माणसे पेरणारा माणूस.

Submitted by जीएस on 29 August, 2013 - 00:01

एक फेब्रुवारी १९४८ च्या उत्तररात्री नागपूर येथे सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर उर्फ श्रीगुरुजी यांना गांधीहत्येच्या कटाबद्दल कलम ३०२ खाली अटक झाली. लगेच चार फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्यात आली आणि कारागृहात गुरुजींना या बंदीबद्दल माहिती मिळताच त्यांनी संघ विसर्जित केल्याची घोषणा केली. एक स्वप्न भंगले होते. १९२५ साली संघस्थापना करतांना डॉ. हेडगेवारांनी एका फार वेगळ्या कार्याचे स्वप्न पाहिले होते आणि आयुष्यातला प्रत्येक क्षण त्यासाठी झिजून मोठ्या विश्वासाने त्याची धुरा गुरुजींवर सोपवून त्यांनी १९४० साली जगाचा निरोप घेतला होता. आणि आता, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अवघ्या सहा महिन्यात ते स्वप्न संपले होते. सर्वांना निदान तेंव्हा तरी असेच वाटले होते.

गुरुजींनी असे कुठल्या कामाचे शिवधनुष्य उचलले होते ? संघाचे नक्की काय काम आहे ? गेली साठ वर्ष, आणि आजही संघ म्हटला की हिंदूराष्ट्र या शब्दावर आणि त्याबदलच्या समज, गैरसमजांबद्दल एक न संपणारी चर्चा सुरू होते. गुरुजींबद्दलही एक तर संघमाध्यमातून प्रकाशित झालेली श्रद्धेने ओथंबलेली चरित्रे किंवा विरोधकांकडून झालेला असत्याधारित विद्वेषपूर्ण प्रचार अशी दोन टोके दिसतात. पण एक संघटना म्हणून या माणसाने काय आणि केवढे काम उभे केले? त्या कामाचा आपल्या देशावर, समाजावर काही प्रभाव पडला आहे का? याचे विश्लेषण अभावानेच आढळते. मनुष्यबळविकास, व्यवस्थापनशास्त्र आणि संघटनाशास्त्र या दृष्टिकोनातून गुरुजींच्या कामाकडे बघण्याचा हा प्रयत्न आहे.

स्वातंत्र्यचळवळ सुरू असतांनाच केवळ स्वातंत्र्याने प्रश्न सुटतील की समाजसुधारणेने ? यावर चिंतन आणि काम आगरकर, म. फुले, डॉ. आंबेडकर यांसारखे समाजसुधारक करत होते. डॉक्टर हेडगेवारांचे विश्लेषणही फार वेगळे नव्हते."आपल्या सर्व समस्या या केवळ पारतंत्र्यामुळे उद्भवल्या नसून पारतंत्र्यासकट सर्व समस्या आपण आपल्या स्वतःच्या अवगुणांमुळे ओढवून घेतल्या आहेत. वैयक्तिक आणि राष्ट्रीय चारित्र्याच्या अभावामुळेच आपण गुलाम झालो, आणि जर हा मूलभूत दोष दूर केला नाही तर उद्या इंग्रज गेले तरी ते स्वातंत्र्य अल्पकाल टिकेल आणि देशात बेशिस्त, स्वार्थ आणि कलह यांचे अराजक माजेल." हा संघस्थापनेमागचा एक मूलभूत सिद्धांत होता.

पण ही समाजसुधारणा घडवायची कशी? वैयक्तिक आणि राष्ट्रीय चारित्र्य निर्माण करायचे कसे? एक कुठला तरी विशिष्ट विषय, समस्या किंवा स्वातंत्र्यप्राप्तीसारखे ध्येय डोळ्यासमोर ठेवून त्याबद्दल प्रबोधन करणार्‍या संस्था असतात, चळवळी, आंदोलने असतात, राजकीय पक्ष असतात. पण देशभक्त, प्रामाणिक, शिस्तबद्ध, नि:स्वार्थी, संघभावनेने काम करणारी माणसे घडवणारी 'संस्था' उभी करायची म्हणजे काय करायचे? डॉक्टरांनी ठरवले, आबालवृद्धांना रोज एक तास एकत्र करून असे संस्कार करणारी मैदानावरची शाळा म्हणजे संघशाखा. शाखेतून चांगला माणूस घडेल. माणूस घडला तर तो आपोआपच कुठलेही प्रश्न सोडवेल. मंत्र सोपा होता, पण एका गावात दहा बारा बाल आणि तरूणांना गोळा करून पहिली शाखा भरवतांना देशातल्या साडेसहा लाख गावांमध्ये अशा शाखा चाळीस कोटी माणसे घडवतील, आणि ती माणसे देश घडवतील असा विचार करणे हे एक वेडे स्वप्नच होते. पण तेवढा एकच ध्यास घेऊन डॉक्टर अहर्निश काम करत राहिले. १९४० साली हे वेडे स्वप्न आणि सहाशे शाखांच्या रूपाने या स्वप्नाचे एक छोटे प्रारूप गुरुजींच्या हाती सोपवून डॉक्टरांनी जगाचा निरोप घेतला.

बर्‍याच सामाजिक, राजकीय वा व्यावसायिक संस्थांचा वा चळवळींचा संस्थापकांनंतर संख्यात्मक व गुणात्मक र्‍हास झालेला दिसून येतो. संघ मात्र गुरुजींच्या नेतृत्वाखाली वाढत राहिला. फाळणीच्या भीषण हत्याकांडाच्या वेळी पंजाब व सिंध प्रांतातली संघाची जी ताकद होती ती सर्व लाखो हिंदू आणि शिखांच्या रक्षणासाठी पणाला लावली गेली. त्यासाठी शेकडो स्वयंसेवकांनी प्राणाची आहुती दिली. संघाच्या वाढत्या ताकदीचा अंदाज प्रथमच सरकारला आला आणि अशातच गुरुजींवर गांधीहत्येचा आरोप ठेवून संघावर बंदी आणल्याने आता संघ संपला, गुरुजींच्या कार्याची इतिश्री झाली असे बहुतेकांना वाटले तर त्यात नवल नव्हते.

पण तसे व्हायचे नव्हते. अटकेनंतर सहाच दिवसात सरकारने गुरूजींवरील गांधीहत्येशी संबंधित सर्व आरोप मागे घेतले मात्र सुरक्षा कायद्याखाली त्यांना स्थानबद्ध केले. संघावर कुठलेही आरोप नसतांना बंदी उठवण्याबाबत नेहरू व सरदार पटेलांशी सतत सहा महिने पत्रव्यवहार करूनही सरकारकडून काहीच हालचाल होत नसल्याचे लक्षात येताच गुरूजींनी सत्याग्रहाची हाक दिली आणि हजारो संघ स्वयंसेवकांनी देशभर सत्याग्रह सुरू केला. सत्तर हजारांना अटक झाली. बंदी उठवण्याबाबत अनेक विचारवंत, पत्रकार, राजकीय नेते यांच्याकडून सरकारकडे विचारणा सुरू झाली. सरकारने संघाची लिखित घटना नाही वगैरे कारणे पुढे उभी केली; तीही दूर करण्यात आली. अखेर जनमताच्या रेट्यापुढे सरकारला झुकावे लागले आणि १२ जुलै १९४९ ला सरकारने संघावरील बंदी विनाशर्त मागे घेतली व गुरुजींची सुटका करण्यात आली.

सुटकेनंतर संघकामाला संजीवनी देण्यासाठी गुरुजींनी ताबडतोब देशभर प्रवास आरंभला आणि त्यांना अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. दिल्लीला त्यांच्या स्वागतासाठी लोटलेला अलोट जनसागर आणि १३ ऑगस्ट १९४९ ची पाच लाखाची सभा पाहून अवाक झालेल्या बीबीसी ने म्हटले "गोळवलकर हे भारताच्या क्षितिजावर उगवलेला दैदिप्यमान तारा आहेत.एवढा जनसमाज आकृष्ट करू शकणारी भारतात पं. नेहरू हीच एक व्यक्ती आहे."

मात्र आपल्याच सरकारकडून विनाकारण घडलेला दीड वर्षाचा तुरुंगवास, हजारो कार्यकर्त्यांचा छळ आणि मग लोकक्षोभामुळे सुटका व प्रचंड जनसमर्थन या पार्श्वभूमीवर सरकारबद्दल अतिशय कटुता किंवा विजयाचा उन्माद यापैकी कशाचे पुसटसे दर्शनही गुरूजींच्या आचार विचारात झाले नाही. दिल्लीच्या सभेत कोणीतरी त्यांच्या व संघाच्या जयजयकाराची घोषणा करताच त्यांनी भाषणातच स्पष्ट केले की त्यांचा, इतर कोण्या व्यक्तीचा वा संघाचाही जयजयकार होऊ नये. फक्त भारतमाता की जय हीच आपली भावना आणि घोषणा असली पाहिजे. आजही सर्वदूर कुठल्याही संघकार्यात संघनेत्यांचा वा संघाचा जयजयकार होत नाही, भारतमातेचाच होतो. त्याच भाषणात गुरुजींनी आपण आपल्या दाताखाली जीभ आली तर दातावर राग धरत नाही, देश आपला आहे, सरकार आपले आहे, क्षमा करा आणि कामाला लागा एवढ्या साध्या शब्दात संघावरच्या बंदीचा, अन्यायाचा विषय बंद केला.

पुढची चोवीस वर्षे प्रत्येक क्षण गुरूजींनी माणसे घडवण्याच्या कामाला वाहून घेतले. अविरत प्रवास करत उभा भारत पुन्हा पुन्हा पिंजून काढला. कामाचा आवाका प्रचंड होता, समर्पित कार्यकर्ते हवे होते. फावल्या वेळेत करण्याचे हे काम नव्हते. संघातील प्रचारक ही संकल्पना गुरुजींची. संघस्वयंसेवकांनी आयुष्याची काही वर्षे वा सगळे आयुष्य केवळ देशासाठी वाहून घ्यायचे. ज्या भागात पाठवले जाईल तेथील समाजाच्या आश्रयाने रहायचे, आणि तेथील संघकार्य चालवू व वाढवू शकतील असे स्वयंसेवक तेथेच घडवायचे. सगळ्या देशातून प्रतिसाद मिळाला. गुरुजींनी घडवलेले हे दहा हजार प्रचारक व त्या प्रचारकांनी घडवलेले आपल्या आयुष्यातले काही तास रोज संघकामासाठी देणारे लाखो कार्यकर्ते ही कोणी असामान्य माणसे नव्हती. आशा, आकांक्षा, राग, लोभ असे सगळे असलेली आपल्यासारखीच हाडामासाची माणसे पण देशासाठी निरपेक्षपणे काम करण्याचा हा त्याग करायला त्यांना कुठून प्रेरणा मिळाली ? प्रशासनात, कॉर्पोरेट जगात गलेलट्ठ पगार, सर्व सुखसोयी देऊनही अधिकार्‍यांना काम करण्यासाठी 'मोटिव्हेट' कसे करावे यासाठी आम्ही मॅस्लॉव्ह, ड्रकर, फ्रॉईड यांचे सिद्धांत वापरून पहातो, कधी ह्यूमन रिसोर्स तर आता ह्यूमन कॅपिटल वगैरे कसे 'डेव्हलप' करता येईल याचे प्रयोग करत रहातो. पण अशी प्रामाणिक, शिस्तबद्ध, देशसेवेला आयुष्य वाहून घेणारी माणसे शाखेत कशी घडतात? त्यांचे मोटिव्हेशन काय? असा प्रश्न भल्याभल्यांना पडतो. वॉल्टर अँडरसन या अमेरिकन अभ्यासकाने संघशाखेवर संशोधन करून स्वतःच्या आदर्शातून आणि एकत्र येण्यातून संस्कार करण्याच्या या शाखातंत्राची 'अद्वितीय' अशी वाखाणणी केली आहे.

गुरुजींनी त्यांना सोपवलेले माणसे घडवण्याचे काम तर भारतभर विस्तारले. गुरुजींच्या कार्यकाळात संघशाखांची संख्या सुमारे सात हजारावर पोहोचली पण आता त्याहून मोठी कसोटी म्हणजे ही घडलेली माणसे समाजात काय सकारात्मक बदल घडवतात ही होती. देशउभारणीसाठी प्रत्येकच क्षेत्रात चांगल्या माणसांची तातडीची गरज होती. गुरुजींनी पैलू पाडलेली माणसे एकेका क्षेत्रात पाठवायला, पेरायला सुरुवात केली. त्या माणसांनी स्वतःला आयुष्यभर गाडून घेतले आणि एक एक संस्था जोमाने उभी राहिली. अशा सर्व संस्था, संघटना, माणसे यांची नुसती यादी द्यायची झाली तरी तो एका ग्रंथाचा विषय होईल. लेखाची मर्यादा लक्षात घेता आपण दोन तीन उदाहरणे पाहू.

