AC मध्ये बसून PC वरच्या एखाद्या सुंदर कवितेला superlike करणाऱ्यातला मी

Submitted by Prasad Chikshe on 24 April, 2012 - 12:55

माझे पहिले लेखण

बीड जिल्ह्या सारख्या अविकसित भागात राहून ही तशा पाहता सर्व चांगल्या सुविधा मला माझ्या आई मुळे लहान पणापासून मिळालेल्या. पाहिजे ते सगळ सगळ मिळाल. त्यामुळे काही नसल्यानी काही सोडावं लागत. असतं त्यात भागवावं लागतं. नसण्याचा स्वीकार करत आपल्या जगण्याचा विजय करण्यासाठी भर तारुण्यातील जीवन काळ्या मातीत मळण्यात व उन्हात तळण्यात घालवण्याची वेळ माझ्या वर कधीच आली नव्हती.
लातूरच्या भूकंपाच्या पुनर्वसनाच्या कामात सहभागी होताना निसर्गाच्या कोपामुळे उद्वस्थ झालेले मनुष्यजीवन जवळून पाहता आले.

गावातले लोक कष्टकरी प्रेमानी सर्वाना आपलेसे करी.
मातीतून सोन पिकवण्याचा त्यांनी घेतला होता ध्यास.
मातेनीच मातृत्वाला आज दिली होती आग ........
काळजाचा ठोकाचुकला आणि गावाचा नक्शाच बदलला
झोपीत होता तो काळ झोपीत गेला.
सुंदर गावाची झाली स्मशानभूमीच आज
आपल्याच माणसांची प्रेत जाळताना दुखत होती त्यांची हात.
आणि माझं आयुष्य पण बदललं.

५ वर्ष विवेकानंद केंद्राचे काम करत असताना अनेक व्यथांनी आणि असुविधानी गांजलेले लोक पाहिले होते.१९९९ मध्ये मी भारत बलशाली राष्ट्र कसे होऊ शकते या डॉक्टर अब्दुल कलामांच्या अभ्यास गटाचे काम करून व ते स्वप्न उराशी बाळगून मी अंबाजोगाईला परतलो. आपल्या तालुक्याचा विकास झाला की आपल्या देशाचाही होतो या भावनेनी. गावातील प्रज्ञावंत मुलं शोधायची व त्यांना नेतृत्व विकसनाच कृतीशील शिक्षण देणे व त्यातून उद्याच उमद नेतृत्व उभ राहील व आपला देश बलशाली होईल ही बौद्धिक दृढता होती. अनुभव अनेक ठिकाणचा घेतला होता तर आपल्या तालुक्याचा फारसा नव्हता त्यातल्या त्यात ग्रामीण अंबाजोगाईचा तर शून्यच........

तीन गावं निवडली .....पोखरी त्यातील एक. माझे अनेक मित्र तेथील माध्यमिक शाळेत शिक्षक होती. बालपणा पासूनची मित्र त्यामुळे काम करणे खुपच सोपे होते. ८ वीचा वर्ग,आठवडयातील एक दिवस,शनिवार आणि २ तास अस ठरलं.

सुरुवात खुपच छान झाली. मुलांशी एकरूप होऊन गेलो की ते आपली होतात जग विसरतात आणि आपली वर्ग खोली त्याचं विश्व बनत व त्यांना शिकवणारा त्याचं दैवत याचा अनुभव मी घेत होतो. आनंदानी चिंब करून टाकणाऱ्या या हृदयी ते त्या हृदयी चा अनुभव घेण्याच्या या प्रक्रियेतुन शिक्षक दुरावतात का? याचा प्रश्न मात्र नकळत निर्माण व्हायचा. अगदी बोटावरची गणिते, सूक्ष्मदर्शीनी आपले रक्त पाहणे मग आपल्या नखातील व तोंडातील घाण पाहणे व त्यातील सूक्ष्मजंतू पाहून मुलं शाररिक स्वच्छते बद्दल जाणते झाले. गावातील गटारातील पाण्याचे निरीक्षण करून “स्वच्छ गावं स्वस्थ गावं” हे अभियान पण राबवले .....मी शनिवारी पोखरीत तर मुल रविवारी अंबाजोगाईत आपल्या खर्चाने, हे प्रवासाचे पैसे कुठून येतात हे मात्र मला त्यावेळी समजले नव्हते किवा त्याचा विचार ही माझ्या मनात कधी आला नव्हता. संगणक शिकणे....चांगले चित्रपट पाहणे ....अंबाजोगाईच्या पंचक्रोशीत खूप भटकंती करणे....... आपल्यावर निर्व्याज प्रेम करणाऱ्या पाखरांन बरोबर खूप विहार करता आला.

या मुलांनीही मला खूप काही शिकवलं .....कांद्याला फुल येत ......ऊस न कापता कसा खायचा .....बैलगाडी कशी चालवायची .....मी जे शिकलो होतो ते त्यांना शिकवत होतो ....आणि ते जे जगत होते ते मला शिकवत होते......शिक्षण ही प्रक्रिया खरं अशी देण्याघेण्याची का होत नाही ?

