शब्द....

Submitted by बागेश्री on 20 December, 2011 - 12:35

सुटीची मस्त सकाळ म्हटलं की हातात वाफाळत्या चहाचा कप आणि समोर वृत्तपत्र, ठरलेलंच!!
"घरकाम होत राहतील आरामात" कसली घाई नाही, गडबड नाही हा आल्हाददायी विचार करत पहिला घोट घेतला अमृततुल्याचा- चहाची चष्म्यावर आलेली वाफ साफ करत, वृत्तपत्रात घातलं डोकं...

'पुंजके' नावाचा स्तंभलेख वाचताना,
सुधीर मोघे म्हणतात- येथे रेंगाळले, ओळी सुंदरच होत्या,
"शब्दांना नसते दु:ख, शब्दांना सुखही नसते,
वाहतात जे ओझे, ते तुमचे आमचे असते!"

वाचन खुंटलं इथेच... खरंच शब्द म्हणजे नक्की काय, नितळ पाणी? भावनांचा रंग मिसळला की तेच भाव व्यक्त करणारे! ते स्वतःच खूप काही बोलतात, आपण व्यक्त होताना त्यांचा अजून खुबीने वापर केला की त्यांचं सौंदर्य अजूनच खुलतं- जणू एक एक शब्द म्हणजे दागिना, तो व्यक्त होणार्याु सौंदर्यवतीने चढवावा अलवार, अंग- प्रत्यंगाचं सौंदर्य लाखपटीने नाही वाढलं तर बोलावं!!!

आज "शब्दावर" घ्यावं लिहायला.... खरंच! स्वतःशी ठरवत, वृत्तपत्र बाजूला सारत जरा सैलावून बसले, आज लिहावंच खरं...

इकडे मनात, उत्स्फूर्त टाळया मारत जमलेली शब्दांची मैफिल ताडकन सावध झाली....

कुणकुण : जरा, गप्पा - टाळ्या थांबवा, ती काहीतरी ठरवत आहे
व्यासंग : हो, तिचा 'शब्दांवर' लिखाण करायचा विचार सुरू आहे
अहं : करु देत की मग, आपण आहोतच श्रेष्ठ, प्रत्येकाने लिहायलाच हवं आपल्याबद्दल.. आपल्यावाचून पानही हलत नाही, आपले उपकार नकोत मानायला?
निर्मोही : आपल्यावर? अरे आपण बापडे कोण लागून गेलो, आपण 'जा, वाक्यात अमूक जागी जाऊन बसा" म्हटलं की जाणारे... आपल्यावर कसलं आलंय लिखाण?
बंडखोर : ए चला, आपण सारे निघून जाऊया, थोडावेळ दूर!! आज ती काम करताना बरंच सुचेल तिला काही-बाही त्या आधी निघूयातच.. उठा
कुरघोडी : हो! आपणच नसू तर कसले आलेय लिखाण, कसले ते व्यक्त होणे, चला निघूया
खंबीर : का तिच्याशी असे वागता. मी येत नाहीये.
भटकंती : फिरलो नाहीये गेले कित्येक दिवसात, तिच्याच दिमतीला आहोत, दमलोय आता- चला निघूचयात..
कूच : या माझ्या मागून....

ज्यांच्यावर लिहायला घ्यावं, तेच रानोमाळ परागंदा झाले, माझ्याच समोर!

कामाला लागले, ते करण्यावाचून पर्यायही नव्हता....
तास, दीड तास...

मनाच्या तळाशी काही दूर्लक्षित शब्दांची हालचाल जाणवली...
एक- एक सारे हळूच मनःपटलावर येऊ लागले....
ह्यांनाच घेऊन लिहावं का? निवडावेत पण जरा... काही जीर्ण, काही उदास, काही मरगळलेले कुणी उगाच मलूल- हे नकोत सध्या, काही काळ...

निवडून एकेकाला टोपलीत भरत गेले, त्यांनाच नंतर सुसंबद्ध गोवून काहीतरी छानसं लिहावं, ह्या हेतूने!
बघता- बघता माझी टोपली भरली... आता ते ओसंडून वाहू लागले, त्यांना थोपवून धरावं म्हणून दोन्ही हात सरसावले... तसा, 'स्पर्श' अगदे उडी मारून बाहेर पडला, चालू लागला..
मी :अरे, अरे जरा थांब, का निघालास?
स्पर्श : तू हात लावून माझ्या अर्थाची भावना प्रत्यक्षात पोहोचवलीस, माझी गरज संपली
'ऊबेनीही' उडी मारत स्पर्शाचेच अनुकरण केले..
मी कारण विचारताच, म्हणाली
ऊब : तुझ्या स्पर्शानेच माझा अर्थ थेट पोहोचतोय, मी का हवी इथे?

