ग्रहण-४

Submitted by मुरारी on 17 October, 2011 - 06:53

ग्रहण-१
ग्रहण-२ग्रहण-३

मला आता घरच्यांपासून काहीही लपवायचं नव्हत.
नाश्त्याला बसलेले असताना.. मी सर्व हकीकत सांगून टाकली
उर्मिलाचा चेहरा. भयाने पांढरा फाटक पडलेला .. आई पण हादरलेली.. बाबांच्या कपाळावर आठ्या पडलेल्या..
मग कोणीच काही बोललं नाही.
मग बाबाच म्हणाले, काल भाटे सांगत होते.. त्यांनी लिफ्ट उघडली तेंव्हा तू खाली पडलेला होतास.. आणि तुझ्या अंगावर ३, ४ काळी मांजर होती.. ती नंतर जिन्यातून पळून गेली .
मी मान खाली घालून बसून राहिलो.. त्यांनी मला पूर्ण झपाटलेल होत हे निश्चित !!!
बाबा मग उठून बाहेर गेले, ते दुपारीच परत आले, आल्या आल्या त्यांनी मला सांगितल..
चल आपल्याला आता एकाच व्यक्ती मदत करू शकेल... आपल्याला त्यांना लवकरात लवकर भेटायला हव
मी विचारल.. कोण बाबा ?
बाबांच्या डोळ्यात कसलीशी चमक आली , ते म्हणाले

समर्थ ...
अशोक समर्थ !!!

******************************************************************************************

अप्पा जोशी....

शनिवारची सुट्टी म्हणुन आज सकाळीच समर्थांकडे आलो होतो. मागच्या आठवड्यातला पनवेलच्या बखळीतला थरार संपल्यानंतर आमचं बोलणंच झालं नव्हतं. शिवाय समर्थांना काही रत्नमणी खास अंदमानातून मागवले होते ते हि पाहायचे होते.

मी आलो तेव्हा समर्थ त्यांच्या खास खोलीत साधना करत होते. त्यांची साधना होईपर्यंत मी बाहेरच पुस्तक वाचत बसलो. तेवढ्यात दार वाजलं. मी दरवाजा उघडला, दारात साठीचे गृहस्थ उभे होते त्यांच्यामागे तिशीच्या आसपासचा मुलगा उभा होता. त्यांनी स्वतःहून ओळख करून दिली.

"नमस्कार, मी गजानन बोरकर आणी हा माझा मुलगा हर्षद.!"

मी त्याच्याकडे पाहिलं पण त्याचं कशातच लक्ष नव्हतं, तो सतत आजुबाजूला घाबरून पाहत होता. "आम्हाला तातडीने समर्थांना भेटायचंय, मगाशी मि फोन केलेला." मी त्यांना लगेच आत घेतलं. आत समर्थांची एक खुर्ची होती त्या समोरील कोचावर त्यांना बसवलं. मी बाजुची खुर्ची घेऊन त्यावर समर्थ बाहेर येण्याची वाट पाहत बसलो. दहा मिनिटात समर्थ बाहेर आले. तेच ते प्रसन्न व्यक्तीमत्व, करारी डोळे, धारदार नाक, व्यायामने घोटवलेलं शरीर, उंच अंगकाठी आणी त्यावर परिधान केलेला पांढराशुभ्र पायघोळ
झगा. त्या झग्याचीही विशिष्ट खासियत होती, सांगेनच पुढे. समर्थांकडे माणसं यायची ती मुळी आपत्तीत सापडलेली असायची. अनैसर्गिक आपत्ती, कधी जाणुनबूजून तर कधी नकळत ओढवून घेतलेली. आणी सगळ्या गोष्टी शेवटच्या थराला गेल्या कि मग त्यांना समर्थांची आठवण यायची..

समर्थांचे कार्य हेच होते, संकटात सापडलेल्याला त्यातून सुरक्षित बाहेर काढणे. पण आज समोर आलेली ती दोन माणसं कुठल्या भयानक संकटात सापडली होती ते आम्हाला पुढच्या एका तासात समजलंच..

"समर्थ, आम्हालाही हा भयानक प्रकार आज सकाळीच समजला, आणी आमचा आमच्या मुलावर पुर्ण विश्वास आहे, हा वेडाचा प्रकार नाही. यामागे नक्कीच अनैसर्गिक शक्ती आहे. आमच्या मुलाला यातुन सोडवा, त्याचा जीव धोक्यात आहे."

गजानन बोरकर गेला एक तास अथक बोलत होते. आता मात्र त्यांच्या डोळ्यात पाणी तरळलं होतं. हर्षद बोलतच नव्हता, अगदी प्रमाणाबहेर त्याच्या डोळ्यात भय दाटलं होतं.

"हर्षद या बंगल्यात असेपर्यंत तु पुर्णपणे सुरक्षित आहेस." समर्थ खुर्चीतून उभे राहत त्याच्या जवळ गेले. त्यांच्या शब्दातच इतकी ताकद होती. समोरचा माणुस कितीही संकटात असला तरी त्याला हत्तीचं बळ यायचं. मी आतून गरमागरम कॉफी घेऊन आलो.

कॉफी पिताच त्याला जरा तरतरी आली.

"तर हर्षद तुझं असं म्हणणं आहे की आता ते सगळे तुझ्या मागावर आले आहेत." समर्थांनी त्याला धीर देत विचारलं.

"हो..होय समर्थ, तुमच्या बंगल्यात पाय ठेवेपर्यंत ते सगळे माझ्या आजुबाजूलाच होते. (त्याच्या डोळ्यातले भाव पाहुन माझ्या अंगावरून शिरशिरी गेली.")

म्हणजे अजुनही ते बंगल्याच्या बाहेर असणारच, बंगल्यात यायचाही त्यांनी प्रयत्न केला असणार, पण समर्थांच कवच एवढं मजबूत होतं कि ते तोडणं अजुनपर्यंत कोणालाही जमलेलं नव्हतं.

"समर्थ, मोठया आशेने आलोय हो.!" बोरकर परत हात जोडून म्हणाले. हर्षद उगीचच आढ्याकडे बघत बसला. समर्थ खुर्चीला पाठ टेकून विचारमग्न अवस्थेत डोळे मिटून बसले, काही वेळाने ते उठले मग म्हणाले "बोरकर, अर्थात मला जेवढी शक्य आहे तेवढी मदत मी करेनच, पण आपल्याला आता घाईने सर्व काम पार पाडायला हवीत. कारण इथे एकच सावट नाहीये."
"अप्पा, यांचा पत्ता,नाव, नंबर सगळं लिहून घे आणी समोरच्या कप्प्यातल्या लाल रंगाच्या चार मोठ्या अगरबत्त्या दे यांना. दोन दिवस सहज पुरतील या. घरात धुर झाला तरी चालेल. एक अगरबत्ती १२ तास पुरेल, पण या विझता काम नयेत. या जोपर्यंत जळत आहेत तोपर्यंत तुझ्या केसालाही धक्का लागणार नाही. जा काळजी करू नकोस."

हर्षद आणी गजानन बोरकर निघुन गेले. ते गेल्यानंतर समर्थ माझ्यासमोर बसले.

"अप्पा गुंतागुंतीच प्रकरण आहे बरं, आधी किसन मग गंगी आणी तिच्या मुली, त्यानंतर दादासाहेब आणी मग शेळके. प्रत्येकाचं मरण्याचं कारण वेगवेगळं होतं. कोण दुखा:ने तर कोण ठरलं सुडाचा बळी. पण आता ते सर्व मेल्यानंतर एकत्रच आलेत. चुंबकिय शक्ती, मॅग्नेटीक पॉवर कशी लोखंडात भेदभाव न करता सर्वच आकर्षून घेते तसच हे सर्व एका अनैसर्गिक, भयानक शक्तीने ओढले गेलेत." काढलेल्या टिपणावरून समर्थांनी आपलं मत व्यक्त केलं.

"मला या मागचा या मागचा इतिहास तारखेसकट पडताळून पहायला हवा." इतके बोलून समर्थ बाहेर निघून गेले. त्यांचे सोर्सेस इतके होते कि, दोनशे वर्षापुर्वीची माहितीही ते सहज मिळवत असत. मीही गड्याला सांगुन निघालो.
संध्याकाळी परतलो तेव्हा समर्थ मोठ्या फाईल उघडून बसले होते. जुन्या रेकॉर्डच्या झेरॉक्स होत्या.

