सह्यमेळावा वृत्तांत
आधीचा वृत्तांत पुरेसा तपशीलवार नसल्याच्या काही तक्रारी आल्यामुळे पुन्हा एकदा लेखणी सरसावून त्याचा परामर्ष घेण्यात आला आहे. तरीदेखील काही गाळलेल्या जागा राहिल्या असतील तर बाकिच्यांनी त्या भरून काढाव्यात ही नम्र विनंती....
तर प्रसंग असा आहे लोक हो की संप्रत देशी अनेक भटकी मंडळी राहत होती. ही मंडळी सतत या ना त्या गडावर जाऊन, त्याचे सुंदर सुंदर असे फोटो टाकून इतरांना जळवत राहत. पण हे असे वागणे पुणेदेशी राहत असलेल्या एका सुदृढ बालकाला पहावले नाही आणि त्याने या सर्व भटक्या मंडळींना एकत्र आणण्याचा चंग बांधला. बर्याच युक्त्याप्रयुक्त्या करून त्याने सर्व भटक्या जमातीला भर पावसाळ्यात मढेघाट या प्रेक्षणिय स्थळी एका झेंड्याखाली आणण्यात यश मिळवले. तिथे या सर्व भटक्यांना आपण सर्वच कुंभमेळ्यात हरवलेली बालके असून देवाने भटकण्याच्या एकाच धाग्याने आपल्याला बांधून ठेवल्याची जाणिव झाली आणि तिथूनच बीजे रोवली गेली दरवर्षी किमान एक तरी सह्यमेळावा आखण्याची.
या हजारो वर्षांच्या (पुण्यात एक, दोन असे क्षुद्र आकडे समजत नाहीत) परंपरेला जागून यंदाचा सह्यमेळावा आधी धोडप क्षेत्री करण्याचे योजले होते परंतु काही कौटुंबिक अडचणींमुळे तो बेत बारगळला. उपरनिर्देशित बालक हे केवळ सुदृढच नव्हे तर हट्टीही होते आणि त्याने नेटाने जुलैत नाही तर नोहेंबरात तरी भेटू असे व्रत अंगिकारले. त्याच्या या कठोर व्रताला अखेर यश लाभले आणि गेल्या वर्षीपेक्षा उदंड प्रतिसाद देत यावेळचा मेळावा २३-२४ नोव्हेंबरला अहमदनगर-नाशिक जवळील भैरवगड (शिरपुंजे), भैरोबा दुर्ग आणि कलाडगड या पुण्यक्षेत्री (पूर्वीच्या...२३-२४ नोव्हेंबरनंतर त्या जागेला काय म्हणतात हे ज्ञात नाही) पार पडला.
या मेळाव्याची सचित्र वृ्त्तांत लिहीण्याची आज्ञा बालकाने आशुचँप या बखरकारास केली. त्यानेही या आज्ञेला शिरसावंत मानत लेखणी हाती घेतली आणि साकारला तो वृत्तांत पुढीलप्रमाणे....
श्रीचरणी अर्पण...
होणार होणार म्हणत जुलै मध्ये होणारा सह्यमेळावा (द्वितीय) आता नोव्हेंबरमध्ये होणार यावर शिक्कामोर्तब झाले आणि मग काय विचारता महाराजा चर्चेचा जो काही महापूर उसळला त्याला तोड नाही. जैसे की भडभुंजे लाह्या भाजतात तैसे धुंद मचली. कुणी कुणाचे ऐकेना, जो तो आपापले घोडे पुढे दामटू लागला आणि सहस्त्रेक भुर्जपत्रे संपली असता अखेरीस बालक ज्याने श्री श्री ओंकार ओक उर्फ सह्याद्रीमित्र उर्फ किल्ले विकिपिडीया उर्फ ओंकार फडणवीस उर्फ भटक्यांचे मुख्यमंत्री (इ.इ.). असे नानाविध अवतार धारण करत मोहीम मुकर्रर केली.
अर्थात यानंतरही भटके एकेनात आणि रात्रौसमयी काय, भोजनसमयी काय, वाहनव्यवस्था काय अशा प्रश्नांचा वर्षाव करण्यात आला. परंतु बालक अत्यंत चतुर असल्याने त्याने अर्णब गोस्वामी या आपल्या गुरुंचे स्मरण करत सर्वांना चूप केले.
प्रश्न एक आणि उत्तरे दहा या गतीने संवाद साधू लागताच सर्वांनी निमू़टपणे त्याचे म्हणणे मान्य केले.
दरम्यानच्या काळात वॉट्सअप वापरत नसलेल्या मायबोलीवरच्या वंचित घटकांसाठी स्पेशल धागा काढण्यात आला आणि त्यावर अखिल भारतीय वस्त्रोद्योग महामंडळाच्या प्रतिनिधी सनीताई लिओन यांनी हजेरी लाऊन भलतीच रंगत आणली. पण पुन्हा एकदा बालकाने रुद्रावतार धारण करताच त्या मायावी आयडीने अंतर्धान पावणे श्रेयस्कर मानले.
तर ठरल्याप्रमाणे पुणेकरांनी ठिक ११.५६ वा राजाराम पूल येथून प्रस्थान केले. झालेला उशीर हा आशुचँप मुळे नसून रस्त्यावरून बनियन व टॉवेल घालून जाणाऱ्या एका व्यक्तीला तुम्हीच आशुचँप का असे विचारल्यामुळे झालेल्या वादामुळे झाला असे नम्रपणे नमूद करावेसे वाटत आहे. असो.
गाडीत बालकासहीत पवन, हिम्सकुल आधीच स्थानापन्न झाले होते. त्यानंतर वाटेत कुशल, सुन्या आंबोलकर, सुनील पाटील आणि त्यांचे चिरंजिव, मल्लीनाथ अशी मंडळी उचलत उचलत आणि वाटेत मस्त चहा मारत पुणेकर राजूरला पोहचले (दरम्यानच्या काळात कोंबडी चापून आलेल्या आशुचँपनी डोळे मिटून विश्रांती घेणे पसंत केल्याने बाकी तपशील इतरांकडून मिळतील). दुसरीकडे, मुंबईकर वेळेवर निघाले पण घोडबंदरपाशी जबरदस्त ट्रॅफिकमध्ये फसल्यामुळे वॉट्सअॅपवर नुसत्याच लाल टिकल्यांचा भडिमार होऊ लागला. आता गेल्यावेळे प्रमाणेच यांचा राडा होणार असे मनात आले पण सुदैवाने त्यांनी फक्त पुणेकरांनंतर केवळ १५-२० मिनिटातच ठरलेल्या ठिकाणी येण्यात यश प्राप्त केले.
तिथून पुढे पहाटेच्या सुमारास शिरपुंजे गाव गाठले आणि पुणेकर आणि मुंबईकरांनी एकमेकांची गळाभेट घेतली. लगेचेच इंद्राने गेली अनेक महिने गाजत असलेला सह्यमेळावाच्या टिशर्टचे वाटप करण्यास सुरुवात केली. पहिल्याच टीशर्टची एकंदर रंगसंगती पाहून काही नापसंतीचे सूर उमटले खरे पण इंद्रा, हेम, नील आणि प्रजो यांच्या मेहनतीला सर्वांनीच दाद दिली. खरेच मस्त निघाले टीशर्ट. तातडीने सगळ्यांनी ते हिरवेगर्द टीशर्ट परिधान केल्यामुळे ट्रेकऐवजी दक्षिण अफ्रिकेचा संघ मैदानात निघाल्यासारखे वाटत होते. (सर्वांची सुटलेली पोटे पाहून यातल्या कुणालाच निवृत्तांच्या संघातही स्थान मिळाले नसते ही बाब अलहिदा).
मग चहापाणी, गरमागरम पोहे आणि इतर आवश्यक बाबी पार पाडून मंडळी रमतगमत भैरवगडाच्या दिशेने निघाली.
आशुचँप नुकतेच डेंग्यु आजारातून उठल्यामुळे अशक्तपणा अनुभवत होते. पण इतर भटक्यांची साथ आणि गडाचा आवाका झेपण्यासारखा असल्यामुळे मजल-दरमजल करत माथ्यावर पोहोचते झाले.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री....हो अखेरीस बालकाचे गर्वहरण झाले जेव्हा त्याच्यापेक्षा लहान बालकाने सर्व मेळाव्यावर अंमल प्रस्थापित केला. अखेरीस, मूळ बालकाने घेतलेले कष्ट पाहून त्यांना मुख्यमंत्रीपदी राहू देत नव्या बालकाला उपमुख्यमंत्रीचा दर्जा बहाल करण्यात आला.
गडावर भैरवनाथाचे मंदिर सोडले तर तसे पाहण्यासारखे काही नाही त्यामुळे मंडळींनी लगोलगच तिथे अडडा जमवला आणि काही नविन मेंबर आल्यामुळे ओळखपरेडीची पहिली फेरी पार पडली.
दरम्यान, एका माकडाच्या पिल्लाने आम्हाला बघून अरे चला चला आपल्यासारखी लई वात्रट मंडळी आलीयंत करत फुल्ल गँग जमवून आणली.
दरम्यान, २४ तास मोहिमेच्या आयोजनात व्यग्र असलेल्या मुख्यमंत्र्यांना अशी माहीती कळाली की भैरोबा गडाच्या पायथ्याकडे जाणारा शॉर्टकट दरड कोसळून बंद झाला असून आता १५-२० मिनिटांऐवजी दीड तास लागणार आहे. त्यामुळे त्यांनी हल्या हल्या करत सगळ्यांना हाकत गडाखाली धाडले. पण पुन्हा ताजी बातमी मिळाली की रस्ता चांगला आहे. मग मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करत हिम्सकुलने आणलेली खास चितळे बाकरवडी, मुंबईकरांच्या डब्यातले पराठे, लाडू आणि इतर पदार्थांचा मंडळींनी फडशा पाडला.
असेही जेवण झाल्यानंतर भैरोबा दुर्ग चढायला कंटाळा येईल त्यामुळे आपण आधीच किल्ला करू मग जेवण करू असा प्रस्ताव आल्यामुळे (अर्थातच मुख्यमंत्र्यांकडून) सर्वांनीच आडवा हात मारला.
भैरोबा दुर्ग हे एकदम सरप्राईज पॅकेज ठरले. पाचनई-कोतूळचे संरक्षित अभयारण्याच पट्टा असल्यामुळे गडाभोवती चांगलीच हिरवाई आहे. त्या गर्द अरण्यातून जातानाच शुभशकुन व्हावा असा स्वर्गीय नर्तक (Asian Paradise-flycatcher) चे दर्शन झाले. तो इतका भिरीभीरी करत होता की फोटो काढणे जमलेच नसते त्यामुळे निवांतपणे त्याच्या देखणेपणाचा आनंद घेतला.
पण बऱ्याच मंडळींनी हे मिसले. घारूअण्णांनी येणार नाही हे आधीच जाहीर केले तर इंद्रा आणि डेव्हील यांनी थोडा वेळ चालून हळूच मागच्या मागे कल्टी मारली. श्रेयस तर पायाच्या दुखण्यामुळे येऊच शकत नव्हता.
मग मजल-दरमजल करत वाटेतल्या शिड्या चढत तिथे बसवलेल्या बाकांवर प्रस्थान मांडले. इतक्या सुंदर ठिकाणी ही बाकडी का बसवली असावीत आणि आता याच्यापुढे झोपाळे आणि घसरगुंड्यापण येणार का हा प्रश्न भेडसाऊन गेला. दुर्गसंवर्धानाच्या नावाखाली असला अाचरटपणा करणाऱ्यांना मुस्काटात वाजवावे अशी तीव्र इच्छा आशुचँपना त्यावेळी झाली.
दरम्यान नाशिकदुर्ग सम्राट हेम याचे आगमन झाले. भैरवगड आधीच पादाक्रांत झाला असल्या कारणाने या चतुर सम्राटाने कुंजरगडाची पाहणी करण्याच निर्णय घेतला आणि लगोलग भैरोबा दुर्गावर दाखल झाला.
भैरोबादुर्गावरही प्रेक्षणिय असे काही नाही. पण आजूबाजूला जो काही पॅनोरामिक व्ह्यू मिळतो त्याला काही तोड नाही. सकाळचा नाष्टा आणि नंतरचे च्याऊम्याऊ पोटाच्या कोपऱ्यात कुठे दडप झाले हे न कळल्यामुळे सगळ्यांनाच आता जेवणाचे वेध लागले होते. त्यामुळे फार वेळ न घालवता सगळ्यांनी परतीचा रस्ता धरला.
