले आणि चित्रपट पाहिल्याशिवाय किंबहुना चित्रपट बघूनही एखाद्याच्या हेतूबद्दल शंका घ्यायचा मला काही एक अधिकार नाही.

पण ईथे मला एक प्रश्न पडलाय तो असा, की समजा एका मुलात अमुक तमुक टॅलेंट आहे. आता ते किती भारी आहे, (म्हणजे राज्यस्तरीय चमकण्याएवढे आहे की अगदी आंतरराष्ट्रीय लेव्हलला नाव कमवण्याएवढे आहे) हा वेगळा मुद्दा झाला. पण समजा ती त्याची आवड नसेल तर...

एखाद्याच्या आवडीला काहीच किंमत नाही का?
किंवा अख्खे बालपण मनाविरुद्ध काही करण्यात फुकट गेले तर त्यात काहीच नुकसान नाही का?
उद्या मेडल मिळाले तर वाहवा होते, चार कौतुकाचे शब्द कानावर येतात, पण त्यामुळे या सगळ्याची किंमत भरून निघते हे कोणी ठरवायचे? जगाने? की त्या व्यक्तीने स्वत:?
आणि ज्यांना मेडलच मिळाले नाही, अश्यांचे काय?
कोणी यातून नैराश्येच्या गर्तेत जात असेल त्यांची स्टोरीही कधी पुढे येत नसेल.

अर्थात हे या पर्टीक्युलर दंगल बद्दल लिहिलेले नाहीये. कारण तो चित्रपट अजून पाहिलेलाच नाही.
फक्त एवढेच म्हणायचेय की अमुकतमुक योग्य हे आपण नाही ठरवू शकत.
अगदी मुलांना स्वतःला त्या वयात आपल्या करीअरबद्दल सिरीअस होण्याची अक्कल नसते तर आपणच पालक म्हणून त्यांच्या हिताचा विचार करायला नको का असे स्पष्टीकरण देऊनही नाही.

एक माझेच उदाहरण देतो,

मला पाचवीपर्यंत बुद्धीबळ नावाचा खेळ असतो हे फक्त जनरल नॉलेज म्हणूनच माहीत होते. पुढे मे महिन्याच्या सुट्टीत शेजारच्या दोन काकांना खेळताना बघून हत्ती घोडे कसे चालतात हे समजले. स्वत:ची अक्कलहुशारी दाखवायला मनातल्या मनात चाली रचू लागलो. हळूहळू तोंडाने बोलू लागलो. ते पाहून त्यांनी मलाही गंमती जंमतीत खेळायला घेतले. पुढच्या काही दिवसांतच मी त्यांना हरवू लागलो. ते देखील अश्या पद्धतीने की ते यापुढे बुद्धीबळ हा खेळ माझ्याशी आयुष्यात कधीच जिंकू शकणार नाही हे त्यांनाही समजले. बघता बघता माझी ही किर्ती आजूबाजुच्या दोनचार बिल्डींगमध्ये पसरली आणि आसपासचे सो कॉलड ग्रॅंडमास्टर समजले जाणारे बुद्धीबळपटू कौतुकाने माझा खेळ बघायला येऊ लागले आणि मग माझ्याशी खेळून हरून जाऊ लागले. मे महिन्याची सुट्टी संपता संपता बुद्धीबळातील ‘ब’ सुद्धा ‘न’ येणारा मी शेजारच्या दोनचार बिल्डींगमधील नंबर वन बुद्धीबळपटू बनलो होतो. ते ही वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी !

पुढे शाळा सुरू झाली तसे मी बुद्धीबळ खेळायचेच सोडून दिले. कारण ती माझी आवडच नव्हती. सहा-आठ महिने काहीच नाही. त्यानंतर डिसेंबरदरम्यान शालेय स्पर्धांमध्ये जसे चमचागोटीत भाग घेतात तितक्याच उत्साहाने बुद्धीबळातही भाग घेतला आणि सेमीफायनलला सातवीच्या गतविजेत्या मुलाला हरवत पुढे फायनलही मारली. सातवीलाही मीच अंतिम विजेता बनलो. तसेच ‘आठवी ते दहावी’ गटाचा जो विजेता होता त्याच्याशी झालेल्या सामन्यातही मीच जिंकलो. थोडक्यात एक सहावीचा मुलगा ‘पाचवी ते दहावी’च्या सर्व ईयत्तांच्या सर्व तुकड्यांचा मिळून चॅम्पियन झाला होता. आणि गंमत म्हणजे मधल्या दोन वर्षांच्या काळात मी या स्पर्धा वगळता एकही बुद्धीबळाचा सामना ईतर कुठेही खेळलो नव्हतो. आठवीच्या सुरुवातीला मला शाळेतर्फे आंतरशालेय स्पर्धांना पाठवणार होते. पण तयारीसाठी मी त्यांच्या मे महिन्यातील प्रशिक्षण वर्गात हजेरी न लावता गावाला जाणे पसंद केले आणि पुढे आठवीला शाळाच बदलल्याने तो अनुभव राहिलाच.