मागोमाग माया, आपुलकी, प्रेम, वेड, लोभ, उल्हास, स्फूर्ती, आनंद, अपेक्षा आणि मी निवडलेले सारे सारे पडले बाहेर, मला मन मानेल ती कारणे देत.....

पुन्हा टोपली रिकामीच!!!

..... आज मला शब्द वश नव्हतेच!

-बागेश्री
ब्लॉगवर पूर्वप्रकाशित : http://venusahitya.blogspot.com/

गुलमोहर: 

व्वा .... भाषेवर अलंकारांचा साज चढविणार्‍या शब्दांनाच
चेतनागुणोक्ती (अलंकार) ने सालंकृत केलंस बागेश्री.... छानच.

छान Happy

बागेश्री,

हे लिखाण सुंदर! खोल खोल जातानाचा तुमचा हा प्रवास जगालाही आनंद देत आहे हे अती सुखद!

हबा आणि तुमच्या लेखनात (हे म्हणणारा मी कोण म्हणा) मला तरी एक साधर्म्य जाणवते, ते म्हणजे त्याच त्याच शब्दांना - ज्यांचा वापर करून माणूस जगत राहतो - चित्रदर्शीत्व बहाल करणे! चुभुद्याघ्या.

अभिनंदन व शुभेच्छा!

-'बेफिकीर'!

तुम्हां सगळ्यांचे मनापासून आभार, हे ललित मनाच्या फार जवळचं आहे,
म्हणूनच प्रतिसादासाठी विशेष धन्यवाद..

छान!

सुरेखच. अतिशय छान लिहिलं आहेस. तुला शब्द काय सोडणार? तुझ्या पुढे हात जोडुन उभे असतात ते.

अभिनंदन ! ( Wink का तुला वेगळं सांगु का? शेवटी जिंकलीस ! Happy )

सारेच शब्द स्वतः घेऊन दुसर्यांना नि:शब्द करते
तुच आता उधार दे छानसे प्रतिसादा तरी पुरते

अलंकार वगैरेंचं काही कळत नाही...

आपले शब्द तर पोचलेच, आणि भावनाही पोचल्या... स्पर्श आणि उबेच्या आधीच्या आणि नंतरच्याही!

पुलेशु...

बागेश्री,
छानच लिहिलेय ... शेवटी शब्द म्हणजे तरी काय ?......
एखाद्याने काही वचन दिले, भविष्यात मदत करण्याची हमी दिली, मदतीची ग्वाही दिली तर आपण म्हणतो कि काही काळजी करू नका त्यांनी शब्द दिलाय. पुढे जर तो मनुष्य म्हटल्या प्रमाणे वागला तर आपण म्हणतो त्याने शब्द पाळला. पुढे वचनभंग केला, मदत नाकारली, तर आपण म्हणतो शब्द फिरवला.
त्या पलीकडे जावून काही भावनांना आपण खरेच शब्दरूप देवू शकतो का ? हा मला खरा सतावणारा प्रश्न आहे. मानवी स्वभाव आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी शब्दांचा आधार घेण्याचा आहे. हे जरी कितीही खरे मानले तरीही सगळेच शब्दातून सांगणे प्रत्येकास जमतेच असे नाही. म्हणूनच काही वेळेस परस्पर विरोधी संकल्पना वापरीत परिस्थितीचे वर्णन करण्याकडे माणसांचा कल असतो. त्यातून तयार होतात पुढील संकल्पना . बोलके मौन. भिजलेला पाऊस. जळणारे उन. अंधारी रात्र. लख्ख उजेड. तर काही संकल्पना शब्दात कशा उतरवाव्यात हे प्रश्न सुटतच नाहीत. उदा. तापलेल्या जमिनीवर कोसळलेल्या पहिल्या पावसाने निर्माण केलेला वास. अचानक अप्रिय घटना घडल्यावर पाठीच्या मणक्यातून थेट मस्तकापर्यंत गेलेली सणक. मला वाटते म्हणूनच अत्यानंद, अति तीव्र दुखः, पराकोटीची कृतज्ञता यावर भाष्य करताना आपल्या तोंडी शब्द येतात ....' हे सांगायला माझ्यापाशी शब्दच नाहीत' म्हणजेच पुन्हा एकदा आपण अव्यक्त शब्दानेच व्यक्त होतो नाही का ?

किंकर,
सुंदर मुद्दा, छान उदाहरणे!
खरंय, कित्येकदा अबोल शब्दच मदतीला येतात Wink

मुंबैकर,
मनापासून आभार, आवर्जून वाचून अभिप्राय कळविल्याबद्दल!

Pages