विषय क्र. १ : चिरवेदनेचा पुनरुच्चार करणारी वावटळ

Submitted by झंप्या दामले on 29 August, 2012 - 15:24

काही सिनेमे चोरपावलांनी येतात (म्हणजे जवळपास ९०% मराठी सिनेमे याच वर्गात आले) आणि ठसाच उमटवून जातात. फक्त तिकीटबारीवरच नाही, तर मनावर सुद्धा ... अनेक मराठी सिनेमे धापा टाकत दम तोडत असताना अगदी अलीकडच्या काळात एक सिनेमा येऊन गेला कि ज्याने नुसती तगच धरली नाही तर सिनेमाच्या बाबतीत इतिहासजमा झालेली 'ज्युबिलीसु'द्धा पुण्यात साजरी केली - तीही Golden Jubilee !!! आणि आश्चर्य म्हणजे इतके असूनही हा सिनेमा औषधाला सुद्धा चर्चिला गेला नाही. ना त्याचा पुरस्कार सोहळ्यांमध्ये फारसा बोलबाला झाला, ना त्याचे DVD आणि Satellite rights हातोहात खपल्याच्या बातम्या आल्या. पुण्यात जवळपास ६० आठवडे चाललेला असूनही या सिनेमाबाबत माहिती असणारे लोक मला हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच सापडले, ही आणखी एक चमत्कारिक बाब. मी सवयीप्रमाणे हा सिनेमा पहिल्याच आठवड्यात पाहून घेतला होता आणि या सिनेमाने खरंच मनात घर केले केले होते. On The Record 'हिट' ठरलेल्या पण प्रत्यक्षात अनेक बाबतीत दुर्लक्षित राहिलेल्या या सिनेमाविषयी लिहायचेच असे वाटून अखेर ते लिखाण पूर्ण केलेच.

या सिनेमाचे नाव आहे 'वावटळ'...अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सापडलेल्या स्त्रीला भोवंडून टाकणारी वावटळ...

चित्रपटाच्या सुरुवातीलाच राजस्थान सीमेवरच्या एका गावात कमांडो कारवाईत घरात घुसून तिथल्या पुरुषांना ठार केले जाते. हे पुरुष म्हणजे पाकिस्तानी अतिरेकी आहेत आणि त्यांनी या गावात येऊन गावातल्या एका घरात वस्ती केली आहे. पण त्यांच्या सोबत एक स्त्री (तेजस्विनी पंडित) देखील जणू काही त्यांचीच कुटुंब सदस्य असल्याप्रमाणे तिच्या लहान बाळासोबत राहात असते. मध्यरात्रीच्या अचानक झालेल्या धुमश्चक्रीमुळे गावकरीपण हबकले आहेत. ते कमांडो पथकाचा प्रमुख K5 ला (अशोक समर्थ) सांगतात, की या स्त्रीला घेऊन जा कारण ही या गावची नाही. अतिश्रमाने थकलेली ती स्त्री कशीबशी चार पावले टाकून बेशुद्ध होते. K5 तिला गाडीत घालतो. आणि BSF (सीमा सुरक्षा दल) च्या तळावर, घेऊन
जातो आणि त्या स्त्रीला BSF च्या कमांडर चौहानच्या (विनय आपटे) ताब्यात देतो. या ठिकाणी या K5चे काम संपणे अपेक्षित आहे. कारण कमांडोचे काम गुप्त कारवाया करून अतिरेक्यांना कंठस्नान घालणे आणि BSF मदत करणे असले तरी BSF ऑफिसरच्या इतर आज्ञा पाळण्यास तो बांधील नाही. त्यामुळे तो सरळ तिथून निघून आपल्या खोलीत निघून जातो.

पण त्याच्यासमोर वेगळेच ताट वाढून ठेवलेले आहे.

ती स्त्री आपली पार्श्वभूमी काही केल्या चौहानला सांगत नाही.... किंबहुना ती तोंड उघडायलाच तयार नाहीये..... ती बराच मोठा काळ कसल्यातरी 'शॉक' मध्ये आहे... तिची तब्येत कशी आहे हे पाहायला K5 तिला ठेवलेल्या खोलीत येतो. त्याला पाहून तिला आठवते की 'हाच आपली सुटका करणारा आहे' आणि ती कृतज्ञता व्यक्त करते. पण तो निघून गेल्यावर मात्र पुन्हा मूग गिळून गप्प बसते. चौहानच्या लक्षात येते की तिचा पुरुष जमातीवरचा विश्वास संपूर्णपणे उडाला आहे आणि K5 हा हिच्यासाठी देवदूत असल्यामुळे हिचा फक्त त्याच्यावर विश्वास आहे. तिला बोलते करायचे तर याला समोर उभे करणे गरजेचे आहे. म्हणून तो K5 ला गळ घालतो "कृपया या स्त्रीच्या भल्यासाठी मला मदत कर". पण K5 सांगतो "सर, आम्हाला अशा भावनिक गोष्टीत अडकण्याची परवानगी नाही.मला तुम्ही अशा कुठल्याही गोष्टीत अडकवून नका. आणि एकदा जर का मी यात लक्ष घालायचे ठरवले तर मग तुम्ही काहीही झाले तरी मला यातून बाहेर काढू शकणार नाही..... तुम्हाला फार जड जाईल ते...." कमांडोंना असेच प्रशिक्षण दिलेले असते की कोणत्याही भावनांना बळी पडणे त्यांना शक्यच होऊ नये .... कोणी ओळख काढून देखील त्यांना असल्या गोष्टीत गुंतवू नये म्हणून त्यांची ओळख देखील इतकी गुप्त असते की अशोक समर्थ केवळ K5 या गुप्त नावाने ओळखला जात असतो... हे सारे असूनही चौहान K5 ला दादापुता करून तिच्यासमोर उभं करतो ते तिच्याकडून तिची आणि पर्यायाने तिच्या सोबतच्या अतिरेक्यांची माहिती काढून घेण्यासाठी ..... त्यामागचे कारण स्पष्ट असते. चौहानला काहीही करून अतिरेक्यांची माहिती त्याच्या वरिष्ठांपर्यंत पोचवणे भाग असते. त्यामुळे तो तिची काळजी करतोय असा कितीही भाव दाखवत असला तरी तिच्या वैयक्तिक पूर्वायुष्यात काय झाले याच्याची त्याला फारसे काही देणे घेणे नसते. तिच्यावर गुदरलेल्या भीषण परिस्थितीची कल्पना आपल्याला येते तिने सांगितलेल्या माहितीतून. लग्नानंतर नवऱ्यासोबत मुंबईला फिरायला जुईली मानकर नावाच्या या तरुणीचं आलेल्या हिंदू - मुस्लीम दंगलीत अडकणं, मुस्लीम टोळीच्या म्होरक्याने तिला पळवून नेणं, तिला एका godown मध्ये डांबून ठेऊन तिच्यावर वारंवार बलात्कार करणं, त्यातूनच तिला मूल होणं, अतिरेक्यांच्या टोळीचं तिला तान्ह्या बाळासह राजस्थान सीमेवर घेऊन जाऊन निर्दयीपणे वाट तुडवायला लावणं, यामध्ये तिचं आयुष्य वावटळीतल्या पाचोळ्यासारखं दिशाहीन भोवंडत राहिलेलं असतं .

Vavtal 2.jpg

तिथून सुटका झाली तरी तिची परवड थांबलेली नसते.

लष्करामार्फत मजल दरमजल करत सून सापडल्याचा संदेश जेव्हा तिच्या सासरी पोचवला जातो आणि तिला पोचवायची व्यवस्था करत आहोत असे कळवले जाते तेव्हा तिच्या वरच्या संकटा विषयी आणि त्यातून तिला झालेल्या अपत्याविषयी कळल्याने त्यांचे चक्क 'No Thanks' वाले पत्र येते. इतकेच नव्हे तर इतकेच नव्हे तर आमदार असणारे तिचे सासरे आपले सगळे वजन वापरून आणि लष्करी अधिकाऱ्यांसोबत संधान बांधून जुईलीची पाठवणी परस्पर महिला आधारगृहात करायचे आदेश काढायला लावतात. K5 ला हे कळते तेव्हा तो अतिशय व्यथित होतो. केवळ अतिरेक्यांचे धागोदोरे शोधण्यापुरतेच तिला (आणि तिच्याकडून माहिती काढण्यासाठी पर्यायाने K5 ला) वापरून घेतल्याबद्दल चौहानला सुनवायलाही कमी करत नाही. आधी त्याने दिलेल्या इशाऱ्याप्रमाणे आता त्याला या प्रकरणातून बाहेर काढणे चौहानला अवघड झालेले असते. चौहान "वरिष्ठांपुढे माझे हात बांधलेले आहेत" असे उत्तर देऊन जुईलीला मदत करण्यासाठी असमर्थ असल्याचे सांगतो. शिवाय सुट्टीसाठी कोल्हापूरला घरी निघालेल्या K5लाच जुईलीला दिल्लीतील महिला आधारगृहा मध्ये पोचवून मगच महाराष्ट्रातल्या स्वतःच्या गावी जाण्याची विनंती करतो.

पुन्हा एकदा हे भावनिक प्रकरण गळ्यात येऊन पडल्याने K5 अस्वस्थ होतो. शेवटी एक कर्तव्य म्हणून जुईलीला घेऊन रेल्वे स्टेशनवर येतो, पण तिला दिल्लीला पोहोचते करण्याऐवजी सरळ दुसऱ्याच गाडीत चढतो आणि तिला घेऊन थेट सावंतवाडीला तिच्या सासरी येऊन धडकतो.

Vavtal 3.jpg

सुनेला दरवाजात उभे राहिलेले पाहून सासरचे लोक स्तंभित होतात. जुईलीचे आयुष्य रुळावर आणण्याचा शेवटचा प्रयत्न म्हणून, K5 तिच्या सासऱ्यांना तिला पुन्हा विनंती करतो पण अपेक्षेप्रमाणे तेही हात झटकतात. आता मात्र K5 संतापतो आणि सासऱ्यांना बरेच काही सुनावतो. तिचा काहीही दोष नसताना तिने किती आणि का सहन करायचे असा प्रश्न विचारतो. सासरे निरुत्तर होतात. पण आता काहीच होऊ शकणार नसते. जुईलीच्या नवऱ्याचे दुसरे लग्न ठरलेले असते. आता जुईलीला तिच्या बाळाशिवाय खऱ्या अर्थाने स्वतःचे अस कोणीही उरलेले नसते.... परिस्थिती ओळखून जुईली बाहेर पडते. जुईलीला सासर परत मिळवून द्यायचे अशा निश्चयाने आलेला K5 सुद्धा नाईलाजाने जड पावलांनी निघतो.... बाहेर पडता पडता K5 थबकतो, काही एक विचार करतो आणि सावकाशपणे आणि विचारतो "घरी माझी आई आहे, स्वतःची थोडी शेती आहे. माझ्याशी लग्न करशील?" ती काहीच बोलत नाही पण तरीही मूकपणे त्याच्यासोबत चालू लागते आणि सिनेमा संपतो.....

अनंत सामंतांच्या ‘K5’ या कादंबरीवरचा हा सिनेमा..... एक स्त्री काहीही संबंध नसताना, चूक नसताना कशी होरपळते आणि तिची सदोदित परवडच कशी होत जाते याचे हे व्यथित करणारे चित्रण... सिनेमा आपल्याला सतत प्रश्न विचारात राहतो, "चूक कोणाचीही असली तरी भोग स्त्रीच्याच नशिबी का ?? दोष तिच्याच माथी का ??" कुठेही melodramatic न होऊ देता केलेली संयत हाताळणी हे या सिनेमाचे बलस्थान. त्याचे श्रेय दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांना द्यायला हवे. विशेषतः शेवटचे K5 चे सासऱ्याची कानउघडणी करण्याचे दृश्य तर आक्रस्ताळे आणि melodramatic होऊ शकले असते, पण अशोक समर्थचा मुळातलाच खर्जातला जबरदस्त प्रभावी आवाज आणि काहीही झाले तरी K5 हा घरात आलेला आगंतुक आहे याचे दिग्दर्शकाने ठेवलेले भान यामुळे संपूर्ण प्रसंगाचा 'टोन' खालचा ठेऊनदेखील K5 चे बोलणे अतिशय प्रभावी ठरते.

