२६/११ च्या रात्रीचा थरार ... मी अनुभवलेला !!!

Submitted by भ्रमर on 25 November, 2009 - 23:06

संध्याकाळी सात वाजता ऑफीस बंद करतानाच मोबाईल वाजला.
"काय रे भ्रमा, कुठल्या गाडीने निघालायस?" फोनवर मायबोलीकर योगी (Yo.Rocks!) होता.
"कोकण कन्या, ११:०५ ला सिएसटी ला"
"कोण कोण जाताय?"
"सगळेच रे. मी, आई, आणि अर्थात शुभांगी- मनवा"
"लग्न कधी आहे?"
"२९ ला आहे रे. आदल्यादिवशी साखरपुडा. एक दिवस आधी जातोय."
"मग नंदिनीच्या लग्नाला जाणार ना?"
"मी ३१ ला परत येतोय, तिचं लग्न ३ तारखेला आहे. पण तिला भेटुन यायचा विचार तर आहेच."
"घरुन...."
मोठ्याने आचका देत मोबाईल बंद पडला. बॅटरी डाउन झाली होती. ’रात्रीच्या प्रवासात फारसा लागणार नाहिये, त्यामुळे घरी जाऊन थोडा चार्ज करु, तसं ट्रेन मधे पण चार्ज करता येईलच की’ असा विचार करतच ऑफिस बंद करुन निघालो. वाटेत मिठाई घेऊन घरी पोचलो. मनवा - माझी दोन वर्षाची मुलगी वाट बघतच होती.
"बाबा, चला चला, सुलु मावशीच्या लग्नाला जायचं. झुक झुक गाडीने जायचं, य्ये य्ये"
"हो रे पिल्ला, जाऊया हां."

मोबाईल चार्जिंगला लावुन सामानावर एक नजर टाकली. एक मोठी सुटकेस आणि दोन खांद्याला मारता येतील अशा बॅग्स एवढं सामान होतं. साडेतीन माणसांचे कपडे, थंडीचे दिवस असल्याने स्वेटर्स, लग्नासाठीचे कपडे, भेटवस्तु यामुळे बॅग्स भरल्या होत्या. मी एकदा उचलुन बघितल्या. "भलत्याच जड की. कुलीच करावा लागेल" असं मनाशी म्हणत मी फ्रेश व्हायला गेलो.

लग्न सराईचे दिवस, आणि सि.एस.टी. ला टॅक्सीने जायचं होतं. एअर पोर्टच्या जवळच्या बर्‍याच हॉटेल्स मधे लग्नसमारंभ असतात आणि त्यामुळे ट्राफीक बर्‍यापैकी जाम होत असतं. सेंटॉर होटेल जवळच्या फ़्लायओवरच काम देखिल तेव्हा सुरु होतं. उशीर होण्यापे़क्षा लवकर गेलं तरी हरकत नाही असा विचार करुन मी ९.०० वाजता घर सोडण्याचं निश्चित केलं होतं. आठ वाजता जेवुन मी पावणे नऊ ला टॅक्सी आणण्यासाठी बाहेर पडलो. दोघा-तिघांची नकार घंटा ऐकुन घ्यावी लागलीच. एक टॅक्सीवाला तयार झाला, त्याला घरी घेऊन आलो. गोरेगावातच राहणारा भाऊ तोवर आला होता. सामान भरुन, शेजार्‍यांना घरावर लक्ष ठेवायला सांगुन आम्ही टॅक्सीत बसलो आणि निघालो तेव्हा वाजले होते रात्रीचे नऊ आणि तारीख होती २६ नोव्हेंबर २००८!!!!

*******************************************

वाटलं होतं तसं ट्राफीक काही मिळालं नाही. फ़्लायओवर कडे सुद्धा फार त्रास न होता आम्ही पुढे निघालो. टॅक्सी ड्रायवर बडबड्या होता. पोलीस कसे हैराण करतात याच्या कहाण्या ऐकवत होता. होता होता आम्ही सि.एस.टी. ला पोचलो. टॅक्सीचे तीनशे रुपये देऊन मी सामान उतरवलं आणी एका कडेला नेऊन ठेवलं. "हॅपी जर्नी साब" अशा शुभेच्छा देऊन टॅक्सीवाला निघाला आणि मी कुली शोधायला लागलो. पण सगळे कुली तितक्यातच आलेल्या गाडीतून उतरणार्‍या प्रवाशांचं सामान उतरवण्यात मग्न दिसत होते. एका कुलीने "१०० रुपये" सांगितले.
"आयला भलतच की. एकच बॅग तर घ्यायची. ह्या दोन मी घेईन." त्याला काही रस नसावा, तो पुढे गेला. मी घड्याळ्यात पाहिलं, ९:४० झाले होते. गाडीला बराच वेळ होता.
"आई, तू ईथे उभी राहतेस का? मी ह्या दोघांना सोडुन आणि ही सूटकेस ठेवुन परत येतो. मग आपण जाऊया."
आई हो म्हणाली. मी तिला कडेला उभं केलं, दोन बॅगा तिच्या पायाकडे ठेवल्या आणि मोठी सूटकेस घेऊन निघालो.

सि.एस.टी. ला जिथे मधे वेटींग हॉल आहे त्याच्या उजव्या बाजुन आम्ही प्रवेश केला. वेटींग हॉल खचाखच भरला होता. सगळी बाकडी अगदी फुल्ल होती. बरीच माणसं खाली बसली होती. वेटींग हॉल संपला की एक मोठा कॉरीडॉर लागतो आणि हा कॉरीडॉर संपला की प्लॅट्फॉर्म नंबर १६ सुरु होतो जिथुन कोकणकन्या सुटते. प्लॅटफॉर्मवर आलो तेव्हा गाडी लागली होती. जनरल खचाखच भरला होता, पत्रे फुटुन माणसं बाहेर येतील की काय असं वाटण्याईतपत गर्दी होती. मी पटापट पुढे चालत होतो. हातातल्या जड बॅगमुळे हाताला रग लागली होती. ईतक्यात मनवाने मागुन हाक मारली. मी थांबलो.
"काय गं?"
"हळु चाला ना बाबा, मी पण येते ना?"
हसुन मी हळु चालु लागलो. थ्री टीयर एसी बराच पुढे होता, तिथवर येऊन पोचलो. बॅग खाली ठेवुन मी कंपार्टमेंट शोधलं, पण दरवाजा आतुन बंद होता.
"साफ सफाई चालु है साब, पाच मिनट लगेगा और"
"तुम्ही ईथे बसा, मी तोवर आईला घेऊन येतो." असं शुभांगीला सांगुन मनवाला टाटा करुन मी मागे फिरलो.
प्लॅटफॉर्मवर माणसं येत होती. एक फिरंगी टोळकं पण उभ होतं. मी सगळीकडे बघत पटापट कॉरीडॉरच्या दिशेने जात होतो.

