मुंबईकरांचे अच्छे दिन केव्हा येणार ..

Submitted by ऋन्मेऽऽष on 15 June, 2015 - 16:35

पाऊस सुरू होऊन आठवडा झाला पण त्यात त्याने कोसळायचा मुहुर्त शनिवार रविवार विकांतालाच साधल्याने त्याच्याशी आमनेसामने असे दोन हात झालेच नाहीत,
पण आज पाऊसाने दिवसभर तुरळक संततधार काय लावली संध्याकाळी घरी पोहोचायचे वांधे झाले. नाही हो, छत्री बरोबर होती पण पटरीवरची ट्रेन रखडली होती. कुठून पकडली आणि कुठे पोहोचायचे होते, तेवढे विचारू नका. पण सुरूवातीचा ८० टक्के प्रवासाला जेवढा वेळ लागला तेवढाच वेळ शिल्लक २० टक्के कापायला लागला.

आता ज्यांना हे सवयीचे झालेय ते इथेच धागा सोडून पसार होतील. पण अरे थांबा. आता चालायचंच, म्हणत कधीपर्यंत हे चालवून घेणार. मध्यंतरी सरकारने लोकल ट्रेनच्या भाड्यात वाढ केली होती. थेट दुप्पट केले होते. तेव्हा सारे कसे पोटावर पाय पडल्यासारखे कळवळून उठले होते. मग तसे रोज गळा आवळला जाताना का नाही चवताळून उठत. रोज श्वास घुसमटला जाताना का नाही एखाद्या दिवशी धुमसून बाहेर पडत. स्साला काय लाईफ आहे आपली! वेळेला काही किंमत आहे की नाही आपल्या!.. आहे ना, ओवरटाईमचे तासाला तीनशे रुपये मिळतात! आज पाऊण तास एक्स्ट्राची ट्रेनमध्ये झक मारली. तीच जर ऑफिसच्या एसीमध्ये मारली असती तर सव्वादोनशे रुपये सुटले असते. थोडक्यात सव्वादोनशे रुपयांचे नुकसान झाले.. अन भरपाई शून्य!

तरी बरेय आपला फर्स्टक्लास आहे. उलट्या दिशेच्या ट्रेनला गर्दी कमी आहे. बसल्याजागी थोडे पाय ऐसपैस पसरता येताहेत. पण समोरच्या ट्रॅकवर रखडलेली ट्रेन. तिचा सेकंडक्लासचा डब्बा. आणि दारावर लटकलेले स्त्री-पुरुष!.. हो, पुरुष आणि स्त्री सुद्धा! काय बोलणार त्यांना. या ताई, तुम्ही बसा. मी उठतो. पण आमची ट्रेन तर उलट दिशेला चाललीय. मग तुम्ही तुमच्या घरी कश्या पोहचाल. आपले काय, घरी तासभर लेट पोहोचलो तरी फिकीर नॉट. आयुष्यातील फुकट जाणारा पाऊण तास, बसल्याजागी मोबाईलवर सत्कारणी लाऊ. स्टेशनला ऊतरून वडापाव खात घरी जाऊ. पण आपली चिल्लीपिल्ली वाट बघत असतील. आज आपला कूकर उशीरा लागला तर त्यांनाही जेवण लेट मिळेल. ऑफिसचा लेटमार्क जास्तीचे थांबून भरून काढाल, हा कसा भराल.

काही हरकत नाही. थोडे ऊशीरा पोहोचाल. पण जरा जपून जा. आपला जीव जास्त मोलाचा. थोडी रग लागली हाताला म्हणून दांडा सोडू नका.

बुलेट ट्रेन येतेय आता मुंबईत.. मुंबई ते गुजरात. १८ हजार कोटी! काल पेपरात वाचले. एवढा खर्चा करताहेत, तर कोणाचे तरी भले होणारच असेल. कोणाचे तरी अच्छे दिन येणारच असतील. पण त्यातून मिळणारा थोडा महसूल ईथेही वापरा. ज्या मुंबईतून ही बुलेट ट्रेन सुरू करत आहात त्या लोकल मुंबईकरांचा प्रवासही थोडा सुसह्य करा. अडकलेल्या ट्रेनमध्ये तळमळणार्‍या आत्म्याची ही ईच्छाच समजा. सुखकर नाही, बस्स सुसह्य.

