येल्लागीरीच्या टेकडीवरचा नरभक्षक चित्ता - २

Submitted by स्पार्टाकस on 28 November, 2013 - 23:26

येल्लागीरीच्या टेकडीवरचा नरभक्षक चित्ता - १ - http://www.maayboli.com/node/46555

येल्लागीरीच्या टेकड्या चंद्रकोरीच्या आकाराच्या आहेत. दक्षिण रेल्वेच्या जालारपेट जंक्शनपासून दोन मैल अंतरावर समुद्रसपाटीपासून सुमारे तीन हजार फूटांवर या टेकड्या जमिनीतून झाड उगवावं तशा उभ्या आहेत. जालारपेट स्टेशनपासून एक पायवाट येल्लागीरीच्या माथ्यावर जाते. काही ठिकाणी घनदाट जंगल तर काही ठिकाणी सरळसोट कातळांवरुन चढत जाणारी ही वाट वाटसरुची कसोटी पाहणारी आहे. आणि जोडीला नरभक्षक झालेला चित्ता, मग तर काय विचारायलाच नको !

१९४१ सालच्या सुमाराला मी येल्लागीरीला जमिनीचा एक छोटासा तुकडा विकत घेतला होता. बंगलोरपासून जेमतेम ९५ मैलावर असल्याने शनिवार-रविवारी विश्रांतीसाठी म्हणून त्याचा वापर करावा असा माझा विचार होता. कामच्या व्यापातून मला इथे येण्यास फारसा वेळ मिळत नव्हता, त्यामुळे माझ्या या 'फार्म हाऊस' वर लॅंटनाचं साम्राज्य पसरलेलं होतं. त्याचा बंदोबस्त करणं अत्यावश्यक असल्याने तीन दिवसांची सुटी घेऊन मी येल्लागीरीला आलो होतो. काही दिवसांपूर्वीच बळी गेलेल्या त्या गुराख्याची हकीकत मला गवत कापणी करणा-या माझ्या मजुरांकडून कळली होती. त्यांच्या मते तो चित्ता अद्यापही त्या परिसरातच होता. आदल्या दिवशीच त्याचे ठसे त्यांच्या दृष्टीस पडले होते.

चित्त्याच्या शिकारीचा प्रयत्न करायचा मी निश्चय केला. माझ्याबरोबर मी माझी रायफल आणली नव्हती. माझ्या जवळ १२ बोअरची शॉटगन होती. अडीअड्चणीला असावीत म्हणून २ एल.जी. काडतूसं मी बरोबर घेतली होती. बाकीच्या हलक्या ताकदीच्या काडतूसांचा चित्त्यासाठी काही उपयोग नव्हता.

दुपारी बाराच्या सुमाराला गवत कापणीचं काम थांबवून मजुरांसह मी चित्त्याचे ठसे पाहण्यासाठी निघालो. गावातून बाहेर पडल्यावर लँटनाचा पट्टा शेतांना लागून गेला होता. लँटनाला लागूनच घनदाट जंगल पसरलेलं होतं. या शेतांपैकीच एका शेताच्या टोकाला असलेल्या पायवाटेवर एका मोठ्या चित्त्याचे ठसे स्पष्ट दिसत होते. तो एक मोठा नर होता. आदल्या रात्रीच तो तिथून गेला होता.

गावात परतून मी पाटलाची गाठ घेतली. चित्त्याची सविस्तर हकीकत त्याच्याकडून कळली. त्याच्या मदतीने चित्त्याल आमीष म्हणून मी एक लहानसा बोकड मिळवला. तो बोकड, पाटील आणि माचाण बांधण्यासाठी चार माणसं यांच्यासह त्या गुराख्याचा बळी गेला होता त्या जागी मी पोहोचलो. चारही बाजूला पसरलेल्या घनदाट काटेरी झुडूपांमुळे जमिनीवर लपून बसणं अशक्यं होतं त्यामुळे आम्ही परतून पायवाटेवर आलो. वाटेला लागूनच फणसाचं एक झाड होतं. या झाडावर चित्त्यासाठी टपून बसायचं मी ठरवलं.

माझ्याबरोबरच्या माणसांनी बाजूच्या जंगलातून झाडाच्या मजबूत फांद्या तोडून आणल्या आणि वेलींनी एकमेकींशी घट्ट बांधून चार फूट लांब आणि तीन फूट रुंद असा एक प्लॅट्फॉर्म दोन फांद्यांच्या बेचक्यात तयार केला. या प्लॅटफॉर्मच्या सर्व बाजूंनी छोट्या डहाळ्या आणि पानांनी तो आच्छादून टाकला गेला होता. कोणत्याही दिशेने चिता आला तरी त्याला माचाण आणि त्यावर बसलेला माणूस दिसणार नाही याची पक्की खात्री मी करून घेतली. झाडापासून सुमारे वीस फूट अंतरावर एक मजबूत खुंटी जमीनीत ठोकून त्याला बोकड्बुवांना बांधलं. मग माचाणावर चढून खुंटाला बांधलेला बोकड आणि त्याच्या आजूबा़जूचा परिसर स्पष्ट दिसेल इतपत त्या पाना-डहाळ्यांतून मी झरोका तयार केला. माझी सारी सिध्धता होईपर्यंत पाच वाजले होते.

आधीच सांगीतल्याप्रमाणे मी येल्लागीरीला मोठ्या शिकारीच्या तयारीने आलो नव्हतो. त्यामुळे रात्रीच्या वेळी मी नेहमी वापरत असलेली साधनं माझ्यापाशी नव्हती. माझा नेहमीचा मोठ टॉर्च आणि तो रायफलला लावयचा क्लॅम्प नव्हता. माझ्याजवळ टॉर्च होता तो मी नेहमी कँप मधे वापरत असलेला २ सेलचा छोटा टॉर्च. त्याचा काहीच उपयोग नव्हता. त्यातून कृष्ण्पक्षातली रात्र असल्याने चांगलीच अंधारी असणार होती. एकंदरीत माझा अनुभव आणि पंचेंद्रियांवर विसंबून राहण्यापलीकडे गत्यंतर नव्हतं.

हे सगळे विचार मनात घोळवतच मी माचाणात स्थानापन्न झालो आणि गावक-यांना परतण्याची सूचना दिली. माझ्या सूचनेप्रमाणे एकमेकांशी मोठ्याने बोलत गावकरी परतले. गावकर्‍यांना ही सूचना देण्यामागे माझे दोन हेतू होते. एकटेपणाच्या जाणीवेने बोकड मोठ्याने ओरडणार होता आणि चित्ता जवळपास असलाच आणि त्याने आम्हांला पाहीलं असलंच तरी गावकरी परत गेले या समजुतीने तो बोकडावर झडप घालण्यासाठी येण्याची शक्यता होती.

गावकरी गावात परतताच बोकड्बुवांनी मोठ्याने बें बें करुन ओरडायला सुरवात केली. ओरड्ण्याबरोबरच त्याचं दोराला हिसके देणंही सुरू होतं. बोकड्बुवांनी असा काही सूर लावल होता की चित्ता मैलभराच्या परिसरात कुठेही असता तरी त्याल तो आवाज गेला असता. एव्हाना सूर्यास्त होऊन गेला होता आणि अंधार पडायला सुरवात झाली होती, सततच्या ओरडण्यालाही कोणीच दाद देत नाही आणि आपल्याल सोडवायला येत नाही ही कल्पना आल्यावर बोकडबुवांनी जमिनीवर बैठक मारली आणि ते निद्राधीन झाले ! आता इतका गडद अंधार पडला होता की चित्ता आला असता तरी त्याचा पाय पडल्यावरच बोकड कुठे आहे हे त्याल समजलं असतं. तरीही चिकाटीने मी माचाणावर बसून होतो.

अखेरीस रात्री नऊच्या सुमाराला चित्त्याच्या शिकारीची मोहीम रात्रीपुरती आवरती घेण्याचं मी ठरवलं. झाडावरुन उतरुन बोकडबुवांना सोडवलं आणि गाव गाठलं. माचाण बांधणार्‍यांपैकी एका गावकर्‍याच्या ताब्यात बोकडाला देऊन मी बिछान्यावर पाठ टेकली.

पुढचे तीन दिवस असेच गेले. दिवसभर गवत कापणीवर देखरेख करावी आणि रात्री वेगवेगळ्या बोकडांना आमीष म्हणून बांधून अर्ध्या रात्रीपर्यंत माचाणावर बसून चित्त्याची वाट पाहवी. सकाळी गावाभोवतालच्या जंगलात त्याच्या ठशांचा माग घ्यावा. पण माझी ही सगळी मेहनत व्यर्थ गेली. चित्त्याची काही खबरबात मिळाली नाही आणि त्याचे ताजे मागही आढळले नाहीत.

चौथ्या दिवशी मी टेकडी उतरून बंगलोरल माझ्या घरी परतलो. निघण्यापूर्वी मी पाटलाकडे माझा पत्ता आणि चित्त्याने पुढचा बळी घेतल्यावर मला तार करण्यासाठी पैसे देऊन ठेवले होते. चित्त्याने बळी घेतल्यावर पाटलाने जालारपेट गाठून मला तार करायची होती.

मी बंगलोरला परतल्याला महिना उलटून गेला होता. पाटलाची तार आली नव्हती. चित्त्याने येल्लागीरीचा परिसर सोडून जावडी टेकड्यांच्या परिसरात स्थलांतर केलं असावं. जावडी टेकड्यांची रांग तिरुमलाईच्या पवित्र टेकडीपर्यंत पसरलेली आहे. कदाचीत चित्ता निर्ढावलेला नरभक्षक नसावा आणि अपवादात्मक परिस्थीतीत त्याने गुराख्याचा बळी घेतल असावा असा मी मनाशी अंदाज केला.

येल्लागीरीच्या नरभक्षकाने माझा अंदाज साफ धुळीला मिळवला !

सात आठवड्यांनी पाटलाची तार आली तेंव्हा मी या चित्त्याला जवळपास विसरुनच गेलो होतो. जालारपेट स्टेशनवरुन येल्लागीरी आणि परिसरातल्या वस्त्यांवर येणार्‍या पोस्टमनचा चित्त्याने बळी घेतला होता.

माझ्या हातात तार पडेपर्यंत दुपार उलटून गेली होती. खूप धावपळ करून सर्व तयारीनीशी बंगलोरहून ७ वाजता सुटणारी त्रिचनापल्ली एक्सप्रेस मी गाठली आणि रात्री १०.३० ला जालारपेटला उतरलो. माझ्याजवळ माझा पेट्रोमॅक्स कंदील होता त्यामुळे भर रात्री येल्लागीरीची वाट तुडवताना काळजी नव्हती. पेट्रोमॅक्सच्या प्रखर प्रकाशात हल्ला करण्याचं नरभक्षकाचं धाडस झालं नसतं. माझी .४०५ विंचेस्टर रायफल आणि सामनाने भरलेली हॅवरसॅक पाठीवर आणि हातात पेट्रोमॅक्स घेऊन खड्या चढणीच्या वाटेने रात्री दोनच्या सुमाराला मी टेकडीच्या माथ्यावर पोहोचलो तेव्हा चांगलाच घामाघूम झालो होतो. गावापासून मैलभर अंतरावर असताना थंडगार वार्‍याची सुखावणारी झुळूक आली आणि जरा बरं वाटलं.

पाटलाच्या घरी जाऊन मी त्याला उठवलं. तशा अपरात्रीही सगळं गाव माझ्याभोवती जमा झालं. पाटलाची जेवणाची सूचना नाकारुन गरमा-गरम चहा रिचवताना मी पाटलाला चित्त्याची हकिकत विचारली.

माझ्या गेल्यावेळच्या भेटीनंतर गावकर्‍यांनी सावधगीरी बाळगण्यास सुरवात केली होती. दिवसा कोठेही जायचं झालं तरीही तीन-चारच्या गटाने काठ्या-कुर्‍हाडीसारखी शस्त्र असल्याशिवाय कोणीही बाहेर पडत नव्हतं. रात्री कोणीही बाहेर पडण्याच प्रयत्नही केला नव्हता. सुमारे दोन महिने चित्त्याची कोणतीही बातमी न आल्याने सर्वजण तसे निर्धास्त झाले होते.

येल्लागीरीच्या टेकडीवर येणारा पोस्ट्मन जालरपेट स्टेशनच्या शेजारीच असलेल्या पोस्टातून सकाळी सहाच्या सुमाराल निघत असे. रात्रभरात बंगलोर, मद्रास आणि कालिकतहून येणार्‍या गाड्यांमधून येल्लागीरीला येणारं टपाल जालारपेटला येत असे. जालारपेटला ते टपाल उतरून घेतल्यावर पोस्टमन टेकडी चढून येल्लागीरीला येत असे. त्याच्याजवळ असलेलं एकुलतं एक शस्त्रं म्हणजे एक छोटासा भाला ! या भाल्याच्या फाळाच्या तळाशी लोखंडी रिंगा बसवलेल्या असत. दर दहा-पंधरा पावलानंतर तो भाला जमिनीवर आपटत असे. लोखंडी रिंगा फाळावर आपटून होणार्‍या आवाजाने वाटेतले कृमी-किटक आणि जाणवणार्‍या आघातांमुळे साप दूर पळून जात. भाल्याच्या फाळाला लावलेल्या रिंगांचा तो आवाज गेली जवळपास शंभर वर्षे भारताच्या गावा-गावांतून पोस्टमनचं आगमन सूचित करत आहे.

ज्या दिवशी तो दुर्दैवी पोस्टमन बळी गेला होता त्या दिवशीही तो नेहमीप्रमाणे सकाळी जालारपेटहून निघाला होता. पण तो टेकडीच्या माथ्यावर पोहोचलाच नाही.

दुपारच्या जेवणानंतर काही माणसे टेकडी उतरून जालारपेटला जाण्यास निघाली. गावापासून सुमारे एक चतुर्थांश अंतर चालून गेल्यावर एका खडकावर उडालेले वाळलेल्या रक्ताचे डाग त्यांच्या नजरेस पडले. नक़्की काय झालं असावं याची आपापसांत चर्चा करत असतानाच एकाची नजर बाजूच्या झुडूपाजवळ पडलेल्या पोस्टमनच्या भाल्यावर गेली. काय प्रकार झाला असावा याची कल्पना येताच सर्वांनी धावतपळत गाव गाठलं. गावातून आणखी माणसांची कुमक घेऊन पाटलासह सर्वजण त्या जागी परतले. थोडा शोध घेतल्यावर एका झुडूपामागे अर्धवट खाऊन टाकलेलं पोस्टमनचं शव दिसलं. पाटलाने जालारपेटला जाणार्‍या लोकांकडे मला तार करण्यासाठीचा मज़कूर लिहून दिला. पण बंगलोरहून जालारपेट फक्तं ८९ मैल असूनही मला तार तब्बल २४ तास उशिराने मिळाली होती. दरम्यान पोलीसांनी पंचनामा आटोपून पोस्टमनचा मृतदेह ताब्यात घेतल होता.

पाटलाकडून एक बाज घेऊन मी गावाबाहेर आलो आणि बाजेवर आडवा झालो तेंव्हा पहाटेचे चार वाजले होते. दोन तासांनी मला जाग आली ती गावातल्या कुत्र्यांच्या भुंकण्याने. येल्लागीरीच्या आजू-बाजूच्या जंगलात आदीवासींची वस्ती नसल्याने गावकर्‍यांना चित्त्याबद्द्ल असलेली माहीती आणि माझा अनुभव यावर अवलंबून राहण्यापलीकडे गत्यंतर नव्हतं.

