'सैराट'मय कविता

Submitted by जव्हेरगंज on 11 May, 2016 - 11:41

====================================

स्टार्टींग विथ् चारोळ्या...

°°°°
झुडपात जाऊन तोंडाला
लय फासलाय साबण
चाललू हिरीत मुटका मारायला
तर आरची म्हणली " हु म्हागं"

- लंगडा प्रदीप

°°°°°°

केळीच्या बागा तुडवून
पाय दुखतात सारखे
आसं काय करती येड्यावणी
"घरची उठत्याल की आरचे"

- परश्या

==================================
"सैराट"मधल्या एक-दोन कविता (नोटीस बोर्डावर लावलेल्या, आठवतंय का?) जशाच्या तश्या खाली टाकतोय! मला तर आवडल्या !! तुम्हाला?
•••••••••

तू

तू वर्गात
मी सर्गात
तू गैरहजर
मी नर्कात

तू हसलीस
माझा सुकाळ
तू रुसलीस
माझा दुष्काळ

माझ्या जीवनात
आता फक्त तू
फक्त तू फक्त तू..

- प्रदीप बनसोडे (कवी)
(एफ.वाय.बी.ए.)

•••••••••

मुके पैजण

एकटेपणाचे हे जीवेघेणे तट
तू आता भराभर ढासळून टाक
पुन्हा कधीच न बांधण्यासाठी
फाटलेल्या आभाळाला
टाके घालून सांधण्यासाठी

कारण
आता मी माझ्याकडचा रस्ता
झाडून पुसून साफ केलाय
तुझ्या पायातल्या
मुक्या पैजणाला
मुक्त गाणी गाण्यासाठी !

- प्रशांत काळे
(एफ.वाय.बी.ए.)

====================================
हे झालं पहिल्या भागाविषयी! दुसरा भाग पाहूनही एक कविता मनात आली, ती खाली देतोय !
•••••••••••••••••••

आज पुन्हा हरायचंय
जीवाला सावरायचंय
दोन अश्रू ओघळले तरी
थोडं अजून जगायचंय

एका गोधडीचा संसार माझा
भुईवरच मांडायचाय
साजणाच्या संगतीत आता
धुळीतच स्वर्ग शोधायचाय

तांदूळ, डाळ, गोधडी, खाट
सोललेल्या लसणाच्या पाकळ्या
एक झाडू, भर्रर स्टो, ढेकणाचं औषध
अन बरंच काही....
बस्स,
थोडं अजून जगायचंय

- एक होती आरची

====================================

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सैराट -2

आर्चि आणि परशाच्या खुनानंतर त्यांच्या मुलाला एक मुस्लिम यास्मिन दीदी उचलते आणि त्याचा जीव वाचविण्यासाठी त्याला घेवून मुंबईला पळून येते तो मुलगा( अमर ) मोठा होतो आणि मुंबईच्या कॉलेज मध्ये त्याचं एका मुलीवर ( राणी ) प्रेम जड़त आणि ती मुलगी म्हणजे प्रिन्स दादा पाटील यांची एकुलती एक सुकन्या आपल्या घरच्यांचा अपमान झाल्यामुळे आणि वडीलांनी आत्महत्या केल्यामुळे प्रिन्स दादा पाटील पण मुंबईला स्थायिक झालेला असतो
त्याची मुलगी ( राणी ) व परशाचा मुलगा ( अमर ) एकमेकांवर जिवापाड प्रेम करतात व 2-3 गाणी पण गातात ( ती सर्व अर्थातच अजय-अतुलचीच) आपल्या मुलीच लफडं एका मुस्लिम मुला बरोबर आहे असे समजताच प्रिन्स दादा पाटीलच्या डोळ्यासमोर आर्चि आणि परशा येतात
त्यांना एकमेकापासून वेगळे करण्यासाठी तिला घेवून बिटरगावाला परत येतो इकडे यास्मिन दिदि अमरला तू माझा मुलगा नसून तुझे आई वडील अर्चना आणि प्रशांत आहेत व तुझ्या आई वडिलांना तू लहान आसताना कुणी तरी मारून गेलं आणि तिथून पुढं तुझा संभाळ आम्ही केला अशी सर्व खरी हकिकत अमरला सांगून टाकते हे ऐकून अमरला धक्का बसतो

Interval

आपल्या आईं वडीलाचा इतिहास जाणून घेण्यासाठी अमर बिटरगावाला येतो तिथंच त्याला त्याची प्रियसी राणी म्हणजेच प्रिन्स दादा पाटील यांची मुलगी पुन्हा भेटते तिला पण बिटरगावाला आल्यावर आर्चि आणि परशा यांच्या प्रेमाविषयी व त्यांचा खुन आपल्याच बापानं केला असल्याचे समजते ती हे अमरला सांगते याच दरम्यान अमरला प्रदिप ( लंगड्या), सलीम आणि आनी (आर्चिची मैत्रीण) भेटतात आणि झालेली हकीकत सांगतात आणि मग अमर आपल्या आई-वडीलांच्या खुनाचा बदला घ्याण्याचे ठरवतो त्याला सर्व बिटरगाव पाठिंबा देतं त्यासाठी अमर हवेली वर जातो आणि मोठ्या चलाखीने व हुशारीने प्रिन्स दादा पाटील याच्या तोंडून त्यांचा गुन्ह्याची कबुली संपूर्ण बिटरगावापुढे देण्यासाठी भाग पाडून त्याला पोलीसांच्या ताब्यात देतो (येथे छोटीशी हाणामारी ) कोर्ट त्याला फाशीची शिक्षा देते. सर्व बिटरगावाचे गावकरी अमर आणि राणीचे मोठ्या थाटात लग्न लावून देतात व त्यांना शुभ आशिर्वाद देतात

The End
( The End ला नावे दाखविताना Background ला हे गाणं )
पैस देन घेण पटत नाही मनाला आणि हुन्डा नको मामा फक्त पोरगी द्या मला
( गायक आणि संगीत अर्थातच अजय गोगावले )

व्हाटस् अप्पांकडून सा भार.

कविता, Happy

त्या एखाद् क्षणही पूर्ण न दिसलेल्या कविता तुम्हाला कशा काय दिसल्या? Wink

>> नोटीस बोर्डावर लावलेल्या, आठवतंय का?

त्यावर प्रदीप बनसोडे दिसलेलं आठवतंय. हे कवी म्हणले लंगडा प्रदीप हे कळलंच नाही तेव्हा.

अगदीच भा प्र, या कविता तुम्ही केल्यात, का सैराट मध्ये होत्या, का व्हाटस अपांवर आलेले रिप्लाय एकत्र करायचा इरादा आहे. जरा इस्कटून सांगा की.
कविता भारी आहेत पण. म्हंजे आरचीची मैत्रीण वाली कविता न्हवे. :p

@ सशल, चारवेळा सिनेमा उगाच नाही बघितला + फोटोशूट पण केले आहे Happy

@अमितव, लिहीलयं की हो प्रत्येक ठिकाणी जो तो संदर्भ ,

तुमच्यासाठी पुन्हा सांगतो,

वरच्या दोन चारोळ्या आणि शेवटची आरचीची कविता ही माझी आहे.

बाकी सगळं इतरांच Happy

तुमचं सैराट -2 काय समजलं न्हाय ब्वॉ..
अमर हा राणीचा आत्येभाउ होइल ना? मग अमरचं आणि राणीचं लग्न होइल का? (नक्की माहिती नाही म्हणुन इचारतोय, प्रेम होउ शकेल कारण ते नातं आधी माहिती नाही असं गृहित)

@विलभ, पडत्या फळाची आज्ञा मानून lyrics खास तुमच्यासाठी Wink

हळद पिवळी ,पोर कवळी ,जपुन लावा गाली
सावळ्याच्या ,चाहुलीनं ,पार ढवळी झाली.
गजर झाला दारी , साजनाची स्वारी .
साजनाची स्वारी आली लाज गाली आली

जपुन होतं ठिवलं मन ह्ये कधीच न्हाइ झुरलं
उधळलं गं समदं बाई हातात न्हाइ उरलं
जीव जडला पर न्हाइ नजरंला कळलं
किती नडलं जिकीरीनं मागं ना सरलं
आत्ताच बया का बावरलं
खरचं बया का घाबरलं

साद तू घातली, रान पेटून आली
कावरी बावरी, लाज दाटून आली
पाहिलं गुमान बाई, घेतलं दमान बाई
चेतल तुफान, साजना
बेभान झाले साजना
नजरला नजरच, नजरन कळलं
मन इवलं, इरघळलं
अन नातं जुळलं
आताच बया का बावरलं
खरच बया का घाबरलं

मन झालं धुंद, बाजिंद, ललकारी गं
पिरतीचा गंध, आनंद, नवलाई गं
लागली ओढ
लागली ओढ, मन हे लई द्वाड
सतवून झालं, समदच ग्वाड
लागलं सजनीला, सजनाच याड

झालीया, भूल ही, उमजली या मनाला
परतूनी, घाव हा, लागला र जीवाला
डोळ झाकलेल बाई, रेघ आखलेल बाई
माग रोखल्याल साजना
उधळूनी गेलं साजना
हरलया पीरमाला, पीरमानं जिकल
झगडूनी मन माझं अदबीनं झुकल
साजना तू, सावरलं

जव्हेरगंज,
डोळ झाकलेल बाई, रेघ आखलेल बाई
माग रोखल्याल साजना

मला असा प्रश्नं पडला की असं सिलेक्टिव लेलं आणि ल्यालं चा वापर बोली भाषेत कसा करतात?
एकतर 'झाकलेलं' सारखं 'रोखलेलं' असावं किंवा 'रोखल्यालं' सारखं 'झाकल्यालं' असायला हवं ना?
का ते लिरिकल लिबर्टी म्हणायची?

हायझनबर्ग चा प्रश्न Happy

मला ते "नजरंचं नजरंला नजरंनं कळलं" ह्यात "नजरनं" रिडडन्ट वाटतं. एकदम "लोकांचे लोकांसाठी लोकांनीं चालवलेले" आठवतं.

मन झालं धुंद, बाजिंद, ललकारी गं

या ओळीला ती एखाद्या सम्राज्ञीपणे वर्गात प्रवेश करते ते लईच आवडलं.
जाम फिदा त्या स्टाइलवर आणि ते इतके मस्त जमून आलेय ना.

धन्यवाद जव्हेरगंज. ग्रामीण ढंगातले संवाद म्हणजे आपला विशेष प्रांत, म्हणून विनंती केलेली.

या ओळीला ती एखाद्या सम्राज्ञीपणे वर्गात प्रवेश करते ते लईच आवडलं.
जाम फिदा त्या स्टाइलवर आणि ते इतके मस्त जमून आलेय ना
.>> अगदी अगदी.
गीताची शब्दरचना सुरेख आहे, अन श्रेयाच्या सुरांनी त्याला चार चांद लागलेत.

