तुम्ही जेथे असाल तेथे देव तुम्हाला आनंदाने आणि सुखाने ठेवो..!!!

Submitted by वैभववैभव on 28 April, 2012 - 15:50

९ वी ची परीक्षा संपली होती. उन्हाळाच्यी सुट्टी लागली होती. पण हि सुट्टी नेहमी प्रकारची नसणार होती. कारण म्हणजे, पुण्याला पी.जोग क्लास्सेस मध्ये १० वी तयारीच्या समर क्लास्सेस मध्ये प्रवेश घेतला होता. १९९१ मध्ये आयुष्यात पाहिलांद्या उन्हाळाच्यी सुट्टी कुठेतरी दूर...... अनोळख्या ठिकाणी घालवावी लागणार होती. इयत्ता ८ आणि ९ मध्ये NCC च्या १० दिवसांसाठी कॅम्प मध्ये राहिलो होतो. तेथे मात्र आपले मित्र आणि शिक्षक होते. पुण्यात मात्र २ महिन्याच्या वास्तवात मात्र, आपले कोणीच मित्र, शिक्षक, नातेवाईक आपल्या बरोबर नसणार होते. १० च्या परिक्षेच महत्व मनावर बिंबवल्या मूळे, जायचं आणि एकट रहायचं ठरवलं.

पौड रोड, कोथरूड येथे क्लास होता. क्लास जवळच्या एका भाडेकरू इमारती वजा वसतीगृहा वर राहण्याची सोय झाली होती. अमृततुल्य इमारतीच होते. नागपूर, अकोला, कोल्हापूर, उरुळी कांचन, नगर वगैरे येथून आलेल्या मुलांची ओळख झाली. मेस साठी दशभुजा गणपती जवळच्या एका हॉटेल मध्ये सोय झाली. क्लास नियमित पणे सुरु झाला. एक एकदम वेगळ्या अनुभवला सामोरे जात होतो, म्हणजे १ वर्षाचा अभ्यास २ महिन्यातच संपवून टाकायचा, नवीन मित्रांच्या नवीन तऱ्हा , क्रीम रोल आणि अमृततुल्यातला वाफाळलेला मस्त चहा, रस्त्या वरची "वाहतूक". सर्व काही नवीन. गाडी हळू हळू रुळली होती.

२२ मे च्या सकाळी नेहमी प्रमाणे क्लासला जायला निघालो तर जाणवलं कि आज काहीतरी वेगळे आहे. आदल्या दिवशी रात्री श्री राजीव गांधी यांची हत्या झाली होती. वत्रमान पत्र विकत घ्यायचे तर त्या दिवशी प्रत्येकाची किंमत एकदम ५ रुपये. सगळी दुकाने बंद.

क्लास मात्र चालू होता. सकाळचे तास संपले आणि दुपार झाली. कडाडून भूक लागली होती. सकाळ पासून काहीच खाल्ले नव्हते कारण अमृततुल्य बंद होते. काय करायचे माहित नव्हते. होस्टेल कडे जायला निघालो. वाटेत क्लासच्या शिपायाने सांगितले कि “वैभव ,२ माणसे तुला शोधात आहे”. विचारात पडलो. आपले इथे कोणीच नातेवाईक नाही आणि नवीन मित्रांशिवाय आपण कोणालाच ओळखत नाही. मग कोण आपल्याला शोधतंय!

तेवढ्यात ती २ माणसे पुन्हा तेथे आली. ते तर आपण ज्या हॉटेल मध्ये मेस लावली होती, त्याचे ते मालक आणि नोकर. क्षणभर मी चकित झालो कारण आज सगळीकडे शुकशुकाट होता आणि सगळी दुकान बंद होती. आम्ही तिघे हॉटेल कडे गेलो आणि बघितलं तर दरवाजा अर्धवट उघडा होता. आत इतर मुले जेवत होती आणि मालकाने सांगितले, " जा जेऊन घे, मला माहित होते कि तुम्हाला वाटल असेल आज हॉटेल, दुकान बंद असतील. उपाशी पोटी तुम्ही परगावची लहान मुले कसे राहणार. रात्री सुद्धा मेस सुरु असेल".

खूप वर्ष झाली या गोष्टीला. पुन्हा पुन्हा मनात विचार येतो कि हा माणूस आपल्याला शोधात क्लास पर्यंत आला, आपल्या साठी थांबला, जोखीम घेऊन सर्व मुलांला जेवायला दिले. खर तर आपल्याला बोलावले नसते तर त्यांचे काहीच बिघडले नसते. प्रत्यक्षात फायदाच झाला असता. मेस चे महिन्याचे सर्व पैसे आधीच दिले होते आणि बुडालेल्या दिवसांचे पैशे मागण्याचा प्रश्नच नव्हता.

खूप वर्ष झाली पुणे सोडून. पण रोज वाटत कि त्या हॉटेल चा पत्ता शोधावा. कसा शोधणार कारण नाव विसरलो आहे! मालकांना भेटावे. कस ओळखाव? कारण चेहरा विसरलो आहे! बर भेट झालीच तर, ते मला ओळखतील का? तो प्रसंग त्यांच्या लक्षात असेल का ? सांगवस वाटत कि आपण केलेली मदत आजून मी विसरलेलो नाही आणि आपल्याला काही तरी 'भेट' द्यावीशी वाटते.

मोठा झालो.बेंगलोर मध्ये एका कंपनी मध्ये कामाला लागलो. LIC चा हफ्ता भरायचा होता. माहिती काढली कि ऑफिस कोरमंगला या परिसरात आहे. पत्ता घेतला आणि निघालो. शनिवार दुपारची वेळ. पत्ता सापडत नव्हता. एका ठिकाणी थांबलो आणि एका मुलाला ( ११ किंवा १२ त असावा) इंग्लिश आणि हिंदी मध्ये पत्ता विचारण्याचा प्रयत्न केला. त्याला LIC आणि Address बहुतेक कळले असावे.खुणेनेच सांगितले "Follow Me". निघालो त्याच्याबरोबर. नक्कीच त्याचे LIC मध्ये त्याचे काम असणार होते. ५ ते १० मिनिटे झाली. आमच्या मोडक्या तोडक्या हिंदी मध्ये गप्पा चालू होत्या. त्या दुपारच्या उन्हात चालायचा जाम वैताग आला होता. शेवटी ऑफिस सापडलं. बघितलं तर तो मुलगा चक्क तसेच माग फिरला आणि जायला निघाला. त्याला विचारलं तर त्याच ऑफिस मध्ये काहीच काम नव्हत तर केवळ मी या भागात नवीन आहे आणि मला मदत करण्या साठी तो या रणरणत्या उन्हात माझ्या बरोबर आला होता. का मदत केली त्याने माझी? तो जेव्हा परत जाण्या साठी वळला तेव्हा, माझं "Thank You!" म्हणण्याची वाट पण बघितली नव्हती! त्याला थांबवले आणि त्याचे आभार मानले. त्याने फक्त स्मित हास्य केले.

कुठे असेल आज हा मुलगा? काय करत आहे? त्याला माहित असेल का त्याने कधी तरी मला मदत केली होती आणि आज पर्यंत मला केलेली मदत मी विसरलो नाहीयेय? सगळ्या प्रश्नांची उत्तरे "माहित नाही"

काही वर्षा पूर्वी Chile देशामध्ये खाण कोसळली आणि ३३ माणस ६८ दिवस त्या मध्ये खाणी मध्ये अडकून होती. Luis Urzua या शिफ्ट सुपरवायजर ने परिस्थितीचा ताबा घेतला आणि पहिल्या १७ दिवसात जेव्हा जगाशी संबंध नव्ह्ता, जगू किंवा मरू हे माहित नव्हत तेव्हा सहकार्यांना धीर दिला, शिस्त लावली. जेणेकरून त्यांना वाटाव कि हि रोजचीच शिफ्ट आहे. जेव्हा खाणी तून निघण्याची वेळ आली तेव्हा तो सर्वात शेवटी वर आला. आपल्या सर्व सहकार्यांना सुखरूप, सही-सलामत वाचवल्या नंतरच तो खाणी मधून बाहेर आला.

आणखी अजुक एक उदाहरण म्हणजे Captain "Sully" Sullenberger. न्यूयॉर्क शहरा वरून विमान मार्गक्रमण करत असतान, पक्ष्यांची धडक लागून विमानाची दोन्ही इंजिन्स निकामी झाली. तेव्हा कॅप्टन Sully यांनी विमानाचा ताबा आपल्या कढे घेतला आणि विमान हडसन नदी वर सुरळीतपणे आणले. सर्व प्रवासी बाहेर गेल्या नंतर, स्वतः दोन वेळा प्रवासी कॅबीन चेक केली आणि सर्वात शेवटी बाहेर आले.

कोलकोता इथे हॉस्पिटल मधे लागलेल्या आगीत दोन नर्सेने, रेम्या आणि विनीथा, पेशंटला वाचवण्यासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली. या बलिदानाची तुलना कोणत्याही गोष्टीशी होऊ शकत नाही.

अशी हि माणस. काही ओळखीची आणि काही विसरलेली. मला अस वाटत कि हि माणसं "सेल्फलेस" Attitude घेऊन जन्माला आली आहे.

तर बंगलोरच्या कंपनीत आम्ही Global Support Division मधे होतो. कधी कोणत्या देशाचा प्रोब्लेम तुमच्या कडे ( Q मधे ) येयील याचा नेम नसायचा. एकदा असाच एक प्रोब्लेम सोडवला आणि confirmation साठी फोन केला. देश आठवत आही, पण Italy किंवा Austria असावा. पलीकडच्या माणसाने सांगितले " मी तुला ओळखतो, ३ महिन्यापूर्वी तू माझ्या एक प्रोब्लेम वर काम केले होते.Nice to meet you again!" मग आम्ही फॉर्मल गप्पा सुरु केल्या, कसा आहे तुझा देश, किती पगार मिळतो? खर तर खूप थकून जायचो. कधी कधी शनिवार, रविवार सलग काम करायला लागायचं.बऱ्याच वेळेला Severity 1 (भडकलेले) प्रोब्लेम दोन दोन,तीन तीन दिवस डोक आउट करून टाकायचे. पण त्या एका फोन नंतर माझा माझ्या कामा कडे बघण्याचा दृष्टीकोनाच बदलला.

मग एके दिवशी असाच साक्षात्कार (enlightening,epiphany काय म्हणतात ते) झाला. "Unintended Positive Consequences".

आपण जे करतो त्याचा मला काय मोबदला मिळेल? कोणी माझ्या कामाची तारीफ करेल का? माझा या गोष्टीत काय फायदा? माझे मित्र, नातेवाईक, सहकारी मी केलेली मदत लक्षात ठेवतील का? या प्रश्नांचा अजिबात विचार करायचा नाही. एकच आशा ठेवायची कि माझ्या कामाचे कोठेतरी, कधीतरी "Unintended Positive Consequences" असतील.

जेव्हा जेव्हा मना मधे विविध कारणांमुळे निराशा दाटते, तेव्हा हि सर्व माणसे माझ्या समोर येतात आणि नकळत पणे मी मनातल जाळ साफ करतो आणि स्वतःला सांगतो " देवाने तुला जे काही दिले आहे....त्याचा उपयोग कर, काम कर...तुला माहिती असेन किंवा नसेन, तू असेल किंवा नसेल...तुझे काम नक्कीच कोणाला तरी उपयोगी पडेल ..प्रेरणा देतील.."

ह्या सर्व माणसांनी मला जी प्रेरणा दिली, प्रकाश दाखवला,त्यांचे आभार मी कसे मानू? मला माहित नाही कि माझी पात्रता आहे कि नाही? मला अधिकार आहे कि नाही ? मी जे देणार आहे त्याची किंमत काय ? पण शेवटी एकच म्हणेल " तुम्ही जेथे असाल तेथे देव तुम्हाला आनंदाने आणि सुखाने ठेवो!"

गुलमोहर: 

अतिशय प्रामाणिक भावनेतून उतरेलं स्वच्छ सहज लेखन... आवडलं, वैभव.
दामोदरसुत म्हणतायत ते खरच <<म्हणजे आशावादी दृष्टिकोण ठेवून आत्ता या घटकेला निष्काम कर्मयोग करायचा!>>

मस्त लेख.. >अतिशय प्रामाणिक भावनेतून उतरेलं स्वच्छ सहज लेख>> अनुमोदन.

मलाही असाच एक अनुभव आला होता. काही कामानिमित्त जात असताना माझ्या गाडीचं चाक पंक्चर झालं. आता कामाला तर उशीर होणारच होता पण करणार काय.. वैतागून मी गाडी रस्त्याच्या बाजूला घेतली आणि शर्टाच्या बाह्या वर करत 'स्टेपनी' काढायला लागलो. तेवढ्यात एक ट्रक येऊन थांबला आणि दोन जण उतरले. म्हणाले, "Looks like you need some help". आणि लगेच त्यातल्या एकानी त्यांच्या गाडीतून जॅक काढला. त्यांचा 'mobile repair truck' होता म्हणजे 'फिरते दुरुस्ती केंद्र'! बर्‍याचदा लोक अशी मदत करतात आणि नंतर काहीच्या काही पैसे मागतात. म्हणून मी नको नको म्हणत होतो तर ते म्हणाले, "आमच्याकडे जास्त चांगली आयुध आहेत. आणि आम्ही हे रोज करतो. तुला लागेल त्याच्या २५% वेळेत आणि श्रमात आम्ही हे करू". आणि खरच बघता बघता त्यांनी त्यांच्याकडचा न्युमॅटिक पंप चालू केला तो जॅकला लावून गाडी वर उचलली आणि चाक बदलल. पुढच्या ५ मिनिटात सगळं आवरून पण टाकलं. मी त्यांना पैसे विचारले तर म्हणाले, "काही नको. आम्ही जशी तुला मदत केली तशी तू कधीतरी एखाद्या गरजूला मदत कर" आणि मी पुढे काही बोलायच्या आत ते गेले सुद्धा. मला त्यांची नावं माहिती नाहीत आणि परत ते कधी भेटले तर मी त्यांना ओळखणारही नाही पण त्यांची मदत मी कधीच विसरणार नाही. त्यानंतर जमेल तेव्हा मी आजूबाजूच्यांना मदत करायचा प्रयत्न करतो.
परवाच कोर्टात गेलो होतो. तिथे तासाभराचं काम असलं तरी दिवसभराचं पार्किंग तिकिट घ्यावं लागतं. माझं काम अर्ध्या तासात झालं आणि मी निघालो तेव्हा एक आजी त्यांची गाडी लावत होत्या. मी त्यांना माझ्या जागी गाडी लावायला सांगून माझं तिकिट दिलं. म्हटलं "तुम्ही पैसे नका घालवू". आजी भलत्याच खूष झाल्या. म्हणाल्या, "You are a good man. Your good Karma will come back to you." गोर्‍या म्हातारीकडून आपल्या 'कर्मा'बद्दल ऐकून खूप गंमत वाटली!

Pages