चित्त्याची गुहा किंवा दुसरं नेहमीचं विश्रांतीचं ठिकाण कुठे असावं याची गावकर्‍यांना कल्पना नव्हती, पण अधिक चौकशी करता त्यांच्यापैकी दोन गुराख्यांनी चित्त्याला 'पेरियामलई' किंवा 'मोठी टेकडी' च्या जवळपास उन खात बसलेला असताना ३-४ वेळा पाहिलं होतं. येल्लागीरीच्या माथ्यावरच्या मोठ्या पठारावर पेरियामलई ही एकमेव टेकडी समुद्र्सपाटीपासून ४५०० फूट उंचीवर सरळसोट उभी ठाकलेली आहे. मी त्या दोन गुराख्यांना चित्ता दिसलेल्या जागेपर्यंत मला नेण्याची विनंती केली पण भीतीपोटी त्यांनी ठाम नकार दिला. पाटलाच्या दरडावणीपूढे मात्र त्यांचा नाईलाज झाला आणि त्यांच्यासह मी चित्त्याच्या मागावर निघालो.

पेरियामलईची टेकडी गावाच्या पूर्वेला - जालरपेटहून येणार्‍या रस्त्याच्या बरोबर विरुध्द दिशेला तीन मैलांवर आहे. चित्त्याचा शेवटचा बळी - पोस्टमन - गेला ती जागा आणि गुराख्यांनी चित्ता पाहिला ती जागा यात ५ मैलाचं अंतर होतं. या ५ मैलांच्या पट्ट्यात संपूर्ण शेती होती. पेरियामलईचं जंगल विरुध्द बाजूला येल्लागीरीच्या पायथ्यापर्यंत पसरलेलं होतं. या सर्व परिस्थितीचा विचार करता गुराख्यांनी पाहिलेला चित्ता पोस्टमनचा बळी घेणारा नरभक्षक नसावा असा विचार माझ्या मनात आला.

पेरियामलईच्या पायथ्याच्या एका मोठ्या खडकाकडे निर्देश करत त्या गुराख्यांनी चित्ता दिसलेली जागा मला दाखवली. पेरियामलईच्या पायथ्यापासून त्या ठिकाणापर्यंत लँटनाचं रान माजलं होतं. टेकडीच्या पायथ्यापासून वर भरगच्च झाडी होती. येल्लागीरीप्रमाणेच पेरियामलईवरही जागोजागी भलेमोठे खडक पसरलेले होते. त्या खडकांमध्ये आणि घनदाट झाडीत चित्त्याचा शोध घेणं अशक्यप्रायच होतं. टेकडीच्या पायथ्याशी आमीष बांधण्यासाठी सोईस्कर जागा आणि माचाण बांधण्यासाठी योग्य झाड पाहून आम्ही गावात परतलो.

पाटलाकडे परतून त्याला मी माझी योजना सांगीतली, त्याने आमीष म्हणून एक गाढव मला मिळवून दिलं. त्या रात्री मी माचाणावर बसणार नसल्याने बोकडाचा उपयोग नव्हता. एक वेळच्या भोजनात बोकडाचा फडशा पाडल्यावर चित्त्याला परत येण्याचं काही कारणंच उरलं नसतं. अर्थात बोकडाने ओरडून चित्त्याला आकर्षून आणलं असतं तसं गाढवाने केलं नसतं, परंतु टेकडीवरुन पायथ्याशी बांधलेली गाढवाची आयती मेजवानी चित्त्याच्या सहज नजरेला पडेल अशी मी आशा केली. माझ्याबरोबर आलेल्या दोन गुराख्यांच्या ताब्यात गाढवाला देऊन मी योजलेल्या ठिकाणी गाढवाला बांधण्याची त्यांना सूचना दिली.

