‘क्रांतितीर्थ’ : चापेकर बंधू

Submitted by ferfatka on 18 April, 2013 - 06:18

महान क्रांतिकाराक चापेकर बंधूंचे ‘क्रांतितीर्थ’

२२ जून १८९७ला रँडवर पाळत ठेवून चापेकर बंधूंपैकी दामोदरने गोळी झाडली. या घटनेला आज ११८ वर्षे पूर्ण झाली. त्या विषयी..

DSCN2000.JPG

पुणे हे स्वातंत्र्यकाळात क्रांतिकाराकांचे माहेरघर बनले होते. अनेक स्वातंत्र्यवीर, क्रांतिकारक या पुण्याने दिले. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या काही क्रांतिकारांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यात चापेकर बंधूंचे नाव उल्लेखनीय आहे. एकाच घरातील तिघा बंधुंना ब्रिटीश सरकारने फाशी दिली होती. चापेकर बंधू राहत असलेले चिंचवडगावातील त्यांचे ठिकाण मोरया गोसावी मंदिरापासून काहीच अंतरावर आहे. मी लहान असताना चापेकर बंधूंविषयी मराठी चित्रपट पाहिला होता. चित्रपटाचे नाव आठवत नाही. पण चित्रपटातील ‘रँड’ या इंग्रज अधिकाराला चापेकर बंधूंनी ठार केल्याचे दृश्य पाहिले होते. चिंचवडगावातील त्यांच्या या वाडय़ाजवळून अनेकवेळा गेलो. परंतु वाडय़ात गेलो नव्हतो. आज वाडा पाहण्याचे ठरवून गेलो.

वासुदेव हरी चापेकरांचा जन्म 1879 मध्ये कोकणात झाला. कालांतराने ते चिंचवड येथे स्थायिक झाले. 1897 पुण्यात प्लेगची मोठी साथ आली होती. या साथीत अनेकांचे बळी घेतले गेले. प्लेगच्या साथीमध्ये रोगी शोधून काढून त्याला उपचारासाठी अमानवीय पद्धतीने नेले जात असे. तसेच ज्यांना या रोगाची बाधा झाली नाही अशा व्यक्तींना देखील केवळ संशयावरून अत्याचार करण्यात आले. प्लेगची साथ आटोक्यात आणण्याच्या हेतूने भारतात पाठविलेल्या वॉल्टर चार्ल्स रॅन्डने रोग नियंत्रणाच्या नावाखाली जनतेवर अत्याचाराचे सुरु केले. रॅडने सामाजिक रुढी परंपरांना पायदळी तुडवून लोकांचा असंतोष ओढवून घेतला. या बिटिश अधिका:याने लोकांचा छळ केला. हिंदूंची घरे जाळणो, देवघरात जाऊन देवांचा अपमान करणो, तपासणीच्या नावाखाली महिलांशी असभ्य वर्तन करणो अशा त्याच्या क्रूर कृत्यांमुळे समाजाच्या सर्वच थरांमध्ये संतापाची लाट उसळली. याचा चापेकर बंधूच्या (दामोदर, बाळकृष्ण, वासुदेव) मनात राग निर्माण झाला. हे अत्याचार करणारा इंग्रज अधिकारी रँड होता.
रँडचा सूड घेण्याची योजना तयार करु न त्याची अंमलबजावणीही केली गेली. यात दामोदरांच्या ‘दादा गोंद्या आला रे आला’ या आरोळी ऐकून बाळकृष्ण चापेकरांनी रॅडची बग्गी आली आहे. अशा समजाने चुकून लेफ्टनंट आयरिस्टवर गोळ्या झाडल्या. ती चूक कळल्यावर रँडची बग्गी आल्यावर दामोदर चापेकरांनी रँडवर गोळीबार केला. यात लेफ्टनंट आयरिस्ट जागीच ठार झाला तर रॅडने 3 जुलै 1897 रोजी हॉस्पिटलमध्ये गेल्यावर प्राण सोडले. पुणे युनिवर्सिटीजवळ असलेल्या गणेशखिंडीनजीक ही घटना घडली. चापेकर बंधु त्यावेळी निसटण्यात यशस्वी झाले असले तरी नंतर तिघांनाही नंतर पकडण्यात आले. चापेकर बंधूंना द्रविड बंधूंच्या फितुरीमुळे अटक झाली. याचा बदला चापेकरांचे तिसरे बंधू वासुदेव हरी चापेकर व त्यांचे एक सहकारी महादेव रानडे यांनी खुन्या मुरलीधराजवळ द्रविड बंधूंचा वध करून घेतला. त्यानंतर त्यांनाही अटक झाली. दामोदर चापेकर यांना 18 एप्रिल 1898 रोजी फाशी देण्यात आले. त्यानंतर वासुदेव चापेकर यांना 8 मे 1899 तसेच बाळकृष्ण चापेकर यांना 12 मे 1899 रोजी येरवडा तुरुगात फाशी देण्यात आली.

