तो मीच आहे ...... अंतिम भाग

Submitted by विशाल कुलकर्णी on 18 February, 2009 - 06:59

तो मीच आहे ...... भाग १: http://www.maayboli.com/node/5885

कामिनी पटवर्धनांचा त्यांच्या ऑफीसमध्ये दिवसाढवळ्या खुन होतो आणि खुनाची जबाबदारी घेत तिघेजण हजर होतात. तिघांच्या जबान्या ऐकुन गोंधळलेल्या इन्स्पे. सावंताना पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काहीतरी सुत्र सापडते....
पुढे.....

३१४०, २२४४ चला आपण पुन्हा एकदा कामिनी पटवर्धनांच्या ऒफीसला भेट देवु या. आपण काहीतरी पाहायचं विसरलोय . मला वाटतं तिथेच काही ना काही नक्की सापडेल.

"च्यायला, इचित्रच हाय हे बेनं, धड तंबाकुबी खाऊ देत न्हाय. ३१४० हे करा, ३१४० ते करा, याला आत घ्या, त्याला टायरमध्ये घाला ! आता काय, तर कामिनी पटवर्धनच्या हापिसात चला. परवाच तीन तास उबवली की तितंच, आता नवं काय सापडणार हाय तितं सायबाला देव जाणे?"

३१४० म्हणजे हवालदार कदम चांगलेच वैतागले होते. एकतर घटना एकदम इतक्या वेगाने घडल्या होत्या की चार दिवसात नीट बायकोशी निवांत बोलायची सुद्धा फुरसत मिळाली नव्हती. ३१४० म्हणजे हवालदार कदम आणि २२४४ म्हणजे हवालदार जाधव म्हणजे अगदी नंबरी जोडी होती. कुठल्याही केसमध्ये ३१४० असला की २२४४ असलाच पाहीजे. विशेष मध्ये दोघांचे एकमेकाशी अजीबात जमायचे नाही, कायम दोघे एकमेकावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करायचे....पण एकमेकाशिवायही दोघांचे जमायचे नाही. त्यांच्या एकमेकावर कुरघोडी करायच्या नादात बर्याच वेळा गोंधळ व्हायचा पण बर्‍याच वेळा त्यातुनच काहीना काही नवीन दुवा सापडुन जायचा. इन्स्पे. सावंतांचे तर त्या दोघांशिवाय पानही हलत नसे. याचे एकमेव कारण म्हणजे दोघांचा प्रामाणिकपणा, मनापासुन कंटाळा न करता काम करायची वृत्ती. साहजिकच ही केस सावंतांनी आपल्या हातात घेतली तेव्हा कमिशनर साहेबांकडुन त्यांनी या दोघांनाही मागुन घेतले होते. सावंत साहेबांचे जय - विजयच होते म्हणा ना दोघे.

या दोघांनाही घेवुन सावंत पुन्हा एकदा पटवर्धन गृपच्या ऒफीसमध्ये येवुन धडकले.

त्या दोघांनाही सावंतांनी कामिनीच्या केबीनमध्ये सोडले आणि स्वत: इतर स्टाफकडे वळले.

"घालु द्या दोघांना काय गोंधळ घालायचाय तो, तोपर्यंत आपण गप्पा मारु."

समोर एखाद्या आज्ञाधारक पाल्यासारखे उभ्या असलेल्या मॆनेजर देशपांड्याकडे पाहत प्रसन्नपणे सावंत म्हणाले आणि देशपांडेंच्या पोटात गोळाच आला.

चार दिवसापुर्वीही असेच सावंत त्यांना गप्पा मारु म्हणाले आणि त्यानंतर ज्या गप्पा सावंतांनी मारल्या त्यामुळे गेले चार दिवस देशपांडेंची झोपच उडाली होती. एक पोलीस अधिकारी बोलुन कुठल्या विषयावर बोलणार. आपल्या नेहेमीच्या स्टाईलने सावंतांनी त्याना एका सिरिअल किलरचा किस्सा सांगितला होता आणि भेदरुन गेलेल्या देशपांड्यांकडुन आपल्याला हवी ती माहीती काढुन घातली होती. त्यामुळे आत्ता सावंतांनी गप्पा मारायचे नाव काढले की देशपांड्यांना ठसकाच लागला. त्यांची स्थिती पाहुनच सावंतांनी हसु आले. ते पुढे काही बोलणार तेवढ्यात.....

साहेब, साहेब करत ही जोडगोळी बाहेर आली.

"थांब रे ३१४० मी सांगतो काय झाले ते", इति २२४४.

"चल बे २२४४, मी सिनिअर आहे, मी सांगणार काय सापडलय मला ते!", ३१४० ने दादागिरी गाजवली.

"तुला नाय, आपल्याला !", २२४४ ने पुन्हा आपलं घोडं पुढे दामटलं.

"२२४४, ३१४० चं म्हणणं बरोबर आहे, तो सिनिअर आहे ना, त्याला सांगु दे आधी", सावंतांनी २२४४ ला डिवचलं.

तसा ३१४० ने विजयी चेहेर्‍याने २२४४ कडे पाहीलं आणि सुरुवात केली .....

साहेब, तुमच्या सांगण्याप्रमाणे आम्ही केबिनचा दरवाजा उघडला आणि हे असे केबीनमध्ये शिरलो.......