संपूर्ण सिनेमामध्ये बलात्कारी अतिरेकी (मुकेश तिवारी) वगळता इतर कोणतेही पात्र थेट वाईट किंवा खलनायकी म्हणून येत नाही. चांगला आणि वाईट या रंगाच्या मधली असणारी, पात्रांना 'ग्रे' शेडमध्ये वागवणारी तात्कालिक परिस्थिती किंवा नियती ही देखील अनेक वेळा प्रभावी ठरत असते हेच यातून जाणवत राहते. याची दोन उदाहरणे आहेत. पहिले उदाहरण पुन्हा वर उल्लेखलेल्या प्रसंगाचेच द्यावे लागेल. तोपर्यंत जुईलीची सुधारगृहात पाठवणीची व्यवस्था करून तिला नाकारणारे सासरचे लोक हे आपल्या दृष्टीने दुष्ट-निर्दयी वगैरे झालेले असतात पण शेवटच्या प्रसंगात मात्र त्यांच्याकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन आणि पूर्वग्रह काहीसा बदलतो. एका स्त्रीची वेदना जाणवून अकृत्रिमपणे हळवी होणारी जुईलीची सासू आणि बोलण्याची इच्छा असूनही पुढे येऊन न बोलता केवळ मूकपणे आणि अस्वस्थपणे जुईलीकडे पाहणारा तिचा नवरा यांना पाहिले की ते परिस्थितीला शरण जाणारे, अप्रिय सत्याला उंबऱ्याबाहेर ठेवून सोयीस्कर आडोसा शोधणारे मर्त्य मानव वाटायला लागतात.

एखाद्या पात्राला सरसकट वाईट न ठरवता त्यावर प्रेक्षकाला फेरविचार करायला भाग पाडणारं दुसरे उदाहरण कमांडर चौहान. BSF च्या Headquarters मधून K5 जुईलीला घेऊन पोहोचवण्यास निघतो तेव्हा वाटेत त्यांना गाठून निरोप द्यायला चौहान स्वतः येतो. सुरुवातीपासून कर्तव्य कठोर असणारा, अतिरेक्यांचा माग काढेपर्यंत जुईलीशी आपुलकीने वागून नंतर मात्र तिला तिच्या सासरी नेऊन सोडण्याची जबाबदारी घेण्याऐवजी सरळ "वरिष्ठांच्या आदेशानुसार तिला महिला आधारगृहात पाठवायला लागेल" असे सांगून हात झटकणारा 'कमांडर' चौहान या ठिकाणी जुईलीच्या बाळासाठी खेळणी भेट देताना आणि एखाद्या बापासारखा हळवा होऊन डोळ्याच्या कडा पुसत जुईलीला निरोप देताना दिसतो. हा प्रसंग खरोखरच touching झाला आहे. माझ्या मते संपूर्ण चित्रपटातला हा सर्वोत्कृष्ट प्रसंग आहे.

