ताण.. जब तक हैं जान ! (Jab Tak Hain Jaan - Movie Review)

Submitted by रसप on 14 November, 2012 - 01:13

मी शहाणा आहे, असं समजण्यात काही वावगं नाही. समोरचा मूर्ख आहे, असंही कधी कधी समजण्यात काही गैर नाही. पण मी(च) शहाणा(च) आहे आणि समोरचे सगळे(च) मूर्ख(च) आहेत, असा समज करून घेऊन जेव्हा एखादी निर्मिती केली जाते, तेव्हा तिला 'जब तक हैं जान' असं नाव दिलं जातं आणि तिच्या केंद्रस्थानी शाहरुख खान येतो.. तो दाढीचे ओंगळवाणे खुंट वाढवून फिरणारा आर्मी मेजर असतो.. तो आणि त्याचे सहकारी सैनिक, सैनिकाची पहिली ओळख - त्याची केशरचना - सुद्धा पाळत नसतात.. ह्या टीमचं काम फक्त बॉम्ब डिफ्युज करणं असतं आणि रोज त्यांना एक तरी बॉम्ब उदरनिर्वाहाकरता मिळतच असतो.. वगैरे, वगैरे..
मग अश्या निर्मितीसाठी काम करता करता ए. आर. रहमानसुद्धा साजिद-वाजीद भासतो, गुलजारचे शब्द एक तर कळतच नाहीत अन कळले तर ते समीर-छाप वाटतात आणि हिंदी सिनेजगताला वेगवेगळ्या उंचीवर नेणारे यश चोप्रांसारखे दिग्गज दिग्दर्शक स्वत:च्या शेवटच्या चित्रपटात सपशेल जमिनीवर आपटतात.

सिनेमाची सुरुवात होते 'लेह'च्या एका मार्केटमध्ये. तिथे एक 'बॉम्ब' सापडला असतो. एक जण त्याला निकामी करण्याचा प्रयत्न करत असतो, पण ते त्याला जमणार नसतंच. कारण हिरोची एन्ट्री करवायची असते. इन कम्स मेजर 'समर आनंद' (शाहरुख), त्याने आजपर्यंत ९७ बॉम्ब्स निकामी केले असतात. तो येतो आणि भाजी निवडल्यासारखा तारा वेचून, तोडून, उपटून बॉम्ब निकामी करतो आणि समस्त शाहरुख भक्त बोंब मारतात! हा राउडी मेजर बॉम्ब प्रोटेक्शन सूट न घालता ह्या करामती करत असतो, हे विशेष. (आर्मीवाले असं कसं काय करू देतात ? - असे प्रश्न विचारायचे नाहीत. कारण आपण मूर्ख आहोत.) तर बॉम्ब निकामी केल्यावर तो नेहमी कुठल्याश्या शांत जागी जाऊन बसत असतो. तसा तो एका तळ्याकाठी बसलेला असताना तिथे येते 'अकीरा' (अनुष्का शर्मा). ती सगळे कपडे काढते, थंडगार पाण्यात उडी मारते आणि बुडते. अर्थातच हिरो तिला वाचवतो आणि स्वत:चं जाकीट तिला देतो. त्या जाकीटात त्याच्या आयुष्याची कहाणी सांगणारी डायरी असते.
कट. फ्लॅशबॅक सुरू..
समर आनंद लंडनमध्ये रस्त्यावर गाणी गाऊन पैसे कमावणारा, हातगाड्या ढकलून माल पोचवणारा, हॉटेलात वेटरचे काम करणारा एक दरिद्री तरूण(??) असतो. तिथे त्याची ओळख एका गडगंज श्रीमंत बापाच्या (अनुपम खेर) एकुलत्या एक मुलीशी - मीरा थापर (कतरिना) - होते. तिचं लग्न ठरलेलं असतं. पण ती व तो प्रेमात पडतात. स्वत:वर बंधन लादून घेण्यासाठी हे दोघं हिंदू, मंदिरात न जाता चर्चमध्ये जाऊन एकमेकांपासून 'सुरक्षित अंतर ठेवा'वाली शप्पथ घेतात. (चर्चमध्ये का? असे प्रश्न विचारायचे नाहीत. कारण आपण मूर्ख आहोत.)
लेकीन इश्क़ रोके रूकता नहीं! ते जवळ येतात.. झोंबाझोंबी करतात.. आणि मग समरचा अपघात होतो. तो मृत्यूच्या जबड्यातून परत येतो. इथे मीराला समजून येतं की तिने तिची येशूसमोर घेतलेली शप्पथ तोडल्याची ही शिक्षा आहे. म्हणून ती समर जिवंत राहावा म्हणून नातं तोडते आणि त्याला लंडन सोडून जायला सांगते. (लॉल!!) २२ व्या शतकात हे समजून घेणे म्हणजे आपल्या मूर्खपणाचा कळस असतो. तरी आपण समजून घेतो कारण आपण खरोखरच मूर्ख आहोत.
बास्स... मीराच्या अंधश्रद्धेला देवाचा चॅलेंज समजून 'रोज मौत से खेलूंगा.. या तो तुम्हे मुझे मारना होगा या उसके (मीरा के) विश्वास को हराना होगा..' असली पोरकटशिरोमणी शप्पथ घेऊन समर वयाच्या २८ व्या वर्षी भारतात परततो. इथे भारतीय सैन्य दलाने त्याच्यासाठी रेड कार्पेटच अंथरलेलं असतं. त्यामुळे तो थेट सैन्यात दाखलही होतो.... मेजरही बनतो आणि 'बॉम्ब स्क्वाड'चा प्रमुखही! (कैच्याकै ! असं कसं शक्य आहे ? - असे प्रश्न विचारायचे नाहीत. का. आ. मू. आ.)
हे सगळं फ्लॅशबॅकमध्ये चालू आहे... विसरलात ना की 'अकीरा' त्याची डायरी वाचतेय ? असंच दिग्दर्शकाचंही होतं. डायरी संपेपर्यंत त्याला आठवतच नाही की हा फ्लॅशबॅक आहे. असो.

