‘सच कहूँ तो’ - नीना गुप्ता

Submitted by स्वेन on 13 August, 2021 - 07:19

१९९३मध्ये ‘बझार सीताराम’ या पहिल्याच चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी नीना गुप्ताने सर्वोत्कृष्ट नॉन-फीचर फिल्मचा राष्ट्रीय पुरस्कार जिंकला. त्या चित्रपटाचे निर्माते श्याम बेनेगल यांनी तिला त्या वेळी सांगितले होते - “प्रत्येक कथेची स्पष्ट सुरुवात, मध्य आणि शेवट असं सगळं लक्षात ठेवलं, तर कधीही अपयश येत नाही.” हा सल्ला तिने केवळ चित्रपटालाच लागू केला असे नव्हे, तर तिच्या आत्मचरित्रालाही लागू केल्याचे दिसते. ती ‘सच कहूँ तो’ या आत्मचरित्रात हेच समीकरण वापरून आपली कहाणी सांगते.

गल्ली क्र.१, रेगर पुरा, करोल बाग, दिल्ली इथपासून या आत्मचरित्राला सुरुवात होते. साठच्या दशकातल्या दिल्लीचे चित्र रंगवतानाच आपले बालपण आणि पौगंडावस्थेतील काळ कसा गेला, हे नीना आडपडदा न ठेवता सांगते. तिचा पहिला प्रियकर, अमलान कुसुम घोष या आयआयटी दिल्लीत शिकणाऱ्या बंगाली विद्यार्थ्याच्या वसतिगृहातील खोलीत ती कशी लपून बसायची आणि त्याच्याबरोबर दिल्ली पालथी घालताना काय काय करायची, हे वाचताना ती हातचं काहीच राखून ठेवत नाही हे कळतं. अमलान तिचा पहिला पती.

नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधले तिचे दिवस कसे गेले, हे सांगतानाच तेंडुलकर लिखित ‘सखाराम बाईंडर’ यानाटकाच्या वेळची एक रंजक घटना ती सांगते. या नाटकात नीनाने चंपाचे पात्र रंगवले होते. सखाराम चंपाच्या तोंडावर उशी दाबतो, तो प्रसंग तिने सांगितला आहे. उशी चेहऱ्यावर हलके दाबण्याऐवजी नाटकातील सखाराम सर्व शक्ती लावून नीनाच्या तोंडावर दाबत राहतो आणि नीनाचा जीव गुदमरायला लागतो. ‘आपले डोळे बाहेर येतायत की काय’ असे वाटत असतानाच ती त्याला ढकलून देऊन उठायचा विचार करते... मग प्रेक्षक काहीही म्हणोत. ती त्याला ढकलते आणि त्याच वेळी रंगमंचावरचे दिवे जातात. तिला ढकलताना कुणीही पाहत नाही, पण टाळ्या वाजत राहिल्या. नंतर सखाराम रंगवणाऱ्या पात्राने नीनाचे पाय धरले; ते तिने ‘माफ़ किया’ म्हणेपर्यंत सोडले नाहीत.

अभिनेते, राजकारणी, उद्योगपती किंवा तत्सम व्यक्ती आपापली आत्मचरित्रे लिहितात, तेव्हा खरेच ‘ते अगदी सत्य लिहितात का?’ हा संशोधनाचा विषय आहे. अगदी ‘नथिंग बट ट्रूथ’ किंवा ‘देवाची शपथ’ असे पुस्तकाचे शीर्षक असले, तरीही त्यावर कितपत विश्वास ठेवावा, हे कळत नाही, पण ती व्यक्ती नीना गुप्तासारखी बंडखोर असेल, तर खात्री पटते की, तिने वर्णन केलेले जीवन आणि तिच्या आसपासचे जग नक्कीच सत्य आहे.

नीनाचे चरित्र कदाचित अनेकांना धक्कादायक वाटू शकते, कारण ती सामाजिक चालीरीतींना तिलांजली देत लग्नाशिवाय मूल जन्माला घालते. बालपणापासून तिची सुरू झालेली सफर, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून निघाल्यानंतर एक जबरदस्त प्रतिभाशाली अभिनेत्री होण्यापर्यंतचा तिचा प्रवास, अगदी वयाच्या साठाव्या वर्षीही एखादे पात्र ताकदीने उभे करणारी एक मनस्वी कलावंत, परंतु सामान्य स्त्रीप्रमाणेच भय, असुरक्षितता, शंका, महत्त्वाकांक्षा, स्वप्ने, आशा आणि इच्छा व प्रत्येक मानवी भावनांसह ती कशी वावरते, या सर्व गोष्टींविषयी तिने मनमोकळेपणाने लिहिले आहे.

