मित्रांनो ,
आपल्याला माहीतच आहे कि आमीरच्या सत्यमेव जयतेचे तेरा भाग तयार आहेत. त्यातल्या पाच भागांचे प्रक्षेपण हे डिस्क्लेमर लिहीपर्यंत झालेले आहे. पण एक भाग असा आहे कि ज्याचे प्रक्षेपण आता लगेच होणार नाही. हा एक विशेष भाग असून, विशिष्ट वेळी त्याचं प्रक्षेपण होईल असं समजतं. आमच्या हातात त्याची सीडी लागल्याने त्या भागाचा यथासांग वृत्तांत वाचकांसाठी समोर ठेवत आहे. डिस्क्लेमर : या लेखात आलेले प्रसंग, नावं आणि व्यक्ती काल्पनिक असून कुठल्याही प्रकारच्या साधर्म्याबाबत काही तक्रार असल्यास वाचण्यापूर्वीच थांबावे ही नम्र विनंती.
या चिमण्यांनो परत फिरा रे... : सत्यमेव जयतेचा विशेष भाग
===============================
रविवार असल्याने निवांत लोळणा-या नवरेमंडळींच्या तावडीतून सुटलेला रिमोट आता दुर्लक्षित वाहिन्यांवरच्या कारस्थानी स्त्री-मालिकांचं सलग प्रक्षेपण पाहत असतो. अकराला दहा कमी असताना टाटा स्कायच्या टायमरच्या कृपेने आपोआप स्टार प्रवाह सुरू होतं आणि हिंस्त्र मालिका बदलूनही घराघरात महिलावर्गाच्या चेह-यावर हास्य फुलतं. स्क्रीनवर आता आमीर खान दिसत असतो !
हंगामा करणे हा माझा उद्देश नाही असं तो मराठीतून सांगतो त्याबरोबर सोफ्यात पहुडलेली नवरे मंडळी सैलावलेल्या लुंग्यांच्या गाठी आवळत सोफ्यातल्या सोफ्यात उठून बसतात. नुकतेच कवायती करून दमून आलेले काही नवरे मात्र आमीर खानचा आवाज कानी पडताच ४४० व्होल्टसचा झटका बसावा तसे टीव्ही बंद करा म्हणून ओरडतात, पण घरात कुणीच ऐकत नसल्याने आज नेटवर याचं चांगलं उट्टं काढण्याचं मनाशी ठरवून तसेच पडून राहतात.
शीर्षक गीत संपतं आणि आमीर पुन्हा पडद्यावर येतो. समुद्राकाठी वाळूत रेघोट्या मारताना लालसर दिसणारा त्याचा चेहरा आता पांढराशुभ्र दिसत असतो.
ए मेरे वतन के लोगों, जरा आंख मे भरलो पानी
जो शहीद हुए है उनकी, जरा याद करो कुर्बानी
हे गीत पार्श्वभूमीला वाजत राहतं. गीत संपेपर्यंत आमीर खान गंभीर चेह-याने स्तब्ध उभा असतो. गाणं संपल्यावर वरचा ओठ खालच्या ओठांत दाबत तो फिस्सदिशी हसतो. चेहरा निर्विकार असला तरी आपली बायको त्याच्या हसण्यावर लट्टु झालेली आहे हे गावीही नसलेला नवरा बोलून जातो.. आज कुठला विषय घेतोय कुणास ठाऊक !
"मित्र / मैत्रिणींनो
हे गीत गेल्या काही पिढ्यांना प्रेरणा देत आलंय. जादू आहे या गीतात. केवळ गीतच नाही तर साहीत्य, नृत्य, कविता, संगीत, चित्रं, शिल्पं यांनी आपलं जीवन समृद्ध बनतं. जगण्याची प्रेरणा मिळते. असं म्हणतात कि साहीत्यिक, कवी यांच्याकडे दैवी शक्ती असते. निर्मिती, सृजनाच्या प्रवासातले हे देवदूत आपल्याला आनंदित करत असतात....
मात्र, आजची पिढी, आजचा समाज त्यांच्या प्रती उतराई आहे का ? काय वाटतं आजच्या तरुणाईला ? चला, आज आपण भेटूयात एका नव कवीला.. !"
सत्यमेव जयतेचा स्टेज उजळून निघतो आणि आपल्याला दिसतात आमंत्रित प्रेक्षक आणि मध्यभागी दोन खुर्च्यात बसलेल्या दोन व्यक्ती ! आता हा ही भाग उजळून निघतो आणि आमीर खान दिसतो
"आपल्याकडे आहेत आज इंटरनेटच्या जमान्यातले एक तरूण कवी, ज्यांच्या हातात उद्याच्या कवितेची लेखणी आहे. ते साहीत्याचे उद्याचे दूत आहेत... पण त्यांच्यावर काय प्रसंग आला हे ऐकूयात त्यांच्याच शब्दात.. !!"
पडद्यावर एक फिल्म सुरू होते. एका शबनम धारी दाढीवाल्या व्यक्तीला मारहाण होत असते. गावातल्या काही लोकांना बेसावध असताना कविता ऐकवल्याचा त्याच्यावर आरोप असतो. कानावर व्हायोलिनचे करुण सूर पडत असतात. रात्रीची वेळ, मुसळधार पाऊस आणि त्या दाढीधारी व्यक्तीला चिखलात फेकले जाते. कुणाच्यातरी बुटाखाली त्याची लेखणी चिरडली जाते. पावसात शबनम मधले कागद इतस्ततः विखरून पडलेले असतात. त्यावरची शाई पावसाबरोबर वाहून जात असते. त्याला पुन्हा गावात पाऊल टाकायचं नाही अशी धमकी देऊन गावाच्या हद्दीबाहेर फेकलं जातं.. पावसातच त्याचं घर जळत असतं. ती सर्वस्वाची आग विझवायला पाऊस असमर्थ असतो...
दृश्य दुसरे : तो दाढीधारी मनुष्य खचलेल्या अवस्थेत , फाटक्या कपड्यात कुठल्याश्या शहरात हातगाडी ओढत असतो. हातगाडीवर कागदाची रद्दी असते. त्यातले काही कागद वा-याबरोबर त्याच्या चेह-यावर येऊन बसतात. त्याची नजर मात्र हरवलेली. ते कागद तो दूर करीत नाही. शून्यात पाहत हातगाडी ओढत राहतो. आणि त्याच्या चेह-यावरून कागद उडतात मात्र .. एखाद्या प्रेताचा असावा तसा चेहरा पाहून काळजाचा थरकाप उडतो. उडालेल्या कागदांवरून हातगाडीवर कॅमेरा...
रद्दीत शहरातल्या कवींच्या कवितांचे कागद असतात. मासिके, वृत्तपत्रे, दिवाळी अंक यामधून नाकारल्या गेलेल्या कवितांच्या रद्दीचं ओझं ओढण्यासाठी एक कवीच मिळावा यापेक्षा विलक्षण असं नियतीचं काव्य आणखी काय असणार ?
दृश्य तिसरे : एक लहान मुलगा टीव्ही पाहत असतो. टीव्हीवर पावसाची दृश्ये दिसतात आणि कुठूनसे धीरगंभीर आवाजात शब्द ऐकू येतात....
त्याला पाऊस आवडत नाही
तिला पाऊस आवडतो....!
तो लहान मुलगा भान हरपून ऐकत असतो. इतक्यात त्याच्या डोक्यावरून एक हात फिरताना दिसतो. तोच तो शून्यवत दाढीधारी मध्यमवयीन मनुष्य आता डोळ्यात पाणी आणून गहिवरलेल्या जनरेने त्या मुलाकडे बघत असतो.
