ट्रेकमय झिंदगी !

Submitted by Yo.Rocks on 14 November, 2011 - 14:27

नुसतं ट्रेक करायचं म्हटलं की अंगातले रक्त सळसळत... वेगळाच उत्साह संचारतो.. ट्रेकचा दिवस उजाडण्यासाठी काउंटडाऊन सुरू होते... पूर्वी कधी तिथे गेले नसल्यास एक नविन अनुभव गाठीशी पडणार, नविन काहितरी बघायला मिळणार म्हणून मनातल्या मनात आनंदाचे उमाळे येत राहतात.. तर उलट आधी जाउन आलेलो असल्यास 'This is my IInd Time or IIIrd Time ' इति इति म्हणत अभिमानाने मिरवायचे... ट्रेक म्हणजे फक्त गड किल्ल्यांची केलेली भटकंती नव्हे.. तर डोंगरदर्‍यांवर केलेले प्रेमही असते.. मग त्यात घाटरस्तेही आले.. डोंगरवस्तीतील जंगल आले..तरीसुद्धा गडकिल्ल्यांच्या खुणा असल्या वा इतिहासाची काही पार्श्वभूमी असली तर एक वेगळाच आदर मनात दाटून येतो... त्यामुळे कधी एकदा तो क्षण येतोय नि पाठीवर सॅक टाकून चालू पडतोय म्हणून होणारी तळमळ.. रोजच्या रटाळ धावपळीच्या जीवनापासून दुर जाण्यासाठी आसुसलेले ट्रेकरचे मन... जसा दिवस जवळ येतो तसे इतर कामांतून लक्ष उडालेले हे ट्रेकरचे मन.. आठवडाभरच्या व्यापातून, घुसमटीतून सुटका व्हावी म्हणून विकेंडची आतुरतेने वाट पाहणारे ट्रेकरचे मन.. आणि एकदा विकेंड आला की ट्रेकींगच्या नावाखाली गडकिल्ल्यांच्या साक्षीने निसर्गसृष्टीत मुक्तविहार करण्यास बाहेर पडणारे असे हे ट्रेकर्स म्हणजे नादान परिंदेच..

ट्रेक हा सुनियोजीत असतोच असे नाही.. उलट कसलीही आखणी न करता अगदी शेवटच्या क्षणी इथुनतिथून झटपट माहिती मिळवून वाटांचा शोध घेत केलेला ट्रेक कधीतरी जास्त आनंद देउन जातो.. न विसरता येण्याजोगी एक आठवण देउन जातो.. शेवटी काय 'घाम गाळून अमाप तंगडतोड करून जिद्दीच्या बळावर केलेले लक्ष्यवेध' नेहमीच समाधानकारक ठरते.. अगदीच लक्ष्यवेध नाही साधले तरीसुद्धा एक जबरी अनुभव म्हणून या घटनेची हृदयाच्या कुठल्या तरी कप्प्यात नोंद जरुर केली जाते..

शेवटी ट्रेक तो ट्रेक.. तो काही ट्रिप नव्हे.. आणि जर का ट्रिप असेल तर तो काही ट्रेक नव्हे ! ट्रेकची कठीण, मध्यम, सोप्पी अशी वर्गवारी केली जाते.. पण कुठलाही ट्रेक हा सोप्पा नसतो.. जिथे घामाच्या धारा, तंगडतोड, घशाला कोरड, तडजोड अशा गोष्टींचा संबंध येत नाही तो खरा ट्रेक म्हटलाच जाउ शकत नाही.. पण इतकी कटकट असूनदेखील हे नादान परिंदे आवडीने या डोंगरदर्‍यांमध्ये मुक्तविहार करतात.. ! किंचीतशी जोखीम पत्कारून धाडस करतात.. ! मार्ग कितीही खडतर असला तरी तो मोठया जिद्दीने पार करून अस्सल मजा चाखतात.. !

तर असे हे ट्रेकर्स विकेंडला नेहमीच्या 'फॉर्मल' पोषाखातून बाहेर येतात.. त्याचबरोबर पायातील नेहमीच्या पादत्राणांची जागा ट्रेकींगचे शुज/ फ्लोटस बळकवतात..

पायात ट्रेकींग शुज घालून पाठीवर सॅकचे वजन आनंदाने घेउन बाहेर पडायचे.. मुंबईतील ट्रेकर्सना तर पहाटेच्या पहिल्याआणि रात्रीच्या शेवटच्या कर्जत-कसारासाठीच्या ट्रेन ओळखीच्या झालेल्या असतात.. कल्याण, मुरबाड, लोणावळा, स्वारगेट येथील एसटी स्टँड नि तिकडचे स्टॉल्स पण ओळखीचेच..

ट्रेकला सुरवात झाली की वाटेतील वैविध्य जोखण्याजोगे असते.. वाटेची सुरवात जर गावाकडच्या शेतमळ्यांमधून होणारी असेल तर अधिक सुखावह ठरते...

(फोटो : विनय भीडे)

पुढे मग ती वाट कधी दाटझाडींच्या भोगद्यातून जाते..

तर कधी नकळत धुक्यात हरवलेली असते...

कातळकडयाच्या खोबणीतून जाणारी वाट असतेच.. तर कधी कधी चक्क दोन कातळांच्या मधून जाणारी सांधण दरीसारखी वाट लागते..

कधी कधी पाण्याच्या खळखळत्या प्रवाहातूनच मार्गाक्रमण करावे लागते..

हे खरेतर झाले ट्रेकमध्ये लागणार्‍या वाटेचे त्यातल्या त्यात सौम्य स्वरुप..

याउलट वाटेचे रौद्र रुप बघेबल असते.. जणू काही गाठ माझ्याशी आहे असे सांगत असते.... याचठिकाणी नवख्या ट्रेकर्संना घाम फुटतो तर अनुभवी ट्रेकर्सलोकांच्या अंगात येते... Proud
मग ते मंडण (मदन) गडावरील चढाईत लागणारे अरुंद व धोकादाय़क वळण असो...

वा भर पावसात भिमाशंकरला जाण्यासाठी शिडीघाटाचा मार्ग असो...

तर कधी कधी दरीत लोटू पाहणार्‍या कलावंतीण सुळक्याच्या पायर्‍या... !

नाळीच्या वाटेची व्याख्याच भारी...

तर 'ढाक बहिरी' सारख्या ठिकाणी कातळकडयाला स्पायडरमॅनसारखे चिकटून जावे लागते..

जिथे उभे रहायला थारा नाही तिथे रोपचा आधार लागतोच...

तसे म्हणायला गेले तर ट्रेकमध्ये लागणार्‍या वाटेबद्दल खूप काही सांगता येइल.. डोंगराच्या सोंडेवरुन जाणारी वाट, पावसातील चिखलवाट इति... ऋतू जसा बदलतो तसा निसर्ग आपले रुप बदलतो.. एरवी सोप्पी वाटणारी वाट पावसात अत्यंत बिकट बनून जाते.. भरगच्च झाडींच्या सावलीतून जाताना जितके प्रसन्न वाटते तितकेच मार्च एप्रिल महिन्याच्या भरउन्हात झाडांचे सांगाडे बघत जाताना त्रासदायक वाटते.. परिस्थिती काहीही असो ट्रेकर्स परिंदे इकडे तिकडे भटकतच राहतात...

उन्हाळ्यात उनाचा त्रास नको म्हणून नाईट ट्रेक चा घाट घालतात.. तो थरारदेखील अनुभवण्यासारखाच..

चढाईमध्ये वाट तुडवताना क्षणभर विश्रांती लागतेच.. मग होणारे लगेच होतात आडवे !

पाणी म्हणाल तर बाटलीतले पाणी उन्हाळ्यात घोटभरच पिऊन तहान भागवतात.. हिंवाळ्यात पावसाच्या पाण्यामुळे कुठे ना कुठे तरी नैसर्गिक साठा थोडया स्वरुपात का होईना उपलब्ध असतो.. पावसाळ्यात मात्र प्रश्णच नसतो... वाटेत लागणारे झरे बाटल्या भरून घ्या सांगत असतात. Happy

कडक उन्हाळा संपला की ट्रेकचा ज्वर वाढू लागतो..पावसाने हवा ओली होते नि ट्रेकरच्या मनाला देखील मग पालवी फुटते.. विंडचिटर, सॅकपॅकची तयारी केली जाते... पावसाळ्यात एकदिवसीय ट्रेकवरच भर दिला जातो.. पण भिमाशंकर, हरिशचंद्रगडासारखा एखाद दुसरा दोन दिवसाचा ट्रेकही केला जातो.. पावसाळ्यातले निसर्गसौंदर्य अनुभवताना स्वर्गात प्रवेश केल्यागत भासते.. ओल्या ओल्या चिंब हरितसृष्टीचे कितीही वर्णन केले तरी शब्द तोकडेच पडतील...

मग ते हिरव्या दरीत कोसळणारे शुभ्र पाणी असो..

वा कातळकडयांना फुटलेले धबधब्यांचे शुभ्र कारंजे असोत...

बेधुंद पावसात मदहोश व्हायला कुणाला नाही आवडणार...

ढगांशी मुकसंवाद करत थंडगार ओल्या हवेचा आस्वाद घेणे म्हणजे ट्रेकरला हवेहवेसे वाटणारे..

(अस्मादीक आस्वाद घेताना)

विविधरंगी रानफुलांचे दर्शन डोळ्यांना सुखावहच ठरते.. 'सोनकी' तर सह्याद्रीची लाडकी...

हा पाउस जाता जाता कारवीच्या जंगलाला मोकाट वाढवून ठेवतो.. या झाडीशी झटापटी करत मार्गाक्रमण करणे जिकरीचे.. त्यात पुढे जाणारी पाउलवाट शोधणे कठीणच.. पण चाचपडत का होईना ट्रेक सुरुच राहतो.. मग अगदी आतापर्यंत चालून आलेली पाउलवाट दाट झाडीत लुप्त झाली तरी चालेल...

जसा पावसाळा मागे पडतो तसा ट्रेकर्सलोकांचा आनंद द्विगुणीत होतो.. कारण आता वेध लागतात अवघड श्रेणीच्या ट्रेकला हात घालण्याचे.. दोन-तीन दिवसाचे ट्रेक करण्याचे... कुडकुडत्या थंडीत गडावर रात्र काढण्याचे...

चढता चढता कुठल्या तरी कपारीत्/गुहेत बसावे..अन क्षणभर आतापर्यंत केलेली चढाई डोळ्यांत भरून घ्यायची..

तिथेच एक ब्रेक घेउन एकत्रित पेटपूजा करायची...

(फोटो:निलेश गुरव)

नि पुन्हा चढाईला सुरवात करायची...