DSCN20067.jpg

आज चापेकर वाडय़ात ठेवलेला चापेकर यांचा पुतळा 4 ते 5 वर्षापूर्वी चिंचवड भाजी मंडईतील मुख्य चौकात उभारलेला होता. 1978 मध्ये चिंचवड गावातील मुख्य चौकात एका हातात पिस्तुल घेऊन उभे असणा:या दामोदर चापेकरांचा सहा फुटी पुतळा उभारण्यात आला होता. या चौकात घडय़ाळ टॉवर व पुतळय़ाचे भूमीपूजन समारंभ कै. बॅ. विठठलराव गाडगीळ व शरद पवार यांच्या उपस्थितीत झाला होता. सध्या या पुतळाच्या चौकात मोठा पूल निर्माण झाला आहे.

चापेकर बंधू राम आळीतील ज्या वाड्यात राहत होते त्याची फार दुरवस्था होती. या वाडय़ाची आतापर्यंत समाजकंटकांनी दोन वेळा जाळपोळ केली. 1930 च्या सुमारास हा वाडा पेटवण्यात आला होता. महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर 1948 मध्ये ही हा वाडा पेटविण्यात आला होता. स्मारक समितेने तेथे प्रथम व्यायामशाळा सुरू केली.

चिंचवड गावात क्रांतिवीर हुतात्मा चापेकर बंधू 125 वर्षांपूर्वी ज्या वाडय़ात राहात होते त्या जागेवर सुमारे दीड कोटी रुपये खर्च करून स्मारक उभारण्यात येत आहे. स्मारकाच्या प्रथम टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. तर दुस:या टप्प्याचे काम सुरू आहे. या चौघा क्रांतिकारकांचे स्मारक चापेकर बंधूंच्या जुन्या वाडय़ात उभारण्यात आले आहे. त्याला शोभेल असेच ‘क्रांतितीर्थ’ असे नाव दिले आहे. येथे अजून काही काम बाकी आहे. स्मारक उभारण्याचा खर्च पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे करण्याचे 1998 मध्ये महापालिकेचे आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी मान्य केले. सध्या समितीचे कार्यवाह गिरीश प्रभुणे आहेत. चापेकरांचा वाडा 1857 च्या सुमारास उभारला असावा. स्मारक म्हणून जुना वाडा त्याच पद्धतीने उभारण्यात येत आहे. सध्या हा वाडा 30 फूट लांब व 150 फूट रूंद आहे. जुन्या वाड्यांचा अभ्यास करून स्मारकाची रचना करण्यात आली आहे. लाकूड, दगडकाम, कोरीव काम हे दुस:या टप्प्यात पूर्ण करण्यात येणार आहे. स्मारकामध्ये चापेकरांच्या वस्तू, त्यांच्याविषयी लेखन साहित्य ठेवण्यात येणार आहे. स्मारकाच्या दुस:या मजल्यावर देशातील विविध क्रांतिकारकांची तैलचित्रे लावण्यात आली आहेत. यात संत मुक्ताई, संत मीराबाई, झाशीची राणी लक्ष्मीबाई, सरोजनी नायडू, पुण्शोल्क अहल्याबाई होळकर आदीं विषयी माहिती दिलेली आहे.

दामोदर चापेकर यांचा स्मृतिदिन 1972 पासून दर 18 एप्रिल रोजी चापेकर स्मारक समितीच्या वतीने चिंचवड गावात साजरा केला जातो. 1857 च्या स्वातंत्र्ययुध्दानंतर निर्माण झालेल्या क्रतिकारकांमधे चापेकर बंधु यांना आद्य क्रांतीकारकांचे स्थान आहे. लाला लजपत राय यांनी चापेकर बंधूंचे ‘गौरव भारतातील क्रांतीचे जनक’ असा केला आहे.

रँडच्या वधाच्या वेळी दामोदरपंतांचे हे अवघे वय होते 27 वर्षे, बाळकृष्ण यांचे वय होते 24 वर्षे व वासुदेवरावांचे वय होते 18 वर्षे. अवघ्या विशी-पंचवीशीतील या तरु णांचा त्याग व शौर्य पाहून आजही उर अभिमानाने भरून येतो ! राष्ट्रकार्यासाठी तीन सख्या भावांनी केलेले हे बलिदान जगात एकमेव आहे ! त्यांच्या या त्यागास व शौर्यास विनम्र अभिवादन.

‘‘स्वदेशिहताकरिता स्वप्राणाची पर्वा न करिता कोटय़वधी पुण्यवान लोक समरांगणी धारातीर्थांचे ठिकाणी पतन पावतात तेव्हा स्वदेशहित होते, फुकट होत नाही. एवढी अक्कल या आधुनिक विद्वांनाना नसावी ही मोठ्या दुर्दैवाची गोष्ट होय.’’
- दामोदर हरी चापेकर

अधिक फोटोसाठी ही लिंक पहा. http://ferfatka.blogspot.com/2013/03/blog-post_11.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चापेकर बंधूंचे देशाच्या स्वातंत्र्यासाठीचे बलिदान स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी घेतलेल्या सुप्रसिद्ध शपथेसाठी प्रेरणास्थान ठरले.
चापेकर बंधूंचे स्मारक लवकरात लवकर पूर्ण होवो!

हुतात्मा चापेकर बंधुना विनम्र अभिवादन!

मी सध्या चिंचवडलाच राहतोय, चापेकर वाड्याच्या अगदी जवळ. हा वाडा, धनेश्वराचं मंदिर आणि आत्ता थेरगाव बोटिंग क्लब पाहायच्या यादीत आहे.

@डॉ.कैलास गायकवाड | 19 April, 2013 - 17:42नवीन
शीर्षकात ''चाफेकर'' असं लिहा प्लीज. <<

नेमके नाव काय याचा अशोक यांनी नेमका शोध घेऊन इथे लिहिले होते. तो प्रतिसाद शोधावा लागेल..

धन्यवाद धाग्याबद्दल.

विनम्र अभिवादन!

चाफेकर बंधु, सावरकर, यासारखे प्रखर देशप्रेमी आणी हिंदुत्ववादी नेत्यांची भारताला आज खरेच गरज आहे.

>>>‘‘स्वदेशिहताकरिता स्वप्राणाची पर्वा न करिता कोटय़वधी पुण्यवान लोक समरांगणी धारातीर्थांचे ठिकाणी पतन पावतात तेव्हा स्वदेशहित होते, फुकट होत नाही. एवढी अक्कल या आधुनिक विद्वांनाना नसावी ही मोठ्या दुर्दैवाची गोष्ट होय.’’
- दामोदर हरी चापेकर <<<<<
समरांगणि हा शब्द महत्वाचा, नन्तर उण्यापुर्‍या वीसपन्चवीस वर्षात नन्तरच्या विद्वानान्नी तो हरवूनच टाकला!

