जसे आले जिणे नशिबी तसे कुरवाळले होते

Submitted by एम.कर्णिक on 12 January, 2012 - 07:46

कधी दुथडी भरुन पाणी बघूनी भाळले होते
अता स्वच्छंद झरणारे उमाळे वाळले होते

फुलुनि गेली फुले आणि सुकूनी जाहला कचरा
तरी केसात गजर्‍याला उगाचच माळले होते

अहंकारास पोसाया नको तो ध्यास धरला अन
किती भोंदू स्तुतीपाठक फुकाचे पाळले होते

अशा भाटांस बसवियले खेटुनी पाट पाटाशी
सुजन, भेटायचे ज्याना, उगाचच टाळले होते

मलीदा खावयाला रे तुम्ही सोकावला होता
कधी दुखा:मधे माझ्या न अश्रू ढाळले होते

जपुन टाकूनही पाउल कशाची बोच लागावी?
मुलायम मख्मलीवरही ठसे रक्ताळले होते

कधी मनमोकळे जगणे कधी होऊनिया कुंद
जसे आले जिणे नशिबी तसे कुरवाळले होते

गुलमोहर: 

अहंकारास पोसाया नको तो ध्यास धरला अन
किती भोंदू स्तुतीपाठक फुकाचे पाळले होते>>>>>कवितेची स्तुती करू की ऩको,पेचात पडलोय.

फालकोर, प्रदीप, पाषाणभेद, प्रद्युम्न, तुम्हा सर्वांचे मनापासून आभार.
विभाग्रज, दॅट्स अ गुड वन. खूप आवडला हा कौतुक करण्याचा मार्ग. 'गजलसदृष' रचनेबद्दलची निर्व्याज स्तुती पोचली. विशेष आभार तुमचे.

छान

अतिशय सुंदर. प्रत्येक कडवं पटलं. आशयघन

जसे आले जिणे वाट्या तसे कुरवाळले होते
ही ओळ अर्थपूर्ण आहे, मात्र वाट्या हा शब्द खटकतो.

जसे आले जिणे वाटेस ते कुरवाळले होते
याप्रमाणे काही बदल करता आला तर सुचवावासा वाटतो.

सर्वांचे परत एकदा आभार.
मैत्रेयी, मलाही तो शब्द खटकत होताच. तुम्ही निर्देशिल्यावर जास्तच खटकला. मात्र 'वाट्याला येणे' आणि 'वाटेस येणे' यात फरक आहे तेव्हा खटकणारा शब्द बदलून 'नशिबी' हा शब्द घातला आहे. पहा ठीक वाटतोय का. माझी ही कविता बारकाईने विचारात घेण्याइतक्या योग्यतेची तुम्हाला वाटली यात भरून पावलो.