मधल्या काळात पवनने सगळ्यांना गाभुळलेल्या चिंचेची पाकीटे वाटली. त्यांनतर त्याच्या पोतडीतून आवळे वाटले गेले. म्हणलं, चिंच, आवळे झाले, वाढलेली पोटे आहेतच आता पेरू आणि बोरं वाटली की सह्यमेळाव्याचे डोहाळजेवणात रुपांतर करण्यात हरकत नाही.
आणि मग लव्हाळे गावात समोर आला तर एक जबरदस्त मेन्यू....रस्सा, भाकरी, कांदा, भात आणि कालवण आणि झणझणीत ठेचा....अहाहा काय चव होती. भात तर इतका चविष्ट होता की बोलता सोय नाही. अर्थातच सगळ्यांनी मनसोक्त उदरभरण केले. आता इतके झकास जेवण झाल्यावर आमच्यासारखेच काही जण आडवे होण्यासाठी पथारी शोधू लागले पण पवन आणि सुन्या आदी मंडळींना पोहण्यात जास्त इंट्रेस्ट. त्यामुळे चरफडत त्यांच्याबरोबर जावे लागले. अर्थात काही मस्त क्लिक्स मिळाले त्यामुळे मग फारसे वाईट वाटले नाही.
सुपर जंपर सुन्या
येताना डेव्हिलने गडबडीत आपल्याबरोबर बाकीच्यांचेही कपडे चुकुन आणल्याने मागे राहील्यांची चांगलीच पचांईत झाली.
आता रात्रीचा मुक्काम होता पाचनईचा..वाटेत सूर्यास्ताच्या पार्श्वभूमीवर कलाडगडाचा अतिशय सुंदर असा नजारा मिळाला.
आशुचँप लिहीतात की...त्यासमयी हवेत बेतशीर थंडावा होता, सूर्यनारायणाने आपली नित्यनेमाची कामे संपवून विश्रांतीस्थळाकडे कूच केले होते, त्याच्या केशरी प्रभावळीवर कलाडगडाचा नजारा अधिकच उठून दिसत होता. आणि त्यावेळी सय आली जिवलग मित्रांची. या क्षणी छायाचित्रणविद्यापारंगत जिप्सी उर्फ योगेश तिथे असता तर काय बहार आली असती या विचाराने आशुचँपला खिन्नता आली.
दुपारचे जेवण अंमळ उशीराच आणि जरा जास्तच झाल्याने सगळ्यांनीच हलकेफुलके काहीतरी खायला पसंती दिली. अर्थातच पाककलातज्ञ मल्लीनाथ आणि इंद्रा यांनी सूप बनवण्याची जबाबदारी घेतली. मायबोलीवरील एक थोर व्यक्तिमत्व श्री. ह.बा. यांनी एके काळ उद्धृत केलेल्या वचनांची त्यावेळी आशुचँप यांना आठवण झाली. हबा वदले होते की
मल्ल्या जर बाई असता तर 'चूल आणि मूल' याच्या पलिकडे कुणी जेसीबी लाऊन ढकलला असता तरीही गेला नसता. त्यानुसार आधी गरमागरम चायनिज सूप आणि नंतर भात आणि तर्रीदार उसळ असा एक जबरी मेन्यू झाला. त्यावर मल्लीने फरसाण घातल्याने जी काय अदभुत चव आली त्याला तोड नाही.
दरम्यान घारूअण्णा आणि कुशल यांनी कँपफायरचा यशस्वी प्रयत्न केला पण दुसरीकडे गिरीविराज हायकर्सच्या सतिश कुडतरकर (सुन्याटुन्या)ने त्याचे क्लाईंबिगचे अनुभव शेअर करायला सुरुवात केली.
भटकी मंडळी किल्ले पालथे घालण्यात पारंगत असली तरी काही अपवाद वगळता कातळारोहणाच्या क्षेत्रात नवखीच. त्यामुळे भक्तीभावाने सर्वांनी श्री सुन्याटुन्या महाराजांचे प्रवचन ऐकले. प्रवचन म्हणताच जम्बो यांनी बसल्याजागी घोरणे सुरु करून या क्षेत्रातला आपला दांडगा अनुभव दाखवून दिला.