" बेटा ! बापाचं अधुरं स्वप्न तू साकार करशील ना ? एक दिवस तू मोठ्ठा कवी होशील ना?
मुलगा आपल्या पित्याकडे बघत राहतो.
दृश्य चौथे : तो मुलगा आता एक मिशीदार तरूण झालेला असतो आणि पापा मोटर्सच्या एका कार्यक्रमामधे स्टेजवर एक पुरस्कार स्विकारताना दिसतो. सर्वोत्कृष्ट कवीचा हा पुरस्कार स्विकारताना बाबांचा क्लोज अप पडद्यावर येतो. जो जिता वोही सिकंदर मधे आमीर खान रेस जिंकताना कुलभूषण खरबंदाच्या चेह-यावर जे भाव असतात तेच भाव आता दाढीधारी मध्यमवयीन मनुष्याच्या चेह-यावर असतात. हम होंगे कामयाबची धुन ऐकू येत असते... माऊली डोळ्याला पदर लावत असते !
इथे फिल्म संपते. सेटवरचे सगळे गंभीर ! काही महिलांचे डोळे पाणावलेले दिसतात. आमीर डोळ्याच्या कडांना रूमालासारखं लावून ते पुसत असतो. पण पाण्याचा टिपूसही नसतो डोळ्यांत. कवीला मात्र वाटत राहतं आमीर आपल्यासाठी सद्गदित झालाय.
"जिगाजी या शो मधे आपले मन:पूर्वक स्वागत. सर्वात आधी तुमच्या नावाबद्दल अभिनंदन करतो. शिवकालीन नाव वाटतंय तुमचं "
" आमीरजी ! हे माझं खरं नाव नाही "
" मग तुम्ही कवितेसाठी हे नाव घेतलंय का ?"
" नाही. नवकवींना पळवून लावणा-या एका कुप्रसिद्ध संस्थळावर मला हे नाव मिळालं आणि ते आता असं चिकटलंय कि मलाही माझं खरं नाव आठवत नाही "
" ओह ! म्हणजे तुम्हाला हा खिताब देण्यात आलाय तर. का बरं ? तुम्ही तिथे लोकप्रिय होतात का ?"
जिगाजी खिन्नपणे हसतो.. त्याच्या हसण्यात ह्रुदय पिळवटून टाकण्याची ताकद असते.
" आमीरजी. खरंच जर असं असतं तर...! " मान हलवत राहतो.
" सुरूवातीला जेव्हा माझ्या कवितेवर १०० - १०० प्रतिसाद केवळ तासाभरातच आले तेव्हां मला असंच वाटलं होतं. पण सत्य काही वेगळंच होतं "
" काय होतं ते सत्य ...प्रेक्षकांना सांगाल का ?"
" मी प्रयत्न करतो.. "
"आपण आताच पाहीलं कि जिगाजींना पापा मोटर्स मधे पुरस्कार मिळालेले आहेत. जिगाजी पुढे काय झालं ? सगळीकडे तुमच्या कवितेचा बोलबाला झाला असेल ना ? "
"आमीरजी... ...!" एक दीर्घ श्वास घेऊन जिगाजी थांबतो.
" माझ्या कवितेचं असं त्रिखंडात कौतुक होत होतं. माझ्या मित्राने माझ्या कविता ऐकल्या आणि त्याने एका संस्थळाचा मला पत्ता दिला. हे संस्थळ साहीत्याला वाहिलेलं आहे तेव्हा तू नक्की ये असं आग्रहाचं आमंत्रण दिलं. मी त्याप्रमाणे सदस्यत्व घेतलं आणि माझी पहिली कविता सादर केली. तिथं पोस्ट करणे हा शब्दप्रयोग वापरतात. "
आमीर डोळे बारीक करून पाहत असतो. डोळ्य़ांना घड्या पडल्यामुळे तो हसतोय असंच वाटत राहतं.
"कविता पोस्ट केल्यावर मी वाट पाहत बसलो. पण कुणीही तिकडे लक्ष दिले नाही. मला वाईट वाटलं. पुन्हा काही दिवसांनी आणखी एक कविता सादर केली. पण पुन्हा तोच अनुभव... असे खूप दिवस गेले. मग हळू हळू सवय झाली. "
" मी समजू शकतो जिगाजी. पापा मोटर्स मधे पुरस्कार मिळालेल्या कवीच्या कवितेकडे दुर्लक्ष झाल्यावर निराशा येणं स्वाभाविक आहे."
" आमीरजी तो माझा प्रॊब्लेम नाहीच. माझी समस्या वेगळीच आहे. एक दिवस मी कविता टाकून गेलो आणि चक्क शंभर प्रतिसाद मिळाले. मी आनंदाने उघडून पाहीलं तर.... "
आमीर हातात हात घेऊन दाबतो
" आमीरजी , पहिल्याच प्रतिसादात लिहीलं होतं कि २१ दिवस आता कुठलीही कविता टाकू नकोस. खूप वाचन कर. आणि ही कवितांची....... हगवण बंद कर !!"
" एक मिनिट. कवितांची.... काय म्हणालात ?"
"कवितांची हगवण. जुलाब सर..जुलाब "
" ओह नो ! माझा विश्वास बसत नाही. त्यांनी तुमच्या कवितेला ह...... असं नाव दिलं ? "
" आमीरजी ! याच कवितेला तर पुरस्कार मिळाला होता. मला तीव्र धक्का बसला. मी त्यांना सांगितलं कि या कवितेला पापा मोटर्समधे पुरस्कार मिळालाय "
" मग सॊरी वगैरे म्हणाले असतील, नाही का ?"
" हम्म. सॉरी ???? ते म्हणाले, कि त्या स्पर्धेत तुझ्यापेक्षा भयानक कवी कुठलाच नसेल. "
स्टेजवर भयाण शांतता पसरलेली असते. एक धुरकट आकृतीसारखी वाटणारी मुलगी डोळे पुसत असते. सर्व स्टेज उजळून निघालेले असले तरी ती मात्र अंधारात असते. बहुतेक ती कवयित्री असावी. आमीर आता दोन्ही हाताचे कोपरे गुडघ्यावर ठेवून हाताची मनगटे क्रॉस करून त्यात तोंड खुपसून बसलेला असतो. मग हात खाली करताना ओठाचा चंबू करून त्यातून जोराची हवा सोडून उफ्फ असा आवाज काढतो. आवाज काढताना त्याची मान नकारार्थी हलत राहते.
"हॉरीबल ..."
"यानंतरही मी एक कविता लिहीली. माझं जीवनविषयक तत्वज्ञान त्यात होतं."
"तुम्ही फिलॉसॉफर आहात ? "
"प्रत्येक कवी असतोच आमीरजी.."
"पुढे काय झालं जिगाजी ??" आमीर खांदे घुसळवत आणि संमतीदर्शक मान हलवत म्हणतो.
" ती कविता खरोखर सुंदर होती. मी चहा पिऊन आलो तर चाळीस प्रतिसाद आलेले होते. मी खूष झालो. कवितेचा धागा उघडून पाहतो तो काय... तिथं पुन्हा दंगल सुरू झालेली होती. "
"अच्छा ? कवितेवरून दंगल ? या वेळी काय म्हणत होते ते ?"
" त्यातला एक आयडी, सर्वश्री बाबा चिमटे भयंकर आहे. त्याने विचारले होते आलास का तू परत ! तुला सांगितलं ना २१ दिवस ब्रेक घे म्हणून ..आमीरजी ही पद्धत आहे का कवितेवर प्रतिसाद द्यायची ? मी काय त्यांच्या दारात भीक मागायला गेलो होतो का ?"
"बोलत रहा.."