देवळात बसुन कापसाच्या वाती वळता वळता कानावर काही पडते म्हणून देवभक्ति होत असेल, तर वाती का वळू नयेत? तत्द्वतच, अहिन्सेच्या मार्गाने मोर्चाबिर्चात सामिल होऊन थोडेफार फिरणे व जोडीला देशभक्तिही होत असेल तर ती का करू नये? जरुर करावी, का नै करू! पण ती तशी करणे म्हणजे स्वातन्त्र्य मिळते वा मिळालेले स्वातन्त्र्य जपले जाते या भ्रमात कोणी का रहावे? रणाविण स्वातन्त्र्य कोणा मिळाले? असो.

क्रान्तिकारकान्च्या या चौघा अर्ध्वयुंस माझा सादर प्रणाम Happy

हा धागा इतक्या उशिरा बघितल्याबद्दल दिलगीर आहे.
इथे माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

चापेकर कि चाफेकर याबद्दलचा शोध 'अशोक' यांनी परिश्रमपूर्वक घेतला होता व तो माबोवर नोंदविल्याचे आठवत होते. त्याची लिंक खाली देतो आहे:
http://www.maayboli.com/node/35869?page=1
त्यावरून चापेकर असेच नाव कागदोपत्री आढळते असे दिसते. त्याचेच चाफेकर हे बदल झालेले रूप असावे.
दोन्तीन दिवसांपूर्वी मी स्वतः क्रांतितीर्थ पाहाण्यास गेलो होतो पण उशीर झाल्याने बाह्य भागाचेच दर्शन होऊ शकले. तेथे स्मारक उघडे असण्याच्या वेळांचा फलक नाही. तो लावला तर बाहेरून येणार्‍यांच्या साठी सोईचे होईल. दुपारी ४.३० नंतर उघडते असे आसपासच्या लोकांनी सांगितले. आता पुन्हा कधितरी जाईन.

तुमचा लेख वाचल्या पासून चापेकर वाडा पाहायचं मनात होतं. अखेरीस २ आठ्वड्यांपूर्वी तो योग आला. खरचं सुरेख आहे स्मारक.

इतक्या छान माहीती बद्द्ल धन्यवाद!

आज दामोदर हरि चापेकर यांचा आज (18 एप्रिल) बलिदानदिन. तीन सख्ख्या भावांनी राष्ट्रकायार्साठी केलेले हे बलीदान जगात एकमेव आहे ! भूमातेला स्वतंत्र करण्याच्या प्रेरणेने ऐन तारुण्यात स्वत:च्या प्राणाची आहुती देणाºया चापेकरांना आदरांजली.

सध्या या पुतळाच्या चौकात मोठा पूल निर्माण झाला आहे.>>>>>>> त्यामुळे चापेकरांचा पुतळा हलवला गेला .तो पुतळा गुरुकुलशेजारी बसविण्यात आला आहे.गुरुकुलला देण्यात आलेली जागाही बहुदा चापेकर संस्थानची आहे.

रायगड जिल्ह्यात त्यांच्या गांवीही छोटं पण सुबक स्मारक पाहिल्याचं आठवतं.
त्यांच्या स्मृतिला अभिवादन !

चापेकर टॉवर आणि पुतळा चापेकर चौकातुन हलवला गेला याला पाच वर्षे होउन गेली. चापेकरांच्या टॉवरच्या बदल्यात त्याच चौकात पुतळा पुन्हा बसवण्यासाठी जागा तयार करण्यात आली. प्राथमीक काम सुरु झाल आणि कुठे माशी शिंकली माहित नाही. प्रार्थमीक काम पुन्हा उखडुन काढण्यात आल आहे.

नविन स्मारक कधी होणार, त्याचा आराखडा काय असेल यावर महानगरपालिका मौन बाळगुन आहे.

Pages