अरेच्या ! हे काय नविनच.. नात्यांच्या पलिकडे जाऊन काय शोधण्याचा हा प्रयत्न? हा तर निव्वळ वेडेपणा असच म्हणाल ना तुम्ही? मग मला सांगा तुम्हीतरी आज किती नाती टिकवली आहेत अन कुठपर्यंत? एखादी व्यक्ती येते आपल्या आयुष्यात अन त्या व्यक्तीचा स्वार्थ अन आपला स्वार्थ एवढेच काय ते एकमेकांना ओळखतात, सोबत राहतात, वेळ घालवतात अन मग एकदा का स्वार्थ संपला की त्या नात्याचा अर्थ लावण्याअधीच वेगळे होतात. मग काही दिवस जातात मतंरलेल्या लाघव वेळांच्या सानिध्यात अन ना ती व्यक्ती पुन्हा भेटते ना तो क्षण आठवांच्या पारावर पिंगा घालताना दिसतो. अरे हे तर ज्याला ओळखत नव्हतो, काहीच माहीत नव्हतं अश्या लोकांविषयी पण आपण ज्याला ओळखतो, जे आपल्या जन्माच कारण आहेत असे आपले आई-वडील ज्या नात्याला जगात सर्वश्रेष्ठ समजलं जातं असं नातं, पण आज त्या नात्यात कितीसा पारदर्शकपणा राहीला आहे? मुलांकडून ह्या नात्याची लक्तरे तोडली जाताना आपण रोज वृत्तमानपत्रात, बातम्यात ऐकतोच. "मुलानेच स्वार्थासाठी आई-बापाच्या खूनाची सुपारी दिली" , "आईनेच मुलाच्या त्रासाला कंटाळून ठार केले" , बापाच्या व्यसनापाई आईचा खून करून मुलाची आत्महत्या.. " शी.. किती निर्लज्ज गोष्ठ आहे ही.. ! जिथे रक्तच विषापेक्षाही जहाल झालं आहे तीथे रक्ताची नाती म्हणजे नागव्या देहाचा चापून केलेला लिलाव फक्त
आज रक्ताच्या नात्यांचा जो बाजार मांडलेला दिसतो ना त्यावरून एकच शेर॑ आठवतो..
रिश्तों कि इस नये दोर मे, यहा अपने ही दूर हो गये..
परायोंपर क्या करे विश्वास, जहाँ जज्बात हि कमजोर हो गये..
आज जखमांवर फुंकर घालायला तर सोडाच पण जखमांतून वाहणारं रक्त हे आपलंच आहे हे मान्य करायलाही काही जण नकारतात अन मग त्या जखमा भरेपर्यंत मने पार पार गोठून गेलेली असतात. आज सख्खा भाऊ वैरी बनतो फक्त कागदी नोटांच्या घोडेबाजारासाठी. दुर्दैव याचं गोष्टीचं वाटतं क्षणिक सुखाच्या या मृगजळामागे धावताना आपण काय सोडून धावतो आहे हे मागे वळून पाहण्याइतकी सुद्धा लाज उरलेली नसते आपल्यात. अरे असे असेल तर या दुनियेत अनाथ म्हणून जन्माला आलेलच बरं निदान नाती जोडण्याचा आनंद अन ती जपण्याच्या धडपडीतून जे सुख मिळतं ना ते देव भेटल्यावरही मिळणार नाही असच असतं अगदी.. पुर्वी नात्यांचा गुंता हा हवाहवासा वाटायचा, नात्यांच्या गोंधळातही मन रमायचं, सण उत्सव याचे खरे महत्व अन खरा आनंद फक्त अन फक्त नात्यांच्या एकत्र सानिध्यातून मिळायचा. आज मात्र सण आले कि दीपोत्सवाला अंगण नसतं, साजरे करायला घर असतं पण मुक्या भिंतींच, डोईवर छप्पर असतं पण या नात्यांच्या विभक्तीकरणाच्या अट्टहासापोटी ते केव्हाच जाळीदार झालेलं असतं मग दु:खात आसवांची रांग लागते ना तसं ते छप्पर केव्हाही उर बडवून भोकाड पसरत राहतं अन त्याला गप्प करायला कोणीच नसतं असतात फक्त डोळे मिटून स्वार्थ सुखाचे हिंदोळे घेणारे ते मानवी युगुलांचे असंख्य झोके अन छपराकडे पाठ करून चालणारे ते चाळे.. ! फक्त एवढ्यासाठीच हवी असते ना प्रायव्हसी..
आज एक होतकरू मुलगा मोठ्या शहरात स्वत:च्या कमाईचा एखादा ब्लॉक, सुगरण नसली तरी चालेल पण कमवणारी अशी बायको, सुट्टीच्या दिवशी काही तासांचा फेरफटका मारून येता येईल अशी एखादी बुडाखाली दोन चाकांची फटफटी अन रात्रीच्या वेळी कटाक्षाने पाळलेली ती कुटुंब नियोजनासाठी लावून घेतलेली अचूक सवय..! इथे आई - बाप गेले कुठे, भावंड गेली कुठे? मित्र - मैत्रिणींचा तो जुना रम्यकाळ गेला कुठे ? अहो, तुमच्याकडे आनंद आहे पण अमर्याद नाही, सुख आहे पण पारंपार नाही तुमच्या पिढिपर्यंत किंवा तुमच्या पिढीतच संपेल एवढंच सुख तुम्ही आयुष्यात मिळवणार असाल तर जन्माला येऊन तुम्ही असं मिळवलं तरी काय ? काहीच नाही ना? अरे सख्या बहिणीला राखी बांधायची असेल तर आज जमणार नाही ताई , एक काम कर तू राख्या पोस्टाने पाठव .. , अरे दादा मी परदेशात आहे ना रे,मग भाऊबीजेला नाही येऊ शकणार..
, "दादा, बाबा गेले तेव्हा तूला किती फोन केले, पण तू तुझ्या प्रोजेक्ट मधे असल्याने तुझ्याशी कॉन्टॅक्ट नाही झाला रे" , अगं मला कळल्यावर खूप वाईट वाटलं बघ ना माझा प्रोजेक्ट सुद्धा सर्वोत्तम म्हणून सिलेक्ट झाला, कदाचित बाबांचीच इच्छा असावी" अरे गिधाडा, बापाने तुझ्या लाख इच्छा पुरवल्या पण तो जाताना त्याची शेवटची इच्छा सुद्धा तू पुरवू शकला नाहीस तर उभ्या आयुष्यात त्या आई-बापाच्या पोटी जन्माला येऊन काय कमवलस?
कोणीतरी म्हटलय ते खरं आहे ना " हळूहळू जग जवळ येत चाललयं, पण ह्या जगातली माणसं एकमेकांपासून दुरावत चाललीये" आज नवीन मित्र मिळवायचा झाला तर एका क्लिकवर मिळतो अन त्या मैत्री सोबत दोन-चार मैत्रीणीसुद्धा अगदी फुकटात मिळतात अन काही दिवस उधळत, हसत, खिदळत मैत्री टिकवण्याचा हट्ट चालतो पण उगाच एखादं प्लॅस्टीकचं मोरपिसं गाली फिरवून अप्सरा मनामधे भरली कि मैत्रींच्या झांजा वाजल्याच म्हणून समजा. मग रोज रोज न विसरता येणारे ते फोन कॉल्स आपोआप डायव्हर्ट होतात, रोजच्या शिव्या, रांगडं वागणं , कट्ट्यावरची ती रात्र जागरणं, उंच टेकडीवर सिगरेटच्या धुराच्या रेषा वर चांदण्या आकाशात काढण्याचं ते सगळं सगळं संपून जातं अन त्या नात्याला आडवा येतो तो फुगा. अहो फुगा कसला कंडोममधे हवा भरलेला एक गुब्बाराच तो. अजून किती फुगवायचा अन केव्हा फुटेल याचा नेम नाही पण केवढा मोठा फुग्गा ! हे समाधान मानून मन त्याच्याशीच खेळत बसतं, त्याच्यातच रमतं अन वेडं खूळं होतं, देहाकर्षणाच्या जाळ्यात मग आपल्यासारखा मासा अडकतो अन जाळं तुटण्याचं दुखः सहन करता येणार नाही म्हणून गुदमरून मरतो. तेव्हा प्रत्येकाने नात्यांच्या पलिकडे जाऊन प्रेम करावं, गोर्या रंगाचं, काळ्या केसांचं, चिकण्या सौंदर्याची स्थळे बाजूला ठेवून ऐकमेकांचं आयुष्य कसं फुलवता येईल, आयुष्यातले उणे कसे भरून काढता येईल, आपलं आयुष्य एकत्त्रित सांभाळता सांभाळता नात्यांच्या परीघात आणखी किती माणसे येतात याचा विचार करून त्या माणसांना आपलंस कसं करता येईल याचा विचार करायलाच हवा.
अन जमत नाही ना तुम्हाला ह्या सगळ्यात गुरफटायला तर सरळ सरळ त्यागाचा, समाज बांधिलकी जपण्याचा मार्ग स्वीकारावा. आता तुम्ही म्हणाल म्हणजे काय राजकारणात जायचं काय? छे हो राजकारणात फक्त वस्त्रहरण चालते, तिथे नात्यांवर फक्त आकडे लावले जातात, आपला आकडा जिंकला तर आपण जुगार जिंकलो अन आकडा चुकला तर एका चांगल्या नात्याला मुकलो एवढेच चालते तिथे..
नाती टिकवायचीयेत ना मनापासून तर मग देशाशी नातं जोडा, सीमेवर लढणार्या जवांनाशी नातं जोडा, त्यांच्या व्यथा, त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांच्या आनंदाचं कारण कसं होता येईल याचा विचार करा. प्रत्येक अनाथ मुलांच्या संपर्कात राहणं कठीण जाईल तेव्हा एखाद्या तरी अनाथाचा नाथ होऊन आनंद द्विगुणित कसा करता येईल याचा विचार करा. नाते जोडायला मनुष्यदेहच लागतो हा विचार डोक्यातून काढून टाका. मुक्या प्राण्यांशी नातं जोडून त्यांच्यावर प्रेम कर करा, त्यांचे मुके संवाद जाणून घ्यायचा प्रयत्न करा. मदर तेरेसा सारख्या स्त्रीने आयुष्यात आणखी काय केले? आज ती व्यक्ती खरोखर नात्यांच्या पलीकडे आपल्या मनात एक वेगळाच ठसा उमटवून गेली आहे. गुरू होता नाही आलं तर शिष्य बनून गुरु-शिष्याचं नातं अनूभवून पहा. वृक्षांवर, वेलींशी नाते जोडू पहा पण बांडगुळासारखं स्वार्थी नातं नाही तर निस्वार्थ नातं तेव्हाच ते नातं एका विशिष्ट संज्ञेच्या अन संकल्पनेच्या बाहेर पडेल अन अशी नाती बनवण्याचा अन ती जपण्याचा अत्यानंद आपल्या आयुष्यात अनुभवता येईल. पण अशी नाती जोडताना, आपल्या रक्ताच्या, मैत्रीच्या नात्यांना कधीच दुखवू नका.
कारण तशीही आता रक्ताची नाती अन दुधाचे दात यांची एकच व्यथा बनली आहे ती म्हणजे दुधाचे दात एकदा पडले कि परत ते दुधाचे म्हणून उगवत नाही अन रक्ताचं नातं जिथं मोडलं जातं तिथे पुन्हा ते सांधणं खूप कठीण होऊन बसतं.
तेव्हा काळोखाच्या डोहात बुडालेल्या ह्या नात्यांच्या संज्ञेला नात्यांच्या पलिकडचा असा सुर्योदय दाखवा की जो कधीच अस्ताला जाणारच नाही...
- सुर्यकिरण..
.
.
छान मांडलेय रे सुकी...
छान मांडलेय रे सुकी...
क्या बात है ! सुर्या काय अफाट
क्या बात है ! सुर्या काय अफाट लिहितोस एखाद्या तत्ववेत्यासारखा. गड्या लिही. अजुन लिही. उपमांना सांभाळ. त्या चपखल असायला हव्यात.