अशी सगळी कहाणी वाचणारी अकीरा डिस्कव्हरी वाहिनीत किरकोळ नोकरीला असते. तिचं एक स्वप्न असतं की एक आर्मी, युद्ध, बॉम्ब्स इ. वर डॉक्युमेंटरी बनवायची. ती त्यासाठी मान्यता मिळवते आणि थेट 'बॉम्ब स्क्वाड' सोबत कॅमेरा घेऊन दाखल ! प्रोफेशनल व्हिडिओ कॅमेरा असतानाही ती एका फुटावरून बॉम्ब निकामी करणाऱ्या समरला चित्रित वगैरे करते, तेव्हा मात्र तीसुद्धा आपल्यासारखीच मूर्ख आहे का? अशी शंका येते. आपण कितीही बिनडोक असलो तरी आपल्याला आधीच कळलेलं की आता ही बया ह्या गालावर निवडुंग आणि डोक्यावर खुरटी झुडपं घेऊन फिरणाऱ्या मेजरच्या प्रेमात डुबकी मारणार आहे, मारतेच. पण तमाशा इथे संपत नाही. अकीरा समरवरच डॉक्युमेंटरी बनवते - 'A man who can not die! ती डिस्कव्हरीवाल्यांना आवडते.. ते रडतात ! आणि ते समरला लंडनला घेऊन ये, असं तिला सांगतात. १० वर्षांपूर्वी मीराला वचन दिलेलं असतानाही, ते तोडून समर अकीरासाठी परत लंडनला येतो. पुन्हा त्याचा अपघात होतो आणि तो ही मधली १० वर्षं पूर्णपणे विसरून आयुष्यात रिवाइंड होतो. (हे शक्य आहे, का. आ. मू. आ.) मग त्याला 'नॉर्मल' करण्यासाठी त्याची डॉक्टर, अकीरा, मीरा आणि त्याचा लंडनमधला एक लाहोरी मित्र असे सगळे मिळून नाटक करतात. भरपूर मेलोड्रामा आणि शाहरुखगिरी झाल्यावर शेवटी 'जान छुट'ते आणि सिनेमा संपतो.

त्याची स्मृती परत आणण्यासाठी त्याच्यावर बनवलेली डॉक्युमेंटरी त्याला दाखवावी, इतकी साधी गोष्ट कुणाच्याही डोक्यात येत नाही, पण ते आपण समजून घ्यायचं. का. आ. मू. आ.

वाईट वाटतं पण बोलायला लागतंय की, यश चोप्रांनी त्यांचं सगळ्यात फालतू काम सगळ्यात शेवटच्या सिनेमात केलं आहे.

jt382.jpg

आदित्य चोप्राची पटकथा व कथा, त्याने शाळेत लिहिली असावी.
गुलजार साहेब आणि रहमानने ह्या सिनेमातील सर्वच्या सर्व गाणी ताबडतोब 'हक्कसोड पत्रा'वर सही करून विमुक्त करावीत.
शाहरुख खान जितक्या लौकर स्वत:च्या प्रेमातून बाहेर पडेल तितकं त्याच्या भक्तांचं भलं होईल.
कतरिनाकडून अभिनयाची अपेक्षा करणे फोलच.
अनुष्का शर्मा लक्षात राहाते.
छायाचित्रण नेत्रसुखद आहे.

रा-वन पाहिल्यानंतर जर आपल्याला असं वाटलं असेल की ह्याहून वाईट शाहरुखपट असणार नाही, तर आपलं चुकलंच.. कारण..........?
का. आ. मू. आ. !!

रेटिंग - *
http://www.ranjeetparadkar.com/2012/11/jab-tak-hain-jaan-movie-review.html

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चित्रपटात शेरुक आहे म्हटल्यावरच नक्को. हजार सलमान चांगले या मला पहा आणी फुले वहा पेक्षा.Proud

परीक्षणापेक्षा ही चिरफाड जाम आवडली.:फिदी:

एवढं लिहूनच्या लिहून वर रेटींगमधे एक 'स्टार' दिल्याबद्दल रसप यांचा जाहीर णिशेद ! Lol

>>>>इथे मीराला समजून येतं की तिने तिची येशूसमोर घेतलेली शप्पथ तोडल्याची ही शिक्षा आहे. म्हणून ती समर जिवंत राहावा म्हणून नातं तोडते आणि त्याला लंडन सोडून जायला सां>>>><<

हायला! खरी की काय? इतक्या छोट्या ती रिश्ता तोडते इश्कवाला? Proud
पण खरे का सांगत नाही की ती कंटाळलीय समरला? Wink

>> मीराच्या अंधश्रद्धेला देवाचा चॅलेंज समजून 'रोज मौत से खेलूंगा.. या तो तुम्हे मुझे मारना होगा या उसके (मीरा के) विश्वास को हराना होगा..'<< Rofl

हे सगळं करण्यापेक्षा मायबोलीवरचा बीबी दाखवायचा ना, अंधश्रद्धा निर्मुलन का काय ते. Proud

तो येतो आणि भाजी निवडल्यासारखा तारा वेचून, तोडून, उपटून बॉम्ब निकामी करतो << Rofl

बेफाट लिहिलंय. Lol

यश चोप्रांनी त्यांचं सगळ्यात फालतू काम सगळ्यात शेवटच्या सिनेमात केलं आहे. >> अरे अरे!

काल कुठल्याशा चॅनेलवर जतहैजा च्या कलाकारांची मुलाखत चालू होती. तर कतरीना बया "यशजींच्या नायिका" ह्या विषयावर अकलेचे तारे तोडू लागली. यश चोप्रांच्या प्रत्येक सिनेमात म्हणे नायिका कधीही शोभेची बाहुली कधीच कशी नव्हती आणि तिचे पात्र असे कथेतले प्रमुख पात्र असते इ. इ. ह्या सिनेमात हिरवीणींनी काय दिवे लावलेत! Biggrin

हजार सलमान चांगले या मला पहा आणी फुले वहा पेक्षा.>>>> ++++११११११११११११

अरारारा...... पार चिरफाड्च (पोस्ट्मार्टेमच) केलीया........:P

व्वा...! याला म्हणावे रोखठोक सिनेपरीक्षण.....उगाच कुणा एका नामवंत दिग्दर्शकाचा वा लोकप्रिय अभिनेत्याचा चित्रपट आहे म्हणजे त्याला 'चार चांद' लागलेच पाहिजेत अशा थाटात वर्तमानपत्री साप्ताहिकी पाट्या टाकू परीक्षणे पाडणार्‍या चिकटू सिनेसमीक्षकाच्या थोबाडीत मारणारे हे अस्सल गावरान चिरफाड करणारे परिक्षण इथे सादर केल्याबद्दल श्री.रसप यांचे मन:पूर्वक अभिनंदन.

भारतीय प्रेक्षकांनी यश चोप्रा, मनमोहन देसाई, सुभाष घई प्रभृतींचे चित्रपट बघायला जाताना आपापले मेंदू फ्रीझरमध्येच ठेवूनच थिएटरकडे जावे अशीच धारणा या निर्माता दिग्दर्शकांनी आपल्या मनी वसवलेली असते हे त्यांच्या अगदी 'क्लासिक' म्हटल्या जाणार्‍या चित्रपटांच्याबाबतीतही जाणवते. हेच यश चोप्रा 'त्रिशूल' मधील कथानकात असे दाखवितात की, अधिकारी बोर्ड मेम्बर्स मुंबईतील सुप्रसिद्ध कन्स्ट्रक्शन कंपनीचे बांधकामाचे टेन्डर मंजूर न करता काल गावात आलेल्या आणि बांधकाम क्षेत्रातील अनुभवाचा कसलाही आगापिछा नसलेल्या 'विजय' नामक युवकाकडे कोट्यावधी रुपयांचे ते प्रचंड असे काम सुपूर्द करतात.....कारण काय ? तर चोप्रांच्या विजयरावांचे टेन्डर त्या सुप्रसिद्ध कंपनीपेक्षा १ रुपयाने कमी असते म्हणून.....पण आपण हे चालवून घेतो, कारण रसप म्हणतात तसे "का. आ. मू. आ. !!"

"जब तक...." मधील हा समर जर लंडनमध्ये वेटर आहे आणि त्याला इंग्रजीही धडपणे बोलता येत नाही (असे एका परिक्षणात वाचले आहे) म्हणजे तो नक्कीच पदवीधर युवक नाही. असे असेल तर मग इंडियन मिलिटरी अ‍ॅकॅडमीने त्याला 'मेजर' पदापर्यंत नेले तरी कसे ? कारण मिलिटरीमधील "कमिशन्ड ऑफिसर" पदाच्या भरतीसाठी किमान पदवीची अर्हता आहेच....पण आपण हे विचारू शकत नाही, कारण "का. आ. मू. आ. !!".

असल्या मूर्खपणाचा ज्या रितीने विल्हेवाट लावली गेली पाहिजे तशीच रसपनी लावली आहे हे स्पष्ट आहे....[खरंतर.....त्यानी "छायाचित्रण नेत्रसुखद आहे...." कशाला छायाचित्रणाची तरी तारीफ करायची ? हे वाक्यसुद्धा लिहायला नको होते. आजकाल फोटोग्राफीचे तंत्रज्ञान इतके सुधारले आहे की अमावास्येच्या रात्री घेतलेले शूटिंगसुद्धा शुद्ध दुधासारख्या चांदण्यात घेतल्यासारखे करता येते.]

वाईट वाटते अमिताभ बच्चन सारख्यांनी आपल्या ब्लॉगवर अशा फालतू चित्रपटाची तारीफ केलेली वाचताना. बिग बी याना चोप्रांविषयी असणारा आदर प्रेम ठीक आहे, पण म्हणून त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या टुकार चित्रपटाविषयी लिहिताना काय वाट्टेल ते बरळावे ? ते म्हणतात, ".....And the film... what can one do, or say about it ? ... each portion poetry, each artist at his and her best, and for Shah Rukh his best performance after 'Swades'."

~ असेल बाबा ! रसप आणि आम्हीच कदाचित अडाणी असू.

अशोक पाटील

माफ करा पण परिक्षण फारच एकांगी आहे . शाहरूख वरचा राग मान्य आहे , पण त्याने चांगले काम केले तरी नावं ठेवायच कारण समजत नाही .
९९ %हिंदी सिनेमात कथेची बोंब ही असतेच , ते काही नवीन मानण्याच कारण नाही ,
RAW एजंट ने ISI बरोबर पळून गेलेल चालत , एक माणूस ५० माणसाना मारतो हे ही चालत , त्यावेळी आपण मूर्ख नसतो का ?

हम्म.मी हा सिनेमा थिएटरमध्ये बघणार नाहीये हे आधीच ठरवलेय.सध्या रिव्ह्युज वाचतेय.

यश चोप्रांच्या प्रत्येक सिनेमात म्हणे नायिका कधीही शोभेची बाहुली कधीच कशी नव्हती आणि तिचे पात्र असे कथेतले प्रमुख पात्र असते इ. इ. ह्या सिनेमात हिरवीणींनी काय दिवे लावलेत!>>>>
बाकी लोकांनी लिहीलेले रिव्ह्युज वाचुन जे काही कळलंय त्यानुसार यातही कतरीना आणि स्पेशली अनुष्काचे पात्र चांगले उभे केलेय. स्टोरी डेफिनेटली हॅज सम फ्लॉज बट कॅरेक्टर्स स्टँड आउट. खखोदेजा. यश चोप्रांच्या सिनेमात खरंच स्त्री कलाकारांची पात्रे स्ट्राँग असतात यात वाद नाही.

रच्याकने, काल अनुपमा चोप्राच्या रिव्ह्युमध्ये ती म्हणाली की बलराज सहानीनंतरचा सगळ्यात हॉट आर्मी मेजर शाहरुखने साकारला आहे. मी ऐकुन कपाळावर (माझ्याच) हात मारला. Proud

झंपे Lol

रसप अतिशय उत्तम रसग्रहण.. शेवटी होतं काय पण? शारूक मिळतो कुणाला?
अकिरा, मीरा की.. Proud

हे बरंय कुणिही कुणालाही लंडन सोडून जा म्हणतं आणि लोकं तसं करतात? Uhoh
कमाल आहे.

दक्षिणा, त्या दोघींना प्रेमाची उपरती होते आणि शारूक मरतो ...म्हणूनच तर 'जब तक है जान'
जान असेपर्यंतच प्रेम बिम कबूल करा, नंतर कै उपयोग नै असा उदात्त संदेश आहे सिनेमात Happy

अर्पणा.. Happy
फायनली मरतो तर शारूक गुड..

शाहरुख खान जितक्या लौकर स्वत:च्या प्रेमातून बाहेर पडेल >> याला नार्सिझम असं म्हणतात. हा एक डिसॉर्डर आहे.

केदार जाधव साहेब,

मी मला हा सिनेमा पाहून जे वाटलं ते लिहिलं.. ते कदाचित चुकीचं असूही शकतं. मी म्हणतो म्हणून त्यावर विश्वास ठेवावा असं माझं अजिबात म्हणणं नाही..! बाकी शाहरुख खानशी माझं कसलंही वैयक्तिक वैर नाहीये. त्याने खरोखरच काही चांगलं (माझ्या मते) करावं, मी त्याला चांगलं म्हणीन की!

रसपजी , चित्रपट चांगला वाटला नाही हे लिहिण्यात काहीच चूक नाही (आणी खर तर हे तुम्हाला सांगणारा मी कोण हे ही तितकच खर :)) माझ मत इतकच , की फक्त शाहरूख आहे म्ह्णून नाव ठेवू नयेत (जे मायबोलीवर थोड जास्तच चालत , त्याचा चित्रपट पहायच्या आधीच तो रद्दड आहे हे त्याना कळलेल असत :)).

बाकी त्याला सारूख , शेरूख काहीही म्हटल तरी तो शून्यातून वर येऊन प्रचंड लोकप्रियता मिळालेला माणूस आहे हे नाकारल जाऊ शकत नाही .

उल्हासनगर कल्याण मधे 16 तारखे पर्यंत हाऊसफुल आहे....
.
.
.
.
काहीनां प्रेमासाठी देशाशी गद्दारी करणारा हीरो आवडतो...पण देशासाठी प्रेम कुर्बान करून 14 वर्ष तुरूंगात असलेला हीरो आवडत नाही.....
.
.
यातच सर्व काही आले....
.
आदर्श तरूणांनी काय ठेवायचा...?

काहीनां प्रेमासाठी देशाशी गद्दारी करणारा हीरो आवडतो...पण देशासाठी प्रेम कुर्बान करून 14 वर्ष तुरूंगात असलेला हीरो आवडत नाही.....
>>> हे काय म्हणे? तुम्ही व्यक्तिरेखा आणि त्याचे सादरीकरण यात गल्लत करत आहात असे नाही वाटत? देशासाठी प्रेम कुर्बान करून 14 वर्ष तुरूंगात असलेला हिरो साकारलाय म्हणुन त्यातली ओव्हरअ‍ॅक्टिंग, वाइट मेकअप, कथेतल्या अ आणि अ गोष्टी वै दुर्लक्षित करुन सिनेमाला चांगले म्हणावे का?कैच्याकै.

पैसे खर्चुन सिनेमा बघितल्यास तो आवडला नाही म्हणायला काय प्रॉब्लेम आहे?
सिनेमाचा तरुणांच्यी जीवनावर मोठा प्रभाव पडतो हे एकवेळ ठीक आहे पण तरुणांचा आदर्श सिनेमातुन मिळण्याचे दिवस केव्हाच मागे पडलेत.

मग तुम्हाला युध्दकैदी... जेम्स बॉंड सारखा साफसुथरा हवा... ? Wink
.
कैच्याकै अपेक्षा आहेत तुमच्या... तुरूंगात आहे पिकनिक ला नाही गेलेला... Lol
.
सादरीकरण छान म्हणून गद्दार ची गोष्ट भारी ठरते का?

