आयटम साँग पुरतीच अश्लीलता?

Submitted by KattaOnline on 21 September, 2013 - 00:56

आपण सर्वजण किती ढोंगी, खोटारडे आणि दुटप्पी वागणारे आहोत याचा अश्लील गाण्यांना टीव्हीवर बंदी घालण्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. "मुन्नी बदनाम हुई", "शीला कि जवानी" , "हलकट जवानी" अशी काही उत्तान व बीभत्स गाणी टीव्हीवर दाखवू नयेत अशी सेन्सॉर बोर्डाने शिफारस केली आहे. प्रत्यक्षात प्रक्षोभक जाहिराती व स्त्री-देहाचे भडक दर्शन घडवण्यात टीव्हीने आता इतकी पुढची पायरी गाठली आहे कि अशा गाण्यातली अश्लीलता त्यापुढे अगदीच मवाळ ठरेल.

itemsong.jpg

एकीकडे चित्रपटात उत्कट प्रेमाचा आविष्कार दाखवणाऱ्या चुंबनाही बंदी आहे. परंतु अत्यंत सूचक लैंगिकता आणि वासनेचा धगधगता आविष्कार याचे मात्र वावडे नाही. पुरुषांच्या अंतर्वस्त्राच्या जाहिराती, "डीओडरंट", "पुरुष शक्तिवर्धक औषधे" या आणि अशाच वस्तूंच्या मार्केटिंगसाठी स्त्री मॉडेल्सचा मर्यादहीन वापर केला जातो त्याचे काय? अमेरिकन संस्कृतीचे अनुकरण करायला हरकत नाही पण त्यासाठी सगळीच "सिस्टीम" तशी बनवावी लागेल. आपण सोपा मार्ग काढून फक्त वासनांध कामुकतेचे प्रदर्शन घडवत आहोत. त्यामुळे पाश्चिमात्यांचे मुक्त अनिर्बंध समाजजीवनही नाही आणि सभ्य भारतीय संस्कृतीही नाही अशा एका भ्रष्ट, बांडगुळासारख्या उपऱ्या जगण्यातच आपण विकृत आनंद घेत आहोत.

गुंड, गुन्हेगार लोक "बिग बॉस" सारख्या कार्यक्रमात मिरवत आहेत, देणग्या देवून धनिक लोक प्रतिष्ठा विकत घेत आहेत, त्यांचे कौतुकाचे सोहळे वृत्तपत्रात - टीव्हीवर रंगत आहेत हाही अश्लीलतेचाच भाग नाही का? आपल्या केजी - नर्सरीतल्या मुलींना तोकड्या कपड्यात नाचताना पाहून टाळ्या पिटणाऱ्या आधुनिक माता, अंगातले जमेल तेवढे कपडे काढून पुरुषांच्या वखवखलेल्या नजरांना खाद्य पुरवणाऱ्या मादक नृत्यांगना आणि हे सर्व प्रकार हताशपणे पहात बसलेले ज्येष्ठ नागरिक हे सर्वचजण या पापाचे भागीदार आहेत.

अश्लील आयटम सॉंगवर बंदी घातल्यामुळे सर्व आलबेल होईल असा आशावाद बाळगणे म्हणजे कोंबडा झाकण्यासारखे आहे. सर्वत्र भ्रष्टाचाराचे आणि नैतिकतेचे उन्ह रणरणत असताना दोन - चार गाण्यांवर बंदी आणून सभ्यतेची सावली समाजाला मिळणार नाही.
[मूळ लेख: कट्टा ऑनलाईन:]

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला सिमन्तिनीबाईंच्या पोस्टीच कळत नाहीत. जे विचारलेलं नाही तेच तोंडी घालून उत्तरं देण्याचा आटापिटा का करतात त्या ?
मुलींवर कपड्यांचे बंधन सांगितले त्याचा आपले मत म्हणून मी आदर करते.>> कुणी म्हटलंय असं ते दिसलं नाही.
जोवर स्त्रीने/पिडीत पुरुषाने काही काळजी घेतली तर हा प्रश्न मिटेल हि मानसिकता आहे तोवर हा प्रश्न मिटणार नाही.>> हा प्रश्न मिटेल नाही सुटेल असं कोण म्हणतंय ते काही कळलं नाही.
उघडी बाई जाहिरातीत आली आणि सेल वाढला तर तो त्या बाईचा दोष कसा?? >>> बाईला कुणी दोष दिलाय ते ही कळलं नाही.

जोपर्यंत त्यांना लोक काय म्हणताहेत हेच कळणार नाही तोपर्यंत आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी टाईप उत्तरं देत राहतील आणि टीआरपी वाढवत राहतील. मुळात प्रत्येकाच्या पोस्टला उत्तरं देण्याचा अट्टाहास का करतात त्या ? त्यांचं म्हणणं काय असेल ते मांडून मोकळं व्हायचं.

भारतातल्या सुधारणा ह्या अगदी संथपणे होत असतात. नुकतच हायकोर्टात ग्रँड्मस्ती चित्रपटावरील बंदीबद्दलची याचिकाही एक आश्वासक पाउल म्हणावं लागेल. टीव्हीवर जाहीराती (किमान आजकाल) खुप गम्भीरतेने बघितल्या जात नसाव्यात, पण गाणे (तेही आयटम साँग) जितकं जास्त वेळ बघितल्या जाईल, तितका त्याचा परिणाम, या अर्थाने सेन्सॉर बोर्डाने वरिल निर्णय घेतला असावा, असे वाटते.

काहीच होत नाही त्यापेक्षा काहीतरी होतय/ केल्या जातय, ह्याच समाधान आहे. अर्थात त्याचा वेग जास्त असावा ही अपेक्षा, पण .... असो.

असो> +१

'असो' यांचे काही मुद्दे पटतात. आदर्श परिस्थितीत ' काय असले पाहिजे ' याबद्दल शक्यतो कुणाचे दुमत असणार नाही. पण आपल्याकडच्या वातावरणात काही कोड ऑफ कंडक्ट्स पाळावे लागतात. या गोष्टी लिंगनिरपेक्ष नाहीत, हेसुद्धा खरे आहे. हे समर्थन नाही, फक्त वस्तुस्थिती सांगणे आहे. आपल्या वातावरणात स्त्रीयांच्याइतके नाही, पण पुरूषांनाही आपल्या व्यक्तिस्वातंत्र्याला काही प्रमाणात मुरड घालावी लागते. कुठलेच स्वातंत्र्य कधीही 'अ‍ॅब्सोल्यूट' असत नाही.

