Submitted by हसरी on 3 February, 2010 - 23:00
उपासना कशी करावी?
कोणत्या देवतेची उपासना कशी करावी याची सविस्तर माहिती द्या?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
उपासना कशी करावी?
कोणत्या देवतेची उपासना कशी करावी याची सविस्तर माहिती द्या?
धन्यवाद सावट. वरील उत्तर
धन्यवाद सावट.
वरील उत्तर वाचून अजून काही प्रश्न मनात आले आहेत, ते विचारते.
'सर्वाभूती' एकच आत्मा आहे हे 'सत्य' आहे... मग हे जर स्वअनुभवाने-स्वप्रचितीने त्या 'जीवाने' जाणले असेल.. तर जीवाची मोक्षाकरीता वाटचाल करण्याची गरजच उरणार नाही... कारण हे जाणणे म्हणजेच 'मोक्ष' आहे.
पटलं. पण, हे जाणून घेण्यासाठीच तर वाचायचे! तेच जर मुळात नाकारले जात असेल, तर जिवाला जाणीव होईलच कशी? आणि कोणत्याही मनुष्य प्राण्याला ही जाणीव नाकारायची तरी कशासाठी? आणि पुन्हा हे ठरविले कोणी? ज्या गुरुंचा व्यवहारात जन्मच अनुसूयेच्या तपश्चर्येच्या गौरवार्थ झाला, त्यांचेच चरित्र स्त्रियांनी वाचू नये, केवढा विरोधाभास आहे! नाही का?
'श्रीवेद' प्रकट करण्याचे सामर्थ्य प.पू.श्रीज्ञानेश्वरांचे आहे... रेड्याचे नाही. ही गोष्ट नाकारून चालणार नाही. 'आत्मा' म्हणजे श्रीज्ञानेश्वर असे मानले तर... 'जीव रुपी रेडा' म्हणजे 'मी' आहे
मान्य. मग असे असेल, तर 'मी' ला आत्म्याला ओळखायची संधी तरी मिळायला हवे की नको? तसे पाहिले तर गुरुचरित्र वाचूनच मोक्ष मिळेल असेही नाहीच. ते न वाचताही कित्येकजण मोक्षपदाला पावले असतील. महत्त्वाचे आहे ती जाणीव होणे. होय ना?
जर असे असेल, तर गुरुचरित्र स्रियांनी वाचू नये, ह्याला काहीच अर्थ रहात नाही, शेवटी नामजप, स्तोत्र वा पुस्तके वाचणे, उपवास करणे, व्रते करणे, पूजा पाठ ही सारी साधने, एका ठराविक मर्यादेपर्यत त्यांचे महत्त्व असे मला वाटते. साध्य वेगळेच. ज्याला जे साधन सोपे वाटते, त्याचा अवलंब त्याने करावा.
शरीर वेगळे असल्यामूळे 'साधन' ही त्या शरीराला अनुसरूनच पाहीजे
हेही मान्य. माझे म्हणणे हे, की ज्याला त्याला हे ठरविण्याचे स्वातंत्र्य हवे, कोणी तिसरे सांगते की गुरुचरित्र स्रियांनी वाचू नये, म्हणून ते वाचायचे नाही, ह्याला काय अर्थ? एखदे साधन आपल्याला झेपणारे नसले की त्याची आतून नक्की जाणीव होते. किंवा जर खरोखर तुम्ही भगवंताच्या हातात स्वतःला सोपवले असेल, तर तुमच्या साठीची योग्य साधना/ उपासना तुम्हांला मिळते, त्याचे लक्ष असते
केवळ स्त्री, पुरुष ह्यावर दर्जा ठरेल? कानडी येत नसेल, पण खूप तळमळ असेल, तर कानडी शिकायची प्रवृत्ती होईल ना? 
अजून मनात काही प्रश्न आल्यास लिहिन. आपले मनापासून धन्यवाद.
व्वा, धन्यवाद! आपण हळूहळू
व्वा,
धन्यवाद!
आपण हळूहळू प्रत्येक प्रश्न पाहूयात..
>>>ज्या गुरुंचा व्यवहारात जन्मच अनुसूयेच्या तपश्चर्येच्या गौरवार्थ झाला, त्यांचेच चरित्र स्त्रियांनी वाचू नये, केवढा विरोधाभास आहे! नाही का?
श्रीमाता अनसूयेंच्या पोटी श्रीदत्तमहाराजांना जन्म घ्यावयास लागला... त्याचे कारण काय आहे? अशी कोणती तपश्चर्या श्रीमातेने केली होती?:)
धन्यवाद!
सावट, सती अनुसूया ह्या
सावट, सती अनुसूया ह्या शब्दांतच तुमच्या प्रश्नाचे उत्तर सामावले आहे .
