प्रेम...??

Submitted by ट्यागो on 27 May, 2010 - 03:22

जिथे टेकते आभाळ धरतीशी
क्षणभरच,
पण कणभर माती जाते उंच
पुन्हा आभाळ कवेत घेऊन...
आणि विशाल धरती तृप्त होते,
पुन्हा नव्याने...
मग आभाळ पुन्हा अनंत मैल दूर,
एकांत उसासे घेत
निर्वात पोकळीत विरह गीत गातो.
पुन्हा मिलनाची आस बाळगत
अनंत क्षण सरतात.
आभाळाला राहवत नाही...
पुरुषीपणा सोडून तोही होतो हळवा,
काळवंडत जातो...
वेडी धरती सैरभैर, अधिरपणे
गोळा करू लागते त्याचे अश्रू...
रुजवत जाते एकेक थेंब,
आणि गर्भार होऊन नटली
की आभाळाचं देणं फिटल्यासारखी हसते...
स्वत:शीच!!
हेच प्रेम,
डोक्यावर आभाळ घेऊन
पोटात अश्रू पेरलेलं!
आभाळातून पडूनही
मातीमधे रुजलेलं!!!

मयूरेश चव्हाण, मुंबई.
२७.०५.१०, ०१.३०.

गुलमोहर: 

मयुरेश, कविता छानच आहे तुझी. तसेच आपले टायटल एकामागे एक प्रकाशित झाले तो केवळ योगायोग आहे. मला कल्पना नव्हती की तू याच टायटलवर कविता रचली आहेस

मयुरेश,
क्या बात है....

हेच प्रेम,
डोक्यावर आभाळ घेऊन
पोटात अश्रू पेरलेलं!!
आभाळातून पडूनही
मातीमधे रुजलेलं!!!
..... अप्रतिम...
खुपच छान झाली आहे कविता.

कप्पा

एक कप्पा असतो, हळूवार असा
प्रत्येकाच्या हॄदयात,
तो उघडला कि
अत्तराच्या कुपीसारखा
दरवळतो गंध.
पसरत जातो चोहिकडे,
सृष्टी बदलते, दृष्टी बदलते,
खळाळत्या झर्‍यासारखी
भाषा बदलते,
अस्थीर होते चित्त,
नश्वर देहाची वृत्ती बदलते.

आपल्याला वाटते
उघडणारा प्रेमीच,
पण ते निमित्तच.
प्रेम हे तुझ्यातच.
समोरचा आरसा,
तिथे फक्त प्रतिबिंबच.
प्रतिबिंबाला भुलु नकोस
आरसे कैक असतात,
बंद कुपीचे दरवाजे
कधीतरिच उघडतात!

मयुरेश चव्हाण, मुबंई.
१५.०७.२०१०, २१.४७.

such a class poem.
कोण म्हणतं मराठी रांगडीच भाषा आहे, असलं रोमँटीक लिहता येतंच की?