सिंघम रिटर्न्स......एक छीद्रान्वेषी रिव्ह्यू

Submitted by ए ए वाघमारे on 15 August, 2014 - 16:11

सिंघम रिटर्न्स......एक छीद्रान्वेषी रिव्ह्यू

आजकाल वर्तमानपत्रातील सिनेमाची परीक्षणं म्हणजे परीक्षण कमी आणि जाहिरात जास्त अशी अवस्था आहे. मोजून ३००-४०० शब्दांचा लेख.त्यातही निम्मे शब्द सिनेमाची कथा सांगण्यात जातात . उरलेल्यापैकी निम्मे श्रेयनामावली आणि पात्र परिचय देण्यात जातात अन शिल्लक राहिलेल्या जागेत अभिप्राय (९०% वेळा अनुकूलच). त्यामुळे अशा परीक्षणाची अपेक्षा असलेल्यांनी पुढला मजकूर वाचण्याचे कष्ट घेऊ नये, हा नम्र सल्ला. इथे छीद्रान्वेषी म्हणजे चांगल्या गोष्टीत छीद्रे पडली आहेत का हे पाहणारा असा अर्थ नसून प्रस्तुत रिव्ह्युवरने स्वत:च्या खिशाला छीद्र पाडून घेऊन, रितसर तिकिट काढून केलेल्या अन्वेषणातून आलेला रिव्ह्यू होय.

तर सध्या हिंदी सिनेमात सीक्वेलची साथ आली आहे. त्याच साथीला बळी पडलेला हा एक नवा सिंघम. तीन वर्षांपूर्वी आलेल्या सिंघममधील मनोरंजनाच्या स्टॅंडर्डच्या अपेक्षेने जर तुम्ही हा नवा सिंघम बघायला जाल तर निराशाच होण्याची शक्यता आहे. या चित्रपटात अ‍ॅक्शन आहे, इमोशन आहे, ड्रामा आहे, कॉमेडी आहे ,सामाजिक संदेश आहे पण एकच गोष्ट नाही ती म्हणजे तगडी कथा-पटकथा. आणि भरपूर प्रमाणात आहे ते ढिसाळ दिग्दर्शन- संकलन आणि न संपणार्‍या बंदुकीतील गोळ्या. पण सिनेमा पाहताना, त्यातही मुख्य धारेतला हिंदी किंवा इंग्रजी सिनेमा बघताना, हे असंच का ?. असं कधी होतं का? असले मूर्खासारखे प्रश्न विचारत नसतात, हे मला पक्कं ठाऊक असल्याने मी त्या वाटेला जात नाही.

सीक्वेल या संकल्पनेचा खरा फायदा म्हणजे हिरोसकट अन्य महत्वाची कॅरेक्टर्स पहिल्याच आवृत्तीत एस्टाब्लिष झालेली असल्यामुळे पटकथाकाराला सीक्वेलमध्ये नवी कथा विस्ताराने मांडायला , नवी पात्रं तयार करायला जादा समय, जादा फूटेज मिळतं. पण हे सगळं करण्याची संधी ‘रोहित शेट्टी व टीम’ने वाया घालवली आहे. त्यामुळे एक बरा सिनेमा बनता बनता राहून गेला असं वाटत राहतं. सध्या चाललेलं राजकारण दाखवायचं की विविध साधू-बाबांचा वरचेवर उघड होणारा भ्रष्टाचार दाखवायचा की समाजातल्या अंधश्रद्धांवर भाष्य करायचं की नव्या पिढीच्या बेजबाबदार वागण्यावर बोलायचं की पोलिसांच्या वैयक्तिक आयुष्यातील परवडीवर बोलायचं, यातलं कुठल्याही एका गोष्टीवर फोकस न करता आल्याने सिनेमाचा वातड चिवडा झाला आहे. पण मध्येच एखादा चांगला सीक्वेंस एखाद्या चांगल्या शेंगदाण्यासाखा किंवा खोबर्‍याचा तुकड्यासारखा तोंडात येतो आणि १४२ मिनिटातली काही मिनिटे तरी सुसह्य होतात. एंट्रीलाच सिंघम ‘उपदेश’ मोड मध्ये येतो आणि आपल्याला पुढे काय पहायला मिळणार याची जाणीव होते आणि ती खरीही ठरते. पहिल्या सीनपासूनच सिनेमा प्रेडिक्टेबल होतो अन् त्यातली मजा कमी कमी होत जाते. तसेच मागच्या सिनेमातील हिरोईनचं काय झालं ते काही समजत नाही.