नवीन शाळेत बुद्धीबळाची स्पर्धा उत्साहात खेळली जात नसल्याने मी देखील उत्साह दाखवला नाही. माझी बुद्धीबळाची करीअर तिथेच संपुष्टात येणार होती. पण कॉलेज झाले, जॉबला लागलो, आणि कंपनीच्या बुद्धीबळ स्पर्धेत केवळ मुलींवर शायनिंग मारायला म्हणून भाग घेतला. शाळेत खेळलेल्या बुद्धीबळाच्या चाली आठवून त्यावरची धूळ झटकत पहिली फेरी मौजमजा करतच जिंकलो आणि दुसर्‍या फेरीला सरदार पटेल कॉलेजचा चॅम्पियन म्हणून ओळखला जाणारा मुलगा समोर आला. पहिल्या फेरीला मी जसे अतरंगी पद्धतीने खेळत होतो ते त्याने पाहिले होते. त्यामुळे जेव्हा तो दुसर्‍या फेरीत माझ्याशी हरला त्यानंतर बसलेल्या धक्यातून तो आजवर बाहेर आला नाही असे ऐकून आहे.
..... पुढे ती स्पर्धाही जिंकून माझा कधीही न हरण्याचा विक्रम अबाधित ठेवण्यात मला यश आले.

पुढच्या वर्षी जॉब चेंज झाला आणि गेले दोनतीन वर्षे ज्या एमेनसीत कामाला आहे तिथे बुद्धीबळ नावाचा प्रकार फारसा प्रचलित नसल्याने मला माझे हे कौशल्य दाखवायची संधी मिळाली नाहीये.

मला एकूणच कल्पना नाही की जर मी माझे बुद्धीबळ कौशल्य जपले असते, त्यावर खूप मेहनत घेतली असती, तर असाच जिंकत जिंकत आज कोणत्या लेव्हलला पोहोचलो असतो. पण मला मुळातच तो खेळ जराही आवडायचा नाही. मला क्रिकेट खेळायला सांगा, अर्ध्या रात्री झोपेतून उठवून बोलवा, मी पचापच तोंडावर पाणी मारून डाव्या हातात बॅट पकडून तयार होईन. पण बुद्धीबळासारख्या (माझ्यामते) निरस खेळात नुसते एका जागी बसून डोके चालतेय म्हणून चालवत राहायचे आणि दर मिनिटभराने एखादा हात उचलून एखादा प्यादा ईकडून तिकडे हलवायचा आणि समोरच्याला शह देत, बघ मी तुझ्यापेक्षा किती हुशार याचे कौतुक मिरवायचे हा खेळ मला कधीच रुचला नाही. जर मी त्या खेळात पुढे जाऊन अगदी ग्रॅन्डमास्टर आनंद बनलो असतो तरीही आज चेहर्‍यावरील माशीही न हलणार्‍या प्रतिस्पर्ध्यांसमोर आणि तश्याच कंटाळवाण्या प्रेक्षकांपुढे बसून दर दुसर्‍या दिवशी हाच खेळ खेळत असतो ही कल्पना देखील मला एका शिक्षेसारखी वाटते.
हुश्श! थॅन्क गॉड, मी त्यावेळच्या निव्वळ यशाला भुललो नाही किंवा मला माझ्या मर्जीविरुद्ध एखादा गॉडफादर भेटला नाही, आणि त्याचमुळे आज मी माझ्या आवडीचे आयुष्य कसलीही खंत न बाळगता जगत आहे Happy
थोडे उदाहरण लांबले...
क्षमस्व!
कारण उदाहरण खोटे आहे, पण मुद्दा समजला असेलच..
ईथे बुद्धीबळ या खेळाचा किंवा तो खेळायची आवड असणार्‍यांचा अपमान करायचा हेतू नाही. किंबहुना प्रत्यक्षात मला या खेळाची बरेपैकी आवड असून कधीही न जमल्याने आणि एकेक चाल करायला सातआठ मिनिटे लावत असल्याने कोणी खेळायलाही घेत नाही. त्यामुळे चांगले बुद्धीबळ खेळता येणार्‍यांचा सदैव हेवाच वाटत आला आहे. पण ते एक असो, धाग्याचा विषय तो नाही. ईतकेच म्हणायचे आहे,
जगा आणि जगू द्या..
चित्रपटाला मनोरंजनाचे माध्यमच राहू द्या..
त्यातून उगाच कसलाही संदेश घेण्याच्या फंदात पडू नका..
कारण जगण्याची सूत्रे माणसामाणसानुसार बदलतात.

