साबुदाण्याच्या खिचडीपासुन घरातल्यांनी माझा चांगलाच धसका घेतला होता. अगदी चहा जरी करायचा म्हणल तरी साबा माझ्या मागेच असायच्या. अगदी गॅस पेटवताना लाईटर घे इथपासुन कॅसेट सुरु करायच्या. आपण नैका नवीन मांजर पाळल्यावर त्याने कुठे तोंड घालू नये म्हणुन त्याच्या सारख मागे मागे करतो तस करायच्या.
इतरवेळी कुठल्याही कारणाने एकमेकांच्या अंगावर गुरगुरणारे सगळे मी काही करणार म्हणाले की एकत्र होऊन नाही म्हणायचे.
आज्जीबाई तर मला एवढ्या वचकुन होत्या जेवढ्या त्या त्यांच्या साबांनापण नसतील. मी दिसले की म्हणायच्या मला अज्जीबात भुक नाही ग सुने. आज मी सकाळचचं काहीतरी खाईन असेलतर, नाहीतर कपभर दुध घेइन.
लग्न झाल्यानंतर १०-१२ दिवसांनी आम्ही पुण्याला परतलो. ४ रुम्सच्या फ्लॅटमधे अगदी दोघेच नको म्हणुन साबांनी लहान दीराला सोबत पाठवलेले. आता ती सोबत की माझ्यावर पाळत हे सांगणे नलगे.
प्री आणि पोस्ट मॅरेज केळवणांमुळे पोटाची वाट लागलीच होती त्यातुन भर म्हणजे माझा स्वयंपाक. नवरा तर पुण्यात आल्याआल्याच म्हणाला की मेसच्या काकुंना एक वाढीव डबा सांगायचा का?
हा अपमान मला जिव्हारी लागला आणि मी पाककलेची जेवढी म्हणुन मिळतील तेवढी सगळी पुस्तके नवर्यालाच आणायला सांगीतली. नवर्याच्या इंजिनियरिंच्या पुस्तकांच्या रांगेत ती पण विराजमान झाली. टॉमशेजारी संजीव कपुर दात दाखवायला लागला. निलेश लिमये आणि मंगला बर्वेंना डिझाईन ऑफ मशिन्सशेजारी स्थान मिळाले.
कधीनव्हे ती आमची स्टडी पुर्ण पुस्तकांनी भरुन गेली.
नमनालाच पळीभर तेल झालं का?? तर कथा सुरु करते आता.
संकट आली की कशी जोडीने हातात हात घालुन येतात नै?? सगळ्या मैत्रींणींमधे माझचं घर मोठ आणि अधिक लोकसंख्या नसलेल (सासरची मंडळी वाढली की कुटुंबाची जनता होते हे माझ्या जवळच्या मैत्रीणीच मत, माझ नाही बरका). एका मैत्रीणीला केळवण माझ्याच घरी करायच ठरल तोपर्यंत त्यांच्यापर्यंत माझ्या स्वयंपाक कलेची किर्ती पोहचली नव्हती म्हणुन बहुदा हा मान मला मिळाला असावा हे नौरोजींच मत.
केळवणच करते आहेस तर डझनभर केळीच दे, उगाच लग्नाआधी तिच्या पोटावर कशाला अन्याय? अस शालजोडीतुन मारायला तो विसरला नाही
तर सगळ्यांना जमणारा आणि सुट्टीचा दिवस म्हणुन चतुर्थीला सगळ्यांनी जमायच ठरल. आता उपवास म्हणजे काहीतरी साबुदाण्याचचं करण आल आणि साबुदाणा म्हणल की मला किंबहुना, नवर्याला धडकी भरते व अचानकच त्याच्या पोटात तरी दुखायला लागत किंवा मित्राकडे जेवायच आमंत्रण तरी येत.:अओ:
खुप विचारांती मी साबुदाणा वडा करायच ठरवल (ठरवल कसल मला त्यातल्या त्यात तेच जमेल अस वाटल म्हणुन).
आईसाहेबांना लगेचच फोन केला व कृती लिहुन घेतली. आईने सांगीतल्याप्रमाणे माझ्या सहा मैत्रीणी आणि आम्ही घरातले ३ अधिक वाढीव दोन अश्या सगळ्यांना मिळुन एक किलोचे वडे पुरणार होते.
मी दोन दिवस आधीच तयारीला लागले. साहित्यामधे साबुदाणा, शेंगदाणे, बटाटे प्रत्येकी एक किलो, मिरची कोथिंबीर, जिरे, थोडस आलं मीठ साखर आणि तेल आवश्यकतेनुसार सगळ आणुन ठेवल. लग्नाला महिनासुद्धा न झाल्याने घरात वाणसामानाची गरजेनुसार साठवण होती (तस नव्हतीच म्हणायला हरकत नाही कारण बर्याचदा नवरा उदार अंत:करणाने बाहेरच जेवायला न्यायचा) आणि फ्रीज तत्सम गोष्टी ठेवण्याची गरज भासली नव्हती, म्हणुन ओल्या फडक्यात मिरची कोथिंबीर गुंडाळुन ठेवली. कुणीतरी लग्नात गीफ्ट दिलेला मिक्सर आता उपयोगी आला. दाणे भाजुन कुट करुन ठेवला. सगळी प्राथमिक तयारी करुन ठेवली.
अखेर तो सुदिन उगवला. भल्या पहाटे उठुन यावेळी न विसरता साबुदाणा भिजत टाकला हो नाहीतर लिबलिबीत/टणक्/कडक वडेच खायला लागले असते मागच्या वेळेसारखे. मिरची कोथिंबीर वाटुन ठेवली. सगळ्या मैत्रींणींना आठवण करुन दिली उपवासाची आणि माझ्याकडे भेटण्याची परत एकदा. कस असत ना, खायला बोलवायच आणि आठवणही आपणच करुन द्यायची. मुलांच बर असत खायला संध्याकाळी बोलावल की सकाळीच हजर होतात.
एवढ्या अथक परिश्रमानंतर एक डुलकी काढु म्हणल तर अगदी ऐनवेळी जिला केळवण होत तिचा फोन आला की काही कारणास्तव तिला यायला जमणार नव्हत. तिच्या सासरचे कुणी काका-मामा तिला पहायला आलेले गावाकडुन आणि तिने असं संध्याकाळी बाहेर जाण चांगल दिसल नसत म्हणुन ती येणार नव्हती. आता ज्याला करायचय त्याने गळ्यात धोंडा बांधल्यावर बाकिच्यांनी कशाला मिरच्या ओवाळायच्या हे काय मला कळल नाही पण मला विचारतोय कोण ना??
दिवसा डोळयासमोर तारे चमकले माझ्या. डोळे चोळुन परत एकदा फोनकडे बघितल, चिमटा काढला स्वतःला पण ते खर होत. परिक्षेची तयारी करावी व ऐनवेळी पेपर कॅन्सल व्हावा तस झाल माझ.
तोपर्यंत मी बटाटे उकडुन कुस्करुन ठेवले होते. अर्थात ही बातमी (मैत्रीण न येण्याची) बाकिच्यांपर्यंत पोहचली होती. मग कुणाच्या मुलाला ताप आला, कुणाची सासुच अचानक आली, कुणाच्या नवर्याला अॅक्सिडेंट झाला (गाडीच साईडस्टँड जरी पायाला लागल तरी त्याला अॅक्सिडेंट म्हणायची पुण्यात पद्धत आहे) म्हणुन चौघी गळाल्या. मग आता येणार्या मैत्रीणी एक आम्ही घरचे तीन व वाढीव दोन. आता हे वाढीव दोन कोण हे मलासुद्धा खरतर माहित नव्हत पण नेहमी काही करताना थोड वाढीव कराव अस आईने शिकवलेलं. तर ह्या समस्त सहा लोकांसाठी मी साबुदाणा वडा करणार होते.
बाकीच सगळ कॅन्सल झाल तरी भिजवलेला साबुदाणा डब्यात आणि उकडलेला बटाटा काही टोपलीत जाऊन बसणार नव्हता. हिस्टरी रिपीटस प्रमाणे परत एकदा या स्वयंपाकाच्या गडावर मी धारातिर्थी पडले होते. शेवटी संध्याकाळी हेच जेवण करु अस ठरवुन मी ते सगळ पीठ एकत्र केल. आता तो गोळा काही केल्या ताटात मावेना म्हणुन त्यातल्या त्यात मोठ्या पातेल्यात घेतला. आता तर दोन्ही हातांनी सुद्धा मळता येइना एवढा तो फुगला. कसाबसा कोंबुन कोंबुन बसवला पातेल्यात. हाताच्या प्रत्येक हालचालीबरोबर मैत्रीणींना शिव्या देवुन झाल्या.
शेवटी संध्याकाळी ६ वाजता मी वडे करायला सुरवात केली. गरमा गरम चार चार वडे नवरा व दिराला खायला दिल्यावर कधी नव्हे ती त्यांनीही माझी तारिफ केली. तोपर्यंत स्वयंपाकघरातला गोळा त्यांनी पाहिला नव्हता. खुप आग्रह करुन करुन मी त्यांना खायला घालत होते. कामावरुन आल्यावर चहाही न विचारणारी आपली पत्नी एकदम पतीव्रता कशी काय झाली हे आश्चर्य नवर्याच्या तोंडावर मावत नव्हते.
दिराला या सरबराईमधे माझा काय गनिमी कावा आहे का अशी शंका आलेली पाहिली मी कारण तो अगदी बारीक डोळे करुन एकदा माझ्याकडे व एकदा वड्यांकडे बघत होता व नंतर तोंडात घास घेत होता.
मग माझी मैत्रीण उगवली. तिनेही पोट ठीक नसल्याचा बहाणा करुन दोनच वडे खाल्ले. तरी मी तिच्याबरोबर १०-१२ वडे बांधुन दिले मुलांसाठी व नवर्यासाठी (माझ्याच एकट्या नवर्याचे का हाल??) . मग शेजारच्या काकुंना गरम गरम ४ वडे डीश मधे घालुन दिले. आणि त्या वाढीव पाहुण्यांची वाट पाहु लागले. इतरवेळी काय, कसं करुन डोकावणारे कुणीही आज फिरकत नव्हते.
आज अगदी कुरियरवाला, पोस्टमन, कुरड्यापापड विकणारे, सेल्सगर्ल कुणीही चालल असत पण ही बाईच खडुस अशी माझी ओळख बहुदा शेजार्यानी करुन दिली असणार किंवा त्यांची कुणाचिही चतुर्थी नसणार म्हणुन कुणी डोकावत नव्हते. अगदी शेजारी यायचे पण माझ्यादारी ढुंकुनही बघायचे नाहीत. बाहेर येवुन मी चुकुन कुलुप तर लावल्यासारख दिसत नाही ना घराला याची खात्री पण केली.
एरवी नवर्याचे कुणी मित्र आले की नाक मुरडणारी मी त्याला आग्रहाने सांगीतले की अरे बोलाव तुझ्या मित्रांना बरेच दिवसात कुणी फिरकल नाही. त्यांनाही साबुदाणे वडे खुप आवडतात ना? (फुकटचे बाजीराव मेले. येतात आणि कचरा करुन जातात. माझ घर काय धर्मशाळा वाटते का यांना अस नवर्याच्या कानात चारवेळा ओरडुन झाल्यावर आता कुठे यायचे बंद झाले आणि काय ही वेळ आणली देवाने माझ्यावर आज परत त्यांनाच बोलवाव लागतय) नवरा परत एकदा संभ्रमात. हिला झालय तरी काय म्हणुन. त्यांनाही बोलावल त्यांनीही तारीफ करुन करुन वडे खाल्ले. पण गोळ्याच आकारमान फक्त इंचा इंचाने कमी होत होत.
मित्र झाले, घरचे झाले, शेजारी पाजारी अगदी पॅसेजमधे खेळणार्या सोसायटीतल्या लहान मुलीपण झाल्या पण एवढं सगळ करुनसुद्धा गोळ्याचा निम्माभाग पण संपला नव्हता. आता मला खरच खुप धास्ती वाटायला लागली काय करायच काय याच??
आईला फोनुन विचारल आता काय करु एवढ्या मोठ्या गोळ्याच? तर तिने डोक्यावर हात मारलेला मला इथ बसुन दिसला कारण तिच पुढच वाक्य ऐकुन मी पिठाचा हात डोक्यावर मारल्याने केसात एक काय अनेक रुपेरी छटा आल्या होत्या. आईने सांगितलेल्या सगळ मिश्रण मिळुन एक किलोचा अर्थ मी प्रत्येक पदार्थ एक किलो असा घेतला होता. 
शेवटी रात्री दहा वाजता मी शेजार्यांची बेल वाजवली व काकुंना अगदी प्रेमाने विचारले की माझा एक पदार्थ तुम्ही तुमच्या फ्रीजमधे ठेवाल का??
काकु खरतर मनातुन शिव्याच देत असाव्यात पण चेहर्यावर हसु आणुन म्हणाल्या, "अग आण की त्यात काय मोठस?? "
पण माझ्या हातातल मोठसं पातेल पाहिल्यावर त्यांच्या चेहर्यावरच्या हास्याची जागा काळजीने घेतली. कारण माझ हे पातेल ठेवायला त्यांना त्यांचे बरेचसे पदार्थ बाहेर ठेवावे लागणार होते.
दुसर्या दिवशी पुन्हा नाष्ट्याला साबुदाण्याच थालिपीठ, दुपारी जेवणात वडे, डब्यात वडे, संध्याकाळी आल्यावर परत वडे. वडेच वडे नुसते. जिला केळवण होत तिला सुद्धा दुसर्या दिवशी डब्यातुन साबुदाणा वडा खायला घातला.
तीन दिवस आम्ही नुसत वडे, थालिपीठ - थालिपीठ, वडे आलटुन पालटुन खात होतो. शेजारच्या काकुंना शेजारधर्म अगदी सचोटीने पाळायची संधी देत होतो. मात्र दिवसागणीक पातेल्याचा आकार कमी होत होता तसं त्यांच्या चेहर्यावरच हास्य पुर्ववत होत होतं. आणि माझ्याबद्दलच्या कौतुकाची जागा नवर्याच्या तोंडातुन बाहेर पडणार्या साबुदाण्यांनी आपलं शिव्यानी घेतली होती
त्या दोन दिवसात जे कुणी पाहुणे माझ्या घरी आले त्यांची नाव सुद्धा आता आठवत नाहीत पण त्यांना दिलेल्या वड्यांची संख्या मात्र चांगली आठवतेय. सगळ घर नुसत वडामय झालेल.
नवर्याने मला धमकीच दिली पुढचे काही वर्ष साबुदाणा वड्याच नाव सुद्धा काढायच नाही. मित्रांनी, शेजार्यांनी आम्हाला वाळीतच टाकल होत, चुकुन घरी गेल तर मी त्यांना साबुदाणा वडा खायला घालीन म्हणुन.
शेजारच्या काकुंनी मला सोसायटीच्या भिशीगृपमधे सामील करुन लगेच नंबर पण दिला आणि नवीन फ्रीज आणायला लावला.
आता कुणी पाहुणे येणार असतील तर नवरा हापिसातुन येतानाच खायला घेवुन येतो किंवा आम्ही सगळेच बाहेर जातो जेवायला.
(No subject)
त्या दोन दिवसात जे कुणी
त्या दोन दिवसात जे कुणी पाहुणे माझ्या घरी आले त्यांची नाव सुद्धा आता आठवत नाहीत पण त्यांना दिलेल्या वड्यांची संख्या मात्र चांगली आठवतेय. सगळ घर नुसत वडामय झालेल.
नवर्याने मला धमकीच दिली पुढचे काही वर्ष साबुदाणा वड्याच नाव सुद्धा काढायच नाही. मित्रांनी, शेजार्यांनी आम्हाला वाळीतच टाकल होत, चुकुन घरी गेल तर मी त्यांना साबुदाणा वडा खायला घालीन म्हणुन.
शेजारच्या काकुंनी मला सोसायटीच्या भिशीगृपमधे सामील करुन लगेच नंबर पण दिला आणि नवीन फ्रीज आणायला लावला.<<<<<<<<<<अशक्य हसले अगदी डोळ्यातून साबुदाणा सोरी पाणी आले.:हहगलो:
शुभे पुन्हा वाचलं. पुन्हा
शुभे
पुन्हा वाचलं. पुन्हा खुप हसले.
(No subject)
भारी लिहीलंय. एकंदरच साबूदाणा
भारी लिहीलंय.
एकंदरच साबूदाणा पदार्थ जरा परिक्षा घेणारे. अगदी "साधे, सुटसुटित, फास्ट होणारे(म्हणून फास्ट ला चालतात वाटतं)" वाटले तरी बिघडले तर गोंद किंवा फेविस्टिक बनते.
अशक्य आहे हे. ऑफिसमध्ये वाचू
अशक्य आहे हे. ऑफिसमध्ये वाचू नये कुणी. एकटीच हसतिये प्रचंड
शुभांगी, मस्त लिहिले आहेस
शुभांगी, मस्त लिहिले आहेस साबुदाणा वडे पुराण. हसून हसून डोळ्यांत पाणी आले अगदी. अजून पुढचे खाणेप्रकार पण लिहीना.
सुरेख लेखनशैली
सुरेख लेखनशैली
(No subject)
आपण नैका नवीन मांजर पाळल्यावर
आपण नैका नवीन
:O 
मांजर पाळल्यावर त्याने कुठे तोंड घालू नये म्हणुन
त्याच्या सारख मागे मागे करतो तस
करायच्या.
फार गंमतीशीर आहे.....
फार गंमतीशीर आहे.....
गुब्बे लय भारी. प्रत्येक
गुब्बे लय भारी. प्रत्येक पदार्थ १ किलो घेतलास,
आता कुणी पाहुणे येणार असतील
आता कुणी पाहुणे येणार असतील तर नवरा हापिसातुन येतानाच खायला घेवुन येतो किंवा आम्ही सगळेच बाहेर जातो जेवायला.
अजूनही असंच का
आता एक्स्पर्ट झाली असशीलना सगळ्यात
मस्त लेख!
मस्त लेख!
(No subject)
मस्त खुसखुशीत लेखन.
मस्त खुसखुशीत लेखन.
माझं पण झालं होता असं मसाले भात कम पुलाव करताना.
तांदूळ 1.5kg plus vegetables 2kg+ असतील पाण्याचा अंदाज नाही आला. भात शिजतोच आहे आणि मी पाणी टाकतेंच आहे असं झालेलं.
(No subject)
(No subject)
Pages