माझे बाबा,मला उलगडलेले - डायरीच्या नोंदीतून.भाग दहा

Submitted by किंकर on 25 July, 2015 - 11:21

भाग एक - http://www.maayboli.com/node/54368

भाग दोन - http://www.maayboli.com/node/54425

भाग तीन - http://www.maayboli.com/node/54450

भाग चार - http://www.maayboli.com/node/54489

भाग पाच - http://www.maayboli.com/node/54490

भाग सहा - http://www.maayboli.com/node/54566

भाग सात - http://www.maayboli.com/node/54601

भाग आठ - http://www.maayboli.com/node/54666

भाग नऊ - http://www.maayboli.com/node/54711

डायरीतील नोंद -- असलेली.
नागपूर सकाळी सोडल्यावर मध्यंतरी प्रवासात एक कॅन्सर झालेल्या बोलू,खावू न शकलेल्या माणसाची गाठ पडली. विलासपूरचा प्रवास श्रीवास पोस्टल क्लार्क यांचे बंधू मुळे घडून आला.

घरी आजारी माणसास घेऊन जाताच,हॉस्पिटलची चौकशी सायकल रिक्षात असतानाच झाली. परंतु घरात कोणी माणसे नाहीत का? यांचे भाऊ कोठे आहेत ? म्हटल्यावर अगोदर घरी उतरून घेतले.बरोबर घरी पोचण्याकरिता स्टेशन-पोस्ट ऑफिस मधला पेंडर रोडचा माणूस,रिक्षावाला, पोस्टल शिपाई पुरषोत्तम या सर्वांनी सहकार्य दिले.

पोहचल्यावर त्याची व्यवस्था लागल्यावर निघावयाचे तेंव्हा त्यांनी थांबून जा म्हटल्यावर जेवून निघालो.परंतु जेवण्यास मन होईना.तो वाचावा अशी भावना व भगवंताजवळ तसा मनोदय.

परंतु घरी आल्यावर एकटा, लग्न न झालेला ,आजारामुळे खंगलेला हे सर्व पाहून त्यांचे भावाला विनाशोक कर्तव्य करावे,म्हणून निरोप घेतला व काय ती भगवंताची मर्जी म्हटले.

---------------------- X ----------------------

विलासपूर ते हौरा पैसे नाहीतT.C..ला कसे तोंड द्यावयाचे असे काही विचार मनात नसता T.C.आल्यावर तिकीट तिकीट म्हटल्यावर नुसताच बसून,तर पुढे बंगाल मध्ये शिरण्यापूर्वी सकाळच्या वेळी काही खात असता तसेच खाणे पुढे चालू ठेवले. त्यावेळीही कोणतीही T.C.कडून चौकशी न होता प्रवास निर्विघ्न पार पडला.

रात्री दुसरी मुंबई असलेले अफाट कलकत्ता पाहून मन काही दडपल्यासारखे झाले. मी अंधारात पाऊल टाकीत नाही ना ? तथापि Light has always guided me म्हणून धीरही.

बोगदा. आत वस्ती करून असणाऱ्या माणसांबद्दलच्या जीवनाचे विचार, तसे म्हटले तर रात्र पडल्यावर सारे जग अंधारातच बुडून जाते.व आपण बोगद्यातच राहतो.दुसरी कशाचीही अशा नसलेल्या मनुष्यास खावयास कसे मिळते,याचा विचार करावा लागतो काय? का तो विचार मनात येतो?