---------------------------------------------
स्त्रीसन्मान म्हणून कधी ४ पुरुष एकत्र आले? त्यांनी कधी कुठल्या डीओ कंपनीला इमेल केली कि तुमची जाहिरात ओफेन्सीव आहे?

हे असे कधीही घडले नाही, याबद्दल तुमची खात्री आहे काय?

चित्रपटातुन साहित्यातुन चित्रांमधुन अश्लिलता व्यक्त होत नसते तर ती पाहणा-याच्या डोक्यात असते आणि म्हणुन त्याला ती दिसते. हे स्टंडर्ड समाजात, जिथे सगळ्यांमध्ये चित्रपट साहित्य चित्रे यांच्यातल्या कलेचा आस्वाद घेण्याची क्षमता आहे, तिथे हे लागु पडते. तिथे सगळेजण निर्मळ मनाने चित्रांमधला काव्याविष्कार पाहतात, फक्त काही थोडक्या विकृत डो़क्यांना तिथे अश्लिलता दिसते.

सध्या मी ज्या समाजात राहते तो समाज फक्त विकृत डोक्यांनी भरलाय. स्त्रीचा आदर करायला मुलांना शिकवायला पाहिजे हे ठिक आहे, पण परत हे स्टंडर्ड समाजाला लागु होते. अशा समाजात जिथे स्त्री-पुरूष एकमेकांचा जोडीदार म्हणुन आदर करताहेत.

भारतीय समाजात ज्या नात्यापासुन समाजाला सुरवात होते त्या नात्यात स्त्रीला एक भोगवस्तु म्हणुन पाहिले जातेय, त्या मुळ नात्यातल्या जबाबदा-याही दोघांना माहित नाहियेत तिथे ती स्त्री आणि तो पुरूष स्वत:च्या मुलांवर कसले संस्कार करणार? त्यांना मुळात असे काय करायचे असते हेच माहित नाहीय.

मी माझ्या घरात माझ्या मुलावर आणि मुलीवर जरी एकमेकांचा आदर करण्याचे संस्कार केले तरी बाहेर जो हा प्रचंड समाज पसरलाय ज्याच्यावर याआधीही कसलेल्ही संस्कार नव्हते आणि यापुढेही कसलेही संस्कार होण्याची शक्यता नाहीय त्याचे काय करु?

मला/माझ्या मुला/मुलीला या समाजातच वावरायचे आहे, त्यांना किती दिवस मी घरात बंद करुन ठेवणार? अशा वेळी मी बाहेर पडताना माझे/मुलीचे कपडे या समाजाची नजर मुद्दाम खिळेल असे नाहीत ना याची काळजी घेणार. मी बुरखा घालुन फिरले तरीही माझा एक्स-रे पुरुषी नजरेतुन काढला जाणार आहेच, पण म्हणुन मी मला कंफर्टेबल वाटते, समाज गेला उडत म्हणत बाहेर हाफ चड्डी घालुन फिरणार नाही. अमुकतमुक कपड्यात मला कंफर्टॅबल वाटते म्हणुन मी अशा आंबटशौकिनांचा शौक का पुरवावा?

ज्या ग्रुपमध्ये माझ्या कपड्यांमुळे मला आणि इतर कोणालाही काहीही फरक पडत नाही तिथे मी मला हवे ते कपडे घालेन, पण घराबाहेर.. नो वे.

माझी मुलगी घरात कायम शॉर्ट्स घालुन असते पण खाली जाताना ती न चुकता त्यावर स्कर्ट चढवुन जाते कारण लोकांच्या वाईट नजरांचा तिने अनुभव घेतलाय. तिला शॉर्ट्स आवडतात यात तिचा दोष काहीच नाहीय, पण बाहेर आपली काळजी आपणच घ्यायला हवीय हे ती शिकलीय आता.

मला सिमन्तिनीबाईंच्या पोस्टीच कळत नाहीत<<<

मलाही त्यांच्या पोष्टी कळत नाहीत.

ही टीका नव्हे. फक्त त्या कोणाला उद्देशून काय आणि कोणत्या बाजूने म्हणत आहेत ते समजतच नाही.

मी मला कंफर्टेबल वाटते, समाज गेला उडत म्हणत बाहेर हाफ चड्डी घालुन फिरणार नाही. अमुकतमुक कपड्यात मला कंफर्टॅबल वाटते म्हणुन मी अशा आंबटशौकिनांचा शौक का पुरवावा?<<<

या संदर्भात ओळखीतल्या, आजूबाजूला राहणार्‍या अनेक स्त्रियांची मते अगदी अशीच आहेत.

अरे वा!! एकदम नवीनच विषय आहे आज चर्चेला.
बरं ग्रँड मस्ती चित्रपट कुणी कुणी पाहिलाय? आवडला ना?

मला मायबोलीवरील अनेक चर्चा आठवल्या तिला पाहून!>>>>>>>>> बेफी खर्रच्च की काय?? Happy

असो +१
<<या संदर्भात ओळखीतल्या, आजूबाजूला राहणार्‍या अनेक स्त्रियांची मते अगदी अशीच आहेत.>> +१

सस्मित, तुम्ही मला विचारलेल्या प्रश्नाचा रोख समजला नाही. कृपया उलगडून सांगाल का? Happy

स्त्रीसन्मान म्हणून कधी ४ पुरुष एकत्र आले? त्यांनी कधी कुठल्या डीओ कंपनीला इमेल केली कि तुमची जाहिरात ओफेन्सीव आहे? उघडी बाई जाहिरातीत आली आणि सेल वाढला तर तो त्या बाईचा दोष कसा??<<<

आईशप्पथ! ही स्त्रियांची मानसिकता आहे? गॉड ब्लेस दीज वूमेन! हद्द झाली. सुप्रिया जाधवांचा मिसरा प्रकर्षाने आठवला:

कमालीच्या निराशेने मनाला ग्रासले आहे

या असल्या मानसिकतेच्या स्त्रीजगताकडून कसलीच अपेक्षा ठेवणे अशक्य आहे. सॉरी टू से!