या वरच्या पॅराग्राफमध्ये राजकारण शोधायला जाऊ नका. लेखातही शुद्धलेखनाच्या चुका शोधायला जाऊ नका. त्या होतच राहतात. मोबाईलवर लिहीत असल्याने जरा जास्तच असतील. तरीही छोटी छोटी वाक्ये. सोपे सोपे शब्द. छोट्या छोट्याश्याच तुकड्यातील, साधे सोपे आयुष्य. पाऊण तास असा वसूल केला.. चार ओळी खरडून.. मन मोकळे करून.. मूड चांगला लागला असता तर पावसावरच्या चारोळ्याच खरडल्या असत्या.. पण काही हरकत नाही, बेटर लक नेक्स्ट टाईम.. उद्या पुन्हा अडकली ट्रेन तर पुन्हा भेटूया.. तुर्तास शुभरात्री शब्बाखैर खुदाहाफिज.. ऋन्मेष.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.........

मुम्बईतली गर्दी कमी झाल्याशिवाय समस्या सूटायच्या नाहीत.
आहे ते इन्फ्रा अस किती गर्दीला पुरेस आहे ह्याचा कधी विचारच झाला नसेल.

आता ज्यांना हे सवयीचे झालेय ते इथेच धागा सोडून पसार होतील.
>>
खरच रे. खुपच सवयीचे झालेत तुझे घागे आता. काही नाविन्य राहिले नाही.
बघ आता तुलाही जाणिव होते आहे की तुझ्या धाग्यात पहिल्या पॅराच्या पुढे वाचक थांबवुन ठेवण्यसाठी तुला हात पसरावे लागतात. वाचक स्वतःहुन थांबत नाहीत.

कुठून पकडली आणि कुठे पोहोचायचे होते, तेवढे विचारू नका>>
एवढा का घाबरतो स्वतःची खरी ओळख उघड करायला?

एवढा खर्चा करताहेत, तर कोणाचे तरी भले होणारच असेल. कोणाचे तरी अच्छे दिन येणारच असतील
>>
किती ती मिरची झोंबली! (मिर्ची ताई तुम्ही नव्हे!).

बाकीचे तुला टपली मारुन मजा घेत असताना मी मागे राहू नये म्हणुन वाचतो मी तुझे लेख. बाकी काही नाही.

तुरळक संततधार >>>> बहुतेक मला मुंबईतील तुरळक ठिकाणी संततधार चालू होती असे म्हणायचे असेल. Happy
थोडक्यात रस्ता तुंबवणारा पाऊस नसूनही ट्रेन रखडायला सुरुवात.

नरेश, अनुमोदन. इथे चांगल्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवाचून पुणेकरांचे चाललेले हाल कुणालाच दिसत नाहीत.

नरेश, अनुमोदन. इथे चांगल्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवाचून पुणेकरांचे चाललेले हाल कुणालाच दिसत नाहीत.>>>>>>>>तुम्हाला दिसताहेत ना? मग तुम्ही लिहा की त्यावर.

"तुम्ही लिहा की त्यावर" ही उत्तम पळवाट आहे. समस्या फक्त मुंबईतच आहे या आविर्भावात लोक असतात म्हणून म्हणालो.

असा काही आविर्भाव नसतो. नी पळवाटेची गरज मला नाही. ज्या व्यक्तीला तो रहातो त्या शहरात जी समस्या वाटली त्याने धागा काढला. तुम्हाला काही समस्या असेल तर काढा की धागा. दुसर्‍याकडुन अपेक्क्षा करत का बसताय? उगा मुंबईच अस्सं तर पुण्याचही तस्सं का नाही ह्याला काय अर्थय?

बाकी तुम्ही ऋ चा धागा आहे म्हणून हे लिहिताय हे मला ठावुक आहे. Happy

मला "अच्छे दिन" हे शब्द दिसले म्हणून बोललो. कुठल्याही समस्येपुढे "अच्छे दिन" हे शब्द लावले की लय भारी असा समज आहे लोकांचा.

