तू येशील तेव्हा...

Submitted by पॅडी on 23 April, 2024 - 01:10

तू येशील तेव्हा
काजळी धरलेल्या
मिणमिणत्या नंदादीपाची
पिवळसर ज्योत
भडकेल क्षणभर
विझेल अकस्मात
अन्
जळक्या वातीचा उग्र दर्प
भरून राहील चराचरात...

कोपरे धरून असलेले
सुजलेले डोळे
पेंगणारे चेहरे, सोडतील
सुटकेचा दीर्घ नि:श्वास
लगेचच चालवू लागतील
पुढच्या ‘ क्रिया - कर्माचे ’
व्यावहारिक व्याकरण...

कुणी हलकेच पिळेल
सलाईनच्या तोटीचा कान
बाजूला सारतील वाटी-चमचा
आठवणीने जपून ठेवतील
सीलबंद टॅबलेट स्ट्रीप्स
औषधांच्या बाटल्या
प्रीमिअर पुल-अप पँट्स
एक्स्ट्रा लार्ज डायपर्स
मेडिकल स्टोअर्सच्या बिलांसहित

... वाढत जाईल माशांचे घोंघावणे

यंत्रवत वारा घालणारा
एखाददूसरा गरजू पदर
थरथरेल क्षणभर
फोडेल टाहो
अन्
चार आसवं गाळून ढाळून
नाक शिंकरत-खाकरत
चालू लागेल न्हाणीघराकडे

खणखणतील फोन
पाऊस शोक संदेशांचा
सांत्वनाचा वळीव
धुमाकूळेल सोशल मिडिया वर
- कळवण्यास दु:ख होते की...
ईश्वर मृतात्म्यास...
आरआयपी...ओम् शांती...
अन्
भांबावलेली..बावरलेली
अबोध; निरागस बालके
कुजबुजतील आपापसात:
‘देवाचं घल खूप दूल असतं का ले...?’
तू येशील तेव्हा

अखेर; एकदाचे
उशापायथ्याशी बसून बसून
अवघडून गेलेल्यांचे
जीव भांड्यात पडल्याचे पाहून
मोहा-मायेचे जीर्णविदीर्ण धागेदोरे
तटतटा तोडून टाकत
मी ही झालेलो असेन
विदेही...विरक्त

... तेवढं एक कर.
सगळी निरवानिरव झाल्यानंतर
तुझ्या डोळ्याला डोळा भिडवून
ताठ मानेने चालू पडण्याइतपत
नैतिक बळ ठेव
माझ्या गलितगात्र देहात
तू येशील तेव्हा...
****

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर कविता...
पण शेवटी अपराधीपणाची भावना समजलो नाही...
मला शेवटचं कडवं नसतं तर कविता अधिक सुंदर वाटली असती... धारिष्ट्य करतोय स्पष्ट बोलायचं तुमच्या कविता आवडतात म्हणून....

द सा- शेवटचं कडवं हाच कवितेचा पाया आहे आणि प्राणही...

ही कविता हवं तर देवाकडे प्रार्थना म्हणा, किंवा मागणे समजा. मृत्यू शय्येवर असताना मनात कुठलीच बोचरी शल्यं, आत्म ग्लानी, अपराध बोध, पश्चाताप, खेद वा खंत नसो , असे हे प्रांजळ मागणे आहे.
नैतिकता आणि नीतिमत्तेच्या वाटेवर चालत, जीवन जगणारी व्यक्ती मृत्यूला हसत हसत सामोरे जाऊ शकते, अशी एक संभाव्य शक्यता कवितेतून मांडण्याचा हा प्रयत्न आहे.

>>>> धारिष्ट्य करतोय स्पष्ट बोलायचं.... एवढा हक्क दाखवल्याबद्दल कृतज्ञ आहे...! Happy

ओह , आता परत वाचली ... खरं मृत्यूलाच साकडं आहे....
गुलजारांची एक सुंदर रचना आठवली

मौत तू एक कविता है

मौत तू एक कविता है
मुझसे एक कविता का वादा है मिलेगी मुझको

डूबती नब्ज़ों में जब दर्द को नींद आने लगे
ज़र्द सा चेहरा लिये जब चांद उफक तक पहुँचे

दिन अभी पानी में हो, रात किनारे के करीब
ना अंधेरा ना उजाला हो, ना अभी रात ना दिन

जिस्म जब ख़त्म हो और रूह को जब साँस आए
मुझसे एक कविता का वादा है मिलेगी मुझको

समजून घ्यायचा प्रयत्न करतोय, केला, करणार आहे. नाही समजली तर तो माझा दोष!
हे कवि.
कविता वाचली कि कुछ कुछ होता है. पण का कुठे ते समजत नाही.

केशवकूल - आपुले मरण पाहिले म्या डोळा.. असा हा माझ्या संभावीत मृत्यूचा सोहळा...!! थोड्या फार फरकाने प्रत्येकाच्या आयुष्याचा घटनाक्रम साधारणपणे असाच असणाराय...

तेव्हा आपल्या हाती फक्त एवढेच शिल्लक आहे की, मरण सुखकर करण्यासाठी आपले जगणे नितळ, निर्मळ ठेवायचा यथाशक्ती व जाणीवपूर्वक प्रयत्न करायचा. Happy

मला वाटते एवढे निरूपण पुरेसे आहे.. ! मन:पूर्वक आभार Happy

हरचंद पालव जी- तुमचा प्रतिसाद पाहून खूप छान वाटले..

आजवर जाणवणारी तुमच्या अनुपस्थितीची पोकळी आज भरून निघाल्याचा अपार आनंद आहे. Happy Happy स्नेह कायम राहावा हीच अपेक्षा..!

आजवर जाणवणारी तुमच्या अनुपस्थितीची पोकळी आज भरून निघाल्याचा अपार आनंद आहे. >> अरे बाप रे! मी आज वाचला. धन्यवाद पॅडी. Happy