वाडा चिरेबंदी.. एक मास्टर पीस!

Submitted by छन्दिफन्दि on 27 May, 2025 - 23:45

वाडा चिरेबंदी… एक मास्टरपीस!
_______________________

आतापर्यंत बघितलेल्या नाटकांपैकी सर्वोत्कृष्ट नाटकांमध्ये अगदी वरच्या क्रमांकावर हे नाटक येईल. आगदी सर्व बाजूंनी परिपूर्ण अशी ही कलाकृती आहे.

१९८४ मध्ये महेश एलकुंचवारांनी लिहिलेल्या या नाटकात साधारण साठाव्या दशकातला काळ दाखवला आहे. अमरावती मधील एका छोट्या गावातला हा देशपांड्यांचा चिरेबंदी वाडा.
रात्रीची वेळ मुंबईहून येणाऱ्या धाकट्या लेकाच्या वाटेकडे डोळे लावून बसलेली, नुकतंच वैधव्य प्राप्त झालेली आई आणि शेजारीच तिला धीर देत बसलेली तिची प्रौढ अविवाहित मुलगी इथून नाटकाला सुरुवात होते. वडिलांचे क्रियाकर्म होईपर्यंतच्या पुढील सात -आठ दिवसांमध्ये वाड्यात ज्या घटना घडतात ते नाट्य म्हणजेच वाडा चिरेबंदी नाटक! अनेक पात्रांची मोळी यात बांधलेली आहे - थोरला मुलगा भास्कर आणि त्याची पत्नी हे घरातील कर्ते सवरते, मुंबईहून आलेला धाकटा मुलगा आणि त्याची बायको म्हणजे तसे उपरेच, तर मधला चंदू म्हणजे घरात राबणारे हात, शिक्षणाच्या हट्टा पायी अविवाहित राहिलेली प्रौढ बहिण, बदलत्या परिस्थितीत सावरून घेणारी व्यवहारी म्हातारी आई, अंथरुणाला खिळलेली, काहीबाही भास होणारी घरातली सर्वात ज्येष्ठ दादी, शिक्षणाअभावी वाईट संगतीमुळे वाया चाललेला पराग आणि फुलपाखराप्रमाणे बागडणारी वयात आलेली लेक रंजू ही दोन भास्करची मुलं, केवळ संभाषणतून कळत गेलेला सुधीरचा हुशार मुलगा अभय.

गतवैभव सरून अवकाळा आलेला तो वाडा, वास्तव न पचवता आल्याने येणं केन प्रकाराने घराण्याची पोकळ प्रतिष्ठा सांभाळणारा थोरला; थोरल्या भावाने केलेल्या उपकारांच ओझं पेलून वैतागलेला, कष्टकरी आणि काटकसरी नोकरपेशा आयुष्याला सरावलेला, व्यवहारी जगाची उपरती झालेला धाकटा; विनातक्रार विनामोबदला अखंड राबणारा चंदू , घरातील ज्येष्ठांच्या बडेजावाच्या पोकळ भ्रमांमुळे पिचलेली मुलगी, थोडी फार स्वार्थ बघणारी, लोभी वाटणारी तरी रक्ताच्या नात्यांनी बांधून ठेवलेली माणसं - ह्या नाटकात दिसणारी वास्तू, भेटणारी माणसे ही फक्त त्या वाड्यातली किंवा त्या काळापूरती न राहता ती अगदी आजच्या काळातही - विशेष करून ज्यांनी जुनी घरं पाहिली आहेत किंवा एकत्र कुटुंब पद्धत अनुभवली आहेत त्यांना - रिलेट होतात. त्यामुळे मग नाटकातील काळ जरी ६० वर्षे जुना असला तरी आजच्या प्रेक्षकाला तो तितकाच खिळवून ठेवतो.

हे नाटक बरंच गंभीर ( intense ) आहे असं ऐकून होते. नाटक जसं शेवटाकडे येत तशी त्याची प्रचिती येते. पण तरी सुरुवातीपासून नाटकात येणारे वऱ्हाडी लहेजातील खुसखुशीत संवाद, कुटुंबात (सर्रास आपल्यासारखे) उडणारे खटके, येता जाता मारलेले टोमणे, जावाजावांमधील शीत युद्ध, वयात आलेल्या मुलीचे स्वप्नरंजन हे असं सगळं इतक छान नैसर्गिकरित्या येत तुम्हाला हसवत जातं. अर्थात एकूण एक सर्व कलाकारांना त्याचं श्रेय जातं - सगळ्याचाच अभिनय अतिशय सहज सुंदर झालाय.