पटकथा ज्या तर्‍हेने मुक्तपणे भरकटली आहे ते पाहता असं वाटतं की हा सिनेमा लोकसभा निवडणुकांच्या वेळेस आणण्याचा आधी निर्माता- दिग्दर्शकांचा विचार असावा. परंतु तसं न करता आल्यामुळे मग कथा थोडी अजून इकडे तिकडे फिरवून आणली आहे. या चित्रपटाचं एक आगळं वैशिष्ट्य म्हणजे मध्यंतरानंतर काय होणार हे आपल्याला माहीत असल्याने मध्यंतर होण्याची आपण आतुरतेने वाट पाहतो !

अमोल गुप्तेने ‘स्टॅनले का डब्बा’ नंतर पुन्हा एकदा चांगला खलनायक साकारायचा प्रयत्न केला आहे. पण करीना कपूरचे पात्र - जे नंतर पटकथेची एक लायबिलिटी बनत जातं , त्या पात्राला जादा फूटेज देण्याचा नादात खलानायकाच्याच पात्रावर संकलकाची कात्री चालली अशी मला दाट शंका आहे. बरं करीना कपूर-खानच्या पात्रात काही नावीन्य आहे म्हणावं तर तेही नाही. ती नेहमी प्रमाणे बडबडी आहे आणि बरीचशी खादाडी आहे. पण कॉमेडीयन ही संस्था आता सिनेमातून नामशेष झाल्यामुळे त्याची कमतरता भरून काढण्याचा तिने मनापासून प्रयत्न केला आहे हे मात्र सांगायला हवं. मागचा ‘सिंघम’ यशस्वी होण्यात प्रकाश राजच्या जयकांत शिक्रेचाच मोठा वाटा होता हे ध्यानात आल्यामुळे यावेळेस खलनायकाच्याच पात्राची छाटणी केली आहे. इतकी की आता काही तासातच मला खलनायकाचं सिनेमातलं नाव विचारलं तर सांगता येणार नाही पण तीन वर्षांपूर्वीचा जयकांत शिक्रे मात्र तुम्हालाही आठवत असेल. हे कदाचित अजय देवग़ण स्वत:च सहनिर्माता असल्यामुळे असू शकतं. यात काही नवं नाही, प्राण सिनेमा खाऊन टाकतो म्हणून त्याचासोबत काम करायला नकार देणारे ‘सुपरस्टार’सुद्धा आपण पाहिले आहेत.

शरत सक्सेनासारखे कलाकारही या सिनेमात उगीचच वाया गेले आहेत. आणि काहींना अकारण महत्त्व दिलं गेलं आहे.उदा. सीआयडीवाला दया, बरखा दत्तसारखी दिसणारी पत्रकार वगैरे. हा दया, मला वाटतं,नवा जगदीश राज होण्याच्या मार्गावर आहे. दयाला दरवाजा तोडायला संधी मिळावी म्हणून एक सीक्वेंस ऐन मोक्याचा वेळेला घुसडलेला आहे. असो.