- ऋन्मेष

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तूमचे ध्येय काय आहे.>>>>

आपले समाधान होईपर्यंत प्रयत्न करत राहणे महत्वाचे. मी अल्पसंतुष्ट पण असू शकेन. पण ते ठरवायचे स्वातंत्र्य हवे. >>>>>+१

जबरदस्ती मारुनमुटकुन डॉक्टर-इंजिनियर झालेले हजारो मिळतील पण कलाकार-खेळाडू झालेले माझ्यातरी पाहण्यात नाहीत.
>>>>+10000000% सहमत

जबरदस्ती मारुनमुटकुन डॉक्टर-इंजिनियर झालेले हजारो मिळतील पण कलाकार-खेळाडू झालेले माझ्यातरी पाहण्यात नाहीत.>>>युवराज सिंग आहे.

मुलांना त्यांचे निर्णय घ्यायचं स्वातंत्र्य असावे....

मुलांना पुर्ण माहिती असणे, आपल्यात नेमके कलागुण / हुनर / कौशल्य आहे हे माहित असणे गरजेचे आहे.
ते हुनर / कौशल्य परीपूर्ण करण्यासाठी आपल्याला कितपत शिक्षण मिळणे, मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे,
ते समजणे गरजेचे आहे.

त्या सरावाला / शिक्षणाला दिशा मिळणे, त्यासाठी कुठल्या गोष्टींचा अडथळा होत आहे ( बालसुलभ चंचलता, व्यसने, वाईट संगत ) ते समजणे आवश्यक आहे.

अजाण वयामूळे हे सर्व समजणे शक्यच असते असे नाही.>>>>

exactly!

एम. एस. धोनीच्या बाबतीत असेच झाले होते ना, त्याची passion football मध्ये होती, पण क्रिकेटच्या कोचमुळे तो क्रिकेटकडे वळला.

मुला.न्ची आवड ईच्छा वगैरे बोलणार्‍या.न्नी सिनेमा पुन्हा नीट बघा. मुलि.न्नी पूर्ण असहकार पुकारलेला असता.न्ना त्यान्ची मैत्रिण त्याना जे समजावून सा.न्गते त्यामुळे त्यन्च्या विचारात बदल झालेला दाखवलाय.

एक वेळ मान्य करुया की मुलिन्ना काही choice दिला नाही वडिला.नी. पण तसाही त्या.न्न काय choice hota?

मंडळी, एक सीमारेषा असते हे मान्य करायला हवेच! अन्यथा कोणतेही टोक गाठणे हे अमानुषताच समजली पाहिजे. 'करु दे त्याला काय पाहिजे ते' आणि 'मी म्हणेल तेच कर' ह्या दोहोंनी विपरित परिणाम होण्याची शक्यता जास्त.

मुला-पालकांनी एक टीम बनवून आयुष्याकडे बघितले पाहिजे. दंगलचाच एक डॉयलॉग देतो. "बेटा, मै तणे लडणा सिखा सकता हूं, पर लडणा तणे खुद है" पालकांनीही हे लक्षात ठेवले तर जबरदस्ती होणार नाही.

आपण मुलांचंच काय घेऊन बसलोय, बहुतांश लोकांना अगदी चाळीशी गाठेपर्यंतही आपल्याला काय आवडते आणि काय करायला पाहिजे हे समजत नाही. आय अ‍ॅम नॉट जोकिंग!

किंवा कोणी प्रोत्साहन योग्य वयात दिलेलं नसतं म्हणून जमणारं आवडतं करीअर हुकलेलं असतं. काही गोष्टी योग्य वयात केलेल्या बर्‍या असतात.

काही अपवाद आहेत म्हणून बहुसंख्यांनी तोच नियम समजणे योग्य नव्हे.

नानाकळा, अगदी हेच..

माझ्याबाबतीत मला विविध पदार्थ करायची हौस आहे, हे मला कळेपर्यंत खुप उशीर झाला होता, कारण तोपर्यंत शिक्षण पुर्ण होऊन करियरही मार्गी लागलं होतं.

