प्रीत गझलियत

Submitted by UlhasBhide on 25 March, 2012 - 03:06

आधीच्या रचनेत थोडेफार बदल केले आहेत.
त्या वेळच्या प्रतिसादांच्या संदर्भांसाठी ती रचना खाली तशीच ठेवली आहे.

ही बदल केलेली रचना :
प्रीत गझलियत

बहर दोन मिसर्‍यांस फुलवून गेली
गझल अंतरंगास खुलवून गेली

अलामत जुळावी जशी काफियाशी
तशी प्रीत हृदयांस जुळवून गेली

खयालात धुंदी, सुरा भासली ती
नशा रोमरोमात भिनवून गेली

जमीनीत जडवून सानी उलांना
गझल अंबरी सैर करवून गेली

अमर्याद उल्हास, कैफात गात्रे
गझल प्रीत-झूल्यास झुलवून गेली

.... उल्हास भिडे (२-४-२०१२)

===============================================================
आधीची रचना :

प्रीत गझलियत

बहर दोन मिसर्‍यांस फुलवून गेली
गझल अंतरंगास खुलवून गेली

अलामत जुळावी जशी काफियाशी
तशी प्रीत हृदयांस जुळवून गेली

बिलगली अलामत अशी काफियाला
नशा रोमरोमात भिनवून गेली

पुराण्या रदीफा अतीतात गेल्या
तयां गैरमुरद्दफ मिटवून गेली

जमिनीत जडवूनी सानी उलांना
गझल अंबरी सैर करवून गेली

मतला नी मक्ता दुरावा न राही
द्वीपदावली संग घडवून गेली

उल्हास, तखल्लुस कशाला हवे ते
तुझी प्रीत जगतास दिपवून गेली

.... उल्हास भिडे (२५-३-२०१२)

२ कडव्यांत थोडेसे बदल केले आहेत.... (३०-३-२०१२)

गुलमोहर: 

व्वा!! नावीन्यपूर्ण.....

बहर दोन मिसर्‍यांस फुलवून गेली
गझल अंतरंगास खुलवून गेली

अलामत जुळावी जशी काफियाशी
तशी प्रीत हृदयांस जुळवून गेली

मस्त शेर, आवडले.

गझलेत का नाही टाकलीत?

सदर गझलेस चीतपट गझल असे म्हटले जाते.
नवीन शिकणा-यांना हा प्रकार लगेच जमणार नाही. त्यांना खडाखडी हा प्रकार पुरेसा आहे. निकाली गझल हा प्रकार त्यानंतर जमतोच. एकदा चीतपट गझल जमू लागली कि पुढे जंगी गझलेचा प्रयत्न करायला हरकत नाही.

कळावे आपला नम्र
ग.पै
किरणौस्ताद

छान!!!

अनेक ठिकाणी वृत्त भंगलेले आहे

अर्थात, आपला तसा हेतूच नसेल तर गोष्ट वेगळी

रचना आवडली नाही

क्षमस्व

उल्हासजी:
हे काव्य लिहिण्यामागे काही प्रेरणा दिसून येत नाही. काही एक भावना किंवा अर्थ पोचविण्याचा प्रयत्न आहे असेही नाही. मग गझलेतील तांत्रिक शब्द एकमेकाला जोडून काय साधले गेले?

प्रद्युम्नजी,
तुमच्या प्रांजळ, मनमोकळ्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
“गझलेतील तांत्रिक शब्द एकमेकाला जोडून काय साधले गेले?” >>>>>>>
नुसते शब्दच जोडायचे असते तर,
“मक्ता रदीफ काफिया
शेर मिसरा मतला
जमिनीस ये बहर
शेर असा मी रचला”
हे असलं काही(तरीच) लिहिता आलं असतो हो. पण माझा तो पिंड नाही.

प्रत्येक कवितेत भाव असायलाच हवा यात वाद नाही. पण प्रत्येक वेळी कविता भावाने ओथंबलेली, थबथबलेली इ.इ. असतेच असं नाही. काही कवितांतून हलके-फुलके भाव देखील व्यक्त होतात.

सदर कविता गझल नसावी, कारण ती मात्रावृत्तात लिहिली गेली आहे, आणि माझ्या माहितीनुसार गझलेत शक्यतोवर मात्रावृत्त वापरले जात नसावे. आणखीही काही कारणांमुळे गझलेचे निकष ती कदाचित पूर्ण करत नसावी. ही कविता म्हणून ’कविता विभागात’ प्रकाशित केली असल्याने हा उहापोह इथे अस्थानी आहे.
त्यामुळे मी आता मूळ कवितेकडे वळतो.

“हे काव्य लिहिण्यामागे काही प्रेरणा दिसून येत नाही.” >>>
मी सद्ध्या गझलेचा अभ्यास करतोय आणि त्यातून कळलेले तांत्रिक शब्द मानवी भावनांशी साधर्म्य दाखवतात असा विचार मनात येणे हीच यामागची प्रेरणा.
शब्दांना चेतनागुणोक्तीने अलंकृत करणं यात काही चूक असावी असं मला वाटत नाही.

प्रत्येक कडव्यातील गझलेतील शब्द, ही ’प्रतीकं’ आहेत. कशी ती पहा :
(१) “बहर दोन मिसर्‍यांस ....”
’ती’ आणि ’तो’ हे दोन मिसरे. त्यांच्या मनात ’बहर’(गझलेचे वृत्त) प्रीत फुलवून गेली.
कारण ’उला’ आणि ’सानी’ हे दोन मिसरे, एकमेकांशी विशिष्ट बहरेने (आणि आशयाने देखील) जोडलेले असतात.
त्यांच्यात प्रीत-गझल फुलली.

(२) "अलामत जुळावी....." ज्याप्रमाणे अलामत आणि काफिया यांचं अतूट नातं असतं त्यानुसार त्या दोन हृदयांना प्रेमभावनेने जुळवलं.

(३) "बिलगते अलामत ...." अलामत जशी काफियाला अगदी चिकटून असते त्याप्रमाणे ’ती’ ’त्या’च्या अंगाला ’त्या’ भावनेने भिडली. थोडंफार शृंगारिक.

(४) "जुन्या त्या रदीफा ...." इथे रदीफ हे आठवणींसाठी वापरलेलं प्रतीक आहे. त्या जुन्या (कटु) आठवणींना आता मिटवून (आयुष्यातून काढून) टाकलं आहे. ’गैरमुरद्दफ’ गझलेत ज्यानुसार ’रदीफ’ नसते त्याप्रमाणे.

(५) "जमिनीत जडवून ...." गझलेतील प्रत्येक एलिमेंट गझलेच्या आकृतीबंधात (जमीन) एखाद्या रत्नाप्रमाणे जडवलं जातं, तसे हे दोन मिसरे (सानी, उला) या प्रेमाच्या ’जमिनी’त जडवले गेले.
प्रेमात पडणारे हवेत उडत असतात म्हणून अंबराची सैर .... जमीन, अंबर यांच्या सरळ शाब्दिक अर्थातून थोडासा विरोधाभास.

(६) "मतला नी मक्ता ....." मतला आणि मक्ता ही पुन्हा ’तो’ आणि ’ती’ साठी वापरलेली प्रतीके.
’तो’ आणि ’ती’ (मतला आणि मक्ता) यांना स्वतंत्र अस्तित्व असूनही त्यांच्यातली द्विपदावली म्हणजेच प्रेम/शृंगार यातील विविध घटना, क्रीया इ.इ. त्या दोघांत एक अतूट संबंध घडवतात.
(द्विपदावली = अनेक शेर ... हा मात्र मी घडवलेला शब्द)

(७) "उल्हास, तखल्लुस ....." या ओळी मात्र थोड्या अवांतर आहेत. नसत्या तरी चाललं असतं. पण सुचल्या म्हणून लिहिल्या. उल्हास, तू तखल्लुस( = टोपणानाव/उपनाम) घेण्याच्या फंदात पडू नको.
इथे अशी अनेक उपनामे आहेत, जी त्यांच्या लिखाणाने जगाला(गझल/काव्य जगत) दिपवून गेली आहेत. तू सामान्य आहेस, जगाला दिपवण्याची क्षमता तुझ्यात नाही. तुझ्या स्वत:च्या डोक्यात प्रकाश पडला तरी खूप..... Wink Proud

----------------------------------------------------------------------------------------------------------------
बेफिकीरजी धन्यवाद.

रसिक मित्रांचे तर्कशुद्ध नकरात्मक प्रतिसाद देखील मला आदरणीय वाटतात.
आपलं सादरीकरण दुसर्‍यांच्या नजरेला कसं वाटतं हे फार महत्वाचं समजतो मी.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद.

उकाका :
अनेक ठिकाणी वृत्त भंगलेले आहे अर्थात, आपला तसा हेतूच नसेल तर गोष्ट वेगळी>>>> सहमत !!!!
यावर जरूर विचार व्हावा......

ही रचना थोडी डागडुजी करून गझल होऊ शकते .

चेतनागुणोक्तीने अलंकृत करणं यात काही चूक>>>> नाहीच !!

मी प्रयत्न केला असता तर हेच शब्द थोड्याफार फरकाने असेच गुम्फले असते गझलेत!!
मला तुमचे प्रयत्न फार आवड्लेत !!

तुम्ही गझलीयत या गोष्टीचा थोडा अजून सराव करा; आपण दिलेली विष्लेषणे १ ते ७ फारशी 'दिपवणारी' वाटत नाहीयत

बाकी तुमच्या सारख्या मातब्बर कवीनी इतक्या उशीरा गझलेच्या प्रान्गणात पाऊल टाकावे...........ठीक आहे देर आये पर दुरुस्त आये !!
मी जाम खुश झालोय !!

आपल्या स्पष्टीकरणाने माझे समाधान झाले नाही, पण तरीही काही हरकत नाही. तुमच्या इतर कवितांतून आनंद मिळतोच आहे. इतकं निश्चित की ही रचना ज्यांना गझल वा किमान गझलेतील काही शब्द ठाऊक आहेत त्यांच्यासाठीच आहे. माझ्यासारख्या, ज्यांना ही माहिती नाही त्यांना हा अभ्यास केल्याशिवाय समजायची नाही.

उल्हासराव, माफ करा

या रचनेत असे शब्द आहेत की ज्यामुळे स्पष्टीकरण आवश्यक असणार

मात्र एकंदरच कवीने कवितेचे स्पष्टीकरण द्यावे का याबाबत आपले मत काय?

तंत्रशुद्धतेमध्ये अनेक बंधने आल्यामुळे संदिग्धता प्रवेश करताना दिसते'

मुक्तछंदात व छंदमुक्त रचनेत तोही प्रश्न येत नाही तरी जाणीवपूर्वक व जेवणातील लोणच्यासारखी व लोणच्याइतकी संदिग्धता कवी आणताना दिसतात

आपल्या या रचनेत संदिग्धता आहे असे मला वाटले नाही

मात्र कवीने कविता करून प्रकाशित केल्यानंतर तिची जबाबदारीच नाकारावी असे माझे मत आहे

'मी हे लिहिले, आवडले तर आवडले, नाही तर नाही' असा स्टॅन्ड आंतरजालावर घेतला जाणे फारच कमी होते असे आपले एक वाटते

हार्ड कॉपी स्वरुपात समोर कविता आल्यानंतर वाचकाला काय वाटते यावर कवी आपली भूमिका कधीच सांगत नाही

पण आंतरजालावर तसा वाव असतो

अशा वेळी कवितेकडे प्रामाणिकपणे पाहणार्‍यांनी प्रकाशित कवितेची जबाबदारीच घेऊ नये असे माझे थोडेसे ठामच मत आहे

अधिक उणे बोललो असल्यास क्षमस्व

Happy

बेफ़िकीर | 26 March, 2012 - 11:38 >>>>
बेफिकीरजी,
तुमच्या या प्रतिसादातील बरेचसे मुद्दे वेगळ्या धाग्यावर चर्चा करण्यासारखे आहेत. मी काही दिवसांपूर्वी कविता या विषयावरील जनरल चर्चेसाठी एक धागा सुरू केला जावा असे सुचविले होते. त्याबाबत गांभीर्याने विचार केला गेला पाहिजे असे वाटते.
"अधिक उणे बोललो असल्यास क्षमस्व" >>> काहीतरीच काय बोलताय बेफिकीरजी !
तुमच्याकडून असं वर्तन माझ्याबाबतीत तरी कधीच घडल्याचं स्मरत नाही.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------
वैभव वसंतराव कु... | 26 March, 2012 - 11:26 >>>>
वैभव्जी,

“तुमच्या सारख्या मातब्बर कवीनी इतक्या उशीरा गझलेच्या प्रान्गणात पाऊल टाकावे...... “ >>>>
मातब्बर कवी ? …. आणि मी ? छे हो ! मी स्वत:ला कवी समजत नाही, कुणी तसे म्हटल्यास मला रुचत नाही. (अर्थात् तुम्ही काय म्हणावे हा सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे.) मला कवी म्हणण्याबाबत माझे स्पष्ट मत : ५-५० कविता लिहिल्या म्हणून मी कवी झालो नाही. कवी तो असतो ज्याच्या डोक्यात काव्यकल्पना सतत जागृत असतात, त्याचं डोकं म्हणजे कल्पनांचं भांडार असतं. सातत्याने त्यात उलथापालथ घडत असते.
काही काही तीर्थक्षेत्रांवर पवित्र पाण्याचे कुंड असतात ना, ज्यांच्यात तळाशी असलेल्या कुठल्याश्या अदृश्य जागेतून सतत वाहणारे झरे असतात. तसं असतं कवीचं मन आणि डोकं.

नाहीतर आमचं म्हणजे माझं डोकं !! (आधी आहे की नाही हे तपासायला लागेल. दोन अडीच वर्षांपासून कविता लिहायला लागल्यापासून गुढगे-दुखीचा त्रास सुरू झालाय Wink :P) हे डोकं त्या कुंडासारखं नसून एखाद्या डबक्यासारखं आहे, ज्यात साठलेल्या पाण्यात कधीतरी केव्हातरी ’डुबुक’ असा आवाज काढत एखादा बुडबुडा उठतो.

“गझलेच्या प्रान्गणात पाऊल” >>>> अत्ता कुठे मी गझलेची थोडी थोडी माहिती करून घेतोय. गझल विभागात मी अजून प्रतिसादही देत नाही. कारण गझल तंत्र-मंत्राबाबत बर्‍यापैकी ज्ञान मिळवल्याशिवाय तिथे प्रतिसाद देणं संयुक्तिक वाटत नाही. आणि प्रांगणात पाऊल याबाबत म्हणायचं तर (तुमच्या स्टाइलमध्येच सांगायचं झाल्यास) ते कधी पडेल हे एक पांडुरंगच जाणे.

उल्हास भिडे ह्यांना गझल शिकण्याची उर्मी निर्माण झाली आहे अशा अर्थाने मी हा प्रयत्न घेतला त्यामुळे खास त्या उर्मीकरीता प्रोत्साहनच देत आहे.

शेवटी धडपडतच शिकता येईल असे वाटते. उल्हास भिडे सिद्धहस्त कवी असले तरी गझल लिहीताना ते नवकवी आहेत अशी भावना सर्व जाणकारांनी ठेवणे गरजेचे आहे असे वाटते.

बरोबरय विदिपा...............सहमतय मी!!
माझ्याबाबतीतही हेच कुणीतरी म्हणायला हवय ............(.सिद्धहस्त वगैरे शब्द वजा करून)

माझ्याबाबतीतही हेच कुणीतरी म्हणायला हवय ............(.सिद्धहस्त वगैरे शब्द वजा करून)>>>

म्हणेल की कुणीतरी... विठ्ठल तरी नक्कीच म्हणेल.... थोडे नम्र आणि प्रेडीक्टेबल झालात तर सगळे मायबोलीकरही म्हणतील.

बाकीची दुनिया गेली तेल लावत, हाकानाका.

आधीच्या रचनेत थोडेफार बदल केले आहेत.
त्या वेळच्या प्रतिसादांच्या संदर्भांसाठी ती रचना खाली तशीच ठेवली आहे.

Pages