पाटील आणि चार-पाच गावकर्‍यांसह मी पोस्टमन बळी गेला त्या ठिकाणी आलो. गावापासून सुमारे दीड मैल अंतरावर लँटना आणि खडकांच्या मधून जालारपेटहून येणार्‍या वाटेच्या बाजूलाच ही जागा होती. आदल्या रात्रीच मी तिथून गेलो होतो पण पेट्रोमॅक्सच्या प्रकाशात खडकांवर उडालेले रक्ताचे डाग माझ्या नजरेतून सुटले होते. गावकर्‍यांनी मला चित्त्याने पोस्ट्मनचा फडशा पाडला होता ती जागा दाखवली. तिथून गावाच्या दिशेला सुमारे ३०० यार्डांवर मी दुसरं गाढव बांधायचं ठरवलं. गावात परतून गावापासून जवळच जिथे जंगल सुरु होत होतं तिथे तिसरं गाढव बांधायचा मी बेत केला. माझ्या सूचनेनुसार पाटलाने गाढवं बांधण्याची व्यवस्था केली, एव्हाना दुपारचा एका वाजला होता. आता माझ्या हाती वाट पाहण्यापलीकडे काहीच नव्हतं. त्या रात्री चित्ता तीनपैकी एकातरी गाढवाचा बळी घेईल अशी मी आशा केली.

पाटलाने माझ्या दुपारच्या जेवणाची व्यवस्था केली होती. परातभर भाताचा डोंगर आणि त्यावर वांगी घातलेली कांद्याची झणझणीत आमटी! आमटीमध्ये मुक्तहस्ताने मिरच्या घातलेल्या होत्या ! माझ्या डोळ्यातून पाण्याची धार लागलेली पाहून पाटलाला फार वाईट वाटलं. तो पुन्हा-पुन्हा दिलगीरी व्यक्त करु लागला. अर्थात मला तिखट जेवण मुळात आवडत असल्याने मी त्याला काळजी न करण्याचं सांगून आश्वस्त केलं. जेवणानंतर भरपूर कॉफी झाली आणि मी उठलो तेव्हा माझं पोट तुडुंब भरलेलं होतं !

वेळ घालवण्यासाठी मी माझ्या फार्म हाऊस वर गेलो आणि संपूर्ण संध्याकाळ कुंभाराच्या चाकावर घालवली, हे माझं फार्म हाऊस सुमारे दीड एकर लांबीच्या तुकडयावर पसरलेलं आहे. फणस, पेरू, पीच आणि वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाल इथे लावलेला आहे. काही पक्षी आणि बदकंही मी इथे पाळलेली आहेत. या फार्म हाऊस वर दोन कोठ्या आहेत. कुडाच्या आणि चिखलाचं लिंपण केलेल्या भिंती आणि गवताची शाकारणी असलेलं छप्पर ! एक छोट्याशा विहिरीतून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. पाणी स्वच्छ ठेवण्यासाठी मी बंगलोरहून मासे आणून विहीरीत सोडले होते. समोरुनच वाहणारा एक लहानसा झराही आहे. एका कोठीसमोर खास गुलाबाची बाग आहे. झर्‍याच्या जवळच्या जमिनीच्या तुकड्यावर मी खास ब्रम्हदेशातूना आयात केलेला काळा तांदूळ लावला आहे. माझ्या माहीतीप्रमाणे हा काळा तांदूळ दक्षिण भारतात फार थोड्या ठिकाणी चांगला वाढलेला आहे.

या फार्म हाऊसबद्द्ल एक मनोरंजक गोष्ट म्हणजे यातली एक कोठी झपाटलेली असल्याची वदंता होती. १९४१ साली सुमारे ५००/- रुपयांना ज्या बाईकडून ही जागा मी घेतली तिच्या भावाचं - जागेच्या मूळ मालकाचं भूत इथे दिसतं असा प्रवाद होता. त्याने ही जागा २५ वर्षे जोपासूना वाढवली होती. त्याच्या मृत्यूनंतर गावकर्‍यांनी त्याचं भूत अनेकदा कोठीसमोर पाहीलं होतं म्हणे ! मी ती जागा रोख पैसे देऊन माझ्या नावावर रजिस्टर करून घेईपर्यंत तिने मला यातलं काहीही सांगीतलं नव्हतं. मी खरेदीचा बेत रद्द करेन अशी तिला धास्ती वाटली असावी. तिने स्वतः ही अनेकदा तिच्या भावाला पाहिलं होतं ! चांदण्या रात्री त्याच्या आवडत्या गुलाबाच्या झुडुपांजवळ तो हमखास उभा असे! अर्थात ते भूत निरुपद्रवी आहे हे सांगायला ती विसरली नाही. या खरेदीबरोबरच मला थोडंफार जुनंपुराणं फर्नीचरही मिळालं होतं. दोन्ही कोठ्यांत पलंग, एक फुटकं ड्रेसींग टेबल आणि एक आरामखुर्ची याचा त्यात समावेश होता.

त्या कोठ्यांमध्ये घालवलेली पहिली रात्र मी जन्मात विसरणं शक्यं नाही. ज्या कोठीत त्या जागेच्या मूळ मालकाचा मृत्यू झाला होता त्या कोठीतच मी झोपलो होतो. पलंगावरच्या टोचणार्‍या बाजेमुळे माझा बिछाना मी जमिनीवर अंथरला आणि मेणबत्ती विझवून पाठ टेकताच मला गाढ झोप लागली.

मला किती वेळाने जाग आली कोणास ठाऊक. चोहीकडे मिट्ट काळोख पसरलेला होता. रातकिड्यांची किरकिरही ऐकायला येत नव्हती.

आणि त्याच वेळी माझ्या गळ्यावर मला कसला तरी थंडगार स्पर्शाची जाणीव झाली ! हाताची दोन बोटं असावीत असा तो स्पर्श माझ्या गळ्याच्या दोन्ही बाजूला मला जाणवला !

आता मी काही फार कल्पनाशक्ती असलेला माणूस नाही. अंधाराची मला भीती वाटत नाही आणि मी अंधश्रद्धाळूही नाही, पण त्या क्षणी माझ्या मनात झर्रकन विचार आला तो त्या मूळ मालकाचा आणि त्याच्या भूताचा ! माझा टॉर्च काही फूटांवरच्या खिडकीत होता. मी काड्याची पेटी कुठे ठेवली ते आठवण्याचा प्रयत्न करत होतो आणि नेमक्या त्याच क्षणी माझ्या गळ्याभोवती त्या बोटांचा दाब वाढल्याचं मला जाणवलं ! माझ्या मानेवरचे केस ताठ उभे राहिले. तो जो काही प्रकार होता त्याला निमूटपणे बळी जायची माझी तयारी नव्हती. सगळी ताकद एकवटून मी उठलो आणि खिडकीच्या दिशेने मुसंडी मारली. अंधारात न दिसलेल्या खुर्चीला मी धडकलो आणि भूतालाच धडक मारली या कल्पनेने माझी पाचावर धारण बसली. टॉर्च शोधण्यासाठी मी अंधारात चाचपडत असतानाच माझ्या हाताला टॉर्चचा थंडगार स्पर्श जाणवला ! टॉर्च हातात येताच मी मनोमन भूताच दर्शन घेण्याच्या तयारीने टॉर्चचं बटण दाबलं आणि पाहतो तो काय... जवळपास एक फूट्भर लांबीचा भलामोठा टोड माझ्या बिछान्यावर बसून माझ्याकडे पाहत होता ! पावसामुळे तो माझ्या कोठीत आला असावा. स्वतःशीच मनसोक्त हसत मी त्याला कोठीच्या बाहेर घालवलं आणि सगळ्या वातावरणाशी - भुतासकट - सूर जुळल्यागत मी शांत झोपी गेलो !

(मूळ कथा : केनेथ अँडरसन )

क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users