सलग दोन वर्ष न चुकता हे चालू होत .......अंबाजोगाईतील प्रज्ञावंत मुलांमधील काम वाढलं व माझ पोखरीला जाण्याच बंद झालं.

पण ग्रामीण भागातील शिक्षणाचा चांगलाच अंदाज आला. १० वर्ष शाळेत अनेक विषयांचा अभ्यास केल्यावर,दर दोन महिन्यांनी एखादी परीक्षा देऊनही त्यात परत ४ थी व ७ वी शिष्यवृत्ती परीक्षाना सामोरे जाऊन विद्यार्थ्याला आपण पुढील शिक्षणासाठी आपल्या क्षमतेस पूरक अशी शाखा व विषय शोधता का येत नसतील ? ही समस्या फक्त ग्रामीण भागात शिक्षण घेणाऱ्या मुलांची नाही तर शहरी भागात अनेक विषयांचे शाळेतील व शाळाबाहेरील तज्ञ मार्गदर्शन घेऊन चांगले गुण मिळवणाऱ्या भल्याभल्यांच्या मुलांची पण प्रकर्षानी दिसते. आपल्या भावी आयुष्याची दिशा हि आपल्या क्षमतेनुसार निवडता न येता प्रचलित “धोपट मार्गा सोडू नको” या ठोकताळ्या ने ठरवणे हि आपल्या शिक्षण पद्धतीतील मोठी शोकांतिका नाही का ? डॉक्टर, इंजिनिअर तयार करणाऱ्या शास्त्र शाखेतच हुशार मुलांनी प्रवेश घेतला पाहिजे हा एक प्रस्थापित नियमच आहे. फाजील आत्मविश्वासामुळे अनेकाचे आयुष्य अपयशी होताना मी पहिले आहे पण सार्थ आत्मविश्वास विकसित न झाल्या मुळे आयुष्यात जास्त काळ वैशाख वणवा अनुभवणारे संख्येनी जास्त पहावयास मिळतात. खर तर शिक्षणाचा मूळ उद्देशच हा सार्थ आत्मविश्वास निर्माण करणे हा आहे.

१० वीपर्यंतच्या अभ्यासक्रमात शेतीला फारसे स्थान नाही. मराठवाड्यातील काय देशातील अनेक लोक १० वी नंतर शेती करतात.थोड फार शेतीला ग्रामीण भागातील शाळेत स्थान दिल तर बरच काही होऊ शकेल अस वाटत.

२००६ मध्ये खोलेश्वर महाविद्यालयातील मुलांचा राष्ट्रीय सेवा योजनेतील १० दिवसांच्या श्रमदानाचे शिबीर प्रबोधिनी च्या भावी कामा साठी घेतलेल्या शेत जमिनीत आयोजित केलं होत. ५०/६० मुल तंबूत राहून शेततळे खोदण्याचे काम करणार होती. २/३ दिवसात्त मुलांची चांगली ओळख झाली.

दुपारच्या जेवणा नंतरच्या विश्रांतीसाठी सर्वजण गेली होती. मी बाभळी च्या झाडाखाली मस्त पहुडलो होतो.....अचानक कुणीतर आल्याची जाणीव झाली व डोळे उघडले ....समोर एक काळासावळा ....गोल चेहऱ्याचा .....मळकट पांढरा सदरा ....पण थोडे आदरयुक्त पण खूप आपुलकीचे भाव .......मी हसलो ....आणि तो पण ....त्याने विचारले, “दादा ओळखल का मला ?” ......नव्हत ओळखता येत मला. तो म्हणाला, “दादा मी, रानबा ...पोखरीचा....तुम्ही येत होतात न आम्हाला शिकवायला.”

अरे किती बदलला आहेस रानबा ....

मुलं मोठी झाली की आपण त्यांना विसरतो ते आपल्याला नाही याचा अनेकदा अनुभव मला येतो .....

“दादा, BA च्या ३ ऱ्या वर्षाला आहे मी” रानबा म्हणाला.

जवळ पास तास भर आम्ही त्या जुन्या विश्वात वावरत होतो. रानबा सोडून सर्वांनी शिक्षण सोडलं ...सर्व जण काम करायला लागले ....वर्गातील अनेक मुलींचे लग्न झाले व काहीना मुलं पण ....एक खूप हुशार मुलगी तेवढी राहिली, एक छोटा पांढरा दाग होता शरीरावर म्हणून .....

“रानबा, तू खूप चांगल करतोयेस शिक्षण घेतोस .....चांगल वाटलं” मी रानबा ला म्हणालो, रानबा पण अभिमानाने हसला.

त्याशिबिरात सर्वात चांगला सहभाग व सर्वात चांगले काम करण्याचा पुरस्कार सर्व मुलांनी एक मतांनी रानबाला दिला. खूप छान वाटलं.