मला जाणवलेल अजुन एक वैशिष्ट्य म्हणजे, प्रत्येक पात्राच्या ( अगदी लहान मोठं - फक्त वयानेच नाही तर भूमिकेच्या लांबी नुसारही) विविध छटा, भाव-भावना दाखवल्यात, आणि प्रत्येकाने त्या इतक्या सुंदर पद्धतीने साकारल्या आहेत. जसं रंजूच अवखळ तरुणी आणि कोमेजून गेलेली कळी, इकडे तर व्यवहारी आणि तरीही कुटुंबासाठी घरासाठी जीव तुटणारा सुधीर, कधी स्थितप्रज्ञ वाटणारी पण आपल्या कमजोर मुलांच्या काळजीने तीळ तीळ तुटणारी आई तसंच गेलेल्या नवऱ्याची प्रतिष्ठा मानसन्मान राखू बघणारी एक मानी पत्नी,
सगळ्यात (सुखद) धक्का दिला तो निवेदिता सराफ यांनी - विदर्भीय भाषेचा लहेजा उत्तमपणे सांभाळत केलेले खोचक संवाद, प्रेमळ वहिनी, घरची मोठी सून, संतापी नवऱ्याची बायको, दोन तरण्या मुलांची आई, ढेपाळणाऱ्या घराची कारभारीण ह्या सगळ्या भूमिकां वटवताना लागणाऱ्या छटा त्यांनी अतिशय खुबीने सादर केल्यात.
मागे चारचौघी बघितलेलं आणि आता हे नाटक - बघताना चंद्रकांत कुलकर्णी हा एक ब्रँड आहे असं का म्हणतात तेही उमजलं - समर्पक पात्रयोजना, कौशल्यपूर्ण दिग्दर्शन - कलाकारांकडून बारकाईने ती पात्र घडवून घेतात हे जाणवलं.
नेपथ्य, प्रकाशयोजना आणि ध्वनी ह्या बाजूही नाटकात अतिशय उत्तमरित्या सांभाळल्या आहेत. एकंदरच अभिजात नाटक म्हणजे काय ते ( बहुदा पहिल्यांदाच) अनुभवायला मिळालं.
तरी एक पण उरलाच - या सर्व दिग्गजांचा प्रयोग हाउसफुल असता तर.. असो!

अकरा वर्षे भारतभर प्रयोग केल्यानंतर, रविवारी जो प्रयोग झाला तो या संचाचा सगळ्यात शेवटचा प्रयोग होता. ते ऐकून अर्थातच वाईट वाटलं. सर्व बाजूंनी परिपूर्ण असे हे नाटक अजून काही काळ चालायला हवं होतं असे वाटून गेलं. पण अर्थात काही वर्षांच्या विश्रांतीनंतर नवीन संचात ते नक्कीच पुनरागम करेल आणि त्यावेळीही प्रेक्षक त्याला असेच उचलून धरतील!

जाता जाता महत्वाचं -
अमेरिकेतील सर्व प्रयोगांदरम्यान वाड्याचा सेट (जो नाटकाचा की पॉईंट ) कित्येक हजार किलोमीटर ट्रक चालवत घेऊन जाणारे शैलेश शेट्ये, ह्या अशा नाटकवेड्या/ कलाप्रेमी मंडळीमुळे एव्हढ्या दूर आम्हाला इतकी अप्रतिम नाटके बघायला मिळतात. त्यांना धन्यवाद आणि त्यांच्या नाट्य प्रेमाला सलाम!

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाटक पाहिले नाही पण नाव ऐकून आहे.
लेख इतका छान झाला आहे तर नाटकही चांगलेच असेल.
काही तिथल्या मित्रांच्या स्टेट्सवर या नाटकाचे फोटो पाहिले होते. भारी आहे असे मोठाले सेट घेऊन अमेरिकेला जाऊन नाटक सादर करणे. पैश्याचे गणित कसे जुळत असावे हा प्रश्न पडतो नेहमी कारण आधीच आपल्याकडे बजेटची बोंब असते.