तेव्हा काळोखाच्या डोहात
तेव्हा काळोखाच्या डोहात बुडालेल्या ह्या नात्यांच्या संज्ञेला नात्यांच्या पलिकडचा असा सुर्योदय दाखवा की जो कधीच अस्ताला जाणारच नाही
लाखमोलाचं वाक्य. छान लेख.....
छान लिहिलयस सुकी आवडल
छान लिहिलयस सुकी
आवडल
अप्रतिम मित्रा!!!! सुंदर
अप्रतिम मित्रा!!!! सुंदर लिखाण.
सुर्या काय अफाट लिहितोस एखाद्या तत्ववेत्यासारखा.>>>>नितिनजींना अनुमोदन.
" हळूहळू जग जवळ येत चाललयं, पण ह्या जगातली माणसं एकमेकांपासून दुरावत चाललीये">>>>अगदी अगदी.
खूप आवडलं सुकी!!! अगदी योग्य
खूप आवडलं सुकी!!! अगदी योग्य आणि नेमकं लिहीलं आहेस.
ह्या लेखांत मांडलेल्या ३-४
ह्या लेखांत मांडलेल्या ३-४ मुद्यांवर जरी सगळ्यांनी विचार केला, तर हल्लीच्या नात्यांची परिस्थिती खुपच वेगळी असेल. सगळंच फार तकलादु झालंय
मस्त लिहीलंयस रे सुक्या..अगदी छान, मुद्देसुद!
किरणा.. छान लिहीलय्स... अगदी
किरणा.. छान लिहीलय्स... अगदी विचार करायला लावणार
बाप्रे सुक्या, काय लिहीलं
बाप्रे सुक्या, काय लिहीलं आहेस!
सुर्या, लिखाण चांगल झालेलं
सुर्या, लिखाण चांगल झालेलं असलं तरी विचार एकांगी झालाय असं वाटतय मला. रक्तांच्या नात्यांना भोसकून तपासणार्यांचा भाग सोडला (त्यालाही कधी कधी फारच जेनुइन कारणं असतात.) तर इतर बाबींचा विचार करायलाच हवा. उदाहरण द्यायच असेल तर एखाद्याच्या व्यक्तीचरित्रात आपण वाचतो की ऐन प्रयोगाच्या वेळीस त्यांना मुलगा मेल्याची तार आली पण 'शो मस्ट गो ऑन' अस म्हणत त्यांनी आधी प्रयोग केला. इथे त्या व्यक्तीला एका वेगळ्या उंचीवर नेलं जाते. पण कालांतराने किंवा तो कैलासवासी झाल्यानंतर. पण त्याक्षणी काही जणांच्या मते त्या नटाने स्वार्थ पाहीलेला असतो. "एवढा मुलगा मेला पण पोराच्या तिरडीला खांदा द्यायच्या एवजी तोंडाला रंग लावून नाटकं करत बसला" असली वाक्ये तेव्हा चघळली गेलेली असतात. अशी अनेक उदाहरणॅ तुला पहायला, ऐकायला मिळतील. एखादा प्रोजेक्ट करणारा प्रोजेक्ट सोडून धाव घेत नाही तेव्हा त्याला फक्त ' नातं आटलं' हेच कारण असत नाही. त्या प्रोजेक्टवर बरेच जिवंत खोळंबलेले असतात. जाणारा तुमच्या वेळा सांभाळून जात नाही. मग आपली वेळ सांभाळून त्याला निरोप द्यावा लागतो. परदेशात राहणारी बहिण पोस्टाने का होईना राखी पाठवते आणि तिच्या नाईलाजाला दुषणं न देता भाऊ ती राखी हातावर बांधून घेतो.
थोडासा एंगल बदललास तर तुला एक वेगळं नात यातही आढळेल. शेवटी नाती ऐच्छिक नसतात. ती तुमच्या जन्माबरोबर जन्माला येतात. तुमच्या परवानगीशिवाय. त्यामुळे आगंतुकांना जपावं की नाही हा प्रत्येकाचा प्रश्न असतो !