" हे सगळं कमी म्हणून कि काय एकाने विचारलं कि ही कविता तुझी स्वत:ची आहे का ? तर आणखी एक म्हणाला कि नक्की त्याची स्वत:ची असेल. इतकी रद्दड कविता कुणीच चोरणे शक्य नाही. "
जिगाजीला रडू कोसळते. आमीर त्याला थोपटत राहतो. कुणीतरी पाण्याचा ग्लास आणतं.
"जिगाजी, पाणी घ्य़ा. लगता है ये बात आपके दिल पे लगी.. "
"आमीरजी .. हे पहा ! "
जिगाजी एक एक्सरे सारखं काहीतरी आमीर ला देतो. तो एक्स रेच असतो.
"एक्स रे ? कशाचा ?"
"आमीरजी माझ्या मनाचा एक्स रे आहे तो.."
"काही कळलं नाही. एक्स रे.. मन... कविता.... मला का दाखवताय हा एक्स रे ? आणि हे मन आहे कुठं या एक्सरेत ?"
"आमीरजी नीट पहा. ही ह्रुदयाकडून बुद्धीला जी तरल रेषा जातेय ना.. ती म्हणजे मन.."
"ओह ! मी पण माझा एक्स रे काढला होता. त्यात अशी रेषा का दिसत नाही ?"
" आमीरजी ! ती फक्त कवींच्या एक्सरेत दिसते !!"
"ओह ! ग्रेट "
’ इथं पहा आमीरजी, काचेला तडा जातो अगदी तशी , या इथे माझ्या मनाला चीर पडलीये "
"अरे हा यार.. इथं एक रेष दिसतीय पांढरी. अरे इथं तर एक कट आहे एक एक्स रे फिल्मला, ओह माय गॉड "
"आमीरजी त्या दिवसापासून माझ्या मनाचा कधीही आणि कुठेही एक्स रे काढला तरी एक्स रे फिल्म वर असाच छेद येतो. "
"उफ्फ.. खूप खोल घाव दिसतोय.."
"जिगाजी, आमच्या शुभेच्छा तुमच्याबरोबर आहेत. तुम्ही खचून न जाता पुन्हा नव्या उमेदीने कविता करा. दोस्तहो, पाहीलंत.. जो कवी आपल्या चेह-यावर हसू फुलवतो त्याच्या ह्रदयावर किती खोल घाव दिले गेलेत.. लाजेने मान खाली घालायला लागेल अशी गोष्ट आहे.
"दोस्तांनो.. मी त्या संस्थळाच्या प्रशासकांशी जिगाजींबद्दल बोलणार आहे. आमच्या रिसर्च चे आकडे सांगतात कि जिगाजींना एकवीस दिवसांची बंदी घातली होती पण आज एकवीस महीने झाले तरी ते आजवर त्या संस्थळावर फिरकले नाहीत. एका छोट्याशा ब्रेकनंतर भेटूच. कुठेही जाऊ नका.. "
"ब्रेकनंतर पुन्हा या शोमधे स्वागत.."
आपण पाहीलं एका पुरस्कार प्राप्त कवीची काय अवस्था झाली. दोस्तहो, या संस्थळावर हे काही एकमेव उदाहरण नाही. इथं असं वारंवार घडत असतं. एखादा नवीन कवी तावडीत सापडला नाही तर इथले लोक अस्वस्थ होत असतात. एखादं गरीब कोकरू लांडग्यांच्या तावडीत सापडावं तशी या संस्थळावर नवकवींची अवस्था होत असते.
" आपल्या बरोबर आहेत कवी निनावी. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करुयात !
निनावी या शो मध्ये आपलं स्वागत. मला एक सांगा, हेच नाव का घेतलंत ?"
" आमीरजी ! नावात काय बी नसतं. लोकांनी मला माज्या कवितेवरून वळखलं पाहीजे "
" क्या बात है ! इतके प्रगल्भ विचार असणा-या एका कवीशी बोलण्याची संधी मिळाली हे माझं भाग्य समजतो मी ."
" धन्यवाद "
" काय अनुभव आला तुम्हाला या संस्थळावर ? "
" आमीरजी. आधि मि माज्या कविता टाकायचो तिकडं कुनाचं लक्श नसायचं. पन जेवापासुन जिगाजीदादा तिथुन निघुन गेले तेवापासुन ते राकिस माज्या मागे लागले "
" राकिस ? म्हणजे ?"
" म्हनजे रावनाच्या सैन्यात नाहि का होते तसले "
" ओह ! राक्षस !! बोला बोला. योग्य शब्द आहे. काय केलं या राक्षसांनी तुम्हाला ? "
" आमीरजी आता मि यांचं सावज झालो. माज्या कवितेत काय लिव्हलंय हे कुनीच बघंना. फक्त सुध्धलेखनाला हसायला लागले "
" शुद्धलेखन म्हणायचंय का तुम्हाला ?"
" तेच ! "
" एक जन तर म्हनला कविता आडवी लिहि. दोन ओळित जागा सोडु नको आनि नीबंद स्पर्धेमधि पाठवुन दे. "
" च्च च्च च्च ! कवितेला निबंध म्हणतात ? व्हेरी बॅड !"
" एक म्हनला कि कविता लिवायचं बन्द करु नको. या लोकांना अद्दल घडव. तुजा कवितांचा मारा असाच चालू ठेव म्हनजे लोक नीजधामाला जातील "
" निजधाम.. पण कविता वाचून लोक तिथं कसे जातील ? असं कसं म्हणू शकतात लोक ?"
" आमीरजी मदमाश्यांचं पोळं उठल्यावर त्या माश्या कशा पिसाळत्यात ना, तसं जिगाजिदादा गेल्यावर तिथले आयडी पिसाळल्यात. त्यांच्या जीभंला नव कवींच कोवळं रगत लागलंय "
" भयंकर आहे हे सगळं. "
" येकदा तर लैच बेक्कार वाटलं. मी कवितेखाली माजा मोबाइल नंबर लिवायचो तर बाबा चिमटेनी तिथं लिवलं कि कवितेत आकडे लावनारा हा पैलाच कवी आहे. मला सगळं समजत होतं पन मी गप बसलो. कोन तोंड देनार या गावगुंडीला ?"
" मी म्हनलं कि हा माजा मोबाईल नंबर आहे तर म्हनला खरा आहे का ? मी म्हनलं कि लावुन बगा "
" मग ?"
" मग बराच वेळ फोन काहि आला नाहि. पन पोष्ट आली बाबा चिमटेची. मला म्हनला तुजा फोन लागत नाहि. गंडवतो का ? तर मी म्हनलं कि दादा पुन्यांदा ट्राय करा "
" आता या खेपंला एक मिस कॉल आला. मी म्हनलं मला एक फोन आला. मग एक नंबर लिवुन इचारलं का बाबा हा नंबर तुजाच का ?"
" तर म्हनला. म्हनजे खराच नंबर आहे. आनि लगेच धमकि दिलि कि या नंबर वर फोन करु नकोस "
" का ? असं का?"
" मी पन तेच इचारलं ना. तर म्हनतोय, कि आता माजा नंबर तुज्याकडं आला म्हनुन रात्रिच्याला कविता ऐकवशील तर लै वाइट परिनाम होतील "
" अरेरे ! असं म्हणाला ? धमकी ?"