"आताच बया" हे सगळ्यात जास्त आवडलेलं गाणं.
सुरु होतं तेव्हा टिपिकल गावरान काहीतरी वाटतं.. फारसं इंटरेस्टिंग वाटत नाही. "गजर झाला दारी" वर आर्चीच्या दणदणीत रॉकस्टार स्वभवासारखं दणदणीत रॉक म्युझिक येतं. ते आधीच्या गावरान ठेक्याच्या पुढे इतकं अनपेक्षित येतं की एकदम वाहवा च होतं..गावरान मराठी शब्द आणि पॉलिश्ड गिटार/ड्रम्स हे काँबो खुप्पच इनोवेटिव्ह वाटलं.
मग आर्चीच्या स्वभावात हळूहळू येणारा गोडवा टिपत एकदम टिपिकल गोडगोड भावगीत होतं की काय अशी भिती वाटत असतानाच "आताच बया" पासून पुढे पुन्हा मस्त ड्रम्स आणि गिटार!
पुन्हा एक अनपेक्षित वळण येतं "मन झालं धुंद.." वर. माझा तर जीवच अडकतो तिथे. Happy ऐकतानाही आणि बघतानाही. Happy त्या एकटक बघण्याच्या सीनमध्ये दोघांनीही कमाल नॅचरल अभिनय केलाय. परश्या तर लई ग्वाड Happy
अजय अतुलची बेस्ट काँपोझिशन्स म्हणजे सैराट! एकदम मजा आली.. मात्र अगदी बारीकसारिक मजा कळायला चांगल्या हेडफोन्सवर ऐकलं पाहिजे.
मला तर "अजय अतुलचं म्युझिक म्हणजे दाणदाण ढोल-ताशा" वगैरे टाइप कमेंट्स देणार्‍यांचं नवलच वाटतं की ह्यांनी नक्की ऐकलं तरी काय? Proud

मला पण "आताच गं बया का बावरलं" हेच गाणं जास्त भावलं. लिरिक्स तर भारीच आहे, पण प्रत्येक कडव्याबरोबर शब्दांना अनुरुप असा चित्रण करण्याचा फ्लो आहे.

"कावरी बावरी, लाज दाटून आली..." बरोबर अर्ची आरशात बघुन लाजते.

"मन झालं धुंद.. " च्या आधी परश्या आर्ची आली नाही म्हणून कसा बेचैन झालेला असतो आणि ज्या तोर्‍यात येते नि नजरेला नजर देत राहते तेव्हा लाजेने चुरचुर होत जाणारा परश्या हे मस्त टिपलंय.

"लागलं सजनीला सजनाचं याड.." या क्षणाला आर्ची बाकावर बसत, परश्याकडे बघायला लागते.

सगळ्या गाण्यांप्रमाणे या गाण्याचे पण पिक्चरायझेशन छानच केलेय. पण यातल्या काही फ्रेम मात्र अतिशय उत्तमच आहेत. उदा: एक फ्रेम ज्यात झुडुपांवरुन अर्ची ओढणीची कडा फिरवत जाते, ती आरशात बघुन टिकली लावतानाची फ्रेम

मला तर "अजय अतुलचं म्युझिक म्हणजे दाणदाण ढोल-ताशा" वगैरे टाइप कमेंट्स देणार्‍यांचं नवलच वाटतं की ह्यांनी नक्की ऐकलं तरी काय?
>> +१

एका मुलाखतीत नागराजने म्हटलेल्या दोन कविता खाली देत आहे! (नागराज मंजुळे लिखित)

•••••••••

आम्ही दोघे मित्र
एकमेकांचे जिवलग
एकच ध्येय
एकच स्वप्न
घेऊन जगणारे

पुढे,
त्याने आत्महत्या केली
आणि मी कविता लिहिली

•••••••••

उजाडताना मी
माझ्यावर कवितेनं धरली सावली
कुणास ठाऊक,
कशी मनात अंकुरली कविता
पृथ्वीला कशी सुचली झाडे?

कविता मस्त. पिक्चरमध्ये वाचेवाचेस्तोवर कॅमेरा हलला त्या कवितांवरुन Happy तुमच्याही कविता एकदम सैराट स्पिरिटमध्ये आहेत.

पुन्हा एक अनपेक्षित वळण येतं "मन झालं धुंद.." वर. माझा तर जीवच अडकतो तिथे. स्मित ऐकतानाही आणि बघतानाही. स्मित त्या एकटक बघण्याच्या सीनमध्ये दोघांनीही कमाल नॅचरल अभिनय केलाय. परश्या तर लई ग्वाड Happy >>> अगदी, अगदी...+१०० !!

Pages