कोकण भटकंती बाईकवरून भाग २

Submitted by आशुचँप on 14 December, 2010 - 07:54

http://www.maayboli.com/node/21818 भाग १......

दिवस दुसरा - इच्छाशक्तीचा विजय

दुसरे दिवशीची पहाट उगवली तीच वाईट प्रकारे. आदले दिवशीचे आचरटासारखे खाणे किंवा बदललेले पाणी यामुळे पोट जाम बिघडले होते आणि फेर्‍या सुरू झाल्या होत्या.
अर्थात, एक गोळी घेऊन बरे वाटेल अशी समजूत घालून कोर्लई किल्ल्याकडे रवाना झालो.

रेवदंडा खाडीवरील पहाट

पोर्तुगिज हे पहिले युरोपियन आक्रमक आणि सर्वात शेवटपर्यंत टिकून असलेलेही. रेवदंडा, चौल आणि कोर्लई इथे त्यांचे चांगलेच वर्चस्व होते आणि अजूनही अनेक ठिकाणी त्याच्या खुणा आढळतात. इतकेच काय या भागात चिश्ती म्हणून एक भाषा बोलली जाते (मराठी आणि पोर्तुगिज भाषेचा संकर असलेली). ही भाषा ऐकण्याची जाम इच्छा होती पण ते काही शक्य झाले नाही.
रेवदंड्यातून गाडीरस्ता खाडी ओलांडून थेट किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या लाईट हाऊसपर्यंत पोचतो. तिथून थोड्या पायर्‍या चढून गेले की किल्ल्याचे प्रवेशद्वार सामोरे येते.

किल्ला अजूनही सुस्थितीत आहे आणि अनेक दरवाजे (चार बाहेरचे आणि सात आतले), बुरुज, तोफा, मंदिर, चर्च असे सगळे काही आहे.

इतर सागरी किल्ल्यांसारखा हा भुईकोट किंवा जंजीरा नसून एका टेकडीवर आहे त्यामुळे पोर्तुगिजांना पाय रोवताना या किल्ल्याची चांगलीच मदत झालेली असणार हे जाणवते. पूर्वी या किल्ल्यावर सुमारे ७० तोफा होत्या पण आता अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच उरल्या आहेत.

संभाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घ्यायचा अयशस्वी प्रयत्न केला आणि नंतर चिमाजीअप्पांच्या नेतृत्वाखाली मराठी सैन्याने हा किल्ला जिंकला. त्यावेळी किल्ल्याच्या बुरुजांची पोर्तुगिज नावे बदलून मराठमोळी गणेश, लक्ष्मी अशी नावे देण्यात आली होती. किल्ल्याला एकूण सात बुरूज आहेत.

पोर्तुगिज शिलालेख...मधल्या जागेत सात किल्ले दिसतायत. असे म्हणतात भारतातील सत्तेचे ते प्रतिक होते. नक्की खुलासा जाणकार करू शकतील.

किल्ला पाहताना मी पोटामुळे अस्वस्थच होतो आणि जसाजसा वेळ जाऊ लागला तसा माझी अवस्था बिकट होऊ लागली. त्यामुळे फारसा वेळ न घालवता आणि लाईट हाऊस पाहण्याची इच्छा डावलून रेवदंड्याचा मार्ग पकडला.

डीहायड्रेशन होऊ नये म्हणून वाटेत बिस्लेरी वॉटर आणि इलेक्ट्रॉल घेऊन त्याचा मारा सुरू केला. रेवदंड्याला पोहोचलो तरी फेर्‍या थांबेनात आणि असह्य कळाही सुरू झाल्या आणि जाणवले हे नुसते पोट बिघडणे नाही.
त्या छोट्याश्या गावात कसाबसा एक डॉक्टर मिळाला आणि सुदैवाने तो चांगला निघाला. त्याने सगळी लक्षणे विचारून घेतली आणि पाण्यामुळे इन्फेक्शन झाले असावे असे निदान केले.
मग आता.....?????
"काय घाबरू नका, आज रात्रीपर्यंत ठीक व्हाल. आता तातडीने जुलाब थांबवण्याची गोळी दिली तर उलट्या सुरू होतील. इन्फेक्शन निघून जाऊ दे, मग फ्रेश व्हाल,"
"अहो पण आमचा आज मुरुड-जंजिरा पाहण्याचा बेत आहे."
"मला वाटतं, तुम्ही या अवस्थेत फार दगदग करू नका, विश्रांती घ्या चांगली."
मग त्याचे म्हणणे ऐकून प्लॅनमध्ये बदल करून आजचा दिवस रेवदंड्यातच काढून दुसरे दिवशी मुरुडला कूच करण्याचे निश्चित केले. पण कळा थांबण्याचे नाव घेत नव्हत्या. अगदीच असह्य झाले तेव्हा घरी फोन केला. अपेक्षेप्रमाणेच बायकोने तातडीने घरी येण्याचा हुकूम सोडला.
"अजून जर तब्येत बिघडली तर त्या गावात काय करणार. आणि तिथे खायचे-प्यायचे हाल होणार. का उगाच जीवाला त्रास करून घेतो."
मलाही ते पटत होते कारण अवस्था तर आता कधीही अॅडमिट करावे लागेल अशीच होती. सकाळपासून १५-१६ वेळेस जाऊन आलो होतो आणि एकथेंबही पोटात रहात नव्हता. आणि त्या आडगावी अॅडमिट होण्याची माझी तरी तयारी नव्हती. शेवटी दु:खी मनाने पॅक-अप करण्याचा निर्णय घेतला.
सॅक पाठीवर घेतली आणि पुण्याच्या दिशेने निघालो. पण एक रुखरुख मनात दाटत होती. मोठ्या मुष्किलीने सुट्टी मिळाली होती आणि जर पु्ण्याला जाऊन बरा झालो रात्रीपर्यंत तर हा ट्रेक पुन्हा करणे शक्य होणार नव्हते.
अत्यंत दोलायमान स्थिती...टू बी ऑर नॉट टू बी...
शेवटी इच्छाशक्तीने मात केली आणि अमेयला गाडी थांबवायला सांगितली.
"हे बघ, त्या डॉक्टरने सांगितले आहे की रात्रीपर्यंत बरे वाटेल. सो आपण चान्स घेऊ. इथून मुरूडला जाऊ, इथल्यापेक्षा तिथे सोय चांगली असेल. काय वाटलेच तर उद्या सकाळी निघून जाऊ पुण्याला परत."
मग वडलांना फोन केला आणि त्यांना सर्व परिस्थिती कथन केली.
"काय होत नाही रे, जा बिनधास्त. गोळ्या घे व्यवस्थित."
त्यांच्या या शब्दांनी खूपच धीर आला आणि वाटेत दिसेल तिथे शहाळपाणी पीत मुरूड गाठले.
गोळ्यांचे दोन डोसपण पोटात गेल्यामुळे कळा खूपच कमी झाल्या होत्या आणि फेर्‍यांची संख्यापण रोडावली होती. रात्री मुरूडला जेव्हा पोचलो तेव्हा सगळीकडे लाईट गेले होते आणि पावसाचे थेंब पडायला सुरूवात झाली होती.
कसेबसे एक रेस्टहाऊस गाठले आणि घासाघिस करून खोली पटकावली. मग जवळच्याच एका हॉटेलमध्ये अमेयने मनसोक्त मासे हादडले तर मी फक्त पातळ वरण-भातावर भागवले.
दोन दिवसात फक्त दोनच किल्ले झाल्यामुळे आमचे प्लॅनिंग तसे बोंबललेच होते पण प्लॅन कॅन्सल न होता पुढे जाऊ शकू या आनंदात छानपैकी पडी टाकली.
(दरम्यान, बायकोने फोनवरून खरडपट्टी काढलीच होती पण ती कानापलीक़डे टाकण्याची किमया खूप आधीपासूनच साधली होती.)

http://www.maayboli.com/node/21976 भाग ३

गुलमोहर: 

भटकंतीत 'हे'इन्फेक्शन फार कॉमन आहे..... म्हणून ओआरएस आणि मेट्रोजिल-४०० च्या गोळ्या सोबत असाव्याच.

हा भागही मस्तै आशु.

मित्रहो, हा भाग अगदीच छोटा झाला आहे. पण मी एका दिवसाला एक भाग असे ठरविल्यामुळे तसे दिले आहे. मलाही त्यामुळे लिहीताना सोपे जाईल आणि वाचकांनाही सुसुत्रपणे वाचायला बरे पडेल असे वाटले..
कृपया तुमचे अभिप्राय कळवावेत.

" बाळा, भाजी संपली"...हे बोलायला लावलं नसतं तर ही वेळ आली नसती Lol
पुढचा भाग लवकर टाक. गड-किल्ले पाहून जमाना लोटला.

दिनेशदा नक्कीच....
ट्रेकला आत्तापर्यंत पहिल्यांदाच माझे पोट बिघडले. गडावरचे पाणी पिऊन काय होत नाही, पण गावातले नक्कीच खराब असते.
पण या गोळ्या बरोबर ठेवाव्यात हे मात्र पटले...
रुणुझुणू - Happy
अगं नायं गं, मी विचारले डॉक्टरांना की काल खूप खाल्लेय त्यामुळे झाले का. तर म्हणे नाही, शक्यता पाणी बदलल्यामुळेचीच वाटतीये. आणि ती बरोबर असावी कारण पुढेपण खाण्यात काय कसर सोडली नाही. त्याचे वर्णन येईलच पुढे.

भाग-२ सुद्धा छानच. फेर्‍यांमुळे लिखाणातही लगबगीचा वेग आल्यासारखा वाटला !
[ पण हे साले इंग्रज, पोर्तुगीज कसल्या गोळ्या घेऊन यायचे हो कलमडायला इथं !!];-):डोमा:

फेर्‍यांमुळे लिखाणातही लगबगीचा वेग आल्यासारखा वाटला !>>> भाऊ Lol

पण ग्रेट आहेस रे तू... एवढा त्रास होऊन सुद्धा प्लॅन कॅन्सल केला नाहीस, याचे कौतुक वाटते. याला म्हणतात जबरदस्त इच्छाशक्ती... Happy

पण ग्रेट आहेस रे तू... एवढा त्रास होऊन सुद्धा प्लॅन कॅन्सल केला नाहीस, याचे कौतुक वाटते. याला म्हणतात जबरदस्त इच्छाशक्ती... >>>> Happy

आशू मस्तच आहे हा भाग.... Happy

भाऊ फारच थोडक्यात आटपल्यासारखे वाटतेय खरे पण खरोखर तसेच झाले.
फेर्‍यांमुळे लिखाणातही लगबगीचा वेग आल्यासारखा वाटला Happy Happy
सानी - एवढा अट्टाहास का केला ते कळेल पुढच्या भागात... Happy

सही वृत्तांत,.......

. [ पण हे साले इंग्रज, पोर्तुगीज कसल्या गोळ्या घेऊन यायचे हो कलमडायला इथं !!] भाऊनां १०० मोदक

ग्रेट... मानला पाहीजे तुला.
रेवदांड्याला मुक्काम केला असतास तर रेवदांड्याचा किल्ला पण करता आला असता.

मनोज मुक्काम रेवदंड्यालाच केला. पण तो किल्ला असा काय नाहीच आहे. त्यामुळे तो पाहिला एवढेच म्हणता येते. बाकी काय उरलेच नाहीये.