आज सकाळी हुगळी नदीत स्नान करून रामकृष्णांच्या तपोभूमीचे दक्षिणेश्वराचे दर्शन घेतले. काळी बाजूस पाच पिंडी यनेश्वर, जलेश्वर etc.अजून सर्व इतिहास समजून घ्यावयाचा आहे

एका खोलीत काही(बंगाली)पहात असता एक म्हातारा काही समजते का? म्हणून विचारात होता.नाही म्हणालो.पुन्हा काही वेळाने त्याची बाहेर गाठ पडली.वय वर्षे ८० संधिवाताचा विकार,बायको वारून २४ वर्षे झाली.तरी मला इथे आले पाहिजे ही भूमी पवित्र आहे इथल्या मातीने रामकृष्णांचे विचार शोषून घेतले आहेत (soaked ) त्या महापुरुष्याच्या सांगण्याकरिता,मला इथे आले पाहिजे

मला उद्देशून तो म्हणाला ( Face reading ) You have caunestness कळकळ मनाची शुद्धता वाढली पाहिजे. रामकृष्णांना सरस्वती प्रसन्न होती म्हणजे काय? केवळ सरस्वतीच प्रसन्न होती काय? असा माणूस ५०० वा हजर वर्षात होणार नाही तसेच श्रद्धा काय करू शकते.या बद्दलच्या ओळी.

बेलूर मठात संध्याकाळी सरस्वती पूजा. भजने साष्टांग नमस्कार मी देवी समोर जाऊन केला तेंव्हा ते प्रमाम बाहेरून केला तरी चालेल असे म्हणाले. गुढघे टेकून नमस्काराची इथे पद्धत दिसली. पतंग आकाशात ३५ते ४० दिसले

दक्षिणेश्वराजवळच्या लोकल स्टेशनाजवळ एक बाई बरोबर आणि २-३ पुरुष स्त्री ( तरुण) व एक पुरुष वर्दळीवर आले रस्त्यावर भांडण .दुसऱ्या एकास कारण विचारता मोहबातीत अंतर पडले दुसरे कारण काय असणार?

स्टेशनवर पुरी भाजी खाल्यावर पानावर जे राहिले ते चाटावयास मागितले (लहान मुलगा)त्याने अंग शहारले what hoorible

----------------------x --------------------------

आज कालीच्या देवळात ( कलकत्ता ) सकाळी ट्रामने गेलो. आयुष्यात प्रथमच ट्राममध्ये बसलो.तिथे दोन दोन चिठ्या तयार केल्या?
१. सौ. वती व मुलांची आर्थिक जबाबदारी स्वीकारणे ,२. सौ. वती व मुलांची जबाबदारी भगवंतावर टाकून निश्चिंत होणे, व जी चिट्ठी निघेल त्याप्रमाणे वागायचे ठरवून दोन्ही पैकी कोणताच निर्णय स्वतः घेण्यास असमर्थ असल्याने असा कौल लावायचे ठरवले.

चिट्ठी पुजाऱ्याच्या संबंधी १०-१२ वर्षाचे मुलाने उचलली व तोच काली प्रसाद मानावयाचे ठरविले निर्णय सौ.वतीचे बाजूने लागला. इथेही १रु.ठेवा असा आग्रह परंतु पंढरपूरची बडवे गिरी नाही

देवळातून २-३ तासानंतर शांत चित्ताने बाहेर पडलो व हौरा स्टेशनचा रस्ता विचारात पायी चालावयास सुरवात केली.जाताना सेंट पॉल कॉथेड्रोल व त्यापलीकडे दिसणारी पांढरी शुभ्र व्हिक्टोरिया मुझीयमची इमारत पाहिली.

व्हिक्टोरिया प्रजा वत्सल दाखवण्या करिता इमारतीवर एका बालकाला दुध पाजणारा,तसेच बालकाला ८-९ वर्षाच्या जवळ घेतलेला पुतळा.राज निष्ठेची शपथ घेतली जात आहे असे देखावे.राज्य रोहणाची मिरवणूक हत्ती घोडे जात आहेत असे bronze structure कर्झन , रिपनचे पुतळे पहावयास मिळाले.व अवघ्या ६५ वर्षाहूनहि थोड्या काळात कर्झनशाहीचा अस्त होऊन काळ बदलल्याची जाणीव.

राज्य रोहणाच्या व शपथे च्या प्रसंगी दहशतीचा भाव, हर्ष एकाच्या चेहऱ्यावर नाही.सातव्या एडवर्ड चा अश्वारूढ पुतळा.शीर झुकलेले, गर्वोद्धत वाटला नाही नेहमीपेक्षा वेगळी पोझ

विस्तृत आकार जलाशय.पुढच्या बाजूस व्हिक्टोरिया राणीच्या हातात पृथ्वीचा गोल असून दुसऱ्या हातात राजदंड असावा. प्रवेश दारावर दोन संगमरवरी सिंह दारावर त्या राजवटीचे सील. जिन्याचे पॉंलिश कालच केल्या सारखे ताजे. ६५ वर्षानंतरही, पितळी तोफा. आतील भाग बंद. असून सैनिकी पहारा.

अंधार झाला. सरस्वती विसर्जनाच्या मिरवणुका ट्रक मधून. एका मोठ्या मैदानातून बाहेर पडल्यावर Hevay traffic .१० अंक मोजावयाच्या आत ५ मोटारी पास थोडाही खळ नाही पायी रस्ता ओलांडणे कौशल्याचे काम. बहुतेक पायी प्रवास. रस्ता विचारल्यावर शार्ट कटने न जाता रहदारीच्या रस्त्यावरून जावे व इधर उधर न घुसना असा सल्ला.

हलवायाने जिलबी देताना भगवान काय म्हणाला? असा प्रश्न केला. तोच दुसरीकडून चोरी करू नको असा आवाज आला हावडा स्टेशन वर झोप. (क्रमशः)

डायरीतील नोंद-मला समजलेली -

या टप्यात घर सोडल्यापासून त्यांनी मनाशी निश्चय करून ठरवलेले काली मातेचे दर्शन घेण्यात त्यांना आलेल्या यशामुळे मला आजही मनास समाधान वाटते.
अर्थात घर सोडून मातेच्या दर्शनाची ओढ मनात असताना त्यांची सामाजिक कर्तव्याची जाण जागरूक असल्याचे दिसते. नागपूर सोडल्यानंतर वाटेत आजारी परंतु अपरिचित व्यक्तीची भेट होताच सर्वतोपरी मदत करीत त्यांनी त्या व्यक्तीस सुखरूप घरी पोहचवले आहे.

पुढे प्रत्यक्षात कोलकता येथे आगमन झाल्यावर तेथील गर्दी, गजबज यांनी आलेले भारावलेपण,अन्य भाविकांचे रामकृष्ण यांचे बद्दलचे मत, गरिबीतील लाचारी,या प्रसंगानि त्यांचे मन हेलावले आहे.

रामकृष्ण मठाचे दर्शन पार पडल्यावर दुसरे दिवशी कालीमातेचे प्रत्यक्ष दर्शन. त्या दर्शनास जातानाच ते एका निश्चित उदेशाने तिथे गेल्याचे नोंदीतून स्पष्ट होते.

घर सोडून हा सुरु केलेला प्रवास असाच सुरु ठेवावा कि संसारात परत जावे? या द्विधा मनास्थितीस उत्तर त्यांनी देवीकडे 'कौल' स्वरुपात मागितले. त्यांचे उत्तर घरी परत जा. असे आले. आणि त्यांनी तीन तासांपर्यंत बसून देवीची मूर्त मनात साठवून, त्यादिवशी अतिशय शांत चित्ताने परतण्याचा निर्णय घेतला.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमच्या बाबांचा हा साराच प्रवास अतिशय विलक्षण आणि एका अनामिक प्रेरणेतून घडलेला - पण त्यांची जिद्द, श्रद्धा यांना दंडवतच ...

राया , साती , झकासराव - धन्यवाद !
पुरंदरे शशांक - चाळीस वर्षांपूर्वीची प्रवास साधने ,सोयी सुविधा यांची उपलब्धता आणि त्यांची त्यावेळची निष्कांचन अवस्था पाहता , आपले मत सर्वथा योग्यच आहे . आभार !