'गैर' पहाण्यात काहीच गैर नाही

Submitted by kanchankarai on 6 November, 2009 - 07:04

मराठी रहस्यप्रधान चित्रपटांबद्दल अपेक्षा उंचावणारा चित्रपट म्हणजे ’गैर’. मराठीतही असा सस्पेन्स थ्रिलर असू शकतो यावर विश्वासच बसत नाही. उत्कृष्ट कथेला तितक्याच ताकदीच्या दिग्दर्शनाची व निर्मितीची जोड असेल तर मराठी चित्रपटात काय घडू शकतं हे तुम्ही गैर मधे पहाच! चित्रपट पहात असताना, ’अरे हे काय दाखवलंय, असं का.... असं का नाही, हे पटत नाही’, असे बरेच प्रश्‍न तुमच्या मनात येतील पण.... त्या सर्व प्रश्नांना चित्रपटाच्या अखेरपर्यंत थोपवून धरा.

सतीश राजवाडे हे उत्तम दिग्दर्शक आहेत, हे त्यांनी यापूर्वीच सिद्ध केलेलं आहे. गैर चित्रपटातील त्यांच्या खास ’टच’ मुळे चित्रपटाला सुंदर गती लाभली आहे. उत्सुकता शेवटपर्यंत ताणून ठेवण्यात 'गैर' यशस्वी ठरला आहे. चित्रपटात निर्माते संजय घोडावत यांच्या दिमाखदार कार्स वापरल्या असल्या तरी त्यांचं कुठेही अवाजवी प्रदर्शन नाही. अगदी चॉपरचा (म्हणजे आपलं हेलिकॉप्टर हो!) वापरही मोजकाच पण नेमक्या वेळेस केलेला आहे. तरीही चित्रपटाला ग्लॅमरस व फ्रेश लूक देण्यात निर्माता व दिग्दर्शक दोघेही यशस्वी ठरले आहेत. सतीश राजवाड्यांना तरूण पिढीची ’नॅक’ सापडली आहे.

Gair (2009) - Marathi Suspense Thriller

या चित्रपटात गाणी आहेत पण ती आवश्यक तिथेच येतात. प्रसंगानुसार संगीतबद्ध केलेली गाणी आपल्याला चित्रपटात गुंतवून ठेवतात. संदिप कुलकर्णी व अमृता खानविलकरवर चित्रीत केलेलं चित्रपटातील सर्वात पहिलं गाणं वातावरणातील गूढपणा आणखीनच गडद करतं. त्यात बराचसा सहभाग ’हरिहरन’ यांच्या आवाजाचा आहे. संदिप कुलकर्णी हे उत्तम अभिनेता म्हणून ओळखले जात असले, तरी त्यांना नाचगाणं करताना कुणी पाहिलं असेल असं वाटत नाही. त्यांच्या व्यक्तिमत्वाला आणि देहबोलीला अनुसरून त्यांना दिलेल्या नृत्याच्या ’स्टेप्स’ नृत्यदिग्दर्शकाचा अनुभव व कसब दर्शवतात. अभिनयाचं म्हणाल तर, सर्वच कलाकारांनी आपापलं काम चोख केलं आहे. शेवट नीट पाहिलात तर हे वाक्य जास्त पटेल.

हिंदी चित्रपट निर्मात्यांनी गैर पाहिल्यानंतर आपला मोहरा मराठी चित्रपटांच्या दिशेने वळवला तर त्याचं नवल वाटायला नको. मुंबई पोलिसांनी संजय घोडावत यांनी निर्मित केलेला ’जेल’ पाहिलाच आहे. त्यांचीच निर्मिती असलेला ’गैर’ही अवश्य पहावा. आणखीही बरंच काही लिहायचं होतं पण लिहीता लिहीता रहस्यभेद नको व्हायला. इतकंच सांगेन, गैर पहाण्यात काहीच गैर नाही.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्व्वा! हे अगदी छान केलंत. आजच पाहिन रात्री जाऊन! Happy
सतिश + संदिप + अंकुश एवढं जबरी आवडीचं समीकरण असताना हा सिनेमा सोडणार नव्हतेच. तुमच्या पोस्ट मुळे याला पुष्टी लाभली.
फक्त एकच सूचना : हा धागा चित्रपट / चित्रपट कसा वाटला मधे यायला हवा म्हणजे चित्रपटात रस असणार्‍या माबोकरांनाही वाचता येईल.