हिंदी चित्रपटसृष्टीत ‘कास्टिंग काऊच’ नावाचा प्रकार असतो, हे ती स्पष्टपणे सांगते. तथापि त्या काऊचवर आपण झोपायचे की नाही, हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून आहे, असे ती पुढे म्हणते. तिलाही या क्षेत्रातल्या बऱ्याच लोकांनी या काऊचवर झोपायला सांगितले होते. ज्या लोकांनी या मागण्या केल्या, अशा पुरुषांची नावे तिने पुस्तकात घेतलेली नाहीत, मात्र ज्यांनी तिचे नुकसान केले, अशा असंख्य लोकांचा तिने उल्लेख केला आहे, परंतु त्यांची ओळख ती जाहीर करत नाही. मात्र काही प्रकरणांमध्ये ती त्याबाबत स्पष्ट इशारा देते. उदाहरणार्थ, जेव्हा तिचे लग्न ठरले, पण कधीच झाले नाही, याबद्दल म्हणते- ‘‘I was acquainted with Raghav's maternal grandfather, who was an eminent producer in India.’’

स्वत:च्या क्षमतेबद्दल खात्री बाळगणारी एक खंबीर व्यक्ती आणि अभिनेत्री असून यशाकडे झेप घेताना तिने अनेक अडथळ्यांना न जुमानता हे मोठे यश मिळवले आहे, हे जाणवत राहते. आजदेखील चित्रपट निर्मात्यांकडून तिच्या कलागुणांचे कौतुक होत असूनही नीना सांगते की, यशाकडे जाणारा रस्ता सोपा नव्हता. वैयक्तिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही पातळ्यांवर नकार, अपमान आणि फसवणूक यांनी तिची कारकीर्द झाकोळली जात असतानादेखील तिने यशाचा पल्ला गाठला. हे सांगताना ती आपल्याला प्रभावित करण्याचा प्रयत्न करत आहे, असे कोठेही दिसत नाही; ती आपल्याशी थेट संवाद साधत आहे, असेच वाटते.

आपल्या आयुष्यातील अनेक बाबी सरळ शब्दांत सांगत असतानाच, तिच्या मुलीचे, मसाबाचे वडील, विव्हियन रिचर्ड्सबद्दल ती त्रोटक माहिती देते. या गाजलेल्या वेस्ट इंडियन क्रिकेटरबरोबरच्या नात्याबद्दल सांगताना ‘मसाबाची आई’ म्हणून आपण कमी पडलो, याचे तिला वाईट वाटते. आनंदाची भावना आणि मातृत्वाचा अभिमान केवळ आईच्या अनुभवातूनच येऊ शकते, हे ती कबूल करते. मसाबाची उपस्थिती किंवा तिचे अस्तित्व, तिने अनुभवलेल्या जीवनापेक्षा अधिक आनंदाचे आहे आणि तो आनंद तिला अजूनही वाटत आहे, असेही तिने सांगितलेय.

‘टिपू सुलतान’च्या सेटवर आग लागली असताना मसाबा कशी एकटीच ग्रीन रूममध्ये अडकली होती, हे पाहून तिचा थरकाप कसा उडाला आणि तिथे जाण्यासाठी तिने जीव कसा धोक्यात घातला, हा प्रसंग अफलातून अशा पद्धतीने सांगितलाय.

चित्रपट उद्योगाबद्दल बोलताना तिचे विचार स्पष्ट आहेत – ‘No one is your companion. The business is a business’. अशा व्यवहारामुळे तिला बराच त्रासदेखील सहन करावा लागला. हे वाचताना प्रख्यात निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते, तसेच टीव्ही कलाकार यांचे पडद्यामागे काम कसे चालते, याबद्दलही बरेच कळते. ‘चोली के पीछे’ या कुख्यात की प्रख्यात गाण्याच्या चित्रीकरणाच्या वेळी सुभाष घई काय म्हणाले होते, हे सांगताना ती लिहिते -

“...They put me in a tribal Gujarati outfit and sent me to Subhash Ghai for approval’.