रानबाशी आत्ता चांगली मैत्री झाली. तो नियमित भेटीला येत होता. त्याला MA करायचं होत मग B Ed व त्या नंतर शिक्षक ....एक सुंदरस स्वप्न होत त्याच. त्याला मी म्हणाली अंबाजोगाईतच रहा मी करतो तुझ्या राहण्याची सोय कारण तो सध्या सायकली वरून दररोज १६ किमी जाणयेण करत होता.

मी थोडा आग्रह पण करत होतो. रानबा त्या दिवशी जो गेला तो परत महिना भर भेटलाच नाही.
महिन्यांनी तो परत आला ...मी थोडं रागानेच त्याला म्हणालो, “रानबा,शिक्षक व्हायचं आहे न ? कॉलेज का करत नाहीस ?”

“दादा, घरी आता कुणाला तरी एकाला रहावच लागत. बा रानात जातात आई ६० रुपये रोजानी जाते .....घरच भागात नाही म्हणून छोटा भाऊ किन्नर म्हणून गेला आहे ट्रक वर .....घरच पाणी भराव लागतं,पाण्याला लई मोठी रांग असते. एक घागर हात पंपा वरून मिळायला बारीत अर्धा तास जातो. पाण्याशिवाय कसं चालणार दिवस भर पाणी भरण्यातच जातो. आत्ता पर्यंत भाऊ करायचा कारण त्यान शिक्षण सोडल होत. पण तो कामावर गेल्या पासून मला रहाव लागतं घरी” रानबा बोलत होता.

दिवाळीच्या फराळाच निमंत्रण देऊन तो निघून गेला. हे निमंत्रण मी स्वीकारले कारण मला रानबाचे घर पहायचे होते त्याच्या कुटुंबियांना भेटायचे होते. दिवाळीत मी पोखरीला निघालो रानबाच्या घरी.

देवळाच्या बाजूच्या बोळीतून थोडं पुढ गेलं की उजव्या हाताला रानबाचे घर होते. तसा तो पारावरच माझी येण्याची वाट पहात होता. घर मातीच ....गेल्याबरोबर मोकळी जागा. एक बाजूला तुराठ्यांचा आडोसा करून तयार केलेल स्वयंपाक घर .....दोन पत्र्याच्या खोल्या, दगड माती ने बांधलेल्या. अंगणात एक विजेचा बल्ब लटकत होता.

“आई, दादा आले”, रानबा ने आई ला आवाज दिला.

आई लगबगी ने पाणी घेऊन आली हात पाय धुण्यासाठी. सहावार,काठापदराची पण थोडी जुनी झालेली साडी..... रानबा सारखाच रंग व चहेरा...४५ च्या आसपास वय असावं....

“या दादा लई ऐकल रानबा कडून तुमच्या इशई.....बर झाल आलात.ये रानबा अंथर की पोत बसायला” रानबाची आई खुपच आस्थेनी बोलत होत्या.

रानबा लगेच बाहेर गेला त्यांनी पोहे आणले. आई नी चूल पेटून भांड ठेवल ....कांदे, कोथिंबीर कापली ....शेंगदाणे, तेल....मस्त वास येत होता ... रानबानी पोहे भिजवले ....या दरम्यान माझे रानबाच्या आईला प्रश्न विचारने सुरु झाले. “दिवाळीत रोजंदारीच काम नसेल न ?”

“अस कसं होईल जावच लागतं ......आज तुम्ही येणार म्हणून नाही गेले.( “म्हणजे ६० रुपयाचे नुकसान”, मी मनातच म्हणालो.) याचे बा ला जाव लागल सालगडी ह्ययंत न ते ....धार काढायला गेलेत ....ये रानबा, बोलून आन त्यांली ....आज काल या लाईटच बी काही खरं नाही बघा दिस भर नसती आणि राती येते .....मग यांली रातच्याला उसाला पाणी दयायला जाव लागतं. आता बघा न आम्ही बिल नाही भरल. येण सणात कापली आमची लाईन ......अंधारातच दिवाळी झाली ....पैसे लई लागायलेत .किती राबल तरी भागत नाही. या आमच्या रानबाला शिकायची लई इच्छा ......अव दर इतवारी हा तुरी बडवायला जायचा ...कापूस काढाय जायचा ...त्यात मग फिया भरायचा लई कष्ट केले यान ....पण आत्ता काय करणार घरी बसूनच अभ्यास चालू हाय त्याचा ....मास्तर व्हायचं म्हणे .....या ईळीस नंबर नाही लागला ....त्या प्राईवेट काय असत्या त्याच्या फिया म्हंजे आमची सम्द्यांची सालाची कमाई....गरिबाला शिक्षण नाई,पाणी नाई, इज नाई.......पण गडी धीराच हाय लई अभ्यास करतंय.......आत्ता बघाकी या कालच्या अवकाळी पावसानी घराच लई नुकसान केलं आधीच इनमीन दोन घोल्या त्यातील एक ढासळली. माती दगड काढायला बी येळ मिळत नव्हता. सणासुदीला आवराव म्हणून हात घातला अन् एक भलं मोठ जनावर फणा काढूनच अंगावर आल. अंगात कापरच भरलं.जी पळत सुटले ते थेट पाराजवळ. अंग घामानी सरदुन गेलं. एक बाई दिसली सरळ गच्च पकडल तिला. काही बी कळणं. शेवटी जवळच्या बायांनी पाणी पाजल,कांदा लावला नाकाला. थोडं भानावर आले. दिसभर घरा बाहेरच काढला. रानबा चे बा येईस्तोर हिम्मत झाली नाही. आजकाल रात्री बेरात्री लई भ्याव वाटत.”

