गोष्ट अल्केची -डायरीतील नोंदी त्याही जशा हाताशी आल्या तश्या -भाग दोन

Submitted by किंकर on 14 February, 2011 - 17:15

भाग दोन
ठिकाण - माझेच घर वेळ - शनिवार मध्यरात्र महिना ( थंडीचा) - ऑक्टोबर १९८३
खरच मी या नोंदी का आणि कुणासाठी ठेवतोय.बेसिक, डी.ए.,टी.ए.,च्या नोंदी ठेवायला बसलाय ना तो कुलकर्णी, मग ना मला जमेची काळजी ना मला खर्चाची चिंता. मग या अवेळी का म्हणून मी माझी रोजनिशी उघडून बसलोय. रोजच्या खर्चा बाबत माझा एक कोकणातील काका नेहमी म्हणायचा , "जमा खर्च कसला लिहतोस शिंच्या ? नेहरू गेली पंधरा वर्षे मांडतोय जमाखर्च पाच वर्षे संपतात कि हा म्हणतो झाली पंच वार्षिक योजना. असा आला रुपया ,आणि असा गेला रुपया. शिल्लक काय तर म्हणे वाढलेली तुट. म्हटले लेका जोपर्यंत काळीज तुटत नाही ना गरिबासाठी तोपर्यंत कितीही पंच वार्षिक योजना मांडा तुटच वाढणार म्हणून म्हणतो, कसला जमाखर्च लिहितोस, येईल ती जमा होईल तो खरच आणि राहील ती शिल्लक. अरे नोंदी काय खर्चले याच्या काय ठेवतोस काय कमावलेस त्याच्या ठेव."
आज त्या काकाची आठवण का आली. खर्चले काय नोंदवू नको हे ठीक पण कमावले काय? हे नोंदवायला माझ्या कडे काय आहे ? अलकाकडे जेवायला थांबायला नको होते का ? तिचा मी घरी जातात न बोलता बाहेर पडलेला भाऊ, वडिलांचे कामाचे निमित्त काढून बाहेर पडणे, याचा काय आर्थ घेवू. का हे सगळे फक्त माझ्या मनाचे खेळ आहेत. तिचे घरी बोलावणे हे एक कर्तव्य होते कि, सिंहगडावर मी शेली झालो असे वाटले तिला मनात. माझे मलाच काही समजेना झाले आहे. ती आमच्या ऑफिसमध्ये आली हे त्या मित्रास सांगितले तर त्याने तर जपून राहा असा सल्ला न मागताच का दिला असेल. जावूदे आज काहीच नको लिहायला. डोके भणभणणुन गेलेय. तिकडे ती अलका गेली असेल स्वप्नात दंगून आणि मी बसलोय इथे डोके धरून. नाही पण एक खरे अलकाच्या घरी जावून आल्यापासून जोश्या मात्र कावून बघत असतो, असे वाटायला लागलेय. जाऊ दे झोपून जावे.
ठिकाण- थेऊर पेशव्यांची समाधी. वेळ दुपारी चारची महिना- (अरे नवीन वर्ष सुरु पण झाले की)जानेवारी १९८४
खरच कि दिवस कुणासाठी थांबत नाहीत हेच खरे. जोश्यांची तिरकी नजर, खडूस बॉस, ऑफिस मधील कामाचा रगाडा, असूनही दिवस बरे चालले होते. "का म्हणे बरे? अरे चांगले म्हण कि," असा आवाज घुमला मग लक्षात आले अरे हा तर माझाच आवाज म्हणजे आतला हो कारण तो फक्त मलाच ऐकू येतो. मी म्हटले बर बाबा चांगले म्हणतो. आणि मग विचार केला अरे खरच कि हल्ली अलका जोश्याच्या नजरेला भिक न घालता मजेत काम करते वर मला म्हणते, "तू आहेस ना इथे मग मला काय त्याची भीती ? नुसता बघतोय तर मेला?" मी म्हटले "वा! मी नवीन आलो तेंव्हा हे तुझे जोशीसर होते आता अगदी ‘मेला’ झाला का ? " त्यावर दोन दिवस रुसून लगेच अबोला धरत कसली रे चेष्टा करतोस म्हणून हि बया गप्प.आणि आज काय तर म्हणे थेऊर ला जावू मी म्हटले कुठे उन्हातान्हात? तर म्हणाली आज चतुर्थी आहे नमस्कार करून येवू. मला वाटले घरचे कोणीतरी बरोबर असेल कारण मला परस्पर पुल गेटला बोलावले होते. आणि पोहचल्यावर पाहतो तर काय ? आज तिच्या त्या आवड्त्या रंगाच्या साडीत आणि तेही एकटीच. मग आम्ही बसने थेउरला. पी.एम.टी.त शेजारी अलका.