सर्वांना मनापासून धन्यवाद..
सर्वांना मनापासून धन्यवाद.. मित्रा तुझा प्रतिसाद आवडला..
शेवटी नाती ऐच्छिक नसतात. ती तुमच्या जन्माबरोबर जन्माला येतात. तुमच्या परवानगीशिवाय. त्यामुळे आगंतुकांना जपावं की नाही हा प्रत्येकाचा प्रश्न असतो ! << हे मात्र खरं आहे..
पण सगळ्यांच्याच बाबतीत मी हे लिहिलय असं नाही, काही नग आहेतच कि.. सध्याच्या पिढित असं फार पहायला मिळतं, परिस्थितीने असेलही पण प्रत्येक वेळेस परिस्थितीनेच घात केला असही नाही ना म्हणता येणार. ऐच्छिक सुखासाठी कधी कधी रक्ताच्या नात्यांना दुय्यम दर्जा देतायेत ना जी लोकं त्यांच्याबद्दल हे लिहिलं आहे. अन तू ज्या नटाचा उल्लेख केला आहेस त्या नटाची मुलाखत मी माझ्या डोळ्यांनी पाहीली आहे अन ऐकली आहे.. "शोध मराठी मनाचा" या कार्यक्रमा अंतर्गत.. एम आय टी कॅम्पस , पुणे येथे.. ते त्याचं वेड होतं ज्या वेडात लोकांनी आनंद, एक चांगली कला शोधली.. अश्या वेड्यांचा मला नक्कीच अभिमान आहे.. राहीलं भावा-बहिणीच्या नात्याविषयी.. तर त्याबद्दल माझी लिखाणाची मांडणी चूकली आहे हे मलाही जाणवले तुझा प्रतिसाद वाचताना.. धन्यवाद. असेच मार्गदर्शन करत रहा..
जाणारा नक्कीच वेळा संभाळून जात नाही कारण ते त्याचा हातात नसतं, पण कदाचित शक्य असतील तेवढ्या वेळा तर आपण आपल्या सवडीने नक्कीच संभाळाव्यात ना रे
असोत.. सर्वांना मनापासून धन्यवाद. लिखाणात काही वाक्य खूपच लांबली आहेत. त्याबद्दल क्षमस्व..
कसं आहे ना.. दोन बोटांनी घास भरवण्याचा प्रयत्न केला तर तो चिमटीतला घास क्षणिक गोडवा देऊ शकतो फक्त.. पण पाचही बोटांनी जेव्हा घास भरवला जातो ना तेव्हा भोजनातला आनंदही मिळतो. निदान मला तरी असेच वाटते.. नाते जपावे.. अन नात्यांची वीण आणखी घट्ट करावी.. कारण आपली पिढी ही पुढच्या पिढीसाठी मार्गदर्शन करत असते.
कौतूक मला एकांगी लिहायचे नव्हते रे..
मांडणीत थोडासा घोळ झाला..
सुकी छान लिहीलेस कौतुक आणि
सुकी छान लिहीलेस
कौतुक आणि तुझी ही पोस्ट पण पटली
नातं हे रक्ताचच असलं पाहिजे
नातं हे रक्ताचच असलं पाहिजे असा अट्टहास ठेवला नाही तर उत्तम आयुष्य जगू शकू...आपल्या वेळी काळी उपयोगी पडणारी, प्रेम करणारी, आनंदात सहभागी करावीशी वाटणारी माणसे म्हणजेच कुटुंब....कधी कधी सख्खी आईसुद्धा मुलीवर जळून तिच्या आयुष्याचं वाट्टोळ कसं होईल याचाच प्रयत्न करते...काय करणार !!!
मित्रा, हा विषय मोठा आहे.
मित्रा, हा विषय मोठा आहे. त्यामुळे मांडणीत काही गोष्टी सुटणारचं.
शेवटी आपण जे पहातो, त्याचं प्रतिबिंब आपल्या लिखाणात उमटणार. प्रत्येकाचा दृष्टीकोन वेगळा. पण आपल्यापेक्षा वेगळा म्हणून तो चुकीचा, असं म्हणण्यात अर्थ नाही. जो तो त्याच्या जागी बरोबर असतो. फक्त ते आपल्याला पटत नाही म्हणून चूक.
