रंगभूमी दिन

Submitted by अज्ञात on 16 July, 2008 - 12:38

५ नोव्हेंबर २००७ ह्या रंगभूमी दिनाच्या दिवशी; रंगमंच पूजनासाठी; अनपेक्षितपणे मला/आम्हा उभयतांना नाशिकच्या सार्वजनिक वचनालयाकडून निमंत्रण आलं आणि भाषण करण्याच्या निमित्तने जे विचारमंथन झालं त्याचा हा गोषवारा.

रंगभूमी दिन !!
जीवनाच्या रंगपटावरील सोंगट्यांना खेळवणार्‍या हातांना नमन करण्याचा दिवस. प्रत्येक रंगकर्मीची कृतज्ञता आज नटराज चरणी नतमस्तक होते. मंचावरची मस्ती विनम्र होण्याचा हा उत्सव !!!

मंच नाटकाचा असो वा आयुष्याचा, "प्रवास आणि अनुभव" सारखाच. किंबहुना "अनेक प्रवासांचा एकत्रित अनुभव" म्हणजे रंगमंच.

माणसाच्या जडण घडणीत मोलाचा सहभाग असलेला वाहक म्हणजे "नाटक". जगणार्‍या अगणित प्रकृतींची जिवंत अनुभूती देणारी आणि आत्मपरीक्षण समृद्ध करणारी एक संवेदनशील कला म्हणजे "नाटक". माणसाच्या व्यक्तिमत्व विकासाचा अविभाज्य भाग म्हणजे "नाटक".

रंगभूमी माणसाला बरंच कांही शिकवते आणि परिपक्व करते हा माझा अनुभव आहे. अनुबंध आणि अनुकरणातून समज वृद्धिंगत होत असते. तिचं प्रभावी मध्यम म्हणजे "रंगभूमी".

सर्वांच्या वतीने नटराज पूजन सोहळ्याचा मान आम्हाला मिळणं हा क्षण आनंदाचाच. कारण ह्यासाठी निवड करण्यात आलेल्या व्यक्तिरेखा याच रंगभूमीने घडवल्या आहेत.

वेगवेगळ्या नाट्याकृतींतून उभ्या केलेल्या विविध भूमिकांनी मला त्या त्या व्यक्तिरेखांची सखोल ओळख करून दिली आहे जेणेकरून "माणूस"; त्याचं "माणूसपण" ओळखणं मला शक्य झालं. लेखकाचा उपन्यास, दिग्दर्शकाचा अभ्यास आणि माझा ध्यास यातून प्रत्येकाची मानसिकता, विचारांची प्रगल्भता, शब्दांची आणि वाक्य रचनांची श्रीमंती मला मिळाली. कितीही मोठी भरारी मारली तरी पाय जमिनीवर ठेवण्याची वृत्ती मिळाली. चेहर्‍याला रंग असलेली भूमिका आणि मूळ अस्तित्व यातला फरक उमजला. कुठलीही भूमिका वठवतांना उच्चनीच भेद न मानता जीव ओतण्याची संथा मिळाली. हातात हात घालून एकाच ठिकणी लक्ष एकाग्र करून मेरू पादाक्रांत करण्याची दिशा मिळाली. सामुहिक वाटचालीत वैयक्तिक विचार अलिप्त ठेवण्याची दीक्षा मिळाली.

प्रेक्षकांशी संवाद साधून त्यांना संमोहित करण्याची विद्या मिळाली. परकाया प्रवेशातून कुणाचंही मन स्वतःमधे सामावून घेण्याची क्षमता मिळाली.

उपलब्ध असलेली प्रत्येक वस्तू कशी केंव्हा कधी आणि किती वापरायची ह्याची शिस्त मिळाली. कलाक्षेत्रातल्या इतरही अंगांचं सौंदर्य पारखण्याची दृष्टी मिळाली.

समूहाबरोबर चालतांना त्यातल्या प्रत्येक घटकाचा सन्मान करण्याचा मंत्र मिळाला. स्वतःला विसरून जगण्याचा स्वतंत्र मार्ग मिळाला.

*****

व्यक्ति तितक्या प्रकृती असतात पण प्रत्येकाचा प्रत्येक प्रकृतीशी संबंध येतोच असं नाही. शिवाय कांही व्यक्तिरेखा आणि प्रसंग हे सामान्य जीवनापेक्षा वेगळे असतात. अशांची आणि जे तुमच्या आमच्या आयुष्यात अनेकदा सहजपणे घडून जात असतं त्याची, प्रबोधनासाठी वा मनोरंजनासाठी, किंबहुना या दोन्हींसाठी केलेली एकत्रित-सुयोग्य-ठळक मांडणी म्हणजेही "नाटक".

नाटक हे प्रसाराचं अत्यंत प्रभावी माध्यम आहे. त्याचा आपल्या संसारिक आणि व्यावहारिक कुटुंब व्यवस्थेशी अतिशय जवळचा संबंध आहे. जे नाटकात प्रत्यक्ष काम करतात ते तर त्या भूमिका जगतच असतात, आणि ते त्या जितक्या उत्कटपणे जागवतात तितक्या प्रेक्षागृहातील प्रेक्षकांना जगायला भाग पाडतात.

नाटकात मनोरंजनाबरोबर शिक्षण आणि संस्कार हेही घटक तितकेच महत्वाचे असतात.

विचारवंत दिग्गज लेखकांनी मांडलेले मौलिक-लाक्षणिक विचार; त्यांची भाषा, दिग्दर्शक आपली कुशाग्र निरिक्षण बुद्धी आणि कसब पणाला लावून अभिनेत्यांत उतरवतो. "पात्रांची बॉडी लँग्वेज, त्याचा पोषाख, चेहर्‍यावरचे हाव भाव, शब्दांचे स्पष्ट-शुद्ध उच्चार, वाक्यांची फेक, व्यक्तिरेखेनुसार आवश्यक ते शिष्टाचार, भावनांचा योग्य अविष्कार होण्यासाठी आवजाचे चढ-उतार, संभाषण चालू असतांना इतरांच्या चेहर्‍यावर उमटणारे तरंग-त्यांच्या सापेक्ष प्रतिक्रिया" ह्या सर्व गोष्टी "प्रसाराची विविध माध्यमं" असतात. ती अधिक प्रभावी होण्यासाठी अणि वातवरण निर्मितीसाठी "नेपथ्य, प्रकाश, संगीत, वेशभूषा, रंगभूषा" ही तंत्र वापरली जातात.

नाटकाची परिणामकारकता वृद्धिंगत करण्यासाठी, आधी सांगितलेल्या बाबींप्रमाणेच, "पात्रांची योग्य निवड, त्यांच्या रंगमंचावरील हालचाली, मंचावर ठेवलेल्या प्रत्येक वस्तूचा केलेला वापर, योग्य वेळी घेतलेल्या एन्ट्री-एक्झीट्स, वावरण्यातली सहजता" ह्या तितक्याच महत्वाच्या असतात. असो. पण हे झालं प्रेक्षकांसाठी ! आता ह्या सर्वांचा रंगकर्मींच्या दैनंदिन दिनचर्येवर कसा परिणाम होतो पहा.---

१) सर्व तंत्र व इतर समयोजित कलांची जवळून 'उपयुक्त' ओळख होते.

२) नृत्य, शिल्प, चित्र, रंग, प्रकाश, संगीत यांच्या सोबतच्या सततच्या वावरामुळे एक अस्वादक सौंदर्यदृष्टी तयार होते.

३) ज्येष्ठांचं लिखाण, श्रेष्ठांचं मार्गदर्शन यातून वागणूक-वृत्ती-भाषा-विचार सर्वच संस्कारित होतात.

४) नाटक जेंव्हा नाटक वाटत नाही तेंव्हा आपण त्याला खरा अभिनय म्हणतो. हाच आपल्या वागण्या बोलण्यातला नाटकीपणा घालवून आपल्या आचरणात सहजता आणतो.

५) रंगमंचाप्रमाणेच घरात देखिल, असलेली प्रत्येक वस्तू वापरली गेली पाहिजे अथवा ती तिथे असताच कामा नये अशी सुटसुटीतपणाची वृत्ती अंगी बाणते.

६) घर लावणे या प्रकारात सर्वसाधारण माणूस आणि अभिनेता / सहकारी / सहकलाकार यांच्यात लक्षात येण्याजोगा फरक असतो.

७) नाटकात जिथली वस्तू तिथेच असावी लागते; आणि ती हव्या त्या प्रसंगाला त्याच ठिकाणी उपलब्ध व्हावी लागते, हे नकळत, घरात आपोआप घडायला लागतं.

८) भूमिका करतांना नट ती प्रत्यक्ष जगत असतो. म्हणजेच लेखकाच्या विचारांची दिग्दर्शकाच्या दृष्टीतून संबंधित पात्रांशी देवाण घेवण करत असतो. असं करतांना ती सर्व पात्र आतून स्वानुभवत असतो, ज्याला मी "पर काया प्रवेश" असं म्हणतो, जो त्या व्यक्तिमत्वाविषयी आपोआप आस्था निर्माण करतो.

९) नाटकाच्या कुटुंबात प्रत्येकजण दुसर्‍यावर अवलंबून असतो, ही जाण रंगमंचाशी संबंधित प्रत्येक माणसाला असते. "सर्वांचा एकत्रित उत्तम मेळ म्हणजे उत्तम नाटक". हीच भावना अंगवळणी पडून घरातही / दारातही काम करते आणि एकमेकांना सांभाळून घेण्याची समज वाढीस लागते.

१०) तत्काळ मूड बदलणे हे फार मोठं कसब असतं. मनातली वादळं दडवून निवळलेलं वातावरण निर्माण करणं सुलक्षण असतं. मागच्या क्षणाला काय घडलं हे पुढच्या क्षणाला समजू न देणं हे नाटकात पडल्यावरच येतं. एक रडका प्रसंग करून विंगेत गेल्यावर दुसर्‍याच एन्ट्रीला; फ्लॅशबॅकचा वेगळाच आनंदाचा सोहळा उभा करावा लागतो त्याच कलाकारांना, लोकांच्या मनावर क्षणापूर्वी ठसवलेलं गांभीर्य पुसून !! असं नाही झालं तर हे दोन वेगळ्या दिवसांचे वेगळे प्रसंग आहेत / होते हे प्रेक्षकांना पचणारच नाहीत. "अशा वेळी आपल्या व्यक्तिगत भावना अलिप्त ठेवणं" हीच "प्रॅक्टीस" असते.

११) प्रत्येक नाटक हे एक टार्गेट ओरिएंटेड प्रॉडक्ट असतं; आणि सर्व संच; ते यशस्वी करण्यासाठी एकाच देशेने एकाच ताकदीने आपली सर्व क्षमता पणाला लावून तत्परतेने काम करत असतो. एखादा जरी कुठे कमी पडला तरी नाटक अपेक्षित परिणाम साधू शकत नाही. "असं रोमा रोमात भिनलेलं टीमवर्क, प्रत्यक्ष व्यवहारात खूपच सामंजस्य आणतं, आत्मविश्वास वाढवतं. "कामाची झिंग" नाटकच शिकवतं !!

१२) प्रत्येकाच्या निसर्गदत्त व्यक्तिमत्वाला अनुसरून, दिग्दर्शक, त्याच्याकडून त्यात्यानुरूप विविध प्रकारची प्रेझेंटेशन्स करवून प्रयोग करत असतो. त्यातूनच कलाकाराला, "त्याला साजरं कुठलं" हे नकळत कळायला लागतं. प्रेक्षकांचा सत्वर मिळालेला प्रतिसाद हेच त्याचं खरं प्रशस्तिपत्र असतं, कारण ते उत्स्फूर्त आणि निरलस असतं.

१३) "ज्ञान घेणं आणि ते सोपं करून सर्वसामान्यांना सहज कळेल असं देणं" हा तर नाटकाचा पायाच आहे. ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ आदि संतांनी हेच केलंय निराळ्या माध्यमातून !!

१४) नाटक हे एक मनन, एक चिंतन, आणि प्रसंगी मेडिटेशनही असतं यात कुठेही अतिशयोक्ती नाही.

व्यक्तिमत्व विकासासाठी अजून काय हवं असतं ? इतकं कुठे मिळू शकतं ? फक्त इथेच !!

म्हणून, हे 'आयुष्य जगून पावलेल्या कलाकारांचं', ज्या स्थानवर ते जगले आणि इतरांना जगवलं 'त्या स्थानाचं रंगमंचाचं', ज्यांच्यासाठी ज्यांच्यामधे जगले त्या 'रसिकजनांचं', ज्याच्या प्रेरणेनं हे साध्य शक्य झालं त्या 'रंगदेवतेचं- नटराजाचं' कृतज्ञ स्मरण-पूजन म्हणजे हा "रंगभूमीदिन" !!
ह्या व्रताला सामाजिक सौहार्दाची गरज आहे हे सांगण्याचा आणि समाजतल्या सर्व घटकांनी आवर्जून साजरा करावा असा हा दिवस !!

*******

गुलमोहर: 

छान लेख...... आयुष्यभराचे जीवन हा एक रंगमंच आहे..... परकाया प्रवेश..... शब्द आवडला..... रंगभूमिदिनाला शुभेच्छा....! कल्पना

कल्पना,
अभिप्रयाबद्दल आभारी आहे. नाटक ही प्रक्रिया, नट आणि सहकार्‍यांची मेहनत आणि त्यातून प्रेक्षकांवर होणारा संस्कार सर्वसामान्यांना कळावा हा या लेखामागचा हेतू. रंगभूमीदिनाचं महत्व सर्वांना समजावं, त्या कार्यक्रमाला सर्वसाधारण प्रेक्षकही उपस्थित रहवा म्हणून हा प्रपंच !!
....................................अज्ञात

छान लिहिलंय, आवडलं

छान लिहिलय, अज्ञात.

ITgirl आणि दाद,
अभिप्रायाबद्दल आभार. Happy
..................................अज्ञात