कॉरीडॉरच्या तोंडाशी आलो मात्र, समोरुन काही माणसं धावत येताना मला दिसली.
"गाडी सुटायला अजुन बराच वेळ आहे, कशाला धावतायत" असा विचार करत मी दोन पावलं पुढे सरकलो.
"फायर, फायरींग. भागो भागो" असे म्हणत आणखी काही माणसं धावत आली. मला कळेना की आग नक्की कुठे लागलिये.
मी जागीच खिळुन उभा राहिलो. क्षणात मला आठवल की आई बाहेर आहे. मी पुढे सरकलो आणि....

"फट फट फट फट" असे आवाज ऐकु आले. आणि समोर गोळ्या सुटलेल्या दिसल्या. काही गोळ्या धातूच्या कमानीवर आपटल्या आणि ठिणग्या उडाल्या. चार-पाच माणसं खाली पडली होती, अगदी निपचित होती. मी थोडा पुढे सरकलो ईतक्यात "ढम्म" असा मोठा आवाज झाला. कॉरीडॉरमधली सगळी माणसं पटापट आजुबाजुच्या वेटींग रुम मधे घुसली. मला मात्र आईचा चेहरा डोळ्यासमोर दिसत होता. काय करावं अशा मनस्थितीमधे असताना आणखी गोळ्यांचे आवाज ऐकु आले आणि मी प्लॅटफॉर्मच्या दिशेने पळालो. प्लॅटफॉर्मवर मात्र कोणाला काहीच चाहुल लागलेली दिसत नव्हती. मी धावत शुभांगी उभी होती तिथे पोचलो.
"फायरिंग झालयं. काही माणसं पडलीत."
"आई कुठेत?" तिने घाब‌र्‍या आवजात प्रश्न केला.
"ती बाहेरच आहे. मी बघतो काय ते, तु मात्र गाडीत बसुन रहा"
मी परत धावत निघालो. कॉरीडॉरमधे आलो. सगळे वेटींग रुममधे घुसले होते. परत गोळ्यांचे आवाज आले आणि मी पण आत घुसलो.
माणसं प्रचंड घाबरली होती. काही बायका रडत होत्या. बाहेर आवाज थांबले आणि मी वेटींग रुमचा दरवाजा उघडु लागलो. एक बाई मला अडवु लागली.
"रुको, मत खोलो"
"अरे मेरी मां बाहर है, आपके उमरकी है!"
मी बाहेर आलो. एक रेल्वेचा कॉंस्टेबल होता.
"बाहर जानेक और कोई रास्ता है क्या? मेरी मां बाहर खडी है"
त्याने माझ्याकडे बघितलं.
"कैसे ईन्सान हो तुम, बाहर छोडके आ गये"
"रस्ता आहे तर सांग ना" माझा आवाज चढला.
"नही, ये एकही रास्ता है"

मी कॉरीडॉरच्या टोकाशी आलो. एक माणूस भिंतीच्या आडोशाला उभा राहुन हळुच वाकुन बघत होता.
"क्या हुआ है??"
"दो लोग है, फायरींग कर रहेले है! भाग, वो फिरसे ईधर मुड गये"

आम्ही दोघेही मागे पळालो. मी पटकन एका पार्सल ऑफिसात घुसलो. आत स्टाफ कुणिच नव्हता. दोन-तीन प्रवासी होते, टेबलाखाली दडुन बसले होते. त्या स्थितीतही माझ्य मनात विचार आला की हे तकलादु दार मोडुन आत यायला कितीसा वेळ लागेल? दोन मिनिटे मी तिथेच थांबलो. बाहेर कानोसा घेतला. आवाज येत नव्हते. मोबाईल काढुन भावाला फोन लावला, रींग वाजुन गेली. त्याच्या बायकोच्या मोबाईलवर केला. तेच! ईतक्यात फोन वाजला. भावानेच केला होता.

"काय रे? पोचलात?"
"ईथे फायरींग झालय. शुभांगी आणि मनवा गाडीकडे आहेत आणी आई बाहेर आहे."
"एक मिनीट, हे बघ टीव्हीवर दाखवतायत काहीतरी गॅंगवॉर आहे म्हणुन. कुलाब्याला पण फायरींग झालं."
"मी आईला शोधुन तुला फोन करतो"

फोन कट करुन पुन्हा एकदा मी वेटींग हॉल कडे वळलो. हॉलकडे बघितलं मात्र ... माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. सगळीकडे मृतदेह पडले होते, रक्ताचा नुसता सडा पडला होता. मी एकटा तिथे उभा होतो. मी जोरात हाका मारल्या " आई, आई". त्या प्रचंड घुमटात आवाज घुमला. मी परत हाक दिली " अरुणा माईणकर" न जाणो तिने माझा आवाज ओळखला नाही तर म्हणुन. पण छे! ईतक्यात परत लांबुन गोळ्यांचे आवाज आले. आणि कसलाही विचार न करता मी स्वत:ला जमिनीवर झोकुन दिलं. सरपटत सरपटत मी बाहेरच्या दिशेने निघालो. एक प्रचंड शरीरयष्टीचा मुसलमान खाली पडला होता, त्याच्या पायाला गोळी लागली होती. पुढे आलो तर एका पुरुष मरुन पडला होता, त्याचा चक्क मेंदु कवटीच्या बाहेर आला होता. मी सरपटत दरवाजापाशी आलो. ईथुनच काही वेळापूर्वी मी आणि शुभांगी आत आलो होतो. तिथे एक पोलीस शिपाई जखमी होऊन पडला होता. मी उभा राहिलो. मागे बघितलं. बापरे!! कित्येक माणसं मरुन पडली होती. त्यात म्हातारे, तरुण, मुलं!!! पण त्याक्षणी मला काहिच जाणवत नव्हतं. मला फक्त आईला सुखरुप बघायचं होतं. मी बाहेर आलो.