"अप्पा आलास! दिन तीन दिवस सुट्टी टाक बरे. दिसतयं तेवढं हे प्रकरण सोप्प नाहिये. आपल्याला मुळावर घावा घालायला उद्याच नागरगोज्याला जायचचं."
"आता ऐक का ते किसन अन्यायाचा बळी ठरला, गंगीला सुड घ्यायचा होता आणी जिवंत राहुन ती कोणाचच वाकडं करू शकत नसती पण मेल्यावर तिने ते करून दाखवलं."
"दादासाहेब आणी शेळके त्यांच पाप मोठं असेल आणी किंवा त्यांच दुर्भाग्य म्हणं. अचानक आलेल्या मृत्युने आणी तो हि अशा परिस्थितला हिडिस फिडिस मृत्यु झाल्याने शरीर सोडलयं हे अजुन स्विकारलेलं नाहीये."
"तर अशा विचित्र पोकळीत हे सर्व अडकलेले आहेत. आता ते हर्षदच्याच मागे का लागलेत त्याला हि एक कारण आहेत. मी तारखा पडताळून बघितल्या, हे बघ गंगीने जीव दिला तेव्हा चंद्रग्रहण होतं..ग्रहणात जीव दिला तिने! दादासाहेबांचा खुन झाला,अमावस्या होती. शेळके गेले ती तारीख...तेव्हा पौर्णिमा होती."
"हर्षद ज्या दिवशी बंगल्यात गेला तेव्हाही पौर्णिमाच होती आणी....लास्ट बट नॉट द लिस्ट, परवा खग्रास चंद्रग्रहण आहे तेव्हा त्या शक्ती पुर्णपणे ताकदवान होणार आणी नविन बळी घेणार त्याच्या आपल्याला त्यांना संपवायला हवं अप्पा, नाहीतर हर्षद खुप मोठ्या संकटात सापडेल."

मी समर्थांकडे पाहत होतो, ते किंचित अस्वस्थ झालेले जाणवले, म्हणजे कामगिरी कठिण असणार हे नक्कीच.

तेवढ्यात समर्थ म्हणाले "अप्पा, आपण ती रत्न वेळेवर मागवली बघ. ती आता आपल्या कामाला येतील बघ." हे बोलतानाच आतुन एका मखमली कापडावर ती रत्न माझ्यासमोर घेऊन आले. अतिशय डोळे दिपवणारी ती रत्न होती. (मागे एकदा तळकोकणात परबांच्या झपाटलेल्या वाड्यात अशाच रत्नांनी समर्थांना वाचवलं होतं.)
"आता यांना सिध्द करायला हवं. माझ्या खोलीतुन बाहेर येईपर्यंत कोणालाही आत घेऊ नकोस. अगदीच गरज असेल तर बाहेर बसवुन ठेव आणी हो, शक्यतो तु सुध्दा बाहेरच रहा."

समर्थांनी आज दिवसभर फक्त फळांचा रस घेतलेला होता. बाकीच्या खाण्याने मन एकाग्र होत नाही. विकार वाढतात. अशावेळी मनाची शक्ती त्या काळ्या शक्तींसमोर दुबळी पडते. म्हणून समर्थ कामगिरी आली कि शक्य तेवढंच अन्न घेत, बाकी उपास. पण तरीही त्यांच तेज धार केलेल्या शस्त्राप्रमाणे वाढतच असे. डोळे प्रचंड निग्रही होतं. अशा वेळी सामान्य माणूस त्यांच्यासमोर उभा राहिला तर त्याची सुध्दा खेर नसे.
अनेक वाईट शक्तींचा बंदोबस्त त्यांनी यापुर्वी केलेला होता. त्यांची ती खास खोली, बापरे!! त्यावर लिहित बसलो तर वेगळाच एक लेख होईल. खोलीचा दरवाजा उघडला कि आतमध्ये एक वेगळंच जग आपल्यासमोर येतं. त्यातलं अवकाश वेगळच होतं. मी दोनदा त्यांच्याबरोबर त्या खोलीत गेलो होतो. अनेक प्रकारचे ग्रंथ, पुस्तकं, नानाविध रत्नं, मोती(सर्व मंतरलेले), अनेक प्रकारच्या अगरबत्त्या, भस्म, दोरे किती गोष्टि अशा होत्या त्यांना काय म्हणतात हेही माहित नव्हते. विविध प्रकारची कापडं, धातू काय नव्हतं तिथे. इतकेच नाही तर समर्थांनी अनेक वाईट शक्तींनाही आपला गुलाम बनवून ठेवलं होतं. ते हस्तकही तिथे वावरत असत. काट्याने जसा काटा निघतो तसा प्रकार होता तो. शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने अनेक वाईट शक्तींचा काटा त्यांनी हे गुलाम वापरून काढलेला होता.
अशा या भारलेल्या खोलीत गेल्यावर मनावर प्रचंड दडपण यायचं. डोळे प्रयत्न करून एखाद्या गोष्टीवर स्थिर ठेवावे लागत नाहीतर अख्खी खोली आपल्याभोवती फिरतेय कि काय असे वाटायला लागे. एक प्रकारचा वास तिथे सदैव भरलेला असे. दुर्गंध नाही म्हणता येणार पण सुगंधही नव्हे. वातावरण अतिशय गार पडलेलं असे. हाडं गोठवणारा गारवा!! तो कसा निर्माण होई हे समर्थच जाणो. तर अशा या खोलीत समर्थ त्यांची साधना करीत. त्यांची उर्जा ते इथुनच मिळवत असत. आजही ते त्या रत्नांना सिध्द करायला तिथेच बसणार होते. किती वेळ लागेल याबाबत ते कधीच खुलासा करीत नसत आणि मी हि विचारत नसे.
ती रात्र मी बंगल्यावरच होतो. दुसर्‍या दिवशी सकाळी ८ च्या सुमारास समर्थ बाहेर आले. चेहर्‍यावर नेहमीपेक्षा अधिक तेज होतं. "अप्पा, रत्न सिध्द झाली बरं का!" " आपल्याला आजच निघायला हवं. हर्षदला फोन करून बोलव नको नाहीतर आपणच त्याला घ्यायला जाऊ, त्याला एकट्याला ठेवणं धोक्याचं आहे."
"घरात त्या अगरबत्त्यांमुळे तो तात्पुरता सुरक्षित आहे पण ते काही कायमच सरंक्षण नव्हे. त्यांच्या घरी फोन करून त्यांना तयार व्हायला सांग."

मी उठलो आणी बोरकारांना फोन फिरवला.....

*************************************************************************************************************************

हर्षद बोरकर...

मी वेडा होणारे, किंवा आता मरण आलं तर बेहत्तर. हे अघोरी चाळे माझ्या सहनशक्तीच्या पलिकडे गेलेले आहेत. संपुर्ण रात्र मी जागा आहे 'त्यांच्या' भितीने.

समर्थ!! त्यांचे आभार कसे मानु कळत नाही. त्यांच्या त्या भारलेल्या अगरबत्त्यांमुळे आमच्या घरात माझ्याभोवती संरक्षण कवच उभारलेलं आहे. ते कवच तोडण्याचा 'त्यांचे' प्रयत्न सतत चालु आहेत. भेसूर ओरडतायेत. माझ्या कानात अभद्र आवाज येतायेत,

ह्रदयाचा थरकाप उडतोय. पण मी सध्या सुरक्षित आहे. आणी हे किती दिवस चालणार?

काल सुध्दा ते काळे आकार माझ्या आजुबाजूला घुटमळत होते. मी बेडवर झोपलेलो असताना...समोरच गंगी....हो गंगीच, ती भेसुर हसत मला खुणावत होती. ते शेळक्यांच अभद्र तोंड्...अजुन दोन तीन काळे आकार वळवळत माझ्याभोवती घुटमळत होते.

आई-उर्मिला खुप घाबरल्या होत्या. दर पाच मिनिटांनी मी घाबरून ओरडत होतो. बाबा त्यांना समजावत होते..

समर्थच मला आता यातुन वाचवू शकतात. त्यांच ते कालचं शांत रूप पाहून माझा विश्वास वाढला आहे. हे विकृत ग्रहण तेच सोडवु शकतात. कालची रात्र कशीबशी गेली.
तेवढ्यात फोन वाजला, बाबांनी घेतला "हो,हो मी सांगतो त्याला. ठिके!!,
अप्पा तुमचे मनापासुन आभार... बाबांच्या डोळ्यात पाणी आलं, त्यांनी ते लपवलं. मी बेडच्या कोपर्‍यात चोरून मुटकूळ करून बसलेलो. बाबा माझ्याजवळ आले, म्हणाले "समर्थ तुला न्यायला येणारेत, तुम्ही आताच निघणार आहात नागरगोज्याला. या सगळ्याचा अंत तिथेच होणारे."

उर्मिला माझ्याजवळ येऊन माझ्या डोक्यावरून हात फिरवू लागली. मी हि रडू लागलो. सहनशक्ती संपलेली होती. एका तासात समर्थांची गाडी खाली उभी राहिली. अप्पा वर आले, ते वर आल्या आल्या 'ते' काळे आकार इकडुन तिकडून माझ्यावर जोरदार

हल्ल्याचा प्रयत्न करू लागले, पण ठराविक अंतरावरून त्यांचा प्रयत्न निष्फळ होत होता.

