उदंड देशाटन करावे ... सिक्कीम - भाग ७ : नथु-ला - ऐकत्या कानांची खिंड...

Submitted by सेनापती... on 9 November, 2012 - 15:10

उदंड देशाटन करावे ... सिक्कीम - भाग १ : पूर्वतयारी ...
उदंड देशाटन करावे ... सिक्कीम - भाग २ : गंगटोकच्या दिशेने...
उदंड देशाटन करावे ... सिक्कीम - भाग ३ : एम.जी.रोड...
उदंड देशाटन करावे ... सिक्कीम - भाग ४ : फुलले रे क्षण माझे...
उदंड देशाटन करावे ... सिक्कीम - भाग ५ : जोरगाँग आणि रुमटेक मॉनेस्ट्री...
उदंड देशाटन करावे ... सिक्कीम - भाग ६ : उर्वरित गंगटोक...

मुंबईवरून व्हाया कोलकत्ता गंगटोकला पोचून २ दिवस झाले होते. आसपासचे स्थळदर्शनही आटोपले होते. आता आज लक्ष्य होते ते भारत - चीन सिमेवर असणार्‍या नथु-ला अर्थात ऐकत्या कानाच्या खिंडीची भेट. पहाटे ६ वाजता जाग न येते तर नवल. मोकळ्याहवेत बाहेर येउन बसावे. सांगितल्या वेळेत बरोबर चहा-कॉफी हजर असावी. सोबत एम.जी.रोड वरील बेकरीमधील खारी, टोस्ट नाहीतर बटर कुकीज. अहाहा!!!

सकाळ ताजीतवानी आणि प्रसन्न. Happy आवज नाही, गोंगाट नाही की प्रदुषण नाही. निवांत आवरून घेतले की नाश्ता तयार. आज तर प्रधान बाईंनी कहर केला. चक्क छोले-पुरी. कसे नाही कसे म्हणावे याला!!! थंड वातावरणात थोडे जास्तच खाल्ले जाते नाही का. श्रीला तिच्या दातांचा विसर पडला होता. शमिका आणि राजीव दोघेही त्यांचे व्याप ठाण्यालाच सोडून आले होते. राजीव काकांना बघून तर मी थक्क व्हायचो. खाण्याच्या बाबतीत त्यांनी थंडी जास्तच मनावर घेतली होती. Wink

नथु-ला येथे जाण्यासाठी भारतीय लष्कराकडून परमीट मिळवावे लागते. स्थानिक एजंट हे काम तसे सहजपणे करुन देतात. पण एका दिवसात इथे जाणार्‍या गाड्यांची संख्या लष्कराने २०० अशी ठेवली आहे. त्यामुळे प्रत्येकाला इथे जायला मिळेलच याची खात्री देता येत नाही. त्यामानाने उत्तर सिक्किमचे परमीट सहज मिळून जाते. रस्त्याची एकुण अवस्था बघता हा आकडा २०० का? हे उत्तर सहज मिळते. खरेतर हा रस्ता अधिक उत्तम स्थितीत असणे गरजेचे आहे. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन त्यांच्या हिमांक प्रकल्पातून लडाखमध्ये उत्तम काम करत आहेत. त्यामानाने हा रस्ता अतिशय वाईट अवस्थेत आहे. तुम्हाला पाठीचे / मानेचे दुखणे असेल तर हा प्रवास नक्की टाळा. किंवा प्रवासाआधी एकदा रस्त्याची किमान अवस्था विचारून पहा.

अतिशय अरुंद आणि वळणा-वळणाच्या उंचसखल आणि खडबडीत अश्या रस्त्याने हळु हळु उंची गाठत आपण नथु-लाकडे सरकत असतो. अचानक दिसते ती लांबचलांब गाड्यांची रांग. पण ह्या सर्व गाड्या थांबून का राहिल्या आहेत बरे? पुढे जाउ देत आहेत ना? की इथुनच मागे फिरायचे? मग लक्ष्यात येते की दरड कोसळलेली आहे आणि लष्कराचे जवान अथक प्रयत्न करून मार्ग मोकळा करण्याच्या मागे लागले आहेत. रांगेत गाडी उभी करत आमचा ड्रायव्हर सत्या खाली उतरला.

सत्या - जल्दी खुले तो अच्छा है. २ बजे के पह्ले लास्ट पोस्ट पे नही पहुचे तो नथु-ला जानेको नही मिलेगा.
मी - लेकीन हमारे पास परमीट है ना. फिर क्यु नही जाने देंगे?
सत्या - वो उनपे है. उपर जानेतक ५ बार परमीट चेक करते है. पॉपकॉर्न खाओ.
श्री - पॉपकॉर्न क्यु?
सत्या - ज्यादा ऑक्सिजन मिलेगा. नही तो अब आगे सास लेना मुश्किल होता जायेगा.

आसपासच्या गावामधले बरेच लोक पॉपकॉर्न विकत बसले होते. आम्ही सहज खायला म्हणून ते घेतलेही पण त्याने जास्त ऑक्सिजन कसा मिळेल हे काही मला अजुन कळले नाहिये. Happy

नथु-लाकडे जाणारा रस्ता सोंग्मो उर्फ चांगू लेक वरून पुढे जातो. १२,४०० फुटांवर असलेले हे एक ग्लेशियर लेक आहे. लेकच्या आजुबाजुला चिक्कर उपहारगृह आहेत. पण नुडल्स सोडुन काही खायला मिळेल तर शप्पथ!!! लडाखला आणि इथेही हे एक लक्षात आलयं ते म्हणजे नाश्ता मजबुत करून निघा आणि दिवसाअखेर पुन्हा व्यवस्थित जेवा. दिवसभर फिरताना तुम्हाला धड काही खायला मिळेल याची शाश्वती नाही. Happy

ज्या लोकांना नथु-लापर्यंत जाण्याचा परवाना मिळत नाही त्यांना किमान चांगू लेक आणि बाबामंदिरपर्यंत नक्की जाता येते. आमचे मुख्य लक्ष्य नथु-ला असल्याने इथे आणि बाबामंदिरला न थांबता आम्ही थेट पासपर्यंत पोचलो. जसे जसे आपण वर जातो तसा निसर्ग अधिकच खुलतो. बर्फाच्छादित दोंगर आणि त्यातून उगम पाउन चांगू लेक मध्ये मिळणारे पाण्यचे ओढे. नथु-ला म्हणजे सिक्किम भेटीमधले माझ्या दृष्टीने सर्वात महत्वाचे स्थळ होते. पुर्व सिक्किममध्ये १४,१४० फुटांवर असलेल्या या खिंडीमधून चीनच्या ताब्यात असणार्‍या तिबेटमध्ये प्रवेश करता येतो. प्राचीन काळचा हा सिल्क रुट. १९६२ च्या युद्धानंतर हा मार्ग बंद करण्यात आला होता. भारत-चीन मधील करारानंतर २००६ मध्ये नथु-ला पुन्हा सुरु केला गेला. दरवर्षी येथून भारतातर्फे २९ तर चीन तर्फे १५ वस्तुंची देवाण-घेवाण, खरेदी-विक्री होते.

नथु-ला पोस्टकरता थोड्या पायर्‍या चढून तारेच्या कुंपणापर्यंत जावे लागले. वाटेत डाव्या हाताला भारतीय लष्कराने शहीद स्मारक उभे केले आहे. थोडेवरती आपला तिरंगा वार्‍यावर अभिमानाने फडकत उभा आहे. पायर्‍या चढताना सावकाश. कारण विरळ हवेनी आपल्याला लगेच त्रास होउ शकतो. डोके जड होणे, श्वास घेण्यात अडचण येणे हे तर सर्रास. अगदी ६-८ पायर्‍या चढून थांबत गेलो तरी हरकत नाही. आम्ही चढत असताना एक जोडपे त्यांच्या लहानश्या मुलाला घेउन, खरतरं अक्षरशः खेचत, आमच्याही जास्त वेगाने,वर जाताना पाहून, थांना काही बोलणार तेवढ्यात वरून खाली येणारा एक सुभेदार त्यांना थांबवत ओरडलाच. इथे येणार्‍या पर्यटकांची काळजीही हे जवान लोक घेत असतात.

पोस्टच्या बाजूला भारतातर्फे येथे एक इमारत उभारली गेली आहे. चीनतर्फे त्याहून मोठी इमारत उभारली गेली आहे. दोन्ही इमारतीत फारतर १२-१५ मिटरचे अंतर असेल. मध्ये असलेल्या तारेच्या कुंपणापलिकडे चिनी शिपाई उभे असतात. त्यांच्या तोंडावर अजिबात स्मितहास्य नसते. अर्ध्यातासाहून अधिक काळ इथे राहिल्यास विरळ हवेचा अधिक त्रास होउ शकतो हे पाहून इथे फार वेळ थांबू नका अशी विनंती पोस्टवरच्या जवानांकडून केली जाते.

गंगटोकवरून सकाळी ८ वाजता निघुनही खराब रस्ते आणि हवामान यामुळे नथु-लापर्यंत पोचायला किमान ५-६ तास लागतात. खुद्द पोस्टवर ४० मिनिटांपेक्षा अधिक वेळ काढता येत नाही. पण आयुष्यात एकदातरी अनुभवावा असा हा प्रवास.

बाबामंदिर म्हणजे १३,१२३ फुट उंचीवर बांधलेली हरभजन सिंग यांची समाधी आहे. मुळ समाधी जिथे आहे तिथे सपाटी नसल्याने, आणि पर्यटकांसाठी पुरेशी जागा नसल्याने, जवळच सपाटी बघून आता बाबा मंदिर उभारण्यात आले आहे. हरभजन बाबा यांना आजही सर्व लष्करी सोई पुरवल्या जातात. दरवर्षी १४ सप्टेंबर रोजी त्यांने सामान जीपमध्ये ठेवून एक जवान न्यु-जलपायगुडी येथे पोचवतो आणि तिथून ते सामान पंजाब मधील त्यांचा गावी पोचवले जाते. हरभजन बाबा हे चीन सिमेवरील संकटांची चाहुल २-३ दिवस आधीच भारतीय जवानांना देतात अशी इथे श्रद्धा आहे.

मंदिरासमोर एक छानसे दुकान आहे. इथे तुम्हाला नथु-ला पास करून आल्याचे सर्टिफिकेट बनवून घेता येते. परतीच्या मार्गावर पुन्हा एकदा चांगु लेकला थांबून याकची सवारी करण्याची इच्छाही भागवून घेता येते. आम्ही मात्र ते काही केले नाही. ३ वाजून गेले होते आणि पुन्हा एकदा कंबरतोड प्रवास पुर्ण करत आम्हाला गंगटोकमध्ये पोचायचे होते. पोचलो तेंव्हा ७ वाजले होते. त्यामुळे घरी जाण्याचा प्रस्ताव रद्द करत आम्ही थेट एम.जी.रोड कडेच मोर्चा वळवला. आज पुन्हा मोमो खायची इच्छा जागी झाली होती. Happy

क्रमश... उदंड देशाटन करावे ... सिक्कीम - भाग ८ : नामची...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

श्री - पॉपकॉर्न क्यु?
सत्या - ज्यादा ऑक्सिजन मिलेगा. नही तो अब आगे सास लेना मुश्किल होता जायेगा>>>> अजब लॉजिक आहे हे ... बहुतेक त्यांची बिझनेस ट्रिक असावी.

खुद्द पोस्टवर ४- मिनिटांपेक्षा अधिक वेळ काढता येत नाही>>> हे विरळ हवेमुळे की तशी सक्तीच आहे लष्कराची??

मस्त झाला आहे हा भाग. Happy

रोहन...

हेवा वाटतो मला तुझा या बाबत.....खरंच. मीही माझ्या कॉलेजच्या जमान्यात खूप फिरलो आहे मित्रांसमवेत....उत्तरेकडील जवळपास सारा भाग....पण आमचे फिरणे [अर्थातच] रेल्वे टाईमटेबलशी निगडित असल्याने खूप मर्यादा असायच्या. त्या काळात 'सिक्कीम' ला स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा असल्याने परत तो प्रवेशाचाही प्रश्न असणार म्हणून त्या भागात कधी जावे असे मनात आले नव्हतेच. ज्यावेळी भारतीय प्रजासत्ताकात सिक्किमचा समावेश झाला त्यावेळी आम्ही पोटापाण्याला लागलो होतो, आणि तो विषयही मग साहजिक मागे पडला.

आज तुझ्या सीरिजमधील फोटो आणि वर्णन पाहताना वाचताना जणू काही मी देखील तुम्हा जोडीसमवेत 'पॉपकॉर्न' खात रस्ता मोकळा होण्याची वाट पाहात उभा आहे की काय असा भास झाला. मस्तच सारे.

बाय द वे...पॉपकॉर्न आणि ऑक्सिजनच्या संबंधावरून आठवले की, जसलमेरच्या वाळवंट फेरीतही मी काही ऑस्ट्रेलियन आणि न्यूझीलंड पर्यटकांसमवेत पाचसहा दिवस असताना त्या मंडळींच्या बोलण्यात 'भारतात कसे काय ऑक्सिजन कोटेड नट्स, चीज, पॉपकॉर्न तसेच काही ड्राय फ्रुट्स मिळत नाहीत ?" अशी पृच्छा केलेली आढळली. "ऑक्सिजन अ‍ॅबसॉर्बर" नामक किट्स मिळतात आणि अशा विरळ हवेच्या ठिकाणी सफर घडणार असेल तर त्या कोटींग कर्नेल्समध्ये ही मंडळी पॉपकॉर्न तसेच नट्सची पॅकेजिस आपल्यासोबत जरूर ठेवीत असतात.

बाकी, अशा उंच ठिकाणी वावरताना....थेट पॉपकॉर्न चावत राहिल्यानंतर कमी पडू शकणारा ऑक्सिजनचा पुरवठा होत असतो की काय याबद्दल कुणातरी तज्ज्ञाला विचारले पाहिजे.

अशोक पाटील

नथुला पास मधुन चायना- भारत यांच्यात ट्रेडींग (INDO-CHINA BORDER TRADE )होते, बर्‍याच सिक्किमीज लोकांकडे ट्रेडींग लायसेंस आहे आणि ते नथुला पास मधुन चिनमधे जातात, दिवसाला १ लाख भारतीय रुपये किमतीचे सामान त्याना आणता येते , हे सामान मग सिक्किमच्या लोकल मार्केट्स मधे विकले जाते. जिथे न्युडल्स वगैरेचे स्टॉल्स आहेत तीथेच बाजुला या वस्तुछे मोठे मार्केट आहे. आपल्याकडुन या मार्गाने काही एक्स्पोर्ट होते कि नाही ते मात्र कळले नाही.

सेनापती... सुरेख भाग! २००२ साली नथुला पासला जाऊन आले होते त्या आठवणी जाग्या झाल्या.
नथुला पासहून गंगटोकला परत येताना आमची जिप उतारावर बंद पडली होती पण उतार असल्याने
खाली येउ शकलो व आल्यावर ब्रेक्स फेल होते असे कळले!

सुरेख भाग.. खरे तर बाबामंदिरासारखी ठिकाणे, भारतीयांची तीर्थक्षेत्रे व्हायला हवीत.

त्या भागात फक्त नूडल्स मिळण्याचे कारण, त्या उंचीवर पाण्याला उकळी फूटणे कठीण आणि त्यामूळे बाकी काहि शिजणेही अवघड.

आपल्याकडुन या मार्गाने काही एक्स्पोर्ट होते कि नाही ते मात्र कळले नाही.
>>> पाटील. इथे सर्व माहिती आहे. http://sikkim.nic.in/msme-di/html/trade.html

ज्या गोष्टी भारतातून बाहेर जातात त्या २९ वस्तुंची यादी तिथे दिली आहे.

मस्तच Happy

मस्त रे रोहन...

मी गेले होते १९९६ ला तेंव्हा विरळ हवे मुळे आम्हाला त्रास झाला होता. त्या मुळे नथुला पास ला जाता आलं नाही. चांगु ( उच्चार त्छांगु ) लेकला जाउन समाधान मानले. आम्ही एकदम पहाटे निघालो होतो. तिकडे चांगुला आम्हाला सातार्‍याचे दोन जवान भेटले होते. त्यांना आम्ही आमच्या कडिल चकल्या देउन टाकल्या होत्या. त्या दोघांना खरेतर प्रवाशां कडुन काही घेताना खुप संकोच वाटत होता. पण आम्ही गेलो ते दिवाळीचे दिवस होते. त्या मुळे त्यांनी ते खाणे घेतले.

खरच आपल्या सातारा सांगलीला छोट्या छोट्या गावातुन हे जवान आपल्या सीमेचे रक्षण करायला जातात... खुपच कौतुकास्पद आहे.

मस्त आहे वर्णन.

खिंडीला ऐकत्या कानांची का म्हणतात? वर लिहिलेय का की माझे वाचायचे राहिले?

खरच आपल्या सातारा सांगलीला छोट्या छोट्या गावातुन हे जवान आपल्या सीमेचे रक्षण करायला जातात... खुपच कौतुकास्पद आहे.

Happy आर्मीत जवानांचे पोस्टींग बदलत राहते, जिथे पाठवतात तिथे जावे लागते. पर्याय नसतो. माझ्या ओळखीतला एकजण सध्या जम्मुच्या पुढे कुठेतरी उंचावर बर्फात आहे. सहा महिने बाकी आहेत तिथल्या पोस्टींगचे. पुढचे पोस्टींग राजस्थानमध्ये आहे.

त्या भागात फक्त नूडल्स मिळण्याचे कारण, त्या उंचीवर पाण्याला उकळी फूटणे कठीण आणि त्यामूळे बाकी काहि शिजणेही अवघड.>>> दिनेशदा उत्तर देणारच ..त्याना काय माहित नाहि असे होणारच नाहि...( देवाने याना बनवताना खुप विचार करुन बनवले असेल )

पुढचे भाग लिहिले नाहियेत अजून. Sad मालिका काही कारणाने अपुर्ण राहिली. पुर्ण करायचा विचार करतो. Happy

आतापर्यन्तचे सगळेच भाग खुप छान लिहीले आहेत. फोटो बघुन सिक्कीमला जाण्याचा मोह होत आहे. कधि योग आला तर तुमच्या मार्गदर्शनाचा नक्की फायदा होइल.
पुढच्या बागांच्या प्रतिक्षेत.....