सिनेमाचा तरुणांच्यी जीवनावर मोठा प्रभाव पडतो हे एकवेळ ठीक आहे पण तरुणांचा आदर्श सिनेमातुन मिळण्याचे दिवस केव्हाच मागे पडलेत.>>> सही बात. Happy

RAW एजंट ने ISI बरोबर पळून गेलेल चालत >>> रविंदर कौशिक उर्फ ब्लॅक टायगर वर गूगल सर्च करा. Happy

काहीनां प्रेमासाठी देशाशी गद्दारी करणारा हीरो आवडतो...पण देशासाठी प्रेम कुर्बान करून 14 वर्ष तुरूंगात असलेला हीरो आवडत नाही.....
>> हे वीर झाराबद्दल बोलत आहात का? तो सिनेमा आवडलेले लोक आहेत. त्याच लोकांना एक था टायगर नावाचा सिनेमा पण आवडलेला आहे. दोन्ही सिनेमा अजिबात न आवडलेले लोकपण आहेत. त्यामुळे हे असे डायरेक्ट कन्क्लूजन कसे काढले ते माझ्या लक्षात आलेले नाही. लोकांना काय आवडेल आणि काय आवडावं याचा फॉर्म्युला अद्याप कुणालाही सापडलेला नाही. त्यातून सर्वकाळ सर्व लोकांना सर्ववेळेला आवडेल असं काही असणं मुश्किल आहे.

बाकी त्याला सारूख , शेरूख काहीही म्हटल तरी तो शून्यातून वर येऊन प्रचंड लोकप्रियता मिळालेला माणूस आहे हे नाकारल जाऊ शकत नाही .
>> हे कुणीही नाकारलेलं नाहीच आहे. पण म्हणून त्याच्या आचरटपणाला नावे ठेवू नयेत असा नियम आहे की काय? त्याने त्याच्या अभिनयक्षमतेला वाव मिळेल अशा भूमिका कराव्यात, त्याचं लोक कौतुक करतीलच. इन फॅक्ट आजवर केलेलंच आहे. म्हणून तर प्रचंड लोकप्रिय झालाय. म्हणून तीच लोकप्रियता सतत कॅश करत गेलं तर ते हास्यास्पद होतं. देव आनंद किंवा राजेश खन्नाला विचारा. काळानुरूप बदलत भूमिका करणार्‍यांचं उलट नाव अजून गौरवास्पद होतं. अशोक कुमार किंवा ऋषी कपूरला (त्याचा कारोबार वगैरे विसरून जाऊन) विचारा.

उदयन मी कुठेही साफसुथरा चेहरा म्हणजे चांगला मेकअप असे म्हटलेले नाही. म्हातार्‍या माणसाचा चांगला मेकअप बघायचा असल्यास सारांश, कमल हसनचाही एक चित्रपट (हिंन्दुस्थानी बहुतेक) बघा. बाकी बरेचसे असतीलच. पण वीरझारा यात मोडत नाही असे माझे मत.

बायदवे, स्कायफॉल मध्ये जेम्स बाँडही वयस्कर (?) दाखवलाय!

तुम्ही परतपरत तीच चुक करत आहात. गद्दार सिनेमा वि वीरझारा सिनेमा ही तुलना करताय की हिरो म्हणुन कोण भारी- गद्दार चा हिरो सनी देओल वि शाहरुखचा वीर की व्यक्ती म्हणुन कोण महान -गद्दारमधल्या हिरोची व्यक्तिरेखा वि वीरची व्यक्तिरेखा ??

हेमाशेपो.

परत चुक....
.
.
म्हातारा... तुरूंगातला युध्दकैदी आहे... हे का विसरतात... सारांश, व इतर वयस्कर लोक तशी बिल्कूल नाहीत...मग तुम्ही का तुलना त्यांच्या मेकअप शी करत आहेत..?
.
चित्रपटाचे सादरीकरण दिग्दश्रक ठरवतो... अभिनेता नाही....
.
..:)
.
....

म्हातारा... तुरूंगातला युध्दकैदी आहे... हे का विसरतात... >>> युद्धकैदी असो वा नसो, कसाही असला तरी त्याचा मेकप कृत्रिम होता. अभिनेता स्वतःचे सादरीकरण स्वतःच ठरवतो. त्याचा लूक्/कपडे/केस हे ठरवताना या सर्वांमधे त्याचा सहभाग असतोच. खास करून शाहरूखसारखा स्टार असताना तर नक्कीच.

Pages