छान लिहिले आहे. मी हे दोनदा पाहिलंय.
हे नाटक जबरदस्त आहे. ज्यांनी पहिले नाही त्यांनी नक्की पाहा. तो काळ, वातावरण, सादरीकरण सगळच जमून आलेलं आहे. सगळ्यांनी भूमिका अगदी जीव ओतून केल्या आहेत. महेश एलकुंचवार म्हणजे वादच नाही.
याच मालिकेतील "मग्न तळ्याकाठी" आणि "युगांत" पण तितकीच भारी आहेत.

मी त्रिधारा प्रयोग मूळ संचात ा बघितलाय.
याच मालिकेतील "मग्न तळ्याकाठी" आणि "युगांत" पण तितकीच भारी आहेत. >>> मम

पैश्याचे गणित कसे जुळत असावे हा प्रश्न पडतो नेहमी >>> हा प्रश्न मलाही पडतो. गेल्या आठवड्यात आम्हीही पाहिलं हे नाटक इथे. तेव्हा चंद्रकांत कुलकर्णींनी आवर्जून सांगितलं होतं की पुढचा प्रयोग बे एरियात आहे तेव्हा अधिकाधिक लोकांना यायला सांगा. आमच्या इथे नाटक हाऊसफुल्ल नव्हतं. छ्न्दिफन्दिंच्या इथे पण नव्हतं असं समजलं. खरंच कसं परवडत असेल? जाहिराती करण्यात कमी पडत आहेत का लोक कुठे? का आपल्याच माणसांना बघायची असोशी नाही?

वाडा चिरेबंदी बघणं एक नितांतसुंदर अनुभव होता. सगळ्यांची कामं सहज झाली. प्रसाद ओकने सगळ्या भावभावना अतिशय सुरेख दाखवल्या. निवेदिताचा वर्‍हाडी लहेजा छानच. मला सगळ्यात जास्त सीन आवडला तो दागिन्यांचा. एकच संवादांचा सेट दोन वेगवेगळ्या बायका म्हणतात. त्यांचा रेफरन्स वेगवेगळा आहे पण भावना तीच.

हे नाटक इतकं छान आहे तर उरलेली दोन कशी असतील याची उत्सुकता आहे. खूप इंटेन्स आणि डार्क होत जातात असं ऐकलं आहे. पहायची इच्छा मात्र नक्कीच आहे.

“भारी आहे असे मोठाले सेट घेऊन अमेरिकेला जाऊन नाटक सादर करणे. पैश्याचे गणित कसे जुळत असावे हा प्रश्न पडतो” - सहसा हे सेट्स इथे लोकल नाट्यमंडळं तयार करून देतात. बॅकस्टेजची पण (थोडी अनस्किल्ड) कामं लोकल हौशी नाटकमंडळी करतात. कलाकारांची राहण्या-जेवणाची सोय आयोजकांकडून केली जाते.

सगळ्यांना धन्यवाद!
त्रि नाट्यधारा विषयी ऐकलंय... एकाच दिवशी साडेआठ तास तीन नाटक अस स्वरूप ना! नक्कीच छान अनुभव असेल.
ओरिजनल संच म्हणजे १९८४ दरम्यान का? विजय मेहता यांनी बसवलेलं?

हो मलाही नगरची दोन्ही नाटकं बघायच उत्सुकता आहे.. पण त्यांचे प्रयोग सध्या चालू आहेत का?

दागिन्यांचा सीन मलाही खूप आवडला होता....
त्या दोन जावांची एकाच बाबतीतली भिन्न भूमिका ( परस्परविरोधी) गमतीशीर णे समोर येतात.. प्रत्यक्ष आयुष्यातही कुटुंबातले बरेचसे वाद असेच असतात ना.. !/?

हे नाटक खरच मलाही दुसऱ्यांदा बघायला आवडेल.