मला वाटतेय रस्त्याच्या दुरवस्थेला त्या दिवशी पहिल्यांदा मी शिव्या न घालता, आणि ड्रायव्हरला दुवा देत होतो. नाही ना कळले. अहो शेजारी अलका आणि रस्त्याची हि अवस्था वारंवार मला अलकाच्या समीप नेत होती. जणू प्रत्येक धक्का सुखद लहर अंगावर उठवत होता. मन म्हणाले वा विरू, काल परवा पर्यंत तिच्या घरी गेलो ते चूक का बरोबर सिहंगडावरील स्वारी करायला हवीच होती का ? असे प्रश्न स्वतःला विचारणारा तू आज अगदी बरे झाले रस्त्याला खड्डे आहेत. ड्रायव्हर गाडी गचके देत चालवतोय म्हणून मजा चाललीय. असा विचार करतोयस.सिहंगडावरील शेळपट शेळी पुन्हा वाघ झाली वाटते. पुन्हा विचार आला शेजारी वाघीण असताना मी का सारखा शेळी होवू. आणि अचानक ती म्हणाली अरे मगापासून बघतेय इतका का भिरभिरतोयस चित्त आहे कोठे ? आणि मी काही न सुचून एकदम प्रश्न केला हे काय ? सुट्टीच्या दिवशी एकदम थेऊर ? एवढे काय मागायचे आहे गजाननास. तर ती म्हणाली देवळात जावू दर्शन घेवू मग सांगीनच. आणि संपू नये वाटणारा प्रवास संपला. बस देवळासमोर थांबली. पटकन खाली उतरत तिने प्रथम पूजेचे ताट घेतले. मग म्हणाली, चल प्रथम नमस्कार करू.
गाभाऱ्यात प्रवेश करण्यापूर्वी तिने डोक्यावरून पदर घेतला. जणू काही पुरेपूर खानदानी सौंदर्यच देवा समोर लीन झाले होते. मी भारावून मागे उभा. इतक्यात तेथील पुजाऱ्याने आवाज दिला. त्यांना ओवाळणी करुदे पण नमस्कार जोडीनेच करा. माझ्या कानात तापलेले शिसेच कोणीतरी ओतले आहे असे वाटले. मी वळून पहिले तर अलका मिटल्या डोळ्यांनी व भावपूर्ण चेहऱ्याने नतमस्तक झाली होती. पुजाऱ्याचे शब्दांचा काहीच परिणाम दिसत नव्हता. मी यांत्रिकपणे पुढे झालो आम्ही जोडीने नमस्कार केला. पुजाऱ्याने कृतार्थपणे "सुखी व्हा!" आशीर्वाद दिला.
एखाद्या चित्रपटात शोभेल अशी वेगाने घडून गेलेली घटना. पण मला मात्र काहीच सुचत नव्हते. आमच्या दोघांचे पाय आपोआप माधवरावांचे समाधी कडे वळले. वातावरणात एक वेगळाच ताण आला होता. शेवटी मीच विचारले कशासाठी आली होतीस देवळात काय मागितलेस. तर म्हणाली , खरे सांगू काय मागावे हे ठरत नव्हते. पण गुरूजींनी जोडीने नमस्कार करा असे म्हटले आणि मीही तेच मागून बसले. किती छान होईल ना आपण जोडीने नमस्कारास आलो तर ? मी काहीच बोलू शकलो नाही. बस मधील गंमत वेगळी आणि हा निर्णय काहीच सुचत नव्हते. मी म्हटले आपण थोडे थांबू मग काय ते ठरवू. तर डोळ्यात येणारे अश्रू अडवत ती इतकेच बोलली कि, मला आहे वाट पहायची सवय. मी थांबीन
ठिकाण - पुणे विद्यापीठ जानेवारी (छे छे नुसता जानेवारी नाही २६ जानेवारी ) वेळ - जवळ जवळ सगळा दिवसच म्हणाना !)
मला समजेनाच झाले आहे . काय चाललेय. या महिन्याचे सुरवातीस थेऊरला जाणे होते काय, तिथे त्या गुरुजींकडून जोडीने नमस्कार करा असे सहज म्हटले जाते काय ? आणि त्या दिवसापासुन अलकाचे वागणे बदलते काय. आता खर सांगायचे तर मलाही काही अगदी धक्का बसला वगैरे नाही, कळत न कळत ती आवडू लागली आहे.मन हल्ली तिचाच विचार करते आहे.पण लगेच मन व्यवहारी पण बनते. अजून बहिणीचे लग्न झालेले नाही. स्वतःचे स्वतंत्र घर नाही. जावू दे असेल इतकी ओढ तर थांबेल नाहीतर आणखी कोणी तरी. एकूण काय तर मनाचेच नव्हे माझेच काय ते ठरत नाही. पण हल्ली तिने बोलावे भेटावे असेही वाटू लागले आहे. आज सुट्टी आणि सकाळीच तिचा फोन. काय करतोयस. मी म्हटले का ग ? तर भेटूयात का बाहेर कुठेतरी. मग काय माझे लगेच हो झाले. जिमखान्यावर एक तासात येतो म्हणून फोन बंद. मनात थोडी भीती , थोड्या आनंदाच्या उकळ्या. काय करावे कुठे जावे.
मी पंधरा मिनिटात जिमखान्यावर. अलाकास येण्यास वेळ होता. म्हणून बस बघत निर्कीकारपणे उभा इतक्यात ऑफिस मधील जोशीबुवा समोर काय सुट्टीच्या दिवशी झोप काढायचे सोडून इथे काय करताय ? मला सुचेचना काय सांगावे. इतक्यात समोर पुणे विद्यापीठाची बस आली आणि मी दिले ठोकून काही नाही विद्यापीठात चाललोय. थोडी माहिती घेण्यासाठी. तर मला म्हणतात कसे, अहो आज कुत्रे सुद्धा दिसणार नाही तिकडे. मग काय एका खोट्या मागोमाग दुसरे खोटे. मी विद्यापीठाचे ऑफिसला नाही चाललेलो. तिथे कॉलनीत माझे परिचित सर राहतात त्यांच्याकडे चर्चा करायला चाललो आहे. थोडे पुढील शिक्षण घ्यावे म्हणतोय ना! म्हणून. आणि मनात आता या जोश्या समोर अलका नाही उगवली तरच बरे. इतक्यात जोशिबुवांचीच बस आली. मी सुटलो.मनात हुश्य केले. पण म्हटले अरे अलका बरोबर जायला खरच विद्यापीठ सारखे सुरेख ठिकाण नाही.एक तर आपल्या ओळखीचे कोणी नसते. आणि परिसर देखील शांत असतो. तोच समोरून अलका राणी हजर . खरोखर आज ती रोजची वाटतच नव्हती. सुरेखसा फिकट अबोली रंगाचा पंजाबी ड्रेस आणि हलकासा मेक अप. मला तर धड धडायलाच लागले. मलाच विचारतीय काय ठरले कुठे जावूयात. का जावून बसायचे सिनेमाला. पण का कोण जाणे वाटले सिनेमा नकोच आज कोठे तरी निवांत गप्पा मारता येतील असे दूर जावे. मी म्हटले, चल आपण विद्यापीठात जावू. समोर बस होतीच आम्ही बस मध्ये बसलो , बस सुरु झाली माझे मन मात्र आज तिच्या पहिल्या भेटी पासुनंचा आढावा घेवू लागले. माझे शांत बसणे पाहून तिने विचारले काय रे मूड नव्हता का तुझा आज. मी म्हटले नाही ग आज खूप खूप बोलायचे आहे. मग मात्र ती हलकेच हसत खिडकीतून बाहेर पाहत निवांत बसून राहिली. बस विद्यापीठात पोचायला सकाळचे अकरा वाजले. पण हवा छान होती. वातावरणातला गारवा सुखद वाटत होता. आज विद्यापीठ बंद असल्याने निरव शांतता भरून राहिली होती. आम्ही जयकर ग्रंथालयाचे पायरीवर येवून बसलो. मी हलकेच तिचा हात हातात घेतला डोळे भरून तिच्या कडे पाहिले.तिच्या चेहऱ्यावर एक आठवणींचे हसू लहरत होते. मनात एक लहर उठली.मी तिला एकदम पण सहजतेने विचारले. काय झाले? आणि तिच्या उत्तराने एकदम उडालोच. मला म्हणाली, अनवधानाने पण पहिल्या चुंबनाची आठवण झाली. मला कळेना हि काय म्हणतेय. आणि ती बोलू लागली. हे बघ. मी तुझ्याशी कधीच खोटे बोलणार नाही. मी बारावीत असतानाची गोष्ट,मी माझ्या मैत्रिणीकडे अभ्यासास गेले होते. आम्ही तिच्या घरी माडीवरच्या खोलीत अभ्यास करत होतो. माझी मैत्रीण पटकन चहा घेवू म्हणत उठून चहा करायला खाली गेली. मी एकटीच खोलीत होत रे आणि इतक्यात तिचा भाऊ कुठूनसा वर आला. वर आला, आणि काय करतेस ? म्हणत समोर येवून उभा राहिला. मी पटकन उठून उभी राहिले, त्याने काहीच न बोलता अचानक मला जवळ घेत माझ्या ओठावर ओठ टेकवून एक दीर्घ चुंबन घेतले आणि माफ कर राहवलेच नाही असे म्हणत निघून गेला. मला देखील काहीच सुचेना पण आई बोलावत आहे म्हणत मी जे बाहेर पडले ते पुन्हा कधीच तिकडे फिरकले पण नाही.
आज तू हात हातात घेतलास अन तशीच लहर अंगावरून उठत गेली रे. मी ऐकून सुन्न झालो. ती खरे बोलली हे महत्वाचे कि आजही पाच वर्षांनतर ती तो स्पर्श विसरू शकत नाही हे महत्वाचे. मलाच काही सुचे ना. मी म्हणालो चल आपण निघू. तर तिने स्पष्टच विचारले. का हे ऐकल्यावर राग आला का. मी काहीच बोलू शकलो नाही. निदान त्या क्षणी तरी मला अस्वस्थ वाटून मन हळवे झाले. ती नि मी उठून न बोलता बसकडे चालू लागलो. आमचा दिवस संपला होता. (क्रमशः)

गुलमोहर: 
शब्दखुणा: