भाग्य दिेले तू मला

Submitted by MazeMan on 13 May, 2022 - 09:04

एक (मालिकेतील) परंपरा जपणारी मुलगी, यशस्वी आणि परंपरांचा सन्मान करणारी उद्योजिका आणि तिचा यशस्वी पण खडूस मुलगा यांची ही कहाणी आहे असं वाटते.
नायिका कोकणातली आहे. तिची आई स्वर्गवासी झालेली आहे. वडीलांची आर्थिक स्थिती कमजोर आहे. त्यांच्या घरावर कर्ज असल्याने ती मुंबईत नोकरी करायला आलेली आहे व उद्योजिकेचा जो काही उद्योग आहे त्यात ती काम करते. सिरिअल अधून मधून बघत असल्याने नक्की कसला उद्योग आहे ते कळले नाही. नायकही त्याच उद्योगात असतो आणि त्याची आई प्रॅक्टिकल निर्णय घेत नसल्यामुळे त्याचे आईशी अधुन मधुन खटके उडत असतात. साधी रहाणी असल्यामुळे आपल्या नायिकेवर उच्च विचारसरणीची जबाबदारी आलेली आहे. शिवाय तिची आर्थिक स्थिती सामान्य असल्याने मालिकावाल्यांच्या नियमाप्रमाणे ती स्वभावाने चांगली असणार. नायक खडुस असल्यामुळे त्याला माणसात आणण्यासाठी तिला पुढे खूप स्कोप मिळेलच.

बाकी एकत्र कुटुंब, कुटील कारस्थाने करणारी नातेवाईक मंडळी, मॉडर्न दिसणारी आणि त्यामुळे खलप्रवृत्तीची ठरेल अशी सून, तिचे कान भरणारी आई, बायकोपुढे काही न बोलणारा नवरा वगैरे स्टिरिओ टाईप्स ठासून भरलेले आहेत.

निवेदिता जोशी (उद्योजिका) सोडल्यास इतर कलाकारांना मी ओळखत नाही. 'अजुनही बरसात आहे' मधील मनू इथे एका साईड रोल मधे आहे.

तर चला घेऊ रसास्वाद 'भाग्य दिले तू मला' या मालिकेचा...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गेल्या काही एपिसोडमध्ये....

नायकाच्या चुलत भावाचा प्रेम विवाह झाला. त्याची पत्नी म्हणजे मॉडर्न दिसणारी सून. तर तिच्या आईने लग्नापूर्वी उद्योजिका व तिच्या मुलाकडे
(इथून पुढे आपण त्यांना उ व ना म्हणू) बिझनेसमधली १०% पार्टनरशिप व काही कोटी रुपये मागितले. नाहीतर ती लग्न मोडणार होती. नायकाने तिचा अपमान करुन ५ कोटी रुपये व नो पार्टनरशिप अशी कांउटर ऑफर दिली. क्या करोगे इतनी धनराशी का? असं कुणी विचारलं नाही. ज्याचे लग्न होतंय त्याच्या कानावर भावी सासरची मंडळी पैशाला किती लोभी आहेत हे घालण्याची तसदीही कुणी घेतल्याचे दिसत नाही. अमृतांजन आणण्यासाठी मी उठून गेल्यामुळे फायनल डील काय झाले कळले नाही. परंतु मॉ सु आनी सासू नायकावर खार खाऊन आहेत हे पुढील एपिसोड मधून समजले. मॉ सु एम्. बी. ए. आहे. पण नोकरी करताना किंवा शोधताना दिसत नाही.

लग्नाच्या दिवशी नायिकेकडे आणि उद्योजिकेच्या हापिसमधल्या लोकांकडे कामाची जबाबदारी असते (हे बघून उद्योजिकेचा वेडिंग प्लानिंग किंवा इवेंट मॅनेजमेंटचा बिझनेस असावा असं मला वाटलं होतं पण तसं काही नाहीये) तर दागिने पोहचवताना/पोहचवल्यावर मंगळसुत्र हरवते. मग ही गोष्ट गुप्त राखण्याची खटापट सुरु होते. नायिका साधी असल्यामुळे ती उगीचच हे तिच्यामुळे झाले असा इतरांचा गैरसमज करवून देते. का ते माहित नाही. बरं लग्नघरात घरची माणसं सोडल्यास हॉलचे कर्मचारी वगैरे कुणी दिसत नाही. पण कुणीही तुम्हाला दिसलंय का मंसु वगैरे वर्हाड्यांना विचारत नाही. पोलिसांना बोलवायचे वगैरे तर राहू दे. नायिका दुसरे मंसु आणण्यासाठी बाजारात जाते. इथे ती घरावरचे कर्ज कमी करण्यासाठी नोकरीला आलेय, तिच्याकडे कुठून येणार एकरकमी पैसे वगैरे विचारायचे नाही बरं का. आणि डिझाइनचे काय? नगाला नग मंसु उभं केलं की झालं? शेवटी दैवाला दया येते आणि त्या दिवशी संप असल्याने तिला मंसु घेता येत नाही. मॉसुची आई लग्न मोडायला टपलेलीच आहे. नो मंसु नो लग्न असं डिक्लेअर करते ती. एवढी बिझनेस पार्टी पण ओळखीच्या सोनाराला फोन करून शटर थोडस्सं उघडुन पटकन एखादं मंसु घ्यावं असं कुण्णाला वाटत नाही. मुळात मॉसु, सासू, नायिका आणि मनू सोडल्यास नवरी लग्नाला उभी राहिपर्यंत ही गोष्ट सिक्रेट ठेवतात. का देव जाणे. मग आपली पारंपारिक, संस्कारी नायिका काळ्या मण्याची पोत ओवता ओवता फिलॉसॉफी झाडून, मंसु नको पण फिलॉसॉफी आवर म्हणण्याची वेळ आणते आणि एकदाचे लग्न लागते. तिची फिलॉसॉफी ऐकून उ इंप्रेस होते. यांच्याकडे दररोजला घालायला म्हणून किंवा माहेरुन दिलेल्या मुहुर्त मण्यासाठी छोटे मंसु बनवत नसावेत. डायरेक्ट काळी पोतच. आणि दागिने असे कोणाकडेही देतात सांभाळायला? नॉर्मल माणसांत एखादी जबाबदार काकू, मावशी नाहीतर आत्या घारीच्या नजरेने वावरत दागिन्यांची पर्स आणि दुसरी तितकीच जबाबदार का/मा/आ द्यायच्या आहेराची बॅग संभाळत असते.

बबड्याच्या मालिकेत निदान ओळखीचे यशस्वी चेहरे होते. ही मालिका एकटी नि जो स्वतः च्या खांद्यावर पेलून नेईल हा अतिआत्मविश्वास कोणाचा बरे असावा.

ना बरोबरच्या अशाच एका वादावादीनंतर उ घर सोडून जाते ती डायरेक्ट नायिकेच्या गावी. नायिकाही तिथे पोहोचते. बहुतेक मंसु एपिसोडनंतर नायक तिला नोकरीवरून काढून टाकतो. मग ना उ ला तिच्या नातेवाईकांच्या घरी घेऊन जाते. तिचे घर गहाण पडलेय. तिथे उ ला आईच्या साड्या वगैरे नेसायला देते. उ बॅग न घेता आलेय. मग हीच कोकणातली सो कॉल्ड पारंपारिक नायिका शहाबादी फरशीचं अंगण केरसुणीने (खराट्याने नाही) झाडते, त्याच हाताने अंगणातल्या चुलीवर टोप चढवते, तांदुळ धुते व ते पाणी चुलीशेजारी फरशीवरच (माडाच्या, आंब्याच्या किंवा केळीच्या बुंधात नाही, गेला बाजार फुलझाडात पण नाही) फेकते, ७-८ जणांच्या बिर्याणीला पुरेल अश्या टोपात २ मुठी तांदुळ वैरते. हे पाहून उ अजून इंप्रेस होते. असं काही केलं तर माझी नॉट सो पारंपारिक आई/सासू त्याच केरसुणीने मारेल मला. नाही झेपत तर उगीच चूल, अंगण प्रकार कशाला दाखवता? गॅस शेगडी आणि कूकर चालेल ना भातासाठी. पण आम्ही पारंपारिक किनई.

बाकी नायिकेच्या कोकणातल्या खाष्ट नातेवाईक स्त्रीच्या छोट्याशाच भुमिकेत संजीवनी जाधव ( पांडगो इलो रे व इतर मालवणी नाटकातील) यांना बर्याच वर्षांनी पाहिले. असल्या भुमिकांत त्यांचा हातखंडा.

मग ना आणि त्याचा आत्तापर्यंत मालिकेत अस्तित्वात नसलेला मामा उ ला आणायला कोकणात पोहोचतात. त्यांना उ तिथे असल्याचा शोध कसा लागतो हे मी मिसलं. उ परत जाताना उगिचच नातेवाईकांना कावेरी कशी ग्रेट आहे आणि एक दिवस तुम्हाला तिची किंमत कळेल असे सुनावून जातात. या एपिसोडमधली एकमेव बरी गोष्ट म्हणजे नातेवाईंकांची वेशभुषा परिस्थितीनुरुप वाटते. त्यातही संजीवनी जाधवांनी नववारी नेसली आहे, शिवलेली नववारी घातली नाहिये. अर्थात कावेरी (नायिका) ची पार्श्वभुमी ब्राह्मणी वाटते. पण संजीवनी जाधवांचे नेसणं ब्राह्मणी नाही, ते इतर समाजासारखं आहे. पण मुळात स्टोरीलाईनपासून बोंब असताना ही फारच छोटी चूक आहे.

बाय द वे, आपली नायिका म्हणे घरात पंजाबी घालते आणि बाहेर साडी नेसते. टॉप बॅंकर्स, एअरहॉस्टेस किंवा हॉस्पिटॅलिटी क्षेत्र सोडले तर कोण करतं असं? किमान ३०-३५ वर्षापूर्वी कोकणातल्या मुली पंजाबी ड्रेसवर मुव्ह झाल्यात. आता त्या ५०-५५ वर्षांच्या बायका असतील. आताची जनरेशन तर जीन्समधे असते. कुठच्या जगात वावरतात हे लोक?

ना उ बरोबर तिची पर्सनल असिस्टंट म्हणून परत आली आहे. एका एपिसोडमधे ती ऑफिसच्या दारात रांगोळी घालते आहे. अगदीच बाळबोध आहे रांगोळी. पण किती ते कौतिक? मुळात ऑफिसच्या दारात कोण रांगोळी काढतं? दिवाळी कॉंपीटिशन वगैरे असली तरी जागा नेमून दिलेल्या असतात आपले कलागुण दाखवायला. मग मॉसु ऑफिसमध्ये येताना ती रांगोळी तुडवते आणि उ तिलाही रांगोळी काढायला बसवते. वर ना टोमणा मारतो की बरोबर जागा दाखवली आहे वगैरे. मॉसु बरोबर एक पे एक फ्री सासू आहेच. तिचा जळफळाट होतो माझ्या एम्. बी. ए. मुलीला रांगोळी काढायला बसवलं, वरतून अपमान केला म्हणून. तसं तिचं बरोबर आहे म्हणा उगिच टोमणे का खावे? पण रांगोळी
काढणं आणि उच्च शिक्षण काय म्युच्युअली एक्स्लुझिव स्किलसेट नाहीत. नसेल जमत किंवा आवडत तर नाही सांगावं. अपमान काय त्यात?

काल काय तर गुलाब पाण्याच्या ऐवजी पर्फ्युम वापरलं म्हणून ऍलर्जी आलीय आणि नायिका नायकाला (ऑफिसमध्ये) लेप लावतेय. बायका पर्समधे लिपस्टीक, मॉइस्चरायझर, लिप बाम, काजळ वगैरे घेऊन फिरतात माहिती होतं. मुलतानी मिट्टी किंवा तत्सम काहीतरी म्हणजे फारच.

फा तुम्ही घ्याच मनावर आता, तुम्ही फार मस्त पिसे काढता.
संजीवनी जाधव असतात की मालिकांमध्ये. सोनी वर लागायची "जुळता जुळता जुळतंय की" त्यात होत्या. अजूनही मालिकेत बघितल्यासारखं वाटतंय.

काकु गोड आहे. अति सांस्कृतिक गप्पा मारते. सिरियल नाही बघितली, प्रोमोज बघितले.

झी वर आहे का ही सिरीज? उद्योजिका वगैरे म्हंटल्यावर मजा येइल >>> कलर्स मराठीवर आहे.

नायिका झीमवरच्या त्या फडतूस कोठारे फँक्टरीतल्या एका सिरियलमधली आहे,ज्यात शशांक केतकर व्हिलन होता,आशय कुलकर्णी हीरो होता.तवी मुंडले नाव असाव
नायकविवेक सांगळे आहे,जो फार पूर्वीच्या देवयानीमध्ये होता.पण काही महिन्यांपूर्वी संपलेल्या आई माझी काळुबाई मध्ये हिरवीनीला म्हणजे प्राजक्ता गायकवाडला शिवीगाळ केल्याच्या आरोपावरून चर्चेत होता.पण सुटला कारण कुबलबाई पाठीशी उभ्या होत्या.
मॉडर्न सून ही त्याच मालिकेतली व्हँम्प आहे,तिथून उचलून आणली आहे,फक्त तिथे गावरान भाषा हौती,इथे मॉडर्न आहे,पण मला ती काही मॉडर्न भाषा वाटत नाही.
बाकी कथानकाच्या नावाने सगळा अंधार आहे.सुरुवातीचे काही भाग पाहिले आता अधूनमधून.
ते तेवढ "ओ काकू" खूप व्हायरल झाल आहे सोमिवर.
सध्या मनु पॉझिटिव्ह आहे पण नंतर तिलाही करतील निगेटिव्ह.

हाय इथले वाचोन बघितले काल काही भाग. माहेरचा चहा!!! बोटॉक्स्ड निवेदिता. रागीट बबड्या. रोज वॉटरच्या ऐवजी पर्फ्युम व पाणी!!! ती मुलगी अगदी गोड चेहर्याची आदर्श सून मटेरिअल घेतली आहे. दुसरी मॉ सु व्हँप ना. चंदनाचा लेप!!!

खरे तर सगळ्यात संत म्हणजे कावेरी ची आई च आहे. ही सतत लहानपणी गेलेल्या आईच्या , घराच्या आठवणी काढते, पण "ही आई मला कधी सावत्रपणाने वागवत नाही" हे वक्य सोडून फारशी दखलही नाही तिची . अभिनय आवडतो मला तरीही राज कावेरी दोघांचाही. कथा बकवास अहे पण. यांच्या परंपरेत चहा बरा बसतो आणि . हळदीचे दूध किंवा काढे दिले पाहिजेत .

मला पण काऊ आणि तो चिमण म्हणजे राज यांची जोडी आवडते.
पण अगदीच टिपिकल मालिका आहे.
आता त्या काऊच्या मैत्रिणीला घेऊश ट्रँगल दाखवतील,मग ती आणि मॉ.सून हातमिळवणी करतील,म्हणजे दोन तीन वर्ष सहज.
सप्टेंबरमध्ये बिबॉस सुरू होईल,तोपर्यंत दळण दळतील,मग एकतर टाईम बदलतील किंवा संपवतील.
पण त्याआधीच टाईम बदलेल,कारण सूर नवाची अँड पाहिली.
यावेळी स्प्रुहाला बहुतेक नारळ देऊन उत्कर्ष शिंदेला अँकर म्हणून आणत आहेत अस ऐकिवात आहे.

काकू अगदीच आगाऊ आहेत. ज्याच्या हाताखाली काम करतात त्यालाच मुर्खात काढतात. काल त्याला न विचारता त्याच्या केबिनमध्ये रोपं लावली आणि ऑक्सिजन वगैरे शब्द वापरून अशक्य पकवलं. ती चोम्बडीपण आहे. दुसऱ्याचं फोनवरचं बोलणं ऐकून लगेच काय झालं करत मागे मागे जायचं आणि स्वतःचा डबा नि जोला देऊन आपण किती काळजीवाहू आणि मोठया मनाचे हे दाखवून द्यायचं. ती स्वीटू सारखी गळेपडू आणि निर्लज्ज वाटते.

हाहाहा चंपा. नेहेमी नाही बघत म्हणून वरचे माहिती नाही पण ते काकुची फॅमिली मैत्रिणीकडे सर्व राहायला येतात आणि ती आज्जी अति विचित्र वागते ते अतिरंजीत वाटलं. तिथे काकु गप्प, मैत्रिणीकडे नीट वागा सुनावत नाही. चोंबडेपणा राजच्या समोर फक्त.

मला तो बच्चूमामा आवडतो, आणि बच्चा डोक्यात जाते. शनिवारचा बघितला आत्ता, राज मस्त वाटेला लावतो बच्चाला ते आवडलं.

मी बघते ही सिरीयल. युट्युबवर छोटे एपिसोड असतात किंवा अपडेट्स असतात. सध्या तरी बरी वाटते आहे. पण स्त्री खलनायिकांचा ओव्हरडोस केलाय. म्हणजे निजोची जाऊ, सानिका, तिची आई, कावेरीची आजी, मैत्रीण वैदेही पण नंतर नेगेटिव्ह होणार बहुतेक.
काकू अगदीच आगाऊ आहेत. ज्याच्या हाताखाली काम करतात त्यालाच मुर्खात काढतात. काल त्याला न विचारता त्याच्या केबिनमध्ये रोपं लावली आणि ऑक्सिजन वगैरे शब्द वापरून अशक्य पकवलं. ती चोम्बडीपण आहे. >>>> अगदी अगदी. आता आता नोकरी लागलीये पण बिनधास्त आहे. कधीही घरी निघून जाते, कामात असताना घराचे फ़ोन सारखे.. मावशी मावशी म्हणून बरी सगळीकडे सूट मिळते.

मागे तिने रांगोळी व गुलाबपाण्याचा शिडकावा ही आपली संस्कृती म्हणून सुरु केलेले. पण ह्या गोष्टी लग्नाव्यतिरिक्त रोज कोण करतं का ? ऑफिस मध्ये रांगोळी सणावारीच असते ना ?कायच्या काय !

कलर्स मराठीच्या सिरियल्स भारतात वुट वर दिसतात. स्टार प्रवाहच्या hotstar disney etc .

भारताबाहेर माहिती नाही.

कावेरी आपले मोठाले डोळे भिरभिरवंत बोलते तेव्हा ती स्वप्नाळू वाटण्याऐवजी स्क्रू ढिला टाइप वाटते

मला तर ती बारीक झालेली स्वीटू वाटते. त्याच मार्गाने जातेय मालिका. महत्वाच्या मीटिंगला राजबरोबर तिला पाठवतात. तिथे ती परंपरा आणि संस्कार हे पाल्हाळ लावते. राजला कुठे तोंड लपवू असे होते. मी शेवटपर्यंत भाग बघितला नाही पण अर्थात तो इन्व्हेस्टर भलताच इंप्रेस होणार आणि तो भली मोठी रक्कम इन्व्हेस्ट करणार. मग सगळ्या मीटिंगला कावेरी असणे मस्ट होणार. जिथे कावेरी नसेल ती मिटिंग होणार नाही कारण इन्व्हेस्टर म्हणणार आम्हाला तीच पाहिजे, ती लकी आहे आमच्यासाठी. हे सगळे स्वीटूच्या मालिकेत होऊन गेलेय.

इन्व्हेस्टरचा उल्लेख ' इन्व्हेस्टर' असा का करतात ? नाव गाव नाही का त्याला ? आणि इन्व्हेस्टर फोन करुन सेक्रेटरीला सांगतात का की मला इन्व्हेस्ट करण्यात इंटरेस्ट आहे ते ?

नुकतेच सासू सासरे येऊन गेले. त्यामुळे हे तुकडे कानावर पडतात. परत येतील तेव्हाही हेच दळण सुरु असेल.

एक प्रोमो पाहिला ह्या सिरियलचा. काकू चक्क राजच्या बेडरुममध्ये घुसली आहे. त्याला झोपेतून उठवत आहे. हिच की हिची संस्कृती, परंपरा आणि संस्कार? कदाचित राजच हे पहाटेच स्वप्न असेल.

काकु सिगरेट सोडवणार राजची हे बरं वाटलं.

काकुचा एका बाजूचा चेहेरा म्हणजे गालाचा भाग सुजलेला वाटतो का कोणाला, की मलाच दिसतो. बॉडीशेमिंग नाही करायचं मला पण जाणवते तसं म्हणून विचारतेय . बारीक खळी पडते, ती बाजू नाही.

मला आवडते हि मालिका... कलर्स मराठी वर आता २ च बर्‍या वाटतात स्वामींची मालिका अन हि मालिका.
प्रोमो पाहताना अगदिच सुमार दोघेहि वाटत होते पण आता रोज पाहताना हे बरे वाटतात.. पण अति आगाऊपणे बोलते ती Happy

बच्चा आणि तिची सासू डोक्यात जातात. आई तिची चॅप्टर आहे पण ती डोळ्यात खुपत नाही, का कोणास ठाऊक, बच्चा बच्चा करते ते डोक्यात जातं. वैदेहीचा आवाज आवडतो मला.

फक्त कावेरी तिची मैत्रीण दोघी एकत्र वाढल्यात पण राहणीमानात प्रचंड फरक कसा म्हणजे काकु अति संस्कृती आणि मैत्रीण अति पार्टी नेचर, ड्रिंक्स, स्मोकिंग फारच.

रिलेशन आणि बिझनेसचा काय संबंध, घरातल्या नातेवाईकांना बिझनेसमध्ये घुसवायचा का प्रयत्न करते रत्नमाला. तिथे राज योग्य वाटतो.

Pages