अभिनयाच्या बाबतीत अशोक समर्थ नेहमीप्रमाणेच दमदार आहे. तगड्या व्यक्तिमत्वाचा, थंड रक्ताचा, मिळालेल्या प्रशिक्षणानुसार कोणत्याही भावनिक गुंत्यात न अडकणारा, पण अखेरीस जुईलीची फरफट पाहून अस्वस्थ होऊन तिला तिचे पूर्वायुष्य परत मिळवून देण्यासाठी सूत्र हातात घेऊ पाहणारा कमांडो त्याने सुरेख साकारलाय. विनय आपटे आणि अशोक समर्थ या दोघांमधल्या शाब्दिक चकमकी लक्षात राहण्यासारख्या झाल्या आहेत आणि या दोन्ही अभिनेत्यांची क्षमता पूर्णपणे दाखवून देणाऱ्या असल्यामुळे समाधान देणाऱ्या आहेत. फक्त चौहानचे सुटलेले पोट पाहून मात्र हा असा पेटू माणूस BSF मध्ये ऑफिसर कसा असेल असा प्रश्न मला छळत होता. तेजस्विनी पंडितला 'सिंधुताई सपकाळ' सोबतच याही सिनेमामध्ये हेवा वाटावा अशी भूमिका मिळाली आहे. अतिरेक्यांच्या कळपासोबत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फरफटत जाणारी, त्यांच्याकडून वारंवार उपभोगली गेल्याने दगडासारखी सुन्न-बधीर झालेली आणि तरीही बाळावर माया करणारी स्त्री तिने समरसून रंगवली आहे. जुईलीला कित्येक महिने एका godown मध्ये बंदिस्त करून तिला कायम अर्धनग्नच ठेवणारा, तिच्यावर वारंवार बलात्कार करणारा विकृत उलट्या काळजाचा नराधम मुकेश तिवारीने जबरदस्त साकारला आहे. सुऱ्याच्या धारदार पात्याने जुईलीचे तळपाय उकरण्याचा प्रसंग शहारे आणतो. मी मूळ कादंबरी वाचलेली नाही, पण मी एके ठिकाणी वाचलेल्या परीक्षणानुसार मूळ कादंबरीत तिच्यावरच्या अत्याचाराची याहून भयानक वर्णने आहेत. कदाचित मराठी प्रेक्षकाची प्रकृती-प्रवृत्ती आणि मर्यादा लक्षात घेऊन दिग्दर्शक शिवाजी पाटील यांनी हे प्रसंग थोडक्यात उरकले असावेत. दंगलीचे दृश्य देखील सपक वाटते. अर्थात या त्रुटी माफक आहेत. सुरुवातीला दाखवलेली कमांडो कारवाई दमदार आहे. संपूर्ण चित्रपट प्रभावीपणे उभा करण्यामध्ये छायाचित्रणाचादेखील वाटा आहे. मराठीत सिनेमा मध्ये यापूर्वी न आढळलेली राजस्थानची रखरखीत पार्श्वभूमी कॅमेऱ्यात चांगली टिपली आहे आणि ती जुईलीच्या आयुष्यातल्या रखरखटाशी कळत नकळत खूप सुसंगत ठरते.

सतत भोगत आलेली आणि वारा नेईल त्या दिशेला भेलकांडत राहणारी सिनेमातली स्त्री मला फक्त कथानकापुरती मर्यादित वाटलीच नाही. कुठल्याही अप्रिय घटनेची परिणती अंतिमतः स्त्रीला दोषी
ठरवण्यात किंवा तिचे हक्क (अनेकदा जगण्याचा हक्कही) नाकारण्यात होते हे आदिकालापासून चालत आलेले आणि अजूनही रोज दिसत असलेले वास्तव मला या सिनेमातून पुन्हा अधोरेखित झाल्यासारखे वाटले. थिएटर बाहेर पडत असताना अस्वस्थतेसोबतच एक चांगला सिनेमा पाहिल्याचे समाधान देखील वाटत होते.

आवर्जून पहावा असा हा लक्षवेधी सिनेमा या निमित्ताने जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचेल अशी मला खात्री आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान परिचय करून दिला आहे. आवडलं लिहिलेलं. Happy मीही पाहिला नव्हता हा सिनेमा, आणि पुस्तकही वाचलं नव्हतं. अशोक समर्थ गुणी कलाकार आहे. त्याचं सिंघम मधलं काम नावाजलं जावं, आणि वावटळ कडे दुर्लक्ष- हे दुर्दैवच.

चांगला परिचय करून दिला आहे. परिक्षणं खूप चांगली आली होती ह्या चित्रपटाची. त्याचं जोरदार मार्केटिंग का केलं गेलं नाही, काही कल्पना?

