विवेक आणि विद्रोह : डॉ. अरुणा ढेर्‍यांची प्रस्तावना

Submitted by गामा पैलवान on 24 June, 2011 - 16:20

विद्रोह आणि विवेक या पुस्तकाला डॉ. अरुणा ढेरे यांची प्रस्तावना लाभली आहे. तिचा जालनिर्देश येणेप्रमाणे :
http://www.maayboli.com/node/25475

ही प्रस्तावना वाचतांना काही गोष्टी माझ्या ध्यानात आल्या. त्या जमतील तशा रीतीने खाली मुद्यांत मांडल्या आहेत. यावर विचारमंथन सुरु व्हावे अशी इच्छा आहे. संपूर्ण पुस्तक मी वाचलेले नाही. केवळ उपरोल्लेखित दुव्यातील लेख (=प्रस्तावना + जाणता राजा) वाचला आहे.

१.
>शब्दप्रामाण्य मानणारा आणि सर्वच सामाजिक संस्थांना अपरिवर्तनीय मानणारा असा एक लोकसमूह या >समाजात संख्येने लहान पण प्रभावी होता.

या लोकसमूहाच्या (=लो१) नेत्यांची नावं मिळतील काय?

२.
>वास्तवाची चिकित्सा करुन नवे सिद्धांत निर्माण करण्यापेक्षा श्रद्धेने परंपरागत सिद्धांतांचा स्वीकार अकरणे >त्याच्यासाठी अगत्याचे होते.

एखादं उदाहरण मिळालं तर बरं होईल. त्यामुळे चर्चेला आधार सापडेल.

३.
>आणि असा एक समूह त्याच काळी इथे होता की पाश्चात्य ज्ञान-विज्ञानाच्या स्पर्शाने तो जागा झाला होता. >इहवादाचे भविष्य उज्ज्वल असल्याचे त्याला कळले होते.

याही लोकसमूहाच्या (=लो२) नेत्यांची व/वा अनुयायांची नावं मिळतील काय? दादाभाई नौरोजी यांचं Poverty and un-British Rule (१९०१ प्रकाशन) हे पुस्तक या समूहातल्या कोणी लोकांनी वाचलं होतं का? या पुस्तकाबद्दलचे त्यांचे विचार जाणून घ्यायला मला आवडेल.

४.
>समाजातले भेद कमी होतील, शिक्षण सर्वांना मिळेल, व्यवसायस्वातंत्र्य मिळेल आणि नव्या संधी उपलब्धी >मिळाल्या तर आपले दैन्य फिटेल, आपली दु:खे संपतील आणि आपल्याला सर्वार्थाने समृद्ध, संपन्न असे >जीवन जगता येईल, अशी आशा त्याला वाटत होती.

इंग्रजांनी भारताचे उद्योगधंदे बुडवले हे जगजाहीर आहे. त्यामुळे शेतीवरचा ताण वाढला. एतद्देशीय शिक्षणाची काय विल्हेवाट लावली इंग्रजांनी तेही उघड आहे. अशी राजवट असतांना उपरोल्लेखित आशावाद भाबडा नव्हे काय?

५.
>जुन्या संस्था, श्रद्धा आणि मूल्ये यांमध्ये स्थितिप्रिय समूहाचे हितसंबंध गुंतलेले होते.

हे हितसबंध कोणत्या स्वरूपाचे होते? आर्थिक? की अजून काही? याचंही उदाहरण मिळेल काय?

६.
>आगरकर, लोकहितवादी, फुले यांच्या विचारांमधले अनिष्टसंहारक अग्नितत्त्व त्यांना नुसत्या दर्शनानेही >भिववणारे होते. ...... म्हणून पूर्वव्यवस्था अधिक बळकट आणि अभेद्य करण्याकडे स्थितिप्रिय समूहाचा कल >होता.

आगरकर, लोकहितवादी, फुले यांच्या पंक्तीत लोकमान्य टिळक कसे नाहीत? ते लो२ मध्ये मोडतात की स्थितिप्रिय लो१ मध्ये?

७.
>परिवर्तनासाठी जनमत तयार करणे हे सर्वच लोकनेत्यांपुढे मोठे बिकट काम होते. ...... त्यांना कृतिशील >बनवण्याचे काम त्याहून कठीण होते;

ही दोन्ही कार्ये लो. टिळकांनी मोठ्या समर्थपणे पार पडली. व्हॅलेंटाईन शिरोलने त्यांना हिंदी असंतोषाचे जनक याचसाठी म्हंटले. टिळकांचा उल्लेखही प्रस्तुत उतार्‍यात नाही. पुस्तकात त्यांचं नाव चर्चेत आलं असेल अशी अशा आहे.

८.
>...वैचारिक परिवर्तनाची जरुरी फार मोठ्या प्रमाणात आहे आणि या परिवर्तनासाठी सर्वांत प्रभावी शस्त्र आहे >विद्रोहाचे.

लोकशिक्षण हेही एक प्रभावी माध्यम म्हणून वापरता येते. यावर टिळक आणि आगरकर या दोघांचे एकमत होते. डेक्कन एज्युकेशन सोसायटी (निदान फर्गसन कॉलेज तरी) त्यामुळेच जन्माला आली. केवळ विद्रोहावर लक्ष केंद्रित करता येत नाही.

९.
>आगरकरांनी अतिकळवळ्याने समाजाला उद्देशून म्हटले आहे, 'ज्या दुर्मतांनी, दुराग्रहांनी व दुराचारांनी >महारोगाप्रमाणे या देशाच्या बुद्धीचा, नीतीचा व शरीरसामर्थ्याचा हजारो वर्षे फडशा चालविला आहे, त्यांचे >यथाशक्ति निर्मूलन करणे अत्यंत उचित होय.

सोबत मॅकॉलेचे इ.स.१८३५ सालचे एक मत उधृत करावेसे वाटते. इथे टिचकी मारा.

जर आगरकरांनी सांगितलेले दुर्मते, दुराग्रह व दुराचार जर हजारो वर्षे चालू असते, तर भारतात इ.स. १८३५ साली चोर किंवा भिकारी सापडत नव्हते हे कसे काय शक्य आहे? मागल्या ६०+ वर्षांत जो अनाचार माजलाय त्यामुळे आज आपल्याला ठिकठिकाणी चोर आणि भिकारी दिसून येतात. भारताच्या अधोगतीस लो१ या समूहाला एकट्याला जबाबदार धरणे कितपत योग्य?

१०.
>विरोधात उभ्या ठाकलेल्या समाजातल्या विविध वर्गांमधली भिन्नतेची तीक्ष्णता कमी कमी करत, >राष्ट्रकार्याच्या दिशेने त्यांच्यातील जागृतीचा मोहरा वळवण्याचे अवधान त्यांनी ठेवले होते.

न्या.रानड्यांबद्दल हे म्हंटलेले खरे आहे. मात्र लोकजागृतीची चळवळ त्यांच्या शिष्योत्तमाने म्हणजे टिळकांनी शिगेस पोहोचवली.

११.
>सच्चा सुधारणावादी नेहमीच हे जाणून असतो की श्रद्धा डोळस हवी, त्याग सबळ हवा आणि तत्त्वे पोषक हवीत. >जीवनातले उदात्त, न्याय्य आणि निर्माणक असे जे जे आहे ते ते राखण्यासाठी प्राणार्पणाचीही तयारी ठेवायला >हवी,

या न्यायाने टिळकही सच्चे सुधारणावादी ठरतात. त्यांच्या गीतारहस्यावरून डोळस श्रद्धा दिसते. प्राणार्पणाची तयारी मंडालेतल्या तुरुंगवासावरून दिसते. आणि त्याग तर त्यांच्या पाचवीलाच पुजला होता.

-----------------------

सारांश :

१. स्थितिप्रिय लो१ आणि (तथाकथित) गतीप्रिय लो२ यांच्यामधली सीमारेषा ठळक नसून तुटक आहे. या सर्व विवेचनास इ.स. १८५७ च्या उठावाची पार्श्वभूमी आहे. तिची चर्चा येथे दिसून येत नाही. प्रस्तुत पुस्तकात असेल अशी अशा आहे.

२. एक उदाहरण पाहूया:

सावरकरांनी रत्नागिरीत अस्पृश्यता निर्मूलनाचे भरीव कार्य केले. त्यांनी एक निरीक्षण नोंदवले आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ब्राह्मणांना सुधारणा चटकन मान्य होत असत. मात्र तळागाळातील जातींचा रूढी बदलण्यास प्रखर विरोध असे. त्यांच्या शब्दांत सांगायचे झाले तर भंगी चांभाराच्या पंक्तीला जेवण्यास बसत नसे. अशा परिस्थितीतून सावरकरांनी निरलस सेवाभावाच्या योगे मार्ग काढला.

नेमका हाच आगम (=अ‍ॅप्रोच) सयाजीराव गायकवाडांना अभिप्रेत होता. वरील लेखाच्या दुसर्‍या उतार्‍यात त्यांच्या तोंडी आलेय की पोटजातींचेही एकीकरण झाले पाहीजे.

सावरकर आणि सयाजीमहाराज लो१ मध्ये मोडतात की लो२ मध्ये? त्यांनी आणि टिळकांनी परंपरेला तुच्छ न मानता आधारभूत मानले. साहजिकच विद्रोहाशिवाय जागृती कशी करावी याचा वस्तुपाठच जणू त्यांना देता आला.

तर मग विद्रोहाचे नक्की स्थान कोणते? कोणी स्पष्ट करेल काय?

कळावे लोभ असावा.
-निनाद चित्रे

Group content visibility: 
Public - accessible to all site users