दंगलच्या निमित्ताने ..... जगा आणि जगू द्या !

Submitted by ऋन्मेऽऽष on 26 December, 2016 - 16:07

सोशलसाईटवर मेसेज फिरतोय. थ्री ईडियट्समध्ये मुलांना त्यांच्या आवडीचे जे हवे ते करू द्या असे सांगणारा, आणि तारे जमीन पर मध्ये मुलांवर आपल्या अपेक्षा लादू नका, त्यांना आपल्या पद्धतीने फुलू द्या असे सांगणारा आमीर खान दंगलमध्ये मात्र आपले कुस्तीत मेडल जिंकायचे स्वप्न आपल्या मुलींवर त्यांच्या मनाविरुद्ध लादताना दाखवला आहे.

चित्रपट मी अजून पाहिला नाहीये. नक्की बघणार आहे. कदाचित चित्रपट बघताना हे जाणवणारही नाही. कारण त्या मुलींनी मेडल मिळवले आहे. शेवट गोड तर सारे गोड नाही का? अर्थात हा शेवट गोड आहे हे देखील आपणच ठरवले आहे ती गोष्ट वेगळी. पण जर तो शेवट तसा झाला नसता तर? जर त्या मुलींना पदक पटकावता आले नसते तर? थोडक्यासाठी हरणार्‍यांना ईतिहास लक्षात ठेवत नाही. त्या देखील विसरल्या गेल्या असत्या. त्यांची स्टोरी मोठ्या पडद्यावर आलीच नसती. आणि त्यांनी आयुष्यभर आपले बालपण गमावत जी किंमत मोजली तिची मोजदाद कधी झालीच नसती. कोणी नुकसानभरपाई देखील दिली नसती.

या देशात क्रिकेटचे एवढे वेड आहे की प्रत्येक गल्लीचा एक तेंडुलकर असतो. पण पुढे जाऊन प्रत्येक जण सचिन तेंडुलकरच काय, अजिंक्य रहाणे वा गेला बाजार अमोल मुझुमदार सुद्धा होऊ शकत नाही. हे पालकांना समजायला हवे. किती ताणायचे आणि कुठे थांबायचे हे समजायला हवे. कारण एकदा गेलेला काळ आणि आयुष्य परत येत नाही.

चित्रपट बघून प्रभावित झालेले मित्र म्हणाले की त्याकाळी हरयाणासारख्या राज्यात एका छोट्या गावात एक बाप आपल्या मुलींसाठी कसा उभा राहतो हे दाखवले आहे. तिथेच मग हा प्रश्नही मनात येतो की त्या मुली त्या बापाचे स्वप्न नाही तर आपले स्वत:चे स्वप्न पुरे करायला रिंगणात ऊतरल्या असत्या तर त्यावेळीही त्या बापाची नेमकी हीच भुमिका असती? अर्थात हे जर तर झाले आणि चित्रपट पाहिल्याशिवाय किंबहुना चित्रपट बघूनही एखाद्याच्या हेतूबद्दल शंका घ्यायचा मला काही एक अधिकार नाही.

पण ईथे मला एक प्रश्न पडलाय तो असा, की समजा एका मुलात अमुक तमुक टॅलेंट आहे. आता ते किती भारी आहे, (म्हणजे राज्यस्तरीय चमकण्याएवढे आहे की अगदी आंतरराष्ट्रीय लेव्हलला नाव कमवण्याएवढे आहे) हा वेगळा मुद्दा झाला. पण समजा ती त्याची आवड नसेल तर...

एखाद्याच्या आवडीला काहीच किंमत नाही का?
किंवा अख्खे बालपण मनाविरुद्ध काही करण्यात फुकट गेले तर त्यात काहीच नुकसान नाही का?
उद्या मेडल मिळाले तर वाहवा होते, चार कौतुकाचे शब्द कानावर येतात, पण त्यामुळे या सगळ्याची किंमत भरून निघते हे कोणी ठरवायचे? जगाने? की त्या व्यक्तीने स्वत:?
आणि ज्यांना मेडलच मिळाले नाही, अश्यांचे काय?
कोणी यातून नैराश्येच्या गर्तेत जात असेल त्यांची स्टोरीही कधी पुढे येत नसेल.

अर्थात हे या पर्टीक्युलर दंगल बद्दल लिहिलेले नाहीये. कारण तो चित्रपट अजून पाहिलेलाच नाही.
फक्त एवढेच म्हणायचेय की अमुकतमुक योग्य हे आपण नाही ठरवू शकत.
अगदी मुलांना स्वतःला त्या वयात आपल्या करीअरबद्दल सिरीअस होण्याची अक्कल नसते तर आपणच पालक म्हणून त्यांच्या हिताचा विचार करायला नको का असे स्पष्टीकरण देऊनही नाही.

एक माझेच उदाहरण देतो,

मला पाचवीपर्यंत बुद्धीबळ नावाचा खेळ असतो हे फक्त जनरल नॉलेज म्हणूनच माहीत होते. पुढे मे महिन्याच्या सुट्टीत शेजारच्या दोन काकांना खेळताना बघून हत्ती घोडे कसे चालतात हे समजले. स्वत:ची अक्कलहुशारी दाखवायला मनातल्या मनात चाली रचू लागलो. हळूहळू तोंडाने बोलू लागलो. ते पाहून त्यांनी मलाही गंमती जंमतीत खेळायला घेतले. पुढच्या काही दिवसांतच मी त्यांना हरवू लागलो. ते देखील अश्या पद्धतीने की ते यापुढे बुद्धीबळ हा खेळ माझ्याशी आयुष्यात कधीच जिंकू शकणार नाही हे त्यांनाही समजले. बघता बघता माझी ही किर्ती आजूबाजुच्या दोनचार बिल्डींगमध्ये पसरली आणि आसपासचे सो कॉलड ग्रॅंडमास्टर समजले जाणारे बुद्धीबळपटू कौतुकाने माझा खेळ बघायला येऊ लागले आणि मग माझ्याशी खेळून हरून जाऊ लागले. मे महिन्याची सुट्टी संपता संपता बुद्धीबळातील ‘ब’ सुद्धा ‘न’ येणारा मी शेजारच्या दोनचार बिल्डींगमधील नंबर वन बुद्धीबळपटू बनलो होतो. ते ही वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी !

पुढे शाळा सुरू झाली तसे मी बुद्धीबळ खेळायचेच सोडून दिले. कारण ती माझी आवडच नव्हती. सहा-आठ महिने काहीच नाही. त्यानंतर डिसेंबरदरम्यान शालेय स्पर्धांमध्ये जसे चमचागोटीत भाग घेतात तितक्याच उत्साहाने बुद्धीबळातही भाग घेतला आणि सेमीफायनलला सातवीच्या गतविजेत्या मुलाला हरवत पुढे फायनलही मारली. सातवीलाही मीच अंतिम विजेता बनलो. तसेच ‘आठवी ते दहावी’ गटाचा जो विजेता होता त्याच्याशी झालेल्या सामन्यातही मीच जिंकलो. थोडक्यात एक सहावीचा मुलगा ‘पाचवी ते दहावी’च्या सर्व ईयत्तांच्या सर्व तुकड्यांचा मिळून चॅम्पियन झाला होता. आणि गंमत म्हणजे मधल्या दोन वर्षांच्या काळात मी या स्पर्धा वगळता एकही बुद्धीबळाचा सामना ईतर कुठेही खेळलो नव्हतो. आठवीच्या सुरुवातीला मला शाळेतर्फे आंतरशालेय स्पर्धांना पाठवणार होते. पण तयारीसाठी मी त्यांच्या मे महिन्यातील प्रशिक्षण वर्गात हजेरी न लावता गावाला जाणे पसंद केले आणि पुढे आठवीला शाळाच बदलल्याने तो अनुभव राहिलाच.

नवीन शाळेत बुद्धीबळाची स्पर्धा उत्साहात खेळली जात नसल्याने मी देखील उत्साह दाखवला नाही. माझी बुद्धीबळाची करीअर तिथेच संपुष्टात येणार होती. पण कॉलेज झाले, जॉबला लागलो, आणि कंपनीच्या बुद्धीबळ स्पर्धेत केवळ मुलींवर शायनिंग मारायला म्हणून भाग घेतला. शाळेत खेळलेल्या बुद्धीबळाच्या चाली आठवून त्यावरची धूळ झटकत पहिली फेरी मौजमजा करतच जिंकलो आणि दुसर्‍या फेरीला सरदार पटेल कॉलेजचा चॅम्पियन म्हणून ओळखला जाणारा मुलगा समोर आला. पहिल्या फेरीला मी जसे अतरंगी पद्धतीने खेळत होतो ते त्याने पाहिले होते. त्यामुळे जेव्हा तो दुसर्‍या फेरीत माझ्याशी हरला त्यानंतर बसलेल्या धक्यातून तो आजवर बाहेर आला नाही असे ऐकून आहे.
..... पुढे ती स्पर्धाही जिंकून माझा कधीही न हरण्याचा विक्रम अबाधित ठेवण्यात मला यश आले.

पुढच्या वर्षी जॉब चेंज झाला आणि गेले दोनतीन वर्षे ज्या एमेनसीत कामाला आहे तिथे बुद्धीबळ नावाचा प्रकार फारसा प्रचलित नसल्याने मला माझे हे कौशल्य दाखवायची संधी मिळाली नाहीये.

मला एकूणच कल्पना नाही की जर मी माझे बुद्धीबळ कौशल्य जपले असते, त्यावर खूप मेहनत घेतली असती, तर असाच जिंकत जिंकत आज कोणत्या लेव्हलला पोहोचलो असतो. पण मला मुळातच तो खेळ जराही आवडायचा नाही. मला क्रिकेट खेळायला सांगा, अर्ध्या रात्री झोपेतून उठवून बोलवा, मी पचापच तोंडावर पाणी मारून डाव्या हातात बॅट पकडून तयार होईन. पण बुद्धीबळासारख्या (माझ्यामते) निरस खेळात नुसते एका जागी बसून डोके चालतेय म्हणून चालवत राहायचे आणि दर मिनिटभराने एखादा हात उचलून एखादा प्यादा ईकडून तिकडे हलवायचा आणि समोरच्याला शह देत, बघ मी तुझ्यापेक्षा किती हुशार याचे कौतुक मिरवायचे हा खेळ मला कधीच रुचला नाही. जर मी त्या खेळात पुढे जाऊन अगदी ग्रॅन्डमास्टर आनंद बनलो असतो तरीही आज चेहर्‍यावरील माशीही न हलणार्‍या प्रतिस्पर्ध्यांसमोर आणि तश्याच कंटाळवाण्या प्रेक्षकांपुढे बसून दर दुसर्‍या दिवशी हाच खेळ खेळत असतो ही कल्पना देखील मला एका शिक्षेसारखी वाटते.
हुश्श! थॅन्क गॉड, मी त्यावेळच्या निव्वळ यशाला भुललो नाही किंवा मला माझ्या मर्जीविरुद्ध एखादा गॉडफादर भेटला नाही, आणि त्याचमुळे आज मी माझ्या आवडीचे आयुष्य कसलीही खंत न बाळगता जगत आहे Happy
थोडे उदाहरण लांबले...
क्षमस्व!
कारण उदाहरण खोटे आहे, पण मुद्दा समजला असेलच..
ईथे बुद्धीबळ या खेळाचा किंवा तो खेळायची आवड असणार्‍यांचा अपमान करायचा हेतू नाही. किंबहुना प्रत्यक्षात मला या खेळाची बरेपैकी आवड असून कधीही न जमल्याने आणि एकेक चाल करायला सातआठ मिनिटे लावत असल्याने कोणी खेळायलाही घेत नाही. त्यामुळे चांगले बुद्धीबळ खेळता येणार्‍यांचा सदैव हेवाच वाटत आला आहे. पण ते एक असो, धाग्याचा विषय तो नाही. ईतकेच म्हणायचे आहे,
जगा आणि जगू द्या..
चित्रपटाला मनोरंजनाचे माध्यमच राहू द्या..
त्यातून उगाच कसलाही संदेश घेण्याच्या फंदात पडू नका..
कारण जगण्याची सूत्रे माणसामाणसानुसार बदलतात.

- ऋन्मेष

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक तर कोणत्याही खेळाबद्दल तुम्हाला पॅशन असावे लागते व ते कुणीही देउ शकत नाही. मग ते तुमच्या वर सक्ती ने असो वा तुमच्या इच्छेने असेल. येथे ही महावीर फोगट ला एका घटनेमुळे आपल्या मुलीत ते पोट्यान्सील दिसते व त्यांना फक्त एक दिशा तो देतो व त्यात त्या यशस्वी सुद्धा होतात मला तरी वाटत नाही एखाद्या ला जबरदस्तीने यशस्वी स्पोर्ट्स मॅन बनवता येते. ..

समजा एकाला आवड रॅदर पॅशनदेखील आहे, त्याच्यावर कोणी सक्तीच केलेली नाहीये तरीही तो स्वयंस्फुर्तीने त्या कलेची आराधना करतोय पण त्याच्यात पुरेसे टॅलेंटच नाहीये आणि उलट दुसरा एक जण ज्याच्यात टॅलेंट भरपुर आहे, पण त्याला काही पॅशनच नाही आणि हे दोघे जण मित्र आहेत. हे सारं लंडन ड्रीम्स नावाच्या एका चित्रपटात दाखवलं आहे. ऋन्मेष हा चित्रपट जरुर पाहा. (तुमच्या लाडक्या शाहरुखच्या चेन्नै एक्स्प्रेसचं उगमस्थानही याच चित्रपटात आहे.)

प्रथम माझं उदाहरण देतो. माझी चित्रकला चांगली होती लहानपणापासून. पण घरच्यांची अभ्यास एके अभ्यास मानसिकता त्यामुळे त्या बाबतीत प्रोत्साहन मिळालं नाही. अगदी बी.ए. फस्टयीअर ला जाईस्तोवर आपल्यात चित्रकलेचं काही खास टॅलेन्ट आहे हे माहित नव्हतं. अपघाताने माहित झालं. पेन्सिल स्केचिंग मध्ये मी अल्पावधीत हातखंडा मिळवला. अगदी महिनाभरात प्रोफेशनल पेन्सिल शेडिंग चित्रे काढायला लागलो. मग कौतुक होऊ लागलं. पण मला एकदा एका प्रकारात मास्टरी मिळवली की पुढे ते करावंसं वाटतं नाही. पेन्सिल शेडींग सोडून दिलं. मूळ स्वभाव एखाद्या गोष्टीचं आव्हान स्विकारणं आणि ती अत्युत्तम येईस्तोवर त्याचा पाठपुरावा करणे. तरी चित्रकलेचं टॅलेन्ट धरुन जेजेत अ‍ॅडमिशन घेतली. पेन्सिल शेडिंग, रंगकाम, बरेच चित्रकलेचे प्रकार हे माझ्यालेखी फार वेळखाऊ आणि पेशन्सचा कस पाहणारे असतात असं वाटू लागलं. म्हणजे एखादं चित्र पूर्ण करण्यातली जी पॅशन असते ती हरवली. माझा कल कन्सेप्चुअलायझेशन आणि ग्राफिक्स याकडे गेला.. तिथेही ग्राफिक्स मधे पेशन्स लागतातच. पण त्यात अक्कल लढवून कमी श्रमात जास्तीत जास्त सुंदर ग्राफिक्स तयार करायचा फंडा शोधून काढला. आता मी आळशी की पॅशनलेस हे मला कळत नाही. पण मी केलेली कामे लोकांना आवडतात, पैसे मिळतात. बरं चाललंय. आयुष्यात काही दिव्य केलंय असं अजुनतरी वाटत नाही. पर्सनल लेवल वर स्वतःला यशस्वी समजतो. Happy

हा माझा थोडक्यात प्रवास. माझ्या दृष्टीने माझ्याबाबतीत थोडी गडबड आहे. कुणीही न शिकवता मी पहिल्याच प्रयत्नात हुबेहुब लाइव पोर्ट्रेट करु शकलो. म्हणजे उपजत टॅलेन्ट आहे. ते पुढे सातत्य नाही ठेवू शकलो म्हणजे पॅशन कमी आहे.

जी लोकं टॅलेन्ट आणि पॅशनच्या बाबतीत दोन्हीत पुरेपूर असतात तेच आयुष्यात काहीतरी भव्यदिव्य घडवू शकतात असे मला व्यक्तिगत वाटते. टॅलेन्ट आहे पण पॅशन नाही, पॅशन आहे पण टॅलेन्ट नाही अशा अवस्थेत तसे यश मिळवणे चित्रपटात शक्य होईल प्रत्यक्ष नाही.

हा माझा खरा अनुभव सांगितला. पुढे चर्चेत विषयाशी संबंधित अन्य गोष्टींवर जमेल तसं लिहितो.

रणछोडदास चांचड, निकुंभ मास्तर आणि महावीरसिंग फोगट ह्या तीन व्यक्तींची विचारसरणी एकच असावी अशी अपेक्षा कशी काय करतात बुवा लोक?

ऋणम्याने मला म्हणायचे असलेले बरेच मुद्दे कव्हर केले आहेत.

दिग्दर्शक त्याला जे दाखवायचे आहे त्यानुसार चित्रपट बनवतो.
चित्रपट ज्या पद्धतीने दाखवला जातो त्याप्रकारे आपले मत बनते.
हाच चित्रपट किंवा असाच चित्रपट जर एखाद्या अशा कुस्तीगिरावर असता कि ज्याचे वडील अतिमहत्वाकांक्षी होते आणि तो यशस्वी होऊन सुद्धा त्याला त्या यशापेक्षा स्वतःच्या आयुष्यातला गेलेला वेळ अनमोल वाटतो तर सगळ्या धाग्यांवरची चर्चा त्या अनुषंगाने झाली असती.
सगळे नेटकरी लगेच पालकांनी मुलांना त्यांच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली दाबून टाकणे कसे चुकीचे आहे याची चर्चा करू लागले असते.

म्हणून मला दादा कोंडके यांचे चित्रपट आवडत!

निखळ करमणूक!
दादा म्हणायचे माझ्या सिनेमाचे प्रेक्षक हे साधारण कामगार शेतकरी आहेत! ते त्यांच्या विवंचनेत त्यांना सिनेमात उपदेशामृत कुठे देत बसू! ४ घटका केवळ त्यांच्या दैनंदिन विवंचनांपासून दूर नेऊन त्यांना निखळ हसवायचे!

उगा सिनेमे पाहून त्यावर हिरो चुकीचा की दिग्दर्श चुकीचा की लेखक चुकीचा ही चर्चाच नको!

Wink

अतरंगी, मारून मुटकून गोल्ड मेडलिस्ट होता येतं का हा खरा प्रश्न आहे.

आताही दंगल बघून अनेक पालक आपल्या पोरांना कसल्याशा क्लासला घालतील, (दंगल न बघताही असे करणारे अनेक आहेत) पोरात टॅलेन्ट आहे नाही याची काळजी न करता 'मी म्हणतो म्हणून तू कर' असे जबरदस्तीवाले असतील. यात पोराचे सुरुवातीला हाल होतील, रडारड, त्रास होईल. पण यातल्या कुणाचंही पोर साधं डिस्ट्रीक्ट लेवलला नाही जाऊ शकणार. त्याला त्याच्या क्लासच्या बाहेरही नाही जाता येणार.डिस्ट्रिक्ट तर फार दूरची गोष्ट. स्पोर्ट्समध्ये तरी टॅलेन्ट किंवा पॅशनशिवाय गधामेहनत कुठेही घेऊन जात नाही. तसं काही उदाहरण असेल तर ऐकायला आवडेल.

डॉक्टर इंजिनियर होणे स्पोर्ट्समन होण्यापेक्षा वेगळं आहे. कलाकार होणे तर त्याहीपेक्षा वेगळं. जबरदस्ती मारुनमुटकुन डॉक्टर-इंजिनियर झालेले हजारो मिळतील पण कलाकार-खेळाडू झालेले माझ्यातरी पाहण्यात नाहीत.

नानकळा,
हे मात्र नाही पटले.
मारून मुटकून झालेले एक क्रिकेटपटू आणि एक टेनिसपटू यांची कहाणी आपल्याला माहित आहे.

टेलेन्ट असो की नसो त्यात यश ( पदक/ पदवी वगैरे वगैरे) मिळवणे त्यासाठी मेहनत करण्याची सक्ती करावी का ?

माझ्या वडिलांनी माझी आयक्यु टेस्ट करून घेतली होती. त्यांनी या मुलाचा बुध्यांक पायलट, इंजिनिअर होण्याच्या पातळीचा आहे असा निर्वाळा दिला होता. पण मला दोन्ही करायचे नव्हते. मला त्यासाठी जी मेहनत करावी लागेल ती नव्हती करायची. मला अर्थशास्त्रात BA करायचे होते. अशा परिस्थितीत पालकांनी मला इंजिनिअर व्हायची सक्ती करायला हवी का ? माझ्यात ते टॅलेंट आहे. पण मला ते करायचे नाही.
हे करणं किंवा न करणं हा मुलाचा वैयक्तिक निर्णय आहे. मुला वर तो लादला जाता कामा नये.

"कारण जगण्याची सूत्रे माणसामाणसानुसार बदलतात." या एका वाक्यासाठी तुला आख्खा धागा माफ केला!

आंद्रे आगासीला अजिबात टेनिसपटू व्हायचे नव्हते परंतू वडीलांच्या जबरदस्तीमुळे त्याला व्हावे लागले असे वाचले आहे.

आता ह्या केसमधे जबरदस्ती करूनही तो जागतिक दर्जाचा टेनिसपटू बनला हे विशेष!

कधी नव्हे ते आज ऋन्मेष ला +१ म्हणायची वेळ आली..
अगदी पुर्ण लेखाला नाही पण .. खरच मुलींना यश मिळाले नसते तर काय असं वाटत राहिलं...

मुलगा होण्याची वाट बघणं पण त्रासदायक वाटलं.. जरी तिथं (हरियाना) तसच आहे आणि
रियल स्टोरिच दाखवत होते तरी..

अजुन की जर मुलगा झाला असता तर..

आन्द्रे वयाच्या सोळाव्या वर्षी प्रोफेशनल टेनिसप्लेयर होता. मला जेवढं माहित त्यानुसार तो वीस वर्षे प्रोफेशनल टेनिस खेळत होता. एखाद्याला आवड नसतांनाही, सज्ञान झाल्यावरही सलग वीसवर्षे पोट भरण्यासाठी आंतरराष्ट्रीय टेनिस खेळायची गरज आहे असे वाटत नाही. सतत खेळायला पॅशन लागते, पॅशन आवड नसतांना येत नाही.

त्याच्याकडे टेनिसचं टॅलेन्ट उपजत होतं, ते ही नाही आणि पॅशनही नाही तर फक्त 'बळजबरी' करुन त्याचे वडील त्याला आयुष्याच्या ४० वर्षापर्यंत जागतिक दर्जाचे टेनिस खेळायला भाग पाडू शकतात तेही अमेरिकेसारख्या देशात हे मला तर पटत नाही. ते आवड नसणे कोणत्यातरी वेगळ्या संदर्भात असावे. तेच युवराजच्या बाबतीत. कॅन्सरवगैरे शी लढत आटोपून परत मैदानात उतरायचे ते वडिलांनी जबरदस्ती केली म्हणून असेल काय?

आवड नसतांना खेळत राहणे ह्याबद्दल अनेक स्पोर्ट्समन लोकांचे मनोगत सांगनारा हा लेख रोचक आहे.

https://www.theguardian.com/sport/2009/oct/29/andre-agassi-hate-tennis

मला खरेच आश्चर्य वाटतंय. आवड/टॅलेन्ट नसतांना एखादा खेळ खेळणे आणि त्यात प्रभुत्व मिळवणे , ते सतत टीकवणे कसे शक्य असते. काहीतरी आहे जे माझ्या मथ्थड मेंदूला उमजत नाहिये. Sad

अवांतरः (जस्ट फॉर फन) Wink
१. माझे ब्रेन किंवा हार्टचे एखादे महत्त्वाचे ऑपरेशन आहे आणि ते करणारा सर्जन हा मनातून सर्जरी वगैरे आवडनारा नाही, मारुन मुट्कून सर्जन झालाय असे कळले तर ..
२. मी ज्या विमानात बसलोय त्याचा पायलट मनापासून नव्हे तर मारुन मुट्कून पायलट बनलाय असे मला कळले तर..
३. मी ज्यांच्याकडून कार विकत घेतली त्या टाटाच्या कारखान्यातले सगळे इंजिनियर असेच मारुन मुटकून झालेले आहेत असे कळले तर..

अवांतर मस्तच Happy

आंद्रे आगासी ने त्याच्या आयुष्यात काय केले हा त्याचा निर्णय. पण लहानपणी त्याच्या वडिलांनी दाखवलेला अमानुषपणा हा अतिशय चुकीचा आहे.
माझा मुद्दा तो आहे. पालकांना मुलांना सक्ती करायचा अधिकार नाही. मुलांना त्यांचे निर्णय घ्यायचं स्वातंत्र्य असावे.

मुलांना त्यांचे निर्णय घ्यायचं स्वातंत्र्य असावे....

मुलांना पुर्ण माहिती असणे, आपल्यात नेमके कलागुण / हुनर / कौशल्य आहे हे माहित असणे गरजेचे आहे.
ते हुनर / कौशल्य परीपूर्ण करण्यासाठी आपल्याला कितपत शिक्षण मिळणे, मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे,
ते समजणे गरजेचे आहे.

त्या सरावाला / शिक्षणाला दिशा मिळणे, त्यासाठी कुठल्या गोष्टींचा अडथळा होत आहे ( बालसुलभ चंचलता, व्यसने, वाईट संगत ) ते समजणे आवश्यक आहे.

अजाण वयामूळे हे सर्व समजणे शक्यच असते असे नाही.

आवड/टॅलेन्ट नसतांना एखादा खेळ खेळणे आणि त्यात प्रभुत्व मिळवणे , ते सतत टीकवणे कसे शक्य असते. >> मोबदला चांगला असेल, तर दुसऱ्याचा घरची भांडीसुद्धा लोक धुतील. आपल्याकडे कितीतरी IT वाले अशीच कामे करताहेत.

खेळ म्हणजे इतर कामांपेक्षा फार वेगळा आहे, असे मला वाटत नाही. जर फार लहानपासूनचा सराव असेल, तर गोष्टी अजून सोप्या होतात. एका विशेष उंचीवर पोहोचल्यानंतर खेळाडूला जो मानसन्मान आणि पैसा मिळतो, ते पाहता खेळ आवडत नसला तरी हट्टाने पुढे नेण्यात खेळाडूला काही वाटत नसावे.
जयललिता यांचे उदाहरण वेगळे असले तरी या जागी चपलख बसावे.