" आमीरजी, दुसरा म्हनला, कि बाबा आता तुला तो सोडनार नाहि. तुला कविता ऐकवनारच. तर तो बाबा म्हनला कि हे बघ ते सीम कार्ड मी कॅन्सल केलय. आता त्या नंबरचा तुला काय फायदा नाहि. तो नंबर डिलिट कर "
"निनावी. आम्ही सर्व जण तुमच्याबरोबर आहोत. तुम्ही कविता लिहिणे सोडू नका ही माझी तुम्हाला विनंती आहे "
"दोस्तहो आताच आपन पाहीलं नव्याने कविता लिहू पाहणा-या कवी निनावि याम्चि काय अवस्था झाली ते. सीम कार्ड बदललं असं प्रतिसादात सांगणं म्हणजे त्याला इतका धसका बसला , धसका कशाचा तर कवितांचा असं त्याला दाखवायचं होतं. इतक्या थराला जाऊन लोक चेष्टा करु शकतात ? ती ही कुणाची ? जिगाजि, निनावी या सरस्वतीच्या उपासकांची ! समजावुन सांगितलं असतं तरी चाललं असतं पण पळवून लावायचं ? हे काय चाललंय ? निनावी म्हणतात त्याप्रमाणे मधमाशांचं उठलेलं पोळं आहे हे ! बापरे , मी पण मराठी शिकतोय. पण इथं कविता लिहायचं धाडस होईल का अशाने ? "
इथं घेतोय आपण एक ब्रेक !
**********************************************
" ब्रेकनंतर पुन्हा आपलं स्वागत आहे. दोस्तहो, नवकवींना काय ट्रीटमेंट मिळाली हे आपण दोन उदाहरणावरून पाहीलं. पण संस्थळावर यायच्या जरा आधीपासून कविता लिहीणा-या पण संस्थळावर नवीन असणा-या कवींना काय ट्रीटमेंट मिळते हे आता जाणून घेऊयात "
"आता आपण भेटणार आहोत एका कवयित्रीला. या मिनिशा "
खुर्चीत कुणीतरी येऊन बसतं. आमीर डोळयाला ताण देतो. खुर्चीत काहीतरी धूसर, धुरकटसं बसलेलं जरूर असतं मात्र त्याच वेळी तिथं अंधाराशिवाय कुणीच नाही असा एक विचित्र भास सर्वांना होत असतो. मात्र एक गोड आवाज कानावर पडतो..
"यामिनीशा..."
"काही म्हणालात ?"
"माझं नाव.. यामिनीशा " आमीरला धूसर आकारातून लाजल्याची भावना पोहोचते.
"यामिनीशा...सुंदर नाव आहे. जपानी नाव आहे का ? काय अर्थ होतो या नावाचा ? "
"यामीनिशा म्हणजे..... यामिनी आणि निशा! या दोन नावाचं जोडनाव आहे ते. नी हा उच्चार कॉमन असल्याने यामिनीशा ! "
" ओह.. यामिनी आणि निशा. म्हणजे रात्रच ना ? मी पण शिकतोय बरं का मराठी .. पण एकच नाव घेतलं असतं तर चाललं नसतं का ?"
" आमीरजी.. गालगागा "
"गालगागा ?? "
" वृत्तात बसतं ना म्हणून हे नाव घेतलं "
"ओहो.. मीटर !! तुमचं वागणं बोलणं सगळं वृत्तातच दिसतंय "
"इश्श्य ..!"
यावर काय बोलायचं हे आमीरला सुद्धा माहीत नसल्याने तो गोंधळलेल्या अवस्थेत बसून राहतो. दोन्ही हातांची बोटं एकमेकात गुंतवण्याचा खेळ काही सेकंद केल्यानंतर पुढच्या प्रश्नाची मनात जुळवाजुळव होते.
" तुम्ही पण त्याच संस्थळावर आहात ?"
"हो "
"तुम्हालाही असाच अनुभव आला ?"
"अगदी असा नाही आला ..पण "
"पण काय? जिगाजी म्हणतात तसं काही होत नाही तिथं असं म्हणायचंय का तुम्हाला ? आमचे आकडे सांगतात कि ८९.२७ टक्के नवकवी त्या संस्थळावरून धसका घेऊन बाहेर पडतात ते पुन्हा तिकडे फिरकत नाहीत. त्यातले ५३.९२ टक्के कवी पुन्हा कवितेच्या वाटेला जात नाहीत तर ११.४२ टक्के कवींना मानसोपचाराची गरज पडते. उरलेले कवी उमेद संपल्यामुळे आत्महत्या करतात "
" आमीरजी.. एक मिनिट "
" तुम्ही म्हणता ते अगदी खरं आहे. मला असं म्हणायचं होतं कि मला जिगाजींसारखा अनुभव आला नाही तर थोडा वेगळा अनुभव आला "
" ओह.. काय आहे तुमचा अनुभव ?"
" आमीरजी.. मी एक अंधारात राहणारी कवयित्री आहे. मला उजेडाची भीती वाटते. रात्र हीच माझा आधार. मी ना कुणाच्या अध्यात , ना मध्यात.. ! मी आपली गीतं लिहीत असते. काही गीतांचे अल्बमही निघाले पण त्या सोहळ्यालाही मी जाऊ शकले नाही. कारण मी अंधारातून बाहेर येऊच शकत नाही. "
व्हायोलीनचे सूर वाजत राहतात. कवयित्रीचा स्वर आता हळवा झालेला असतो.
"माझं दु:ख मी कविता, गझलेमधून मांडत असते. कुणाला माझा त्रास नसतो. असं असतानाही माझ्या गझलेची चेष्टा झाली.. खूप वाईट टिंगल टवाळी झाली. माझी गझल जर एखादी नवतरुणी असती तर तिने आत्महत्याच केली असती !! "
"यामिनीशाजी .."
"आमीरजी, माझ्या त्या त्या गझलेचं नाव होतं पाळलेली दोन मांजरे ! आजही माझी खूप आवडती गझल आहे ती.."
एक पॉझ घेऊन धुरकट आकृती थांबते. कदाचित गळ्यात आवंढा आलेला असावा.
" आमीरजी ते माझं बाळ आहे. सर्वांनी त्या बाळाचं कौतुक केलं होतं.. आणि एक दिवस.."
"एक दिवस माझ्या बाळाला कुणीतरी विद्रुप करून ठेवलं होत "
धुरकट आकृतीला रडू कोसळतं... आमीर उठून तिच्या खुर्चीमागे उभा राहतो. खांद्याचा अंदाज घेऊन तिला खांद्यावर थोपटत राहतो.
आमीरच्या स्पर्शाने असेल आकृती आता सावरते. आकृती आता त्याचा हात खांद्यावर दाबून धरत त्याला नाक पुसत राहते. आमीरच्या चेह-यावर कंट्रोल कंट्रोल असे भाव पसरतात. कसलेला अभिनेता असल्यानेच चेहरा वेडावाकडा होत नाही.
"तर, पाळलेली दोन मांजरे, हे माझ्या गझलेचं शीर्षक होतं. एक दिवस याच नावासारखं नाव असणारी गझल विडंबन म्हणून कुणीतरी पोस्ट केली होती.. आणि नाव दिलं होतं, वाळलेली दोन गाजरे !!"
" काय होतं काय त्या गझलेत ?"
कवयित्री एक कागद पुढे करते.
" आमीरजी प्लीज मनातल्या मनात वाचा. मी उच्चार देखील करू शकत नाही. मी नवीन होते. माझ्या गझलेचा संदर्भ देत यामिनीशा यांची माफी मागून असं साळसूदपणे लिहून कुणीतरी हा अगोचरपणा केला होता"
"यामिनीशाजी. हे खरंच भयंकर आहे ! मी डोळेच मिटून घेतले वाचताना ! आणि हे तुमच्याबरोबर घडलं ? विश्वास बसत नाही. "
".................................."
काही सेकंद शांततेत जातात. पण ही शांतता प्रेक्षकांच्या अंगावर येते.
"यामिनीशा जी, कोण आहेत हे लोक ?"
"आमीरजी.. हे एक टोळकं आहे. ते एकदा सुरू झाले कि सगळेच त्या दंगलीत उतरतात. आणि मग या भयंकर दंगलीत अनेक होतकरू साहीत्यिक उद्ध्वस्त होताना मी पाहीले आहेत "
"मग तुम्ही काय केलंत ?"
" मी काय करणार ? मी गप्पच बसले. "
" तुम्हाला आवाज उठवावा असं वाटलं नाही ?"
" आमीरजी, तुम्हाला माझी अडचण आधीच सांगितली. मला उजेडाची भिती वाटते. आवाज उठवायचा म्हटलं तरी मला उजेडातच यावं लागणार ना ? आज एमएसईबी कडून थोडासा अंधार सोबत आणल्यानं इथं मुला़खत देतेय.. नाहीतर इथंही येता आलं नसतं "
" या टोळक्याच्या प्रतापाबद्दल आणखी काही सांगू शकाल ? त्यांना साहीत्याबद्दल घृणा वाटते का ?"
" साहीत्याबद्दल घृणा ? आमीरजी.. त्यांच्यात चांगले कसलेले कवी आणि गझलकार पण आहेत "
आमीर भिवया उंचावून आणि दोन्ही ओठ दुमडून घेत आश्चर्याने पाहतो. त्याचे टपोरे डोळे विस्फारत जातात.
" माझी अडचण या लोकांनी चांगलीच ओळखली आणि एक दिवस बघते तर काय एका गटगमधे चक्क माझं नाव टाकून एक खोटा वृतांत टाकलेला होता. "
" गटग ?"
" सॉरी हं. काही काही लघुरुपं अशी तोंडातच बसलीत. गटग म्हणजे गेट टुगेदर "
आमीर मोठ्याने हसतो.
" या तुमच्या गटग कि काय त्यामधे नाव टाकण्याला तुमचा आक्षेप होता का ?"
" छे हो आक्षेप कसला ? मी गेलीच नव्हते त्या गटगला. ती खारीबावली गोरी कि सावळी हे सुद्धा मला माहीत नाही तर मी कशाला जाऊ तिथं ?"
" म्हणजे तुम्ही गेलाच नव्हता तरी ?"
" आमीरजी, कवितेत खुसपट काढता आलं नाही कि विडंबन आणि ते ही अपुरं वाटू लागलं कि असं गैरसमज पसरवणारं काही तरी लिखाण करायचं आणि त्याला विनोदी लेखन किंवा कै च्या कै असं नाव द्यायचं ही तिथली पद्धतच आहे "
" यू मीन मोडस ऑपरेंडी ?"
" हम्म. तेच ते "
" वर लिहीलं कि मी तिथं तुपकट पराठे खाल्ले. हे हे माझ्याबद्दल गैरसमज पसरवणारं आहे. तुम्ही बघताच आहात मी झिरो फिगर कशी मेंटेन केलीये ती. मी ते तसले पराठे खाईन तरी का ? "
" झिरो फिगर ना ? दिसतंच आहे , आय मीन काहीच दिसत नाहीये. फक्त अंधार ! पण तुमचे फोटो होते ना त्या गटग मधे ?"
" आमीरजी, तुमच्या लक्षात कसं नाही येत ? न जाताच माझं नाव टाकू शकतात तर फोटो कुठून तरी टाकायला किती वेळ लागतो ?"
" यामीनिशा जी, या व्यक्तीचं नाव सांगू शकाल ?" आमीर संतापाने लालबुंद होत विचारतो.
यामीनिशा एका कागदावर एक नाव लिहून देते. आमीर ते वाचतो मात्र.. हळू हळू त्याच्या चेह-यावरचा संताप नाहीसा होऊन त्याची जागा भय, आश्चर्य आणि गोंधळ या भावना घेतात. त्याला जोरदार धक्का बसलेला स्पष्ट दिसतो.
" नेटवर बसून सारखा किबोर्ड बडवत असते खरी.. काहीतरी लिहीत असते पण असं काही करत असेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं.." न राहवून आमीर बेसावधपणे स्वगत बोलून जातो खरा पण पॉवरफुल माईक मधे ते स्पष्ट ऐकू येतं.
" आमीरजी, काय पुटपुटताय ?"
" नाही काही नाही... यामीनिशा जी, तुम्हाला पूर्ण विश्वास आहे , या नावाबद्दल ?"
" शंकाच नाही. लिखीत स्वरूपात आहे..आणि याच व्यक्तीमुळं मी लिहायची बंद झाली आहे"
आमीर दोन्ही डोळे गच्च मिटून घेतो.
"आता पुन्हा तिसरं.....!"
यामीनिशाला काहीही कळत नाही. ती फक्त गोंधळून आमीरकडे बघत राहते.
"हे बघा यामीनिशा जी, माझी पत्नी... ती जर खरंच दोषी असेल तर विश्वास ठेवा, तुम्हाला न्याय मिळेल. मी मिळवून देईन. माझ्या प्रिय पत्नीला अटक झाली तरी चालेल पण मी कुणावर अन्याय होऊ देणार नाही "
" तुमची पत्नी ? काय बोलताय ? तुमच्या पत्नीवर कुठं आरोप केले मी ? त्यांचं नावही मी घेतलं नाही...! ओहो, नावावरून आलं लक्षात, आमीर जी गैरसमज होतोय.. याच नावाचा एक टोळभैरव आहे या संस्थळावर, त्याबद्दल बोलत होते मी "
आमीरच्या चेह-यावरचे भाव बदलत जातात. एका मोठ्या संकटातून सुटल्यासारखा तो हुश्श्य करतो आणि यो असं चित्कारतो. त्या आनंदाच्या भरात तो यामीनिशाला मिठी मारतो.
"इश्श्य ..!" "आमीरजी, हे काय ? सगळे पाहताहेत ना.. " हलकेच पुटपुटल्य़ासारखी धुरकट आकृती बोलते.
"ओह.. माफ करा. एकदम तणावाखालून बाहेर पडल्याने काहीच सुचलंच नाही आणि तुम्हाला मी किरण समजून मिठी मारली "
" माफी कसली मागता , किरण समजलात तरी हरकत नाही :). " आकृती कानात कुजबुजल्यासारखी बोलते.
आमीरला अचानक खोकल्याची उबळ येते.
"कट कट कट "
कुणीतरी पाणी घेऊन येतं.
"यामिनीशा जी, हे सर्व प्रकार खपवून कसे घेतले जातात ? प्रशासनाला का कळवत नाही ?"
" आमीरजी ! राउडी राठोड पाहीलाच असेल ना तुम्ही ? त्यातले लोक आणि पोलीस अधिकारी पण कसे हतबल होते पाहीलंत ना ?"
" पण कुणी तरी आवाज उठवायलाच हवा ना ? कुणीतरी यांना धडा शिकवायलाच हवा !"
" कुठल्याही मैदानात जेव्हां परिस्थिती प्रतिकूल असते तेव्हां राहुल द्रवीड सारखं जुळवून घेत टिकून राहणं हेच शहाणपणाचं असतं."
" भीती न बाळगता खेळणारे सेहवाग सारखे पण असतात यामिनीशीजी "
" हम्म... काही दिवसांपासून दिवस खरंच पालटलेत. या संस्थळाचा इतिहास जेव्हां लिहीला जाईल तेव्हां अर्धी पानं ज्यांच्यावर खर्ची पडतील ते शायर बेमिसाल जेव्हापासून इथे आलेत तेव्हापासून टोळभैरव दबकून असतात "
" शायर बेमिसाल ! ओह .. खूप मोठं नाव आहे. मी त्यांचा मोठा एसी आहे. हे जर त्या संस्थळावर असतील तर त्या संस्थळाचं भाग्यच म्हणायला हवं "
" तुम्ही ओळखता त्यांना ?"