आणि ज्या काळात करीयर निवडायचे होते त्या काळात फारसे चॉईस उपलब्ध नव्हतेच आणि हे क्षेत्र तर अजिबातच मान्य झाले नसते... पण आनंदाची बाब म्हणजे माझ्याच घराण्यात, माझ्यापेक्षा लहान भावंडानी आनंदाने हे क्षेत्र निवडले, त्यात शिक्षण घेतले आणि करियरही केले.

एखाद्या MNC मध्ये काम करणाऱ्या व्यक्तीच्या मागे त्याच्या घरातले( मुले, बायको, आई-वडील) जर मागे लागले की तु या कंपनीचा CEO होच. ते जो पर्यंत होत नाही तो पर्यंत तुझ्या सहली, पार्ट्या, टीव्ही, मोबाईल, इंटरनेट सगळ्यावर बंदी तर त्यांना कसे वाटेल?

मी आशुचॅम्पच्या धाग्यापासून हेच म्हणत आहे की प्रोत्साहन देणे आणि सक्ती करणे सीमारेषा समजून घ्यावी. आणि ती कसोशीने पाळावी.

तुमची मुले म्हणजे तुमची मालमत्ता नाही.
त्यांना त्यांची स्वप्ने, आशा आकांशा, मते , भावना आहेत. तुमची मते, स्वप्न, भावना आहेत त्याच त्यांच्या असाव्या असा आग्रह/ अट्टहास नको. ते सर्व त्यांच्यावर लादू नका. तुम्हाला त्याचा काही अधिकार नाही.
त्यांना त्यांच्या पद्धतीने जगू द्या.

अतरंगी एमेनसी उदाहरण अचूक.

मुलांना त्यांच्या चांगल्या वाईटाचा निर्णय घ्यायची अक्कल नाही म्हणून त्यांच्यावतीने तो तुम्ही घेणे हे एक झाले.
तर मुलांना तुम्ही घेतलेला निर्णय डावलायचा अधिकार वा हिंमत नाही म्हणून तुम्ही आपले मत, आपली आवड त्यांच्यावर लादणे हे एक झाले.
आणि म्हणूनच आईवडिलांना पालक बोलतात, मालक नाही Happy

आई वडिलांनी मुलांवर आपली स्वप्ने लादू नयेतच पण म्हणून त्यांना पूर्ण सूट द्यावी असेही नाही. थोडे बहुत प्रोत्साहन आणि जर मूल प्रयत्नात कमी पडत असेल तर थोडी शिस्त ही उपयोगीच पडते. नाहीतर अतिप्रेमामुळे देखील मूल वाया जाऊ शकते.
दंगल मध्ये सुरुवातीला महावीर सिंग आपल्या इच्छेपोटी आणि मुलींमध्ये दिसलेल्या चुणूकीमुळे त्यांना कुस्तीकडे वळायला भाग पाडतो (अर्थात स्वतःवर एका वर्षाचे वेळेचे बंधन घालून घेऊन). मात्र मुलींच्या असहकाराने थोडे निराश होतो. त्यावेळी ज्या मुलीचं इच्छेविरुद्ध लग्न लागत असतं ती ह्या मुलींना जाणीव करून देते आणि मग मुली कुस्तीमध्ये मनापासून रस घ्यायला लागतात. त्यातूनही पहिल्या दंगलीत हारून आल्यावर जेव्हा गीता पुढची दंगल कधी आहे असे स्वतःहून येऊन विचारते तो प्रसंग मला सगळ्यात जास्त महत्वाचा वाटतो. त्या पुढचा प्रवास हा गीताच्या स्वप्नाचा आहे. मग पुढे प्रशिक्षणासाठी गेल्यावर गीता आपल्या मनाप्रमाणे वागते त्यावेळी नाराजी व्यक्त करण्याखेरीज त्यांचे बाबा काहीही करत नाहीत. शिवाय इथे एक वडील आणि एक प्रशिक्षक अशी दुहेरी भूमिका आहे. प्रशिक्षक म्हणून अति कठोर वागताना आपल्या दमून झोपलेल्या मुलींचे पाय दाबून देणारा एक बाप देखील दाखवला आहेच की! त्यामुळे मला दंगल पटला. अर्थात दंगल ही एक सत्यकथा आहे. पण तेच नियम सगळ्यांना लागू पडतील असं नाही. प्रत्येक मुलामुलीची गोष्ट सारखी नसणारच.
अवांतर: हा एक छान सर्वांनी वाचावा असा पालकत्वाविषयीचा लेख - http://www.nytimes.com/2016/01/31/opinion/sunday/how-to-raise-a-creative...

लेख आणि प्रतिक्रिया सवडीने वाचीन.

".... वा गेला बाजार अमोल मुझुमदार सुद्धा होऊ शकत नाही."