म्हणजे बायका कश्याही वागतील, पुरुषांनि एकत्र येऊन सन्मान ठेवत आणि तो ठेवल्याचे सिद्ध करत फिरत राहायचे. वर कुठे काही प्रकार झाला की पुरुषांची मानसिकता हा निकष आहेच. असो यांच्या म्हणण्याला 'अगदी अगदी'! समोरून ट्रक येत असेल तर आपणच बाजूला होणे चांगले!

मुक्त लैंगिक संबंध ज्या समाजात असतात तिथे लैंगिक गुन्हे कमी घडतात असे वाचले होते. निकोप लैंगिक संबंधांना विरोध असायचे काहीच कारण नाही ते नैसर्गीक अहे.तोकड्या कपड्यांनी भुवया उंचावतात याचे कारण ते कपडे 'एक्सेप्शन' आहेत ते कपडे जिथे 'नॉर्म' असतात तिथे भुवया उंचावत नाहीत व तसे कारणही नसते. भारतात निकोप आणि मुक्त लैंगिक संबंध होते असे वि का राजवाडे यांचे 'भारतीय विवाह संस्थेचा इतिहास' या पुस्तकात वाचले होते. इथे एक चांगले आर्टीकल आहे.
http://www.loksatta.com/chaturang-news/sexual-satisfaction-is-needed-40206/

धिरज कांबळे, तुम्ही ज्या लेखाची लिंक दिली आहेत तो लेख, विशेषतः त्याचा पहिला ७५ ते ८०% भाग अप्रतिम आहे. धन्यवाद.

वरिल लिंक ओपन होत नाही...
जमल्यास कंटेंट पेस्ट करा.. अथवा सारांश सांगा

असे कॉपी पेस्ट करण्याची परवानगी आहे की नाही ते माहीत नाही. नसल्यास प्रशासनाने कृपया कळवावे, संपादीत करेन.

आनंदी, तो लेख खालीलप्रमाणे आहे:

>>>

एका बाजूला पुरुषांचे लैंगिक भुकेलेपण आहे तसेच त्याचा वापर करून आपला आर्थिक फायदा उठवणारे गल्लाभरू चित्रपट, प्रसारमाध्यमे आहेत, यातून एका बाजूला पुरुषांची कोंडी होते आहे. तर दुसरीकडे पुरुषप्रधान संस्कृती पुरुषी अहंकाराचे स्तोम मजवत स्त्रीला दुय्यम लेखत तिची कोंडी करत राहिली. यातूनच निर्माण झालेले पुरुषी लैंगिकतेचे घृणास्पद अनुभव सध्या संपूर्ण समाजालाच भोगावे लागत आहेत. म्हणूनच हा फक्त पुरुष वा फक्त स्त्रियांचा प्रश्न नसून तो समाजाचा आहे. त्यावर उपाय म्हणून समाजानेच काय करायला हवे हे सांगणारा, ५ जानेवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या ‘लैंगिकतेचे शमन की दमन?’ या लेखाचा हा उत्तरार्ध ..
निसर्गत: माणसाच्या ब्रेनमध्ये झालेल्या प्रिवायरिंग सेटअपमुळे विवाहप्रथा आणूनसुद्धा स्त्री-पुरुषांमध्ये असणारा मुक्त आचरणाचा कल आपण रोखू शकलेलो नाही. यासंबंधीची शरीरशास्त्रीय माहिती आपण मागील लेखात घेतली. विवाहामुळे स्त्री-पुरुष संबंधांचे नियमन होत राहणार आहे, या कल्पनेत (किंवा भ्रमात) आपण राहिल्याने लैंगिक भावनांची दडपणूक (दमन) कधीपासून सुरू झाली, हे आपल्याला कळलेलेच नाही; आणि आज स्त्रियांवर होणाऱ्या पुरुषांच्या हल्ल्यातून हे दमन विकृतपणे समोर येताना दिसत आहे.
विवाहाने प्रस्थापित केलेल्या पुरुषप्रधान समाजात जर स्त्री-पुरुषांची कामवासना योग्य प्रकारे शमविण्याचा विचार आपण करणार असू, तर पहिल्या प्रथम पोटाच्या भुकेप्रमाणे लैंगिक भुकेची अनिवार्यता समजून घेता आली पाहिजे. जसे पोटाची भूक व्यवस्थित भागत असेल तर आपण अन्नसेवन समाधानाने, आनंदाने करतो. पण जे भुकेलेले असतात, ते अन्नावर तुटून पडताना आपण पाहतो. मात्र इथे आपण त्यांची उपासमार समजून घेतो. माणसांनी अन्नावर तुटून पडणे वाईट दिसते म्हणून त्यांची ती भूक, अन्न मिळू न देता दमन करण्याचा विचार कधी कुठे होत नाही. उलट त्यांना अन्न मिळण्याची सहज सोय करण्याचा प्रयत्न होतो. लैंगिक भुकेची नेमकी हीच स्थिती आहे. तरीसुद्धा ती सहजपणे भागविण्यात समाज अडथळे उभारतो. विवाहाचं वय वाढून सुद्धा विवाहपूर्व लैंगिक शमन हे अनैतिक ठरवतो. तेव्हा उपासमारीची स्थिती निर्माण होऊन ती भूकवासना अनावर होते. त्यातून मग मिळेल त्या मार्गाने स्त्री-पुरुषांनी शरीरसंबंधाचा प्रयत्न करणे, चोरून वेश्यागमन करणे, ब्ल्यू फिल्म्स पाहणे, बलात्कार, छेडछाड, विनयभंग, लैंगिक रॅगिंग, लहान मुलांचे लैंगिक शोषण म्हणजेच एकप्रकारे ‘तुटून पडणे’ ही सेक्सक्रिया सर्वत्र, म्हणजे चित्रपटांतून, कुटुंबातून, मैत्रीमधून, सामाजिक गुन्ह्य़ांतून आणि अगदी वैवाहिक संबंधातूनही दिसते. पण गंमत म्हणजे या गुन्ह्य़ांमागील खऱ्या कारणांना बगल देऊन स्त्रिया अंगप्रदर्शन करतात, म्हणून पुरुष गुन्हे करतात, असा दिशाभूल करणारा युक्तिवाद नेहमी केला जातो. आपल्याला वरवर विचार करण्याची सवय लावली गेल्याने असे युक्तिवाद अगदी चटकन पटतात. पण जगातल्या सर्व आदिवासी समाजात स्त्रिया या सर्वासमक्ष उघडय़ा अंगाने फिरत असतात, पण त्यांच्या समाजात हे लैंगिक गुन्हे अज्ञात आहेत, हे मागील लेखात आपण पाहिले. उलट आपल्याच समाजातले लोक या स्त्रियांचे फोटो आणि व्हिडीओ काढून आपले भुकेलेपण दाखवतात. तेव्हा प्रश्न हा शरीर उघडे टाकण्याचा नसून, आपल्या समाजात लैंगिक भावनेचे शमन आदिवासी समाजानुसार होत नाही. त्यामुळे कुठेही शरीराचा थोडासा भाग जरी उघडा दिसला की, अरे पाहा, पाहा, अशी आपली मानसिकता प्रक्षुब्ध होत असते. स्त्रीला संपूर्ण बुरखा घालायला लावणाऱ्या समाजात (देशात) स्त्रीचा उघडा हात जरी दृष्टीस पडला तरी पुरुष उत्तेजित होऊ शकतात. याउलट फ्री सेक्स असणाऱ्या पाशात्त्य देशात स्त्री-शरीराचे सवंग कुतूहल नसल्याने तोकडे पेहराव केलेल्या स्त्रिया अवतीभोवती असल्या तरी तेथील पुरुष रिलॅक्स असतात. जिच्याविषयी आकर्षण तिचे नखही दृष्टीस पडू नये अशा समाजात क्रौर्य, हिंसा आणि विकृतीने भरलेले तालिबानी पुरुष जन्म घेतात, हा योगायोग नाही.
आपल्या समाजात लैंगिक कामना शमविण्याच्या वाटा अतिशय युक्तीने चित्रपट आणि टीव्ही मालिकांमधून त्यांचे निर्माते दाखवत असतात. बहुसंख्येने हे निर्माते पुरुषच असतात. अर्थात पुरुषांच्या कामवासनेची होत असलेली कोंडी त्यांच्या परिचयाची असते. म्हणून मग स्त्रीचे अंगप्रदर्शन, सेक्श्युअल नृत्य, बेडसीन्स हा सर्व मसाला प्रत्येक चित्रपटात ठासून भरला जातो. जे पाहून पुरुषवर्ग उत्तेजित होतो. ते पाहण्यास चित्रपटाला गर्दी होते आणि निर्मात्याचा धंदा जोरात होतो. परंतु उत्तेजित होऊन चित्रपटगृहाबाहेर पडलेल्या पुरुषांना कामवासना शमविण्याचा सन्माननीय मार्ग उपलब्ध असतोच असे नाही. आपल्या देशात तर अशा पुरुषांमध्ये अविवाहित तरुण, घटस्फोटित पुरुष तसेच नोकरीनिमित्त पत्नीला सोडून दुसऱ्या ठिकाणी राहणारे असंख्य पुरुष अशी मोठी यादी सांगता येईल. पुरुषांची नैसर्गिक कामवासना शमविण्यासाठी काही क्षेत्रात महिनोन्महिने किंवा काही वर्षेसुद्धा स्त्रीसहवास त्यांना मिळू शकत नाही. यामध्ये बांधकाम साईटवरचे कामगार पुरुष, इंजिनीअर्स, ठेकेदार, मोठे व्यावसायिक किंवा बोटीवर असणारे पुरुष, लष्करातील पुरुष अशा सर्वाचा समावेश असतो. प्रगतीकडे सतत धावणाऱ्या माणसाने अशा पुरुषांच्या लैंगिक गरजेचा विचार कधी केलेला नाही. त्यामुळे या पुरुषांचे समलैंगिक संबंध, विवाहबाह्य़ संबंध किंवा शेवटी बलात्कार अशी न टाळता येणारी स्थिती मानवी जीवनात ठाण मांडून बसलेली आहे. या कृत्यांना फक्त गुन्हा समजून सोडून देणे, हा अविचार आहे.
जगभरात विवाहसंस्था सर्वत्र असली तरी प्रत्येक संस्कृतीत सेक्सबाबत असणारा दृष्टिकोन हा त्या त्या देशातील गुन्ह्य़ाचे प्रमाण ठरवतो. सेक्स दृष्टिकोन जितका उदार, जितका निकोप तितकी ती संस्कृती नवनव्या तंत्रज्ञानास सहजपणे सामावून घेत असते. आपण जेव्हा पाश्चिमात्य चित्रपटातील सेक्सप्रदर्शन जसेच्या तसे उचलले, तेव्हा त्या समाजात फ्री सेक्स रूढ आहे आणि आपल्याकडे ती कल्पनाही सहन होत नाही, हे लक्षातच घेतले गेले नाही. उलट भुकेल्या माणसास जेवणाचे ताट दाखवून ते काढून घेतल्याप्रमाणे सेक्सविषयीचा हा खेळ खेळून भारतीय मानसिकतेचा छळ करण्यासाठी या कल्पना प्रसारमाध्यमांकडून वापरल्या जात आहेत. ज्यामुळे आपला समाज झपाटय़ाने विकृतीकडे चालला आहे. भारतीय मुली ज्या पाश्चात्त्य देशात शिक्षण वा नोकरी करीत आहेत, त्यांच्यावर बलात्कार वा तत्सम लैंगिक हल्ले झाल्याच्या बातम्या आपण ऐकत नाही. मात्र भारतात आलेल्या परदेशी स्त्रियांवर बलात्कार होत असतात आणि बलात्कार करून त्यांची हत्याही होत असते. या स्त्रियांना गर्दीमध्ये भारतीय पुरुषांच्या हस्तस्पर्शाचासुद्धा जेव्हा ‘प्रसाद’ मिळतो तेव्हा त्या आपल्या या संस्कृतीने चकित होतात. स्त्री-पुरुषांची आपल्या समाजात कोंडून घातलेली लैंगिक इच्छा आणि त्यातून पुरुषांची स्त्रीबाबत तयार झालेली भोगवादाची मानसिकता त्याचे हे वरील परिणाम म्हणावे लागतात.
मात्र पुढे पुढे निव्वळ लैंगिक भावनेची कोंडी या थेट कारणांवर अनेक पांघरुणे आपल्या भोवतालामधून पडत गेली. संशोधक ज्याचा उल्लेख करतात, त्या ‘भोवताल’मध्ये अनेक विषय आणि व्यक्ती असतात. म्हणजे पालक, शिक्षक, नातलग, शेजारी, मित्रमैत्रिणी, शिक्षण, आर्थिक परिस्थिती, विविध प्रसारमाध्यमे समाजातील विवाह, धर्म, कुटुंब, न्याय, शासन अशा संस्था व त्यांचे संस्कार वगैरे! पितृत्वासाठी प्रथमच निसर्गव्यवस्थेला डावलून बंधनातल्या शरीरसंबंधाची कल्पना प्रस्थापित करणारी विवाहकल्पना निसर्गाच्या रेटय़ापुढे वाहून जाऊ नये म्हणून पुरुषांनी धर्मग्रंथ लिहून त्यातून स्त्रियांची योनिशूचिता आणि पातिव्रत्य याचे स्तोम मांडण्यात आले. ते मोडणाऱ्या स्त्रियांना शिक्षा सांगण्यात आल्या. त्यातून पुढे पुरुषाला झुकते माप देणारी संस्कृती उदयाला येऊन आपल्या समाजात पुरुषांसाठी नवस व त्याचे कौतुकसोहळे स्त्रियांनी करण्याच्या परंपरा निर्माण करून पुरुषाला संस्कृतीने अधिकच श्रेष्ठ पदावर बसविले.
विवाहसंस्था, धर्मसंस्था यांच्या संस्काराचे परिणाम कुटुंबसंस्थेवर झाले. स्वत:च्या पितृत्वासाठी विवाहित स्त्रीच्या लैंगिक इच्छेवर पतीचा असणारा सातत्याने पहारा तसेच विवाहापूर्वी स्त्रीला मातृत्व येऊ नये म्हणून अविवाहित स्त्रीवरसुद्धा ठेवली जाणारी नजर याची परिणती, पुरुषांची मानसिकता, स्त्रीबाबत मालकी हक्काची भावना बाळगणारी होऊन बसली आहे. पुरुष स्वामी आणि स्त्री त्याच्या आधीन अशा निसर्गविरोधी असणाऱ्या आपल्या स्वयंभू कल्पनेतून मुला-मुलींवर जन्मल्यापासूनच संस्कार कुटुंबातूनच केले जातात. त्याकरिता ‘बॉय कोड’चा वापर करून मुलगा पाच-सहा वर्षांचा झाला की त्याच्या भावनाशील, संवेदनशील असण्याचे हसे केले जाते. मुलगा घाबरला, रडला किंवा लाजला तर तू पुरुष आहेस, स्ट्राँग पाहिजेस, याची त्याला सारखी जाणीव करून दिली जाते. त्याची मानसिक, भावनिक गरज लक्षात न घेता त्याला ‘मम्माज बॉय’ असे हिणवून त्याच्या आईपासून तोडण्यास सातव्या-आठव्या वर्षांपासून सुरुवात केली जाते. मुलींसारखे रडतोस काय, नि लाजतोस काय? अशा प्रकारे प्रत्येक वेळी त्या मुलामध्ये तो मुलीपेक्षा विशेष असल्याची भावना निर्माण केली जाते. त्यामुळे एकीकडे स्त्रीसारखं हळूवार व्यक्त न होऊ शकणारा, आणि दुसरीकडे पुरूषी कामभावना दडपणारा असा अहंकारी पण द्विधा मनस्थितीचा पुरूष कुटुंबात मालक म्हणून जेव्हा घडविला जातो तेव्हा स्त्री व पुरुषांमधील सर्वच स्नेहसंबंधांची पुरती दैना होते. आई-मुलगा, बहीण-भाऊ, पती-पत्नी, मित्र-मैत्रीण यापैकी कोणतेही नाते समपातळीत आणि निकोप राहत नाही. शिवाय मुलींची संवेदनशीलता किंवा त्यांच्या प्रतिक्रिया या चुकीच्या किंवा मूर्खपणाच्या आहेत, या बालपणीच्या संस्करांमुळे स्त्री आपल्यापेक्षा कमी दर्जाची आहे, या भावनेतून पुरूष कुटुंबातील किंवा समाजातील स्त्रीबरोबर तुच्छतने किंवा हिंसकतेने व्यवहार करतो. बालवयातील संस्कार म्हणून दुरूस्त होणं गरजेचं आहे.
कुटुंबामध्ये पती-पत्नीने एकमेकांना प्रेमाने जवळ घेणे, प्रेमाने चुंबन घेणे हे आपल्या संस्कृतीत मुलांच्यादेखत ‘वाईट संस्कार’ समजले जातात. पण आश्चर्य म्हणजे मुलांसमोर पत्नीचा पाणउतारा करणे, तिला मुलांदेखत मारणे हे मात्र वाईट संस्कारात येत नाही! एका तीन वर्षांच्या मुलाचे वडील त्याच्या आईला हातात मिळेल ते फेकून मारताना पाहून हा मुलगा घाबरून रडत असे. पण नंतर तेच ते पाहून आई ही मारण्यासाठी असते, असा त्याचा समज झाला आणि आईने त्याला काही शिस्त लावली की आपली खेळणी तिच्यावर फेकून तो मारू लागला. स्त्रीविषयीची सन्मानाची भावना अशी पायरी पायरीने खाली उतरवली जाते. ज्यातून पुढे समाज स्त्री-भ्रूणहत्या करायला मागेपुढे पाहत नाही.
(‘युनिसेफ’तर्फे कौटुंबिक हिंसाचाराबाबत एक धक्कादायक सव्‍‌र्हे काही महिन्यांपूर्वी प्रसिद्ध झाला, ज्यामध्ये पत्नीला मारणे योग्य आहे, असे ५७ टक्के पुरुषांनी सांगितले तर पत्नीला मारायला हरकत नाही, असे सुमारे ५३ टक्के स्त्रियांनी सांगितले. अचंबित करणाऱ्या या मतांचे मूळ हे टीव्ही मालिकांमध्ये आहे. मालिकेतला एखादा पती पत्नीचा अवमान करणारा, हात पिरगळणारा, वस्तू फेकणारा दाखवलेला असतो तरी ती पत्नी त्याला जवळ घेऊन ‘तू तिथे मी’ म्हणत प्रेमाने त्याच्या छातीवर डोके टेकते तेव्हा तरुणांचा समज होतो की मुलींना असेच पुरुष आवडतात. पत्नीला मारणे हा पुरुषार्थ आहे. त्यामुळेच पत्नी प्रेम करते. तर याच मालिकांमधून समजूतदार, मनमिळाऊ पुरुष हा बहुधा हतबल आणि अपमानित होणारा दाखवतात. त्याची खुद्द आईसुद्धा त्याची मानहानी करताना दाखवतात. काही मालिकांत अशा पुरुषाला मतिमंद किंवा वेडासुद्धा दाखवतात. अर्थात मुलींवर मनमिळाऊ पुरुष म्हणजे कचखाऊ पुरुष, असा संस्कार होतो. याऊलट या मालिका गुंड प्रवृत्तीचा, आक्रमक पुरुष यशस्वी दाखवतात. मुख्य म्हणजे मुलींना असा पुरुष बाहेरच्या जगापासून सुरक्षा देण्याच्या कुवतीचा वाटतो. जो आपल्या अंगावर धावून येईल, तोच बाहेरच्यांना धडा शिकवील या एकूण समजुतीतून ‘युनिसेफ’कडे तशी मते स्त्री-पुरुषांनी नोंदविलेली दिसतात. यातून स्त्रीमनात बाहेरच्या जगातील असुरक्षिततेची असणारी धास्ती तर दिसतेच पण टीव्ही मालिकासुद्धा मनमिळाऊ पुरुष अपयशी दाखवून किती घातक संस्कार बाहेर टाकतात हेसुद्धा उघड होते. अशा समाजविघातक आणि विकृत मूल्ये बाहेर फेकणाऱ्या मालिकांच्या विरोधात देशभर पालकांनी आणि प्रेक्षकांनी रस्त्यावर येऊन निदर्शने करण्याची वेळ आता आलेली आहे.)
राजकारण क्षेत्रात आपल्याकडे स्त्रीवर बलात्कार करून किंवा तिच्याशी विवाहबाह्य़ संबंध ठेवून हत्या करणारे काही जण आहेत. स्वत:च्या पत्नीला मारणारे, विनयभंग करणारे पोलीस आहेत. गैरवर्तन करणाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी ज्यांची नेमणूक आहे तेच स्वत: असे दुसऱ्याला उद्ध्वस्त करणारे गुन्हे करून, वर पुन्हा निर्दोष सुटतात. ही वस्तुस्थिती सामान्य समाजकंटकांना, रोडरोमियोंना हिंमत देऊन बिनधास्त करणारी आहे. आपल्या देशात स्त्रीविरोधी गुन्ह्य़ांचे प्रमाण वाढण्याचे हे फार महत्त्वाचे कारण आहे. थोडक्यात, विवाहसंस्था, धर्मसंस्था, संस्कृती कुटुंबसंस्था, प्रसारमाध्यमे, शासनसंस्था वगैरे या भोवतालच्या घटकांद्वारे बाहेर पडणारी घातक मूल्ये व संस्कार, आधीच ज्यांचे लैंगिक दमन झाल्यामुळे मनोवस्था प्रक्षुब्ध आणि विकृत झालेली आहे, त्यांना हिंसक बनविण्याची महत्त्वाची कामगिरी कशी पार पाडतात हे इथे लक्षात येईल.
मग अशा समाजव्यवस्थेतील बलात्कारासारख्या गुन्ह्य़ासाठी अगदी फाशी जरी बजावली तरी तो त्या गुन्हेगार व्यक्तीपुरता मर्यादित उपाय ठरतो. तो हवाच. पण त्यामुळे भविष्यातले गुन्हे थांबत नाहीत हे दिल्लीच्या घटनेनंतरसुद्धा ज्या बेशरमपणाने बलात्काराचे गुन्हे घडत आहेत त्यावरून लक्षात येईल. फाशी शिक्षा देण्यात धोका असा आहे की, बलात्काराचा पुरावा म्हणून असणाऱ्या त्या स्त्रीची निश्चित त्यामुळे हत्या होईल. म्हणून आमरण जन्मठेप ही अधिक चांगली शिक्षा ठरेल. स्त्रिया-मुलींनी तिथल्या तिथे प्रतिकार करावा असे काही मार्ग सुचविले जात आहेत. उदा. डोळ्यात मिरची पावडर टाकणे, गुंडाच्या ओटीपोटात लाथ मारणे वगैरे. तरी ते यशस्वी होतीलच असे नाही.
म्हणून मग व्यक्तिगत शिक्षा किंवा व्यक्तिगत प्रतिकार याच्यापलीकडे जाऊन ही लढाई अखेर या व्यवस्थेच्या विरोधात लढण्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही. दिल्लीच्या घटनेसंबंधीच्या मोर्चात मोठय़ा संख्येने पुरुषही होते, ही त्यातल्या त्यात दिलासा देणारी गोष्ट. खरोखरच दुर्वर्तनी पुरुषांपेक्षा सद्वर्तनी पुरुषांची संख्या भारतात जर जास्त असेल तर अशा गुन्ह्य़ासंदर्भातील परिस्थितीच्या नियंत्रणाची सूत्रे त्यांना सांभाळता आली पाहिजेत. जिथे कुठे स्त्रीची छेड काढण्याचा प्रयत्न असेल तिथे १०-१२ पुरुषांनी एकदम या गुंडाला घेरले पाहिजे. त्यापैकी किमान एकाला तरी त्यांनी पोलीस चौकीत नेले पाहिजे आणि तिथे त्याच्या कुकर्माचा पाठपुरावा याच सज्जन पुरुषांनी ठिकठिकाणी संघटना स्थापून केला पाहिजे, म्हणजे ते गुंड सहजी सुटणार नाहीत. या कामी त्यांना टीव्ही चॅनेल्सची मदत होऊ शकते. पुरुषांची ही नेमकी भूमिका महिलांना अपेक्षित आहे. घटना घडून गेल्यानंतर मेणबत्ती-मोर्चात सामील होऊन निव्वळ सहानुभूती प्रदर्शन हे प्रत्येक वेळेस सज्जन पुरुषांना शोभा देणारे ठरणार नाही.
सर्व स्त्रियांनीसुद्धा अशा घटनांसंदर्भात एकदा तरी सार्वजनिक संपाची हाक दिली पाहिजे. शिक्षण संस्था, अन्य सरकारी खाती, आयटी क्षेत्र, खासगी कंपन्या, बँका, अंगणवाडय़ा, मनोरंजन क्षेत्र, बचत गटातील स्त्रिया, उद्योजक व व्यावसायिक स्त्रिया, कामगार-मजूर स्त्रिया व गृहिणी या सर्वानी दोन दिवस तरी आपापली कामे बंद ठेवून एक प्रकारे महिलांशिवाय चालवून दाखवा देश, असे आव्हान या व्यवस्थेपुढे ठेवून आपली ताकद दाखवली पाहिजे आणि स्त्रियांच्या प्रश्नांची दखल घेण्यास व्यवस्थेला भाग पाडलं पाहिजे.
बलात्कारकर्त्यांला कोणती शिक्षा द्यावी असे वाटते, असा प्रश्न मी एका तरुणाला केला असता तो म्हणाला, अशा पुरुषांचे लैंगिक खच्चीकरण हाच या घृणास्पद वृत्तीवरचा उपाय मला वाटतो. पुरुषाला त्याचे लिंग म्हणजे मर्दानगीचा मानबिंदू वाटत असतो. पण त्याचा त्याने कुणाला उद्ध्वस्त करण्याकरिता दुरुपयोग केला असेल तर त्याचा हा नैसर्गिक परवाना आपण रद्द करायला पाहिजे. लैंगिक खच्चीकरणामुळे त्याला आयुष्यभर समागमसुखापासून वंचित राहण्याचे दु:ख भोगावे लागेल आणि ते त्याने भोगलेच पाहिजे. कारण कुणा निरपराध स्त्रीला किंवा बालिकेला त्याने उद्ध्वस्त केलेले आहे याची जन्माची आठवण त्याला राहिली पाहिजे. स्त्रिया अनेक शतके लैंगिक मानहानी सोसत आहेत. तेव्हा आता अशा वृत्तीच्या पुरुषालासुद्धा ही मानहानी भोगतानाच्या होणाऱ्या वेदना कळल्या पाहिजेत. म्हणून फाशीऐवजी लैंगिक खच्चीकरणाचा कायदाच अशा हीन वृत्तीला दहशत बसवेल असे मला वाटते.
आहे का असा कायदा चालवून घेण्याची हिम्मत विविध सत्तेवरच्या पुरुषांमध्ये?