दुसरी एक महत्वाची जाणवणारी गोष्ट म्हणजे सिनेमाचं बजेट. जवळपास ७०% सिनेमा स्टुडिओतच चित्रित झालेला वाटतो. आउटडोअर सीक्वेंसही बरेचसे मुंबईतलेच आहेत. यावेळेस गाड्या, खलनायकासोबत फिरणारे गुंड वगैरे कमी दाखवले आहेत. दंगेधोपे दाखवताना तोडफोड जेवढ्या प्रमाणात दाखवायला पाहीजे तेवढी दाखवलेली नाहीत. त्यामुळे त्याचा हवा तसा प्रभाव पडत नाही. यात आमचा दोष नाही,भरपूर तोडफोड,नासधूस पाहायची सवय हिंदी सिनेमानेच आम्हाला लावली आहे. क्लायमॅक्सचे पोलिसांचे मॉब सीन अजून उठावदार करता आले असते,त्याऐवजी पाण्यात पडलेली अ‍ॅम्बुलन्स दाखवण्यातच सगळं सिनेमेटोग्राफिक कौशल्य पणाला लावण्यात आलंय. इथे बजेट आड आले हे स्पष्ट जाणवते. रिलायंस ही कॉर्पोरेट कंपनी निर्माती असल्याचा हा परिणाम असावा. आजकाल कॉर्पोरेट कंपन्या सिनेनिर्मितीत आल्यापासून सिनेमा शेवटी शेवटी आवरता घेण्याचे, बजेटमुळे पटकथा प्रभावित होण्याचे प्रकार वाढले आहेत.

संगीत या गोष्टीला ‘सिंघम’मध्ये फारसा वाव नव्हताच तरीही अजय –अतुलचा पत्ता कसा कट झाला हे कळायला काही मार्ग नाही. सिनेमा तांत्रिकदृष्ट्या उत्तमच आहे.

तात्पर्य: लवकरच टी.व्ही.वर ‘वर्ल्ड टीव्ही प्रिमीअर’ वर ‘सिंघम रिटर्न्स’ पाहायला आमची काहीच हरकत नाही. आणि तोपर्यंत चित्रपटगृहात जाऊन दौलतजादा करायची तुमची इच्छाच असल्यास , आम्ही कोणाकोणाचे हात पकडणार हो ?

ता.क.: बरं इतका सिनेमा मनोभावे, डोळा लागू न देता पाहिल्यानंतर शेवटी ‘यो यो’ हनी सिंग आहेच. या ‘यो यो’ हनी सिंगचं काय करायचं, काही इलाज आहे का ?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लिहीले आहे! आवडले.

आजकाल कॉर्पोरेट कंपन्या सिनेनिर्मितीत आल्यापासून सिनेमा शेवटी शेवटी आवरता घेण्याचे, बजेटमुळे पटकथा प्रभावित होण्याचे प्रकार वाढले आहेत. >> हे इंटरेस्टिंग निरीक्षण आहे. या कोनातून विचार केला नव्हता याआधी.

पहिला सिंघम मी लागला तेव्हाच थिएटर मधे पाहिला होता. त्यातही कथा बिथा च्या भानगडीत न पडता समोर दिसत आहे ते एन्जॉय करायचे याच उद्देशाने आलेल्या लोकांची अजिबात निराशा त्या चित्रपटाने केली नव्हती. हा तसा आहे की नाही कल्पना नाही.

फँमिलीनी आज first day first show बघितला. Friday working असल्याने फक्त १० टाळकी होती. त्याना तर आवडला. मुले दयाचे ( CID) पंखे असल्याने त्याना मजा आली.

एक प्रकाश झा चा गंगाजल सोडुन मला तमाम "पोलिसपट" डोस्क्यात जाता भो!!!!!, च्यायला थर्ड वर्ल्ड कंट्रीज मधे ही पोलिस असले चाळे करत नसतील जे ह्या चित्रपटांत दाखवतात!!!, कोणी ड्युटी वेस्ट बेल्ट लाऊन गंजीफ्रॉक वर हिंडतोय तर कोणी बोट बोट दाढी वाढवत फिरतोय तर कोणी शर्टाची बटणे उघडी ठेऊन!!!! :रागः

मार्मिक परिक्षण...
ह्या इसमावर एकही केस वगैरे नाही का झालेली >>> झाली आहे अशी ऐकीव माहीती.