उद्या लगोलग सगळ्या IT संबंधित कामातून मिळणारा मोबदला कमी झाला, तेव्हा पहा, प्रत्यक्षात किती लोक तिथे टिकून राहतात. खडतर परिस्थितीत फक्त पॅशन असलेला टिकून राहतो.

कौशल्य आणि मेहनत यात मलातरी मेहेनतीचे पारडे जाड वाटते. कौशल्य नसताना निव्वळ अपार कष्ट उपसून आयुष्यात मोठे झालेले कितीतरी लोक आहेत. पण फक्त अफाट कौशल्य असून थोडीसुद्धा मेहेनत न घेणारे फार कमी वेळेला यशस्वी झालेले पाहिलेत.

चीनमध्ये ऑलिम्पिक विजेते घडवण्यासाठी बऱ्याच लहान मुलांना मनाविरुद्द प्रशिक्षण दिले जाते, असे कानावर आल्याचे आठवते. अन चीनच कशाला, इतर देशातसुद्धा थोड्याफार फरकाने असे होत असणार. स्पर्धाच इतकी वाढलीय की वर्षानुवर्षांचा सरावसुद्धा फिका पडायला लागलाय. अगदी लहान वयापासून प्रशिक्षण सुरु करण्यावाचून गत्यंतर नाही, मग भले ते मनाविरुद्ध असेल Sad

स्पर्धाच इतकी वाढलीय की वर्षानुवर्षांचा सरावसुद्धा फिका पडायला लागलाय. अगदी लहान वयापासून प्रशिक्षण सुरु करण्यावाचून गत्यंतर नाही, मग भले ते मनाविरुद्ध असेल 
>>>>

मग हे चूक की बरोबर?

स्पर्धाच इतकी वाढलीय की वर्षानुवर्षांचा सरावसुद्धा फिका पडायला लागलाय. अगदी लहान वयापासून प्रशिक्षण सुरु करण्यावाचून गत्यंतर नाही, मग भले ते मनाविरुद्ध असेल

>> ते प्लेगृपमधल्या चिमुरड्यांना मॅथ्स चे क्लास लावणारे पालक बघून जाणवतंच. Wink

प्ले गृप मध्ये मॅथ्सचा क्लास?????

कीव येते अशा पालकांची.

पहिली दुसरीतल्या मुलांना काहीतरी फोनेटिक्स म्हणून पण क्लास लावतात असे ऐकले. तिथे जाऊन काय तर उच्चार शिकवतात.

दिनेश. | 27 December, 2016 - 15:14 नवीन

मुलांना त्यांचे निर्णय घ्यायचं स्वातंत्र्य असावे....

मुलांना पुर्ण माहिती असणे, आपल्यात नेमके कलागुण / हुनर / कौशल्य आहे हे माहित असणे गरजेचे आहे.
ते हुनर / कौशल्य परीपूर्ण करण्यासाठी आपल्याला कितपत शिक्षण मिळणे, मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे,
ते समजणे गरजेचे आहे.

त्या सरावाला / शिक्षणाला दिशा मिळणे, त्यासाठी कुठल्या गोष्टींचा अडथळा होत आहे ( बालसुलभ चंचलता, व्यसने, वाईट संगत ) ते समजणे आवश्यक आहे.

अजाण वयामूळे हे सर्व समजणे शक्यच असते असे नाही.>>>>>>>>>>

दिनेश सर,
तसे करण्यासाठी कोणी मार्गदर्शन करणे जरुरी आहे, असे मुलांना वाटायला पाहिजे किंवा वाटू शकते का ?
अथवा आपले मुलं काहीतरी करतय आणि त्यासाठी त्याला आपण मार्गदर्शन करावे असे एखाद्या पालकाला वाटले आणि पालक तसे करू लागले तर तीही जबरदस्ती होते का? मी जस्ट विचारतेय....

रणछोडदास चांचड, निकुंभ मास्तर आणि महावीरसिंग फोगट ह्या तीन व्यक्तींची विचारसरणी एकच असावी अशी अपेक्षा कशी काय करतात बुवा लोक?
>>>>

किंबहुना यातील फरक लक्षात घ्या हेच तर सांगायचे आहे.
ईडीयट्स आणि तारे जमीन पर मधील विचारसरणी सर्वसाधारण केसेसमध्ये आयडीयल आहे.
पण दंगल ही स्पेशल केस आहे. म्हणून त्या प्रभावाखाली ऊगाच येऊ नका हेच म्हणने आहे.

माझे मत या बाबतीत तळ्यात मळ्यात आहे. खेळाडू अगदी लहान वयात स्वतःच्या इच्छेने झोकून देऊन मेहनत करत असेल तर, इन्शाल्लाह, कोणाला नकोय ?इथे तक्रार करायला जागाच नाही. अशी स्थिती कधीही उत्तम.

पण वास्तव असे, की असे बऱ्याच कमी वेळेला घडते. सिंधूचे प्रशिक्षक गोपीचंद यांनी मुलाखत देतानाचे एक वाक्य अजून लक्षात आहे - "ऑलिम्पिक सामने संपल्यावर मी सर्वप्रथम काय केले, तर सिंधूचा मोबाईल तिला परत केला. "

उद्देश भले चांगला असेल, पण इतक्या दीर्घ कालावधीत तिला आपल्या मित्रांशी/आई-वडिलांशी बोलावे असे वाटत नसेल? थोडा विरंगुळा म्हणून नेटसर्फिंग करावे असे वाटत नसेल? तिने स्वतःच्या मनाने हा निर्णय घेतला तर ठीक आहे, पण तिने/तिच्या कोचने तिच्या मनाविरुद्ध या गोष्टी केल्या असल्या, तरी त्या चुकीच्या कशा ठरतील?

जेव्हा ऑलिम्पिक सारख्या जागतिक दर्जाच्या स्पर्धेची गोष्ट येते, तेव्हा तुमचा सामना अक्षरश: सगळ्या जगातल्या सर्वोत्तमाविरुद्ध असतो. जेव्हा इकडे आपले धावपटू पळभर विश्रांती घेत असतात, तेव्हा आफ्रिकेतले अनेकजण जिवाच्या आकांताने उर फुटेस्तोवर धावत असतात. एकेक मिलिसेकंदाने जेव्हा हातातले पदक हुकते, तेव्हा वेळ निघून गेलेली असते. अशा तगड्या स्पर्धेत खेळाडूला आपल्या आवडीनिवडीला मुरड घालावीच लागते, त्याची इच्छा असो व नसो.

मलातरी वाटते की बहुतांश ऑलिम्पिक खेळणाऱ्यांची परिस्थिती अशीच असावी. एकेकाळी खेळाची आवड म्हणून त्यांनी सराव केलादेखील असेल, पण दरवेळी आपल्या मनाला घालावी लागल्याने कालांतराने तोच खेळ आवडेनासा होत असेल. मग पदरी पडले आणि पवित्र झाले, अशा मनस्थितीत जितका होईल तितका सराव (अनेकदा मनाविरुद्ध) करतात, खेळाडू स्वतः करत नसतील तर कोच जबरदस्तीने करवून घेतात. त्यांना तरी सगळा दोष कसा देता येईल, स्पर्धेचे स्वरूपच खूप मोठे आहे, जितके कराल तितके कमी.

अपर्णा, तोच माझा मुद्दा आहे.

आपला कल ओळखणे आणि तो जोपासणे.. हे लहान मूलांना शक्यच नसते. ते पालकांनी किंवा इतर तज्ञ लोकांनी ओळखायचे असते. पण त्यांची स्वतःची जिद्द आणि त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या आकांशा लादणे गैरच !

ते प्लेगृपमधल्या चिमुरड्यांना मॅथ्स चे क्लास लावणारे पालक बघून जाणवतंच >>

खरंय. चीड येते हे पाहून. Angry
बौद्धिक क्षमता किंवा अंगभूत कलाकौशल्ये फक्त जास्तीच्या सरावाने फारश्या बदलू शकत नाहीत. मैदानी,मेहेनतीच्या खेळाचे मात्र गाडे सरावाशिवाय पुढे जात नाही, जितका जास्त तितका चांगला.

विलभ चा मुद्दा आहे तो स्पर्धेचा.
तूमची ईच्छा असो वा नसो, स्पर्धा टाळता येत नाही..

पण हे देखील तूमच्या मानण्यावरच आहे. स्पर्धा स्वतःशी देखील असू शकते. !
तूमचे ध्येय काय आहे. ऑलिंपिक मेडल मिळवायचे ? आणि ते मिळाल्यावर पुढे काय ?

आपले समाधान होईपर्यंत प्रयत्न करत राहणे महत्वाचे. मी अल्पसंतुष्ट पण असू शकेन. पण ते ठरवायचे स्वातंत्र्य हवे.

Pages