तीट कवितेला - कविता क्र.६ - समजूतदारपणा

Submitted by संयोजक on 20 September, 2015 - 05:33

गुलमोहरात पूर्वी काय काय लिहिलंय हे बघत असताना आम्हाला कवितांचा एक खजिनाच सापडला. काही वाचलेल्या, काही न वाचलेल्या, तर काही वाचलेल्या असूनही परत वाचताना वेगळाच अर्थ गवसलेल्या. अशा कित्येक सुंदर कविता, काळाच्या... आपल धाग्यांच्या उदरात गडप झाल्या आहेत. आता हा खजिना शेअर केल्याशिवाय आम्हाला राहवतय थोडच?
पण नुसता त्या त्या कवितेचा दुवा देण्यापेक्षा एक उपक्रम घेतला तर? ह्या कवितेला तुम्ही शेवटच्या कडव्यानंतर एक कडवं जोडायच. थोडक्यात ती कविता समजून घेऊन, त्यातल्या कल्पनांचा विस्तार करून आणि अर्थातच स्वतःचा स्वतंत्र विचार करून आणखी एका कडव्याची रचना करायची, बरोबरच कवितेला एक नवीन नावही सुचवायच. कशी वाटतेय कल्पना?

यात कवी/ कवयित्रीच्या प्रतिभेशी बरोबरी करायचा किंवा त्याच्या कलाकृतीला जरासाही धक्का लावायचा हेतू नाही. फक्त कवी/ कवयित्रीच्या प्रतिभेला दाद देउन आपल्याला अशीच रचना करायची वेळ आली तर आपण कसा विचार करू याचा एक खेळीमेळीत अंदाज यावा आणि उत्तमोत्तम कविता पुन्हा वाचल्या जाव्यात इतकाच उद्देश आहे.

नियम:
१. या उपक्रमा अंतर्गत आम्ही मायबोलीवर पूर्व प्रकाशित कविता, कवी/ कवयित्रीच्या नावासकट प्रकाशित करू. त्या कवितेच्या शेवटी तुम्हाला एक कडवं रचायच आहे आणि त्या कवितेला एक नवीन नावही सुचवायच आहे.
२. या उपक्रमात रोज एक नवीन कविता देण्यात येईल.
३. कडवं आणि नाव दोन्ही सुचवणे आवश्यक आहे.
४. तुमचं कडवं आणि नाव इथेच प्रतिसादात लिहा.
५. एका प्रतिसादात एकच कडवं लिहिण अपेक्षित आहे.
६. एक आयडी कितीही वेळा या उपक्रमात भाग घेऊ शकतो.

आजची कविता:

मूळ नाव: समजूतदारपणा
कवयित्री: मी मुक्ता
कवितेची लिंक: http://www.maayboli.com/node/40235

काय झालं..? ....... काही कळत नाहीये...
काही भांडण वगैरे?..... नाही नाही.. किती सारखे होतो (म्हणजे आहोत) आपण ..
काही गैरसमज? .... गैरसमज.. आणि आपल्यात? शक्यच नाहीये..
मग आठवणच यायची बंद झाली का?.. तसंही नाही. रोज नाही पण बरेचदा येतच असते की आठवण..
मग इंटरेस्ट च कमी झाला नाही?... तसं काही झालं असतं तर कशाला एकमेकांना इतक्यांदा साद घातली असती?
मग नक्की झालं तरी काय?
तेच तर कळत नाहीये ना..
आपण कायमच खूप समजून घेतलं ना एकमेकांना?
कधी मी साद घातली तर तू व्यस्त..
कधी तुझ्या हाकेला नेमकी मी व्यस्त..
तरी कधी राग नाही आला..
"काहीतरी महत्वाचं काम असल्याशिवाय तू असं करणार नाहीस.."
दोघांनाही ही खात्री..
असा कितीतरी काळ लोटून गेलाय मध्ये..
न भेटता.. न बोलताच..
तुझ्या माझ्यातल्या या अमर्याद अंतरभर आता फक्त समजूतदारपणाच उरलाय..
आणि म्हणूनच कदाचित हे अंतर पार करणं अशक्य आहे आपल्याला..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तय ही कविता.

शिर्षक : - समझोता.

अशक्य वगैरे नसत गं काही
आणि अंतराला तर आपल्यात थाराच नाही.
तू ही घाल साद मला, मीही देईन 'ओ' आता
तुझंच की मी अंतर्मन, चल नव्याने करु सुरुवात...नव्याने समझोता.....