अगदी खरय ... पर्याय नव्हता म्हणुन पाहीला... सुट्टी असल्यामूळे तोबा गर्दी होती थेटरात ... कधी संपतो अस होउन जात शेवटी शेवटी .. प्रकाशराज ची आठवण आली .. निगेटिव्ह रोल असला तरी तो बाबा लोकांमधे असताना काहीही कसा बरळतो कळायला मार्ग नाही . स्टॅनली का डब्बा मधे अ‍ॅक्टींग छान केली होती पण इथे वाया घालवलाय .. त्या अप्सरा आणि जीतु ला उगाच घुसाडलय ..

त्या साळुंके ची बायको आणि त्या पैसे घेतलेल्या मुलाचि आई दोघींचे एक्सप्रेशन जबरी ...

न संपणार्‍या बंदुकीतील गोळ्या >> अगदी अगदी Lol

हिरो हिरवीण एक जण मराठी धड बोलत असेल तर शप्पथ ..::राग:

त्या यो यो ला तर धरुन सुतवायला पाहीजे ... डोक खराब ..::राग:

कोणी शाखा चे नवीन मुव्ही चे ट्रेलर पाहीले काय .. शाखा , दिपीका , बोमन इराणी , अभिषेक पाचव्याच नाव नै माहीत .. किती मुव्ही चोरुन तॉ बनवलाय कुणास ठाऊक ?

मस्त परिक्षण. उद्या जाऊन बघायचा विचार होता, पण दौलतजादा करायची अजिबात इच्छा नसल्यामुळे तुम्ही सुचवलेल्या "वर्ल्ड टि.व्ही. प्रिमियर" च्या पर्यायावर शिक्कामोर्तब.

मस्त लिहिलंय परीक्षण. नुसते या एका सिनेमापुरते नसून काही वाक्ये जनरलाईज असल्याने एक लेख वाचल्याचाही फील आला.
पहिला सिंघमही काही फार भारी होता अश्यातला भाग नाही पण सिंघम आणि जयकांत शिक्रे हि कॅरेक्टर्स छान जमल्याने मजा आलेली. इथे तेच मिसिंग असेल तर फुस्स.

टिव्हीवर बघताना सुद्धा अडीज तासांचा.. सॉरी, जाहिरातींसह साडेतीन तासांचा वेळ फुकट नाही घालवायचा..

अवांतर - प्राण सिनेमा खाऊन टाकतो म्हणून त्याचासोबत काम करायला नकार देणारे ‘सुपरस्टार’सुद्धा आपण पाहिले आहेत.
>>>
हा सुप्पर्र्स्टार कोण ? तमिताभ का ?

तो मुलगा " मला राग येतोय " असा बेंबीच्या देठापासुन का ओरडतोय याचा उलगडा चित्रपट पाहिल्यानंतरच होतो... Biggrin

सर्वांचे धन्यवाद!

ऋन्मेष: तो सुपरस्टार अमिताभ नव्हे.....प्राण नसता तर अमिताभ नसता....जंजीर असो की मजबूर किंवा डॉन, शराबी असो की अमर अकबर अ‍ॅंथनी -अमिताभच्या यशात प्राणचा मोठा वाटा आहे. किंबहुना जंजीर रिलीज झाला तेव्हा जया भादुरी आणि प्राण हेच त्याचे स्टार होते... सुरूवातीचे प्रेक्षक त्यांच्याच नावावर सिनेमाला गेले होते.नंतर काय झालं तो इतिहास....माझा रोख मुख्यतः राजेश खन्नाकडे आहे. राजेश खन्ना आणि प्राणचे काही फारसे आणि उल्लेखनीय चित्रपट आहेत असं मला वाटत नाही. आहेत त्यातले बरेचसे राजेश खन्नाच्या पडत्या काळातले आहेत. चू.भू.दे.घे.

@आबासाहेब-या योयोवर नागपूर कोर्टात एक जनहित याचिका चालू आहे. त्याच्या इथल्या कॉन्सर्टला(?) अश्लीलतेच्या आरोपावरून कोर्टाने स्टे दिला होता. केस अजून चालू आहे.

@टीना----खर्‍या सिनेमावाल्याने ट्रेलर आणि अशा परिक्षणावर जाऊ नये Wink स्वत: मेल्याशिवाय स्वर्ग किंवा नर्क दिसत नसतो.

प्राणला टाळणारा राजेश खन्ना तर होताच तसा राजकुमारही असावा....
राम और शाममध्ये दिलीपकुमारचा डबल रोल असूनही प्राणने तो खाल्लाच होता... नन्तर दिलिपकुमार प्राणला टाळीतच असे. अर्थात ते प्राणला घाबरून नव्हे तर दिलिप कुमार , देव आनन्द , राज कुमार यांना स्वतः वर जास्तीत जास्त कॅमेरा ठेवण्याची वाईट सवय होती अगदी शॉतमध्ये गरज नसतानाही...

वाघमारे ओके,
आम्हाला त्या काळातला (किंबहुना सार्वकालिक) सुपर्रस्टार म्हटले की अमिताभच आठवतो. माझ्यासारखे इतर असले तर त्यांचा गैरसमज व्हायला नको म्हणून शंका उपस्थित केली. तसा तो आमचा काळ नसल्याने सारेच काही ठाऊक नसते. आपण थेट नाव घेऊन प्रश्नच सोडवलात. बाकी प्राण हा फार मोठा ईम्पॅक्ट प्लेअर होता एवढे तर आमच्याही पिढीला त्याचे चित्रपट बघून समजतेच.

तर दिलिप कुमार , देव आनन्द , राज कुमार यांना स्वतः वर जास्तीत जास्त कॅमेरा ठेवण्याची वाईट सवय होती अगदी शॉतमध्ये गरज नसतानाही...
>>>>>>>>>
बोले तो शारुक सारखे .... अनसिक्युरड असुरक्षित सुपर्रस्टार Wink

ऋन्मेष तो सुपरस्टार राजेश खन्ना होता.:स्मित:

आपला जन्जिर, राजेश खन्ना, राजकुमार, देव आनन्द ( या बया, बरे झाले याने जन्जीर नाकारला, जस्ट इमॅजीन देव अ‍ॅज विजय ), धर्मेन्द्र आणी बर्‍याच जणानी नाकारला. तेव्हा ओमप्रकाश प्रकाश मेहराना म्हणाले वो लम्बु आता है ना तेरे ऑफिसमे हमेशा काम के लिए, उसे क्यू नही लेता इस रोलमे. आणी मग इतिहास घडला रे भो.:फिदी:

तेव्हापासुन अमिताभच्या प्रत्येक सिनेमात ओमप्रकाश, प्राण आणी प्यारेलाल असायचे.

ऋन्मेष:
अरे बाबा मी काही 'त्या' काळातला काळपुरूष वगैरे नाही आहे. इतक्या लौकर म्हातारं करू नका रे बाबा मला Sad

माहितीसाठी म्हणून मी पाहिलेले(म्हणजे मला आठवत असलेले ) सुरूवातीचे चित्रपट म्हणजे बोल राधा बोल, डर, ज्युरासिक पार्क, साजन वगैरे....आणि शेवटचा चित्रपट- तो अजून तयार व्हायचा आहे.

वाघमारे .. हा हा .. ओके ओके .. ज्युरासिक पार्क हा माझ्याही आयुष्यातील पहिला ईंग्लिश चित्रपट (स्पिलबर्गच्या दुर्दैवाने हिंदीत पाहिलेला Proud

मी असं वाचलं होतं की प्राण ने राजेश खन्ना बरोबर काम करायला नकार दिला होता, त्याच्या वेळ न पाळण्यासदृश स्टार चाळ्यांना वैतागून (वेळेवर यायला मी काय कारकून आहे?, मी सुपरस्टार आहे - स्व. रा. ख.)

Pages