सुन्याटुन्याने कातळारोहणादरम्यानचे धोके, झुमारिंग, किरण अडफाडकर या व्यक्तीमत्वाबद्दल माहीती असे बरेच काही त्याने शेअर केले. आशुचँप यांनी पत्रकाराच्या भूमिकेत जात बरेच आडवेतिडवे प्रश्न विचारले तर विनय भिडे यांनी मुंबईकर-पुणेकर वाद निर्माण करण्यासाठी काडी घालून पाहीली. पण सुन्याटुन्याने कुणालाच दाद दिली नाही आणि अतिशय मौल्यवान असे अनुभव कथन केले.
त्यानंतर नाशिकचे राहुल सोनावणे यांना मैदानात घेतले. नाशिक जिल्ह्यात कुठेही ट्रेकिंगदरम्यान अपघात झाला, कुणी वाट चुकले तर राहुल सोनावणे हे खात्रीने मदत करणारच अशी त्यांची ख्याती आहे. मग त्यांनी आत्तापर्यंत आलेल्या रेस्क्यु मिशनचे अनुभव सांगितले. सगळे भटके म्हणजे आपल्याच पंथातले असे समजून चालणाऱ्या आमच्यासारख्या लोकांना ट्रेकरपण कसे विक्षिप्तपणा करतात हे ऐकून वाईट वाटले.
आता वेळ होती कुशलची. याने पिंपरीच्या सागरमाथा संस्थेबरोबर एव्हरेस्ट मोहीमेत सहभाग घेतला होता आणि बेसकँपची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली होती. त्यामुळे त्याच्यावरही प्रश्नांचा भडीमार करण्यात आला.
एकूणच सह्यमेळावा म्हणजे नुसतीच मौजमजा असे स्वरुप न येता माहीतीची देवाणघेवाण, भटक्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नांवर जसे की गावकर्यांचे बदलते स्वरुप यावर अतिशय सुंदर चर्चा झाल्यामुळे या पूर्ण मोहिमेला एक वेगळीच उंची प्राप्त झाली.
झोपण्याची व्यवस्था दोन वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आली होती. आणि आशुचँपने एकदंरीत रागरंग पाहून आधी पसरलेली पथारी जम्बो यांना देऊन दुसरीकडे प्रस्थान केले. हा निर्णय चांगलाच फायदेशीर ठरला कारण त्या घरी झालेले कोंबडी पळाली प्रकरण.
याबद्दल घारूअण्णा, स्वच्छंदी उर्फ मनोज आणि मल्ली जास्त माहीती देऊ शकतील.
पण त्यातही मनोज उर्फ स्वच्छंदी आणि हेम यांची घाटवाटांबद्दल घनघोर चर्चा सुरुच होती. मुख्यमंत्री त्यांचे बोलणे थांबायचे वाट पाहत होते पण रात्रभर थांबला तरी यांच्या घाटवाटा संपणार नाहीत याची जाणिव होताच त्यांनी माऊथऑर्गनवाजवायला सुरुवात केली. थंडीचा कडाका चांगलाच वाढला होता आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांचे वादनही आटोक्यात ठेवत निद्रादेवीची वाट धरली.
विन्या, डेव्हील मंडळी तर केव्हाचीच ढाराढूर झाली होती. पण आशुचँपच्या पायाशीच एका वासराला बांधल्यामुळे एक डोळा त्याच्याकडे ठेवत डोळे मिटले.
दुसरे दिवशी साडेपाचला वेकअप कॉल, सात वाजता नाष्टा आणि लगेच गडाकडे प्रस्थान असा हुकुम हायकमांडकडून आल्यामुळे सगळेच चिंतेत होते पण शेवटी देवालाच दया. आदले दिवशीचा ठेचा बर्याच जणांना चांगलाच भोवला आणि पहाटेची पळापळ सुरु झाली. आशुचँपही त्याला अपवाद नव्हतेच.
मग पुन्हा एकदा चहा-पोहे कार्यक्रम पार पडला आणि कलाडगडाकडे प्रस्थान केले. आजचा दिवस होता ग्रे. म्हणजे बहुतांश सर्वांनीच दोन रंगाचे टीशर्ट घेतले होते. त्यामुळे एकदम सर्वांनी साऊथ अफ्रिकेतून न्यूझीलंडमध्ये स्थलांतर केले.
गड अगदीच सोपा आहे आणि गडाच्या मध्यापर्यंत गाडी जाते असे किल्ले विकिपिडीयानी जाहीर केल्यामुळे निवांत होतो, पण गडाचा चढ बघूनच मुख्यमंत्र्यांना चुकीचा अहवाल मिळाल्याची जाणिव झाली. मग खुलासा असा करण्यात आला की पूर्वीची वाट ८ किमी अलीकडेच संपत होती. त्यामाने आता आपण बरेच वर आलो आहोत.
कलाडगड आहे लहानखुराच पण पहिल्या पावलापासूनच तीव्र चढण सुरु होते ती पार माथा गाठेपर्यंत. त्यात वाटेत घसारा आणि कातळटप्पा देखील. त्यामुळे चांगलीच वाट लागली. जम्बो यांना मध्यावर आल्यानंतर त्रास होऊ लागल्याने त्यांच्या मदतीसाठी सुन्या आणि मल्ली पुन्हा खाली धावले. कौतुकाची गोष्ट अशी की त्यांना खालपर्यंत सोडून ते पुन्हा धावत गडावर आले. त्यांच्या स्टॅमिनाला सलाम. घारूअण्णांनी धोरणीपणे पुन्हा एकदा गडाखालीच राहण्याचा निर्णय घेतला.
मोबाकरांचा ट्रेक आणि यो रॉक्स असताना उडीबाबा प्रोग्रॅम होणार नाही हे संभवतच नव्हते. त्यामुळे सगळ्यांनीच मनसोक्त उड्या मारून घेतल्या. त्यात विन्याचे व्हॅल्यू अॅडीशन भारी ठरले. एरवी एकदम धीरगंभीर असणाऱ्या हेमने देखील उड्या मारल्या.
गड उतरल्यावर आता पोहण्याचा बेत आखत असतानाच मनोजची गाडी पंक्चर झाली. त्यात टायर बदलणारा एक आणि सूचना देणारे १५ असा प्रकार असल्याने जो काही धुमाकुळ घातला तो भन्नाटच होता.
शेवटी एकदा पोहण्याचे ठिकाण आले. इतका मस्त डोह होता आणि त्याबाजूने मस्त कातळ, छोटा धबधबा आणि कंबरेएवढे पाणी असल्याने सगळ्यांनीच डुंबण्याचा आनंद घेत दोन दिवसाच्या ट्रेकिंगचा शिण घालवला. त्यातही बर्याच गंमतीजमती झाल्या पण त्या राखीव ठेवल्या आहेत.
मग तिथेच निरोप समारंभ पार पडला. पुढच्या मेळाव्यात काय करता येईल आणि काय टाळता येईल यावर साधकबाधक चर्चा झाली आणि मंडळी पांगली. पण पुणेकरांसाठी अजून धम्माल बाकीच होती. कारण आकर्षण होते कुशलने रांधलेली गावरान कोंबडी. त्या कोंबडी रस्स्याला जी काय अप्रतिम चव होती की बाजरीची भाकरी आणि रस्सा यावर तुटुन पडलो. या मेळाव्यात एकदंरीतच खाण्यापिण्याची जोरदार चंगळ होती.
पुणेकरांना परतीच्या प्रवासात दोन विचित्र अनुभव आले. पहिले आळेफाट्यानजिक एक अपघात. रस्त्यात मधोमध पडलेल्या एका मध्यमवयीन माणसाभोवती इतर कोंडाळे करून उभे असलेले पाहताच सर्वजण तिकडे धावले. त्या माणसाच्या पायाला जबर मार लागला होता आणि तीन ठिकाणी तुटला असावा हे मांडीतून बाहेर आलेले हाडच सांगत होते. बरेच रक्तही सांडले होते. आणि गावकरी सैरभैर झाल्यासारखे सगळ्यांना शिव्या हासडत होते.
अखेरीस, ओंकारने शांतपणे परिस्थिती हाताळत हायवे अॅथोरीटीला फोन केला आणि अँब्युलन्स पाठवण्याची विनंती केली. दरम्यान सुन्या, पवन यांनी ट्रॅफिक सुरळीत राहतील असे पाहिले. आणि मायबोलीकरांच्या या एकत्रित प्रयत्नांमुळे थोड्याच वेळात अँब्युलन्स येऊन त्या जखमी माणसाला घेऊन गेली आणि एक चांगले कार्य घडल्याच्या समाधानात सर्वजण गाडीकडे परतले.
