जननायक प्रभू राम
शतकानुशतके रामकथा भारतीय समाजाला प्रेरणा देत आली आहे. विविध कालखंडात, वेगवेगळ्या प्रांतात राम कथेची विविध रूपे लोककलेतून, काव्यातून, नाटकातून, नृत्यातून, प्रकट केली गेली. महाराष्ट्रात गीत रामायणाच्या रूपाने राम कथा तेजाळली. मराठी भाषेला धन्यता लाभली असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. सन 2005 मधे गीत रामायणाला 50 वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने गीत रामायणाच्या अनेक आठवणींना उजाळा मिळाला.
हजारो वर्षांच्या कालप्रवाहात या कथेला अनेक रंगांचे वेष्टण लाभले. रामचंद्रांच्या, लोकोत्तर कार्याच्या प्रभावातून रामांचे प्रभू, भगवान, अलौकिक देवता म्हणून रूपांतर झाले. देवालयात त्यांची स्थापना होऊन विविध सण व धार्मिक कृत्ये निर्माण झाली. राम, सीता, लक्ष्मण व हनुमान यांच्या एकत्रित रूपात मूर्ती देवालयात सजल्या. राजाश्रयातून चित्रकला, स्थापत्य, मूर्तीकला, यांचा अनुपम विकास पावला व प्रचंड मंदिर संकुलांची स्थापना झाली. देव रूपात राम डाव्या हाताच्या खांद्याला धनुष्य व पाठीला मोजक्या काही बाणांचा भाता लटकवून व उजव्या हाताने भाविक भक्तांच्या मागण्यांना हवा तो आशीर्वाद देते झाले. ‘रामाने रावणास मारले‘ या मराठी भाषा व्याकरणातील भावे प्रयोगाच्या वाक्यात रामायणाची इति कर्तव्यता झाली असा आभास होऊ लागला.
संध्याकाळच्या परवचात पाठांतराचा मापदंड व संस्कृतोच्चार शुद्ध होण्याला मदत म्हणून रामरक्षा म्हणणे ब्राह्मण कुटुंबात अनिवार्य झाले. शिवाय रात्री-अपरात्री एकटे राहण्याची पाळी आली तर मनातल्यामनात किंवा भितीने अधिक गाळण उडाली तर मोठमोठ्यांने राम रक्षा म्हणून भीती घालवण्याला मानसिक आधार म्हणून ती उपयोगी पडू लागली. हनुमानाला शनिग्रहाचा वार आणि मंदिर वाटून मिळाले व तेलाचे सचैल स्नान घडू लागले. कीर्तनकारांनी रामनामाच्या जपाचे महत्व उपदेशल्याने जप माळ हातात घेऊन वृद्धांना विरंगुळा मिळाला. अंत-काळी ‘राम’ म्हणण्याने सर्व पापांचा नाश होणार व मोक्षपदाची प्राप्ती होणार असल्याने रामाला साकडे घालण्यात सार्थकता वाटू लागली.
रामांच्या चरित्राचे अवलोकन करता रामांनी कोणाही भक्ताला माझे फक्त नाम घे असे आश्वासन दिल्याचे संदर्भ सापडत नाहीत. रामांनी ज्ञान-कर्म-भक्ती मार्गाचे वर्णन करून गीता कथन केल्याचे वाचनात येत नाही. वनवासाच्या काळात सीतेच्या मनोरंजनार्थ पौराणिक कथा वा गुजगोष्टी करना राम दिसत नाहीत. बंधू लक्ष्मण व अन्य सहकार्यांबरोबर काही अध्यात्मिक चर्चा करून, त्यांच्या शंका-संशयांचे निराकरण केले असाही फारसा संदर्भ मिळत नाही. आसपासच्या राना- वनातील रयते मधील लोकांशी संपर्क करून रामानी त्यांना धार्मिक वा पौराणिक कथा कथन कसे आपलेसे केले असेल याचा ओहापोह मिळत नाही.
रामायण पूर्वकालीन राजकीय, सामाजिक, आर्थिक परिस्थिती काय होती? त्या वेळच्या समस्या काय असाव्यात? दुष्ट व्यक्ती, वन्य जनावरांपासून, निसर्ग निर्मित धरणीकंप, महापूर, अवर्षण सारख्या प्रकोपांना त्यावेळी लोकांनी कसे तोंड दिले असावे?
शेती, वस्त्र, निवारा व अन्य जीवनावश्यक सुविधांची निर्मिती करणार्या कलांचे रक्षण व शिक्षण देण्याची पद्धती कशी असावी़? राक्षस संस्कृतीचा प्रभाव काय होता? शस्त्र निर्मितीसाठी धातू खाणींचा शोध, युद्धकला व अन्य विद्याभ्यास, काव्य-शास्त्र-विनोद यांचा विकास कसा साधला गेला असावा? रामांच्या चरित्रामुळे त्यामधे काय व कसा परिणाम झाला? असे अनेक विचार सामान्य माणसाला पडतात. रामायणातील व्यक्तिरेखा मनात काय काय विचार करत असाव्यात ? याचे कुतुहल प्रत्येकाला असते. रामायणातील काही प्रसंगातून रामांच्या व्यक्तीरेखेचे दर्शन करण्यासाठी अनेकांना लेखनाची प्रेरणा मिळाली.
आरंभ - 2005 च्या हिंदी विभागातील उत्कृष्ठ लेखनाचा पुरस्कार सुप्रसिद्ध कादंबरीकार श्री.नरेन्द कोहली यांच्या नावाने दिला आहे. यांनी हिन्दी भाषेत ‘अभ्युदय’ नावाची रामकथा कादंबरी रूपात प्रस्तुत केली आहे. त्या रामकथेतील राम त्यांनी जननायक स्वरूपात दर्शवला आहे. जन-सामान्यांच्या व्यथा, समस्या, दुःखे यांच्याशी राम कसे समरस होतात, त्यांच्या जीवनाची इति कर्तव्यता लोककल्याणाशी कशी जुळली आहे. रामांनी राजप्रासाद सोडून खेड्यापाड्यातील, वने, जंगलातील लोकांना ज्यांचा त्या काळातील सुधारलेल्या जगाशी संपर्क नव्हता अशा जाती-जमातींना आपलेसे करून घेतले. त्यांच्या प्रभावी नेतृत्वाला प्रखर पराक्रमाची धार होती. अगतिक गांजलेली सामान्य जनता व स्वतःमधे मशगूल, ऐशारामी राजसत्तेमुळे त्यावेळच्या शस्त्रसंपन्न व आधुनिक पण निर्दयी राक्षस संस्कृतीला टक्कर देण्याची हिम्मत खंडप्राय देशात राहिली नव्हती. रामांसारखा लोकोत्तर नेता जनतेच्या मानसिकतेची रग जाणणारा व त्यांच्या सुख-दुःखांच्या जगात उतरून त्यावर यशस्वी मात कशी करायची याचा आदर्श घालून देणारा, चारित्र्य संपन्न राज्यकर्ता म्हणून तळपून दिसतो. ही त्या काळाची गरज होती. रावण वध हा फक्त स्वतःची पत्नी हरण केली गेली म्हणून तिला परत मिऴवण्यासाठीचा बदला किंवा सूड असा रामांच्या वैयक्तिक समस्येशी जोडलेला नसून त्यावेळच्या राजकारणाचा एक भाग म्हणून वापरला गेलेला डावपेच होता. सीता पळवली जावी असे ठरवले नसताना अचानक आलेल्या संकटाचा संधी म्हणून कसा वापर केला गेला. रामांनी मिळवलेली व नवीन बनवलेली शस्त्रे यामधून मरगळलेल्या व पराजित मनोवृत्तीच्या तरुणाईला शस्त्र विद्येचे तंत्र-मंत्र देऊन आपल्या समाजाचे रक्षण करण्याचा आत्मविश्वास जागृत केला. पुढे युद्धात उभे राहिल्यामुऴे वानर आणि अन्य अनेक जंगली व मागासलेल्या जाती जमातींमधील जनतेला अन्यायाविरुद्धच्या लढाईला सज्ज केले. प्रगत व प्रचंड संहारक शक्ती असलेल्या बलाढ्य सेनेचा यशस्वी मुकबला करून युद्धात विजय मिळवला.