रानबाच्या आई चे बोलणे मी फक्त सुन्न होऊन ऐकत होतो.

इतक्यात रानबा आपल्या वडिलांना घेऊन आला. पांढरी टोपी, सदरा, धोतर, चांगला रापलेला रंग, प्रचंड काम करणाऱ्या शरीरावर ज्या काही खुणा असतात त्या सगळ्या. राम राम करत वडील खाली बसले. गरम गरम पोहे, चुरमुऱ्याचा चिवडा, शेव व नुक्ती चा चांगलाच पाहुणचार मी घेतला.

जवळची एक काडी घेऊन वडील आपले तळपाय खाजवत होते. मी पाहिलं तर त्यांच्या हाताला व पायाला चांगल्याच भेगा पडल्या होत्या थोडं रक्त पण येत होत.

“काय झाल काका ?” ,मी विचारले

“खात टाकून टाकून झालं हो .....चुना लावला पण बर काही होईना दवाखान्यात जायला येळच नाही भेटला.”
मन सुन्न झाल.

“थोडा वेळ काढावा काका स्वतः साठी” माझ्यातील समुपदेशक बोलला .

“हो न जायलाच लागल. अव आपली दोन एक्कर हाय त्यात भागत नाही म्हणून सालगडी म्हणून हायएका कड. सकाळी आपल्या रानात घंटे दोन घंटे नंतर दिस बर मालकाच्या रानात. दिस कधी जातंय समजतच नाय. रात्री दुखायल की ध्यानात येत.” रानबाचे वडील सांगत होते.

बऱ्याच गप्पा झाल्या. रानबाच्या कुटुंबाची चांगलीच ओळख होत चालली होती. AC मध्ये बसून PC वरच्या एखाद्या सुंदर कवितेला superlike करणाऱ्यातला मी होतो. पंचतारांकित व्यवस्थेत बसून देशाला बलशाली बनवण्याचे नियोजन करणाऱ्यातला मी. विचारांची चक्र भरभर फिरत होती. अश्या अनेक रानबानां शिक्षण सोडून देत पाणी भराव लागतं. तुरी बडवाव्या लागतात, कापूस वेचावा लागतो,ऊस तोडावे लागतात आणि मग आमच्या सारखे लोक विनासायास चांगल विद्यावेतन घेत चांगल्या महाविद्यालयात जाऊन उच्चविद्या विभूषित होतो......
त्याचं जीवन मी कसं समृद्ध करू हा विचार तिथे करत त्यांच्या दैनंदिन कामातील अडथळा आणण्या सारखे होते ....बराच वेळ घेतला होता.

जाण्यासाठी निघालो आई, वडिलांच्या पाया पडलो आणि टावेल टोपीचा आहेर पण घेतला ........
पारापर्यंत आलो तेच रानबाच्या आईचा आवाज आला.ती आम्हाला बोलावत होती. आम्ही परत घरात गेलो आईच्या हातात रंगीत करदोडा होता. तिने तो मला दिला मी तिला विचारल , “ हे कश्यासाठी ?”

आई म्हणाली, “दिवाळीच्या दिवशी आपल्या घरातील मोठयापोराला कंबरेला करदोडा बांधण्याची रीत हाय कसली इजा बिजा येवूनाये म्हणून. आत्ता रानबा तुम्हाला दादा म्हणतो मग तुम्ही माझ थोरलं पोर की आता तुम्हालाच द्यावा लागणार. फक्त या रानबा जरा थोडं समजून सांगत जा आम्हाला ते काय म्हणताय ते काय बी समजत नाही”

रानबाच्या आईच्या त्या शब्दान मध्ये व कृतीत मला सापडलं काय आपला भारत या जगाला देऊ शकतो ....आणि काय शिकऊ शकतो.

मी डोळे घट्ट मिटले व माउलीचे पाय धरले.........

गुलमोहर: 

Chhan lihilay !!