जसजशे वरती जातो तसतशी उत्सुकतेत भर पडत जाते.. ट्रेक हा जर गडकिल्ल्यांवर जाण्यासाठी असेल तर त्या गडाच्या पुसटशा खुणा पण दिसल्याक्षणी मनात अभिमान दाटून आणतात..दुरुन झालेल्या नुसत्या दर्शनाने दांडगा उत्साह संचारतो.. ! मग तो ढासळलेला बुरुज असो वा तटबंदी असो... ! इथे घडलेला इतिहास काही असो पण इथे कोण्या एका काळी राज्य होते, लढाया व्हायच्या अशा अनेक ऐतिहासिक घटनांची साक्ष देत ते वर्षानुवर्षे उभे आहेत हेच लक्षणीय आहे.. पुर्वीचे महत्त्व, दिमाखदारपणा आता फक्त पुस्तकांत दिसते.. सद्यस्थितीत मात्र झाडेवेलींचा विळखा, प्लॅस्टीकचा कचरा आणि अडाणी लोकांनी भिंतीवर्/कातळावर आपापली नावे कोरुन दाखवलेला सुशिक्षीतपणा याच गोष्टी त्यांच्या नशिबी उरल्या... हे कटू सत्य असले तरी ट्रेकर्सलोकांच्या मनात गडकिल्ल्यांविषयी आदर असतोच.. म्हणून की काय गडकिल्ल्यांचे अस्तित्व त्यातल्या त्यात टिकून आहे.. आज ट्रेकींग ग्रुप्स कुत्र्याच्या छत्रीप्रमाणे भराभर उगवले तरी प्रत्येकाच्या नियमात 'गडकिल्ल्यांना कुठल्याही प्रकारची हानी होउ देउन नये' इति गडकिल्ल्यांच्या व निसर्गाच्या संरक्षणार्थ हे साम्य आढळते.. काहीही असो.. आजही नैसर्गिक भिंतीचा आधार घेउन बांधलेले काही बुरुज वा त्याकाळी बांधलेले प्रवेशद्वार वर्षानुवर्षे वारा-पाउस यांचा मारा खात उभे आहेत..


- - -

बहुतांशीवेळा गडकिल्ल्यांवर चढाई करताना ट्रेकर्सलोकांना एकाची सोबत असते.. तो म्हणजे पायथ्याकडच्या गावातील कुत्रा.. मग तुम्ही राजगड ते तोरणा असा ट्रेक जरी केलात तरी तो तुमची शेवटपर्यंत(किल्ल्यावरती जाईपर्यंत) साथ सोडत नाही.. त्यांना तर रोजचे झालेले असते.. एकवेळ तुमची दमछाक होईल पण हा सोबती सदैव आपल्या पुढेच...

एकदा वरती पोहोचलो की शिवरायांचा जयजयकार करत गडावरती प्रवेश करताना आगळाच जोश येतो.. आतापर्यंतच्या चढाईमुळे थकलेभागलेले जीव आहे त्याच स्थितीत आडवे होतात... तर काहीजण लगेच कडयावर बुरुजावर उभे राहून अवतीभवतीचा परिसर न्याहाळू लागतात... थोडासा फेरफटका झाला की आणलेले डबे उघडले जातात.. ब्रेडबरोबर जाम, चीज, लसुणचटणी, श्रीखंड नाहीतर पराठे हा कॉमन मेनु असतो.. याव्यतिरीक्त आणलेल्या मेनुवर पण ताव मारलाच जातो.. शेवटी काय इतकी चढाई करून आल्यावर पोटात काहीही ढकलले तरी चांगलेच लागते... तिथेच जवळपास पाण्याची टाकी असेल तर रिकाम्या झालेल्या बाटल्या भरुन घेतल्या जातात..

मग सुरु होतो फेरफटका.. जर मुक्काम असेल तर मस्तपैंकी निवांतपणे फिरायचे.. गडावरच्या पुसत चाललेया खुणा शोधायच्या.. मग त्यात एखादी तोफ नजरेस पडते..

तर काहीठिकाणी त्याकाळच्या पाण्याच्या टाक्या नजरेस पडतात..

याशिवाय बर्‍याच खुणा दिसतात.. ढासळलेली तटबंदी, राजवाडे, चौथरे, तुटल्या अवस्थेतील जाते, एखादे छोटे देवदेवतांचे मंदीर वा अजुनकाही.. क्षणभर जरी विचार केला की पुर्वी इथे कसे नांदत असतील तर मति गुंग होउन जाते..!!

गडावरती आल्यावर एक वेगळीच उंची गाठल्यानंतर दिसणारा नजारा अप्रतिमच असतो.. त्यात सभोवतालचे तासलेले सह्याद्रीचे डोंगर-कडे आलेच..

याच डोंगरकडयांबरोबर मग झटापटीचा खेळ आवडीने खेळणारे ढग...

दिवस पावसाचे असतील तर ढगांची जत्रा अनुभवण्यातील मजा काही औरच... या ढगांनी घातलेल्या विळख्यामध्ये थोडी जरी फट राहिली तर त्या फटीतून धरतीला पाहताना क्षणात स्वर्गच गाठल्याचा भास होतो..

तर कधी ढगांच्या भूतलावरील धावणार्‍या सावल्या बघण्यात आनंद मिळतो..

फेरफटका मारताना डोंगराचा वा गडाचा प्रत्येक कोपरा गाठून तिथले तिथले सौंदर्य बघताना वेळ कसा जातो याचे भानच राहत नाही...

सूर्य पश्चिमेकडे कलला की वातावरणात एक वेगळीच धुंद येते.. आतापर्यंत सुर्यप्रकाशात तळपत असणार्‍या डोंगररांगा सौम्य रुप धारण करतात.. धुक्याचे पांघरुण घेउन निजू लागतात.. तर सूर्याचा लालबुंद गोळा हळूहळू फिका पडत पडत क्षितीजापलिकडे लुप्त होतो...

सूर्यास्त झाला की थंड वारे आपली जाणीव करून देउ लागतात.. साहाजिकच गडावरची भ्रमंती आटपून गुहेत वा जिथे मुक्काम ठोकला आहे तिकडे परतावे लागते.. पोटात भुकेचा खडडा पडला नाही तर नवलच.. मग लगेच चूल वा पोर्टेबल स्टोव्ह पेटवून गरमागरम चहा नि मग जेवणाच्या तयारीला सुरवात..

एकत्रितपणे जेवण करतानाची गंमत पण मस्तच असते.. अंधारात टॉर्चच्या प्रकाशात जेवण करताना त्रास असतो.. पण गप्पागोष्टींमध्ये सारे काही विसरायला होते.. जेवण झाले की अंथरुण पसरायचे नि शेकोटीची उभ घेत गप्पा करत काही वेळाने झोपी जायचे..

गुहेत वा मंदीराच्या आवारात असेल तर ठिक अन्यथा उघडया पठारावरच झोपायचे अन आकाशरुपी पडद्यावर निखळणारे तारे मोजत डोळे मिटायचे.. झोपता क्षणीच घोरण्याची स्पर्धा सुरु होतेच.. दिवसभरात केलेल्या मेहनतीचा परिणाम.. गुहेत वा मंदीरात उंदरांचा सुळसुळाट असला तर झोपेचे खोबरे झालेच.. Happy

झोप तासभर का होईना मिळाल्याचे समाधान मानायचे नि लवकर उजाडण्यापूर्वी उठून पुर्वेकडे निघायाचे.. यासाठी सुर्योदय सोहळा बघण्याची आवड हवीच.. एरवी आपण राहतो त्या शहरातून दिसत नाही पण इथे इतक्या उंचीवर डोंगरदर्‍यांच्या पडद्यामागून तांबूस रंगाचा गोळा आपल्या अगदी नजरेसमोर वरती येतो हे केवळ शांतपणे बघत तल्लीन होण्यासारखे.. सूर्योद्य आणि सूर्यास्त ह्या गोष्टीदेखील ट्रेकर्ससाठी हव्याहव्याश्या.. पौर्णिमा असेल तर चंद्रोद्य सोहळादेखील बघण्यासारखाच..

सुर्योद्य बघणारे हौशी असतातच.. पण झोप प्रिय असणारे मात्र उजाडले तरी पांघरुण घेउन कोण चहा देतय का बघत टपलेले असतात.. Happy सकाळचा गडावरच केला जाणारा चहा-नाश्ताचा आस्वाद काही न्याराच असतो..

खाण्याची प्रत्येकाची स्टाईल पण भारी असते.. इंग्लिशमध्ये काय बोलतात तो 'व्हॅकी'पणा ट्रेकरलोकांकडे असतोच.. त्यामुळेच कुठल्याही परिस्थितीशी जुळवून घेण्याची ताकद असते.. भले त्रास झाला तरी हसत खेळत विनोद करत वेळ मारून नेण्यात सगळे माहीर असतात.. काहीतरी वेगळा नमुना दिसतोच ग्रुपमध्ये..

ट्रेकमध्ये सध्या सगळ्यांची सर्वात आवडती गोष्ट असते ती म्हणजे फोटो काढण्याची.. काढून घेण्याची.. आता बहुतेकांकडे कॅमेरा असतोच नि अश्या आठवणींची प्रत स्वतःकडे डिजीटल रुपात ठेवायला कोणाला नाही आवडणार.. शेवटी ही चढाई एक "achievement" च असते.. याच ट्रेकच्या निमित्ताने नविन मित्र जोडले जातात.. नेहमीचेच मित्र असतील तर ट्रेकमस्तीला उधाण येते.. पण सारे क्षण कसे टिपण्यासारखे.. लक्षात ठेवण्याजोगे.. फोटो काढेपर्यंत चेहर्‍यावर आतापर्यंत भोगलेल्या त्रासाची वा झालेल्या दमछाकाची कुठलीही रेष दिसत नाही.. फक्त स्माईल आणि स्माईली आणि धमाल !

(फोटो :आधार कांगो, संकरणःयो रॉक्स)

- - -

- - - -

ट्रेकचा शेवट जर उंचपुरी पहाडाच्याचा साक्षीने पायथ्यालगच्या नदीत वा ओहोळात अंघोळ करून होत असेल तर मग ट्रे़कींग जीव अधिक सुखावतो..

ट्रेक संपल्यावर चहाचे शेवटचे एकत्रितपणे घुटके घेताना एक ग्रुप फोटो हवाच.. जणू एकजुटीचा जल्लोषच ..

- -


(फोटो:अजय कोरपे)

गडकिल्ले केले डोंगरदर्‍या पालथ्या घातल्या..इथे ट्रेक संपत नाही.. तर परतीचा प्रवासदेखील तितकाच महत्त्वाचा.. जितकी ट्रेक सुरु होण्यापुर्वी उत्सुकता असते तितकीच मग ट्रेक संपल्यावर घरी जाण्यासाठी असते.. पण हा प्रवास देखी धमालमस्ती करत पार पाडला जातो.. मग तो एसटीच्या लाल डब्यातून असुदे की ट्रेनमधून असुदे.. टेम्पो असेल तर धमालच..


(फोटो:तन्मय शेंडे, संकरण :यो रॉक्स)

एकंदरीत काय ट्रेकमय जिंदगी न्यारीच.. नेहमीच्या लाईफपेक्षा हटके.. केवळ ट्रेकची आवड या निकषावर मित्रांशी ओळख होते.. नकळत मैत्रीचे नाते गुंफले जाते....बस्स येइल त्या परिस्थितीतून मार्ग काढत पुढे कूच करायचे हेच ट्रेकरला माहीत असते.. साहाजिकच आपल्यातील मानसिक बळ आणि जिद्द या गुणांची पारखण करता येते.. काहीलोक 'ट्रेकींग करणे म्हणजे सपशेल येडेगिरी' असे म्हणतात.. पण ह्या लोकांना आयुष्यात अनुभवण्यासारखे बरेच काही असते हे माहीतच नसते.. नि ट्रेक करुनही जर कोणी वैतागत असेल तर नक्कीच त्याचे सभोवतालच्या निसर्गसौंदर्याशी देणेघेणे नाही असे समजायचे.... याहून सांगायचे तर एक वेगळी दुनिया अनुभवायाला मिळते.. जिथे तुमचा संबंध फक्त आकाश, ढग, सूर्य, चंद्रतारे, फुलझाडे, पक्षीप्राणी नि सभोवतालचे सह्याद्रीचे आकर्षक कडे यांच्याशीच येतो.. यांच्यामुळेच आपण ट्रेकच्या कधी स्वाधीन होतो हे लक्षातच येत नाही.. शेवटी प्रत्येक ट्रेक या ना त्या कारणासाठी यादगार ठरतो.. मानवनिर्मित किमया सगळ्यांनीच अनुभवली असेल.. पण निसर्गाची किमया अनुभवण्यात वेगळाच अभिमान दाटून येतो.. इसी का नाम है 'ट्रेकमय झिंदगी' !

समाप्त नि धन्यवाद Happy

गुलमोहर: 

यो,

मस्तच आहे तुझं शब्दचित्रांकन! ट्रेक हे एक जगण्याचं तत्त्वज्ञान आहे हे अगदी मनापासून पटतं. Happy

आ.न.,
-गा.पै.

झकास ट्रेक वर्णन आणि फोटोन्बरोबर कॅप्शन पण भारी आहेत !
फोटो पाहून ट्रेक ला जायची जाम इच्छा झाली !

य्यो .. फोटॉ जबरॅक्स आवडले ! एक पॅनोरमा आहे तिघे फोटो घेतानाचा. काय क्लास फोटो आहे तो !
अनेक धन्यवाद तुला आणि तुझ्या सोबत्यांना.

>>एकदा वरती पोहोचलो की शिवरायांचा जयजयकार करत गडावरती प्रवेश करताना आगळाच जोश येतो..
अगदी अगदी !!

मस्तच रे ! खूप मनापासून लिहिलं आहेस... ट्रेकिंगवरचं जिवापाड प्रेम दिसून येतय..
लिखाणाला समर्पक फोटो >>> आडो.. अगदी !

तुला असेच भरभरून ट्रेक करायला मिळू देत.. Happy

मनापासुन लिहिलेला लेख खुप आवडला Happy

लिखाणाला समर्पक फोटो.>>>>>+१

तुला असेच भरभरून ट्रेक करायला मिळू देत..>>>>>>अगदी दोन महिन्यानंतरही Proud Happy

त्रिवार सलाम.....................भारी आहे.....

प्रचंड आवडलं लिखाण..
काही फोटो चित्तथरारक आहेत, स्पायडरमॅनसारखं कातळाला चिकटून वर चढत जायचं म्हणजे प्रचंड आंतरिक शक्ती हवी.. कुठेही दमलो म्हणून चालणार नाही.
खरंच हॅट्स ऑफ्फ! Happy

तुला असेच भरभरून ट्रेक करायला मिळू देत..>>>>>>अगदी दोन महिन्यानंतरही
>>
तथास्तु.. Proud

दगडु, फोटो आणि शब्दांकन भारीच. आवड्या.

छान लिहलय, प्रकाशचित्रेही अप्रतिम...:स्मित:
महाराष्ट्रात एवढे दुर्गवैभव आहे. युरोपातील आल्प्स पर्वतरांगातील अवघड अव्हानां प्रमाणे सह्याद्रीपर्वतरांगातही अनेक सुळके, बेलाग कडे आहेत, तरीही महाराष्ट्र पर्यटन विभागाला त्याची जाहीरात करू वाटत नाही हे केवढे दुर्देव.:अरेरे:

काय लिहीलय यार!!!!फोटो पण एकदम सही.काही फोटो बघताना तर अंगावर काटा आला आणि ट्रेक ला जायची जाम इच्छा झाली !

_/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_

शब्द नाहीत माझ्याकडे ...यो रॉक्स रिअली रॉक्स !!!!

यो... तुझा डाव ओळखला बरं....
दोन महिन्यांनी पुढिल ट्रेकसाठी वेगळे वृत्तांत लिहिण्याची सवड मिळणार नाही म्हणून की काय हा लेखाजोखा... फक्त प्रचि टाकायाचे आणि वरिल लेखाची लिंक द्यायची Wink

अगदी मनातलं उतरलयं... मस्तच

तरीही महाराष्ट्र पर्यटन विभागाला त्याची जाहीरात करू वाटत नाही हे केवढे दुर्देव >>> जाहिरात अजिबात नको... ते दुर्लक्षित आहेत तेच चांगले आहे. गडावर जो काय एकांत मिळतो तो का म्हणून गर्दीच्या स्वाधिन करायचा?

Pages