त्यांचे प्रयोग सध्या चालू आहेत का? >>> नाही. निदान US मधे नाहीत. प्रतिमा जोशींशी आम्ही बोललो तेव्हा त्या म्हणाल्या इतके तास कोण बसून बघणार? म्हणून आम्ही हे एकच नाटक आणले. याशिवाय लॉजिस्टिक्सचा मुद्दाही आहेच.

लेख इतका छान झाला आहे तर नाटकही चांगलेच असेल. >>> उलट आहे.. नाटक चांगलं आहे म्हणून त्याविषयी हे लिहिता आलं Happy

वरती फेरफटका यांनी सांगितल्याप्रमाणे कधी कधी सेट लोकल असतात, किंवा नेपथ्यातील इतर गोष्टी लोकल असतात, किंवा कधी प्रकाशयोजना ध्वनी व्यवस्था बघणारे स्थानिक असतात.

या नाटकात सीट मला वाटतं ओरिजिनल होता.. तो त्यांनी बहुदा भारतातून शिप केला असावा. आणि इकडे तो मग वर म्हंटल्याप्रमाणे फिरवला.

हे नाटक हाऊसफुल्ल नव्हते (१००० सीट चे थिएटर होते ४०% bhatlele) . पण बरीचधी नाटके इकडे हाउसफुल जातात.
आत्ताच सांगायचं तर पत्रा पत्री, जर तर ची गोष्ट ही दोन्ही नाटकं हाउसफुल होती. गेल्यावर्षी चारचौघी त्यानंतर महाराष्ट्राची हास्य जत्रा हे पण हाउसफुल होतं. हास्य जत्रा तर अजून मोठ्या थेटर मध्ये होतं ( दीड दोन हजार लोकं पण असतील कदाचित).
शिवाय बऱ्याचशा नाटकात 4=8 जणांची अशी छोटी टीम असते.. खर्चही तेव्हढा कमी येतो. शिवाय एका टूर मध्ये 5-7 शहरांत प्रयोग होतात.
तिकिटाच्या किमतीही वाढल्यात .
( 100 - 75$ ला पुढची तिकीट असतात.. 30-40$ च्या फक्त शेवटच्या दोन रंग असतात)

यावेळचा प्रयोग हाऊसफुल्ल न होण्यामागे ही काही कारणे असावीत असा माझा अंदाज होता..
हा वीकेंड लाँग weekend होता.
सामान्यतः असं बघितलं की स्थानिक संस्था जसं महाराष्ट्र मंडळ किंवा कला यांपैकी कोणी त्यात इन्व्हॉल्व असेल तर बऱ्याचदा हाऊसफुल जातो..
या नाटकाची जाहिरात बहुदा खूप जास्त झाली नव्हती.

कास्टिंग आणि नाटकाचं नाव बघून वाटलेलं की आयत्या वेळी तिकिटं मिळणार नाहीत म्हणून दोन महिने आधीच काढलेली.

म्ही हे एकच नाटक आणले. याशिवाय लॉजिस्टिक्सचा मुद्दाही आहेच.>> हो ते तर आहेच
मलl विचारायचं होतं की भारतात .. कारण हे नाटक आता त्यांनी तथांबवलंय .

राहण्याचा विषय निघाला म्हणून सांगते. आता हे कुठे राहिलेले माहित नाही म्हणजे हॉटेलवर किंवा कोणाच्या घरी... पण एवढी मोठी टीम होती तर बहुदा हॉटेलवरच उतरले असावेत.

गेल्यावर्षी बी एम एम संमेलनात सगळे आर्टिस्टस मारिएट मध्ये उतरले होते .

मलl विचारायचं होतं की भारतात >>> भारतात या संचात हे नाटक आधीच थांबवलं आहे म्हणाले. कदाचित नवीन संचात आणणार असतीलही.

Thanks सामो
अनेक पातळ्यांवर उत्तम जमून आलंय.

Submitted by समीर on 1 June, 2025>>> शेअर केल्याबद्दल धन्यवाद !
ही मंडळी खरी नाट्यवेडी आहेत Happy

छान ओळख करून दिली आहे. समीरने दिलेली लिंकही पाहिली. बजेटच्या ट्रकमधेच मूव्ह केले आहे, अगदी घराच्या मूव्हिंग सारखे वाटले. खूप ऐकले आहे ह्या नाटकाबद्दल.