डोम्या म्हणे .... तो मी नव्हेच !

Submitted by कौतुक शिरोडकर on 20 December, 2009 - 12:20

"कळल की नाही ? " डोम्या कावळ्याशेजारी स्थान ग्रहण करताच बोलला.
"काय रे ?" कावळ्याने मान उंचावत विचारलं.
"अवधुत गुप्तेंचा 'झेंडा'. आता 'फडकतो' की 'भडकतो' ते माहीत नाही ?" डोम्याने पुडी सोडली.
"का रे ?" कावळ्याने शंकीत स्वरात विचारलं.
"निखारे हातात घेतले की हात भाजतोच, नाही का ? पहिलाच चित्रपट आणि तोही सरळ ठाकरे खानदानावर. गुप्ते 'गुप्त' झाला नाही म्हणजे मिळवलं ?" डोम्याने आपला तिरकसपणा ऐकवला.
"डोम्या, आडनावांवर कसल्या कोट्या करतोयस ? कोठीकरांसारख्या " कावळ्याने चोरलेलं वाक्य फेकलं.
"कावळ्या, हा आडनाव प्रकार भारी असतो. माणसांचे स्वभावविशेष आणि त्यांचे कर्तृत्व यांच्यावर कधी कधी आडनावाचा फार पगडा असतो बघ. त्यामुळे ती आडनाव फक्त त्यांनाच शोभतात." डोम्या विचारवंतासारखा बोलला.
"सिद्ध कर." कावळ्याने त्याला ढुशी देत सांगितल.
"हे म्हणजे 'बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल' पद्धतीचं बोललास. तुझ्यासारख्याला कावळ्याला श्राद्धाशिवाय दुसरं सुचणार तरी काय ? " डोम्याने त्याला खिजवलं.
"डोम्या, तू सरळ असा पर्सनल लेव्हलला येऊ नकोस. कावळा असलो तरी दिलेल्या पिंडावर भागवतो. मेलेल्यांच्या टाळूवरचं लोणी खात नाही. चल, आता तुझा मुद्दा स्पष्ट कर." कावळ्याने आपला सेल्फ रिस्पेक्ट राखला.
"श्रीसंथसारखा चिडू नकोस. बरं ऐक, ठाकरे मधला 'करे' महत्त्वाचा. 'हम करे सो' सारखा. एकदा 'करे' म्हटल की मग मागे हटणे नाही. इथे ती 'मरे' सारखी 'रोज मरे' नव्हे बरे. 'ठा' च काय करायचं ते तू कर. 'ठाम' कर नाहीतर 'ठार' कर. एक घाव दोन तुकडे. इकडे तिकडे नाहीच." डोम्याने ठाकरे शैलीची फोड केली.
"अरेच्चा, मी हा विचार कधी केलाच नाही." कावळ्याने डोके खाजवले.
"दोष तुझा नाही. आपली शिक्षणपद्धती विचार करायलाच देत नाही. धोकायचं, गिरवायचं, पास व्हायचं, पुढे जायचं, मागचं विसरायचं. पुन्हा..." डोम्या शिक्षणावर घसरला.
"तू विषयांतर करू नकोस. मला नीट उदाहरण दे." कावळ्याने डोम्याला ट्रॅकवर आणलं.
"सांगतो, पवार घे. कधी, कुठे, कुणावर वार करतील त्याचा नेम नाही. पाठीत वार करण्याबद्दलचा त्यांचा इतिहास सर्वज्ञात आहे. भुजबळ बिचारे अधूनमधून आपल्या भुजांमधील बळ चाचपत राह्तात. मुंडेचे मुंडे उगवत्या सुर्याकडे पाहणार्‍या सुर्यफुलासारखे दिल्लीकडे उगवते आणि शेवटी महाराष्ट्रात मावळते. गडकरीच्या नावातली 'करी' आधी त्यांच्या पोटाकडे बोट दाखवते. स्वतःचा गड राखता राखता आता भाजपाच्या ढासळत्या गडाला राखायला 'गडकरी' निघालेत. अडवाणींना त्यांच्या 'वाणी'ने जेवढं 'अड'वल तेवढं अजून कोणी अडवलचं नसेल. चव्हाणाची व्हाण