कुठल्याही समस्येपुढे "अच्छे दिन" हे शब्द लावले की लय भारी असा समज आहे लोकांचा. >>
अगदी बरोबर मनातले बोललात बघा Wink

धन्यवाद

<<बुलेट ट्रेन येतेय आता मुंबईत.. मुंबई ते गुजरात. १८ हजार कोटी!>>

फक्त १८ हजार ?? आहात कुठे?
९० हजार कोटी लागणार आहेत म्हणे. २०१० मधील एस्टिमेटपेक्षा खर्चात ४३% वाढ गेल्या महिन्यातच व्यक्त केली गेली आहे.
बुलेट ट्रेन स्टेशनातून सुटेपर्यंत आकडे अजून किती फुगणार ते आपण फक्त बघत बसायचं. अच्छे दिन आले आहेत भाऊ Wink

अहो काय ते सारखं अच्चे दिन अच्चे दिन. विषय काय? ऋ ने समस्या काय मांडलीये? वैताग आला आता त्या अच्चे अच्चे चा.

समस्येपुढे "अच्छे दिन" हे शब्द लावले की लय भारी असा समज आहे लोकांचा. >>>>>>>>>>>>>>> भारी काये त्यात? फारफारतर त्यामुळे गंभीर सम्स्या पण विनोदी होते म्हणा. Happy

मुंबईतून रेल्वेला सर्वाधिक महसूल मिळतो तरी लोकलची व्यवस्था भयानक आहे. कुठल्या लॉजिक ने हे भाडेवाढ करतायत कुणास ठावूक आता तर रेल्वेचे खाजगीकरण करण्याचे ठरवतायत. म्हणजे सरकारी उपक्रम हा जाणून बुजून तोट्यात आणायचा नि रेल्वे सारखी देशाची संपत्ती अंबानी, अडाणी ह्यासारख्या उद्योगपतींच्या घश्यात लोटून त्यांना अच्छे दिन आणायचे.ह्यात सर्व सामान्यांना कधीच अच्छे दिन येणार नाहीत .

मुंबईतून रेल्वेला सर्वाधिक महसूल मिळतो तरी लोकलची व्यवस्था भयानक आहे. कुठल्या लॉजिक ने हे भाडेवाढ करतायत कुणास ठावूक आता तर रेल्वेचे खाजगीकरण करण्याचे ठरवतायत. म्हणजे सरकारी उपक्रम हा जाणून बुजून तोट्यात आणायचा
<<
<<

पगारेंचा वरचा प्रतिसाद वाचुन मला वाटले, गेल्या कित्येक दशकांपासून महाराष्ट्रात आणि देशात भाजपाचेच सरकार होते कि काय? Happy

कॉंग्रेसच्या काळात देश गरीब होता, देशापुढे मोठ्या मोठ्या समस्या होत्या, देशावर ३ वेळा युद्धे लादली गेली,शिक्षणाचे प्रमाण कमी होते, बालविवाह, बालमृत्यूंचे प्रमाण जास्त होते ते रोखायचे होते, देशाला अन्न धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करायचे होते, धार्मिक उन्माद असणार्यांना रोखून देशाची एकात्मता राखायची होती..........

आता मात्र देश महाशक्ती झालाय, ९ लाखांचे कोट मिरवले जातात, अमेरिकी अध्यक्षांच्या स्वागतासाठी ५०० कोटी उडवले जातात नि निवडणुकीत तर हजारो कोटी नुसते जाहिरातीत वापरले जातायत. आता देशापुढचे प्रश्न काय आहेत, घरवापसी, योग दिन कधी करावा. योग न करणार्यांनी जीव द्यावा किंवा पाकिस्तानात जावे , प्रत्येक हिंदूने १० पोरे पैदा करावीत, असले फुटकळ प्रश्न आहेत. निवडणुकी साठी हजारो कोटी खर्च्घ करणार्यांनी काही हजार कोटी मुंबई लोकल वर खर्च करून त्यांना अच्छे दिन दाखवावे हि अपेक्षा...(जी कधी पूर्ण होणार नाही )

Pages