मी मला कंफर्टेबल वाटते, समाज गेला उडत म्हणत बाहेर हाफ चड्डी घालुन फिरणार नाही. अमुकतमुक कपड्यात मला कंफर्टॅबल वाटते म्हणुन मी अशा आंबटशौकिनांचा शौक का पुरवावा?<<<
या संदर्भात ओळखीतल्या, आजूबाजूला राहणार्‍या अनेक स्त्रियांची मते अगदी अशीच आहेत.
१००% अनुमोदन तुम्हाला बेफी......

बेफी,
शेवटच्या १५-२०% भागात आहे तेच तर सिमंतिनी यांनी म्हटले आहे ना?
म्हणजे-->
जिथे कुठे स्त्रीची छेड काढण्याचा प्रयत्न असेल तिथे १०-१२ पुरुषांनी एकदम या गुंडाला घेरले पाहिजे. त्यापैकी किमान एकाला तरी त्यांनी पोलीस चौकीत नेले पाहिजे आणि तिथे त्याच्या कुकर्माचा पाठपुरावा याच सज्जन पुरुषांनी ठिकठिकाणी संघटना स्थापून केला पाहिजे, म्हणजे ते गुंड सहजी सुटणार नाहीत. या कामी त्यांना टीव्ही चॅनेल्सची मदत होऊ शकते. पुरुषांची ही नेमकी भूमिका महिलांना अपेक्षित आहे. घटना घडून गेल्यानंतर मेणबत्ती-मोर्चात सामील होऊन निव्वळ सहानुभूती प्रदर्शन हे प्रत्येक वेळेस सज्जन पुरुषांना शोभा देणारे ठरणार नाही.

काळजी घेणं आणि पुरुषांची मानसिकता / समाज बदलवणं या दोन्ही गोष्टी हातात हात घालून का जाऊ शकत नाहीत ? कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजमेंटमधे सीपीएम किंवा पर्ट चार्ट हे टूल माहीत असेल तर बदलाच्या गोलचं टार्गेट अचिव्ह करेपर्यंत सेफ्टी ही अ‍ॅक्टिव्हिटी पॅरलल जाऊ शकते. या दोन एक्स आणी वाय अ‍ॅक्सीजवरच्या गोष्टी असल्याप्रमाणे एकाचा उल्लेख झाला कि दुसरी गोष्ट त्याची विरुद्ध अर्थाची असल्याप्रमाणे प्रश्नोत्तर होतात प्रत्येक वेळी. मघाशी अशी एक पोस्ट पण होती कुणाची तरी. आता का बरं दिसत नाही ?

माझ्या मते टी व्ही वर जाहीर करण्यात येणार असणारी बंदी "लहान मुलांवर" विपरीत परीणाम होऊ नयेत ह्यासाठी महत्वाची ठरते.

कारण टी व्ही इतका आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग झालेला असतो की काय लावलेय आणि मुले आजूबाजूला आहेत का ह्याचे भान पालक म्हणून कितपत आपल्याकडे आहे ह्याबद्दल मी साशंक आहे.

धन्यवाद बेफि...
माझं वैयक्तिक मत.. या अशा कमी कपडे घालुन फिरणार्‍या .. इतरांच आकर्षण ठरणार्‍या स्त्रिया खुप नाहियेत... बहुतेक सगळ्याजणी भान बाळ्गुनच असतात .. आणि जिथे अगदिच सुरक्षित वाटते त्या ठिकाणिच हवे ते कपडे घालण्याचे स्वतंत्र्य घेतात जस की साधना यानी म्हंटले आहे की <<माझी मुलगी घरात कायम शॉर्ट्स घालुन असते पण खाली जाताना ती न चुकता त्यावर स्कर्ट चढवुन जात<<<<
अगदीच परिस्थिती अशी नाहिये की, सगळ्याच मुली काय घलुन फिरत आहेत आणि मग पुरुष असेच वागणार..
वरिल लेखात लिहिल्याप्रमाणे लैंगिक स्वतंत्र्य न मिळणे हेच कारण असु शकते..

कारण टी व्ही इतका आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग झालेला असतो की काय लावलेय आणि मुले आजूबाजूला आहेत का ह्याचे भान पालक म्हणून कितपत आपल्याकडे आहे ह्याबद्दल मी साशंक आहे. >> सहमत. त्याचबरोबर चॉईस देखील उरलेला नाही. कुठल्या चॅनेल वर कधी कुठला प्रोमो अचानक दाखवला जाईल, ब्रेकमधे अचानक जाहीरात येईल हे तरी कुठं माहीत असतं बेफीनी दिलेल्या लेखात या प्रोग्राम्सचे इफेक्ट छान सांगितलेत.

साधना +१

लेखाच्या विषयाशी स्त्री आणि पुरूषाची मानसिकता ह्याचा नेमका काय संबंध आहे हे मात्र काही केल्या कळत नाही...

इब्लिस, सीमंतिनी यांनी व्यक्त केलेली तेवढी एकच अपेक्षा -

- की पुरुषांनी अश्या समयी एक होऊन स्त्रीच्या बाजूने लढा द्यायला हवा -

ही अतिशय योग्यच आहे की?

पण एखाद्या स्त्रीशे देहप्रदर्शन प्रामुख्याने असलेल्या जाहिरातीमुळे एखाद्या कमोडिटीचा सेल वाढला तर या बाबीस स्त्री जबाबदारच नाही? तेव्हा मात्र फक्त पुरुषांनी एक होऊन निषेध व्यक्त करावा? मग स्त्रीने का करू नये? मुळात जर पुरुषांनी पत्रे लिहून अथवा आंदोलने करून निषेध व्यक्त करावा असे 'काही' स्त्रियांचे मत असेल तर त्या स्त्रियांना असे का वाटत नाही की मुळात स्त्रीने असे काही करू नये? हे विलक्षणच कोडे नाही का?

बाकी - असे वाटणार्‍या स्त्रिया, की पुरुषांनि एक होऊन निषेध करावा, यापेक्षा असे वाटणार्‍या स्त्रिया, की मुळात स्त्रीने उगाचच असंबद्ध असताना देहप्रदर्शन करू नये, या दुसर्‍या प्रकारच्या स्त्रियांची संख्या अमाप जास्त आहे. येथील दहा पाच स्त्रियांच्या मतावर बाहेरचे जग अजिबात चालत नाही. मात्र बाहेरचे जग असे असे आहे असे येथे लिहिले की 'ते पिढ्यापिढ्यांनी केलेले कंडिशनिंग आहे' असा डांगोरा पिटला जातो.

वर धिरज यांनी दिलेल्या लेखाचा गाभाही हाच आहे की अतृप्ती व असमाधान यांनी किडलेल्या पुरुषांना अजुनच भडकवण्याचे प्रकार सुरू आहेत व त्यांचे दमन / शमन होत नसल्याने गुन्हे वाढत आहेत. स्त्रीला कोणीही दोष देत नाही आहे. पण या अश्या दुर्दैवी परिस्थितीत खरोखरच ट्रक अंगावर येत असेल तर आपण ट्रकची चूक म्हणून आडमुठ्यासारखे रस्त्यात उभे राहतो का? की बाजूला सरकतो?

लेखाच्या विषयाशी स्त्री आणि पुरूषाची मानसिकता ह्याचा नेमका काय संबंध आहे हे मात्र काही केल्या कळत नाही...<<<

कोणत्या लेखाच्या विषयाशी? या आयटेम साँगवाल्या की लोकसत्तामधील लेखाच्या?

अतृप्ती व असमाधान यांनी किडलेल्या पुरुषांना अजुनच भडकवण्याचे प्रकार सुरू आहेत >>> लेख ब-याच अशी बरोबर असला तरी अनेक गोष्टी क्लिअर नाहीत होत. एखादी गोष्ट झाकून ठेवण्याच "बंधन" हे "जिज्ञासा" वाढवायला कॅटलिस्टसारखं काम करतं. ही जिज्ञासा ही मार्केटची गरज समजून जेव्हां असे आयटेम साँग्ज, ग्रॅण्डमस्ती सारखे सिनेमे बनतात तेव्हां त्यांना काय अभिप्रेत आहे यावर न बोलता पुरुषांच्या मनातल्या अश्लीलतेला दोष देणं हे अर्धवट अ‍ॅनालिसीस होईल. विकृतीला खतपाणी घालणे आणि विकृत विनोदांचा मनोरंजनाप्रमाणे उपयोग होणे या अशा एकमेकांशी रिलेटेड गोष्टी आहेत.

मुक्त लैंगिक संबंध ज्या समाजात असतात तिथे लैंगिक गुन्हे कमी घडतात असे वाचले होते. निकोप लैंगिक संबंधांना विरोध असायचे काहीच कारण नाही ते नैसर्गीक अहे.तोकड्या कपड्यांनी भुवया उंचावतात याचे कारण ते कपडे 'एक्सेप्शन' आहेत ते कपडे जिथे 'नॉर्म' असतात तिथे भुवया उंचावत नाहीत व तसे कारणही नसते.>>>>>>>>>>>>>> Uhoh

पाश्चात्य देशात (अमेरिका वगैरे वगैरे) प्रत्येक स्त्री मागे बलात्कारीत स्त्रियांचे प्रमाण जास्त आहे.... २००८ मधे टाईम्स ला वाचलेली बातमी लख्ख आठवते.... खुप जुनी बातमी असल्याने लिंक सापडणार नाही..... Sad

Pages