आज २८ जानेवारी सुमनताईंचा वाढदिवस. सर्व मायबोलीकरांतर्फे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! नुकताच त्यांना लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, त्याबद्दलही त्यांचे अभिनंदन!
(सौजन्यः नेट)
सुमन कल्याणपुर नुसते नाव जरी उच्चारले तरी निर्मळ शांत, सोज्वळ, सात्विक चेहरा आणि तेवढाच मधुर आवाज आठवतो. त्यांची गाणी जितकी प्रसिद्ध झाली तितक्याच त्या प्रसिद्धिपासुन अलिप्त राहिल्या. अनेक वर्षे अज्ञातवासात असलेल्या सुमनताई "झी गौरव्"च्या जीवनगौरव पुरस्काराच्या निमित्ताने समोर आल्या.
सध्या बांग्लादेशात असलेल्या ढाका येथे २८ जानेवारी १९३८ साली सुमन हेमाडी यांचा जन्म झाला. १९४३ साली त्यांनी मुंबईत येऊन संगीताचे रितसर प्रशिक्षण घेतले. रामानंद कल्याणपुर यांच्याशी लग्न होऊन त्या सुमन कल्याणपुर या नावाने सर्व परिचित झाल्या. एका गाण्याच्या कार्यक्रमाच्या वेळी तलत महमूद सुमनताईंच्या आवाजाने प्रभावित होऊन HMV म्युझिक कंपनीकडे त्यांच्या नावाची शिफारस केली. वयाच्या १७व्या वर्षी त्यांनी मो. शफी यांनी संगीत दिलेल्या "मंगु" (१९५४) या चित्रपटासाठी प्रथम पार्श्वगायन केले. गाण्याचे बोल होते "कोई पुकारे धीरे से तुझे". त्यानंतर त्यांच्या गाण्याची घोडदौड
हि चालुच राहिली आणि लता मंगेशकर, शमशाद बेगम आणि आशा भोसले यांच्या गाण्याचा तारकामंडळात त्यांनी मानाचे स्थान मिळवले.
सुमनताईंच्या आवाजाने एका पिढीला अक्षरशः वेड लावले होते. "जिथे सागरा धरणी मिळते" असे म्हणत प्रियकराची वाट बघणारी प्रेयसी, "घाल घाल पिंगा वार्या माझ्या परसात, माहेरी जा सुवासाची कर बरसात" असे म्हणणारी सासुरवाशीण, "निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई, आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाहि" हि अंगाई, "कशी गवळण राधा बावरली" हि गवळण, "सांज आली दुरातुनी, क्षितीजाच्या गंधातुनी" हे विरहगीत, "नाविका रे वार वाहे रे, डौलाने हाक जरा आज नाव रे", "केतकीच्या बनी तेथे नाचला ग मोर" हे भावगीत, "केशवा माधवा, तुझ्या नामात रे गोडवा", "जगी ज्यास कोणी नाहि त्यास देव आहे", "देव माझा विठु सावळा, माळ त्याची माझिया गळा" सारखी भक्तीगीते, "उठा उठा चिऊताई", "या लाडक्या मुलांनो या" सारखी बालगीत अशा विविध मराठी गाण्यांनी एक काळ गाजवला होता. किंबहुना आजही तितकीच गोड वाटतात. पण दुर्दैव असे की सुमनताईंनी गायलेली बहुतेक गाणी हि लता मंगेशकर यांनी गायली आहे असा अनेकांचा समज असतो.
सुमनताईंनी मराठी भावगीतांपैकी सर्वात जास्त गाणी श्री दशरथ पुजारी यांच्याकडे गायली. किंबहुना दशरथ पुजारी यांच्या गाण्यांमुळेच आज मराठीभावगीतांमध्ये सुमनताईंची गाणी मैलाचा दगड ठरली आहेत.
सुमन कल्याणपुर यांनी मराठे व हिंदी व्यतिरीक्त पंजाबी, गुजराती, बंगाली, असामी, कन्नड, भोजपुरी ओरीया भाषेत सुद्धा गाणी गायली आहे.
"न तुम हमे जानो न हम तुम्हे जाने मगर लगता है कुछ ऐसा मेरा हमदम मिल गया", "ठहरीए होश मै आ लू, तो चले जाईएगा", "तुमसे ओ हसीन कभी मोहब्बत न मैने करनी थी", "परबतो के पेडो पर शाम का बसेरा है", "अज हु ना आये बालमा", "तुमने पुकारा और हम चले आये" "मेरे मेहबुब न जा" या आणि अशा असंख्य गाणी गाऊन त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीहि गाजवली होती. आणि लोकप्रियतेच्या या शिखरावरच असताना त्यांनी एकदम गाणे गायचे सोडुन दिले. काहि अंतर्गत वादामुळे रफी यांनी लतादिदि बरोबर गाण्याचे सोडुन दिल्याने लतादिदिंची काही गाणी सुमनताईंच्या वाटेला आली आणि त्यांनी त्या गाण्याचे अक्षरशः सोने केले. (मनात कधे कधी असा विचार येतो की हा वाद अजुन काहि काळ असता तर सुमनताईं आणि मो. रफी यांची आणखी काहि गाणी ऐकायला मिळाली असती :)). कारण काहिहि असो पण त्याकाळच्या स्पर्धेच्या युगात एका चांगल्या गायिकेचा आवाज दबला गेला असे मला वाटते. कधी असेहि वाटते कि त्यांना अजुन संधी मिळाली असती तर त्यांच्या नावने सुद्धा आज एखादा पुरस्कार दिला गेला असता....... असो.......
आजही इतक्या वर्षांनीहि सुमनताईंची गाणी परत परत ऐकावीशी वाटतात. तेंव्हा सुमनताई तुम्ही परत एकदा या, सारे काहि विसरून पुन्हा मनमोकळेपणाने गा. आम्ही सर्व रसिक, तुमचे चाहते या क्षणांची आतुरतेने वाट पाहत आहे.
सुमनताईंनी गायलेली काहि मराठी गाणी:
आई सारखे दैवत सार्या जगतात नाहि
अक्रुरा नेऊ नको माधवा
आकाश पांघरून जग शांत झोपलेले
आली बघ गाई गाई
केतकीच्या बनी तेथे नाचला ग मोर
वाट इथे स्वप्नातील संपली जणु
अरे संसार संसार
असावे घर ते आपुले छान
चल उठ रे मुकुंदा
देवा दया तुझी
दिपक मांडले
एक तारे सुर जाणे
एकदाच यावे सखया
गेला सोडुनी मजसी कान्हा
घाल घाल पिंगा वार्या
हाले हा नंदाघरी पाळणा
हि नव्हे चांदणी हि तर मीरा गाते
जिथे सागरा धरणी मिळते
जगी ज्यास कोणी नाहि
जुळल्या सुरेल तारा
का मोगरा फुलेना
कुणी निंदावे वा वंदावे
कशी गवळण राधा बावरली
कशी करू स्वागता
केशवा माधवा तुझ्या नावात रे गोडवा
क्षणी या दुभंगुनी
मज नकोत अश्रु घाम हवा
मस्त हि हवा नभी
मी बोलले काहि
मी चंचल होऊनी आले
मृदुल करांनी छेडित तारा
नकळत सारे घडले
नंदाघरी नंदनवन फुलले
नाविका रे वार वाहे रे
निंबोनीच्या झाडाखाले
ओंकार प्रधान रूप गणेशाचे
पहिलीच भेट झाले
पाखरा जा दुर देशी
पैलतीरी रानामाजी
पक्षिणी प्रभाती चारीयासी जाय
पाण्यातली परी मी
पिवळी पिवळी हळद लागली
प्रीत हि डोळ्यात माझ्या
प्रीत सागरी तुझ्या स्मृतीचे
रिमझिम झरती श्रावणधारा
सांग कधी कळणार तुला
सहज तुला गुपित एक
सावळ्या विठ्ठला
शब्द शब्द जपुन ठेव
श्रीरामाचे चरण धरावे
लिंबलोण उतरता
जाग रे यादव
ते नयन बोलले काहि
तुझ्या बोटाला कृष्णा
तुझ्या कांतीसम
तुला ते आठवले
उघडले एक चंदनी दार
उर्मिला मी
उठा उठा चिऊताई
वार्यावरती घेत लकेरी
विसरशील तु सारे
या झोपल्या जगात
या कळ्यांनो या फुलांनो (मंत्र वंदे मातरम)
या लाडक्या मुलांनो
असे हे जगचे फिरे चक्र बाळा
वल्हव वल्हव रे वल्हव रे होडी
गणाधिपा हो उठा लवकरी
ओम नमो हा सुर
जो त्रिगुणांची मुर्त जाहला
पार्वती वेचिती बिल्वदळे
देवगृही या भक्तजनांना गौरीनंदन पावला
टिपः सुमनताईंच्या गाण्यांचा निस्सिम चाहता असल्याने हा लेख प्रपंच.चु.भु.द्या.घ्यावी.
पण दुर्दैव असे की सुमनताईंनी
पण दुर्दैव असे की सुमनताईंनी गायलेली बहुतेक गाणी हि लता मंगेशकर यांनी गायली आहे असा अनेकांचा समज असतो.>> अगदी. अगदी.