काश्मीरप्रश्नी नेहरूंशी मतभेद झाल्याने डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी मंत्रिमंडळातून बाहेर पडले. राष्ट्रीय विचारांचा एक पक्ष संघाच्या मदतीने स्थापन करावा असे त्यांच्या मनात होते. गुरुजींनी संघ राजकारणात पडणार नाही, पण देशव्यापक पक्षउभारणीसारखे प्रचंड काम हाती घेण्यासाठी काही स्वयंसेवक राजकीय क्षेत्रात काम करण्यासाठी पाठवेल असे ठरवले. पं. दीनदयाळ उपाध्याय, नानाजी देशमुख आणि अटलबिहारी वाजपेयी अशा काही संघप्रचारकांना दैनंदिन संघकार्यातून मुक्त करून शून्यातून सुरूवात करून पक्षबांधणीसाठी पाठवण्यात आले आणि २१ ऑक्टोबर १९५१ ला भारतीय जनसंघाची स्थापना झाली. पुढे पंचेचाळीस वर्षे संघात घडलेले शेकडो स्वयंसेवक तळागाळात जाऊन संघटना बांधत राहिले. १६ मे १९९६ रोजी अटबिहारी वाजपेयी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. हा पक्षाच्या दृष्टीने कळसाध्याय म्हटला तरी या अनेक नेत्यांनी राजकारणात राहूनही ज्याप्रकारे तत्वनिष्ठ नि:स्वार्थी कार्याचा आदर्श उभा केला तो संघाच्या राजकारणात कार्यकर्ते पाठवण्याच्या प्रयोगाचा खरा कळसाध्याय होता.

संघ भाजपचे नियंत्रण करतो का? भाजपकडे सत्ता, संघाकडे काही नाही तरी कसे काय करतो? असा प्रश्न आजही अनेकांना असतो. जनसंघ आणि अशा अनेक देशव्यापी संघटनांना जन्म देतांना या सर्वांचे संघातून नियंत्रण करणारी एक यंत्रणा निर्माण करावीशी वाटणे स्वाभाविक होते. पण गुरुजींनी असे केले नाही. आपले काम हे माणसे घडवण्याचे काम आहे. ही माणसे विवेकबुद्धीने योग्य ते काम करतील. आपणच घडवलेल्या माणसांवर आपला विश्वास नसेल, आणि नियंत्रण ठेवावेसे वाटत असेल तर आपला आपल्या कामावरच विश्वास नाही असे होईल एवढे सोपे त्यांचे तत्वज्ञान होते, आणि एवढा त्यांचा माणूस घडवण्याच्या कामावर विश्वास होता.

१९७९ साली जनता सरकारच्या प्रयोगात कुरबुरी सुरू झाल्यावर परराष्ट्रमंत्री अटलबिहारी वाजपेयी आणि माहिती व प्रसारण मंत्री लालकृष्ण अडवाणी यांच्यासमोर मंत्रिपद आणि संघविचारांशी बांधिलकी यापैकी एकाची निवड करण्याचा पर्याय इतर सहभागी पक्षांनी ठेवला. क्षणाचाही विलंब न करता या दोघांनी व इतर जनसंघ सदस्यांनी मंत्रिपदाचा व पक्षसदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि गुरुजींचा विश्वास किती सार्थ होता हे दाखवून दिले.

१९५२ साली वनवासी क्षेत्रात काम करण्यासाठी वनवासी कल्याणाश्रमाची स्थापना झाली. गुरुजींच्या प्रेरणेने बाळासाहेब देशपांडेंनी आपले सारे आयुष्य त्यासाठी झोकून दिले. कामाला अखिल भारतीय स्वरूप येण्यासाठी अनेक प्रचारक व कार्यकर्ते झटत राहिले. शिक्षण, स्वयंरोजगार, आरोग्य आणि वनवासींच्या नैसर्गिक गुणवत्तेला वाव देण्यासाठी खेलकूद सारखे हजारो प्रकल्प साडेतीनशे जिल्ह्यांमध्ये आज राबवले जात आहेत. मोफत शिक्षण देणार्‍या एक शिक्षकी शाळाच पन्नास हजार आहेत. लिंबाराम चे यश तर आहेच पण वनवासी कल्याणाश्रमात घडलेलाच एक वनवासी तरूण मोठा होऊन आज वनवासी कल्याणाश्रमाचा देशव्यापी पसारा शेकडो वनवासी कार्यकर्त्यांच्या मदतीने सांभाळतो आहे ही त्या माणूस घडवण्याच्या कामाची पावती आहे.

१९५४ साली गुरुजींनी दत्तोपंत ठेंगडींसारख्या द्रष्ट्या प्रचारकाकडे कामगार क्षेत्राचे संघटन करण्याची करण्याची जबाबदारी दिली. 'जगातील कामगारांनो एक व्हा' चा वर्गकलहाचा सिद्धांत नाकारत 'कामगारांनो जगाला एक करा' या भारतीय सिद्धांतावर भारतीय मजदूर संघाची स्थापना झाली. १९९६ साली भारतीय मजदूर संघ ही भारतातली सर्वात मोठी कामगार संघटना झाली. पण खरा गौरवाचा क्षण त्याआधीच आला होता. १९६२ साली चीनने भारतावर आक्रमण करताच, आपल्याला मुक्त करायला चीन येत आहे अशी भूमिका घेउन भारतीय कम्युनिस्ट पक्षाने आणि त्यांच्या कामगार संघटनांनी संरक्षण साहित्याचे उत्पादन करणार्‍या कारखान्यात व वाहतुकीत संप घडवून आणले. अशा वेळेला भारतीय मजदूर संघ ठामपणे 'देश के हित मे करेंगे काम, काम का लेंगे पूरा दाम' अशी घोषणा देत उभा राहिला, आणि उत्पादन तसेच वाहतुकीतले अडथळे दूर केले. पुन्हा एकदा देशभक्तीच्या संस्कारांचे महत्व अधोरेखित झाले.

वेगवेगळे पंथ, संप्रदाय, जाती यात विभागलेल्या हिंदू समाजाला एका व्यासपीठावर आणून हिंदू समाजाच्या हितरक्षणाचे काम करण्यासाठी गुरुजींच्या उपस्थितीत २९ ऑगस्ट १९६४ साली विश्व हिंदू परिषदेची स्थापना केली गेली. दादासाहेब आपटे या संघप्रचारकांना ही जबाबदारी देण्यात आली. संघात तर जातीपाती कधीच पाळल्या जात नसत. प्रत्यक्ष गांधी़जी व डॉ. आंबेडकरांनीही संघशिबिरांना भेट दिली तेंव्हा या गोष्टीचे कौतुक केले होते. पण समाजात मात्र भेदाभेद मोठ्या प्रमाणावर होते. अस्पृयुश्यताविरोधी कायदा केला होता पण त्याने काही अनेक सवर्णांच्या मनात असलेली अस्पृश्यता गेली नाही. स्वतः गुरुजी आणि विहिंपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी अथक प्रयत्न करून शंकराचार्यांसह विविध पंथांच्या चारशे प्रमुख धर्माचार्यांना उडुपी येथे एका व्यासपीठावर आणले आणि कोणीही उच्च नीच नाही, सर्व हिंदू हे सहोदर आहेत ही घोषणा त्यांच्याकडून करून घेतली. हिंदू समाजातील विषमता विद्रोहाच्या नव्हे तर समरसतेच्या मार्गाने संपवण्यासाठी विश्व हिंदू परिषद काम करत राहिली. दलितांना देवळात पुजारी नेमण्यासाठीचे प्रशिक्षण व नेमणूक असाही कार्यक्रम यशस्वीपणे राबवत राहिली.

१९५२ सालीच विद्याभारती आणि सरस्वती शिशू मंदिराची स्थापना झाली. ज्यात पहिला तास हा नेहमी 'सदाचार' या विषयाचा असतो अशा वीस हजाराहून अधिक शाळा आज चालतात.

अशा कितीतरी देशव्यापी संस्था गुरुजी सुरू करत गेले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भारतीय किसान संघ, हिंदुस्थान समाचार, .. सगळी यादी इथे देणे शक्यही नाही.

स्वातंत्र्यानंतर लगेच निर्वासितांसाठी संघ स्वयंसेवक वास्तुहारा समितीच्या माध्यमातून धावून गेले त्यानंतर देशावर आलेल्या प्रत्येक आपत्तीत आणि आक्रमणाच्या वेळेस संघ स्वयंसेवक धावून गेले आहेत.

शिक्षण, आरोग्य, रोजगार, पाणी, आहार यांचे एकेका परिसरातले प्रश्न सोडवणे हे सुद्धा पिढ्यानुपिढ्या चालणार्‍या संस्थेचे काम आहे. बाबा आमटे, अभय बंग अशा माणसांनी असे प्रकल्प उभे केलेले आपण बघतो.
भारताला अशा लाखो प्रकल्पांची गरज आहे. त्या संस्था उभ्या करायला, चालवायला स्वतःला गाडून घेऊन काम करतील अशा लाखो माणसांची गरज आहे. गुरुजी संघमाध्यमातून अशी माणसे घडवत गेले, त्यांना पेरत गेले. आज हीच घडलेली माणसे असे दीड लाख सेवाप्रकल्प चालवत आहेत. पन्नास हजार शाखा, तीन हजार प्रचारक, दोन लाखावर कार्यकर्ते हे माणसे घडवायचे काम करत आहेत

समाजाने, विरोधकांनी आणि सरकारनेही गुरुजींच्या या अहर्निश तपस्येची नोंद जरूर घेतली. नेहरूंच्या भूमिकेतही अगदी शेवटी परिवर्तन झालेले दिसते. १९४८ साली गांधीहत्येच्या एक दिवस आधी अमृतसर येथे आम्ही संघाला चिरडून टाकू असे गर्जणार्‍या नेहरूंनीच १९६३ साली २६ जानेवारीला संघाला प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सहभागी करून घेतले. ३००० संघ स्वयंसेवकांनी गणवेषात संचलन केले. लालबहादूर शास्त्रींनी पंतप्रधान असतांना गुरुजींना त्यांच्या एकात्मता मंडळात सहभागी करून घेतले.

गुरुजींच्या निधनानंतरही संसदेची दोन्ही सभागृहे, पंतप्रधान इंदिरा गांधी, संरक्षणमंत्री, राष्ट्रपती, विनोबा, एस एम जोशी, सर्व राजकीय नेते, सर्व वर्तमानपत्रे यांनी गुरुजींना आयुष्याचा प्रत्येक क्षण देशासाठी वेचलेला प्रखर देशभक्त याच शब्दात श्रद्धांजली वाहिली.

माझे कुठलेही पुतळे, स्मारक वगैरे उभारू नये असे मृत्यूपत्रात स्पष्ट लिहून ५ जून १९७३ रोजी गुरुजी या जगातून निघून गेले. नागपूरला कधी गेलात तर रेशीमबागेत त्यांचा अंत्यसंस्कार झाला त्या ठिकाणी फक्त एक छोटे प्रतिकात्मक यज्ञकुंड धगधगताना दिसेल, किंवा मग देशाच्या कुठल्याही कानाकोपर्‍यात गेलात तरी गुरुजींनी पेरलेल्या माणसांनी घडवलेल्या कार्यमग्न माणसांच्या हृदयात उत्कट देशभक्तीची तीच आग आजही धगधगताना दिसेल.

संदर्भ.

(१) सुपरस्क्रिप्ट वापरता न आल्याने लेखातील त्या त्या वाक्याला संदर्भ क्रमांक देता आला नाही. पण हाताळलेल्या विषयानुसार संदर्भ देत आहे.
(२) संदर्भासाठी अधिकृत आकडेवारी व रिपोर्ट्स उपलब्ध करून दिल्याबद्दल Archives Of RSS, Zandewalan extn. New Delhi यांचा ऋणी आहे.

रा. स्व. संघ, कार्यपद्धती, आकडेवारी
RSS: A Vision In Action - H. V. Sheshadri, Sahitya Sindhu Prakashan.
The Brotherhood in Saffron: The Rashtriy swayamsevak sangh and hindu revivalism Walter Anderson and Shridhar Damle
संघ संस्कारांची बलस्थाने : उत्तम कानिटकर, भारतीय विचार साधना.
मी, मनू आणि संघ : रमेश पतंगे, हिंदुस्थान प्रकाशन.
स्मरणशिल्पे : दामूअण्णा दाते, विवेक प्रकाशन.
मूल्यांकन : दत्तोपंत ठेंगडी
संघगाथा: भारतीय विचार साधना
सरकार्यवाह प्रतिवेदन २०११ - Archives Of RSS
सरकार्यवाह प्रतिवेदन २०१२ - Archives Of RSS
www.rss.org

श्री गुरुजी
समग्र श्रीगुरुजी. खंड १ ते १२. भारतीय विचार साधना.
Shri Guriji: Pioneer of an era - C. P. Bhishikar
समन्वय के सुमेरु - सुरुची प्रकाशन
श्री गुरुजी और राजनीती - सुरुची प्रकाशन
श्रीगुरुजी और सामाजिक समरसता - सुरुची प्रकाशन

फाळणीच्या वेळचे काम
The tragic story pf partition : H. V. Sheshadri
Now it can be told : A. N. Bali

गांधीजी, आंबेडकर आणि संघ
गांधीजी समग्र खंड ९७ ( हरिजन मधील १५ सप्टेंबरची बातमी)
गांधीजी की दिल्ली डायरी - ब्रिजकिशन चांदीवाला
डा. अम्बेडकर और सामाजिक क्रान्ति की यात्रा - दत्तोपंत ठेंगडी

कम्युनिस्टांची भूमिका १९४२, १९६२
The Only Fatherland : Arun Shaurie
Declassified CIA Dossier: http://www.foia.cia.gov/CPE/ESAU/esau-15.pdf
A Traveller and the road: The Journey of an Indian communist - Mohit Sen

विविध संघटना
http://en.wikipedia.org/wiki/Bharatiya_Jana_Sangh
www.bms.org.in
www.vhp.org
www.abvp.org
www.ekal.org
www.bharatiyakisansangh.org
www.vanvasi.org
www.hindusthansamachar.com

सेवाकार्याची आकडेवारी
सेवा दिशा १९९७ - राष्ट्रीय सेवा भारती
सेवा दिशा २००४ - राष्ट्रीय सेवा भारती
सेवा दिशा २००९ - राष्ट्रीय सेवा भारती

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गुरुजींबद्दल इतके तपशीलवार याआधी वाचले नव्हते. वर्गीस कुरियन यांच्या 'I too had a dream' या चरित्रपर पुस्तकात त्यांनी देखिल यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले आहेत ते वाचून गुरुजींबद्द्ल अधिक जाणून घ्यायला हवे असे वाटतच होते आणि हा लेख आला. धन्यवाद!
त्यांचा जीवनपट उलगडून दाखवणारे एखादेच पुस्तक वाचायचे असल्यास कोणते वाचावे?

सरसंघचालक गोळवलकर गुरुजी....असे एक नाव की ज्यानी हकनाक झालेल्या अटकेबाबत मनी कोणतीही कटुता न बाळगता सुटकेनंतर अत्यंत निरलसपणे संघाचे कार्य अखंडपणे चालू ठेवून देशातील सार्‍या कार्यकर्त्यांसमोर एक आदर्श घालून दिला होता. आज त्यांच्या देहावसनाला ४० पेक्षा जास्त वर्षे उलटली असली तरी गुरुजींचे नाव संघाचे कार्यकर्ते कधीच विसरू शकत नाहीत इतके ते ऋषितुल्य व्यक्तीमत्व होते.

मी संघात नव्हतो हे जितके खरे तितकेच हेही खरे की किल्लारी-सास्तूर भूकंप तसेच आंध्रप्रदेशातील महापूर आदी नैसर्गिक कोपाच्या समयी संघ कार्यकर्त्यांनी केलेल्या मदतकार्याची पाहणी करण्याचे भाग्य मला {आणि माझ्या तीन मित्रांना} लाभले होते. त्यावेळी समजले की गुरुजी म्हणजे नेमकी कसली ताकद होती. त्या दिवसापासून रा.से.संघाच्या कार्याकडे मी एका नव्याच नजरेने पाहात गेलो होतो हे सत्य आहे.

लेखक जीएस यानी लेखासंदर्भात दिलेल्या ग्रंथसंपदेची यादी फार बोलकी आहे आणि ती नोंदवून ठेवणे गरजेचे आहे. एक दोन लेख आणि तितकेच प्रतिसाद इतक्यावरच हा विषय पूर्ण होऊ नये असेच वाटत राहील.

अशोक पाटील

सुरेख लिहिलय जीएस.
हल्ली संघाबद्द्ल सगळीकडे गैरसमजच अधिक दिसतात. अश्याप्रकारचे लेखन हे गैरसमज दूर करायला नक्की मदत करेल.

गुरुजी आणि संघा बद्दल खूप छान माहिती मिळाली.

डॉ. हेडगेवार,गोळवलकर गुरुजी, दत्तोपंत ठेंगडी हि नावं लहान पणा पासुन कानावर पडायची. रोज संध्याकाळी खाकी हाफ पँट आणि पांढरा शर्ट घालुन मैदानात शिस्तित उभे राहुन छाती वर आडवा हात ठेवुन ''नमस्ते " नी सुरवात होणारी प्रार्थना म्हणणारे बरेचसे आजोबा आणि काका लोक आमच्या खेळाच्या वेळात मैदान आडवतात म्हणुन दुश्मन गँग मध्ये टाकले गेले होते.सावधान दक्ष - गाव भर लक्ष सारख्या कॉमेंट्स मारत त्यांच्या प्रार्थनेत अडथळा आणण्यात एक काळ आम्हाला धन्यता वाटायची ,आज लाज वाट्ते.

संघाचे काम आणि त्यांच्या कडुन दिले जाणारे देशभक्ती आणि चारीत्र्या चे संस्कार आज खूप महत्वाचे वाटतात.पुन्हा एकदा ईतक्या माहिती पुर्ण लेखा साठि धन्यवाद!

माहितीपुर्ण लेख यथार्थ शिर्षक.
गुरुजींबद्दलही एक तर संघमाध्यमातून प्रकाशित झालेली श्रद्धेने ओथंबलेली चरित्रे किंवा विरोधकांकडून झालेला असत्याधारित विद्वेषपूर्ण प्रचार अशी दोन टोके दिसतात.>>>>
हे दोन्ही टाळुन छान महिती दिलित.

अतिशय समतोल लेख आहे. श्रीगुरुजी आणि एकंदरच संघाचे अवाढव्य कार्य असा मोठा आवाका असलेला विषय निवडूनही खुप नेमक्या शब्दात लिहिलं आहेस.
अलिकडच्या काळात संघाविषयीचे माझे कुतुहल खुप वाढले आहे. पण आजुबाजुच्या माहितगार लोकांकडून कोणत्याही पूर्वग्रहांशिवाय माहिती मिळणे तसे कठीणच. तुझा उत्तराखंड दुर्घटनेच्या वेळचा लेख आणि हा लेख म्हणुनच महत्वाचे आहेत. त्याबद्दल धन्यवाद.

२-३ महिन्यांपुर्वीच अगदी घरासमोरच शाखा सुरु झाली आहे आणि दिवसाची सुरुवात वेगवेगळ्या वयोगटातल्या मुलांच्या उत्साहवर्धक घोषणांनी होते. दररोज सकाळी खड्या आवाजातले हे देश-मंत्र कानावर पडतात आणि कवायती किंवा खेळ दिसतात तेव्हा काय वाटतं ते सांगण्या पलिकडचं आहे.

अत्यंत सपर्पक शीर्षक. ज्यांनी ज्यांनी संघात वा संघकार्याशी संबंधित संस्थात काम केले असेल त्यांना नक्कीच पटेल की संघात माणूस घडवणे ह्याला अतिशय महत्त्व दिले जाते आणि तेसुद्धा ब्रेनवॉशिंग न करता. संघाची मते पटो वा न पटो ह्या संस्थेची शिस्त, कामाची पद्धत व त्यामागची भुमिका (देशनिर्माण व देशाचे कल्याण) ह्यात दुमत असूच शकत नाही.