सगळीकडे सन्नाटा पसरला होता. काही वेळापूर्वी गजबजलेलं स्टेशन अगदी शांत होतं. टॅक्सीस्टॅंड मधे एकही टॅक्सी नव्हती, एक लहान मुलाचा मृतदेह पडला होता. मी जिथे आईला उभं केलं होतं तिथे आलो. मला काय बघायला मिळणार या कुशंकेने धडधड वाढली होती. मी तिथे पोचलो आणि....

आईला जिथे सोडुन आलो होतो तिथे काचांचा खच पडला होता. वजन यंत्र, वेंडींग मशिन्स, तिकीट काउंटर्स फुटली होती. आईचा मात्र पत नव्हता. मी "आई, आई" अशा हाका मारल्या, तिकिट काउंटर मधे वाकुन पाहिलं. काही माणसं तिथे लपली होती. त्यांना मी विचारलं " ईधर कोई औरत छिपी है" त्यानी नकारार्थी मान हलवली. त्यांच्या डोळ्यात भिती स्पष्टपणे दिसत होती.

आई नाही हा माझ्यासाठी मोठा धक्का होता. मी वॆडाच झालो. परत ईकडे तिकडे बघत, हाका मारत मी हॉल मधे आलो. फोन वाजला. अनोळखी नंबर होता.
"हॅलो"
"ईथे बोला" एका पुरुषाचा आवाज.
"आई मिळाल्या?" शुभांगी होती.
"नाही. जिथे उभं केलं होतं तिथे नाहिये"
"तुम्ही ईथे या, आम्ही पण येतो"
"तु गाडीतच रहा. आत बसुन रहा, खाली उतरु नकोस. आई भेटली की मी येतोच"
"मला या मोबाईलवर फोन करा"
"ठीक आहे"

परत फोन वाजला. भावाचा फोन. त्याला मी सगळं सांगितलं. तोवर "लिओपोल्ड" ची खबर त्याने बघितली होती. "मी येउ का?" त्याने विचारलं "नको, मधे आणखी काही प्रॉब्लेम असेल तर अडकशील. मी तुला फोन करेन" आणि माझ्या लक्षात आलं की माझ्या फोनची बॅटरी पूर्णपणे चार्ज नाहिये. आणिबाणीच्या परिस्थितीमधे मला फोनची गरज लागेलच.

मी परत हॉलमधे आलो. तोपर्यंत स्ट्रेचर आली होती. परत फोन वाजला. योगीचा फोन. मी त्याला थोडक्यात कल्पना दिली आणि फोन कट केला. एक-दोघा जखमींना मी स्ट्रेचर वर चढवायला मदत केली. फार भयाण दृश्य होतं. माझी नजर मात्र आईला , तिच्या बॅगला शोधत होती.
पण कुठेच काही दिसत नव्हतं. ईतक्यात एक पोलिसशिपाई आणि ईन्स्पेक्टर बंदुक आणी रिवॉल्व्हर घेऊन आले आणि सेंट्रलच्या गाड्या सुटतात तिथे आडोसा घेत घेत पुढे गेले.
"अरे देखो देखो, ईधर बम पडा है"
मी बघितलं तर एक न फुटलेला बॉंब पडला होता. मी परत बाहेर आलो. समोरच रेल्वेचीच एक ईमारत होती. तिथे पोचलो. काही डॉक्टर तिथे होते अणि जखमींवर उपचार करत होते. मी तिथे जाऊन पाहिलं. आई नव्हती. एक रेल्वे पोलीस आला. त्याला विचारलं " यहा कोई औरत आई है छिपने"? त्याने दोन-तीन बंद खोल्यावर थाप मारली. आतुन भेदरलेले चहेरे डोकावले.
"बाहरका कोई छिपा है क्या?"
"नही"

आता मात्र मी प्रचंड निराश झालो. परत भावाचा फोन आला. मी त्याला सगळं सांगितलं आणि म्हणालो की माझ्या मोबाईलची बॅटरी डाउन आहे. मी त्याला एसेमेस करुन काय ते कळवेन.
ईतक्यात परत फोन वाजला. शुभांगीने ज्या मोबाईलवरुन केला होता तोच नंबर.

"मी दादरला उतरते आणि बेबीमावशीकडे जाते. हेगडेकाकांना कळवते, मग ते न्यायला येतील मला."
बेबीमावशी म्हणजे शुभांगीच्या काकीची बहिण. दादरला सेनाभवनाजवळ राहतात.
"चालेल, मला कळव मात्र. मनवा काय कततेय?"
"शेजारच्या लहान मुलीबरोबर खेळतेय"
"बरं"

मी तिथुन परत सि.एस.टी. च्या प्रवेशद्वारा कडे निघालो. कुठुन आईला तिथे उभं केलं असं वाटत होतं. ईतक्यात डोक्यात एक विचार आला.
’आई नाहिये, पण तिच्या बॅगापण नाहियेत. आणि जिथे उभी होती तिथे काही अघटीत घडल्याच्या खुणा पण दिसत नाहियेत. म्हणजे आई कुठेतरी असेल’. आता मला थोडा हुरुप आला आणि मी दोन पावले पुढे गेलो तोच ....

"हात उपर, हात उपर. हलु नकोस. कोण आहेस तू?"

सि. एस. टी. च्या प्रवेशद्वारामधुन ७-८ पोलीस आत आले होते आणि त्यांनी माझ्यावर बंदुका रोखल्या होत्या. बरोबरच होतं. त्या कंपाउंडमधे मीच एकटा असा बाहेर फिरत होतो.
" आईला शोधतोय, आईला शोधतोय" मी जोरात ओरडुन सांगितलं.
"पळ, बाहेर पड चल" त्यांनी हुकुम दिला.
मी पटापट चालत त्यांच्याच मागे गेलो. सगळेजण सि.एस.टी. च्या तिकिट काउंटर कडे गेले. तिथे तर काचांचा प्रचंड खच पडला होता. पोलिसांच्या बोलण्यावरुन कळलं की दोनजण आहेत आणि तोंडावर मास्क वगैरे लावुन ते आले होते. पोलीस आपापसात बोलताहेत तोवर बाहेरुन पुन्हा गोळिबाराचे आवाज ऐकु आले. सगळे पोलीस आत पळाले. दोन हवालदार बाजुला असलेल्या व्हॅन मधे बसले आणि व्हॅन सुरु केली. मी व्हॅनच्या मागुन धावलो आणि आत उडी मारली. व्हॅन सुसाट स्टेशनच्या बाहेर आली. सि.एस.टी. च्या समोरच डि.सि.पी - झोन १ चं ऑफिस आहे. तिथे व्हॅन थांबली आणि मी उतरलो. बघ्यांची अफाट गर्दी झाली होती. एक उसवाला उसाची मोळी टाकुन पळाला असावा. बरेच पोलीस उसाची कांडकी हातात घेऊन "सज्ज" होते. त्याही स्थितीत मला गंमत वाटली. कुठे त्या बंदुका आणि कुठे हे उसाची कांडकी फिरवणारे पोलीस!

परत फोन वाजला. शुभांगीच्या भावाचा - देवदत्तचा फोन.
"काय झालं? तुम्ही कुठे आहात?
मी त्याला सगळी कथा ऐकवली, शुभांगी आणि मनवा गाडीत आहेत, गाडी सुटली तर दादरला उतरतील हेही सांगितलं. हेगडेकाकांना कळवा हे देखिल सांगितलं.

फोन वाजला. ईंद्राचा होता, त्याने काही लागलं तर कळव सांगितलं. आता मात्र बॅटरी संपण्याच्या दिशेने कूच करत होती. परत वाजलेला फोन मी कट केला. शुभांगीच्या आतेभावाने केला होता. मी त्याला एसेमेस केला की देवदत्तला फोन कर.

आजुबाजुला प्रचंड संख्येने पोलीस होते. आजुबाजुला राहणारी बरीच बघे मंडळी खाली उतरली होती. सि.एस.टी.च्या प्रवेशद्वारामधुन आत जायला मज्जाव होता. मी स्वत:कडे पाहिलं. जमिनीवर सरपटत आल्यामुळे कपडे, हात संपूर्ण काळे झाले होते. घशाला कोरड पडली होती. पण आई कुठे असेल आणि गाडीत शुभांगी-मनवा कशा असतील या शंकेने मी प्रचंड व्याकुळ झालो होतो. गाडीचं तिकीट माझ्याकडे होतं. शुभांगीकडे पर्स पण नव्हती. परत फोन वाजला. सुलुचा- माझ्या मेव्हणीचा होता. मी कट केला. तिने परत केला. मी पुन्हा कट केला. मला काही दुखापत झाली असावी किंवा मी परत कुठे अडकलो असेन अशा शंकेने तिने एसेमेस पाठवला "तुम्ही फोन का नाही घेत आहात?" मी तिला बॅटरीची समस्या असल्याचे उत्तर पाठवले. जरा मागे आलो. तिथे एक लॉजिंग होतं. मी तिथल्या पायरीवर बसलो. मालकाकडॆ पाणी मागितलं. त्याने मला कुठुन आला विचारलं. मी सगळी हकीकत सांगितली. त्याच्या चेहर्‍यावर माझ्याबद्दल करुणा दाटुन आली. त्याने माझ्या खांद्यावर थोपटलं. ईतक्यात एसेमेस आला. देवदत्तने पाठवला होता " आई सापडली".
मी लागलीच त्याला फोन केला.
"कुठे आहे आई?" मी अधिर्‍या स्वरात विचारलं.
"शुभांगीच्या मोबाईलवर करा. सुलु बोलली त्यांच्याबरोबर."
मी लगेच कट करुन शुभांगीला फोन केला.
"आई तुझ्याबरोबर कशी आली?"
"आई? ईथे नाहिये"
"अरे मला आताच देवदत्तने सांगितलं. मी करतो त्याला.
मी परत देवदत्तला फोन केला.
"आई नाहिये शुभांगीजवळ. सुलु कशी बोलली? मी आताच शुभांगीला फोन केला होता"
"अहो शुभांगीच्या मोबाईलवर करा"
आणि माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. काय झालं हे माझ्या लक्षात आलं. घरुन निघतानाच शुभांगीचा मोबाईल आईच्या हॅंडबॅगमधे टाकला होता. ईतका वेळ शुभांगी दुसर्‍याच्या मोबाईल वरुनच फोन करत होती. पण गडबडीत माझ्या हे लक्षातच आलं नव्हतं. मी भावाला फोन केला. त्याला आई सापडल्याचं सांगितलं. शुभांगी ज्या फोन वरुन फोन करत होती तो नंबर त्याला दिला. त्याला म्हटलं की माझी बॅटरी कुठल्याही क्षणी दगा देईल. तू या दोघींच्या संपर्कात रहा आणि मला एसेमेस करत रहा.

मला प्रचंड हायसं वाटलं. आम्ही सगळे सुखरुप होतो. आता प्रश्न होता तो पुन्हा सगळे एकत्र येण्याचा. पोलिसांकडे गेलो, त्यांना म्हटलं की मला आत जाऊद्या, बायको आणि लहान मुलगी गाडीत आहेत. पण त्यांनी नकार दिला. साहजिकच होतं. आत सगळीकडे झडतीसत्र चालु होतं. आजुबाजुचे रहिवासी मदत करायला सि.एस.टी. मधे गेले होते. तिथली बरीचशी दुकानं उघडुन बिस्कीटं, दूध वगैरे घेऊन बरेचसे स्वयंसेवक निघाले होते. ऍंब्युलन्स धावत होत्या. मधेच काही वरीष्ठ अधिकारी तिथे आले. त्यांनी उभ्या उभ्या आढावा घेतला. ते गेल्यावर पोलीस पांगले. प्रत्येक जण मोबाईलवर आपल्या आपल्या घरी, मित्रांना खबर करत होता.

भावाचा परत एसेमेस आला. आई एका दुकानात असल्यांचं आणि ती अगदी सुखरुप असल्याचं त्याने कळवलं होतं. शुभांगीची गाडी अजुन सुटली नव्हती. पण ती दादरलाही उतरणार नव्हती. गाडी सुटलीच तर रत्नागिरीलाच पोचायच असं ठरलं होतं. तिकीट नसल्याची समस्या होती खरी, पण टीसी नक्कीच ऐकला असता. आई नक्की कुठे आहे हे मी भावाला विचारलं. कळवतो असं त्याने सांगितलं.

वातावरणात प्रचंड तणाव होता. चॅनल्स च्या ओबी व्हॅन्स धावत होत्या. काही पत्रकार आतून आलेल्या एका माणसाचे "चावे" (बाईट्स) घेत होते. ईतक्यात भावाचा एसेमेस आला. त्याने ’आई जिपिओ च्या जवळच्या दुकानात आहे’ असं त्यात म्हटलं होतं. मी पोलीस डॉग घेऊन उभा असलेल्या एका पोलीसाकडे गेलो. "जिपिओ कुठे" असं विचारलं. "कशाला?" या अपेक्षित प्रश्नावर मी त्याला सगळं सांगितलं.
"जिपिओ मधे मिलिटरी थांबवलीये. तो सगळा एरीया कॉर्डन ऑफ केलाय. आई सुखरुप आहे ना? गाडीतली मंडळी पण सुखरुप आहेत ना? मग आता काही करु नका. आहात तिथे ठीक आहात. कारण अजुन आम्हालापण माहित नाहिये की काय काय होतयं. ताजवर पण हल्ल्ला झालायं." मी सुन्न झालो.

परत त्या मगाच्याच लॉजिंगजवळ आलो. मालकाने विचारलं " मिले क्या? ". मी त्याला हो म्हटलं. ईतक्यात पोलिसांनी सगळ्यांना पांगवायला सुरुवात केली. अतिरेकी एक क्वालीस घेऊन फरार झालेत अशी खबर आली होती. पटापट सगळे पांगले. मालकाने मला आत बोलावलं. मी जाऊन बसलो आणि मोठ्ठा बीप देऊन मोबाईलने राम म्हटला.
"आपके पास चार्जर होगा क्या? छोटा पिनवाला? मेरा बॅटरी खतम हुआ"
त्याने ३-४ चार्जर काढले. पण सगळे मोठ्या पिनचे होते. त्याने एका नोकराला बोलावलं आणि "नीचे जाके छोटा पिनवाला चार्जर ढुंढके ला" म्हणुन सांगितलं.

समोर टीव्ही चालु होता. त्यात ताज-ट्रायडंट वरील हल्ला, टॅक्सीत झालेला बॉंबस्फोट ई. बातम्या येत होत्या. हा हल्ला किती मोठ्या प्रमाणावर आहे याची हळुहळु कल्पना येऊ लागली होती. ईतक्यात "ब्रेकींग न्यूज" झळकली. "करकरे शहीद" लागोपाठ पुन्हा बातम्या आल्या. "साळसकर, कामटे शहीद" बापरे!! मुंबई पोलीसांचे तीन खंदे वीर हल्ल्यात मरण पावले होते. साळसकर आमच्याच भागात राहत असल्याने नियमित दिसत.

ईतक्यात नोकर चार्जर घेऊन आला. मी मोबाईल चार्जिंगला लावला आणी सुरु केला. पहिलाच एसेमेस शुभांगीने केला होता. "गाडी सुटली. आम्ही ठीक आहोत. तुम्ही काळजी घ्या".
भावाचा पण एसेमेस आला. त्यानेही तीच बातमी दिली होती.आणि त्यात आई असलेल्या दुकानाचा व्यवस्थित पत्ता दिला होता. मोबाईल आता थोडाफार चार्ज झाला होता. पहाटेचे तीन वाजले होते.
मालकाच्या भावाला मी विचारलं "यह ब्लॅकीज हाऊस कहां है? मेरी मां वहीं हैं!"
"ये क्या सामने"
मी बरोबर त्याच ईमारतीच्या मागच्या बाजुस होतो. म्हणजे पाच तास मी आईपासून काही अंतरावरच होतो.
मी त्या ईमारतीत गेलो.
"ये दुकान कहा है? मेरी मां है वहां"
"अकेली है ना? थोडी उम्रवाली?"
"हां, यही है क्या?"
"ये देखो सोयी है"
एका बाईला त्याने उठवलं. काळोखात मला आधी काही दिसलं नव्हतं. पण ती भलतीच बाई निघाली.
"यहा आओ, यहा भी कुछ औरते सोयी है"
एका बॅगांच्या दुकानात काही बायका झोपल्या होत्या. पण त्यात आई नव्हती. मी बाहेर आलो. ईतक्यात दोन तरुण आले.
"आपकी मां है क्या? दो बॅग है उनके पास?"
"बिल्कुल"
त्यांनी एका बंद दुकानावर थाप मारली. एका बाईने दार उघडलं.
"मेरी मां है अंदर?"
"तुम्ही अजय का?"
"मी त्याचा भाऊ"
तिने मला आत बोलावलं. आई झोपली होती.
"मावशी उठा, तुमचा मुलगा आलाय"
आई पटकन जागी झाली. मला एकदम गहिवरुन आलं. मनात नको त्या शंकानी घर केलं होतं, पण आईला मी सुखरुप बघत होतो.
"तू झोप थोडावेळ, आपण नंतर निघुया."
"मनवा आणि शुभांगी"
"त्यांची गाडी सुटली. रत्नागिरीला उतरतील त्या"
मी बाहेर आलो. बरीच मंडळी वर्तमानपत्रं, पुठ्ठे टाकुन झोपली होती. मी पण त्यातच पाठ टेकली. पण झोप येईना. उठुन बसलो. माझा अवतार बघुन एक-दोघे जवळ आले.
"आप अंदर थे क्या"
परत सगळी कथा त्यांना ऐकवली. ते सिएसटीच्या बाहेर बसणारे फेरीवाले होते.
"सब माल उधर पडा है खुल्लेमे. ईसलिये बैठे है. अभी कलसे हमको सतायेंगे पोलीस वाले."
"वो शिंदे भी मारा गया. अच्छा आदमी था"
"आपका नसीब अच्छा है, आप सब बच गये"

पहाटेचे चार वाजले. सकाळच्या गाडीने जाणारे प्रवासी हळु हळू येऊ लागले होते. रात्री एव्हढा प्रकार होऊनही माणसं घराबाहेर पडली होती.
"मुंबई स्पिरीट" माझ्या मनात आलं.

आता वेळ घालवण्यापेक्षा घरीच जावं असा विचार करुन मी आईला जाऊन उठवलं. त्या बाईनी आईच्या पिशव्या आणुन दिल्या. आता आईचा बांध फुटला.
"यांनी मला खुप मदत केली. मला ईथे ठेवुन घेतलं" असं म्हणुन आईने त्या बाईना मिठी मारली. माझेही डोळे पाणावले.
त्या बाईंचा निरोप घेऊन आम्ही टॅक्सीने निघालो.
मुंबई शहर झोपलं होतं. वाटेत काही ठिकाणी पोलीस गाड्या उभ्या होत्या. पण एकाही ठिकाणी आम्हाला अडवण्यात आलं नाही. मला आश्चर्य वाटलं. पुरते आठ तास नव्हते झाले तरी असं कसं?
साडेचारच्या सुमारास घरी आलो. भावाला फोन केला, देवदत्तला एसेमेस केला. दोघेही जागे होते.
पंधरा मिनिटांत भाऊ आणि त्याची बायको घरी आले. तिने चहा केला. चहा घेता घेता आईची हकीकत कळली.
************************************************
आई उभी होती, त्याच्या मागेच तिकीट काउंटर होतं. आई ईथे तिथे बघत असताना, तिच्या भाषेत सांगायचं झालं तर "पत्र्यावर काठ्या मारल्यावर होतात तसे आवाज" ऐकु आले आणि माणसं पळायला लागली. आईला क्षणभर काहीच कळलं नाही. ईतक्यात एक पोलीस ओरडला "मावशी, पळा, फायरींग होतयं"
"कुठुन अंगात ताकद आली माहित नाही, पण दोन्ही बॅगा मी उचलुन मी पळाले. बॅगांमुळे नीट पळता येत नव्हतं, तरी मी जीव खावुन पळाले.एका माणसाने आपल्या मुलाला माझ्या बॅगा घ्यायला सांगितल्या. मग आम्ही सगळे बाहेर आलो".

बाहेर पडलेले सगळे समोरच्या ईमारतीत शिरले. तिथे ’बॅंक ऑफ महाराष्ट्र’ ची शाखा होती. एवढी माणसं येताना पाहुन तिथली वॉचमन धावत आले आणि यांना आत शिरण्यापासुन रोखु लागले. मग पोलिसांनीच मध्यस्थी केली. ज्या बाईंनी आईला आसरा दिला त्या सौ. वाघ त्या दुकानात काम करतात. दुकान बंद करुन त्या घरी निघाल्या होत्या, पण फायरींग झाल्याचं कळल आणि त्या बसस्टॉप वरुन परत आल्या. आई एकटीच बघुन त्यांनी आईला आपल्यासोबत ठेवुन घेतलं.

त्या दुकानाच्या पायर्‍यांवर बसली असताना आईच्या बॅगेत असलेला मोबाईल वाजला. आईला प्रथम काहीच कळलं नाही. परत जेव्हा वाजला तेव्हा एका माणसाने आईला तसं सांगितलं. त्यानेच मोबाईल रिसिव्ह केला आणि आई सुलुशी बोलली आणि मी तिला शोधु शकलो.

माझी आई गावात सातवी शिकलेली. ४० वर्षं मुंबईत राहिली खरी पण एकटं फिरण्याचा प्रसंग तिच्यावर कधीच आला नाही. गोरेगावच्या बाजारात जाऊन येणं ईतकच तिला माहित. त्यामुळे त्या प्रसंगाला तिने खरच धीराने तोंड दिलं. तिच्याकडे असलेल्या एका बॅगमधे या दोघींचे दागिने होते. एका माणसाने तिला विचारलं की "आपके थैलीमें कुछ जोखम तो नही?" त्यावर तिने "आम्ही गावच्या जत्रेसाठी जातो आहोत, पिशवीत नातीचे कपडे आहेत"असं सांगितलं.

भाउ घरी गेल्यावर आम्ही झोपायचा प्रयत्न केला पण रात्रीचा प्रसंग वारंवार डोळ्यासमोर येत होता. शुभांगी आणि मनवाचा विचार पण मनात येत होता. शेवटी मी टिव्ही लावुन बसलो. ताज-ट्रायडंट-सिएसटी - सगळीकडच्या घटना दाखवत होते.

आठ वाजता मी शुभांगीला फोन केला. तिला भेटलेलं कुटंब तिच्या ओळखिचचं निघालं. म्हणजे शुभांगीने जेव्हा हेगडेकाकांना फोन केला, तेव्हा त्या गृहस्थाने - श्री. वागळेंनी तिला "हे हेगडे म्हणजे अमुक का, अमुक ठिकाणी राहतात का" वगैरे विचारलं. वागळे हे हेगडेंचे भाचेच निघाले. त्यांनी बरीच मदत झाली. त्यांच्या फोनची बॅटरी डाउन होईल ईतके फोन शुभांगीने केले. सकाळी त्यांनी ब्रेकफास्ट मागवला. ईतकचं नाही तर रत्नागिरीला उतरताना "कदाचित तुझा भाऊ यायला उशीर झाला तर असुंदे" म्हणुन काही पैसे पण दिले.

त्या रात्री मी आणि आई खाजगी बसने रत्नागिरीला गेलो. साखरपुडा, लग्न अगदी मस्त पार पडलं. लग्नात सगळ्यांच्या नजरेचा केंद्रबिंदु होती ती आई. सगळी कथा परत परत सगळे ऐकत होते.

३१ तारखेला आम्ही परत आलो. रुटिन आयुष्य पुन्हा सुरु झालं.

त्या रात्रीचा मी विचार करतो तेव्हा काही शक्यता माझ्या लक्षात येतात -
१. आमची टॅक्सी उशीरा पोचली असती तर आम्ही उतरता - उतरता कदाचित फायरींग मधे सापडले असतो.
२. मी आणि शुभांगी-मनवा किंवा मी एकटा किंवा मी आणि आई वेटींग हॉल ओलांडुन जात असताना फायरींग मधे सापडलो असतो.
३. सर्वात थरकाप उडवणारी शक्यता म्हणजे मी आईला बाहेर उभं न करता वेटींग हॉलमधे बसवलं असतं तर!!

त्या रात्री माणुसकीला काळिमा फासणारे नराधम पाहिले तसेच आम्हाला मदत करणारी "माणसं"ही भेटली. माझ्याबाबत बोलायचं तर "देवमाणूस" या संज्ञेवरचा माझा विश्वास अजुन दृढ झाला.

गुलमोहर: 

बाप रे.. भयानक आहे हे सगळं...
तुमच्या आईच्या धीरचं खुप विशेष वाटतय...

बाप रे! सत्य हे कल्पनेपेक्षा अतर्क्य असतं याची प्रचिती आली म्हणायची तुला.
लिहीलंयस पण छान. त्यावेळच्या घटनांचा वेग, तेंव्हा कथानायकाच्या मनावर असणारा ताण सगळं व्यवस्थित मांडलंयस. घटनेची कथा करणं अवघड असतं. तेही योग्य जमलंय.

........

भ्रमरा, सुन्नच झल्येय हे सगळ वाचुन Sad
तुम्हा सर्वांच्या हिम्मतीला आणि प्रसंगावधानाला खरच दाद.
देव तारी त्याला कोण मारी हे अगदी पटले.
जगात देवमाणस आहेत आणि माणुसकी अजुन जिवंत आहे हे अश्या प्रसंगातुन जाणवुन येत.

अतिरेकी हल्ले काय किंवा तो जुलै मधला क्लाऊड बर्स्ट आणि आलेला महापुर... यातुन अश्या देवमाणसांमुळेच अनेकांचे जीव वाचले असतिल.

इथे परदेशात आम्ही बीबीसी वर हे थरार नाट्य बघत होतो. ऑफिसात सुद्धा कामात मन लागत नव्हत. मुंबईत रहाणार्‍या सगळ्या नातेवाईकांना आणि मित्र मंडळींना फोन करुन ते सुखरुप असल्याची खात्री करुन घेतली. आम्हाला इथे सकाळच्या बातम्यात हाल्ले झल्याचे कळले तेव्हा देशात रात्रीचे २ वाजले असतिल. अश्यावेळेस कुणाला फोन देखिल करता येइना. शेवटी माहेरी आणि सासरी सकाळी ६ वाजता फोन केलाच आणि विचारले की सगळे ठीक आहे ना तर त्याना असे काही झालय याची कल्पनाच नव्हती. रात्री कोणी टीव्ही लावलाच नव्ह्ता.. आमच्याकडुन बातमी कळल्यावर ते पण सुन्नच झाले Sad

नंतर कळले की नवर्‍याचा आतेभाऊ ताज मधे ड्युटीवर होता.. आणि तिथे अडकला होता. नशिबाने वाचला कारण तो बेसमेंट मधे काहीतरी सामान आणायला गेला होता. सुखरुप घरी पोचला पण आठवडाभर कोणाशी बोलत नव्हता, खात पित नव्हता. नुसता बसुन रहायचा आणि रडायचा.. वयवर्षे फक्त २१.... आता त्याने ताज सोडले.. म्हणाला जिथे माझे मित्र मारले गेले मझा बॉस ठार झाला तिथे मी काम करण शक्यच नाही...
खुप भयंकर आहे हे सगळ.... अजुन अंगावर काटा येतो...
कधी संपणार हा नरसंहार ??????

काल वाचले, पण डोळ्यातल्या पाण्यानी आणि हेलावलेल्या मनाने काही लिहूच दिले नाही. अन काही लिहिल्याशिवाय जाववतही नव्हते... आज पुन्हा वाचले. पुन्हा त्याच वेदना ...तेच अश्रू... तुमचे, तुमच्या आईंचे, बायको, मुलगी आणि सगळ्यांच्या त्यावेळच्या अवस्थेशी आम्ही एकरूप झालो. पण खरच सांगते तुम्हा सर्वांइतके धाडस असेल असे वाटत नाही मला. आईंची तर कमाल वाटते मला, माझा मनापासून साष्टांग दंडवत त्यांना. अन तो पूर्ण प्रसंग ज्या ताकदीने निभावलात तुम्ही, हॅट्स ऑफ टू यू सर ! अन हे सगळे आमच्याशी शेअर करताना किती अवघड गेलं असेल तुम्हाला. पण खुप त्रास घेउन तुम्ही ते केलत, अन त्याच मुळे अशा घटना होऊच नयेत याची अगदी प्रखर जाणीव करून दिलीत तुम्ही आम्हा सर्वांना. अन हो आलीच तशी वेळ तर धैर्याने तोंड कसे द्यावे हे ही नकळ्त सांगीतलेत. मनापासून भावी जीवनाला शुभेच्छा !

Sad

भ्रमा. खरंच खूप सुन्न झाले. तुझ्या आईच्या प्रसंगावधानाचे कौतुक आहे!!

एका माय्बोलीकराने मला चक्क फोन करून "हे वाचलस का?" असं विचारलं होतं. म्हणून रत्नागिरीवरून आल्या आल्या पहाटेच वाचलं मी!!

सर्व हल्लाच इतका भीषण होता की असे काही होइल हे कुणाला वाटलंच नव्हतं. आणि मीडीया हा काय समाज घातक प्राणी आहे हे या हल्ल्यात समजून आलं होतं....

बापरे.......किती भयंकर रे....!! सुखरुप आहात....... खूप भाग्यवान आहात !!

बापरे..कित्ती भयंकर अनुभव!! डोळ्यांसमोर एक वर्ष पूर्वीचं दृष्य उभं राहिलं..टी व्ही वर पाहतानासुद्धा ,थरार उडाला होता.. डोक्याच्या शिरा ताणल्या गेल्यामुळे डोकं दुखू लागलं होतं,आणी तुम्ही तर हे सर्व स्वताहा प्रत्यक्ष अनुभवलंय.. कल्पना सुद्धा करवत नाहीये

बापरे !! Sad

प्रसंग विलक्षण, अतर्क्य.

मुम्बै स्पिरिट च उल्लेख आलाय. स्पिरिट बिरिट काही नाही. मुम्बई असहायता म्हण. असहयतेनेच लोक कोणत्याही प्रसंगी बाहेर पडतात. नाही तर उपाशी राहतील.

जीवघेण्या अनुभवातून वाचलात केवळ! रॉबिनहूड अगदी बरोबर बोलत आहेत. पोट हातावर असलेल्या माणसांना पर्यायच नसतो म्हणून बाहेर पडली ती. आमच्यासारखी उच्चभ्रू घरातून टिव्ही पहात होती फक्त. माझ्या घरातून एअरपोर्टजवळ झालेल्या टॅक्सीतल्या बॉम्बस्फोटाचा नुसता आवाज ऐकू आला होता तरी त्यामुळे पुढचे कित्येक दिवस थरकाप होत होता जीवाचा. कसलं स्पिरिट? आणि काही जण मुद्दाम बाहेर पडली होती ती बघुयात तरी टेररिझम असतो तरी काय या विचित्र कुतुहलातून. नरिमन हाऊस किंवा ओबेरॉय, ताज जवळचे ते शेकडो बघे जे कमांडोंच्या कार्यातही अडथळा बनत होते ते असंच विकृत स्पिरिट प्यायलेले.

अनुभव लिहिलाय सुद्धा वाचणार्‍याला पूर्ण गुंतवून टाकेल अशा पद्धतीने. त्याबद्दल आणि या जीवघेण्या प्रसंगातून निभावल्याबद्दल अभिनंदन!

Sad कल्पनाही करवत नाही. असा प्रसंग वैर्‍यावरही येऊ नये! Sad
आणि "स्पिरिट"बद्दल रॉबिन व शर्मिला फडके यांच्याशी सहमत!

Sad तस्साच्या तस्सा उभा केलास प्रसंग. थरारक. अन कल्पनेपलीकडे, हे खरं.

२६/११ ला मीही मुंबईत होतो. आईला सोडायला एअरपोर्टवर. पुर्ण ट्रॅफिकजॅममध्ये अडकलो होतो. जीव मुठीत धरून गाडीत बसून रेडिओवरच्या बातम्या ऐकत होतो. त्यावेळची अवस्था बघता, कुठल्याही क्षणी आपल्याच गाडीशेजारी / खाली कसकस्ले आवाज येतात की काय, असे वाटत होते. जॅम झालेले अनेक चौक अन पोलिस तपासण्या ओलांडून वाशी पार केले तेव्हा सुसाट गाडी दामटली, कुठेच न थांबता.

अजूनही ती आठवण नको वाटते. Sad

खरेच थरारक अनुभव्...! काही प्रतिक्रिया द्यायला सुचतच नाही आहे...मन बधीर झाले वाचुन. पण खूप संयमित लिहिले आहे,आईबद्दलची काळजी,असहाय्यता शब्दाशब्दातुन जाणवत होती. या प्रसंगातुन गेल्यावरही माणुसकीवरचा विश्वास वाढला हे वाचुन तर तुम्हाला लाख लाख सलाम !
निरपराध लोकांना मारणार्‍या त्या नराधमांना कठोर शिक्षा लवकरात लवकर व्हावी हीच इच्छा!

बापरे! नुसतं वाचूनच अंगावर काटा आला. तुमच्या त्या वेळच्या मनस्थितीची कल्पना करणेही अशक्य

भ्रमर,

गेले ४-५ दिवस रोज हा अनुभव वाचत होते... पण धडपणे प्रतिक्रिया लिहिताच आलि नव्हती...
दरवेळेस आठवणीनी डोळयासमोर फेर धरला.. आणि प्रतिक्रिया द्यायचे राहुन गेले..
या आणि या आधी झालेला ७/११ चा प्रसन्ग एक पत्रकार म्हणून मी जवळून बघितला..
अनेकांच्या कहाण्या पहिल्या, एकल्या आणि अनुभवल्याहि... माझ्या दुर्देवाने, त्यात तुमच्यासारख्या नशिबवान कहाण्या थोड्याच...
काही ठिकणी मीडियाने केलेला अतिरेक पाहून पहिल्यादांच पत्रकार असल्याची लाज सुद्धा वाटली..
नशिबानी हे दोन्ही खटल्यांच्या वेळी कोर्टात हजार राहण्याची संधीही मला मिळते आहे..
२६/११ चा खटलाही ७/११ च्या मार्गाने जाउ नये एवढीच इच्छा...

भ्रमरा, हे वाचूनही प्रतिक्रिया द्यायला इथे येत नव्हते. कारण या सगळ्याबद्दल आणि हे घडू देणार्‍यांबद्दल इतकी चीड आहे ना मनात! २६/११ च्या या प्रसंगात एका खेड्यातल्या बाईची दोन्ही लहान मुलं, एक मुलगा आणि एक मुलगी मारली गेली. साधारण १० व ८ अशा वयाची. बिचार्‍या खेड्यात राहणार्‍या या बाईने, आपली मुलं मुंबईला भावाकडे शिकायला पाठवली होती कारण तिच्या खेड्यात शिक्षणाची चांगली सोय नव्हती. नुकतीच आईवडिलांकडे सुट्टी घालवून मामाबरोबर ही मुलं मुंबईला परत आली होती आणि गाडीतून उतरल्यावर थोड्याच वेळ्यात बंदुकीच्या गोळ्यांची शिकार झाली. त्या बाईचा आक्रोश बघवत नव्हता.

सगळ्या पहिले, म्हणजे ९२ चे स्फोट झाले तेव्हा माझा नवरा मुंबईत स्टॉक एक्स्चेंजजवळ काम करत होता. त्याने स्फोट झाल्यानंतर जमेल तशी लोकांना मदत केली आणि एका बाईला तिच्या डोक्यातून वाहणारं रक्त थांबवायला स्वत:जवळ असलेला टर्कीश नॅपकिन दिला होता. त्याने केलेलं लोकांच्या जखमांचं वर्णन ऐकवत नाही. ९२ नंतरही, आज २००८ साली पण हे घडतंच आहे. इतका मोठा कालावधी उपाययोजनांना आणि दोषी लोकांना शिक्षा करायला लागतो?

असो. तुम्ही आणि तुमचं कुटुंब सुखरुप आहात आणि या प्रसंगातून जाऊनही माणुसकीवरचा विश्वास उडू दिला नाहीत ही गोष्ट महत्वाची.

बाकी शर्मिला आणि रॉबीनशी सहमत. हे मुंबई स्पिरीट नाही, लाचारी आहे.

SALAAM !!!

भ्रमरा, सुन्न!! वाचताना रोखलेला श्वास, धडधड जात नाहीये अजून, तुम्ही तर प्रत्यक्ष अनुभवलंय...... बाप रे!

बाप रे भ्रमर, नुसतं वाचतानासुध्दा भीती वाटते इथे... तुम्ही तर प्रत्यक्ष अनुभव घेतलात.

Pages