"ओळखता काय ? आख्खं बॉलिवूड त्यांचं दिवाणं आहे. त्यांच्या नावाचा फॅन क्लब निघालेला आहे. रजनीकांत स्वतः त्या फॅन क्लबचा अध्यक्ष आहे. सलमानला तर त्यांचं नाव घेतलं तरी जबरदस्त कॉम्प्लेक्स वगैरे येतो "
" आमीरजी ! तेच या टोळभैरवांना धडा शिकवित आहेत "
" यामिनीशा जी तुमच्यावर झालेल्या अन्यायासंदर्भात आपण बोललात आणि संस्थळावर काय प्रकार चालतात याची माहीती दिल्याबद्दल मी आपले आभार मानतो. तुमच्या वर झालेला अन्याय दूर होईल आणि पुन्हा कुणावरही अशी पाळी येणार नाही याबद्दल मी जातीने यात लक्ष घालीन याबद्दल मी आपल्याला शब्द देतो. माझी तुम्हालाही विनंती आहे कि तुम्ही लिहायला सुरुवात करा. शुभेच्छा ! "
" पुन्हा भेटुयात "
" कधी ? कुठे ? " कुजबुजत्या आवाजातले प्रश्न कानावर आल्याबरोबर आमीर गडबडतो. झटकन कॅमे-याकडे पाहत पाहत तो घाईघाईने सटकतो..
"मित्रांनो, आपण घेतोय आता एक कमर्शियल ब्रेक. कुठेही जाऊ नका "
" ब्रेकनंतर पुन्हा स्वागत आहे आपले या शोमध्ये. मित्रांनो, यामिनीशा यांची कहाणी आपण ऐकली. इतकं सगळं होऊनही अन्याय सहन केल्यानेच अन्याय करणा-यांचं फावतं. लक्षात ठेवा मित्रांनो, अन्याय सहन करणे हा सगळ्यात मोठा गुन्हा आहे. माझ्याकडे एक जादूची छडी आहे ज्याच्याबद्दल मी आता सांगणार आहे. ती जादूची छडी आहे तुम्ही स्वतः !
तुम्ही नाही म्हणायला सुरूवात करा. मी हे सहन करणार नाही. मी हे चालू देणार नाही. प्रत्येकाने आज एकाच वेळी शपथ खाऊयात.. ही दादागिरी आम्ही सहन करणार नाही, आणि मग बघा चमत्कार ! खोटं वाटतंय ? या भेटू एका चमत्कारी (क नव्हे) पुरुषाला ! "
" दोस्तहो ! जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. द वन ऍण्ड ओन्ली बेमिसाल ! "
टाळ्यांचा प्रचंड कडकडाट होत राहतो.
"बेमिसालजी या शोमधे मी आमीरखान आपलं मनापासून स्वागत करतो. आज मी आणि हा माझा शो दोन्हीही धन्य झाले ! ओह.. माझा अजून विश्वास बसत नाही, मी साक्षात बेमिसाल यांच्यासमोर बसलोय. हे पहा माझ्या हातांवरचे केस.. उभे राहीलेत ! "
बेमिसाल रामायण मधल्या अरूण गोविल सारखे स्मित करत आमीरला बसायची खूण करतात.
" बेमिजी, या शो मधे तुम्हाला भेटण्यासाठी बॉलिवूड मधे येऊ घातलेली एक भावी अभिनेत्री खूपच उत्सुक आहे.आपन तिच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे दोन प्रेमाचे शब्द बोलावेत ही विनंती "
येऊ द्या या अर्थाची खूण होते आणि पडद्यावर राष्ट्रीय अल्पवस्त्रांकिता स्पर्धा विजेती कु. पूनम पांडे दिसू लागते. बेमिंना पाहून ती अक्षरशहा उड्या मारत असते.
" हाय पूनम ! कशा आहात ?"
" बेमिजी ! ओह.. मी स्वप्नात आहे बहुतेक "
" नाही हे स्वप्नं नाहि. तुम्ही आज खरच माझ्याशी बोलत आहात "
" अहो जाहो नका करू ना गडे !"
" मी सर्वांना अहो जाहोच करत असतो. "
" बेमिजी , माझे "ते" फोटो पाहीलेत का ?"
" नाही अजून. "
" नाही ई ई ई ई ???? शक्यच नाही !"
" या आयडीने पाहीलेत असं मी म्हणू शकणार नाही "
" मी आवडीने काढलेत ते फोटो तुमच्यासाठी"
" हो का ? मला तर फक्त कपडे काढले होते इतकंच माहीत आहे "
" पण तुमच्यासाठीच ना !! "
" पण आयपीएल मधे केकेआर जिंकली तर कपडे काढणार असंच डिक्लेअर केलं होतं ना ?"
" ऍक्चुअली, तुमचं नाव घेतलं तर तुमची बदनामी होईल असं मला आमीरने सुचवलं होतं. त्यापेक्षा, शाहरूखच्या केकेआर चं निमित्त कर असा सल्ला त्याने दिला आणि आशिर्वाद दिला ... ( लाजत लाजत ) निर्वस्त्रवती भव !" लाजण्याचा सराव नसल्याने ती आता केविलवाणी दिसत असते.
" नाव शाहरूखचं पण कारण मात्र तुमचं लक्ष माझ्याकडे वेधून घेणे हेच !! क्लिअर करते हं "
" अच्छा !म्हणजे विबासं म्हणा कि ! हम्म. आवडलं आपल्याला "
इकडे आमीर खान मात्र हा गौप्यस्फोट ऐकल्यापासून अस्वस्थ झालेला असतो. तो एडीटर कडे पाहत दोन बोटांनी कात्रीची खूण करत असतो. शाहरूखला जर हे कळलं तर आपली धडगत नाही हे त्याला चांगलंच माहीत असत. मनातल्या मनात पूनमचा उद्धार करतानाच चेह-यावर प्रोफेशनल हसू खेळवत तो कार्यक्रमाची सूत्र पुन्हा हातात घेतो.
" मित्रांनो आपण आताच पाहीलं बेमिजींची क्रेझ कशी सर्वत्र आहे. अगदी बॉलिवुडमधे पदार्पण करू पाहणा-या अभिनेत्रीं पासून ते रजनीकांतपर्यंत सर्वांचे ते मॅटीनी आयडॉल आहेत. बेमिंनी देखील आपल्या चाहत्यांना निराश केलं नाही हे ही आपण पाहीलं. आता आपण बेमींचा अनुभव जाणून घेऊयात.
" बेमीजी आपण इतके प्रसिद्ध साहीत्यिक असताना या संस्थळावर यावंसं का वाटलं ?"
" आमीरजी ! तुम्हाला माहीतच आहे लोक माझ्याबद्दल वाट्टेल ते बोलत असतात. मात्र मी कुणाबद्दल पूर्वग्रह ठेवत नाही. कुणाला लहान मोठा मानत नाही यावर माझ्या विरोधकांचीही सहमती आहे "
" एक मिनिट बेमिजी, तुम्हाला विरोधक आहेत हेच मला नवीन आहे "
बेमिसाल यावर खळखळून हसतात.
" आमीरजी तुम्हाला जिवंत आहेत असं म्हणायचंय बहुतेक ! असो. मी या संस्थळावर यायचं पहिलं कारण म्हणजे आधीच मी म्हटल्याप्रमाणे मी पूर्वग्रह ठेवत नाही. कुणाला लहान / मोठा मानत नाही.
मी इथे येण्याचं दुसरं कारण म्हणजे मुद्रित साहित्यविश्वात जरी मी प्रस्थापित साहीत्यिक असलो तरी उद्याचं साहीत्य हे ईसाहीत्य असणार आहे याची मला कल्पना आहे. म्हणूनच मी माझ्या एका मैत्रिणीच्या सांगण्यावरून आंतरजालावर आलो "
" मैत्रिणीच्या ! क्या बात है ! काय नाव आहे तुमच्या या मैत्रिणीचं ?"
" लक्षात नाही ! "
आमीरचा गोंधळ उडतो.
" मी समजलो नाही. लक्षात नाही असं कसं ?"
" आमीरजी इतक्या मैत्रिणी आहेत कि सगळ्यांची नावं लक्षात राहतच नाहीत "
" अरे, कमाल आहे, मैत्रिणींना तुम्ही विसरता कि काय ?
" आमीरजी, नावं विसरतो म्हटलं मी. मैत्रीण काय नावावरूनच थोडी लक्षात राहते ?"
या उत्तरावर आमीर पुन्हा एकदा बुचकळ्यात पडतो.
" तर या संस्थळावर जेव्हां मी आलो तेव्हां इथल्या साहीत्य़ाचा दर्जा अत्यंत सुमार होता."
" हे कारण असेल का नवीन साहीत्यिकांना पळवून लावायचं ?"
" हे एक कारण असू शकेल. दुसरं कारण म्हणजे कंपूशाही. इथे असलेले गप्पांचे धागे याला कारणीभूत आहेत हे माझं स्पष्ट मत आहे "
" ओह ! बराच अभ्यास दिसतोय तुमचा. तुम्हालाही पळवून लावायचे प्रयत्न झाले असतील ना ?"
" कुणाची टाप आहे ? जेव्हां मी माझ्या गझला कविता आणि कथा पोस्टू लागलो तेव्हां दर्जा म्हणजे काय हे त्या संस्थळाला कळालं. "
" मग तुम्ही हिट्ट झाला असेल इथेही ?"
" नाही. एकही प्रतिसाद नव्हता "
" काय सांगता ? असंभव ! "
" खरं तेच सांगतोय "
" का बरं असं ? मी एक वेळ नव्याने लिहीणा-यांचं समजू शकतो. पण तुम्ही तर प्रस्थापित साहीत्यिक होतात ना ?
" आमीर, मी म्हटलं ना कंपूशाही !"
" ते काय असतं ?"
यावर बेमिजी पुन्हा खळाळून हसतात. त्यांच्य़ा आवडीच्या विषयावर कुणी काही विचारलं कि त्यांना हसू येतंच...
" आमीरजी कंपूशाही म्हणजे कंपू बनवायचे आणि आपल्यातच प्रतिसाद द्यायचे. ज्याचा कंपू मोठा त्याला काहीही लिहीलं तरी शंभरेक प्रतिसाद सहज मिळतात. माझा असला कुठलाही कंपू नव्हता "
" तुम्हाला मग वाइट वाटलं असेल ना?"
" वाइट कशासाठी ? मी सर्वांना फाट्यावर मारलं... "
" म्हणजे ? तुम्ही अॅक्शन पण करता ?"
" फाट्यावर मारणे समजायला मराठी म्हणूनच जन्म घ्यावा लागतो. मी माझे चाहते इथं बोलावून घेतले. त्यामुळे माझ्या कथांना आरामात पन्नास पन्नास प्रतिसाद मिळू लागले. प्रतिसादांसाठी लिहायचं नाहि हे ठरवलं तरी ज्याला प्रतिसाद जास्त मिळतात त्याची दखल घ्यावीच लागते हे कटु सत्य आहे इथलं "
" ओहो.. म्हणजे आमच्या सिनेसृष्टीसारखं. चांगले सिनेमे बनवून चालत नाही. सिनेमे चालले तरच जग सलाम करतं ?"
"आमीरजी. इथलं बॉक्स ऑफीस म्हणजे मिळालेले प्रतिसाद !"
" या बॉक्स ऑफीस वर कुणा एकाची मक्तेदारी नाही हे दाखवण्यासाठीच मी यश मिळवीत गेलो आणि मग संपूर्ण संस्थळावर माझी दखल घेण्यात येऊ लागली. चमत्काराशिवाय नमस्कार नाही."
" लाख पते कि बात कही बेमिजी ! " आमीर नकळत हिंदीत बोलून जातो.
" पण तरीही इथले प्रस्थापित आयडी माझ्या साहीत्याकडे पाठ फिरवूनच होते. मी कधी त्यांना वाचायचा आग्रह केला नाही. पण कधी कधी त्यांचे खवचट प्रतिसाद यायचे "
" मग तुम्ही रागावत असाल ना ?"
बेमिसाल धूसर आकॄतीकडे रोखून पाहत " मी एक प्रेमळ मनुष्य आहे. माझा कुणावरच राग नसतो. तसा त्यांच्यावर ही मी कधी राग धरला नाही. माझा राग सिस्टीम आणि प्रवृत्ती यांच्या विरोधात असतो."
" इथल्या लोकांची टेस्ट बदलवणं गरजेचं आहे हे माझ्या ध्यानात आलं. त्यासाठी त्यांच्या विचारांत अमूलाग्र बदल होणं गरजेचं होतं. म्हणुनच जेव्हां जेव्हां खोडसाळ प्रतिसाद आले तेव्हां मी दुर्लक्ष केलं पण माझे चाहते त्यांना चोख प्रत्त्युत्तर देऊ लागले. मी त्यांनाही कधी रोखलं नाही. "
" मग ?"
" मग काय ! नाठाळाचे माथी देऊया काठी या न्यायाने सर्वांना माझ्या चाहत्यांनी झोडून काढल्यावर सगळे वठणीवर आले. या संस्थळाला आज जर काहि चांगले दिवस आले असतील तर ती माझी २४ X ७ कसून केलेली मेहनत आहे. मी जाहीरपणे कंपूशाहीचा निषेध केला. या कंपूशी एकट्याने लढलो. चर्चांच्या धाग्यावर जाऊन प्रस्थापित मतांविरुद्ध मतं मांडली. ती मतं चूक कि बरोबर याची कधीच फिकीर केली नाही. गप्पांच्या धाग्यावर जाऊन साहीत्याकडे दुर्लक्ष करून गप्पा मारण्याच्या सवयींचा जाहीर निषेध केला. लवकरच या सर्व गप्पांच्या धाग्यांचा ताबा माझ्या चाहत्यांनी घेतला आणि हळू हळू प्रत्येक क्षेत्रात मी किंवा माझे चाहते शिरकाव करू लागले."
" यातून काय साध्य केलंत ?"
" यातून कंपूशाही उध्वस्त करण्यात यश आलं. कंपुंचा विळखा पडलेले बाफ आणि विभाग माझ्या धडक कारवाईमुळे मोकळा श्वास घेऊ लागले."
" हे एकहाती युद्ध चालू असतानाच असहाय्य नवकवींनाही मी आधार दिला. ज्याप्रमाणे चर्चांमधे मी प्रत्येक आयडीला झोडून काढू लागलो तसंच नवकवींना सतावणा-यांनाही झोडून काढू लागलो "
आमीर उठून उभा राहत टाळ्या वाजवतो...त्याबरोबर सेटवर टाळ्यांचा कडकडाट होतो.
" हे तर एक अत्यंत महान काम केलंत बेमिजी तुम्ही ! पण ज्या प्रकारांविरुद्ध तुम्ही आवाज उठवलात त्यात तुमचे चाहते तर सहभागी झाले नाहीत ना ? "
" आमीरजी, हाताची पाचही बोटं सारखी नसतात. काही काही चाहते जरूर नवकवींना त्रास द्यायचे. पण मी तिथे ताबडतोब पोहोचून त्यांना जाहीर समज देऊ लागलो. मी स्वत:च त्यांची जाहीर निर्भत्सना केल्याने बेमिजी आपल्या चाहत्यांनाही सोडत नाहीत हा संदेश सर्वत्र गेला. लोक मला दबून राहू लागले आणि लवकरच या संस्थळाचं रुपांतर एका सुसंस्कृत साहीत्यिक कट्ट्यात झालं.."
" बेमिसालजी ! माझा सलाम कबूल करा या कामासाठी. याचं सर्व श्रेय तुम्हालाच !"
" मी एक निमित्त आहे आमीरजी ! अत्याचार वाढले कि देवही अवतार घेतोच "
" खरय अगदी ! दोस्तहो, या कामाचं महत्व तुमच्या लक्षात आलं नसेल अजून. त्याबद्दल आता बोलूयात आपण ! पण बेमिजी हे अत्यंत व्यस्त असल्याने आणि त्यांना एक लेख पोस्टण्यासाठी लवकर जायचे असल्याने आपण आता इथेच थांबूयात. पण ज्या पद्धतीने त्यांनी एकहाती सिस्टीम बदलली त्याप्रमाणे प्रत्येक क्षेत्रात एकेक बेमिजी तयार झाले तर कुठल्याही आमीरखानला सत्यमेव जयते ही मालिका काढायची गरज पडणार नाही (टाळ्या). आतापर्यंतच्या तेरा भागात केवळ समस्या आहेत हेच मला दाखवता आलं. पण या विशेष भागात एक नवा आयडॉल देशापुढे उभा राहीला आहे. मी युवकांना आवाहन करतो कि तुम्ही ज्या कुठल्या क्षेत्रात असाल तिथे बेमिजींपासून प्रेरणा घेत तुम्ही स्वत: एक बेमिजी बनण्याचा प्रयत्न करा हेच मला सांगायचं होतं . (पुन्हा एकदा जोरदार टाळ्या)"
" खाली स्क्रीनवर जो मोबाईल क्रमांक दिसतोय तो बेमिजींचा आहे. त्यांचा संघर्ष अजून संपलेला नाही. त्यांच्या कार्यात आपला सहभाग नोंदवण्यासाठी तुम्ही फक्त एक एसएमएस करू शकता. ही रक्कम बेमींच्या क्रमश: या संस्थेला देण्यात येईल. आणि अर्थातच जितकी रक्कम जमा होईल त्या रकमेत तितक्याच रकमेची भर श्री संजय बिल्लेवाले यांची संस्था रिवाइंड फाऊंडेशनतर्फे घालण्यात येईल.
थ्री चियर्स फॉर बेमिसाल !
तर दोस्तहो ! आपण पाहील्याप्रमाणे आता त्या संस्थळावरची परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे. म्हणूनच मी या शोद्वारे त्या तमाम साहीत्यिकांना परतण्याचं आवाहन करतो जे हाय खाऊन निघून गेले, ज्यांनी या संस्थळाचा धसका घेतला किंवा ज्यांनी लिहायचं बंद केलं. आता त्यांनी परतावं. इथं बेमिजी आहेत, क्रमश: आहे आणि रिवाइंड देखील आहे. इथे मी आमीर खान आपली सर्वांची छोट्या पडद्यावरून रजा घेतो. जय हिंद ! जय भारत ! सत्यमेव जयते ! "
सेटवरच्या एका कोप-यात गाणं सुरू होतं.
या चिमण्यांनो परत फिरा रे !!
गीताच्या सुरावटींसोबत सगळे ताल धरत असतानाच नावं येत राहतात आणि सरतेशेवटी एक बोर्ड पडद्यावर झळकतो..
(समाप्त)
- Kiran
जगाला ओरडून सांगा आम्ही हलकेच
जगाला ओरडून सांगा आम्ही हलकेच घेत आहोत
( एक स्मायली दुरुस्त केली फक्त.. बाकि नो चेंज )
क्या बात है किरण... लै झ्याक
क्या बात है किरण... लै झ्याक जमलय बघ
ही रक्कम बेमींच्या क्रमश: या संस्थेला देण्यात येईल>>>
ध मा ल.. ते पापा मोटर्स
ध मा ल..
ते पापा मोटर्स वाचल्या वाचल्याच सगळा उलगडा झाला
मस्त
मस्त मस्त.......................... हा शो प्रसारित झालाच पाहिजे
मस्तच
मस्तच
(No subject)
(No subject)
Kiranya, kahar ahes.
Kiranya, kahar ahes. Chimanyana laich miss karat ahes as distay
खासच आहे!
खासच आहे!
ए अरे काये हे कहर आहेस अगदी
ए अरे काये हे


कहर आहेस अगदी
..... पण चिमण्या परत फिरणार
..... पण चिमण्या परत फिरणार या कल्पनेनं घाबरायला होतंय.
आता या पेशल भागावर लवकर खलबत
आता या पेशल भागावर लवकर खलबत करण्यासाठी सत्यमेव जयते चे मायबोली करस्पोंडन्ट "श्री स्वानंदरात्री" यांना विनंती की त्यांनी लवकरच एक व्यास्पीठ उपलब्ध करुन द्यावे.
खतरनाक. बाकी कवितांच्या बीबी
खतरनाक.
बाकी कवितांच्या बीबी वर मी फिरकतही नसल्याने कवितांचे संदर्भ कळाले नाहीत पण त्याने अडलं नाहीच.
(No subject)
(No subject)
धमाल !
धमाल !
लय भारी!!
लय भारी!!
भारीये
सह्ही मामी...त्यांना घरटी
सह्ही

मामी...त्यांना घरटी बांधुन द्यायला आता अनेक उपक्रम आहेत
अत्याचार वाढले कि देवही अवतार
अत्याचार वाढले कि देवही अवतार घेतोच >>>>>
पहिल्या वेळी निनावी पर्यंतच
पहिल्या वेळी निनावी पर्यंतच वाचू शकलो, हहपुवा
आता उरलेलं वाचलं
अफाट
मित्रांनो.. हलकंच
मित्रांनो..
हलकंच घेतल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार
(No subject)
कल्पनाशक्तीला दाद केबीसीमध्ये
कल्पनाशक्तीला दाद
केबीसीमध्ये मायबोलीकर असा एक एपिसोड होऊन जाऊदे आता
(No subject)
एकदाही हसू आलं नाही. विनोदी
एकदाही हसू आलं नाही. विनोदी मधेच टाकायचं होतं का ?
कहर....
कहर....
ताठर बाहुला, हसण्यासाठी थोडी
ताठर बाहुला, हसण्यासाठी थोडी सैल आणि ऐसपैस बसावे लागते

अहो बाहुलेबुवा... त्यासाठी
अहो बाहुलेबुवा... त्यासाठी जरा जुनं व्हा... कळेल हो हळूहळू...
अरे परवाच ट्रेनमधे वाचलं हे
अरे परवाच ट्रेनमधे वाचलं हे आणि भरगर्दीत एकटाच वेड्यासारखा हसत होतो. (ते बहुधा माझं नैसर्गिक रुप असावं, कारण कुणीही ढुंकूनही बघीतलं नाही ती गोष्ट वेगळी). खरंतर काही संदर्भ मध्यंतरी बराच काळ मा.बो. पासून दुर असल्याने समजले नाहीत. तरीही हसू मात्र आलंच.
Pages