सुभेदार: आहे भव्यदिव्य तरीही...

Submitted by अतुल. on 27 August, 2023 - 03:24

सुभेदार पाहिला. आजकाल जवळपास सर्वच चित्रपट तांत्रिकदृष्ट्या खूपच पुढे गेलेले आहेत. ती बाजू सांभाळणारे जे कोणी तंत्रज्ञ, कलाकार इत्यादी आहेत त्यांना मानलेच पाहिजे. सिनेमॅटोग्राफर, कला दिग्दर्शक, स्पेशल इफेक्ट तंत्रज्ञ, एडिटिंग करणारे इत्यादी सर्वांनी या चित्रपटात खूप मेहनत घेऊन एक भव्यदिव्य चित्रपट साकारला आहे. आजकाल सेट्स तर सगळे एकदम चकाचक फाईव्ह स्टार असतात. नितीन देसाईंच्या काळात भव्यदिव्य आणि त्याचसोबत बारकावे टिपणाऱ्या कलादिग्दर्शनाचा पायंडा पडला आहे. मानलेच पाहिजे. यासाठी हा चित्रपट नक्कीच पाहण्यासारखा आहे. विशेषतः मध्यंतरानंतरचा चित्रपट. सिंहगडाच्या त्या भीषण रात्रीच्या युद्धाचे जे प्रसंग दाखवले आहेत ते खुर्चीला खिळवणारे आहेत (एकदोन अपवाद वगळता, ज्याचा पुढे उल्लेख करीनच).

या शिवाय त्या काळातली भाषा, तेच इतिहासाला अनुसरून असलेले प्रसंग वगैरे दाखवण्यासाठी दिग्दर्शक आणि टीम ने भरपूर मेहनत घेतल्याचे दिसून येते. "जिथे संदिग्धता आहे तिथे एकाहून अधिक संदर्भग्रंथात (पोवाडे, कादंबऱ्या किंवा काव्य वगैरे नव्हे. ऐतिहासिक संदर्भग्रंथ!) काय उल्लेख आहे तोच खरा मानून त्यानुसार पटकथा लिहिली आहे" असे या चित्रपटाच्या दिग्दर्शकाने एका मुलाखतीत सांगितल्याचे वाचले. ते जाणवले देखील. उदाहरणार्थ, घोरपड या प्राण्याला दोर बांधून गडावर पाठवण्याचा उल्लेख पोवाडे आणि काव्यात आहे. पण तसे न दाखवता घोरपडे बंधू त्या रात्री कमरेला दोर लावून पहिल्यांदा गडावर गेले असे दाखवले आहे. पुढेसुद्धा, सुभेदार तान्हाजी मालुसरे धारातीर्थी पडल्यानंतर शेलारमामा परतीचे दोर कापून टाकत त्वेषाने मावळ्यांना परत फिरून लढण्यासाठी प्रेरित करतात असा उल्लेख कादंबऱ्या, पोवाडे यातून आहे. चित्रपटात मात्र हि भूमिका सूर्याजी करतो असे दाखवले आहे.

परंतु.... होय! एकदोन बाबी "परंतु" आहेत. आणि तो परंतु चित्रपटभर जाणवत राहिला म्हणून लिहायची वेळ आली. प्रेक्षकांच्या भावनेला हात घालणारे संवाद, मानस गुंतवून ठेवणारे प्रसंग किंवा स्मरणात राहतील असे संवाद का येत नाहीत? खूप पूर्वी कुठेसे वाचले होते कि चित्रपटगृहात येणारा प्रेक्षक हा मनात "आपापली ओझी" घेऊन आलेला असतो. त्यांना त्या ओझ्यांतून सोडवून चित्रपटांत वळवून तिथेच अडकवून ठेवणे हे दिग्दर्शकाचे आणि पटकथाकराचे काम आहे. आणि हि तर खरी चित्रपटकला किंवा गोष्ट सांगण्याची कला आहे. हा चित्रपट भरपूर चाललाय. गाजतोय. सर्व मान्य. मी सुद्धा इतरांना पाहण्याचा आग्रह करेन. तो भाग नाही. पण माफ करा पण मला हा चित्रपट या पातळीवर खूप खूप मागे पडला असे वाटले. शिवकालीन भाषेचा लहेजा सांभाळण्यात संवादफेकीत जे मॉड्यूलेशन आवश्यक असते ते साफ दुर्लक्षित झाले आहे. परिणामी कित्येक संवाद मनात शिरत नाहीत. लक्षात राहणे हि तर दूरची गोष्ट. (चित्रपटातील एकही संवाद माझ्या लक्षात राहिला नाही, कारण एकही मनास भिडला नाही)