अतिरेक्यांचा उदोउदो करण्यात सरकार आणि चमचे संपादक यांची चढाओढ लागली आहे. साहजिकच या चित्रपटास प्रसिद्धी मिळाली नाही. हा चित्रपट परत लागेल की नाही याची शंका वाटते.

-गा.पै.

माझ्याच्याने होणार नाहीये चित्रपट पाहणे , कादंबरी तर लांबची गोष्ट! पण हे लिहील्याबद्दल आभार. खरच तन्मयतेने लिहिले आहे तुम्ही.

तेजस्विनी पंडीत गुणी अभिनेत्री आहे. तिने चांगली वठवली असेल भुमिका..

"अतिरेक्यांचा उदोउदो करण्यात सरकार आणि चमचे संपादक यांची चढाओढ लागली आहे. साहजिकच या चित्रपटास प्रसिद्धी मिळाली नाही">>>
गामा पैलवान : वरील दोन गोष्टींचा एकमेकांशी संबंध लावणे करणे जरा अतिरेकीच ठरेल ...
दोष द्यायचाच झाला तर चित्रपटाची योग्य प्रसिद्धी केली गेली नाही याचा दोष सर्वप्रथम निर्मात्याकडेच जायला हवा आणि त्याच बरोबर ५० आठवडे रोज सिनेमाची जाहिरात पेपर मध्ये पाहूनही "जरा बघू तरी जाऊन काय आहे सिनेमामध्ये" असे क्षणभर सुद्धा न वाटणाऱ्या (आणि त्याच काळात बिग बजेट थुकरट हिंदी सिनेमे केवळ नावाखातर सुपरहिट करण्यात वाटा उचलणाऱ्या ) मराठी माणसाला या ठिकाणी दोष दिला पाहिजे

"अजून असे चांगले पण जास्त प्रसिद्धी न मिळालेले मराठी चित्रपट असतील तर जरूर सांगा" >>>>
@लंपन : प्रसिद्धी न मिळालेले पण उत्तम चित्रपट. संधी मिळाल्यास अजिबात सोडू नयेत असे.
१) विक्रम गोखले दिग्दर्शित 'आघात' : वैद्यकीय व्यवसायातल्या अपप्रवृतीवर आधारित सुरेख सिनेमा. मुख्य आकर्षण - अर्थातच मुक्ता बर्वे.
२) 'रंग मनांचे : चिन्मयी सुर्वे आणि सचित पाटील अभिनित आणि शिवदर्शन - अमित दिग्दर्शित , व.पुं.च्या कथेवर आधारित Touching सिनेमा '
३) सुखांत : इच्छामरणावर आधारित सिनेमा किरण यज्ञोपवित यांचे अप्रतिम पटकथा संवाद, संजय सुरकारांचे सुरेख दिग्दर्शन आणि अतुल कुलकर्णी ज्योती चांदेकर अप्रतिम अभिनय
४) 'निरोप' : 'गंध' या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सिनेमाचा दिग्दर्शक सचिन कुंडलकरचा आधीचा सिनेमा. हा मी पाहिलेला नाहीये पण ऐकून आहे की चांगला आहे म्हणून
५) अमोल पालेकरांचा 'धूसर' : kathanak व्याप्ती अगदी छोटेसे असूनही दिग्दर्शन आणि रीमा लागूचा fantastic अभिनय आणि उपेंद्र लिमयेची त्याच्या image ला संपूर्ण छेद देणारी संयत भूमिका यामुळे सिनेमा पाहून मी भावूक झालो होतो.

माहितीही नव्हत ह्या चित्रपटाबद्दल.
आभार तुमचे. मराठी चॅनेलच्या कृपेने लागला तर बघेन.