अर्रर्र... मी परत काहीतरी ब्लंडर केलंच का? पुढच्या वेळेस लेख योग्य सदरात टाकण्याची काळजी घेईन.
aashu_D | तुमच्या सूचनेसाठी आभार!
prakashkalel | मग? हल्ली मराठी पण काय कमी नाय? चित्रपट पहा. तुम्हाला नक्की आवडेल.
Anjali28 | इतकंच सांगेन, कुठल्याही चित्रपटाच्या कथेशी तुलना न करता हा चित्रपट पहा. सस्पेन्स थ्रिलर आणि तोही चांगला. आणखी काय हवं?
amruta | sayuri | पोस्टर मलाही आवडलंय. मात्र पोस्टर मला चित्रपट पाहून झाल्यावर सापडलं.
deepanjali | तुम्हाला आवडत नाही का अंकुश चौधरी?

मोफु, फक्त इतकंच सांगता येईल का, की चित्रपटात फक्त सस्पेन्स, थ्रिल आहे की रक्तरंजितही आहे? खून, पिस्तुलं, हिंसा वगैरे वगैरेही कितपत आहे? मेन्दूला ताण देणारा असला, तर चालेल, पण हिंसा (असलीच तर) अंगावर येणारी आहे का?
चित्रपट पहाणार हे नक्की, पण हे आधी कळलं तर बरं होईल, धन्यवाद Happy

psg | बिनधास्त जा! सस्पेन्स मुद्दाम सांगत नाहीये. मेन्दूला ताण निश्चितच आहे पण हिंसा अशी नाही. तुम्हाला मुलं असतील नि ती दहा वर्षांपेक्षा मोठी असतील तर त्यांनाही नेऊ शकता.

mogaraafulalaa, खूप धन्यवाद ह्या चित्रपटाबद्द्ल लिहिल्याबद्द्ल. सतीश राजवाडेंच्या असंभवची मी जबरदस्त फॅन होते, अग्निहोत्र ही आधी आवडायचं, आता रटाळ झालंय. असो. तर त्यामुळे हा चित्रपट पहावा का असा विचार करत होते आणि कोणी पाहिलाय का हा प्रश्न टाकायला चित्रपटांच्या बीबीवर जाणार एव्हढ्यात हा बीबी दिसला. आता जाऊन बघतेच. मग पोस्टेन इथे.

बाय द वे मंडळी, लोकसत्तामधलं रेखा देशपांडेचं कोणत्याही चित्रपटाबाबतचं परिक्षण चुकूनही वाचू नका -जर तुम्हाला तो चित्रपट पहायला जायचं असेल तर. रहस्यभेद ठरलेला आहे Sad

अप्रतिम फिल्म !!! जरुर पहायालाच हवी. मराठी फिल्म्स मधिल हे नक्कीच एक revolution आहे.
background music जबरदस्त आहे. गाणी मस्त आहेत.Keep it up ...Gair team

swapna_raj, तुमच्याशी सहमत! मी तशा आशयाची प्रतिक्रियाही त्या लेखावर दिली होती. मला वाट्तं त्यांनी ती प्रसिद्ध केली नाहिये.

aashu_D | सिनेमाची टीम कारवाई करू शकत नाही कारण शेवट असा सांगितलेला नाही. पण एखाद्या विविक्षित प्रसंगाचं मूल्यमापन स्वतःच्या नजरेने करताना समिक्षकांनी भान ठेवायला हवं. समिक्षकांना जे आवडेल ते पब्लिकला आवडेलच असं नाही. तसं असतं तर 'लम्हे' सुपरहिट व्हायला हवा होता.