दुसरी बाब म्हणजे प्रेक्षकांच्या भावनेस हात घालण्यासाठी केलेली धडपड! भावनेस हात घालण्याच्या बाबतीत खरे तर, वर उल्लेख केल्याप्रमाणे, परिणामकारक संवाद हे फार महत्वाचे असतात. पण रडारडीचे किंवा "अरेरे" छाप प्रसंग दाखवून प्रेक्षकांच्या मनात फार काळ घर करता येत नाही. दिग्दर्शकाने या दुसऱ्या प्रकाराचा अनेकदा अवलंब केल्याचे दिसते. ते पटत नाही. आणि कधीकधी तर न पटण्याचा कडेलोट होतो. अरे ते महान योद्धे होते. तडफदार लढाऊ बाणा होता. झुंझार होते. त्यांना अनेकदा असे भावनाविव्हल होऊन रडताना का दाखवले आहे? त्यांना भावना नव्हत्या असे मुळीच नव्हे अर्थातच. पण असे प्रसंग दाखवताना त्यांचा लढाऊ बाणा आणि तडफदार वृत्ती अबाधित ठेऊन केवळ मोजक्याच शब्दात प्रेक्षकांच्या ह्रदयाला हात घालता आला असता. त्यांना निशब्द करता आले असते! प्रेक्षक आतून अक्षरशः हलला पाहिजे. आणि ते मोजक्याच संवादांनी आणि नेमक्या दृश्यानीच साधता येते. हे असे "नही.... नही.. तुम मुझे ऐसे नही छोड सकते" टाईप प्रसंग बच्चन, धर्मेंद्र, जितेंद्र यांच्या सिनेमात ठीक होते (मग स्लो मोशन मध्ये "येSSSS... दो स ती.... हम नहीSSS...." ढाण्ण!!! वगैरे वगैरे सगळे). पण इथे ते तसे का दाखवले आहे? खूप मोठा योद्धा धारातीर्थी पडल्याचे दृश्य असे "ऐंशीच्या दशकातल्या टिपिकल फिल्मी" पद्धतीने दाखवल्याने परीणामकारक होईल का? अजिबात पटले नाही! या शिवाय काही प्रसंग (जसे कि मालुसरेंच्या हातात तलवार घुसलेला प्रसंग, शिवराय आल्यानंतर तान्हाजी त्यांच्या मिठीत प्राणत्याग करतात हा प्रसंग इत्यादी) इतिहासाला धरून वाटले नाहीत (जसे दिग्दर्शकांनी मुलाखतीत दावा केला आहे).

असो. पण तरीही सुंदर चित्रपट, प्रेक्षागृह तुडुंब भरले होते. प्रसंगानुरूप शिट्ट्या टाळ्या येत होत्या. शिवराय (तन्मय मांडलेकर), जिजाऊ (मृणाल कुलकर्णी), तान्हाजी (अजय पूरकर) यांच्या एन्ट्रीच्या वेळी दणकून शिट्ट्या व टाळ्या पडत होत्या. मुघल सैनिक आणि इतर मुघल पात्रांच्या वेळी निषेधाचे व धिक्कार स्वरूपाचे उद्गार ऐकायला येत होते (उदयभान (दिग्विजय रोहिदास)ला अजून स्कोप द्यायला हवा होता). अधूनमधून "छत्रपती शिवाजी महाराज कि जय" च्या घोषणांनी प्रेक्षागृह निनादून जात होते. ऑल इन ऑल, छान चित्रपट आहे Happy

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिग्पाल लांजेकर, ओम राऊत, आ रा रा रा अ‍ॅक्टर (नाव माहिती नाही), चिन्मय मांडलेकर हे सर्व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहेत. चित्रपटात अजेण्डा जाणवतो. दिग्पाल लांजेकरने तर संघाचा आहे हे अभिमानाने सांगितले आहे. ओम राऊत, आराराराने सुद्धा सांगितले आहे.

अजेण्डा असला तरी पूर्ण चित्रपट टाकाऊ नसतो. तरीही निर्भेळ आनंद मिळत नाही. शिवरायांच्या काळात ना हिंदुत्ववाद होता, ना सेक्युलॅरिजम होता. आजच्या काळानुसार त्यांना लेबले लावणे चुकीचे आहे. लेबल न लावताही महाराजांचा वापर करून विशिष्ट अजेण्डा रेटणे हे सुद्धा चुकीचे आहे.