झंप्या दामले,

>> दोष द्यायचाच झाला तर चित्रपटाची योग्य प्रसिद्धी केली गेली नाही याचा दोष सर्वप्रथम निर्मात्याकडेच
>> जायला हवा आणि त्याच बरोबर ५० आठवडे रोज सिनेमाची जाहिरात पेपर मध्ये पाहूनही "जरा बघू तरी
>> जाऊन काय आहे सिनेमामध्ये" असे क्षणभर सुद्धा न वाटणाऱ्या (आणि त्याच काळात बिग बजेट थुकरट
>> हिंदी सिनेमे केवळ नावाखातर सुपरहिट करण्यात वाटा उचलणाऱ्या ) मराठी माणसाला या ठिकाणी दोष
>> दिला पाहिजे

एका अर्थी आपलं खरंय. पण ते करमणूकप्रधान चित्रपटांच्या बाबतीत, नाहीका? या चित्रपटाची जातकुळी वेगळीच आहे. माझा रोख वृत्तपत्रीय प्रसिद्धीकडे आहे. कुठल्याश्या थुरकट हिंदी सिनेमावर भरभरून लिहिणार्‍या सिनेलेखकांना या चित्रपटाची दखल घ्यावीशी का वाटली नाही? की वाटली होती, पण संपादकांनी थांबवलं? तसं असेल तर ही सरकारकडून आलेली स्थायी सूचना (स्टँडिंग ऑर्डर) समजावी का? तशीही आजची वृत्तपत्रे सरकारी जाहिरातींवर चालतात. तेव्हा एखादी अनौपचारिक स्थायी सूचना जारी करणं सरकारला कठीण नाही.

असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. यांच्या संदर्भात माझं विधान परत मांडावंसं वाटतं.

जरी निर्मात्याने प्रसिद्धी दिली असती, तरी ती दाबून टाकणं सोपं असावं. कारण सरकारला पसंत नसलेली कुठलीही गोष्ट चालवणं प्रचंड जिकिरीचं असतं.

आ.न.,
-गा.पै.

गामापैलवान : संपादकांनी थांबवले असेल असे वाटत नाही. कारण मुळातच या सिनेमाचा फोकस धार्मिक दंगल - आतंकवाद असा नसून 'स्त्री' हा आहे. आणि पेपर मध्ये याची परीक्षणे छापूनसुद्धा आली होती ... पण वृत्तपत्रीय समीक्षा ही मुळातच कमी शब्द मर्यादेची असल्याने अशी समीक्षणे बऱ्याचदा चटावरचे श्राद्ध या गटात मोडतात.
ज्यांचे लिखाण आवर्जून वाचले जाते, मत विचारात घेतले जाते असे मराठी सिनेमाचे समीक्षक जवळपास नाहीतच. अशोक राणे आहेत पण अलीकडे ते लिहितात की नाही मला माहित नाही, माझ्या अजिबात वाचनात आलेले नाहीये. गणेश मतकरी अप्रतिम समीक्षण करतात पण ते प्रामुख्याने इंग्रजी सिनेमाचेच असते ... मराठी सिनेमाची समीक्षा कमी प्रमाणात करतात, मराठी सिनेमाची समीक्षा त्यांनी अधिक ठळकपणे करावी असे फार वाटते. एकुणातच मराठी सिनेमाला जशी चांगल्या प्रसिद्धीची, उदंड प्रेक्षक प्रतिसादाची गरज आहे तशीच वाचकप्रिय समिक्षकाचीही गरज आहे (हिंदी / इंग्रजीमध्ये बरेच लोकप्रिय समीक्षक आहेत त्याच धर्तीवर )

झंप्या दामले,

१.
>> मराठी सिनेमाची समीक्षा त्यांनी अधिक ठळकपणे करावी असे फार वाटते

अगदी १००% अनुमोदन! त्याकरिता चित्रपटकलेचा आस्वाद कसा घ्यायचा ते शिकलं पाहिजे. यासंबंधी काही मार्गदर्शक तत्त्वे आहेत का? नसतील तर तशी बनवायला हवीत.

२.
>> मुळातच या सिनेमाचा फोकस धार्मिक दंगल - आतंकवाद असा नसून 'स्त्री' हा आहे.

हे तुम्हालाआम्हाला कळतं, पण सर्वसामान्य प्रेक्षकाला कळण्याची अपेक्षा नाही. किंबहुना या चित्रपटामुळे अतिरेक्यांविषयी जे मत होतं ते प्रेक्षकाच्या नकळत होतं. दिग्दर्शकाला दाखवायचंय एक आणि प्रेक्षक पाहतात ते वेगळंच हा प्रकार अनादिकाळापासून चालत आला आहे.

एक उदाहरण द्यायचं झालं तर असाच आक्षेप देऊळ चित्रपटातल्या दत्तगुरूंच्या गाण्यावर घेतला गेला होता. भले दिग्दर्शकाला श्रीदत्तगुरूंस वेठीस धरलेले दाखवायचे असेल, मात्र त्यासाठी डार्लिंग दत्त, पापं सगळी ढोसेल दत्त, रिटेलमध्ये होलसेल दत्त, इत्यादि रूपके वापरावीत का? ही रूपके गाण्यात आल्याने कोणीही (विशेषत: लहान मुलं) अजाणतेपणी गुणगुणण्याची शक्यता आहे. हे योग्य नाही. त्यामुळे देवाचा गैरफायदा घेतलेला योग्य प्रकारे दाखवण्याचा आग्रह धरावासा वाटतो.

सांगण्याचा मुद्दा काय आहे की दिग्दर्शकाला जे अभिप्रेत असतं तेच प्रेक्षक पाहतो असं गृहीत धरू नये.

आ.न.,
-गा.पै.

@गा.प.
मार्गदर्शक तत्वे आहेत का माहित नाही पण 'सिनेमा कसा पाहावा' या संबंधी काही फिल्म क्लब पुण्यात चालतात. तुम्ही पुण्यात रहात असाल तर 'आशय फिल्म क्लब'चे सदस्य होऊ शकता. माझी पण सदस्य व्हायची इच्छा आहे. नुसते आपापले सिनेमे पाहण्यापेक्षा अशा क्लब मार्फत पहिले तर दिग्दर्शन आणि इतर तांत्रिक बाबींविषयीबरीच सखोल माहिती मिळते.

झंप्या दामले, माहितीबद्दल धन्यवाद! Happy मी राहायला पुण्यात नसतो. त्यामुळे गुग्गुळाचार्यांना विचारेन्से म्हणतो.

आ.न.,
-गा.पै.

अस्वस्थ करणारं लेखन आहे... खरच त्या स्त्रीचं काय झालं असेल... चित्रपट कुठे पहायला मिळाला तर नक्कीच बघेन.

इथे मेकींग/ कलाकारांचे मनोगत आहे. http://www.youtube.com/watch?v=Lj7auDaKhjo

@विजय देशमुख : 'हेवन करेंगे'च्या धाग्यावरून थेट इकडे हनुमान उडी मारलीत की काय !!! मी विसरून पण गेलो होतो मी असं काही लिहिलं होतं इकडे म्हणून. आणि मला रंग मनांचे बद्दल खरच फार कमी आठवतंय. लिहायला बसलो तर ५-७ ओळींमध्ये आटपेल अशी भीती वाटतीये म्हणून लिहायला घेतले नाही

छान लिहिलंय.
या चित्रपटाबद्दल ऐकलं होतं. पाहिलेला नाही. आता बघेन .

शिवाजी लोटन पाटील हे 'धग' चे ही दिग्दर्शक आहेत.'धग' साठीच उषा जाधव ला अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कार ही मिळाला आहे. यात स्मशानात राहणार्या कुटुंबाचा विषय आहे. मराठीत खूप वेगळ्या विषयावरचे चित्रपट येतायत.

@माशा : या चित्रपटाबद्दल ऐकलं होतं. पाहिलेला नाही. आता बघेन .>>> मला नाही वाटत की आता हा सिनेमा तुम्हाला कुठे बघायला मिळेल. डीव्हीडी नाहिये. टीव्हीवर पण लागत नाही. Sad

आणि 'धग' हा सुद्धा सुरेख सिनेमा आआहे. बघितला नसल्यास नक्की बघा

Pages