भुल

Submitted by नितीनचंद्र on 16 February, 2010 - 00:18

अहमदनगरच्या एस.टी. स्टॅड वर औरंगाबाद -पुणे एशियाड थांबली. रात्रीचे सात वाजले होते. माझ्या शेजारची एक सीट रिकामी झाली. मी जरा आळोखे पिळोखे देत बसच्या दरवाज्याकडे पहात होतो. साधारण तीन तास पुण्याला पोचायला रात्री जेवण, हॉटेलमध्ये मुक्काम, मग उद्यापासुन पुढ्चा प्रवास. उद्या परवा पुण्याचे क्लायंट्स मग परत औरंगाबाद माझ्या मनाशी आखणी चालली होती. बसच्या दरवाज्यातुन एक स्त्री आत येत होती. मी तीला पाहिले मात्र, माझ्या काळजाचा ठोका चुकला. श्वसनाची गती वाढली. बरोब्बर पंचवीस वर्षानी स्मिता मला दिसत होती. तिच्या चेहेर्‍यावरचे भाव शुष्क होते, वाढत्या वयाचा पोक्तपणा दिसत होता. चालत चालत ती माझ्या शेजारच्या रिकाम्या सीट वर येऊन बसली. सहज म्हणुन तीने माझ्याकडे पाहिले आणि आश्चर्यचकित होण्याची पाळी तिची होती. राजेश तु ? क्षणार्धात आश्चर्य मावळुन तीच्या चेहर्‍यावर वेगळेच भाव उमटले. पुढे काय बोलावे दोघांनाही सुचत नव्हते. "स्मिता मी गुन्हेगार आहे तुझा. आज तुझी माफी मागायची ही संधी कधी येईल अस वाटलच नाही. तुला न सांगता, तुझी भुमीका न जाणता, तुला बोलायची संधी न देताच मी पुण सोडुन निघुन गेलो." मी बोललो. माझी मान खाली गेली. तिच्याकडे पाहण्याचा धीर मला होत नव्ह्ता. ती शांत होती. तीचा मुळचा स्वभाव पाहता ती रागावेल, लोकांसमोर तमाशा करेल असे वाटत असताना तीच शांत रहाण मला अस्वस्थ करुन सोडत होत.

तीने एकदा माझ्याकडे पाहिल, पाण्याची बाटली काढुन एक पाण्याचा घोट घेतला. आता मात्र ह्द्द झाली. मी म्हणालो " तु काहीच बोलत नाहीस ? मला वाटल तु चिडशील रागावशील." ह..... तीने सुस्कारा सोडला." राजेश तु विचीत्र वागलास खरा पण जे घडल त्यात तुझी चुक फक्त पंचविस ट़क्के होती. तुझ्या समोर जे चित्र उभ केल ते इतक प्रभावी होत की तु ते खर मानुन बसलास. चुक अशासाठी म्हणायच की ते चित्र खर की खोट हे न तपासताच तु निघुन गेलास. तुझ्या अश्या जाण्याने माझ्यासमोर जे चित्र उभे केले ते मला खरे वाटले." "म्हणजे तुला सगळ माहीत आहे तर ? मी म्हणालो " तेव्हा नव्हत पण आता सर्व माहित आहे. स्मिता म्हणाली. दादाने सर्व सांगीतल .. शेवटी. ती म्हणाली. "शेवटी ?" हो शेवटी"दादाचा उद्या दहावा आहे त्यासाठीच पुण्याला चालले. स्मिताच्या डोळ्यात पाणी होत. वाटत होत तीचा हात धरावा. सख्खा मोठा भाऊ होता तीचा आणि मला भावासारखाच. सगळ्यांसमोर प्रशस्त वाटेना. पाच मिनीटे अशीच गेली. तीचे हुंदके थांबले. मग मी विचारल "काय झाल होत प्रकाशदादाला ?" " अर्धांगवायुने शेवटचे सहा महिने झोपुन होता. " उद्या येतो मी त्याला पाणी द्यायला." मी म्हणालो. कशाला येतोस ? ती चिडुन म्हणाली. तुझा आणि माझा वैरी होता तो. मला जायला पाहीजे जनरीत म्हणुन पण तुझा काय आता संबंध राहीला आहे पंचविस वर्षात ? " वैरी ? मी तीच्या या शब्दावर आश्यर्य व्यक्त केल. हो हो वैरी. राजेश जे चित्र तुझ्यापुढे दादाने उभे केले ते खोटे होते. माझ्या आईने तुला कधीच दुध पाजले नाही. हा सगळा बनाव होता तुझ माझ लग्न होऊ नये म्हणुन रचलेला. स्मिता परत रडु लागली. रडता रडता तिने माझ्या छातीवर डोके ठेवले. मी तीच्या डोक्यावरुन हात फिरवत राहीलो. तीचे हुंद्के थांबत नव्हते जणु माझ्या सांत्वनासाठीच तीन रडण राखुन ठेवल होत.

बस पुण्याकडे धाऊ लागली. स्मिता आता शांत झाली होती.मी आठवत होतो, जुने दिवस जेव्हा पासुन आठवत होते तेव्हा पासुन. माझी आई मला स्मिता व प्रकाशदादाच्या आईवर सोपवुन देवाघरी गेली मी पाच वर्षांचा असताना. आई मला अंधुकशी आठवते. वडील तर माझ्या जन्माआधीच परागंदा झालेले. स्मिता व प्रकाशदादाच्या आई, राधामावशीचा मोठा आधार होता तीला. माझे वडील कोण, ते का परागंदा झाले यावर कधी कोणी बोलल नाही. माझी आई व राधामावशी लहानपणापासुनच्या मैंत्रीणी होत्या. आईला नव्ह्ता माहेरचा आधार ना सासरचा. पुण्यात राधामावशी,काका म्हणजे स्मिता व प्रकाशदादाचे वडील शुक्रवार पेठेत नाईक वाड्यात रहायला होते. काका कॅपमध्ये एका दुकानात नोकरीला होते. ते जास्त वेळ घराबाहेरच असत. राधामावशी संपुर्ण घर सांभाळत त्यामुळे काकांचा ह्स्तक्षेप फारसा नसे. आईची स्थिती ओळखुन राधामावशीने तीला पुण्याला आणले. याच वाड्यात आईला एका खोलीची जागा मिळवुन दिली. दोघी कुरडया, पापड्या, पापड करुन विकु लागल्या. याशिवाय आई मला मावशीकडे ठेऊन छापखान्यात नोकरीही करु लागली. सगळे सांगत खुप कष्ट घेतले आईने आणि त्यातच तीला क्षय जडला. आईच्या आयुष्यातील शेवट्ची दोन वर्षे मी राधामावशी म्हणजे स्मिता व प्रकाशदादाच्या आईकडे रहात होतो मला क्षयाची बाधा होऊ नये म्हणुन. आईनंतर राधामावशीने मला वाढवल. जे तिच्या मुलांना जेवायला तेच मलाही वाढ्ल. कशातच अंतर राखल नाही. उलट आईविना पोर म्हणुन माझ्यावर जास्तच माया केली. दहाव्या वर्षापासुन मी वर्तमानपत्रे वाटु लागलो. शाळा सुरु होतीच. मी आणि स्मिता शाळेत बरोबर जात होतो. एकाच इयत्तेत एकाच वर्गात शिकत होतो. मला जसे आठवते, त्यावेळी माझ्या संवेदना सांगत होत्या. ही माणसे तुला जरी आधार देतात तरी ही तात्पुरती व्यवस्था आहे. एक दिवस ही व्यवस्था संपेल तेव्हा तुला तुझे जग निर्माण करायचे आहे.

स्मिताच्या मनात काही वेगळेच चालले होते. त्याचे कारण तसेच होते. आम्ही दोघे पाच वर्षाचे असताना वाड्यात बाहुला बाहुलीचे लग्न झाले. त्या लग्नात मी बाहुला तर स्मिता बाहुली. हा संस्कार स्मिताने मनापासुन जपला. लहान असतानाच तीने मला राखी बांधायला नकार दिला. विचारल तर म्हणाली मोठा झाल्यावर तु माझा नवरा होणार आहेस. मला ही ते आवडु लागल होत. वाड्यातली मुल, मुली चेष्टा करायचे. स्मिता तर त्या चेष्टेने आणखीच खुलायची. राधामावशीच्या कानावर ही गोष्ट पड्ल्यावर ती म्हणायची "लहान आहेत झाल. त्यांना काय कळतय ?" स्मिता मात्र याला विरोध नाही म्हणुन आनंदात असायची. मी तर स्वत:हुन काही प्रतिक्रीया देण्यावर बंधन घालुन घेतले होते. आश्रीताने पाळावयाच्या बंधनाची जाण मला लहान वयातच आली होती. मी चेष्टा होईल असे वर्तन करत नव्हतो किंवा झालीच तर ती टाळत नव्ह्तो. एकंदरीत या घरातील कोणीही माझ्यावर नाराज होऊ नये असा माझा वागण्याचा प्रकार होता. मी आणि स्मिता दहावी ए.सी.सी ला असताना एक वाईट घटना घड्ली. राधामावशीला रस्ता क्रॉस करताना बसने उडवल. आम्ही दोघ शाळेत होतो. राधामावशीला ससुन हॉस्पीटलला नेल. शेवटी जे घडायच ते विपरीत घड्ल. राधामावशी गेली. तीची बॉडी घरी आणली. तीच कलेवर संपुर्ण झाकलेल. स्मिता तर धाय मोकलुन रडत होती. प्रकाशदादाची अवस्था याहुन वेगळी नव्ह्ती. मी दुसर्‍यांदा पोरका झालो. मीच दोघांना सावरल. बहुदा खुप लहान वयात असल दु:ख पचवल्याचा परिणाम असावा. त्यानंतर स्मिता आणि मी मनाने जास्त जवळ आलो. हळु हळु स्मिता सावरली. रोजचा स्वैपाक करु लागली. काका पुर्वी पेक्षा जास्त बाहेर राहु लागले. प्रकाशदादा एका कंपनीत नोकरीला लागला. त्याची से़कंड शीफ्ट असेल तेव्हा मी आणि स्मिता रात्री दोघच घरात असायचो. मला काय खावे वाट्ते ते विचारून स्मिता जेवण बनवी. नकळत ती मला आवडु लागली. मी कॉलेजची वेळ संपल्यावर लहान मोठ्या नोकर्‍या करु लागलो. तिला आवड्तील अश्या गोष्टी तिच्यासाठी आणु लागलो.

रेशीमबंध बांधले जात असताना दुसर्‍या बाजुला नकळत उसवले जात होते ह्याची जाणिव मला होत नव्हती. कारण मी आज कोणावरही अवलंबुन नव्ह्तो. मी घरखर्चाला पैसे देत होतो. मला आवड्णार्‍या गोष्टी स्मिता करत होती. दादाला पण विचारावे त्याला आवडेल ते आणावे हे माझ्या मनात येत नव्हते किंबहुना मी ते टाळत होतो. स्मिता माझीच आहे हे ग्रुहीत धरुन माझी मनमानी चालली होती. जुन्या परिस्थीतीत मनावर घातलेले निर्बध झुगारुन मी बेफाम होऊ पहात होतो.स्मिताला हे कळत होत की नव्हत पण ती माझीच बाजु घेत होती. नुकतेच क्रुष्णधवल टी.व्ही. बाजारात येऊ लागले होते. घरात चर्चा चालु होती. स्मिता तर माझ्यामागे लागली होती. दादाचे म्हणणे होते जरा थांबुया. शेवटी मी दादाला विचारल काय करायच ? दादा म्हणाला "तुला टी.व्ही. हवाय ? मला वाटला तुला थोड तरी डोक असेल." दादा तुला काय म्हणायचय ? मी नरमाईने म्हणालो. " अरे आता स्मिताच लग्न करायची वेळ आली, पैसे नकोत जवळ ?" मला वाटल तो माझ्या मनात काय आहे ते जाणतो आहे. मी म्हणालो " त्याची येवढी काय काळजी. " "शाणाच आहेस, मुलाकड्ची माणस हुंडा मागणार, मानपान करावा लागणार, लग्न म्हणजे काय गम्मत आहे ?" " कोण कशाला मागतय हुंडा अन मानपान ?" मी म्हणालो. तुला काय कळणार तुला येवढ्च सांगतो ही भाऊ म्हणुन आपल्या दोघांची जबाबदारी आहे. मी म्हणालो काय म्हणतोस दादा तु ? तुला काहिच माहित नाही का ? दादा म्हणाला "काय ते?" "हेच की स्मिता आणि माझ लग्न व्हाव हे आमा दोघांना वाट्त." मी बोलुन टाकल. दादा म्हणाला " बाहुला बाहुलीच लग्न आणि नवरा नवरीच यात काय फरक असतो का नाही ? लहानपणी खेळताना लग्न लावल तेच धरुन बसलास काय तु ? अरे लग्न जमवायला सोयरीक जुळावी लागते. पदर जुळावा लागतो. मी जर माझ्या मामाकडे गेलो आणि म्हणल मामा करायच का लग्न स्मिताच तुझ्याशी तर तो विचारल तुझा बाप कोण तर काय सांगु त्याचा पत्ता नाही म्हणुन ? जर त्यानी विचारल तुमच गोत्र काय ? देवक काय तर काय सांगु ?माहित नाही. मग तो म्हणल असल लग्न तरी का करतोस? त्या पेक्षा बहिणीला तुझि रखेल म्हणुन ठेव राजेशकड. पैसे तरी वाचतील लग्नाचे. तुमच अस लग्न लावल्यावर माझ काय करु? माझ्या लग्न करायच म्हणल्यावर बहिण कुणाकडे दिली म्हणुन विचारतील की मग काय सांगु ? शहाण्णव कुळी नसलो तरी मराठा आहोत आम्ही. तुझरे कुळ काय. तुझ्या बापाच ख्रर नाव माहित नाही अश्या वेळेला क्रुष्णा नाव लावतात. तु जे आण्णाव लावतोस ते तुझ्या आईच्या वडीलाच आहे, माहित आहे का तुला ?" याउप्पर सांगतो. आमच्या आईने तुम्हा दोघांना दुध पाजलय त्याची जाण ठेव. पळुन जाऊन लग्न करायच मनात आणु नको. आमच्या आईन तुला लहानाचा मोठा केला ते आमच्या तोंडात माती घालायला नाही केला हे ध्यानात ठेव." दादा बोलायच थांबला. मी म्हणालो राधामावशीन कधी विरोध नाही केला. "ती कधी हो म्हणाली का ते सांग की." दादा म्हणाला "ती देव होती म्हणुन तुझ इतवर निभावल नाहीतर कुठ जाऊना पड्ला असता ?" माझ डोक भणाणल. मी तसाच घराच्या बाहेर पड्लो. नशीब स्मिता घरात नव्ह्ती. जेव्हा डोक शांत झाल तेव्हा वाड्यात परत आलो. रात्रीचे बारा वाजुन गेले असावेत. माझ्या खोलीत आलो. आता हे सर्व सोडायच हा निर्णय झाला. एक चिठ्ठी लिहली स्मिताच्या नावाने, तीला हे जातीपातीचे विचार पट्ले नसते म्हणुन फक्त दुधाची गोष्ट लिहली. होते नव्हते ते एका बॅगेत घातले आणि सर्व बंध तोड्ले.

स्मिता आता शांत झाली होती. "काय रे झाल राजेश हे" ती माझ्याकदे पहात म्हणाली. " का वागला दादा असा आपल्याशी". "स्मिता जातीची बंधन फार बळकट असतात. सर्वानाच नाही तोडता येत ही बंधन. त्यातुन दादा एक सामान्य माणुस. राधामावशी एतका बळकट नव्हता. मला सांग राधामावशीन तरी काय केले असत ? लावल असत तुझ माझ लग्न ?" मला सांग एकदा तरी तिन तुझी चेष्टा केली माझ्यावरून ? कधी मला म्हणाली या बाबतीत ? नाही ना ? ती गेली तेव्हा खुप मोठे नव्हतो लहानही नव्हतो ना. एक गोष्ट दादा जाताना सांगुन गेला तुला, जी खोटी होती. ते खोट त्याला डाचत होत. पण बाकी सर्व खरच होत ना. तुला काय वाटत ? मला औरंगाबादला गेल्यावर लग्न करायचे ठरवल्यावर कुणी जात विचारली नाही ? दहा जणांनी विचारली, मग शेवटी मी कुणाशी लग्न केल माहीत आहे ? जिला आई नाही बाप नाही अशा अनाथ मुलीशी. येवढ्यान प्रश्न संपला का तर नाही. अजुन चार पाच वर्षांनी जेव्हा माझी मुलगी लग्नाला येईल तेव्हा काय कुणी विचारणार नाही हा प्रश्न ? विचारणारच की. धर्मांतर केल्यान सुध्दा हा प्रश्न संपत नाही. जात नाही ती जात अस म्हणतात ते काय उगाच ? स्मिता खर सांग किती वेळा तुझा घास माझ्यासाठी अडला या पंचविस वर्षात? किती वेळा तुला वाटल मला भेटाव ? तुला पाहिल की वाट्त आहे तु सुखात आहेस्.मी पण आहे. दादाला येऊ शकणारे सर्व प्रश्न त्याच वेळी माझ्या जाण्याने सुटले. तुलाही हे प्रश्न तुझ्या मुलांच्यावेळी येणार नाहीत. हे जर माझे भोग होते तर ते मीच भोगावे हेच बरोबर. तुझ्या आईने आमच दु:ख वाटुन घेतले. भोग पण घ्यायचे होते का ? मग ज्याचा शेवट चांगला ते चांगलच की ग.

स्मिता गप्प होती बहुदा तिला माझे, पर्यायाने दादाने जे केले ते पट्ल होत. बसचे लाईट ऑन झाले. पुण जवळ आल्याचे दिसत होते. मी स्मिताला म्हणल " क्षणभर जे चित्र दिसत तो भास असतो. आपल्याला त्या चित्राची भुल पडते. तेच खर वाटु लागत. निष्कारण आपण स्वतःला किंवा इतरांना दोष देत राह्तो. आपण वास्तवा जवळ जायला हव नाहीका ? उद्या दादाला पाणी दे ,साफ मनाने. मी आलो असतो पण निष्कारण चर्चेला विषय नको लोकांना. स्मिताला बहुदा पट्ल असाव. निदान चेहेरातरी हेच सांगत होता. पाऊस पडुन गेल्यावर जस स्वछ आकाशात चांदण दिसाव तसा.

गुलमोहर: 

नितिन,
कथा आवडली. एक जिवंत प्रश्न मांडलात.....
>>येवढ्यान प्रश्न संपला का तर नाही. अजुन चार पाच वर्षांनी जेव्हा माझी मुलगी लग्नाला येईल तेव्हा काय कुणी विचारणार नाही हा प्रश्न ? विचारणारच की. धर्मांतर केल्यान सुध्दा हा प्रश्न संपत नाही. जात नाही ती जात अस म्हणतात ते काय उगाच >><<

नितिन, चांगली लिहिलीये कथा. मला आवडली. कुठेही विषयाला न सोडता बांधेसूद झालीये. एकच विनंती आहे. अधिक परिच्छेद असावेत. तुमचा दुसरा परिच्छेद मी असा लिहीन -

तीने एकदा माझ्याकडे पाहिल, पाण्याची बाटली काढुन एक पाण्याचा घोट घेतला. आता मात्र ह्द्द झाली.

मी म्हणालो " तु काहीच बोलत नाहीस ? मला वाटल तु चिडशील रागावशील."
"ह....." तीने सुस्कारा सोडला.
"राजेश तु विचीत्र वागलास खरा पण जे घडल त्यात तुझी चुक फक्त पंचविस ट़क्के होती. तुझ्या समोर जे चित्र उभ केल ते इतक प्रभावी होत की तु ते खर मानुन बसलास. चुक अशासाठी म्हणायच की ते चित्र खर की खोट हे न तपासताच तु निघुन गेलास. तुझ्या अश्या जाण्याने माझ्यासमोर जे चित्र उभे केले ते मला खरे वाटले."
"म्हणजे तुला सगळ माहीत आहे तर ? मी म्हणालो
"तेव्हा नव्हत पण आता सर्व माहित आहे. स्मिता म्हणाली.....

तुमच्या पुढील लेखनाला शुभेच्छा. खरच चांगलं लिहिता आहात.

दाद,

प्रतिसादाबाबत धन्यवाद, जलद वाचताना येणार्‍या अडचणीबाबत केलेली सुचना मान्य आहे. नक्की आमलात आणेन.

कथा छान्..विषयही मस्त हाताळलाय्..दादला अनुमोद्न्..परिच्छेद जास्त नसल्यामुळे संवाद वाचताना थोडा त्रास होत होता...

खुप छान नितीन..खरंच...धर्मांतराने प्रश्न सुटत नाही....मनातलं बोललास..

आवडली कथा.

एक सुचवावंसं वाटतं: शुध्दलेखनाकडे जास्त लक्ष पुरवायला हवं. उदा. क्रुष्णा (kru) हे चु़कीचं असून कृष्णा (kRu) असं हवं. इकार आणि उकार जवळजवळ सगळीकडे र्‍ह्स्व (पहिला) आहे, त्याऐवजी नियमानुसार र्‍ह्स्व किंवा दीर्घ (दुसरा) हवा. प्रत्येक व्यंजनाला आकार, उकार, इकार लागत नसेल तर त्यानंतर a दाबावा. ("पट्लं" यात "ट" लिहीताना a न लावल्यामुळे पाय मोडलेला दिसतो.)
(If you want, we can exchange emails separately on this..)

तुम्हाला या सूचनांचा राग येणार नाही अशी आशा...

मस्त