"च च च , अरे येड्या चुकलास बघ, साहेब आम्ही असे नाही शिरलो आत".....संधी साधुन २२४४ ने मुसंडी मारली.

"मग कसे शिरलो?", ३१४० ने मारक्या म्हशीसारखे विचारले.

"तर साहेब आम्ही दरवाजा उघडला आणि तसे आत शिरलो....२२४४ ने गंभीरपणे बोलला तसे सावंतांना हसु आवरेना. आता मात्र ३१४० ही जोरजोरात हसायला लागला. बघता बघता सगळेच खदखदुन हसायला लागले.

"साहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सगळीकडे शोध घेतला, आणि शोध घेताना ......!", सुहास शिरवळकरांच्या अमर विश्वासचा फॆन असलेल्या २२४४ ने खास अमरच्या स्टाईलमध्ये एक पॊज घेतला.....

आणि तीच संधी साधुन ३१४० मध्ये घुसला..., पुढचे मी सांगतो साहेब.

"साहेब, टेबलापाशी काय तरी आहे, जरा आत येताय का?" २२४४ ला संधी न देता ३१४० ने थेट मुद्दा संपवुनच टाकला.

"येस, मी याचीच वाट पाहत होतो मित्रांनो, म्हणुनच तुम्हाला दोघांनाच आत सोडलं होतं".

"हात तुज्या मारी, सगळी मजाच घालवुन टाकलीस", २२४४ करवादला.

सावंत लगबगीने आत गेले. त्या दोघांनी जे काही त्यांना दाखवले ते बघुन तर त्यांनी मस्तपैकी जोरजोरात शिळच घालायला सुरुवात केली.

"दोस्त कंपनी, आणखी एक दोन प्रश्न मनात आहेत, त्यांची उत्तरे मिळाली की ही केस संपलीच म्हणुन समजा !" सावंत भलतेच खुशीत आले होते. "चलो थोडा मॆनेजर साबके साथ गप्पा मारेंगे." खुशीत असले की सावंत असलं धेडगुजरी हिंदी बोलत. त्यांचं बोलणं ऐकलं आणि बाहेर उभे असलेले देशपांडे लगेच टॉयलेटकडे पळाले.

’अरे देशपांडे साहेब कुठे गेले?

कुणीतरी टॉयलेटकडे बोट केले आणि सावंत खदखदुन हसले आणि दुसर्या एका कर्मचार्‍याकडे वळले.

"कामिनीबाईंच्या केबिनमध्ये आणखी एक दरवाजा आहे तो, कुठे उघडतो?"

"साहेब, तो दरवाजा शेजारच्या मोठ्या साहेबांच्या केबिनमध्ये उघडतो. म्हणजे त्याचं असं झालं साहेब, मोठ्या साहेबांनी शेजारी शेजारी दोन केबिन बनवुन घेतल्या होत्या. एक त्यांच्यासाठी आणि शेजारची दुसरी अजयसाहेबांसाठी. पण अजयसाहेबांचा अकाली अपघाती मृत्यु झाला आणि त्यांची केबिन कामिनी मॆडमच्या वाट्याला आली मात्र तेव्हापासुन मोठ्या साहेबांची केबिन बंदच आहे." कुणीतरी उत्साहाने माहिती पुरवली.

तसे सावंतांनी त्यालाच पकडले," म्हणजे जर कोणी दादासाहेबांच्या केबिनमध्ये लपुन राहीले असेल, आणि संधी साधुन त्यानेच जर कामिनीचा खुन केला असेल तर, ही शक्यता अगदीच नाकारता येत नाही, नाही ?"

तसा तो हिरो गारठला, " साहेब मी काय सांगणार त्याबद्दल, तुम्ही शोध घेताच आहात."

"मला अजुन एक सांगा, जयंत साठे यांना तुम्ही ओळखता का?"

"हो साहेब, पटवर्धन फार्मास्युटिकल्स मध्ये स्टोअरकिपर म्हणुन होते. मोठा हसतमुख आणि प्रसन्न माणुस. खुप इमानदार आणि जुना माणुस. दादासाहेबांचा व्यक्तिश: आवडता म्हणलात तरी हरकत नाही. पण त्यांचा काय संबंध?"

"कुछ नही!" विसरुन जा.

सावंतांनी ३१४० आणि २२४४ ला जवळ बोलावलं आणि काहीतरी त्यांच्या कानात सांगितलं, तसे मान हलवुन दोघे बाहेर निघुन गेले.

"चला मीही निघतो, गरज पडली तर येइनच गप्पा मारायला ! " शेवटचे शब्द सावंतांनी मुद्दामच मोठ्याने, टॊयलेटमधल्या देशपांड्यांना ऐकु जातील असे उच्चारले आणि तिथेही देशपांड्यांना ठसका लागला. तसे सावंत स्वत:शीच हसत बाहेर पडले आणि त्यांनी आपला मोहरा "प्रांजल" बंगल्याकडे वळवला.

सावंत जेव्हा बंगल्यावर पोचले तेव्हा डॊ. लिमये दादासाहेबांचं रुटीन चेक-अप करत होते. सावंतांना बघीतले आणि दादासाहेबांनी मनापासुन त्यांचे स्वागत केले.