रक्ताची नाती हा विषय वेगळा आहे. यावर बरचं लिखाण झालं आहे. पण काही नाती आपण आपल्या सोयीने निर्माण करतो आणि मग त्यांच्याकडे गरज सरल्यावर दुर्लक्षही करतो. खरी मेख इथे आहे. कारण ही नाती निर्मिलेली असतात आणि आपल्याच निर्मितीची जेव्हा आपण कदर करत नाही तेव्हा आपण माणूस म्हणून जगायला पात्र आहोत की नाही याचा विचार व्हायला हवा. तसा हाही विषय मोठा आहे सुर्या. बघ, यावर विचार करून. पण या प्रोसेसमुळे मला माझ्या एका उपेक्षित कथानकाची आठवण झाली. लवकरच लिहीन म्हणतो.
कारण ही नाती निर्मिलेली असतात
कारण ही नाती निर्मिलेली असतात आणि आपल्याच निर्मितीची जेव्हा आपण कदर करत नाही तेव्हा आपण माणूस म्हणून जगायला पात्र आहोत की नाही याचा विचार व्हायला हवा. << खरं आहे तुझं अगदी.. पण माणूस आजकाल नाती अगदी सर्पकाती सारखी टाकून निघून जातोय, त्याच्या पात्रतेचा दर्जा आज खालावतो आहे मग उद्याची पिढी काय करेल.. "क्षणिक नात्यांचा विरंगुळा" एवढिच त्यांची नात्याची रंजक व्याख्या होऊन बसेल याचं वाईट वाटतं.
अगदी खरं आहे हा दृष्टीकोनाचाच विषय आहे..
पण काही नाती आपण आपल्या सोयीने निर्माण करतो आणि मग त्यांच्याकडे गरज सरल्यावर दुर्लक्षही करतो. << नाती गरजेपुरतीच असावीत ह्यावर मला भयंकर चिड आहे.. नात्यांचा दिवा मिणमिणत राहीला तरी चालेल पण विझायला नको.. ! कारण मी धरली होती कि ओंजळ.. पण वार्यानेच घात केला अशी विधानं करणारे बरेच लोक आहेत इथे..
असोत.. कुठलाही विषय मोठा नसतो.. विचार सरणीच्या कलह-उत्सवाने त्याला मोठेपण मिळतं.
अन हो.. तुझ्या त्या उपेक्षित कथानकाची वाट आता मी ही पाहिल कारण तो ह्या विषय-उत्सवाचा भंडारा उधळेल ना ? तुला शुभेच्छा..
या विषयावर चर्चा करून बर्याच विषयांवर विचार करायला लावलस मित्रा.. ! धन्यवाद.
शिल्पा बडवे @ नातं हे रक्ताचच
शिल्पा बडवे @ नातं हे रक्ताचच असलं पाहिजे असा अट्टहास ठेवला नाही तर उत्तम आयुष्य जगू शकू.
अगदी खरं आहे हे. विशेषतः परप्रांती किंवा पर्देशात रहाण्यांकरतां.
कारण आपल्या अडीअडचणीला प्रत्यक्ष नातेवाईकांपेक्षा, कितीही घट्ट नाते असले तरीही, ऐनवेळी उपयोगी पडतात ते येथीलच शेजारी आणि मित्र. वर्षांदोनवर्षांनी कधीतरी आपले नातेवाईक,जुने शाळामित्र भेटतात तेव्हा फार बरे वाटते. पण रोजच्या धकाधकीच्या जीवनात परकीयच आपले निकटवर्ती.
अतिभाबडा आणि अतिभावनिक लेख.
अतिभाबडा आणि अतिभावनिक लेख. नाही पटला.
माझ्या मते प्रत्येक नात्याचे एक नशिब असते, त्याप्रमाणे ते वाढते, बदलते वा संपते. आपल्या प्रयत्नांनी किंवा इच्छेने (कितीही प्रामाणिक असली तरीही) तुम्ही ते आहे तसे टिकवू शकत नाही. आणि यात मित्रांपासून आई-वडीलांपर्यंत सगळीच नाती येतात.
आगाऊ आभार. माझ्या मते
आगाऊ आभार.
माझ्या मते प्रत्येक नात्याचे एक नशिब असते, त्याप्रमाणे ते वाढते, बदलते वा संपते. << मान्य आहे मला..
आपल्या प्रयत्नांनी किंवा इच्छेने (कितीही प्रामाणिक असली तरीही) तुम्ही ते आहे तसे टिकवू शकत नाही. << पण हे दुर्दैवच नाही का...
मला नाही वाटत यात काही
मला नाही वाटत यात काही दुर्दैव आहे असे,
ना अब वो यादों का चढता दरिया, ना फुरकतों की उदास बरखा
युं ही जरासी कसक है दिल में, जो जख्म गहरा था भर गया वो - नासिर काझमी
ही अवस्था ही तितकीच एंजॉय करता येऊ शकते, मला तरी.
सुकि ... छान लिहिलंय ! पण
सुकि ... छान लिहिलंय !
पण राजा ... खरंच अवघड आहे ..
आपण ढीग प्रयत्न करू हो ... पलीकडे पाहण्याचा ... पण कोणी अलीकडे येण्याचा प्रयत्नही केला नाही तर ?
खुप भडक चित्रण केल्या सारखे
खुप भडक चित्रण केल्या सारखे वाटले.
मस्त लिहल आहेस...
मस्त लिहल आहेस...
प्रत्येकाचे प्रतिसाद देखील पटतायेत....
प्रत्येक नात्याचे एक नशिब
प्रत्येक नात्याचे एक नशिब असते, त्याप्रमाणे ते वाढते, बदलते वा संपते. आपल्या प्रयत्नांनी किंवा इच्छेने (कितीही प्रामाणिक असली तरीही) तुम्ही ते आहे तसे टिकवू शकत नाही. आणि यात मित्रांपासून आई-वडीलांपर्यंत सगळीच नाती येतात>>>>>>>>>>>>>>>
अगदी १००% अनुमोदन, आगाऊ..
खूप सुरेख लेख
खूप सुरेख लेख
आगाऊशी पुर्णपणे सहमत सुर्या
आगाऊशी पुर्णपणे सहमत
सुर्या निवांत फोन करेन रे, बोलू सविस्तर
>>तेव्हा प्रत्येकाने
>>तेव्हा प्रत्येकाने नात्यांच्या पलिकडे जाऊन प्रेम करावं, गोर्या रंगाचं, काळ्या केसांचं, चिकण्या सौंदर्याची स्थळे बाजूला ठेवून ऐकमेकांचं आयुष्य कसं फुलवता येईल, आयुष्यातले उणे कसे भरून काढता येईल, आपलं आयुष्य एकत्त्रित सांभाळता सांभाळता नात्यांच्या परीघात आणखी किती माणसे येतात याचा विचार करून त्या माणसांना आपलंस कसं करता येईल याचा विचार करायलाच हवा.
क्या बात है! आवडले विचार...
सूर्यकिरण, छान लिहिलय. खरे तर
सूर्यकिरण, छान लिहिलय. खरे तर दोन्ही नात्यांबद्दल लिहिण्यासारखे खूपच आहे. अर्ध्यापेक्षा जास्त चित्रपट आणि नाटके, नातेसंबंधावरच तर बेतलेली असतात.
सुकि चांगलं , लिहिलसं , पण
सुकि चांगलं , लिहिलसं , पण जास्तच नकारार्थी वाटतयं .
प्रत्येक नात्याचे एक नशिब
प्रत्येक नात्याचे एक नशिब असते, त्याप्रमाणे ते वाढते, बदलते वा संपते. आपल्या प्रयत्नांनी किंवा इच्छेने (कितीही प्रामाणिक असली तरीही) तुम्ही ते आहे तसे टिकवू शकत नाही. आणि यात मित्रांपासून आई-वडीलांपर्यंत सगळीच नाती येतात>>>>>>>>>>>>>>>
सहमत!!
Pages