शेवटा शेवटाला रडवलंस गड्या Sad

खूप काही लिहावे असे वाटत आहे वाचल्यानंतर पण शब्द साले....एक देखील आता डोळ्यासमोर येत नाही आहेत, चूकार एकदम! हेलावून जाणे, वाईट वाटणे इत्यादी इत्यादी कॉमन प्रतिसाद द्यावा असे देखील वाटत नाही आहे.. , नजरे समोर येतं आहे ते रानबाचं घरं व त्याच्या घरचे मंडळी सगळे.. !

लेखनात तुमच्या प्रचंड ताकद आहे, असेच लिहीत रहा, जागल्या* म्हणून! आमच्या सारख्यांना कधी कधी असे झटके देणारे लेखन वाचण्यासाठी देत रहा.. काय माहीती एखादा पेटून उठेल व रानबासारख्यांचे जीवन सुखकर करण्यासाठी झटेल. आमच्याकडून नका करू तशी अपेक्षा आम्ही मातीचे पुतळे .. काहीच कामाचे नाहीत! ना पुजेचे ना नवसाचे! पण कुठलातरी मातीचा पुतळा हलेल एक दिवस.. तुमच्या सारखा व मदतीचा हात पुढे पुढे करत राहील ही आशा..

प्रसाद तुम्ही शीर्षक अगदी समर्पक दिले आहे ह्या लेखाला सुधा.

~ AC मध्ये बसून PC वरच्या एखाद्या सुंदर कवितेला super-like करणाऱ्यातला मी ~ मी सुधा ह्याच category मध्ये येणारी. मराठी मध्ये चांगल काही वाचायला मिळाव आणि मराठीशी जन्माने बांधलेले बंध तुटू नयेत, मराठी संस्कृतीशी लहानपणापासून बांधली गेलेली वीण अजून घट्ट व्हावी असल्या अगदी शुल्लक स्वार्थापायी मायबोलीवर येणारी मी.....

खरं तर कळतच नाही कशी दाद द्यावी तुमच्या कार्याला आणि कश्या द्यायच्या शुभेछा तुमच्या स्वप्नांना. तुम्ही म्हणता ते खरच आहे असं AC ऑफिस मध्ये किवा Starbucks मध्ये बसून coffee चा आनंद घेत घेत......खूप छान लेख किवा मनाला स्पर्शून जाणारी गोष्ट अशा रुक्ष प्रतीक्रीयाना खरच काही अर्थ नसणार पण तरीही राहवत नाही म्हणून सांगते....तुमच्या कार्याला आणि संवेदनशील मनाला मनापासून शुभेछा!!!

प्रसादभाऊ,

१.
>> शिक्षण ही प्रक्रिया खरं अशी देण्याघेण्याची का होत नाही ?

>> (इतक्या सार्‍या) परीक्षाना सामोरे जाऊन विद्यार्थ्याला आपण पुढील शिक्षणासाठी आपल्या क्षमतेस पूरक अशी शाखा व विषय शोधता का येत नसतील ?

>> आपल्या भावी आयुष्याची दिशा हि आपल्या क्षमतेनुसार निवडता न येता प्रचलित “धोपट मार्गा सोडू नको” या ठोकताळ्या ने ठरवणे हि आपल्या शिक्षण पद्धतीतील मोठी शोकांतिका नाही का ?

वरील तीनही प्रश्नांचं उत्तर आपल्या शिक्षणपद्धतीत दडलं आहे. ती अत्यंत टाकाऊ आणि भारतद्रोही आहे. तिच्यात केवळ कारकून निर्माण करायची क्षमता आहे. भले त्याची पदवी एम.बी.ए. असेल. ही पद्धती फक्त पोट कसं भरायचं ते पाहते. तीत विद्यार्थ्यांना प्रश्न विचारावयास वाव नाही. घोकंपट्टी सोडल्यास विद्यार्थ्यात दुसरं कुठलंही कौशल्य विकसित होत नाही.

इ.स. १९४७ साली भारत स्वतंत्र झाला असं म्हणतात. मागील ६५ वर्षांत सरकारला शिक्षणाकडे लक्ष द्यायला वेळ आणि पैसा नाही. म्हणून आजही प्राथमिक शिक्षणाची वानवा आढळून येते.

२.
>> खर तर शिक्षणाचा मूळ उद्देशच हा सार्थ आत्मविश्वास निर्माण करणे हा आहे.

अनुमोदन. पण मॅकॉलेप्रणित शिक्षणपद्धतीत आत्मविश्वासास स्थान नाही. त्यामुळे शिक्षणाच्या मूळ उद्देशास हरताळ फसला जातोय.

३.
>> थोड फार शेतीला ग्रामीण भागातील शाळेत स्थान दिल तर बरच काही होऊ शकेल अस वाटत.

परत अनुमोदन. मात्र आपल्या राज्यकर्त्यांना मॅकॉलेप्रणित पद्धती राबवून लोकांना भिकेला लावण्यात अधिक रस आहे. यातूनच 'भारत गरीब देश आहे' इत्यादि भूलथापा उत्पन्न होतात.

असो.

यावर एकाच उपाय. तो म्हणजे भारताची स्वत:ची अशी शिक्षणपद्धती राबवणे. तीत मुलांना विविध कौशल्यांचे (निव्वळ विषयांचे नव्हे) शिक्षण तर दिले जाईलच, शिवाय सोबत आयुष्यातल्या संकटांचा सामना करण्यासाठी तात्विक पायाभरणीदेखील केली जाईल.

या तात्त्विक अधिष्ठानासाठी धर्मशिक्षण अनिवार्य आहे. इथे धर्म म्हणजे कर्तव्य आणि मर्यादा यांचा सुसंगत संगम अपेक्षित आहे. भारत ही फार पूर्वीपासून धर्मभूमी म्हणून गणली जाते. कारण इथे अधिकारांपेक्षा कर्तव्यांना प्राधान्य दिलं जातं म्हणून. तर हीच कर्तव्याधिष्ठित जीवनपद्धती जगण्यासाठी तशा प्रकारची पूरक शिक्षणप्रणालीच अस्तित्वात येणे गरजेचे आहे.

असो.

वातानुकूलात बसून आपल्याला जसं अपराधी वाटतं तसं मलाही एकेकाळी वाटत असे. मात्र हल्ली तसं वाटत नाही. प्रत्येक जण आपापले प्रारब्ध घेऊन जन्माला येतो. त्याल आपण काहीच करू शकत नाही. मात्र इतरांचे तीव्र प्रारब्ध सुसह्य करायला मदत निश्चित करू शकतो. अध्यात्मिक साधनेने (उदा. भक्ती) प्रारब्ध सुसह्य होते. त्यामुळे लोकांना अध्यात्मातील खरेखोटे शोधून काढायला उद्युक्त करणे हेही लोकशिक्षणात मोडते.

आ.न.,
-गा.पै.

प्रत्येक जण आपापले प्रारब्ध घेऊन जन्माला येतो. त्याल आपण काहीच करू शकत नाही.

जे आपलं सुखासीन प्रारब्ध सोडून आडवळणाला जातात त्यांनाच जग लक्षात ठेवतं. प्रचारकी थाटाच्या भाषणांनी देश चालत नाही. डॉ एपीजे अमेरिकेतली गलेलठ्ठ पगाराची नासाची नोकरी सोडून भारतात आले. आज त्यांनी कष्टाने उभारलेल्या मिसाईल प्रोग्रामची फळं आपण चाखतोय. डॉ बाबा आमटे, डॉ प्रकाश आमटे, विकास आमटे, अभय बंग, राणि बंग आणि अशी कित्येक उदाहरणं आहेत. यातल्या काहींना प्रसिद्धी मिळाली तर काहींनी त्याचीही अपेक्षा ठेवलेली नाही.

सदर बाफचा लेखक स्वतः ग्रामीण भागात करतोय. काम करतानाच समाजाचे निरीक्षण आणि आत्मपरीक्षण असे त्यांचे गुण या लेखात ठळक झालेले आहेत. आपल्यासारख्यांनी अशांकडून जितकं घेता येईल तितकं घ्यावं. रट्टे मारलेली विचारसरणी अशा प्रॅक्टिकल लोकांना काय शिकवायची ?

माफ करा... पण राहवलं नाही.

प्रसाद तुझ्या अनुभवांचं भांडार आमच्याकरता खुलं केल्यामुळे आपल्या देशातील अजून बरच काही दुर्लक्षित आहे हे लक्षात आणून देतायेत तुझे लेख.

राज जैन, पहिल्यांदा मी हे ज्यावेळी कागदावर उतरवत होतो त्यावेळी ........खूप रडत होतो मी ........पण आता अश्रू ची कृतीत रूपांतर करायला थोडं थोडं जमायला लागलय. अश्रू नाही तरी काय असतात १ % पाणी व ९९ % भावना.

गामा पैलवान यात शासन जसे जबाबदार आहे तसे नवीन कुटुंब रचना व पालकनीती पण आहे न ?
माझ्या पुढील एका लेखात हे लिहिणार आहे.

वर्षू नील धन्यवाद लेखन तसा माझा प्रांत नाही. सध्या पाय मोडला आहे त्यामुळे हात व डोके जास्त वापरतो. जे भिडले ते लिहितो. खरंच माझ्यात सुप्त लेखक आहे की कार्यकर्ता हा संभ्रम आहे. आपल्या सारख्यांचा सहवास मिळतो आहे हे पण भाग्य नाही तर कुणाला वेळ आहे कुणाचे वाचायला सगळ्यांचे स्टेट्स बिझी !

अनन्या वर्तक धन्यवाद
एखादी घटना,स्थिती,परिस्थिती, व्यक्ती पाहिल्यावर प्रथम पाहणे होते. जर ते हृदयाला भिडले तर मग त्या बद्दलचा भाव मनात निर्माण होऊन ते अभिव्यक्त होतात.

रूनी पॉटर तुझा प्रतिसाद मला हवा आहे तू अंब्याच्या मातीत्तली काही कारणस्तव विदेशात गेलीस म्हणून काय .....अग आपली नाळ इथच पुरली आहे. खूप काही करू शकतो आपण आणि आपणच ते करायला पाहिजे. तुंझा मी दादा आहे म्हणून हक्क आहे तुला सांगण्याचा ......वेळ नक्की येईल तुझ्या कडून पण काहीतरी होईल ...तुझा खूप अभिमान वाटतो आम्हा अंबाजोगाईकरांना.

प्रसाद, उत्तम लेख.
या निमित्ताने ग्रामीण भागातले जीवन कोणत्या पातळीवर जाउन पोचले आहे याची थोडी कल्पना लोकांना आली तरी बरेच मिळवले. म्हणजे गरीब, शेतकरी, आरक्षण इ.इ.वर बेफाम उथळ विधाने करताना थोडा तरी विचार होईल.

रट्टे मारलेली विचारसरणी अशा प्रॅक्टिकल लोकांना काय शिकवायची ?>>> प्रचंड अनुमोदन!

<<यावर एकाच उपाय. तो म्हणजे भारताची स्वत:ची अशी शिक्षणपद्धती राबवणे. तीत मुलांना विविध कौशल्यांचे (निव्वळ विषयांचे नव्हे) शिक्षण तर दिले जाईलच, शिवाय सोबत आयुष्यातल्या संकटांचा सामना करण्यासाठी तात्विक पायाभरणीदेखील केली जाईल.

या तात्त्विक अधिष्ठानासाठी धर्मशिक्षण अनिवार्य आहे. इथे धर्म म्हणजे कर्तव्य आणि मर्यादा यांचा सुसंगत संगम अपेक्षित आहे. भारत ही फार पूर्वीपासून धर्मभूमी म्हणून गणली जाते. कारण इथे अधिकारांपेक्षा कर्तव्यांना प्राधान्य दिलं जातं म्हणून. तर हीच कर्तव्याधिष्ठित जीवनपद्धती जगण्यासाठी तशा प्रकारची पूरक शिक्षणप्रणालीच अस्तित्वात येणे गरजेचे आहे.>>
अनुमोदन

<< AC मध्ये बसून PC वरच्या एखाद्या सुंदर कवितेला superlike करणाऱ्यातला मी होतो. >> हीच तर खरी व्यथा आहे, पांढरपेशा समाज आणि अविकसित ग्रामीण भाग यातील दारी फार मोठी आहे प्रसाद जी

उत्तम लेख ,धन्यवाद

प्रसाद,

माझा आपल्याला आदरपूर्वक नमस्कार

आम्हा सुखसुविधात लोळणार्‍यांना काही काम सांगता येण्यासारखे असल्यास सांगाल का? तेवढंच एखादं पुण्य घड्ल

मी जे शिकलो होतो ते त्यांना शिकवत होतो ....आणि ते जे जगत होते ते मला शिकवत होते...... >>> हा अ‍ॅटीट्यूडच फार आवडला Happy

बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले........
तुझे सर्वच लिखाण अंतर्मुख करायला लावते.....

माझ्या एक सहकारी मित्राची इथे पुण्याजवळच शेतीही आहे. ऑफिसचे काम संपले की तो शेतातच असतो - सतत प्रयोगशील राहून आसपासची शेतकरी मंडळी काय करत असतात हे नीट पहात असतो. त्यामुळे तो खूप संपन्न शेतकरी आहे. त्याच्या म्हणण्यानुसार शेती बिनभरवशाची असली तरी थोडा फार अनुभव व प्रयोगशीलता यामुळे चरितार्थाचे नक्कीच साधन होऊ शकते. सरकारकडे खूप योजना आहेत पण सर्वसामान्य शेतकर्‍यापर्यंत त्या पोहोचतच नाहीत वा लालफितीची दिरंगाई हे ही एक कारण.
त्याच्या म्हणण्यानुसार अल्पभूधारक मात्र कायम अडचणीतच असतो व ही अडचण साखळी एकदा सुरु झाली की संपतच नाही......
शेतकर्‍याला आपल्यासारखी सिक किंवा कॅज्युअल लिव्ह नसतेच, शिवाय सध्या सरकारचे (शेतीतील) सबसिडी काढून घ्यायचे धोरणही फार हानिकारक होणार आहे.....
याविषयी खूप चर्चा करता येईल - पण तू म्हणतो तशी ए. सी. मधे बसून केलेली काय उपयोगाची ??????

प्रसादजि नमस्कार
अश्या अनेकरानबानां शिक्षण सोडून देत पाणी भराव लागतं. तुरी बडवाव्या लागतात, कापूस वेचावा लागतो,ऊस तोडावे लागतात << खरच मला माझ बालपण आठ्वल, मि बारावि पर्यन्त हे सर्व कामे केलेलि आहे, आज मि AC मध्ये बसून PC वर प्रतिसाद देत आहे. परतुं मि अजुनहि कुणासाठि काहि करु शकत नाहि ह्याचि खंत वाटते. मला काहि कारणास्तव ph. D मधेच सोडावि लगलि. आज माझ्याकडे IIM, ISRO सारख्या संस्थेचा अनुभव आहे. परतु सर्व व्यर्थ वाटते कारण , मि सध्या तरि कुणासाठि काहिच करु शकत नाहि. Sad

<<आम्हा सुखसुविधात लोळणार्‍यांना काही काम सांगता येण्यासारखे असल्यास सांगाल का? तेवढंच एखादं पुण्य घड्ल
<< +१११

पुन्हा एकदा पडसर्‍याची आठवण आली. तिकडे आदिवासी वस्त्यांमधे एक मुलगा खुप लांब रहात होता (दोन तिन डोंगर ओलांडून) त्याला शाळेत आणायला गेलो होतो त्याच्या घरी.
तसेच लेण्याद्रीजवळ ठाकरवाडी मधे साक्षरता सर्व्हेसाठी गेलो होतो. या दोन्ही वेळेस साधारण रानबाच्या घरासारखाच अनुभव होता. Sad

वाईट तर खुप वाटते पण याची योग्य कारणमिमांसा गापै यांनी दिलेली आहे.

बिनआयडीचे खाते,

१.
>> जे आपलं सुखासीन प्रारब्ध सोडून आडवळणाला जातात त्यांनाच जग लक्षात ठेवतं.

अगदी बरोबर. मात्र हे किती जण करू शकतात?

२.
>> प्रचारकी थाटाच्या भाषणांनी देश चालत नाही.

मला देश चालवायचा नाहीये. मला फक्त समोर दिसणारी अडचण कशातून उत्पन्न झाली हे शोधून काढायचंय. आणि तिच्यावर उपाय पण शोधायचाय.

३.
>> आपल्यासारख्यांनी अशांकडून जितकं घेता येईल तितकं घ्यावं.

१०० % अनुमोदन.

४.
>> रट्टे मारलेली विचारसरणी अशा प्रॅक्टिकल लोकांना काय शिकवायची ?

कुठली विचारसरणी आणि कसले रट्टे? आणि कोण कोणाला काय शिकवतोय? लेखकासारखी मनस्थिती माझीही होती आणि अनेकांची आहे. तिच्यावर लेखकाने त्याच्या वृत्तीप्रमाणे अतिशय वाखाणणीय उपाय काढला. मात्र हा उपाय सर्वजण अंमलात आणू शकतीलच असे नाही.

प्रत्येकाला आपापल्या शक्तीप्रमाणे उपाय योजला पाहिजे. मला वाटतं तो उपाय वर सांगितला आहे. त्या उपायाच्या स्पष्टीकरणासाठी कर्मसिद्धांताचा आधार घ्यावा लागला तर काय चुकलं? "प्रारब्ध बदलता न येणे" हा उल्लेख आपल्याला आक्षेपार्ह वाटल्याची शक्यता इथे गृहीत धरतो. म्हणून मला वाटतं प्रारब्ध ही संज्ञा थोडी स्पष्ट करावी. प्रारब्ध म्हणजे काय आणि त्यावर कशी मात करावी हे इथे पाहायला मिळेल.

आ.न.,
-गा.पै.

मराठवाड्यात धरणे बांधने हा उपाय नाही मुळात पाउसच कमी पडतो. कारण नसताना मराठवाड्याचा धरणांचा अनुशेष भरुन काढा ही ओरड चुकीची आहे.कारण काही हजार कोटी खर्च करुन धरणे बांधली तरी ते पाणी खुप कमी लोकांना फायद्याचे ठरते.
स्थानिक पातळीवर जमीनीचा आणि खडकाचा पोत बघुन भुजलसंधारण हाच उपाय आहे.आणि महाराष्ट्रात water table move होतो पाणी टिकत नाही हे अडचण आहे त्यावर स्थानिक उपायांना पर्याय नाही.
ह्या वर्षी सगळीकडे दुष्काळ असताना नांदेडची स्थिती बरी आहे कारण गेली २-२.५ वर्षे सातत्याने गाव पातळीवरची जलसंधारणाची कामे रोजगारी हमी अंतर्गत सुरु आहेत.
मराठवाड्यात दुर्लक्शित राहीलेली water conservation method म्हणजे केडिया पध्दतीने भुजल साठवण.औरंगाबदच्या बाभुळगावाने हा प्रयोग केलाय. २००१-२००२-२००३ च्या भीषण दुष्काळातही बाभुळगावातुन आजुबाजुला टँकरने पाणीपुरवठा सुरु होता.
तुम्ही संघटीत कार्यकर्ते आहात , तुम्हाला ह्याचा काही उपयोग झाला तर बघा.
केरळात Subsurface dyke पण बघा
http://en.wikipedia.org/wiki/Subsurface_dyke

Pages