नांदेड, मुंबई, दिल्ली यातच घासली जातेय. लातूरमधल्या सगळ्या गोष्टी नांदेडमध्ये आणायला त्यांना पाच वर्षे नुसत्या वार्‍याच करायला लागणार बहुतेक. देशमुखांच्या मुखाचं काय बोलणार ? स्वतःच्या मुखाबरोबर त्या वर्माच मुख घेऊन ताजला गेले आणि त्यांच्या वर्मावरच सगळ्यांनी बोट ठेवलं. आता आपले पाटील. यांच्या कोर्‍या पाटीला कोणतीही गोष्ट कळत नाही till इट हॅपन्स. राणेंच्या आडनावातच 'गार्‍हाणे' आहे. कायम तेच रडगाणे घेऊन ते पक्षश्रेष्ठीकडे जात असतात." डोम्याने उदाहरणाची पोतडी उघडली.
"शिरोडकर बद्दल तुझं काय मत आहे ?" कावळ्याने त्याच्या धावत्या गाडीला मध्येच ब्रेक लावला.
"खाल्ल्या ताटात कशाला नको ते करायला लावतो कावळ्या. ते म्हणतात ना, आपलं ठेवावं झाकुन आणि दुसर्‍याच...." डोम्या मध्येच थांबला.
"तेही बरोबर. कुलकर्णीबद्दल तुला काय वाटते ?"
"अरे, नावातच थंड करणी असलेल्या माणसाचं काय ? सांभाळायला हवं रे बाबा !" डोम्या चारही दिशांना पाहून हळूच बोलला.
"बरं, जोशी, देसाई, पटवर्धन यांच्याबद्दल काय ?"
"कावळ्या, तुझ्या लिस्टचा संदर्भ भलतीकडे चाललाय. मी काय म्हणतोय ते जर पटवर्धनांना पटलं नाही तर धना धन होईल माझी. तेव्हा हा विषय इथेच पुरे."
"ठिक आहे. अवर फादर्स वॉट गोज. ते विदर्भाचं काय ? मनसे नाही म्हणाली ना ?" कावळ्याने ट्रॅक बदलला.
"कावळ्या, पत्रकार म्हणजे तुला चालता-बोलता टिव्ही वाटतो का रेडीओ. केबल, डिशवाल्या घरात वाकायची सोय नसेल तर निदान रद्दीतला पेपर घेऊन वाचत जा." डोम्याने लायकी काढली.
"डोम्या, टिव्ही-रेडीओ मला पटत नाही. सिरियल्स पचत नाहीत. आरजे झेपत नाहीत. ब्रेकींग न्युज रुचत नाही. वाचायचं म्हटल तर लोक रद्दीही सांभाळून महिन्याअखेर विकतात. तेवढीच एकवेळच्या भाजीची सोय. तुला जमत असेल तर सांग नाहीतर हा मी चाललो." कावळ्याने सरळ शेवटच्या अस्त्राला हात घातला.
"कावळ्या पक्षांतर करणार्‍या प्रादेशिक नेत्यांसारखा धमक्या कसल्या देतोस ? ऐक, मनसे स्वतंत्र विदर्भाच्या विरोधात आहे. हे म्हणजे 'लोका सांगे ब्रम्हज्ञान' यातला प्रकार. स्वतःची घुसमट होते, विकास होत नाही म्हणून वेगळा पक्ष काढायचा. पण तोच नियम विदर्भाला लागू केला तर म्हणायचं, महाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाही. एंव नाही आणि तेंव नाही. " डोम्या पुन्हा पत्रकाराच्या भुमिकेत शिरला.
"बरोबर आहे, उद्या तसं झाल तर मग यांच्यातलाच कोणी वेगळी विदर्भ नवनिर्माण सेना काढायचा." कावळ्याने मुद्द्याला हात घातला.
"करेक्ट. पण हा संसर्गजन्य रोग आहे. याची लागण वाढली तर प्रत्येक वॉर्ड उद्या स्वतंत्र होण्याची मागणी करेल. मग एकाला एक आणि दुसर्‍याला दुसरा न्याय असं करताच यायचं नाही. तुला काय वाटतं, जनतेला वेगळी चुल हवीय ? नाही रे, त्यांना फक्त त्यांची चुल पेटती हवीय. पण त्याच्याशी कुणाला काही घेण देणच नाही. हे फक्त आपापल्याच राजकीय पोळ्या भाजण्यात व्यस्त. काँग्रेसने तरी विदर्भाला एवढी वर्षे काय केलं....वर वर माया आणि उपाशी निज ग बया. बाकीचेही त्यातलेच." डोम्या जरा चिडलाच.
"मग यावर इलाज काय ?" कावळा चिंतित स्वरात बोलला.
"जसा बारामती म्हणजे महाराष्ट्र नव्हे हे जेव्हा पवारांना तसेच नांदेड म्हणजे महाराष्ट्र नव्हे हे चव्हाणांना कळेल तेव्हाच काहीतरी होईल बघ. दिल्लीला पोहोचले तरी हे नेते अजून आपापल्या गल्लीतच रमलेत. त्याच्यापलिकडे विकास त्यांना सुचतच नाही."
"जाऊ दे. या राजकारण्याबद्दल बोलणं म्हणजे उगाच स्वतःच्याच डोक्यात राख घालून घेण्यासारखं आहे. आपण दुसर्‍या विषयावर बोलू."
"कुठल्या ? कोपनहेगनची बैठक सोसायटीच्या बैठकीसारखी फिसकटली त्यावर की दुबईच्या मंदीने शेखांचे धाबे दणाणले त्यावर की भारत - श्रीलंका 'तुला एक-मला एक' खेळताहेत त्यावर की अरुणा शानबागचं आयुष्य उध्वस्त करून सुखानं जगणार्‍या सोहनलालला सोडून तिच्या सुखांतासाठी दाखल झालेल्या याचिकेवर ?"
"डोम्या, मी एक सामान्य कावळा आहे रे. ज्यात मला गती नाही त्यात माझी मती कशी चालेल ?"
"जाऊ दे चल. इतिहासातलं बोलू शाहीस्तेखानाने पुणं लुटलं पण शिवाजी महाराजांनी एक अक्षराने त्याची चौकशी न करता तलवार चालवली त्याची बोटे छाटली. अफझलखानाने मंदिरं फोडली पण शिवाजी महाराजांनी एका अक्षराने त्याची चौकशी न करता कोथळा बाहेर काढला. खंड्याने बाया नासवल्या पण शिवाजी महाराजांनी एक अक्षराने त्याची चौकशी न करता हातपाय छाटले."
"म्हणजे ? महाराजांचं चुकल म्हणायचं का तुला ?"
"अलबत. याला काही अर्थ आहे का ? मानवाधिकार वगैरे काही असतं की नाही ? असा कसा जाणता राजा जो समोरच्याला सफाईची संधी देत नाही. साक्षीदार नाही, ओळख परेड नाही, वकील नाही, तारीख नाही, आरोपपत्र नाही.... लोकशाही म्हणतात का याला ? आणि म्हणे शिवाजी महाराज लोककल्याणकारी राजा होते. तुला तरी पटतय का ते ? "
"डोम्या, मित्रा, कन्फुज नको करूस." कावळयाची उरलीसुरली मती मंदावली.
"कावळ्या, कारण जाणत्या राज्याला गुन्हेगारांचे लाड पुरवायची सवय नव्हती. आम्हाला आहे. म्हणुन तर तो कसा बघ बोलला. त्याचा तरी काय दोष ? पोलिसांची आधीच 'कानफाट्या' म्हणून ख्याती आहे. खोट्या चकमकी आणि निरपराध्याला बडगा. यांच्या नावावर कमी का खपलय ? त्यात आमचे आदर्श विचार, आदर्श उसुल. नको तिथे लोकशाहीचा डंका. मानवाधिकाराची पुंगी. लोकांच्या पैशाचा चुराडा. वर्षभराचा फार्स काय कमी होता. वकीलांची बतावणी, साक्षीपुराव्याची गवळण आणि सरतेशेवटी वग कोणता तर कसाबलिखित "तो मी नव्हेच !"
..... आणि डोम्या उडाला.