एका चांगल्या गायिकेचा आवाज
एका चांगल्या गायिकेचा आवाज दबला गेला असे मला वाटते. >>
मलाही असेच वाटायचे.
पण सप्तरंग मधे वाचल्याचे आठवते, फॅमीली साठी सुमनताईंनी गाण्यात करीयर नाही केले. कारण त्यासाठी मुंबई ला रहाणे आवश्यक होते, आणि त्यांच्या मिस्टरांची बदली, अंदमान-निकोबार सारख्या प्रदेशात झाली होती.
छान लेख
छान लेख
छान लिहिलयं! सुमनताईंवर
छान लिहिलयं!
सुमनताईंवर अलिकडे "सुमनसुगंध" नावाच पुस्तक आलय ना? बहुतेक मंगला गोडबोलेनी लिहिलयं. कुणी वाचलय का ते?
रेशिम, "सुमनसुगंध" हे पुस्तक
रेशिम, "सुमनसुगंध" हे पुस्तक मंगला खाडिलकर यांनी लिहिलेले आहे.
खरंच सुंदर लेख्...कितीतरी
खरंच सुंदर लेख्...कितीतरी गाणी लतादीदींनी गायलीत म्हणुन प्रसिद्ध होती..तुमच्या लेखामुळे आणि गाण्यांच्या लिस्ट मुळे माझेही बरेच गैरसमज दूर झाले..खरंच आभार तुमचे
सुंदर लेख, योगेश. त्यांची
सुंदर लेख, योगेश. त्यांची गाणी खूप ऐकली... समजून गाणार्यांतल्या एक.
वाढदिवसाच्या त्यांना मनापासून शुभेच्छा. तुझे आभार.
सुमनताई कल्याणपूर यांच्या
सुमनताई कल्याणपूर यांच्या दुर्मिळ २५ गाण्यांचा संग्रह "युनिव्हर्सल म्युझिक" कंपनीने "स्वर सुमन" या शिर्षकांतर्गत MP3 स्वरूपात उपलब्ध केला आहे. (किंमत रू. ७५/-)
यात खालील गाणी (ओरीजनल) आहेत.
१. गणाधीपा हो उठा लवकरी
२. सोनसकाळ झाली
३. जो त्रिगुणांची मूर्त जाहला
४. देवगृही या भक्तजनांना
५. जयदेव जयदेव
६. राम राम राम
७. शांती परते नाही सुख
८. आवडे हे रूप
९. श्रीरंगा हो ध्यास जीवाला
१०. हेचि थोर भक्ती
११. दीप लाविले ज्योती गाती
१२. ओम नमो हा सूर
१३. चला रांगोळ्या घालुया (दशदिशा उजळल्या)
१४. दारी पाऊस पडतो (आला सुगंध मातीचा)
१५. काल राती स्वप्नामधे एक राजा आला
१६. मी तर थांबले ग
१७. आला ग बाई अंगणी बाळराजा
१८. चंद्र हे चांदणे जणु
१९. हास रे ह्रदयी मम नंदलाल
२०. आले मनात माझ्या
२१. निंदित जरी हे लोक
२२. हसण्याचे बहुमोल
२३. अजाण आम्ही तुझी लेकरे
२४. तु नाही मी, मी नाही तु
२५. वल्हव वल्हव रे वल्हव रे होडी पल्याड माझे गाव रे
सुमनताईंची काही गाणी ऑनलाईन इथे ऐकायला मिळतील.
व्वा व्वा काय अप्रतिम लेख !
व्वा व्वा काय अप्रतिम लेख ! फारच छान.
सुमनताईंचा आवाज किती गोड तसाच हा लेखही सुमधुर !
तुमचे खूप आभार .
परमेश्वर कृपेने सुमनताईंना उत्तम आयुरारोग्य प्राप्त होवो.
सुमनजी - one of my most fav
सुमनजी - one of my most fav singers...
"केतकीच्या बनी".. हे गाणं त्यांनी जे अशक्क्क्क्य गायलंय ना.. त्याला तोड नाही... तसं फक्त एकीनेच गायलं होतं - आनंदी जोशी, सारेगामाच्या पहिल्या सत्रात... "ओठावरी भिजला गं आसावला सूर" ही तिने गायलेली ओळ अजून कानात भरून आहे... बाकी no one could beat सुमनताई...
जीवेत् शरदः शतम्...
छान लेख! सुमनताईंना
छान लेख! सुमनताईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा!
योगेश, एवढा छान लेख
योगेश, एवढा छान लेख लिहिल्याबद्द्ल शतशः धन्यवाद! काय सुंदर माहिती दिलेय तुम्ही!
"केतकीच्या बनी तिथे" हे गाणे तर मी परत परत ऐकते. तरी समाधान होत नाही.
सुमन ताईंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
छान, मस्त लेख! "विसरशील खास
छान, मस्त लेख! "विसरशील खास मला" हे सुमनताईंचच गाणं का?
योगेश सुरेख लेख. सुमनताई
योगेश सुरेख लेख. सुमनताई माझ्यापण फेवरीट. मलाही त्यांचा इतका सुंदर आवाज असुन त्यांच्यावर अन्याय झाला आहे असेच वाटत आले आहे नेहेमीच. ठहरीए होश मै आ लू, तो चले जाईएगा हे अत्यंत आवडते गाणे. वाट इथे स्वप्नातील व शब्द शब्द तर अप्रतिम. धन्यवाद व सुमनजींना वाढदिवसाच्या शुभच्छा.
प्रतिसादाबद्दल
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
"केतकीच्या बनी".. हे गाणं त्यांनी जे अशक्क्क्क्य गायलंय ना.. त्याला तोड नाही...>>आनंदयात्री, अनुमोदन.
"विसरशील खास मला" हे सुमनताईंचच गाणं का?>>>>बित्तु, हे गाणे आशा भोसले यांचे.
ठहरीए होश मै आ लू, तो चले जाईएगा हे अत्यंत आवडते गाणे.>>>>केपी, सेम पिंच. माझही अत्यंत आवडतं गाणे. यातील "मुझको इजहारे मोहब्बत से हया आती है....." हे कडवं खुपच आवडते.
जिथे सागरा... हे गाणं मी
जिथे सागरा... हे गाणं मी किमान दोन वेळा तरी ऐकतेच. त्याशिवाय समाधान नाही होत.
बाकी सगळ्यांना अनुमोदन.
सुमनताईंना खूप खूप शुभेच्छा!!
छान लेख ... पण दुर्दैव असे
छान लेख ...
पण दुर्दैव असे की सुमनताईंनी गायलेली बहुतेक गाणी हि लता मंगेशकर यांनी गायली आहे असा अनेकांचा समज असतो >> हे खरे आहे... लता दीदींचा आणि सुमनताइंचा आवाज ओळखणे काही जणांना कठीण जाते... उदा.. नाविका वारा वाहे रे.. काही वर्षांपूर्वी पहिल्यांदा जेव्हा हे गाणे ऐकले तेव्हा एवढेच वाटले की आवाज लता मंगेशकरांच्या जवळ जातोय पण लता मंगेशकर वाटत नाही... सुमन कल्याणपूर असाव्यात... नेट वर हुडकल्यावर ही गोष्ट कन्फर्म झाली...
सुमन कल्याणपुर माझ्या अत्यंत
सुमन कल्याणपुर माझ्या अत्यंत आवडत्या गायिका. मला आवडलेली त्यांची काही गाणी (बहुतेक रफीबरोबरची युगुलगीते आहेत)
दिलने पुकारा और हम चले आये (राजकुमार)
तुम्हे देखा तुम्हे चाहा (छोटीसी बात)
आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे (ब्रह्मचारी)
दिल एक मंदिर है (दिल एक मंदिर)
बहनोने भाई की कलाई मे (रेशम की डोरी)
ओ मेरी लाडली (दिल एक मंदिर)
हा लेख कसा मिसला मी?? किती
हा लेख कसा मिसला मी??
किती सुंदर सुंदर गाणी आहेत सुमन कल्याणपूर यांची....!
मीही अतिश्य चाहती आहे त्यांची.. त्यांचा आवाज आणि त्यांना मिळालेली सुरेख गीते याचे त्यांनी अक्षरश: सोनेच
केले आहे यात शंका नाही! धन्यवाद जिप्सी
अरे मी कसा मिसला हा अपूर्व
अरे मी कसा मिसला हा अपूर्व लेख..
सुमन कल्याणपूर यांना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!!!
त्या वेळच्या जीवघेण्या स्पर्धेपायी आणी नंतर कौटुंबिक कारणांपायी इतका सुंदर,मधुर आवाज काळाच्या पडद्याआड ढकलला गेला पण त्याची आठवण , सुमन च्या चाहत्यांच्या मनातून कधीच पुसली गेली नाही ,हा लेख या गोष्टीचा भक्कम पुरावाच आहे..
धन्स जिप्सी!!
पर्बातोंके पेडोंपर शाम का बसेरा है, मेरे संग गा ,गुनगुना, अजहुन आये बालमा, मेरे महबूब न जा, न जाने कहाँ हम थे, चाँद तकता है इधर, दिल ने फिर याद किया... स्सुमन कल्याणपूर.. तुम जियो हजारों साल..
Pages