गोष्ट अल्केची-डायरीतील नोंदी,त्याही जशा हाताशी आल्या तश्या-भाग सात.

Submitted by किंकर on 7 March, 2011 - 22:20

ठिकाण-घरी-३० डिसेंबर१९८७ वेळ रात्र.थोड्या वेळापूर्वीच एक जुना मित्र येवून गेला.शाळेतील मैत्री.त्यामुळे गप्पा सहजच रंगल्या.उद्या कोकणात एखाद्या अपरिचित बीचवर जावून यावर्षी कविता वाचन आणि आपली आठवण सांगत,नव वर्षाचे स्वागत करूयात.असा कार्यक्रम घेवून तो आला होता.इतका चांगला योग लवकर येणार नाही म्हणून,त्याला बसवून,पटकन अलकाच्या आईस फोन केला.खरे तर अनेक वर्षांनी घरी फोन केला होता.कोण फोन घेताय कोणास ठावूक? असे म्हणत,नंबर फिरवला.नशीब जोरावर होते.आईनेच फोन घेतला.त्यांना म्हटले,वीरेंद्र बोलतो आहे.मी उद्या बाहेरगावी जात आहे,तर पार्सलसाठी कोणी आले तर काय करायचे? त्यावर त्या म्हणाल्या,बरे झाले विरू फोन केलास. पार्सल साठी कोणीतरी नाही,तर अलकाची मैत्रीण सुजाता येणार आहे.आणि ती तुझ्याकडे एक तारखेला येईल. मी म्हणालो, "ठीक आहे,असे करू मी एक तारखेस दुपारी फोन करेन,मग ठरवू ,कसे भेटायचे ते." फोन ठेवला. खरेतर पार्सलची उत्सुकता होती,तरीही ३१ डिसेंबरच्या कार्यक्रमात,अडचण नाही म्हटल्यावर मनातून सुखावलो.तसाच परत आलो आणि घरी येवून थांबलेल्या नयन या वर्गमित्रास भेटून,कोकणाचा एक रात्रीचा दौरा नक्की केला.

ठिकाण- कोकणातील नितांत सुंदर समुद्र किनारा. ३१ डिसेंबर १९८७- आणखी एका वर्षाची सांगता - आज जवळ जवळ पंधरा वर्षांनी समुद्र काठच्या त्या मुलायम वाळूवर पाय ठेवला.यापूर्वी एकदाच तेही पावसाळ्यात कोकणात येणे झाले होते.पण ते वय होते दहा /अकरा वर्षाचे.निरागस बाल्यच म्हणाना ! तेंव्हा आई आणि आजी बरोबर कोकण दौरा केलेला.एका संध्याकाळी गावाबाहेर खेळायला चाललो होतो.

आजीच्या वाड्यातील कमला माझ्या बरोबरीची.दारात उभी होती.मला म्हणाली,विरू आत्ता कुठे? तर मी म्हणालो, महादेवाच्या देवळात खेळायला.तर मला म्हणाली’”अरे वारा सुटलाय ढग भरून राहिलेत.गडगडाट ऐकला नाहीस का? आत्ता गेलास तर भिजशील.त्यापेक्षा आपण कडी पाटावर बसून झोके घेवू.”पण माझे लक्षच नव्ह्ते तिच्याकडे,मी पळालो.

मागून ती काहीतरी आण म्हणाली, मी न समजताच हो म्हणत धूम ठोकली.देवळात जावून बरोबरीच्या मुलात खेळतोय इतक्यात मोठ्ठा पाऊस.मोठ्ठा म्हणजे हे मोठ्ठा.आणि पाठोपाठ विजांचा कडकडात.देवळातून पुजारी बाहेर आले,आणि पोरांना म्हणाले,अरे भिजू नका;वळचणीला थांबा.आम्ही हुं हूं करत थोडे शांत.इतक्यात ह्या टपोऱ्या गारा.बघता बघता देवळातला दगडी चौक पांढरा शुभ्र झाला.आम्ही हसत हसत मजा बघत होतो.इतक्यात मला एक आयडिया सुचली. तीही अफलातून,म्हटले चला,या गाराच कमलासाठी घेवून जावू. पटकन त्या पावसात पळालो.शर्टाच्या आणि चड्डीच्या खिशात,गारा भरल्या आणि त्या पावसातून भिजतच घर गाठले.

अंगणात पोहचलो आणि तिथूनच हाक मारली,”कमळे.....“ तर माजघराच्या दारातूनच तिने खुणेनी विचारले काय? मी म्हटले बघ तुझ्यासाठी खाऊ आणलाय गारांचा. तर त्यावर ती म्हणाली सुंभच आहेस अगदी.मला कळेना. मी आपला एकदा शर्टचा आणि एकदा चड्डीचा खिसा चाचपडतोयघरी येईपर्यंत त्याचे पाणी पाणी झाले होते.कमला जवळ येत म्हणाली, "अरे गारा का कधी अश्या आणता येतात.जावूदे.शहरातील शाळेत सांगत नाहीत कारे काही.का तूच मुलखाचा धांदरट आहेस.चल आत आपण बोरे खाऊ"असे म्हणत,ती आत पाळली.पण माझ्या डोळ्यात मात्र पाणी आले.त्यात, कमला तूच मुलखाचा धांदरट आहेस,असे म्हणाली याचा राग होता कि,पावसाच्या पाण्यात गारा विरघळून गेल्या,याचे दुखः होते,हे आजही सांगता येत नाही. पण पावसात भिजल्याचा,एक फायदा मात्र त्या दिवशी झाला,तो म्हणजे त्याने माझे रडू कोणाला सांगितलेच नाही. डोळ्यातले पाणी पावसाच्या पुरात वाहून गेले.

अरे मी या मऊ मऊ वाळूत पाय टाकला आणि मन मात्र किती मागे गेले.तेंव्हा कमला आता अलका या कधी समजल्याच नाहीत.खाली वाळूत सहजपणे बोट फिरवले.त्यावर वील्का कि काय लिहिले बहुदा विरू आणि अल्का यातून नवेच काही आले का? इतक्यात एक हलकीशी लाट आली आणि ती अक्षरे पुसत नाहीशी झाली.तिकडून नयन आला,"चल,अगोदर चहा घेऊ आणि रात्री परत समुद्रावर येवू.आणि हो किरण गाणे म्हणणार आहे.तुला तुझ्या कवितांचे वाचन करायचे आहे."मी म्हटले,"पाहू काही सुचले तर म्हणीन नक्की!"मग आम्ही घरी गेलो. एक एक करत सोळा जणांचा छान ग्रुप जमला.तीनचार तास सहज संपले.जेवणानंतर सगळेच,किनाऱ्यावर जाण्यासाठी बाहेर पडले.नयनची आजी म्हणाली,"अरे तसा दोन तासांनी जरा गार वारा सुटेल,तेंव्हा परत उठून यायचा कंटाळा येईल,पण त्यावेळी हा चहा घ्या,म्हणजे बरे वाटेल." असे म्हणून,तिने एक मोठा थर्मास आणि कप असलेली पिशवी दिली.मग आमची वरात समुद्रावर रवाना झाली.

रात्री साडे नऊला सुरु झालेली आमची मैफिल अशी काही रंगली कि,१२ च्या ठोक्याला खाडी पलीकडे मोठ्या गावात फटाके उडाले,म्हणून आम्हास नव वर्षाच्या आगमनाची जाणीव झाली.मग नयनच्या आजीस धन्यवाद देत आमचा चहा तुकडा( टी ब्रेक हाहाहा ) झाला.प्रत्येकाचा सहभाग मैफिलीत अनिवार्य असल्याने,माझी पाळी आली आणि एकदम मला कविता आठवली पाहिजे,याची जाणीव झाली. आधीच संध्याकाळी कमलाच्या आठवणीने,ओरखडा गेला होता, तर आता एकदम, अलकाच्या आठवणीने,खपलीच निघाली. त्या रात्री पंधरा /सोळा जणांच्या गर्दीत मी पुन्हा एकटा पडलो.

"विरू लक्ष कुठे आहे? कोणती कविता म्हणतोस?" या प्रश्नाने भानावर आलो.

"खरतर किरणने पंडित हृदयनाथजींचे – ‘वेगवेगळी फुले उमलली रचुनी त्याचे झेले

एकमेकांवरी उधळली गेले ते दिन गेले.’

हे गाणे म्हणून सर्वांनाच,एका सुरेख आणि रम्य आठवणीत नेत,कातर केले होते.तरीही मी काही न काही म्हणणे जरुरीचे होते. मग मी कविता सुचणे आणि ती फुलणे,उमलणे हे एक वेगळेच रसायन असते,असे सांगत माझी पुढील कविता वाचून दाखवली. मन मात्र म्हणत होते रचना,कवितेस उद्देशून आहे कि ??????

तिने यावे वाटते तेंव्हा ती रुसते

तिची आठवण होता मन खुदकन हसते,

ती इथेच तर आहे मीच मला समजावतो

सहवासाने तिच्या मनोमन सुखावतो!

कधी कधी ती धावून येते

आषाढ मेघापरी पुरेपूर बरसते,

कधी कधी ती सहज येते

श्रावण सरीसारखी हुलकावणी देते!

तिचे येणे तिचे जाणे

जणू चांदणीचे गूढ आभाळी लपणे,

तिच्या आगमनाने चैत्र पालवी बहरते

तिच्या स्पर्शाने ती वैशाख वणवा विझवते!

येणे जाणे तिचे असुनी इतके अनिश्चित

मन मंदिरी तेवते आठवाची ज्योत सदोदित,

कोणाची हि कोणासाठी चाललीय प्रार्थना ?

प्रवेशिता गाभाऱ्यात कोण थांबावी स्पंदना ?

कोण बरे हि प्रतिभा कि कल्पना

का 'कविता' माझी आहे हि नुसतीच वल्गना!!

हि कविता आणि किरणचे गाणे यामुळे झालेल्या भावूक वातावरण मैफिलीची सांगता झाली. आणि

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

हि कविता आणि किरणचे गाणे यामुळे झालेल्या भावूक वातावरण मैफिलीची सांगता झाली. आणि>>> आणि??? आजही पार्सल नाहीच??? किती ताणताय किंकर.... हे बरे नोहे!!! इतकं ताणल्यानंतर आता पार्सलमध्ये काहीतरी बंडल गोष्टी निघाल्या ना, तर आम्ही वाचक संतापू बरं का तुमच्यावर Wink
Proud

असो, आवडला आजचा भाग! Happy

किती ताणताय किंकर.... हे बरे नोहे!!! इतकं ताणल्यानंतर आता पार्सलमध्ये काहीतरी बंडल गोष्टी निघाल्या ना, तर आम्ही वाचक संतापू बरं का तुमच्यावर>> अगदी अगदी सानी मी पण हेच लिहिणार होते की किती ताणताय म्हणुन.. Happy
बाकी छान. Happy

काय हे सानी! त्यांनी लिहीलय ना '......त्याही जशा हाती आल्या तशा!' त्याच्या हाती मुद्याच्या नोंदी (ज्या आपल्याला अपेक्षित आहेत त्या!) अजुन आल्या नसतील. जशी पानं सापडताहेत तसं ते ईथे टाकताहेत ना?
किंकर, Light 1 Light 1