कावळा मात्र उघड्या डोळ्यांनी आपल्याला अजून काय काय तमाशे पहावे लागणार आहेत याचा विचार करत बसला.

गुलमोहर: 

तुला काय वाटतं, जनतेला वेगळी चुल हवीय ? नाही रे, त्यांना फक्त त्यांची चुल पेटती हवीय. >>> कौतुक अगदी थोडक्या शब्दांत खुप काही सांगुन गेलास ,
जनतेला चुल पेटती हवीय स्वत:च्या पोटाची आग विझवण्यासाठी , पण संधीसाधु राजकारणी त्याच चुलीतले निखारे इतरांच्या घरांवर टाकुन आगी लावालया भाग पाडतील आता ह्या मुद्द्यावरुन . Uhoh

झकास Happy

झकास रे कौतुक....डोम्या रॊक्स ! Proud

डोम्या, आडनावांवर कसल्या कोट्या करतोयस ? कोठीकरांसारख्या>>>>>

कुलकर्णीबद्दल तुला काय वाटते ?"
"अरे, नावातच थंड करणी असलेल्या माणसाचं काय ?>>>>

संबंधितांनी नोंद घ्यावी ! Proud Rofl

इतिहासातलं बोलू शाहीस्तेखानाने पुणं लुटलं पण शिवाजी महाराजांनी एक अक्षराने त्याची चौकशी न करता तलवार चालवली त्याची बोटे छाटली. अफझलखानाने मंदिरं फोडली पण शिवाजी महाराजांनी एका अक्षराने त्याची चौकशी न करता कोथळा बाहेर काढला. खंड्याने बाया नासवल्या पण शिवाजी महाराजांनी एक अक्षराने त्याची चौकशी न करता हातपाय छाटले."
"म्हणजे ? महाराजांचं चुकल म्हणायचं का तुला ?"
"अलबत. याला काही अर्थ आहे का ? मानवाधिकार वगैरे काही असतं की नाही ? असा कसा जाणता राजा जो समोरच्याला सफाईची संधी देत नाही. साक्षीदार नाही, ओळख परेड नाही, वकील नाही, तारीख नाही, आरोपपत्र नाही.... लोकशाही म्हणतात का याला ? आणि म्हणे शिवाजी महाराज लोककल्याणकारी राजा होते. तुला तरी पटतय का ते ? "
"डोम्या, मित्रा, कन्फुज नको करूस." कावळयाची उरलीसुरली मती मंदावली.
"कावळ्या, कारण जाणत्या राज्याला गुन्हेगारांचे लाड पुरवायची सवय नव्हती. आम्हाला आहे. म्हणुन तर तो कसा बघ बोलला. त्याचा तरी काय दोष ? पोलिसांची आधीच 'कानफाट्या' म्हणून ख्याती आहे. खोट्या चकमकी आणि निरपराध्याला बडगा. यांच्या नावावर कमी का खपलय ? त्यात आमचे आदर्श विचार, आदर्श उसुल. नको तिथे लोकशाहीचा डंका. मानवाधिकाराची पुंगी. लोकांच्या पैशाचा चुराडा. वर्षभराचा फार्स काय कमी होता. वकीलांची बतावणी, साक्षीपुराव्याची गवळण आणि सरतेशेवटी वग कोणता तर कसाबलिखित "तो मी नव्हेच !">>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>१००% खरं बोललास कॉतुक.

डोम्या जबरीच.. इचारात पाडतोस दर वेळी.. हा भाग तर सॉल्लिड झालाय.. !!
शिरोडकर वर कोटी ??? कोटीकर.. सॉरी कोठीकर करतीलच.. हेहेहे Happy

गुप्ते 'गुप्त' झाला नाही म्हणजे मिळवलं ?" >>

डोम्या, आडनावांवर कसल्या कोट्या करतोयस ? कोठीकरांसारख्या>>>>>

कुलकर्णीबद्दल तुला काय वाटते ?"
"अरे, नावातच थंड करणी असलेल्या माणसाचं काय ?>>>>

सही रे...