शाळा : नसलेली कादंबरी.

Submitted by A M I T on 4 February, 2011 - 05:45

मध्यंतरी मिलिंद बोकील यांची "शाळा" कादंबरी वाचनात आली. साहजिकच माझ्या शालेय जीवनातील आठवणी चाळवल्या आणि आज किबोर्डावर बोटांची "चाळवाचाळव" करून त्या तुमच्यासमोर मांडतोय. कमी-अधिक फरकाने माझ्या या आठवणी तुमच्या शालेय आठवणींशी साधर्म्य राखतील, अशी आशा आहे.

अगदी पहिल्या इयत्तेपासून नाही सांगत. सरळ येतोय दहावीत. आमच्या नववीतील चार तुकड्यांचे दहावीत दोनच तुकड्यांत रूपांतर झाले. अ आणि ब. आमची तुकडी ब. १० वी ब. उन्हाळी सुट्टी संपून शाळेतला पहिला दिवस होता. मी दरवाज्यापासून तिसर्‍या रांगेतला शेवटला बाक पकडला. कारण पहिल्या दिवशी आपण जो बाक पकडतो तो वर्षभर आपल्या मालकीचा राहतो. शेवटला यासाठीच.... कारण मागच्या वर्षीचा अनुभव गाठीशी होता. नववीत मी शाळा सुरू झाल्यापासून २-३ दिवसानंतर शाळेत गेल्यामुळे सरांच्या टेबलासमोरील बाकावर बसणे भाग पडले. त्याचा परिणाम.... सगळ्याच विषयांवरील सर शिकवत असताना हुक्की आल्यासारखे मध्येच मलाच प्रश्न विचारीत. तेव्हा माझी अवस्था अचानक हल्ला झाल्यामुळे गोंधळून गेलेल्या सैनिकासारखी व्हायची. मी फक्त ठोकळ्यासारखा उभा राहून समोरचा फळा निरखत असे. तेव्हापासून मी मुलींच्या चेष्टेचा विषय बनलो.
मग कधी कधी ऑफ पिरीयडला आनंद शिंदेंच्या गाण्यावर आम्ही या बाकांना मनसोक्त बडवत असू. वर्गात सागरचा आवाज तसा होता. काय गाणं गायचा तो? वाह..! मी त्याला कौतूकाने "सर्व सुरांचा सागरू" म्हणायचो. वर्गात ज्या ३-४ जणांच्या ओठांवर कोवळं मिसरूड फुटलं होतं, त्यातला तो एक होता.

वर्गातल्या फळ्यावर वरच्या बाजूला लिहलेलं "विद्या विनयेन शोभते" हे सुभाषित आम्हांला वर्षभर पुरलं. त्याचा योग्य अर्थ आमच्याच वर्गातल्या "विद्या विनयला शोभते" असा सोयीचा लावून आमच्या वर्गाने त्या दोघांना चिडवून जेरीस आणले होते. त्यांचं काहीतरी "गुटर्गू" चालू आहे, अशी चर्चा वरचेवर वर्गात रंगत असे. विनयने म्हणे एकदा विद्याला लव्हलेटरही लिहलं होतं. तिनं मात्र ते तडक प्रिन्सिपलकडे सुपूर्त केलं. प्रिन्सीपलनी मग विनयला आपल्या केबिनात बोलावून चांगलीच "हजेरी" घेतली आणि वर आई-बाबांना बोलावण्यासंबंधीची नोटीसही दिली. प्रेमाच्या या "साईड इफेक्टस्"नी विनय पुरता घायाळ झाला. नंतर तो हरवल्यासारखा एकटक खिडकीबाहेर बघत बसे. सर मग त्याला खडू फेकून मारत असत. म्हणूनच की काय आम्ही त्या सरांना "खडू"स सर म्हणत असू.

एकदा विज्ञानाच्या तासाला कुणीतरी आपल्या पोटातला गलबला विचित्र चिरक्या आवाजात पेश केला आणि वर्गात हसण्याची चढाओढ लागली. प्रत्येकजण आपल्या शेजार्‍याकडे संशयित नजरेने पाहून उगाचच नाक पकडी. सरांच्या नजरेच्या जरबेनं आणि भेदक डरकाळीनं वर्ग शांत झाला. सर पुढे शिकवू लागले. शिकवत असताना एक शब्द असा आला की सबंध वर्ग पुन्हा खदखदला.
तो शब्द होता...... "पुनरूत्पादन...!!"
याच सरांनी कधीतरी आम्हांला प्रयोगशाळेत नेवून साबण बनवण्याचं प्रात्यक्षिक दाखवलं. साबण तयार झाला खरा पण त्याला फेस काही येईना. सरांनी त्यात कुठलं तरी रसायन कमी पडल्याचं कारण पुढं केलं.
आमचा वर्ग प्रयोगशाळेनजिक असल्यामुळे कधी कधी त्या प्रयोगशाळेतून कुठल्यातरी रसायनाचा येणारा कुजकट अंड्याच्या बलकासारखा वास आमच्या नाकातील नुकतेच उगवू घातलेले केस जाळी.

आमच्या हिंदीच्या सरांनी चौथ्यांदा निबंधाच्या वह्या पुर्ण करून तपासण्यासाठी मागितल्या. मनोज उर्फ मन्या नावाचा माझ्या मित्राने (तो आणि मी एकाच बाकावर बसत असू.) आतापर्यंत एकही निबंध तपासून घेतला नव्हता. आता त्याला सरांच्या ठोकशाहीला सामोर जावं लागणार होतं. संध्याकाळी मी त्याच्या घरी गेलो. तो सॉल्लीड टेन्शनमधे होता. दोघांनी खुप विचार केला आणि या निर्णयाप्रत पोहोचलो की, मी सरांच्या सहीची नक्कल करायची. मन्याने मग आतापर्यंतचे सगळे निबंध खरडले. लाल रंगाच्या शाईच्या पेनाची उपलब्धी झाली. मी आधी रफ कागदावर सरांच्या सहीचा सराव केला, मग मनाचा हिय्या करून सह्या केल्या. आमच्या दोघांच्याही "दृष्टी"ने त्या अगदी हुबेहूब होत्या..!
पण हाय रे दैवा..! दूसर्‍या दिवशी सरांनी त्या नकली सह्या ओळखल्या आणि मन्यावर त्यांची वक्र"दृष्टी" झाली. त्यांची आखुड पण जाडसर बोटे मन्याच्या गाल आणि पाठीवर विजेसारखी (तशाच आवाजासह) कोसळू लागली. मी चरकलो. ह्याने जर माझं शुभनाव आपल्या मुखात घेतलं, तर माझ्याही श्री"मुखात" भडकवायचे सर राहणार नव्हते. पण नाही...! हिंदी चित्रपटातल्यासारखा पोलीसांकडून मार खावून घेणार्‍या सराईत गुंडाप्रमाणे त्याने मार खाल्ला. पण तोंडातून "अ" (हे माझ्या नावाचं इनिशियल आहे. "ब्र" काढायला माझं नाव काय "ब्रम्हा" नाहीए.) काढला नाही.
मी "सही"सलामत सुटलो होतो. नंतर बराच वेळ तो बाकावर डोके टेकवून रडत होता. तास संपल्यावर सर वर्गाबाहेर गेले. मुलींकडून चुकचुकण्याचे आवाज झाले.
"बाई..! आज सर कित्ती पिऊन आलेत? त्यांचीच सही त्यांना ओळखू येत नाही" मुलींमध्ये कुजबुज सुरू झाली. ही मन्याबद्दलची सहानुभूती होती.
हे हिंदीचे सर शाळेत येताना वरचेवर ढोसून येतात, ही माहीती आमच्या वर्गालाच काय? सबंध शाळेलाच ज्ञात होती. त्यामुळेच मुलींचा तसा समज झाला असावा.
यावर मी आणि मन्याने एकमेकांकडे पाहून डोळे मिचकावले.
या मन्याचे काही किस्से थोडक्यात इथे सांगतो -
मन्या वर्तुळ काढण्यासाठी १ रूपयाच्या नाण्याचा वापर करायचा.
इंग्रजीचे सर एखादा पॅरेग्राफ (अर्थात इंग्रजीत) सांगत असताना मन्या घाईघाईत इंग्रजी शब्दांचे मराठी उच्चार लिहायचा. म्हणजे बघा असं... Krissh was brave man तर तो लिहायचा - "क्रिश वॉज ब्रेव्ह मॅन."
परीक्षेच्या वेळी तो प्रत्येक विषयाचं गाईड आम्ही शाळेपासून दूर जिथं "लघुशंका" करायला जायचो तिथल्या झाडीत लपवून ठेवायचा आणि मग पेपर लिहताना सरांना लघवीला जातोय असं सांगून उत्तरं पाहून यायचा.

परीक्षेच्या वेळी माझी परिस्थिती मात्र बिकट असायची.
म्हणजे बघा. परीक्षा ४ दिवसांवर आली की, ते "कल हो ना हो" चित्रपटातील गाणं आठवायचं..
"कुछ तो हुवा है. कुछ हो गया है.."
आणि प्रत्यक्ष परीक्षेच्या दिवशी प्रश्नपत्रिका पाहून त्याच गाण्यातील पुढच्या ओळी आठवायच्या...
"सब कुछ अलग है. सब कुछ नया है..."

परीक्षेचं सोडा. आमचे गणिताचे सर एखादं प्रकरण शिकवून संपलं की, त्यावर ५० गुणांची चाचणी घ्यायचे. ज्या विद्यार्थ्याला जितके मार्क कमी पडतील तितक्या छड्या बसायच्या.
यातल्या पहील्याच चाचणीत माझ्यावर फक्त २० मार्कच मेहेरबान झाले आणि सरांनी दिलेल्या ३० छड्या मी दोन्ही हातांवर वाटून वाटून खाल्ल्या. आता वर्गातील मुले मला ३० फटके खाणारा म्हणून "तीस मार खा" तर म्हणणार नाही ना? अशी भीती वाटू लागली.

१० वर्षानंतर शिक्षकांच्या "हाता"तून सुटका झाली आणि पुढं पुन्हा वडलांच्या "हाता"खाली मी ५ वर्षे काढली.

* * *

http://kolaantudya.blogspot.com/

गुलमोहर: 

मस्त लेख...enjoyed Happy

"बाई..! आज सर किती पिऊन आलेत? त्यांचीच सही त्यांना ओळखू येत नाही" >>>>>>>>>>>>>>>> Rofl

३० फटके खाणारा म्हणून "तीस मार खा">>>>>>>>> Rofl

धमाल रे....
पंचेस तर सॉलीड आहेत...

"बाई..! आज सर किती पिऊन आलेत? त्यांचीच सही त्यांना ओळखू येत नाही">>>>>
Biggrin

Lol
अमित खुपच छान लिहल आहे. शाळेचे दिवस आठवले Lol

<<"सब कुछ अलग है. सब कुछ नया है...">> << "बाई..! आज सर कित्ती पिऊन आलेत? त्यांचीच सही त्यांना ओळखू येत नाही" >> Rofl Rofl

कुछ तो हुवा है. कुछ हो गया है.."
आणि प्रत्यक्ष परीक्षेच्या दिवशी प्रश्नपत्रिका पाहून त्याच गाण्यातील पुढच्या ओळी आठवायच्या...
"सब कुछ अलग है. सब कुछ नया है..."

Lol
सही प्रकरण पण सही आहे.

छान जमलाय. आणखीन वाचायला आवडलं असतं.

प्रत्येकाच्या जीवनातील शाळा...........

आमचा सुद्धा वर्ग नेमका प्रयोगशाळे जवळ होता.....

आणि प्रत्येक सर खडुस... १०वी ला प्रतल आणि साइन ,कॉस, टिथा.........डोक्याबाहेर जायचे.......

अरे कसे रे चुकीचे अर्थ काढता राव.......

खरं तर ते "विद्या विनये "न" शोभते" असं म्हणून तू चान्स घ्यायला हवा होतास...... Proud

यु मिस्ड द बस बडी........ Rofl Lol