मला वाटतं रहस्यप्रधान चित्रपटात काही प्रश्नांच्या उत्तरांचा शोध जर प्रेक्षकांसाठी राखून ठेवला, तर चित्रपट पुन्हा पहाण्याचा मोह प्रेक्षक टाळू शकत नाहीत किंवा अशा प्रसंगातून दिगदर्शकाने त्या प्रसंगाचा चारही बाजून विचार करून मगच तो प्रसंग तसा चित्रीत केलेला असतो, हे समिक्षकांच्या लक्षात यायला हवं.

prachiavi | तुम्ही चित्रपट पाहून आलेल्या दिसताय Happy

मला वाटतं रहस्यप्रधान चित्रपटात काही प्रश्नांच्या उत्तरांचा शोध जर प्रेक्षकांसाठी राखून ठेवला, तर चित्रपट पुन्हा पहाण्याचा मोह प्रेक्षक टाळू शकत नाहीत किंवा अशा प्रसंगातून दिगदर्शकाने त्या प्रसंगाचा चारही बाजून विचार करून मगच तो प्रसंग तसा चित्रीत केलेला असतो, हे समिक्षकांच्या लक्षात यायला हवं.
---------------------------------------------------------------------------------
हे अगदी बरोबर आहे आणि शेवट सांगणे किंवा हिंट देणेही चुक आहे पण..

काही वेळा रहस्यभेद झालेला असला तरी चित्रपट/मालिकेच्या कथेचा फ्लो जर चांगला ठेवला तर रीपीट ऑडीयन्स नक्की मिळतो.
उदा. इथे "मंक" नावाची एक डिटेक्टीव सीरीयल आहे त्यात बर्‍याचदा खुन्/गुन्हा कसा केलाय ते सुरुवातीला दाखवतात आणि मग हळुहळु त्याची उकल करतात. ती सीरीयल तरीही एंजॉय करता येते. "तिसरी मंझिल" हे एक आणखी उदाहरण.. बर्‍याच जणांनी हा चित्रपट अनेकवेळा पाहिला असणार तरीही प्रत्येक वेळी पाहताना तितकीच मजा येते.

mogaraafulalaa, तरी बरं ह्या वेळेस मी २०१२ आधी पाहिला आणि मग त्याचा रिव्ह्यू वाचला. खरं तर ह्या चित्रपटाचे स्पेशल इफेक्ट्स अप्रतिम आहेत पण ह्या बाईला ते लुटूपुटूचे वाटले. धन्य आहे!

'गैर' पाहिला Sad
गैरवाजवी अपेक्षा ठेवून गेल्यामुळे असेल पण भलताच अपेक्षाभंग झाला..
वैतागून आम्ही काही माबोकरांनी सूड म्हणून वैर७२ हा 'गैर' चा दुसरा भाग काढायचा असे ठरवले आहे Lol

आता ७२ का हा प्रश्न अगदी 'unwanted' आहे. Wink

मिल्या Lol
त्या सर्व प्रश्नांना चित्रपटाच्या अखेरपर्यंत थोपवून धरा. >>> थोपवून धरले आणि ते तसेच धरून थिएटरमधून बाहेर आलो. पकाऊ चित्रपट आहे.

खरंय.. सतीश राजवाडेकडून खूप जास्त अपेक्षा होत्या.
'प्रेक्षकांना धक्का द्यायचाय' ह्या कल्पनेनं पछाडून जाऊन त्याने जो काही शेवट केलाय, त्याने धक्का बसतो जरूर, पण अपेक्षाभंगाचा! Angry संवादलेखकाने (बहुधा खुद्द सतीश आणि पराग कुलकर्णी) का ही ही संवाद लिहिले आहेत.. त्यातलं गांभीर्यच गेलंय..

निर्मिती चकाचक आहे, लोकेशन, कपडे, गाड्या सगळं छान. संदीप कुलकर्णी, इला भाटे यांची कामं सहज. अमृता मस्त दिसते. पण मूळ कथाच इतकी बळंच आहे, की अपेक्षाभंगाचं दु:ख आणि चिडचिड कमी होत नाही!