"ये रे अनिरुद्ध, खरे तर मीच तुला फोन करणार होतो. म्हणलं तुला विचारावं तपास कुठपर्यंत आला ते आणि एक गोष्ट तुला सांगायची राहुन गेली होती तीही सांगायची होती."

"आधी अरुला भेट, हा डॊ. अरुण लिमये, माझा जवळचा मित्र अगदी तुझ्यासारखाच आणि अर्थातच कट्टर शत्रुही! सारखा माझ्या खाण्या पिण्यावर नजर ठेवुन असतो. आणि अरु हा अनिरुद्ध सावंत, गेली २० वर्षे झाली, अजुन इन्स्पेक्टरच आहे. तत्वनिष्ठेचे असेही फायदे असतात बघ."

आणि मग तिघेही खळखळुन हसले.

"दादा, केस खुपच विचित्र होत चाललीय! गंमत वाटेल तुला पण माझ्याकडे एकुण तीन जण आलेत, मीच कामिनीचा खुन केलाय असे सांगत. गंमत अशीय की तिघेही अगदी जेन्युईन वाटताहेत. पण तरीदेखील काहीतरी मिसिंग आहे. काय ते शोधायलाच तुझ्याकडे आलोय!" सावंतांनी आपल्या येण्याचे कारण सांगितले.

"तेच सांगतोय मी तुला अनि, शक्य असेल तर सद्ध्या तरी हे तुझ्यापाशीच ठेव. पटवर्धनांच्या इभ्रतीचा प्रश्न आहे हा."

दादासाहेब फार गंभीर झाले होते.

"दादा, एक गोष्ट आधीच स्पष्ट करतो, कायद्याच्या कक्षेत राहुन शक्य ती सर्व मदत करेन मी. कायदा मोडणार्‍याला मी कधीही माफ करत नाही हे तुला चांगलेच माहीत आहे." सावंत अतिशय गंभीरपणे बोलले.

"मला माहीत आहे रे ते, तुझा विश्वास आहे ना या दादावर? असो, तर ऐक काही दिवसांपुर्वी मी आणि अरु आम्ही दोघे जसलोकला गेलो होतो. काही चेक-अप करुन घ्यायचा होता त्या साठी. नंतर तिथुन तसेच पुढे थोडा वेळ पी.डी.पी. ला गेलो आणि तिथे मी कामिनीला पाहीलं, अनि, अरे तिच्याबरोबर कुणीतरी होतं आणि अतिशय विचित्र परिस्थितीत होते ते दोघे. म्हणजे एखादे नवथर जोडपे असावे तसे चाळे चालु होते. मला क्षणभर प्रचंड राग आला. मी रागा रागाने पुढे जाणारच होतो पण अरुने थांबवले. आपण पुर्ण माहिती काढु आणि मग तिच्याशी बोलु असे त्याचे मत पडले.

घरी आल्यावर मी थोडा विचार केला आणि वाटलं त्यात गैर तरी काय आहे, तिनं अजुच्या आठवणीत रडत बसणं मलाही आवडलं नसतं, पण तिने निदान वर्षभर तरी थांबायला हवं होतं रे. पण ठिक आहे तिला कोणी योग्य जोडीदार भेटला असेल तर त्यांच्या वाटेत यायचं नाही असा मी निर्णय घेतला. पण आम्ही त्यानंतर एक खबरदारी म्हणुन त्याची माहीती काढायची ठरवली.

अनि, खुप मोठा धक्का होता रे माझ्यासाठी, ती दोघे एकमेकांना अजय आणि कामिनीच्या लग्नाआधीपासुनच ओळखत होती. स्पष्टच सांगायचं तर कामिनीने हे लग्नच अजयच्या इस्टेटीसाठी केलं होतं. पण मग अजय अमेरिकेला परत गेल्यावर सख्खी मुलगी घेणार नाही एवढी काळजी घेतली रे तिने माझी. तशात एक दिवस मी नेमलेल्या खाजगी गुप्तहेराने बातमी आणली की अजयचा मृत्युही नैसर्गिक नव्हता. त्यात हस्त परहस्ते कामिनी आणि तिच्या त्या प्रियकराचा हात आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे तिचा तो प्रियकर माझ्याच एका कंपनीत नोकरी करतोय.

दुर्दैवाने अजुन पुरावे नाहीत आमच्याकडे, म्हणुन ही माहिती पोलीसात कळवली नाही. आम्ही ठरवलं की कामिनी व तिच्या मित्रावर नीट नजर ठेवायची आणि जास्तीत जास्त पुरावे गोळा करायचे. त्या दिवशी मी ऒफीसला गेलो होतो अरु बरोबर. तिथे कामिनीचा संभावितपणा बघुन मस्तकात तिडिकच गेली रे. बोलता बोलता अरुला म्हणालो मी की या चांडाळणीला कुणी संपवलं तर त्याला मी वाटेल तेवढा पैसा देइन. मला वाटतं ते कुणीतरी ऐकलं असावं कारण त्याच रात्री मला एक अज्ञात फोन आला. फोनकर्त्याने विचारलं की मी खरोखरच त्याला हवे तेवढे पैसे देइन काय म्हणुन? मी विचाराच्या तंद्रीत होतो, त्याच नादात त्याला हो म्हणुन गेलो. नंतर लक्षात आलं आपण केवढी मोठी चुक केली होती ते. कारण त्यानंतर तिसर्‍या दिवशी कामिनीचा खुन झाला. पण विश्वास ठेव अनि, तिला मारण्याची माझी मुळीच इच्छा नव्हती. कसेही असले तरी तिने मुलीसारखी सेवा केली होती रे माझी.