ओघवता आणि माहिती देणारा लेख आवडला. शीर्षकही नेमके आहे. धन्यवाद, जीएस.

संघाची शिकवण इतकी सरळमार्गी, जनहिताची आणि पर्यायाने देशहिताची असूनसुद्धा त्याच्याबाबत चांगले आणि विरोधी बोलणारे नेहमी टोकाच्या आक्रमकतेने का बोलतात, हे काही कळले नाही.

खरोखर अप्रतिम लेख!

ज्यांनी ज्यांनी संघात वा संघकार्याशी संबंधित संस्थात काम केले असेल त्यांना नक्कीच पटेल की संघात माणूस घडवणे ह्याला अतिशय महत्त्व दिले जाते आणि तेसुद्धा ब्रेनवॉशिंग न करता.
+१००००
अमेरिकेत ठिकठीकाणी 'हिंदू स्वयंमसेवक संघ' नावाने शाखा चालवल्या जातात. शाखेत जाणारी मुल खूप छान घडताना दिसतात. मुख्य म्हणजे मुलांच्या नेतृत्व-गुणांचा विकास होताना प्रकर्षाने जाणवत.

अगदी सुरेख लेख. हल्लीच्या तरुणांना गुरूजींचे माहात्म्य मुळीच माहीत नसणे शक्य आहे. अशांना किमान त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची व्यवस्थित ओळख करवून देणारा लेख.आवडला.

गुरूजींनी मूळ इंग्रजी भाषेत लिहिलेले "वुई: अवर नॅशनॅलिटी डिफाईंड" हे पुस्तक आपल्या राष्ट्रीयतेची व्याख्या व्यवस्थित करते. (कुणाला मिळाल्यास मला हवे आहे.)

तेसुद्धा ब्रेनवॉशिंग न करता>> याविषयी पूर्णपणे असहमत. जी काही बौद्धिकं होतात, भाषणं होतात, वरच्या लोकांचे विचार मांडले जातात ते अतिशय सटल ते उघड ब्रेनवॉशिंग या प्रकारातच मोडतात. संघविचाराच्या बाहेर जाऊन स्वतंत्र विचार करून प्रत्येक गृहितकं - स्वतःची, स्वतःच्या संघटनेची - कठोरपणे तपासली जात नाहीत. संघविचारसरणीच्या बाहेर जाऊन वेगळं वाचन चिंतन खरंच किती होतं? नाहीतर एकाच संघटनेत सगळ्यांची विचारसरणी एकच, भाषा एकच हे कसं होत? इन्कल्केशन ऑफ आयडिऑलॉजी, इन्डॉक्ट्रिनेशन, कुठल्याही वैचारिक/विचारसरणीवर आधारित संघटनेत प्रत्येक पातळीवर होतंच. संघ वेगळा नाही. बहुतेक स्वयंसेवक हे अ‍ॅक्शन मेन असतात. 'वरून आदेश' आलेला असतो त्याचं पालन करत असतात.

देशनिर्माण, देशकल्याण या विषयी दुमत नाही फक्त व्याख्येत दुमत आहे. माझ्यासारख्या अनेकांना संघाचा 'हिंदूराष्ट्राचा' पर्याय/व्याख्या पटत नाही. आणि संघाबाहेरही या उद्दिष्टांनी प्रेरित झालेली लो़कं असतात, समाजकार्य करत असतात हेही नजरेआड करून चालणार नाही. संघाच्या चांगल्या कामांबद्दल सगळ्यांनाच आदर आहे. पण म्हणून मूळ विचारसरणी/कार्यपद्धती याला सरसकट मी तरी मान्यता देऊ शकत नाही. आपलं म्हणू शकत नाही.
आणि आता संघही पूर्वीचा राहिलेला नाही. बाहेरच्या समाजातल्या बर्‍यावाईट प्रवृत्ती इथेही दिसतात. स्वाभाविकच आहे.

संघातल्या आदरणीय व्यक्तिमत्वांचा अनादर करायचा कुठलाही हेतू नाही. इथे एरवी होतात तसे हिंदू-अहिंदू वाद खेळण्यातही रस नाही (आता बहुतेक माझ्या पोस्टनंतर सुरू होतीलच!) फक्त टण्याची पोस्ट वाचून लिहावसं वाटलं म्हणून लिहिते आहे.

वरदा, संघातल्या बौद्धिकात घवघवीत चर्चा होतात, वेगवेगळी मते मांडली जातात.

>>>
नाहीतर एकाच संघटनेत सगळ्यांची विचारसरणी एकच, भाषा एकच हे कसं होत?
>>>
संघाची म्हणुन जी विचारसरणी असेल ती एकच असणार ना? हे कुठल्याही यशस्वी संघटना/पक्षासाठी सत्य असेल पण त्याचा असा अर्थ होत नाही त्या संघटनेत इतर कुठल्याच मतावर चर्चा होत नाही वा चर्चेआधी प्रत्येक सदस्याचे मत एकच होते. जर चर्चेनंतरसुद्धा संघटनेच्या अधिकृत विधानात मतभिन्नता असेल तर समाजवाद्यांच्या प्रमाणे 'आवाज दो हम एक है' होते ना.

संघात काय किंवा कम्युनिस्टात काय, आज किती विचारवंत, हुशार लोक येत आहेत हा चिंतेचा मुद्दा आहेच. एकूणच सार्वजनिक संवादाची पातळी घसरलेली आहे.

इथे समाजवादी किंवा कम्युनिस्ट कुठून आले? मी त्यांच्याबद्दल काही बोलत नाहीये, तो इथला विषयही नव्हे (तसेही कम्युनिस्ट आणि संघ दोन्हीही पोथीनिष्ठांच्याच संघटना)..

पण घवघवीत चर्चा वगैरे होतात तर शेवटी सगळ्यांची मतं आसिंधुहिंदू कशी होतात? एकाचंही मत वेगळं असू शकत नाही? आणि या चर्चा कुठल्या रीडिंग मटेरिअलच्या बेसिसवर होतात? का सगळ्यांचीच अनुभवविश्वं फार संपन्न असतात आणि प्रत्येकजण स्वतंत्र विचार करणारे असतात चर्चा करायला? असे लोक संघातही फार फार कमी आहेत. बाकीच्या 'अ‍ॅक्शन मेन'ची 'चर्चा' हे नुसते इकडून तिकडून ऐकलेल्या अर्धवट मतांचे डोलारे असतात. त्याला कशालाही पक्का वैचारिक पाया नसतो. स्वतःचं असं ठाम वाचन, त्यावरची स्वतंत्रपणे मतं नसतात. वैचारिक-तात्विक पायावर काउंटर अर्ग्युमेन्ट्स यातले फार कमी लोक बाहेर करू शकतात. ते आत बौद्धिकांमधे करू शकत असतील यावर माझा विश्वास नाही...

मी आयुष्यभर संघिष्ट घरात वाढले आहे. सामान्य स्वयंसेवक ते मिडल लेव्हल नेतृत्व ते एकदम हायकमांड नेतृत्व अशा सगळ्या स्पेक्ट्रममधल्या संघवाल्यांना जवळून बघितलं आहे, त्यांच्याशी इंटरॅक्ट केलं आहे.. तेव्हा जशी त्या संघटनेची बलस्थानं पाहिली आहेत तशीच शेवटची त्यांची बॉटमलाईन ही हिंदुत्ववादी पोथीनिष्ठा कशी असते हेही पाहिलं आहे. एकदा देश, आसिंधुहिंदू वगैरे आलं की मग सगळ्या वैचारिक लाटा वगैरे लयच पावतात. मग देशप्रेम, देशावरची श्रद्धा अशा गोष्टी सुरू होतात. असो.

माझ्या संघाबद्दल असलेल्या तोकड्या ज्ञानावर आधारित, असे म्हणावेसे वाटते की तिथे इतर विचारधारेच्या माणसांना स्थानच नसते, संघाची विचारसरणी ज्यांना पटते तेच त्यांच्या सोबत रहातात.
असे अनेक उल्लेख वाचले आहेत की व्यायामा-खेळायच्या नादाने संघात गेले आणि काही काळानंतर वैचारिक असहमतीमुळे संघ सोडला.

ब्रेनवॉशिंग ह्या एका शब्दामुळे गोंधळ उडतो आहे का?

याचे गूगलप्रणित मराठी भाषांतर 'मूळ मतांच त्याग करून नवीन मते स्वीकारण्यास भाग पाडण्याची एक पाशवी पद्धत' असे दाखवत आहेत.

तसेच इंग्रजी अर्थ असा दाखवत आहेत.
brainwashing present participle of brain·wash, Verb - Make (someone) adopt radically different beliefs by using systematic and often forcible pressure.

वरदा तुला पण हाच अर्थ अपेक्षित आहे का?

हिन्दू संघटन वगैरे ठीक आहे. पण पूर्वाश्रमीचा जनसंघ आणि आताचा भाजप यावर संघाचा रिमोट नाही असे म्हणायचेच असेल तर संवाद करायचाच नाही आहे हे स्पष्टच होते आहे. हे दोन्हीही पक्ष संघाच्या राजकीय विंग्ज आहेत हे भारतातल्या शेम्बड्या पोरालाही माहीत आहे. राजकीय माध्यमातून इच्छित परिवर्तन घडवून आणणे यात गैर काहीही नाही. राजकीय व्यवस्था हे एक प्रभावी साधन आहे. मग ताकाला जाऊन गाडगे लपवण्याचेही करू नये . त्याने विश्वासार्हतेवर परिणाम होतो. संघ वाढतो आहे अशी समजूत एकमेकांची काढायची असेल तर ती आत्मवंचनाच ठरेल. संघाला काय साधायचे आहे हे शीर्षस्थ नेतृत्व शेवटच्या कार्यकर्त्याला नीट सांगतेय काय? सामाजिक कार्याची केवळ काही बेटे उभारून भविष्यकाळात काही ठोस हाती लागेल असे वातत नाही.

त्रयस्थपणे पाहिले तर संघ (म्हणजेच भाजप )(असेच बाहेर परसेप्शन आहे हे कृपया लक्षात घ्या.) अत्यन्त कालबाह्य उद्दिष्ट्ये कार्यकर्त्यांपुढे ठेवीत आहे असे दिसते. उदा. आसिन्धु वगैरे. खरोखरीच स्वतः पाकिस्तान आणि बान्गला देशाने भारतात स्वतः होवून सामील व्हायची ऑफर दिली तरी ती भाजप सरकरही स्वीकारू शकते काय? म्हणजे तिथले काय ते २५-३० कोटी दरिद्री मुस्लिम त्यांना पोसायच्या प्रॉब्लेम्सह आपन कोणत्याही माध्यमातून(म्हणजे 'हंसके जिंकून' वगैरे) सामावून घेऊ शकू काय. ? आसिन्धु सिंधु एकत्र झाले तर मुस्लिमांचे परसेन्टेज वाढनार नाही काय? मग हे मृगजळ कशासाठी?
समान नागरी कायदा वगैरे विनोदी प्रकार त्यातले. संसदेत सर्वच्या सर्व खासदार भाजपचे आले तरी समान नागरी कायदा येऊ शकणार नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यातलीच काही मंडळी समान कायादा आम्हाला मान्य आहे पण त्यातल्या 'काही तरतुदीना' आमचा आक्षेप आसे हे हल्ली नव्याने खोडा घालण्याकारता जे अस्त्र निघाले आहे त्याचा नकीच वापर करतील.... ते असो..

थोडक्यात पूर्वाश्रमींचे कार्य, काही समाजकार्य लक्षात घेऊनही संघ समाजाला कुठे नेणार आहे हे आश्वस्त करू शकत नाही त्यामुळे लोकमताची बैठक त्याला मिळणे उत्तरोत्तर दुरापास्त होत जाणार अशी भीती आहे. अन्यथा ८० ठक्के हिन्दू असलेल्या देशात , कडवे हिन्दुत्व पुकारण्यार्या संघटनेच्या हातात आपले भविष्य द्यायला ८० टक्के हिन्दू का तयार होत नाहीत याचे आत्मपरिक्षण केल्याशिवाय पुढे कसे जाता येईल....

मी लहानपणी संघ कायकर्त्याच्या सहवासातच वाढलो आहे त्यांच्यात म. गांधी , नेहरू, इंदिरा गांधी, इत्यादी.च्या बाबतीत ज्या अश्लील चर्चा चालत त्यावरून सुसंस्कृतता तळागाळापर्यन्त 'झिरपण्यात' अपयश आल्याचे स्पष्ट दिसून आले. आणि हा मार्ग आपला नव्हे ही खूण गाठही .
जनतेला काय जो त्यांचे कल्याण करील असा भरवसा देऊ शकतो त्याच्या हातात नेतृत्व देणार (राजकीय, सामाजिक, आणि सांसकृतीकही ) ..

भविष्यात असा भरवसा देऊ शकतो संघ?