नंतर मग धम्माल आली ती पिंपरीच्या अलीकडच्या टोलनाक्यावर. आमची गाडी पिंपरी पासिंगची असल्यामुळे त्याला टोल लागणार नव्हता. पण टोलनाक्यावरच्या लोकांना दादागिरी करत पैशाची मागणी केली. त्यामुळे कुशल जे काही पिसाळला आणि पट्टा सुरु केला.
तु कशाचे पैसे मागतो बे. तुला पाहिजे तर तुझ्या घरच्याला १०० रुपये देतो पण या हरामखोरांना एक पैसा देणार नाही अशीच सुरुवात झाली. आणि मग तिकडून ८-१० जण आणि गाडीतून कुशल, पवन, ओंकार अशी तुफान धुमश्चक्री झाली. एकवेळ तर अशी आली की आता हाणामारीच होणार, पण शेवटी समेट करावा लागला. त्यानंतरही कुशल बराच वेळ धुमसत होताच.
मग एकेका टप्प्यावर मंडळींनी निरोप घेतला आणि या मेळाव्याची सांगता झाली.
विशेष शब्द - मुद्दाम वेगळे देण्याचे कारण म्हणजे अनिरुद्ध हा छोकरा. या पिल्ल्याने पूर्ण मेळा्यात जाम धमाल आणली. आधी लाजरा बुजरा वाटणारा नंतर नंतर इतका मिसळला की भल्याभल्यांची फिरकी घ्यायला कमी केले नाही. चालायच्या बाबतीतही कुठेही कडेवर घ्या म्हणून आग्रह नाही की कंटाळलो म्हणून कुरकुर नाही. सॉलीड उत्साह. या वर्षात त्याने १२-१३ किल्ले केले आहेत ही माहीती कळल्यानंतर तर फारच कौतुक वाटले..त्याचे आणि त्याच्या बाबाचेही.
अजून विशेष शब्द - सह्यमेळाव्याची संपूर्ण जबाबदार खांद्यावर पेलणार्या ओंकार ओक बद्दल नाही लिहीले तर व्यर्थ. संयोजन पूर्णपणे अंगात मुरलेल्या ओंकारने मेळाव्याची आखणी इतकी चोख केली होती की पुणेकरांनादेखील त्यात नावे ठेवायला काही उरले नाही. कुठे थांबायचे, कुठे जेवायचे, त्यांची फोनाफोनी, मेन्यू सगळे काही त्याने एकट्यानेच निभावून नेले. आणि इतक्या टारगट लोकांना सांभाळून पारही पाडून दाखवले.
अर्थात आर्थिक व्यवहाराच्या बाबतीत त्याचा झालेला गोंधळ पाहता मुख्यमंत्र्यांनी एकाच वेळी जबाबदारीची दोन खाती सांभाळू नये असा आगावू सल्ला देण्यात आला ही गोष्ट वेगळी (दुसरे कोण देणार...पुणेकरच आम्ही)
पण सर्वांना खूप खूप धन्यवाद...मजा आली मित्रांनो..
Missed it
Missed it
झकास !!
झकास !!
झकास आणी मस्त वृत्तांत...आणी
झकास आणी मस्त वृत्तांत...आणी फोटोपण सही पण.. मधे मधे जागा भरण्यासाठी बराच स्कोप ठेवला आहेस
ग्रुप फोटो कुठे आहे?
ग्रुप फोटो कुठे आहे?
आला. वृत्तांत आला. मस्तच चँप
आला. वृत्तांत आला.
मस्तच चँप !
अखिल भारतीय वस्त्रोद्योग
अखिल भारतीय वस्त्रोद्योग महामंडळाच्या प्रतिनिधी सनीताई लिओन >>
मनोज, गाळलेल्या जागा भरा मग..
मस्त वृत्तांत!.. वंचित घटक
मस्त वृत्तांत!..

वंचित घटक
घारुचे सिक्सर्स नोंदवलेत कां कुणी?
वृत्तांत बदलून टाकण्यात आला
वृत्तांत बदलून टाकण्यात आला आहे
लय लय लय भारी रे चँपा... हा
लय लय लय भारी रे चँपा...
हा मिसला. पुढचा नक्की (करेन)
मस्तच आशुदा हा मिसला. पुढचा
मस्तच आशुदा
हा मिसला. पुढचा नक्की (करेन).................. गुरुदेवा मीपण
सुंदर. सर्व भटक्यांचे आभार!
सुंदर.
सर्व भटक्यांचे आभार! छोट्या अनिरुद्धचे विशेष कौतुक!
खुसखुशीत वृत्तांत आणि जबरदस्त
खुसखुशीत वृत्तांत आणि जबरदस्त फोटो.
काही काही पंचेस खासच 
मस्तच!!
झकास नि झकास !!
झकास नि झकास !!
वृत्तांत , फोटो मस्तच.
वृत्तांत , फोटो मस्तच.
और ये लगा चॅम्प का सिक्सर..
और ये लगा चॅम्प का सिक्सर..
धम्माल, चटपटीत वृत्तांत आहे. मात्र फोटोंची फोडणी कमी पडलीय...
मस्त वॄत्तांत आणि फोटो सुद्धा
मस्त वॄत्तांत आणि फोटो सुद्धा
आशुचँप अप्रतिम लिहिला आहेस
आशुचँप अप्रतिम लिहिला आहेस लेख... सगळं कसं जमुन आलंय...
>> अनिरुद्धने पूर्ण मेळा्यात जाम धमाल आणली. त्यचे खरच खुप कौतुक वाटले.
बाकिचे दर्दी भटके तुमचे पण
बाकिचे दर्दी भटके तुमचे पण लेख येऊ द्यारे.....
खूप छान वृतांत, फोटो सुरेख.
खूप छान वृतांत, फोटो सुरेख.
जबरदस्त व्रुतांत छान प्रचि,
जबरदस्त व्रुतांत छान प्रचि, खुप धमाल केलेली दिसतेय
मस्त वृतांत. पोहण्याचा,
मस्त वृतांत.
पोहण्याचा, शेकोटीचा फोटो छानच !
हाय्ला लै भारी रे!!!
हाय्ला लै भारी रे!!!
घारुआणासारखा धोरणीपणा चालतो हे माहिती असतं तर घारुच्या धोरणीपणाचा जोडीदार म्हणुन मी आलो अस्तो.
मल्ल्याकडे बघुन म्हणावं वाटत "ह्या एवढाशा चुळुक देहात एवढी एनर्जी कुठुन येते"
साभार : पुलंनी केलेली कोटी.
झक्या आला असतास तर तुला घारु
झक्या आला असतास तर तुला घारु सारखे खाली बसू दिलेच नसते..
अरे व्वा! खूपच धमाल केलेली
अरे व्वा! खूपच धमाल केलेली दिसते. फोटो खूप छान. दुसरं पोर्ट्रेट आवडलं. आणि डाइव्हचा फोटो!
वर्णन एकदम खास जमलंय.. मज्जा
वर्णन एकदम खास जमलंय.. मज्जा आली वाचायला..
छोट्या पिल्लाचा उत्साह पाहून छान वाटलं... मस्त!!
ते शेंदूर का काय लावलेले कातळाचे दगड पाहून ,'कर्ज' सिनेमातील ,'तो' प्रसंग आठवत राहीला
ते शेंदूर का काय लावलेले
ते शेंदूर का काय लावलेले कातळाचे दगड पाहून
त्याला विरगळ म्हणतात. त्या ठिकाणी एखाद्या जिंकलेल्या युद्धाचं किंवा युद्धात धारातीर्थी पडलेल्या व्यक्तीचं प्रतीक म्हणुन उभं करतात.
मल्ल्या विरघळ नाहे रे
मल्ल्या विरघळ नाहे रे "वीरगळ"
एखाद्या परक्रमाची विजयाचि किंवा विजयी व्यक्तीची आठवण म्ह्णुन सलग दगडात कोरलेली चित्रे असे स्व्ररुप असते.
त्याला विरघळ म्हणतात.>>>
त्याला विरघळ म्हणतात.>>> वीरगळ रे.
असेच सतीचे दगड पण असतात.
मस्त लिहीलय. झकास झालाय
मस्त लिहीलय. झकास झालाय सह्यमेळावा.
फोटो मस्तच काढलेत.
फोटो मस्तच काढलेत.
Pages