"दादा, एक सांग, तो आवाज तुला आठवतोय, म्हणजे यापुर्वी कधी ऐकल्यासारखा वगैरे!"

दादांच्या डोळ्यासमोर पुन्हा ते फोनवरील संभाषण उभे राहीले.

संध्याकाळी सात च्या दरम्यान तो फोन आला होता. बहुदा कुठल्यातरी पब्लिक बुथ वरुन केला असावा कारण वाहनांचे, रहदारीचे आवाज पार्श्वभुमीवर जाणवत होते.

"सायेब, दोपारच्याला तुमी बोलत व्हता त्या डाक्टरबरुबर त्ये खरं हाये का, जर आमी तुमच्या सुनेला मारली तर किती रुपया देल तुमी. आन जर आमाले पोलीसानी पकडला तर आमच्या फॆमिलीला तो पैसे देल काय तुमी?

"कोण बोलताय तुम्ही? आणि कशाबद्दल बोलताय? " इति दादासाहेब

"तुम्हाला म्हायते सायेब आमी कशाबद्दल बोलुन राह्यला ते! फ़कस्त येवडा सांगा हो की नाय!"

"ठिक आहे! पण तुम्ही कोण?

ते कळलच ना सायेब तुम्हाला. मेडम गेली की आमी येतोच ना पैसा नेयाला, नायतर आमची फेमीली येल."

आणि फोन कट झाला.

"दादा, शब्दश: विचार करायचा झाला तर बोलण्याची ही पद्धत मी यापुर्वी कुठेतरी ऐकलीय, पाहिलीय! आता आठवत नाहीये पण आठवेल लवकरच."

चल मी निघतो, बरीच कामे बाकी आहेत अजुन. जाता जाता सावंतांचे लक्ष खोलीतल्या फ्रिजकडे गेले आणि त्यांना लक्षात आले की आपल्याला तहान लागलीय. तसे ते फ्रिज कडे वळले त्यांनी फ़्रिजमधली पाण्याची बाटली काढली,

"अरे बापरे, ही भलतीच थंड आहे रे दादा, बहुदा खुप दिवसाची दिसतेय."

"अरे हो, आठवडा झाला त्या फ्रिजच्या पाण्याचा वापरच नाही झाला. रखमा, अनिरुद्धला पाणी आणुन दे गं थोडं."

रखमाकाकी पाणी घेवुन आल्या, तोवर सावंतांनी बाटली तोंडाला लावली होती. थंडगार पाणी तोंडात गेले आणि त्यांनी तोंड वाकडे केले.

"भलतेच गार आहे रे ! ही बाटली घेवुन जातो मी बरोबर चौकीवर पोचेपर्यंत नध्ये लागलंच तर उपयोगी येइल."

"अरे रखमाकाकी, तरुण दिसु लागलीस की तु? केसाला मेंदी वगैरे..."

"कसलं वो सायेब, कामिनीच मागं लागुन लावायची मेंदी माझ्या केसाला. न्हायतर आजकाल लै गळतात बघा. मी कसली लावते मेंदी." रखमाकाकी उगीचच लाजल्या.

"बरोबर आहे, बरोबर आहे म्हातारपण आलं की केस गळणार, बर आहे म्हणा नाहीतर हेच केस आपला गळा कापायला कमी करत नाहीत." सावंत आपल्याच तंद्रीत म्हणाले आणि दरवाजाकडे निघाले.

तेवढ्यात त्यांचा मोबाईल वाजला.

".................................

"हं बोल ३१४०, काय झालं, मी सांगितलेलं काम झालं की नाही?

"..................................................................................................

"गुड आणि २२४४ ला पण मी काही सांगितलं होतं.......!"

"....................................................................................................

"एक्सलंट,............! तुम्ही दोघे एक काम करा, त्या तिघांनीही घेवुन आज संध्याकाळी सहा वाजता "प्रांजल" बंगल्यावर पोचा. हो हो..दादासाहेबांचाच बंगला. आज संध्याकाळी खुनी आपल्या हातात असेल.!"

सावंत अतिशय खुशीत परत दादासाहेबांकडे वळले.

"माफ कर दादा, मला कामिनीचा खुनी सापडलाय, पण त्याला मी संध्याकाळी सहा वाजता तुमच्या समोर आणेन. त्याआधी काही छोटी छोटी कामे आहेत तेवढी आटपुन घेतो.

माफी एवढ्यासाठी की तुला न विचारता तुझ्या बंगल्याचा या कामासाठी वापर करायचा असं मी ठरवलय. तुझी परवानगी असेलच असे गृहीत धरुन. आणि प्लिज, त्यावेळी तुम्ही तिघेही मला हवे आहात, तु, डॊ. लिमये आणि रखमाकाकी तुम्हीसुद्धा. जाण्यापुर्वी तुला सांगतो मी इथे का आलो होतो ते, तुझ्या कामिनीच्या त्या प्रियकराने स्वत:ला तिचा खुनी म्हणुन पोलीसात कबुल केलय आणि त्याने आरोप केलाय की कामिनीच्या खुनाची सुपारी तु त्याला दिली होतीस. पण आता सत्य माझ्यासमोर हात जोडुन उभं आहे, सहा वाजता भेटुच."

संध्याकाळी बरोबर सहा वाजता.....

स्थळ : प्रांजल बंगल्याचा मध्यवर्ती हॉल

उपस्थित : इन्स्पे. सावंत, ३१४०, २२४४, दादासाहेब, अरुकाका, रखमाकाकी, अभंगराव तडमोड, जयंत साठे आणि राजन गावंड.

सगळ्या वातावरणात एक विलक्षण तणाव होता. सगळ्यांचेच चेहरे विलक्षण तणावाखाली दिसत होते. फक्त ३१४० आणि २२४४ मात्र एखाद्या लग्नाला आल्यासारखे वावरत होते.

मंडळी....सावंतांनी उगीचच खर्जातला आवाज लावला होता.

कामिनी पटवर्धन यांचा त्यांच्या ऒफीसात खुन झाला आणि आत्तापर्यंत तिघा जणांनी आपणच खुन केला असल्याचा दावा केलाय.
अभंगराव तडमोड, राजन गावंड आणि जयंत साठे.

शेवटचं नाव ऐकलं आणि दादासाहेबांसकट रखमाकाकींनाही धक्का बसला.

"जयंता, हे काय ऐकतोय मी?" दादा एकदम उसळले.

साठे मात्र शांत होते." ते सत्यच आहे, दादासाहेब, कामिनीला मीच मारलय!"

तशा रखमाकाकी अतिशय अस्वस्थ झाल्या," जयंतदा तुम्ही !...."

"रखमाकाकी, तिकडे आपण लवकरच येवु, इथे तीन संशयित आहेत त्यातला एकच खुनी आहे आणि तो अजुन सिद्ध व्हायचाय."

"तर अभंगराव तडमोड, तुम्ही कामिनीचा खुन केलात."

"व्हय की सायेब, आमी तर मारली ना तिले, आमचा पैसा देयाला तयार न्हवती......आमी सगळा सांगितला ना तुमाला."

"हाच तो अनि, याच माणसाने मला फोन केला होता." दादा एकदम उत्तेजीत झाले.

"मला माहीत आहे, दादा म्हणुन तर याला इअथे आणलय. तर अभंगराव तुम्ही खुन केलात. खरं काय ते सांग..नायतर माझ्याशी गाठ आहे. टाटा हॊस्पिटलच्या तुझ्या रिपोर्टची कॊपी आहे माझ्याकडे

हा वार मात्र वर्मी लागला आणि अभंगराव जोरजोरात रडायलाच लागला. सावंतांनी पुढे होवुन त्यांच्या डोक्यावरुन प्रेमळपणे हात फिरवला. आणि इतरांकडे वळुन म्हणाले...

"याला ब्लड कॆन्सर आहे दादा, शेवटच्या स्टेजला आहे बिचारा. त्या दिवशी तुमचं बोलण ऐकुन याच्या डोक्यात कल्पना आली आणि त्याने तुला फोन केला. कामिनीचा खुन करण्याच्या बदल्यात तुझ्याकडुन मिळणारा पैसा त्याच्यामागे त्याच्या कुटुंबाची काळजी घेवु शकत होता. कारण आजकाल त्याचा धंदाही बुडीतच गेला होता. पण कुणीतरी दुसर्‍याच कुणीतरी कामिनीला संपवले आणि याच्या सगळ्या आकांक्षावर पाणी पडले. म्हणुन याने खोटेच कारण रचुन स्वत:ला पोलीसांच्या स्वाधीन केले. जेणेकरुन त्याला शिक्षा होईल आणि त्याचे कुटुंबीय तुझ्याकडुन पैसे मिळवु शकतील. तुझ्याशी बोलताना आपल्या कुटुंबियांचा उल्लेख त्याने यासाठीच केला होता. पण दुर्दैवाने आणखी दोघे खुनी हजर झाले आणि याच्या योजनेवर पाणी फिरले. माफ कर अभंगराव, मला तुझ्याबद्दल खुप सहानुभुती आहे पण......कायदा कायदा आहे आणि मी कायद्याचा रक्षक!"

आता दुसरे महाशय, श्री. राजन गावंड.....

दादा, हा माणुस गुन्हेगार आहे पण या केसमध्ये नाही. कामिनीच्या मस्तकावर मागच्या बाजुला जी जखम होती ती पितळी फुलदाणीने केलेली. पण ती जखम जवळपास मानेवर, थोडीशी वरच्या दिशेने. म्हणजे बघा मेंदुच्या खालच्या बाजुस साधारण. कामिनीची उंची साधारण साडे पाच फुट, राजनची उंची सहाच्या वर तेव्हा त्याने जर वार केला असता तर तो डोक्याच्या वर , शिरोभागी असला असता. सहा फुट उंचीचा माणुस आपल्या पेक्षा बुटक्या माणसावर फुलदाणीने हल्ला करेल तेव्हा फुलदाणीचा फटका त्या व्यक्तीच्या डोक्यावर मध्यभागी बसेल. तो जर त्याच्या मानेवर बसायला हवा असेल तर फटका मारणारी व्यक्ती थोडी बुटकी साधारण पाच फुट उंचीची हवी, म्हणजे बघ आपल्या रखमाकाकीएवढी.

सगळ्यांच्या नजरा चमकुन रखमाकाकींकडे वळल्या. त्या खाली मान घालुन शांतपणे बसल्या होत्या.

दादा दुर्दैवाने तुझे आणि डॊ. लिमयेंचे बोलणे राजनने देखील ऐकले होते. त्यावेळी त्याने विचार नाही केला, पण जेव्हा कामिनीचा मृत्यु झाला तेव्हा मात्र तो पिसाळला आणि कामिनी व तिची इस्टेट दोन्ही तुझ्यामुळे हातुन निसटलीय असा त्याने ग्रह करुन घेतला. दुर्दैवाने तुझ्या संपत्तीचा मोह असला तरी ती त्याला कामिनीसहीत मिळाली तरच हवी होती. कारण या माणसाने कामिनीवर मनापासुन प्रेम केलेय. माफ कर दादा, पण हा सगळा प्लॅन कामिनीचाच होता, म्हणजे अजयशी लग्न, मग त्याचा मृत्यु आणि मग तुझी पाळी.

माफ कर दादा, पण तुझ्या सेवेचं देखील एक नाटकच होतं. तुझ्या सेवेच्या नावाखाली तुला रोज स्लो पॉयझनिंग करण्यात येत होतं. या दोघांनीही अफलातुन मार्ग शोधुन काढला होता त्यासाठी.

दादा तुला नुकताच ह्रुदयविकाराचा झटका येवुन गेलेला. त्याचा त्यांनी फायदा घेतला. आठवतं दुपारी मी तुझ्या फ्रिजमधली पाण्याची बाटली घेवुन गेलो होतो? त्या पाण्याचा रंग, त्याची चव थोडी वेगळी वाटली. म्हणुन मी ते पाणी आमच्या लॅबमध्ये नेवुन टेस्ट केलं.

दादा...हे नेहेमी आपण पितो ते पाणी नाहीये. याला शास्त्रीय परिभाषेत "हेवी वॉटर" असे म्हणतात. हे पाणी मोस्टली बाँबनिर्मितीसाठी वापरलं जातं. या पाण्याचं वैशिष्ठ्य असं आहे की आपल्या नेहेमीच्या पाण्याप्रमाणे हे रक्तात मिसळत नाही. तर तसंच वेगळं राहतं. आणि त्यामुळे अर्थातच ब्लड प्रेशर वाढत राहतं आणि मग एखादा मोठा मानसिक धक्का आणि सगळं खल्लास.

खरे तर अजय गेला तेव्हाच तुझी पण पाळी होती. पण सुदैवाने अरुणजींसारखा निष्णात डॉक्टर तुझ्यावर उपचार करत असल्याने तुझं ब्लडप्रेशर कंट्रोलमध्ये राहीलं आणि तु वाचलास.

पण जेव्हा कामिनीचा खुन झाला तेव्हा राजनच्या मनाने घेतलं की तुच सुपारी देवुन तिचा मृत्यु घडवुन आणलास. तसेही तिच्यानंतर राजनला जगण्यात स्वारस्य राहीले नव्हतेच. पण मरता मरता त्याने कामिनीच्या खुनाचा सुड घेण्याचे ठरवले आणि स्वत:लाच खुनी म्हणुन पोलीसांच्या स्वाधीन करुन तुझे नाव घेतले. यात अगदी तुला शिक्षा नाही झाली तरी बदनामी आणि मनस्ताप होणार होताच.

पण एक गोष्ट मी खात्रीशीरपणे सांगु शकतो की ज्या ट्रकने अजयला उडवले तो ट्रक राजनच चालवत होता. त्याला घटनास्थळी ट्रकसहीत पाहिलेले प्रत्यक्ष साक्षीदार आहेत माझ्याकडे.

तसे दादासाहेब उसळले पण अरुकाकांनी त्यांना आवरले. दादासाहेबांच्या आणि रखमाकाकींच्या डोळ्यातुन पाण्याच्या धारा वाहु लागल्या.

सावंत पुढे आले. मंडळी दोघेजण तर या केसमध्ये निर्दोष ठरलेत आता राहीले फक्त श्रीयुत जयंत साठे.

"नाही, हा खुन मी केलाय, जयंतदा फक्त मला वाचवण्याचा प्रयत्न करताहेत........................

आवाज रखमाकाकींचा होता. सगळेच त्यांच्याकडे आश्चर्याने पाहत होते.

रखमाकाकी रडत रडत दादांच्या समोर उभ्या राहील्या......

"हो दादासाहेब, मीच मारलं त्या चांडाळणीला. अज्जुच्या मृत्युनंतर एके दिवशी रात्री पाणी प्यायला म्हणुन उठले आणि कोणीतरी कुजबुजत्या आवाजात फोनवर बोलत असल्याचा भास झाला. जवळ जावुन बघितलं तर ती कामिनी होती. तिच्या या याराशी बोलत होती बहुतेक . तिच्या बोलण्यातुन मला एवढंच कळलं की त्यांनीच अज्जुला मारण्याचा कट केला होता आणि त्यांची पुढची शिकार तुम्ही होता.