ऊत्कृष्ट, माहितीपूर्ण लेख, समर्पक शीर्षक.

>>आपणच घडवलेल्या माणसांवर आपला विश्वास नसेल, आणि नियंत्रण ठेवावेसे वाटत असेल तर आपला आपल्या कामावरच विश्वास नाही असे होईल एवढे सोपे त्यांचे तत्वज्ञान होते, आणि एवढा त्यांचा माणूस घडवण्याच्या कामावर विश्वास होता.

अगदी कुठल्याही संस्था, कंपनी, समाज, राष्ट्र यांच्या जडण घडणीसाठी हे तत्व मार्गदर्शनपर मौलिक आहे!

वा मस्त लेख!

आणि आजही संघ म्हटला की हिंदूराष्ट्र या शब्दावर आणि त्याबदलच्या समज, गैरसमजांबद्दल एक न संपणारी चर्चा सुरू होते. >>> यु नेल्ड इट.

जीएस तुझ्या कडुन अजुन विष्लेश्णात्मक लेखाची आपेक्षा होती या विषयावर.
वरदा + १

सुंदर लेख. कधी अत्यंत आदर वाटणारी संस्था तर कधी जबरी चेष्टा करावीशी वाटणारे बरेच लोक असे एकत्र असलेली क्वचित दुसरी संघटना असेल.

संघात नंतर सुमारे २०-२५ वर्षांनी काय झाले यावर गोळवलकर गुरूजींचे यश जोखणे अनफेअर आहे. सुरूवातीला निष्ठावंत, नेत्याचे विचार अचूक आचरणात उतरवणारे लोक असणे व एक दोन पिढ्यांनतर चित्र एकदम वेगळे दिसणे हे जवळजवळ सर्व संस्थांमधे, पक्षांमधे झालेले आहे (काँग्रेस सकट, किंबहुना जेथे सत्ता आहे तेथे जास्तच).

बाकी तरूण पोरांनी त्यांना पसंत नसलेल्या नेत्यांबद्दल अश्लील बोलणे हे सगळीकडे आहे. तेथे संघ किंवा इतर संस्थांचा संबंध नाही Happy

समर्पक शीर्षक आणी बांधेसूद लेख आवडला. संदर्भाची यादीही छान आहे.
वरदा +१.
संघातले ब्रेनवॉशिंग कधी उघड तर कधी सटल असते. याची अनेक उदाहरणे देता येतील पण

१ चांगल्या कामासाठी ब्रेन वॉशिंग करायला काय हरकत आहे?
२ केडर बेस संघटनेत ब्रेनवॉशिंग अपरिहार्य असते. मग ते डावे असोत वा उजवे.
३ सगळे कार्यकर्ते विचार आणी अभ्यासच करत बसले तर मग काम कोण करणार ?
४ अशा प्रकरची संघटना चालवायला एक्शन मेन चीच जास्त जरूरी असते.

अर्थात निबंधाचा विषय श्रीगुरुजी हा आहे त्यामुळे हे थोडेसे विषयांतर झाले.

प्रतिसादांबद्दल सर्वांना धन्यवाद.

हर्पेन, मला स्वतःला कुठले एक पुस्तक समाधानकारक वाटले नाही. पण 'तीन सरसंघचालक' वाचलेत तर डॉक्टर, गुरुजी आणि बाळासाहेब देवरस यांचा जीवनपट एकत्र वाचायला मिळेल. पुण्यात असाल तर भारतीय विचार साधनामध्ये मिळेल.

अशोकराव, तुमचे संयत प्रतिसाद अनेकदा इतरत्र वाचले आहेत. एखाद्या संघटनेची/ माणसाची सर्वच तत्वे पटणे जवळ जवळ अशक्यच आहे पण जे चांगले आहे त्याला चांगले आहे म्हणण्याची हल्ली कमी होत चाललेली पण तुम्ही टिकवून ठेवलेली वैचारिक उदारता मला आवडली.

पराग्, गजानन्, सिंडरेला, फारएंड - जसे गैरसमज असलेले खूप जास्त लोक आहेत, तसेच हितचिंतकांचेही प्रचंड पाठबळ आहे. मिडिया आणि विरोधकांकडून होणारे हल्ले पाहिले की असे वाटू शकते की अरे एवढी सतत टीका होते,कोणाला यांच्या कामाची किंमत नाही तर हे का करत राहतात काम? आपण एखादी छोटी चांगली गोष्ट आपल्याच घरात केली तरी घरातल्यांनी appreciate करावे अशी आपली अपेक्षा असते. इथे तर समाजासाठी स्वतः झळ् सोसून काम करून सतत शिव्याशापच वाट्याला येत असतील तर कसे काय यांचे मनोधैर्य टिकते? पण प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात मात्र समाजाकडून भरपूर प्रेम, आदर, विश्वास या कार्यकर्त्यांच्या वाट्याला येतो. अर्थात गैरसमज दूर करण्यासाठी काही करता आले तर चांगलेच आहे कारण कितीही वेगवेगळे विचार असले तरीही समाजातील सज्जनशक्तीने एकत्र येण्याची सध्या फार गरज आहे.

ब्रेनवॉशिंगबद्द्लच्या टण्याच्या दोन्ही पोस्टना अनुमोदन. ही काही फक्त चर्चेने कळायची गोष्ट नाही, त्यासाठी प्रत्यक्ष काम करण्याचा अनुभव घ्यायला ह्वा. जो त्याने घेतला आहे, आणि त्यावरून लिहिले आहे.

रॉबीन, संवाद न व्हायला काय झालं ? पण मी काही संघ प्रवक्ता अथवा अधिकृत प्रतिधिनी नाही त्यामुळे संघाची प्रत्येक गोष्ट डिफेंड करण्याची मला आवश्यकता नाही, शिवाय या लेखाचा विषय राष्ट्रउभारणीसाठी माणसे घडवून पेरण्याचं किती वेगळ आणि प्रचंड काम गुरुजींनी केलं एवढाच होता. पण संघाबद्दल अनेकदा उपस्थित केले जाणारे प्रश्नच तुम्ही लिहिले आहेत. वर टण्याचं तुम्हाला अनुमोदन आहे, त्यामुळे तुम्हाला उत्तर द्यायला हवं. तेवढे लिहिण्याएवढा वेळ मिळाला की ते देतो.

संघ वाढतो आहे. नव्या संघशाखा उघडत आहेत, परदेशातही काम वाढत आहे अशी आकडेवारी माझ्याकडे आहे. पण सई अणि कल्पुने त्याचे प्रत्यक्ष उदाहरणच वर लिहिले आहे.

सर्व वाचकांना आणि प्रतिसाद देणार्‍यांना धन्यवाद.

Pages