‘No! No! No! No!’ he shouted. ‘Kuch bharo’.

I was so embarrassed. In my opinion, he was referring to my choli and stating that it needed to be filled. It wasn’t anything personal, I knew. He had visualized something… bigger for the rendition.

I didn’t shoot that day. But the next day I was presented to him in a different outfit, with a bra that was heavily padded, and he seemed satisfied.”

एक कसलेली अभिनेत्री म्हणून अलीकडे तिची पुन्हा नव्याने ओळख होते आहे. आयुष्यात ती बऱ्याच गोष्टींबद्दल बेफिकीर राहिल्याबद्दल ती दिलगीर असल्याचे पुस्तकाच्या उपसंहारामध्ये तिने कबूल केले आहे – ‘‘Please don’t think that of me. I am in no sense doodh ki dhuli. I have my reasons for doing this. Moreover, I too have made mistakes and done things I am not proud of. All of us have… And again, Sach Kahun Toh, I have withheld a few of those incidents because I realized my mistakes but did not want them immortalized in ink and paper. I’m sorry about that.’

या ओळीवरून तिने एक प्रामाणिक आत्मचरित्र लिहिले असल्याचे जाणवते.

........

Group content visibility: 
Use group defaults

वाचायचं आहे हे. इथे नाही दिसलं त्यामुळे पुढच्या भेटीत घेईन.
तुम्ही छान परिचय लिहिला आहे.

छान परिचय. नीना गुप्ता बिनधास्त, खमकी, व्हॅम्पिशच वाटते ते मुख्य तिच्या भूमिकांमुळे. खानदान मालिकेतील तिची भूमिका आठवते.

छान परिचय पुस्तकाचा. मला तिची सांस सिरीयल खुप आवडायची. खानदान मधे होती एवढंच आठवतय, खानदान सिरीयल अजिबात आठवत नाहीये. म्हणजे स्टोरी.

सांस सिरीअल ची मी पण फॅन आहे. ती तिने प्रोड्युस केलेली आहे. उत्सव सिनेमात पण तिचा छान छोटासा रोल आहे. तिच्या बोल्ड निर्णयाचा
मसबाला त्रास झाला असे ही तिने कबूल केले होते. एकूण प्रांजळ व्यक्तिमत्व. मसबा सिरीअल नेटफ्लिक्स का कुठे आहे ती बघून मग त्यातली यलो व कमळ फुलांचे डिझाइन असलेली मसबा साडी मागवली होती मी. नीना फरहा खानला भेटायला जाते त्या सीन मध्ये आहे ती.

छान परिचय. नीनाच्या अनेक भूमिका लक्षात राहिल्यात. साथ साथ, जाने भी दो यारों, त्रिकाल, रिहाई

मालिकांत बुनियाद, खानदान आणि साँस.

हे आत्मचरित्र मला वाचायला नक्की आवडेल. फारूक शेख व दीप्ती नवलचा साथ साथ नावाचा सिनेमा आहे. त्यात नीना गुप्ता एकदम goofy टाइप होती. मला वाटते तो तिचा पहिला सिनेमा असावा. तेव्हापासून मला ती लक्षात राहिली. आता गुगलले तर त्यातील एक सीन दिसला.. त्या सिनेमात तरुण सतीश शाह, राकेश बेदी, एवढेच काय तो अवतार सिंग, किरण वैराळे होते. सर्व कॉलेज दोस्त दाखवले आहेत. 'तुमको देखा तो ये खयाल आया ' माझे एक आवडते गाणे होते.
नीनाची एक hawkins प्रेशर कूकरची ऍड पण आठवते.

फारूक शेख व दीप्ती नवलचा साथ साथ नावाचा सिनेमा आहे. त्यात नीना गुप्ता एकदम goofy टाइप होती. मला वाटते तो तिचा पहिला सिनेमा असावा. >>>>> हो आणि एक डायलॉग तिच्या तोंडी कायम दाखवलाय, " मै ना केहेती थी! " Lol
हॉकिन्स ची ॲड पण मजेशीर होती., जाने भी दो यारों मध्ये पण कमाल च काम केलय Lol