देवाने पोटी लेकरु नाही दिलं मला दादा, पण अज्जुनं ते सगळं सुख दिलं होतं. तो मला आई म्हणुनच हाक मारायचा. माझ्या लेकराचा जीव घेतला होता त्या सटवीने. तेव्हाच मी ठरवलं की तिला जाब विचारायचा आणि जमलं तर.....

तीला मारलं त्याच्या आदल्या रात्रीपासुन तुमच्या केबीनमध्ये लपुन होते मी. कामिनी आल्यावर तिच्या समोर जावुन उभी राहीले आणि तिला जाब विचारला.

म्हटलं, "बयो, कुठल्या जन्मीचं वैर साधलंस, तुला काय दिलं नाही या घराने. प्रेम, माया, वात्सल्य, समृद्धी. तुला अशी दुर्बुद्धी का आठवली?"

तर माजोरीपणे मलाच म्हणते कशी ,

" हो मी मारलं अजयला आणि आता त्या म्हातार्‍याला पण मारणार! त्याचा माझ्यावर इतका विश्वास आहे की तु त्याला काही सांगितलस तरी त्याचा विश्वास नाही बसणार. गेली दोन वर्षे राबलेय मी त्याचा विश्वास संपादन करण्यासाठी. जा गपचुप घरी जा आणि शहाणी असशील तर शक्य तितक्या लवकर हे गाव सोडुन निघुन जा. नाहीतर म्हातार्‍याच्या आधी तुझा नंबर लागेल."

संताप संताप झाला होता, मस्तकात स्फोट होत होते.

ती त्या बेसावध मस्तीतच मागे वळली आणि तीच संधी साधुन मी तिथलीच फुलदाणी उचलुन तिच्या डोक्यात मारली. माझ्या अंगात कुठली ताकद आली होती कोण जाणे पण एका फटक्यातच ती खलास झाली. नेमके तेव्हाच जयंतदा तिथे आले, त्यांनी मला त्या अवस्थेत पाहीलं आणि काय ते समजुन गेले. त्यांनी माझ्या हातुन फुलदाणी कादुन घेतली आणि मला म्हणाले ताई, तुम्ही जा मी पाह्तो काय करायचे ते. मला काय माहीत, कधी तरी बांधलेल्या एका राखीखातीर ते माझा गुन्हा आपल्या डोक्यावर घेतील.

"नाही सावंतसाहेब, कामिनीचा वध केलाय मी, हो खुन नाही म्हणणार मी त्याला, वधच होता तो. आणि वेळ पडली तर पुन्हा पुन्हा करेन."

दॅट्स ऑल, फ्रेंड्स.

खरेतर हे मला दुपारीच कळाले होते. आधी पोस्ट मार्टेम रिपोर्टवरुन जखमेची माहीती वाचताना काही शंका मनात उभ्या राहील्या. त्यानंतर केबीनची तपासणी करताना तिथे टेबलाच्या कडेत अडकलेला एक केस मला सापडला, मेंदीने रंगवलेला. खरेतर त्यासाठीच मी दुपारी बंगल्यावर आलो होतो. रखमाकाकींशी बोलता बोलता मी त्यांचा एक केस ढापला. कसा ते विचारु नकोस.

पण केवळ एक केस हा पुरावा होवु शकत नव्हता. कारण साठेंनी फुलदाणीवरचे सगळे ठसे पुसुन फक्त आपले ठसे उमटवले होते. तेव्हा फक्त रखमाकाकींच्या सदसदविवेक बुद्धीला साद घालणे हा एकच मार्ग होता, तो मी स्विकारला आणि यात यशस्वी ठरलो.

अर्थात ३१४० आणि २२४४ या दोघांचीही फार मदत झाली त्यांनी जर राजन आणि अभंगरावची पाळे-मुळे उपसुन काढली नसती तर मात्र इथपर्यंत पोचणे कठीण होते.

"बघ शेवटी, माझ्या मार्गदर्शनाचा फायदा झाला की नाही तुला?" ३१४० ने पुन्हा एक्दा २२४४ ला डिवचले.

"माफ करा जयंतराव, तुमच्यासारखा भाउ प्रत्येक बहिणीला मिळो, पण माझा नाईलाज आहे......
मला रखमाकाकींना अटक करावीच लागेल. कारण कायदा शेवटी कायदा आहे आणि मी कायद्याचा रक्षक.

समाप्त.

गुलमोहर: 

याहू... या वेळेस माझा पहीला प्रतिसाद.
मस्त झाली कथा. आवडली.

हुश्श !! आजच पहिला भाग वाचला. नी आता दुसराही !!! मस्त आहे कथा....

खूप छान गुंतागुंत जमली आहे. खूप आवडली कथा..

छान आहे.. खर तर कथामाला सुरु करता येईल, इ. सावंताना घेउन! मस्तच! लैच !!!

सहीहीहीहीहीहीहीहीहीही..... मजा आली..सगळे तर्क खोटे ठरवलेस...मस्तच सस्पेंस....
'CID' मालीके करता पठवून द्या..नक्कीच जमुन येइल...

एकदम भारी.... मस्त फुलवलीस... Happy

पल्लवी

जियो विशाल..
मजा आली.. मस्तच Happy

सस्पेन्स चांगला फुलवलाय पण मला ही गोष्ट फार काही आवडली नाही. कदाचित सुशींच्या अश्या टाईपच्या गोष्टीं अति वाचल्यामुळे असेल कदाचित.

ह्या भागात त्या दोन हवालदारांचा संवाद मला कंटाळवाणा वाटला. (IMO)

सहीहीहीहीहीहीहीहीहीही..... मजा आली..सगळे तर्क खोटे ठरवलेस...मस्तच सस्पेंस....
-----------------------------------------------------------------------
माझे स्पेयुलेशन अर्धे बरोबर होते. कामिनीने अजयचा खुन घडवला होता ते:)
(ते पोस्ट उडाले वाटते).

कथा छान आहे.

पुढच्या कथेसाठी शुभेच्छा!

मस्त आहे कथा... आवडली... Happy

सावंत जेव्हा 'हेच केस आपला गळा कापायला कमी करत नाहीत' असं म्हणाले तेव्हा मला कळलं की रखमावाईंनी काहीतरी झोल केलेत म्हणून.... पण बाकीच्या तिघांचं म्हणणंसुद्धा मस्त जुळवून आणलयंस....

हवालदारांमधलं विनोदी संभाषण मलापण आवडलं नाही...

जबरीच, रे विशाल! तू आणि तुझं ते डोकं... साष्टांग नमस्कार!
खरच जाई-जुई म्हणतेय तशी लेखमाला सुरू का करीत नाहीस?

विशाल तुमच्यावर सुहास शिरवळकराचा खुप प्रभाव आहे अस वाटते आहे. कथेचा flow छान आहे

लगे रहो विशालभाई.
.........................................................................................................................

http://kautukaachebol.blogspot.com/

मंजिरी,
कथा सुशीची नक्कल वाटत असेल तर तो नक्कीच माझा दोष आहे. प्रभावाचं म्हणाल तर सुशी हे माझं दैवत आहे.

सस्नेह...

विशाल.
____________________________________________

रातराणीचा सुगंध पलंगावर पडल्या पडल्यादेखील घेता येतो. पण तुळस वृंदावनातच राहते, तिच्यापुढे आपल्याला उभंच राहावं लागतं.

http://maagevalunpahataana.blogspot.com

अगदी अगदी... CID ला पाठवाच ही गोष्ट... खरंच खुप खुप छान...
'हेच केस आपला गळा कापायला कमी करत नाहीत' असं म्हणाले तेव्हा मला कळलं की रखमावाईंनी काहीतरी झोल केलेत म्हणून.... >>> ह्म्म मलापण आली होती कल्पना Happy

हवालदारांमधली कुरघोडी अजुन थोडी छान फुलवता आली असती पण तरीही खुप छान!

सुशिंचा भावी वारसदार तयार होतोय... Happy लिहीत रहा राव...

dreamz_unlimited.jpg

सगळ्यांचे आभार.

<<हवालदारांमधली कुरघोडी अजुन थोडी छान फुलवता आली असती पण तरीही खुप छान!>>

ड्रिम्....खरेतर माझा तसा विचार होता, पण तसा एक प्रसंग सुशीच्या कुठल्यातरी रहस्यकथेत येवुन गेला होता. म्हणुन हेतुपुरस्सर मोह टाळला.

सस्नेह...

विशाल.
____________________________________________

रातराणीचा सुगंध पलंगावर पडल्या पडल्यादेखील घेता येतो. पण तुळस वृंदावनातच राहते, तिच्यापुढे आपल्याला उभंच राहावं लागतं.

http://maagevalunpahataana.blogspot.com

आवडेश!!!!!!!!!!!!!!!!!

~~~//\\//\\//\\//\\//\\//\\//\\//\\//\\~~~
दिसलीस तू, फुलले ॠतू

आवडली कथा. दिलेली कलाटणी आवडली.

कथा आवडली. शेवटही अनपेक्षित.

पण खरंतर मला त्या हवालदारांचा प्रसंग, त्यांची चढाओढ वातावरणनिर्मितीमध्ये बाधक वाटली. एक सलग मूड होत होता तोवर कथेचा. बर, त्या प्रसंगामुळे कथेत काहीच फरक नाही पडला. बाकी, मस्त लिहीलंय.
-----------------------------------
शेवटी साथ नशीबाचीच!

झकास लिहीलीस वाचुन मजा आली!!!!!!!!

असाच लिहीत जा!!!!!!!!!

योगेश कोठावदे

विशाल कुलकर्णी,
तुमच्या कथा फारच सुन्दर आहेत. तुमचे एखादे पुस्तक प्रकशित झाले असल्यास कृपया मला सान्गा. मला नक्कि आवडेल तुमची पुस्त़क वाचायला.

पीएसजी ना अनुमोदन. सस्पेंन्स जमलाय!

विशाल भाऊ मस्तच एकदम. ससपेन्स एकदम आवडला .
फक्त क्रमशः च तेवढ पुढच्या वेळेस बघा. म्हणजे झाल

रह्स्य कथा छान जमली, सुहास शिरवळकरांची याद आली.

फारच मस्त..........................खूपच मस्त जमली आहे कथा...................

Pages