ऋन्मेऽऽष ला असं म्हणायचं असेल की स्पर्धा इतकी जबरदस्त आहे, चांगल्या खेळाडूंना सुद्धा संधी मिळणे कठीण आहे, तर ठीक. नाहीतर अतिशय असंवेदनशील वक्तव्य आहे हे.

For record, अमोल मुजुमदार हा एक अतिशय गुणवान, पण कमनशिबी खेळाडू आहे.
दुर्दैवाने भारतीय संघात संधी मिळाली नाही. मेहनत, क्रिकेट बद्दल प्रेम, तयारी हे कोणी त्याच्यावर लादलेल वाटत नाही

A very promising and talented Mumbai player who unfortunately never made it to the national team,

माझ्या आईबापाने मला लहानपणापासुन पुर्ण मोकळीक दिली होती,त्यामुळे आयुष्यात टर्निंग पॉईंटला मी चूकीचे निर्णय घेऊन शेवटी अल्प भूधारक शेतकरी म्हणून आज पाट्या टाकत आहे.कसेबसे वर्षभरात दीड दोन लाख कमावतो ,ते ही निसर्गाची कृपा असली तर.माझे वर्ग मित्र वर्षाला १२ लाखाचे पॅकेज घेतात,कारण त्यांच्या आईबापाने त्यांना कसलीच मोकळीक दिली नाही.अभ्यास् म्हणजे अभ्यास
सर्कशीतल्या प्राण्यांचा नियम माणसलाही लागू होतो,हंटर दाखवला की वळण लागतेच.मुलांचा कल कशात आहे हे ओळखून पालकांनी त्यांना मेहनतीला जुंपले तर आजकालच्या स्पर्धेच्या युगात वाव आहे.अन्यथा आमच्यासारखे बांधावर तंबाखू मळत बसावे लागते .

असुफ, अमोल मुझुमदारमधील गुणवत्तेबद्दल मला कल्पना नाही अशी शंकाही घेऊ नका. प्रत्येक मुंबईकर क्रिकेटप्रेमीला अमोल मुझुमदार बद्दल एक सॉफ्ट कॉर्नर असतोच. तर त्याचे नाव योग्य संदर्भानेच लिहिले आहे.

अमोल मुझुमदारमधील गुणवत्तेबद्दल मला कल्पना नाही अशी शंकाही घेऊ नका. प्रत्येक मुंबईकर क्रिकेटप्रेमीला अमोल मुझुमदार बद्दल एक सॉफ्ट कॉर्नर असतोच.>>>
त्याची फलन्दाजी पाहताना झोप यायची. द्रविड परवड्ला एक वेळ.

द्रविडमुळेच कदाचित त्याच्यासाठी संघात कसलीही भुमिका उरली नाही आणि चान्स मिळाला नाही.

माझ्या आईबापाने मला लहानपणापासुन पुर्ण मोकळीक दिली होती,त्यामुळे आयुष्यात टर्निंग पॉईंटला मी चूकीचे निर्णय घेऊन शेवटी अल्प भूधारक शेतकरी म्हणून आज पाट्या टाकत आहे.कसेबसे वर्षभरात दीड दोन लाख कमावतो ,ते ही निसर्गाची कृपा असली तर.माझे वर्ग मित्र वर्षाला १२ लाखाचे पॅकेज घेतात,कारण त्यांच्या आईबापाने त्यांना कसलीच मोकळीक दिली नाही.अभ्यास् म्हणजे अभ्यास
सर्कशीतल्या प्राण्यांचा नियम माणसलाही लागू होतो,हंटर दाखवला की वळण लागतेच.मुलांचा कल कशात आहे हे ओळखून पालकांनी त्यांना मेहनतीला जुंपले तर आजकालच्या स्पर्धेच्या युगात वाव आहे.अन्यथा आमच्यासारखे बांधावर तंबाखू मळत बसावे लागते .>>>

सहमत!

मुलांचा कल कशात आहे हे ओळखून पालकांनी त्यांना मेहनतीला जुंपले तर आजकालच्या स्पर्धेच्या युगात वाव आहे.>>>

हे महत्त्वाचे!

आजच रैवारची नववर्षाची पहिल्याच शोची या सिनेमाची दोन तिकीटे काढलीत. या धाग्यातील वाद विवाद मतमतांतरे आणि चर्चा विसरून चित्रपटाचा निखळ आनंद घेणेच उत्तम ठरेल. कारण या विषयावर एखाद्याचे मत काहीही असो, पण दंगल चित्रपट म्हणून न आवडणारी व्यक्ती मला अजून भेटायचीय Happy

Pages