श्री. नरेंद्र कोहलींच्या लेखनाचे महत्वाचे वैशिष्ठ्य असे आहे की संभाषणाच्या आधी घडणार्या मनोव्यापारातून व्यक्तिरेखांचा गाभा कसा असावा याचे त्यांनी केलेले वर्णन. त्यांच्या लेखनातून राम कथेतील रामांची व्यक्तीरेखा तळा-गाळातील लोकांच्या जननायकाची कशी आहे याची कल्पना येते. उत्सुक वाचकांनी ती कादंबरी व त्यांचे अन्य साहित्य जरूर वाचावे.
संकलन - विंग कमांडर (निवृत्त) शशिकांत ओक,
डॉ. नरेंद्र कोहलींचा अल्प परिचय
दि. 6 जानेवारी 1940 रोजी सध्याच्या पाकिस्तानातील क्रिकेटच्या बॅट्ससाठी प्रसिद्ध सियालकोट शहरात त्यांचा जन्म झाला. विभाजनानंतर वडील - परमानंद व आई - विद्यावती यांच्या समावेत त्यांचे बालपण व शिक्षण जबलपूरला झाले. पत्नी डॉ. मधुरिमा, मुलगे - कार्तिकेय व त्याची पत्नी डॉ. वंदना, व अमेरिकेत राहणारा अगस्त्य असा त्यांचा परिवार आहे, त्यांनी 1970 साली दिल्लीच्या रामजस कॉलेजामधून हिंदी साहित्यामधे पीएच डी मिळवली. लघुकथा, नाटके, विनोदी व सामाजिक गंभीर विषयावर त्यांनी विपुल साहित्य निर्माण केले आहे. या शिवाय चरित्रात्मक कादंबर्यांचे लेखन हे त्यांच्या साहित्याचे महत्वाचे वैशिष्ठ्य आहे.
रामायणावर आधारित ’अभ्युदय’ मधील श्रीराम लोकनायकाच्या रुपातून त्यांनी सादर केला. ’अभियान’ कादंबरीमधे श्रीकृष्ण व सुदामा यांच्या मित्रप्रेमाच्या कथानकावरील पार्श्वभूमीवर त्या काळातील राजकीय व सामाजिक समस्यांची उकल त्यांनी केली आहे. महाभारतावर आधारित यांच्या ’महासमर’ कादंबरीत महाकवी व्यासांनी रेखाटलेल्या प्रसंगातून सादर केलेल्या व्यक्तिरेखांचा व सध्याच्या परिस्थितील मानवी समस्या यांचा समन्वय कोहलींच्या आत्म प्रेरणेमधील लिखाणातून घडतो. महाभारताचा कणा गीता उपदेश आहे. कर्म मार्गाचा अवलंब करून मन, बुद्धी आणि मानवी संवेदना यांच्या मिश्रणातून तर्कनिष्ठ गीतोपदेश त्यांनी अद्वितीयपणे रंगवून नवा प्रकाश टाकला आहे. प्रकांड पांडित्य व प्रखर प्रतिभेचे दर्शन घडवणार्या आठ खंडातून त्यांच्या लेखनाचा उरक व प्रचंड आवाका कळून येतो.
डॉ. नरेंद्र कोहलींना विवेकानंद हे सामाजिक, राजकीय, धार्मिक व अध्यात्मिक बंधनातून भारतीयांना मुक्त करणारे महापुरूष वाटतात. ’तोडो कारा तोडो’ या कादंबरीतील विवेकानंदांचे प्रखर व्यक्तिमत्व हे त्यांना अपेक्षित भारतीयतेच्या स्वरूपाचे सत्यदर्शन घडवणारे आहे. त्यांच्या लिखाणामुळे हिंदी साहित्य जगताला सामाजिक जाणिवांचे अनेक धक्के बसले तर नवल नाही.
डॉ. नरेंद्र कोहलींची निवडक ग्रंथ संपदा
1) अभ्युदय - कादंबरी (पाने - 1292 - दोन खंड - किंमत - रु. 400)
2) महासमर - कादंबरी (पाने - 4150 - आठ खंड - किंमत - रु. 2100)
3) अभियान - कादंबरी (पाने - 232 - एक खंड - किंमत - रु. 5)
4) तोडो कारा तोडो - कादंबरी (पाने - 1716 - चार खंड - किंमत - रु. 600)
डॉ. नरेंद्र कोहलींचा पत्ता -
वैशाली, 175, प्रीतम पुरा , नई दिल्ली. 110088.