गूढ कथा: कालग्रहांचे भविष्यआरसे (भाग ३)

Submitted by निमिष_सोनार on 10 September, 2010 - 12:06

समाधिस्थ होण्याआधी सातनाम साधूने जी तपश्चर्या केली त्यात त्याला अनेक गोष्टी दिसल्या. त्याने डोळे मिटले.
डोळे मिटताच एक अजब अंधार.
मग त्याने मनातले सगळे विचार नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्याला बराच प्रयत्न करावा लागला. चार ते पाच प्रहर उलटून गेले. तेव्हा कुठे मनातले सगळे विचार नाहीसे झाले. ही विचार नष्ट करण्याची पद्धत त्याने अनेक वर्षांच्या अथक तपातून साध्य केली होती.

मनावरचे विचारांचे दडपण दूर झाले होते. आता मन भरारी मारण्यासाठी सज्ज झाले होते.

मनावरचे विचार दूर झाले की त्याचे जडत्त्व कमी होवू लागते. ते वातावरणात सहजगत्या संचार करू शकते हे त्या साधूला समजले होते. या आधी सुद्धा त्याने मनाला पृथ्वीवरच्या अनेक ठीकाणी नेले होते. अगदी समुद्राच्या तळाशी असलेले जीव तो सहजगत्या मेंदूवरच्या पटलावर बघू शकत होता. आकाशातल्या ग्रहतार्‍यांपर्यंत तो जावू शकत होता. अगदी चंद्रावरची माती जवळून बघू शकत होता. आपल्या सूर्यमंडलाच्या ग्रहचक्रात फिरून झाल्यावर मात्र त्याला आणखी बाहेर जाणे जमले नव्हते.....

पण त्या दिवशी त्याच्या मनाने आपल्या सौर मंडलाच्या पलिकडे भरारी घेतली. सौर मंडलाला भेदले. त्या पलीकडे त्याचे मन प्रवास करू लागले. आपला एक सूर्य पार करून अनेक पोकळ्या पार केल्या. त्याला कळत होते की या विश्वाला अंत नाही. पण कुठपर्यंत अंत नाही? अंतालाही काहीतरी अंत असायला हवा ना! आपण अंत हा शब्द वापरतो तेव्हा कुठेतरी सुरुवात झाली असते असे आपल्याला अपेक्षीत आहे. तरच अंत असतो. सुरुवार नसेल तस अंत कसला?......

साधूचे मन प्रवास करत होते........

तसे पाहीले तर या विश्वाची सुरुवात कुठे आहे हेच आपल्याला माहिती नाही. आपण राहातो ती पृथ्वी या विश्वात नेमकी कुठे आहे. माहीत नाही. आपण पॄथ्वीवर राहातो म्हणून आपणाला ती सुरुवात वाटते.

या विश्वात इतर ग्रहंवर जीव आहेत असे आपल्याला वाटते. पण पॄथ्वीवरच्या सजीव निर्जीव व्यक्तींबाबत ज्या घटना घडतात त्या नेमक्या कोणत्या नियमानुसार घडतात? त्यासाठी कुणीतरी विश्व कर्त्याने काहितरी संगणकासारखी प्रोग्रामींग (विधिलिखीत- आज्ञा प्रणाली) करून ठेवली असेल का?

साधूचे मन प्रवास करत होते........

तर साधूचे मन प्रवास करत करत अवकाशात अनेक प्रकाशवर्षे अंतर पार करून गेले तेव्हा त्याला पुन्हा एक सूर्यमंडल दिसले. तीच आपली पृथ्वी. तेच ते ग्रह. त्या पृथ्वीवर तेच ते ओळखीचे प्रदेश?

साधू आश्चर्यचकीत झाला. आपली साधना चुकून आपण पुन्हा पॄथ्वीवर आलो असे त्याला वाटू लागले. पण त्याने जेव्हा निराश होवून मनाला आपल्या स्वतःच्या राहाण्याच्या जागेवर आणण्याचा प्रयन्त केला तेव्हा त्याला तो स्वतः दिसला पण तो तपश्चर्या करतांना न दिसता त्याची समाधी दिसली... काळाच्या पुढची घटना आपल्याला आताच कशी दिसली?

म्हणजे अनेक अंतर आकाशात पार करुन गेल्यावर पुन्हा काळाच्या पुढे असलेली सौरमंडलाची हीच रचना विधात्याने करून ठेवली आहे? हीच रचना. तेच. फक्त काळाच्या पुढची? म्हणजे त्या विश्व कर्त्याला लक्षात ठेवायला सोपे जावे?

मग हे सौरमंडल पार केल्यावर आणखी अंतर गेल्यावर या पुढचे बघायला मिळेल? अनंत वेळा असे घडेल?

म्हणजे, असे तर नाही की अनेकांना भविष्याचा पूर्वाभास जो होत असतो तो आपले मन आपल्या नकळत एखाद्या अवकाशातल्या कुठेतरी आत्ता सुरु असलेल्या पुढच्या अवकाश पटलात जाते म्हणूत तर होत नसावी ना?

म्हणजे,

एरवी भविष्यात ज्या घटना घडलेल्याच नाहीत त्यांचा अंदाज कुणाला येईलच कसा?

तसा तो ग्रहांच्या भ्रमणाद्वारे ज्योतीषी काढतातच?..

बरोबर! ग्रह... विधिलिखीत... ग्रहरचना बदल?

त्या साधूने पुन्हा मनाला अवकाशात पुढे नेले. २०१२, २०१३ साल.... अशा काही अनेक सौर मंडल ओलांडल्यानंतर त्याला मग सौर मंडल रचने मध्ये बदल घडलेले दिसू लागले.

डॉळे बंद असतांनाच त्याने खुणेद्बारे त्याने जे पाहिले ते तो घड्याळाच्या चिन्हांच्या रुपात लिहू लागला. त्यावेळेस पृथ्वीवर कोणता काळ आहे हे तो बघून ठेवून लिहू लागला.

कारण त्याने सगळे शिकून घेतले. क्षणांत. मनाद्वारे. सिद्धीद्वारे.

म्हणजे सगळे काळ आत्ता वर्तमानातच घडत आहेत? सगळे पुढचे मागचे आता आजच घडते आहे??

.... पण डोळे उघडण्या आधी त्याने शेवटची सौर मंडलाची जी रचना पाहीली त्यामुळे त्याला पुढे काहीही बघण्याची इच्छा राहीली नाही.

तो काळ २०२२...

त्या काळात ग्रहरचना अद्भुत होती. जशी कधीच नसावी असे आपणाला वाटेल, अगदी तशीच ती होती.

म्हणजे विश्वकर्त्याला लगेच एकाच रचनेवर समाधान मानून लगेच २०१२ मध्ये जग नष्ट करायचे नाही. अनेक प्रयोग त्याला करून बघायचे आहेत.

काय होती ती रचना? काय पाहिले त्या साधूने?

.... त्या नवग्रह दगडी मंदिरावर कोरलेले ते चिन्ह आणि सांकेतीक भाषांचे फोटो आपल्या लॅपटॉपवर राहुल २०२२ साली बघत होता. ते वेगळेच बाळ! ती लोकांची नष्ट होत चाललेली सहाशीलता? घडणार्‍या विचित्र घटला? अचानक हींसक होवू लागलेले लोक?
अवकाश निरिक्षणाचा अहवाल आला की कळेलच...

(क्रमशः)

- निमिष सोनार , पुणे

गुलमोहर: