शिवरायांबद्दल परदेशी इतिहासकारांनी काढलेले उद्गार

शिवाजी महाराजांच्या जीवनाचा अनेक परदेशी इतिहासकारांनी आढावा घेतला.काही शिवकालीन होते तर काही नंतरचे होते.यांनी शिवरायांच्या कार्याचे कशा पध्दतीने अवलोकन केले आहे यातुन परदेशी लोक शिवाजी महाराजांबद्दल काय विचार करतात हे दिसुन येते. त्यापैकी काही उद्गारांचे भाषांतर करत आहे.

Thevenot म्हणतो-
शिवाजी राजांचे डोळे तीक्ष्ण होते,आणि त्यातुन असामान्य बुध्दिमत्ता दिसुन येत असे.राजे दिवसातुन एकदाच जेवण करतात आणि ते निरोगी आहेत.

Cosmo Da Guarda म्हणतो-
शिवाजी राजांच्या कृतीत धडाडी होतीच पण त्याचबरोबर त्यांच्या आचरणात्,चालीत एक जिवंतपणा व उत्साह होता.त्यांचा चेहरा स्वच्छ आणि गोरा होता,निसर्गाने त्यांना सर्वोत्तम गुण दिले होते मुख्य म्हणजे त्यांचे काळे डोळे ज्यातुन जणुकाही अग्निज्वाळा येत असत्,आणि याला जोड होती तीव्र्,तीक्ष्ण बुध्दिमत्तेची.

Orme म्हणतो-
शिवाजी महाराजांकडे एका यशस्वी सेनापतीचे सर्व गुण होते.सैन्याचा प्रमुख म्हणुन त्यांनी जितके जमिनीवर जितके अंतर पार केले तितके दुसर्‍या कुठल्याही सेनापतीने केले नसेल.आणीबाणीचा प्रसंग कितीही आकस्मिक अथवा मोठा असला तरीही शिवाजी राजांनी त्याचा विवेकाने व धैर्याने त्वरीत यशस्वीपणे सामना केला.

General Sullivan म्हणतो-
ज्या संत्रस्त काळात शिवाजी महाराज रहात होते त्या काळात सफल होण्यासाठी आवश्यक असलेला प्रत्येक गुण त्यांच्यामधे होता.ते सतर्क होते आणि त्यांची कृती प्रखर व धाडसी असे.त्यांच्यातील सहनशीलता,उर्जा आणि निर्णयक्षमतेमुळे कुठल्याही काळात त्यांच्याकडुन गौरवास्पद कार्य झाले असते.तो एक हिंदु राजा होता ज्याने आपल्या देशी घोड्यांच्या सहाय्याने प्रचंड मुघल घोडदळाला पाणी पाजले.त्यांचे मावळे गनिमी काव्यामुळे त्याकाळातले जगातील सर्वात चांगले पायदळ होते

J. Scott म्हणतो-
शिवाजी राजे एक योध्दा म्हणुन असामान्य होते,राज्यकर्ता म्हणुन निपुण होते तर सद्गुणी लोकांचे मित्र होते.त्यांनी हुशारीने आपली धोरणे आखली तर दृढतेने ती अमलात आणली.कोणीही कधीही त्यांच्या ध्येयाबद्दल अवगत नसे तर प्रत्येक जण त्या ध्येयाच्या पुर्तीबद्दल अवगत असे.

Douglas म्हणतो-
कुठल्याही आणीबाणीच्या समयाच्या वेळी सजग राहुन शिवरायांनी त्याला तोंड दिले.या कलेमध्ये त्यांच्या करंगळीत जेव्हढ होत तेव्हढ औरंगजेबाच्या पुर्ण शरीरात नव्हता.जणुकाही शिवाजी राजे एक डोळा उघडा ठेवुनच झोपत.त्यांनी आपल्या जादुई स्पर्षाने आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्वाने त्यांच्या गरीब्,आज्ञाधारक,दैववादी महाराष्ट्रातील जनतेला अलौकीक कृत्ये करण्यास प्रेरीत केले.ही जनता सर्वोत्तम सैनिक्,पक्के सरदार्,कुशल राजनिती विशारद बनली जिने शेकडो युध्दे जिंकलेल्या मुघलांचा सामना केला.

Abbe Carre म्हणतो-
शिवाजी राजे पुर्वेने पाहिलेल्या सर्वोत्तम योद्ध्यांपैकी एक आहेत.त्यांच्या धाडसीपणामुळे ,त्यांच्या युध्दातील चपळाईमुळे व इतर गुणांमुळे त्यांची तुलना स्विडनच्या महान राजा ऍडॉल्फसशी होउ शकते.त्यांच्या जलद गतीने आणि दयाशीलतेने ज्युलियस सीझरप्रमाणे त्यांनी त्यांच्या शत्रूंचीही मने जिंकली ,जे शत्रु त्यांच्या शस्त्रांमुळे दहशतीत होते.

Dr. John F. G. Careri ( 1695 A. D. ) म्हणतात-
हे शिवाजी राजे इतके बलाढ्य आहेत की ते एकाच वेळी प्रचंड मुघलांबरोबरही लढतात आणि पोर्तुगिजांबरोबरही लढतात. ते रणांगणावर ५०००० घोडे आणतात आणि त्याहुनही जास्त पायदळ आणतात.त्यांचे सैनिक मुघलांपेक्षा कितीतरी चांगले आहेत. हे सैनिक अतिशय थोड्या अन्नावर दिवस काढतात तर मुघल बायका,विविध साधनसामग्री,तंबु घेउन जातात जणुकाही ते एक चालत फिरत शहरच असत.

Daughlas म्हणतो-
शिवाजी महाराज खडकांमधे रहात.त्यांची शक्ती म्हणजे डोंगर दर्‍या होत्या.हा किल्ल्यांमधला माणुस होता ज्याचा जन्मही किल्ल्यामधे झाला होता.किल्ल्यांनी त्याला बनवल आणि त्यानी किल्ल्यांना बनवल.हे किल्ले म्हणजे भारताची दहशत होती,शिवरायांच्या राज्याचे उगमस्थल होते,त्यांच्या युध्दांचा आधार होते,त्यांच्या ध्येयांच्या पायर्‍या होते,त्यांचे घर आणि आनंद होते.त्यांनी अनेक किल्ले बांधले आणि सर्व किल्ले त्यांनी बळकट केले.ही फारच कृपेची गोष्ट होती की शिवाजी राजे दर्यावर्दी नव्हते.नाहीतर जमिनीप्रमाणे समुद्रावरही त्यांनी वर्चस्व गाजवले असते जे वर्चस्व त्यांनी जवळजवळ प्रस्थापित केले होते.त्यांना समुद्र आवडत असे पण समुद्राला ते आवडत नसत.त्यांचे खार्‍या पाण्यावर इतके प्रेम होते की असे म्हणतात की त्यांनी सिंधुदुर्ग बांधताना स्वतःच्या हातानी हातभार लावला होता.त्यांच्या पावलांचे ठसे अजुनही तिथे दाखवता येतात्,काळाच्या वाळुत नाही तर ठोस खडकात.

Da Guarda म्हणतो-
शत्रुमध्ये असा दृढ विश्वास निर्माण झाला होता की शिवाजीराजे सगळीकडे आहेत.ते एकाच वेळी अनेक ठिकाणि चढाई करत असत आणि सर्वच ठिकाणी सैन्याचे नेत्रुत्व तेच करत असत.ह्या प्रश्नाला अजुनही उत्तर मिळालेले नाही की शिवाजी राजे स्वतःच्या नावानी दुसर्‍या कुणालातरी पाठवत असत का त्यांना जादु टोना येत असे का स्वतः सैतान त्यांच्या जागी कार्यरत होता.

Sir E. Sullivan म्हणतात-
शिवाजी राजे हिंदु इतिहासातील सर्वोत्कृष्ठ राजकुमार आहेत.त्यांनी आपल्या ज्ञातीचा पुरातन गौरव वापस आणला जो अनेक शतकांच्या पराधिनतेमुळे नष्ट झाला होता.आणि मुघल साम्राज्याच्या परमोच्च बिंदुला त्यांनी आपले साम्राज्य बनवले,वाढवले जे की हिंदुस्तानातील मुळ लोकांनी काढलेले आत्तापर्यंतचे सर्वश्रेष्ठ साम्राज्य आहे.

Kincaid म्हणतो-
शिवाजी राजे हे मराठा देशाचे मुक्तिदाते होते,त्यांचे गुण विभिन्न होते,जीवन नियमीत होते,स्वभाव सहनशील होता त्यामुळे यात काही आश्चर्य नाही की त्यांचे लोक त्यांना त्यांच्यापैकी एक न मानता त्यांना देवाचा अवतार मानतात.ज्याप्रमाणे अथेन्सचे रहीवासी त्यांचे साम्राज्य लयास जाउन भरपुर कालखंड गेला असुनही भक्तीभावाने Theseus चे पुजन करतात त्याचप्रमाणे मराठे ,शिवरायांच साम्राज्य संपुन भरपुर काळ लोटला तरी अजुनही राजगड्,मालवण मधे त्यांचे पुजन करतात.

Elphinstone म्हणतो-
शिवाजी राजांसारखा प्रतिभासंपन्नच औरंगजेबाच्या चुकांचा फायदा उठवु शकतो त्यानंतर धर्मासाठी प्रेरीत करु शकतो व यातुन मराठ्यांमधे राष्ट्राभिमान जाग्रुत करु शकतो.या भावनांमुळे त्यांचे साम्राज्य अशक्त हातांमधे गेल्यानंतरही तग धरुन होते आणि अनेक अंतर्गत समस्या असुनही भारताच्या एका मोठ्या भागावर त्याने नंतर प्रभुत्व निर्माण केले.

Owen म्हणतो-
वीरता,देशाभिमान्,धर्माभिमानाची प्रभावळ त्यांच्या(जनतेच्या) कार्यवाहीत होती ज्यातुन ते प्रेरीत झाले.त्यामुळे शहाजी राजांच्या पुत्रास ते पुर्वनिश्चित,दैविक कृपापात्र मुक्तिदाता मानत होते.त्यामुळे शिवाजी राजे व त्यांचे अनुयायी असे मानु शकतात व मानत की त्यांच्या पध्दतीने मुस्लिमांबरोबर केलेल्या युध्दामुळे ते देवासाठी व मनुष्यासाठी एक चांगले कृत्य करत आहेत.ज्यामुळे त्यांचा गौरव झाला,त्यांचे फक्त स्वागतच झाले नाही तर प्रशंसनिय रीत्या प्रतिकात्मक लाभही झाला.

टिप्-मुळ इंग्रजीतील वाक्यांमधे Shivaji असा उल्लेख आहे.त्याचे शब्दशः भाषांतर केल्यास शिवाजी असा एकेरी उल्लेख येतो.वाचनकर्त्यांच्या सोईसाठी वर शिवाजी महाराज्,शिवाजी राजे व शिवराय असे शब्द वापरले आहेत.वाक्यांचे शब्दशः भाषांतर करण्याचा प्रयत्न केला आहे पण हा माझा पहीला अनुवाद असल्याने काही चुका असण्याची शक्यता आहे.त्याबद्दल क्षमस्व. सर्व परदेशी लोकांच्या उद्गारांनंतर शेवटी एक भारतीयाने काढलेले उद्गार देतो.

कविराज भूषण म्हणतो-
जंभासुरला जसा इंद्र , समुद्राला जसा वाडवाग्नी,गर्विष्ठ रावणाला ज्याप्रमाणे प्रभुराम, मेघाला ज्याप्रमाणे वादळ,मदनाला जसे शिव शंकर, सहस्रार्जुनाला ज्याप्रमाणे परशुराम,वृक्षाना ज्याप्रमाणे वणवा, हरिणांना जसा चित्ता,अंधाराला जसा प्रकाश, कंसाला ज्याप्रमाणे श्रीकृष्ण,त्याचप्रमाणे नरसिंह असणारे शिवराय म्लेंच्छांचा नाश करतात


Thanks.



धन्यवाद माणसा



लेखनाचा चान्गला उपक्रम हे! स्मित छान!
...;
आपला, लिम्बुटिम्बु



नेहेरुंनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया मध्ये शिवरायांबद्दल जे अनुद्गार काढले (ऐकीव माहिती, चुकीची असल्यास सोडून द्या..) ते कुठल्या इतिहासकारांच्या भाष्यावरून.. मी असेही ऐकले आहे की काही बंगाली इतिहासकारांनी देखील शिवरायांना लुटारु असे संबोधिले होते.. म्हणजे शिवरायांबद्दल ज्यांनी ज्यांनी आक्षेपार्ह लिहिले आहे ते सगळे भारतीय इतिहासकार/लेखकच आहेत का?

त.टी.: माझी सर्व माहिती ऐकीव आहे. चुकिची असल्यास कृपया तसे स्पष्टपणे निदर्शनास आणावे.. विशेषतः केदार जोशी आणि चिन्या सांगू शकतीलच..



चिन्मय धन्यवाद.



छान माहिती दिलीस चिन्मय. चांगलं वाचल्याचं समाधान मिळालं.

***
हस्सरा नाचरा, जरास्सा लाजरा-
सुंदर साजिरा, श्रावण आला..!



चिन्या, संकलनाची कल्पना छान. लेखकांच्या नावांबरोबर त्या पुस्तकांचीसुद्धा नावे देशील का ? धन्यवाद.
नेहरुंचे विधान नक्की काय आहे ? कोणी ते मूळ इंग्रजी विधान इथे देऊ शकेल का ?
बंगाली इतिहासकारांनी मराठ्यांना लुटारू म्हटले आहे कारण पेशवे, नागपूरकर भोसले यांनी बंगालात लूटालूट केली होती. पण शिवरायांनाही म्हटले असेल तर विचित्रच, कारण त्यांनी तर कधीच बंगालात मोहीम आखली नव्हती ना ?

    ***
    It is the spirit of the age to believe that any fact, no matter how suspect, is superior to any imaginative exercise, no matter how true.
    - Gore Vidal



    धन्यवाद लिंबु,प्रतिभा,टन्या,स्लार्ती,सजिरा!!!!!!

    टन्या,नेहरुंनी 'shivaji was a misguided patriot' अस वक्तव्य केल होत.व संसदेत शिवाजि महाराजांना लुटारु म्हटल होत.डीस्कव्हरी ऑफ इंडिया बद्दल मला माहीती नाही.यंग इंडिया मधेही शिवरायांबद्दल खराब छापुन आल होत. गांधी-नेहरु यांना शिवराय आवडायचे नाहीत कारण त्यांनी हिंसाचाराने स्वराज्य मिळवले. शिवरायांबद्दल आक्षेपार्ह लिहिणारे अनेक भारतीय इतिहासकार होते.पण त्याचबरोबर परदेशी इतिहासकारांनीही चुकिच्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. वरील इतिहासकारांनीही शिवरायांबद्दल सर्वच गोष्टी चांगल्या लिहिलेल्या नाहीत.शिवाजी महाराजांनी बंगालात मोहीम आखली नव्हती.पण पेशवाई अस्ताला लागल्यावर काही मराठ्यांनी पैशाची कमतरता असल्याने तिकडे लुट केली होती.बंगाली भाषेत त्यावर एक म्हण पण आहे.
    स्लार्ती,पुस्तकांची नावे द्यायचा प्रयत्न करतो.पण काही इतिहासकार खुप जुने आहेत त्यामुळे त्यांनी पुस्तके लिहिली का नाही माहीत नाही.मला ही वक्तव्ये बाल कृष्ण यांच्या 'शिवाजी-द ग्रेट' या पुस्तकातील वेगवेगळ्या भागातुन मिळाली.



    चिन्या, मी जरा धसकूनच वाचायला सुरुवात केली की आता महाराजांबद्दल काय वाचायला मिळणार आहे कुणास ठाऊक !! (संदर्भ : लेन) पण तसे काही नाही त्यामुळे हुश्श झाले. थँक्स. छान वाटले वाचून.



    चिनू... सुन्दर लिहिलयस....
    जमल तर मुळ उतारे पण इथे टाक...
    - येडचॅप



    छान संकलन. माहितीत बरीच भर पडली. धन्यवाद.



    चिन्या स्तुत्य प्रयत्न.

    गांधी-नेहरु यांना शिवराय आवडायचे नाहीत कारण त्यांनी हिंसाचाराने स्वराज्य मिळवले.
    --- आता महाराजांनी शहेनशाह औरंगजेबाच्या (किंवा विजापुर) दरबारी उपोषणाला बसायला हवे होते, मग त्या दगडाला पाझर फुटुन त्यांनी स्वराज्य दिले असते.



    धन्यवाद्,अश्विनी,येडचॅप,दुसरी अश्विनी आणि उदय.



    पण पेशवाई अस्ताला लागल्यावर काही मराठ्यांनी पैशाची कमतरता असल्याने तिकडे लुट केली होती.बंगाली भाषेत त्यावर एक म्हण पण आहे.>>> पेशवाई अस्ताला लागल्यावर नाही तर उदयास येताना. रघुजी भोसल्याकडे बंगाल प्रांत होता (मराठामंडळ) त्याचा पाडाव बाजीरावानेच केला. पुढे रघुजीच्या पुतन्याने ईंग्रजांचे साहाय्य घेऊन, मोगलांचे छुपे साहाय घेउन पेशव्यांशी युध्द केले त्यात तो हारला. हे सर्व युध्द बंगालात झाले त्यामुळे भाडयाच्या बंगाली सैन्याला मराठी सैन्याने चांगलाच धडा शिकवला. पुढे असे अनेक युध्द होतच राहीले व मराठी लोक बंगालात बदनाम झाले. कारण ते पैशांसाठी कोणाचीही बाजु घेत असत.

    नेहरुंनी डिस्कव्हरी मध्ये लिहीताना लुटारु टाईपचे राज्य अशी भाषा वापरलेली आहे. डिस्कव्हरी वाचुन य वर्षे झाल्यामुळे पुर्ण वाक्य लक्षात नाही. पण नंतर त्यांनी हे राज्य उदयाला आले हे ही लिहीले आहे. या राज्याचे सरदार खंडनी घेउन / पैशांसाठी भांडने करीत हे लिहीले आहे. शिवाजी महाराजांनी ते केले नसले तर त्यांचा नातवाने हे केले आहे त्यामुळे ते अगदी चुक आहे असे नाही.

    शिवाजी महाराजांनी आणखी ऐक राज्य उदयाला आणन्यास मदत केली आहे ते म्हणजे बुंदेल खंड. छत्रसालाला शिवाजीने भाऊ मानले व त्याला मोगलांविरुध्द लढन्यास प्रवृत्त केले. पुढे छत्रसालाने माळव्यात राज्य उभारले.



    बरोबर आहे केदार्.धन्यवाद



    चिन्या१९८५, खूप छान लिहिलसं.. शब्दार्थाच्या बीबीवर तू काही शब्द याच साठी विचारतं होतास तर.. स्मित



    धन्यवाद बी.
    हो यासाठीच शब्दार्थाच्या बाफ वर विचारत होतो



    मी असे ऐकले आहे की ब्राम्हणांनी शिवरायांची जाणुन बुजून बदनामी केली आहे.. ज्या वेदांतामध्ये मराठ्यांना क्षुद्र
    लेखले तो वेदांत शिवरायांना मान्य नव्हता.
    त्यांनी राज्याभिषेकाचा पुजेचा सोहळा
    'महानुभाव पंथा' कडून करून घेतला होता..
    हे सर्व खरे आहे का?
    असल्यास कोणी विस्तारीत माहीती देईल का?



    सुभाष्,हे काही पुर्णपणे खर नाही.काही ब्राह्मणांनी राज्याभिषेकाला विरोध केला होता कारण त्यांचे म्हणने होते की शिवाजी महाराज शुद्र आहेत्.कारण त्यांचे म्हणने होते की कलियुगात ब्राह्मण आणि शुद्र हे दोनच वर्ण राहिले आहेत्. पण ब्राह्मणांबरोबरच मोहिते,घोरपडे,मोरे,घाटगे,शिर्के,गुजर्,दळवी,सावंत यांनीही राज्याभिषेकाला विरोध केला होता.पण तरीही अनेक ब्राह्मण शिवरायांच्या बाजुनी होते. शिवराज्याभिषेकाला २०००० ब्राह्मण उपस्थित होते.गागाभट्टाने शिवराज्याभिषेक करवला होता. तो महानुभाव पंथानुसार माझ्या माहीतीप्रमाणे तरी झाला नव्हता.मुळात महानुभाव पंथात असा राज्याभिषेक असतो का नाही माहीत नाही.पण शिवरायांच्या पुर्वीच्या अनेक शतकांमधे असा कोणाचाही राज्याभिषेक झाला नव्हता. राज्याभिषेक ही हिंदुंनी धर्मग्रंथांमधे वाचलेली गोष्ट होती.राजपुतांचाही असा राज्याभिषेक झाला नव्हता. राज्याभिषेकास विरोध करणार्‍या व्यक्तींचे म्हणने होते की शिवरायांनी काही वेळा ब्रह्महत्या केलेली आहे त्यामुळे त्यांचा राज्याभिषेक होउ शकत नाही पण गागाभट्टांनी असे सांगितले की कृष्णाजी भास्कर कुलकर्णी वगैरे प्रॅक्टिसिंग ब्राह्मण नव्हते, ते जे काम करत होते ते क्षत्रियाचे होते त्यामुळे त्यांना मारणे ब्रह्महत्या ठरत नाही.दुसर म्हणजे माझ्या माहीतीप्रमाणे वेदांतात असे काहीही लिहिलेले नाही.
    संभाजी ब्रिगेड खोट्या गोष्टी पसरवते.



    धन्यवाद चिन्मय,
    चांगली माहिती मिळाली..
    मला राजे संभाजी बद्दल जास्त माहीती हवी आहे. ती कोणकोणत्या पुस्तकातून मिळेल?
    राजे संभाजी SANSKRIT चे गाढे अभ्यासक होते का?
    सुभाष



    संभाजी राजे संस्कृतचे गाढे अभ्यासक होते व त्याबरोबर त्यांना इतर ६ भाषाही येत असत्.विश्वास पाटिल यांचे 'संभाजी' पुस्तक चांगले आहे.
    मायबोलीकर केदार जोशी यांना तुम्ही संभाजी राजांबद्दलची इतर पुस्तके विचारा.मी जास्तकरुन शिवाजी राजांवरचीच पुस्तके वाचली आहेत.



    छावा (वाघाचा बछडा) - श्री. शिवाजी सावंत, शेवटचे पन्नास पाने वाचतांना अंगावर काटा येतो.
    http://www.rasik.com/cgi_bin/display_book.cgi?bookId=b61327&lang=marathi

    छत्रपती संभाजी महाराज - (W.S./ V.C., नक्की माहीत नाही) बेंद्रे



    श्री छत्रपति शिवाजी महाराजांवर श्री. धर्माधिकारी यांची दोन व्याख्याने नुकतीच इ प्रसारण वर ऐकण्यात आली. जरूर ऐकावीत.
    हे खरे की संभाजी ऐवजी राजारामाला गादी मिळावी म्हणून भांडणे झाली. ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट. चूक कुणाचीहि असो, काही चांगली मंडळी मारल्या गेली. त्यानेच राज्य कमकुवत होते.
    दुसरी वाईट गोष्ट म्हणजे शाहूराजे परत आले नि त्यांनी सांगितले की मराठी राज्य मुगलांचे रक्षण करील! म्हणजे श्री छत्रपति शिवाजी, व संभाजी यांची स्वप्ने धुळीत मिळाली! मग काय उरले करायला? आपआपसात भांडणे, संकुचित दृष्टि, नि स्वार्थ.
    भोसले पंतप्रधान होऊ शकले नाहीत, पण त्यांना सांभाळून घ्यायला पाहिजे होते, मराठी राज्यातच ठेवायला पाहिजे होते, त्यांना बंगालवर स्वारी करायला मदत करायला हवी होती, नि मराठी साम्राज्य विस्तारायला पाहिजे होते. बंगालमधे लुटालूट करण्या ऐवजी महाराष्ट्रात जशी न्यायाची, कायदेशीर व्यवस्था होती तशी तिथे करायची. त्या ऐवजी त्या प्रांताला वार्‍यावर सोडले!
    पण शाहूमहाराजांचा आदेश की मुघलांचे नि त्यांच्या राज्याचे संरक्षण, या पायी भोसले नि पेशवे यांच्यात युद्ध!
    वाईट वाटते १७०० नंतरचा मराठ्यांचा इतिहास वाचताना!
    अजून तरी काय? आपआपसातली भांडणे संपली आहेत का? डझनावारी पक्ष, त्यांची एकमेकांशी नि शिवाय आप आपसात भांडणे. क्षुद्र वृत्तीची माणसे, श्री शिवाजी महाराज, किंवा बाजीराव, माधवराव यांच्यासारखे लोक कुठे गेले आता? राज्यकारभार, प्रगति याचे काय?



    इ-प्रसारण वर व्याख्याने कशी ऐकायची? म्हणजे दुवा मिळु शकेल का?
    चिन्या, विश्वास पाटलांचे 'संभाजी' तुझ्याकडे इथे (रशियामध्ये) आहे का?



    झक्की ,इतिहासापासुनच आपण मराठी माणसे एकमेकांत भांडत आलो आहोत. अजुनही ते चालुच आहे.
    टन्या,ते पुस्तक इथे नाहीये.भारतात असताना वाचले होते.



    अतीशय सुंदर अनुवाद केला आहेस.



    www.eprasaran.com
    या ठिकाणी आता दर शुक्रवारी श्री. धर्माधिकारी यांची निरनिराळ्या नेत्यांबद्दल भाषणे असतात. आत्तापर्यंत श्री. छत्रपति शिवाजी महाराज नि बाबासाहेब आंबेडकर यांची चरित्रे झाली. अजून खूप आहेत.
    तेथील हिंदी व मराठी गाणी पण छान असतात, आपली आवड कळवली तर लावतात दर मंगळवारी.



    धन्यवाद बंडुपंत