मी घाबरत घाबरत उठलो, कपडे बदलले. आईने अंगारा जवळ दिला. उर्मिला रडतच होती. बाबा खाली आले. मी समर्थांच्या बाजुला बसल्या बसल्या 'ते' काळे आकार दिसेनासे झाले. अप्पांनी गाडी सुसाटच सोडली.

मी स्वतःला भाग्यवान समजत होतो. आज माझ्या बाजुला समर्थ होते. त्यांच 'रुद्रपठन' सुरू होतं. होय!! 'रुद्रच' !!! लहानपणी एकलेले. पण समर्थांचे उच्चार असे होत होते कि सर्व भुमंडळ डळमळेल. एक एक वर्ण बाजुच्या वातावरणावर आघात करत होता.

त्यांच्या चेहर्‍यावरील तेज...अवर्णनीय होतं.

"हर्षद" ..........त्यांनी हाक मारल्यावर मी तंद्रीतून बाहेर आलो. "हर्षद त्यांनी तुला लक्ष्य केलेलं आहे, हे आपाल्याला आता कळालयं. त्यांचा नाश मुळासकट झाला तर फायदा.. आणी ते तुझ्यासमोर आल्याशिवाय हे शक्य नाही म्हणुन आपण नागरगोज्याला जात आहोत."
"तुला काही धोका नाही याचं वचन देतो मी. पण तु सुध्दा मला एक वचन दे की काही झालं तरी मन खंबीर ठेवशील. कमकुवत मन भेदणं खुप सोप्प असतं. पण मनाच्या भिंती अशा मजबुत कर कि कोणीही त्याचा सहजासहजी ताबा घेऊ शकणार नाही."
"तुझ्या संरक्षणाची तयारी मी केलेलीच आहे. आता 'त्यांचा' नाश मात्र अटळ आहे."

समर्थांच्या सहवासाने मी भारून गेलो होतो. बाहेर मुसळधार पाऊस कोसळत होता. अप्पांच्या गाडीचा वेगही त्या पावसाप्रमाणे वाढतच होता. सुसाट वेगाने गाडी पळत होती.

संध्याकाळच्या सुमारास नागरगोज्याला पोहचलो. एका बर्‍याशा हॉटेलात अप्पांनी आम्हा दोघांना जेवण मागवलं. समर्थांनी फक्त फळांचा रस घेतला. जेवुन लगेच निघालो. गाडीने वळण घेतलं आणी पठारावर लख्खन चमकलेल्या विजेने कोर्टाच्या इमारतीचं क्षणभर दर्शन झालं. माझ्या अंगावर परत काटा आला. दुसर्‍याच क्षणी ती वास्तु परत अंधारात गुडूप झाली.
"अप्पा गाडी आत घे" समर्थ म्हणाले आणी माझ्या हातावर हात ठेवला. प्रचंड उर्जेचा स्त्रोत माझ्या अंगातून गेल्यासारखा वाटला. आम्ही, मी राहत असलेल्या बंगलीसमोर उतरलो....आणी मी हादरलो. समोरच्या बंगलीत मिणमिणता उजेड होता आणी झोपाळे जोरजोरात हलत होते.

क्रमशः

गुलमोहर: 

हांग अशी
अशा भुताखेताच्या ष्टोर्या लैच आवडतात.. उगाच टुकार कादंबर्या(क्रिकेटच्या) कोण वाचणार

पुढील भाग लवकर टाका.... नाहीतर लिंक लवकर लागत नाही मागील भागांची... >>>>>>>+1
बाकी मस्तच चाललीये गाडी

"हिडिस फिडिस मृत्यु" हा शब्दप्रयोग बरोबर वाटत नाहिये. एखाद्याला तुसडेपणाने वागवताना 'हिडिस फिडिस करणे' हा शब्दप्रयोग योजतात. 'हिडिस रीतीने' असे शब्द बरोबर वाटतील असं मला वाटतं.

बाकी भाग उत्तमच झाला आहे. पुढला भाग ह्याच आठवड्यात टाका प्लीज.

छान होता हा भाग..............जास्त उशिर लावु नका....... रस संपतो वाचण्याचा

किति वाट पहायला लावता......
अगदि भयानक आहे,पण चान्गलि आहे कथा.........
keep it up....

सर्वांचे आभार.. मध्यंतरी बराच व्यग्र असल्याकारणाने लिहायला वेळ नव्हता.. पण आता लवकरच पुढचा भाग टाकेन...

पुढचा म्हणजे शेवटचा.. कथा आता संपायलाच आली आहे
Happy
- प्रसन्न आपटे