अतिशय छान चित्रपट. दुसर्‍यांदा बघतानाही अजिबात बोअर झाले नाही मला.

तस्मात, ज्यांना आवडला नसेल, त्यांनी आणखी एकदा बघा. तेही ७२ तासांच्या आत. Proud

"हा माझ्या मुलीच्या जीवाचा प्रश्न आहे!"
"तुम्ही कुलदेवी ला जाऊन हनीमूनला जा ; मी इकडे अष्टविनायकाला जाऊन नातू मागते!"
>> या सारखे पंचेस अफाट आहेत Rofl
शिवाय तर्कशुध्दता , सखोल विचार , हुशार प्रेक्षक वगैरे चित्रपट / मालिका मध्ये अपेक्षित नसतात हे लक्षात ठेवून जा पाहायला.
आमच्या टीम ७२ च्या नवीन सिनेमाची कॅचलाईन आहे >> "झोप गेली तरी बेहत्तर पण वैर ७२!" Biggrin
या सिनेमामुळे आमच्या कल्पनाशक्तीला पोट प्रचंड दुखेस्तोवर वाव मिळाला. आणि ती मजा साजिर्‍या तुला मिळाली नाही हेच तुझे प्रायश्चित्त समज. Proud

आई शपथ्थ... तुम्ही सगळे जाऊन हा चित्रपट बघून आलात.. कुठे फेडाल हे पाप आता...
वैर ७२ काढून असले उत्तर देऊच नका... ते माहितीच आहे... दुसरे काहीतरी सांगा...

हिम्या, पाप तर आम्हाला फेडावंच लागेल रे! पण तू पुण्यात्मा निघालास जो या भोगातून निसटलास! Lol

तिच्या मुलीच्या जीवाची काळजी तिला नसणार तर कुणाला? आणि अष्टविनायकाला नातू मागू शकत नाही का? कुणीही मागू शकतो. अगदी मीही. तो अष्टविनायक काय इमेजेटली नातू देणार काय हवेतनं काढून?

नुसता वैर काढा. त्यात ७२ चे शेपूट कशाला? आकडे आवडत नाही लोकांना आजकाल. व्यवस्थित झोप वगैरे काढून काधा शिनेमा. म्हणजे ७२ ची गरजच नाय.

मी दुसर्‍यांदा बघितला तेव्हा असाच झोप पुर्ण काढून मगच बघितला. फार्फार फ्रेश वाटले. हिम्या तु माझ्याकडे ये. आपण बघू पुन्हा.

म्हणजे ७२ ची गरजच नाय.
>> असं कसं. ७२ चा उपयोग हिरवीणीला /हिरोला / सासूला/ वडिलांना माहित असता तर सिनेमाचा शेवट काही औरच असता! Wink म्हणून आम्ही जोर वैर आणि ७२ दोन्हीवर देणार आहोत. Proud
असो. गैर 'फालतू' आहे असं मुळीच नाही. पण ज्या अपेक्षेनं गेलो होतो त्या उंचीवर जात नाही तो. आणि चुका तरी कशा? तर सहज टाळता येण्याजोग्या. वरचे नमुनेदार सुमार संवाद, मधेच हिंदी गाणी, धूम सारखे फ्रेम टू फ्रेम सीन्स.. हे सहज टाळता येऊ शकलं असतं. म्हणजे बाकी बाजू भक्कम असूनही अशा जागी सिनेमानं कच खावी याचं वाईट वाटलं. Happy

सिनेमानं नाही गं, सतीश राजवाडेनं! श्या! माझा अजूनही विश्वास बसत नाही राजवाडे असा सिनेमा करू शकतो यावर! असंभव, अग्निहोत्र, एक डाव धोबीपछाड यानंतर हे????

वैनी... प्रत्येक फुग्यात हवा किती भरायची ते ठरलेलेच तर असतंय... त्यापेक्षा जास्त भरायचा प्रयत्न केल्यावर दुसरं काय होणार आहे...

साज्या.. तुला परत हाच चित्रपट बघून चाफळकरांना परत मदत करायची आहे काय?

Pages