तरीही एखादा अपवादात्मक अजेण्डा वाला सिनेमा चालवून घेता येतो. पण इथे तर फॅक्टरी उघडली आहे.

परीक्षण छान.
पण सध्या ऐतिहासिक चित्रपटांना माझा पास असतो.

परीक्षण छान. >> +१
पण सध्या ऐतिहासिक चित्रपटांना माझा पास असतो. >> +७८६.

घोरपडे बंधू आणि सूर्याजी दोर कापणे - हे बहुतेक तान्हाजी सिनेमातही होते. त्या सिनेमात चंद्राजी होते बहुतेक, सूर्याजी ऐवजी. मी ठेत्रात म्हटलो पण होतो, सूर्याजी पाहिजे म्हणून, तर पुढच्या रांगेत बसलेल्या अमराठी लोकांनी उगाच शूक शुक करून मला गप्प केलं.

सामना, मी तुमचे मत बरोबर किंवा चुकीचे आहे असं काहीही म्हटल नाही. आणि झोबण्याचा प्रश्नच नाही. मला वाटल तुम्ही सिनेमा बघून आपल मत व्यक्त करत आहात, म्हणून विचारलं.कारण मला तरी कोणताही अजेंडा चित्रपटात दिसला नाही. पण तुमची तळमळ समजली.

@सामना
>> आजच्या काळानुसार त्यांना लेबले लावणे चुकीचे आहे.
सहमत आहे. कारण ज्या त्या काळाच्या राजकीय व सामाजिक चौकटी त्या काळानुरूप असतात. धाग्यातले मुद्दे "एक चित्रपट परीक्षण" यादृष्टीने मांडलेत. त्यामुळे चित्रपट परीक्षकाच्या भूमिकेतून "चित्रपट निर्मिती मागील हेतू/भूमिका" याबात मत मांडणे माझ्यासाठी योग्य होणार नाही म्हणून आपल्या इतर मुद्द्यांवर माझा पास Proud तरीही प्रतिसाद म्हणून सर्व मतांचा आदर आहेच.

@ऋन्मेऽऽष, हरपा धन्यवाद

आज जाणार होतो. पण २०/२५ मावळे आणि २० / २५ मोगलांचे सैनिक ट्रेलर मध्ये लढताना बघितले आणि चित्रपटाला जाण्याचा इंटरेस्ट गेला ....
मराठी फिल्म मध्ये भव्य दिव्यपणा कधी येणार ?????

Lol Lol
तेही खरंच म्हणायला हवं. "भव्यदिव्य" इज ऑलवेज ए परसेप्शन. जमेल तितका आणलाय मात्र त्यांनी. किंवा त्याबाबत कदाचित मी फार अपेक्षा ठेऊन गेलो नसेन.

घरातील मुलांच्या आग्रहामुळे नाईलाजाने लांजेकर चे दोन तीन सिनेमे बघितले असतील , पण प्रत्येक वेळी तोच तोच पणा आणि तेच तेच कलाकार बघून वैताग येतो .
लांजेकर च्या कोणत्यातरी सिनेमात मृणाल कुलकर्णी म्हणते " राज्याच्या सीमा आणि तटबंदी वर जागता पहारा ठेवा " लगेच त्या पाठोपाठ दहा बारा घोडस्वार मावळे जाताना दाखवलेत .
त्या लांजेकरमध्ये भव्य दिव्य करण्याची आर्थिक कुवत नाही तर त्याने महाराष्ट्राच्या महान इतिहासाचे धिंडवडे काढू नये अशी या गरीबाची माफक अपेक्षा !
लांजेकर ने महान कथानकांचे स्वस्तात वाटोळे केल्यावर इतर कोणा जाणकारला त्यात उतरण्याची हिम्मत होणार नाही .
दक्षिण चित्रपट सृष्टीत काल्पनिक कथेला उत्कृष्ठ VFX द्वारे दाखवून सिनेमा उच्च पातळीवर नेतात आणि हा लांजेकर महाराष्ट्राचा ज्वाजल्या इतिहास असताना चित्रपटात सतत दळींद्रीपण दाखवत असतो .....
असो ......

अष्टक म्हणजे आठ ऐतिहासिक चित्रपट काढणार आहे लांजेकर, त्यातला हा पाचवा असे मी कालच कुठेतरी वाचले. कलाकार, कपडेपट, घोडे, सगळे आठ चित्रपटांच्या करारावर असतील म्हणजे फॅक्टरीच उघडली आहे. त्यापेक्षा एकच भव्य चित्रपट बनवला असता तर. पण त्या एकच भव्य चित्रपटाचा आदिपुरुष झाला तर अशी भीती असेल. लांजेकरसाठी वीस पंचवीस मावळे हा भव्यपणा असेल. मराठी माणसाला मराठी चित्रपटात कशाला एवढा भव्यपणा दाखवा असेही असेल. शक्यता काहीही असू शकते. मी अजून एकही ऐतिहासिक चित्रपट बघितलेला नाही अगदी फर्जंदही.

छान लिहिले आहे.
प्रेक्षक आपापली ओझी बाळगत सिनेमा बघतो हे किती खरं आहे.
परीक्षण छान. >> +१
पण सध्या ऐतिहासिक चित्रपटांना माझा पास असतो. >> +१
चांगले लिहिले आहे, चंपा. म्हणजे अजून तीन सिनेमे बघणं टाळायचे आहे

पण २०/२५ मावळे आणि २० / २५ मोगलांचे सैनिक ट्रेलर मध्ये लढताना बघितले आणि चित्रपटाला जाण्याचा इंटरेस्ट गेला ....>>>> Lol

भव्य दिव्य दाखवण्याच्या नादात सिन्हगडावर एक लाख मावळे विरुद्ध दहा लाख मोगल लढताहेत असे अपेक्षित आहे का? तो खरा इतिहास होइल का?

मावळे गनिमी काव्याने लढत असे माझ्या लहानपणीच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिले होते. बाजी प्रभु वगैरे वीर तुटपुन्जी सेना घेऊन लढले असे वाचले होते. तानाजीच्या बाबतीतही तसेच काहीसे वाचलेले आठवतेय. तेव्हाचा इतिहास आता बराच बदललेला असेल पण म्हणुन मावळ्यांची ही काही फेमस युद्धे दोन्ही बाजुंनी लाखो लोक मिळुन लढताहेत हे दृश्य नजरेसमोर काही येत नाही. शाहिस्तेखान मोठी फौझ घेऊन उतरलेला पण त्यालाही गनिमी काव्यानेच जेरीस आणले ना..

मावळे गनिमी काव्याने लढत होते हे सर्वांनाच माहीत आहे , पण ते २० / २५ ऐवजी काही हजार तर नक्की असतील .
आणि मोगलांचे सरदार काही लाखांच्या फौज घेवून यायचे हे देखील वाचलं होत , पण लांजेकर च्या कोणत्याही सिनेमात मोगलांची लाखोंची फौज कधी दिसली का ?
बाहुबली प्रमाणे शेकडो कोटी. VFX वर खर्च नका करू पण एखादा कोटी तरी खर्च करा ना !!!!
यांच्याकडे VFX साठी पैसे नव्हते म्हणून शिवशाही आणि पेशवाईत देखील पडके बुरूज असल्याचे मान्य करायचे का ?

मला नेमकेपणाने कदाचित मांडता येणार नाही, पण पावनखिंड आणि शेर शिवराय दोन्ही सिनेमांत काहीतरी मिसिंग होतं, तकलादू होतं, कन्व्हिन्सिंग नव्हतं. उदा. अफझलखानाशी लढण्यासाठी प्रतापगडाची निवड हा एक स्ट्रॅटेजिक निर्णय होता. उगाच कुठल्याश्या दगडी भिंतीसमोर चार लोकं त्वेषानं बोलता बोलता, महाराज ‘त्या भोरप्या डोंगरावरच्या किल्ल्याचं बांधकाम कुठवर आलं?, अच्छा, झालं का, चला तर मग, अफझलखानाशी आपण प्रतापगडावर लढू‘ असं काहितरी दाखवलं तर त्या प्रसंगाच्या गांभीर्याचा, त्या निर्णयामागे असलेल्या बुद्धीमत्तेचा सगळ्याचाच खेळखंडोबा होतो. किंवा दहा हजारांच्या छावणीत एक बाई जाऊन खानाच्या जेवणात कांद्याचं प्रमाण वाढवते आणि तो तामसी प्रकृती बळावून चुकीचे निर्णय घेतो हे दाखवण्यात पंताजीकाका बोकीलांच्या (हे पात्र वैभव मांगले ‘फु बाई फू‘ मधल्या स्किटच्या कॅरेक्टरप्रमाणे साकारतो) वकिली बुद्धीमत्तेची चेष्टा वाटते.

ह्या लोकांनी ऐतिहासिक सिनेमे आणि बायोपिक्स काढू नये, एकांगी किंवा अनकन्व्हिन्सिंग होतात.

धन्यवाद अस्मिता, सामो.

>> म्हणजे अजून तीन सिनेमे बघणं टाळायचे आहे

मला वाटतंय मी आधी फक्त फर्जंद पाहिला होता. तेंव्हा अष्टक वगैरे बद्दल माहिती नव्हते. आता मात्र लक्षात ठेवणार आहे Proud

सैन्य फारसे नव्हते त्याबद्दल सिनेमात सुद्धा संवादातून उल्लेख आहे.

@फेरफटका अगदी सहमत. या सिनेमात सुद्धा उदयभान राठोड झोपला असता त्याच्या बेड शेजारचा गडाचा नकाशा शिवरायांचे हेर पळवून नेतात असे काहीसे दाखवले आहे. काही प्रसंग फारच पोरकट वाटतात. शिवाय ज्या प्रकारे तान्हाजी आपल्या पत्नीचा निरोप घेतो किंवा एकूणच पती पत्नीतले संवाद दाखवलेत ते मागच्या साठ सत्तर वर्षातले वाटतात. शंभर वर्षांपूर्वी सुध्दा असे इतके मोकळेपणाने बोलत नसतील. तीनशे वर्षांपूर्वी कसे वातावरण असेल? पण तिथे सिनेमॅटिक लिबर्टी अनेक सिनेमात घेतलेली दिसते. हिंदी तान्हाजी पाहताना सुद्धा मला हे खटकले होते.

>> तान्हाजी चित्रपट पाहिला आहे- यात काही वेगळे आहे का? का कॉपी आहे पूर्ण?

कॉपी नाही. या टीमने यांच्या पद्धतीने मांडणी केली आहे. बजेट मुळे काही गोष्टी तान्हाजी मध्ये अर्थातच सरस आहेत. म्हणून तशी तुलना अयोग्य होईल. पण दिग्दर्शन आणि इतर काही बाबतीतही तान्हाजी उजवा वाटतो.

अतुल तान्हाजी उजवा वाटला म्हणजे हा चित्रपट कसा असेल हे लक्षात आलं
फर्जंद थिएटर मध्ये पाहिलेला, मुलासोबत.
काही खटकणार्या गोष्टी होत्या त्यातही पण आवडला होता.
बहुतेक त्याला मिळालेलं यश बघून हे अष्टक वै डोक्यात आलं की काय ह्या टीमच्या हे नाही माहीत.
महाराजांचं कर्तृत्व, हुशारी , अचूक निर्णय क्षमता, रिस्क reward analysis, त्यांच्या मागे उभे असलेले जिवाला जीव लावणारे त्यांचे मावळे हे कोणी सुपरहिरो नसूनही गाजवलेले मोठे मोठे पराक्रम ह्यावर फोकस हवा. तो थोडा लूज होतो आणि चित्रपट बांधीव रहात नाही.
काहीतरी मिसिंग वाटतं ते हेच असावं.
जुने ब्लॅक व्हाइट चित्रपट पाहताना देखील हे इतकं खटकत नव्हतं. अर्थात ते दूरदर्शनवर भाबड्या वयात पाहिल्याने देखील असेल.

धन्यवाद झकास, आचार्य

>> जुने ब्लॅक व्हाइट चित्रपट पाहताना देखील हे इतकं खटकत नव्हतं

संवाद लिहिणे आणि संवादफेक दोन्हीवर खूप मेहनत घेत होते पूर्वी. प्रसंग प्रेक्षकांच्या मनास कसा भिडेल हे पहात (म्हणजे फक्त भावनातिरेक दाखवणे नव्हे). आता तांत्रिक बाबींवर जास्त मेहनत घेतात.

बाई पण भारी देवा ने पहिल्या आठवडयात २४ कोटी आणि टोटल ६५ कोटी कमवले होते .

पहिल्या आठवड्यात कुथून कुथुन आठ कोटींचा हल्ला गोळा केला सुभेदार ने !
थोडक्यात लांजेकर चे आता तरी डोळे उघडतील आणि झेरॉक्स मारणे बंद करील ......