शैलजा, तरीपण अजून 'सती' या
शैलजा,
तरीपण अजून 'सती' या शब्दाचा उलगडा कृपया कराल काय?
हे पहाणे गरजेचे आहे.. कारण ज्या श्रीदत्तप्रभूंच्या श्रीचरित्राविषयी आपला मुख्य प्रश्न आहे.. त्यांच्या मातेने अशी काय 'साधना'... 'वाचन' केले होते की प्रत्यक्ष 'श्री' ना त्यांच्या पोटी जन्म घ्यावा असे वाटले. आणि तेच उदाहरण म्हणून... 'स्त्री' या नात्याने.. आपण सांगितल्याप्रमाणे पहायचे झाल्यास.. हे एका 'स्त्री'ने केलेले साधनही माहीत पाहीजेच, नाही काय?:)
धन्यवाद!
शैलजा, >>>पण, हे जाणून
शैलजा,
>>>पण, हे जाणून घेण्यासाठीच तर वाचायचे! तेच जर मुळात नाकारले जात असेल, तर जिवाला जाणीव होईलच कशी? आणि कोणत्याही मनुष्य प्राण्याला ही जाणीव नाकारायची तरी कशासाठी? आणि पुन्हा हे ठरविले कोणी?
शास्त्र हे 'अहं ब्रह्मास्मि' ... 'मी' ब्रह्म आहे... या जाणिवेतून लिहले आहे. आपण ''मी' म्हणजे शरीर' या जाणिवेला सतत पकडून असतो... म्हणूनच आपण विचारही तसाच करतो. लिंग(पुरुष-स्त्री) हे आत्म्याची उपाधी नाही आहे..पण जीवाच्या वासना त्याला तशी उपाधी धारण करायला लावून.. तसा 'व्यवहार' घडतो.
जसे एखादी 'स्त्री' लग्न करताना पुरुषासीच करेल... आत्मा एकच आहे म्हणून.. स्त्रीशीच लग्न करत नाही... कारण ती व्यवहारात वागताना... भेदानेच व्यवहार करते. (आणि.. तसाच पुरुषही).
मग एखादी गोष्ट या निसर्गताच असणार्या शरीर भेदाच्या नैसर्गिक जाणिवेने... वेगवेगळी सांगितली तर ते बरोबरच असेल, नाही काय?:)
धन्यवाद!
सावट, मला सगळेच माहित असते तर
सावट, मला सगळेच माहित असते तर मी मायबोली वर प्रश्न विचारत बसले असते काय?
माहित नाही, कळत नाही, पण जाणून तर घ्यायचे आहे, म्हणून तर जाणून घ्यायचा प्रयत्न.
तरीही मला सती ह्या शब्दाचा उलगडा ज्या प्रकारे झाला आहे ते लिहायचा प्रयत्न करते. जमेल ही शाश्वती नाहीच
सती ही व्यक्ती स्वतःबद्दल, आपल्या सभोवतालाबद्द्ल, एकूणच विश्वाच्या अस्तित्वाबद्दल सजग असली, पण त्याचा स्वतःवर परिणाम होऊ देत नाही. त्यातून सतत सत्याचा शोध घेत राहते. स्वतःवर विश्वास आहे, कारण अंतर्बाह्य एकत्व आहे. विश्वाच्या नियमानुसार विश्व चालेल, ही जाण आहे आणि त्यात स्वतःचे कर्मही पूर्ण समरसतेने करायची वृत्ती आहे.
सांगायला नीटसे जमलेले नाही, हे ठाऊक आहे. त्याबद्दल क्षमस्व. जेवायला गेले होते म्हणून टंकायला उशीर झाला.
मग एखादी गोष्ट या निसर्गताच
मग एखादी गोष्ट या निसर्गताच असणार्या शरीर भेदाच्या नैसर्गिक जाणिवेने... वेगवेगळी सांगितली तर ते बरोबरच असेल, नाही काय?
शरीर हे तर केवळ आत्म्याचे पांघरुण. जीव आत्म्याच्या सहाय्याने परमात्म्यापाशी पोहोचायचा प्रयत्न करतो, शरीराच्या नव्हे. कोणतेही कर्म केवळ शरीर करत नाही, तर जीव करीत असतो. शरीर म्हणजे जसे आपण देहात कपडे चढवतो, तसे जीवाने धारण केलेले आवरण, नाही का?
माझे चुकते आहे का? तसे असल्यास जरुर सांगावे ही विनंती आहे.
शैलजा, >>>जर असे असेल, तर
शैलजा,
>>>जर असे असेल, तर गुरुचरित्र स्रियांनी वाचू नये, ह्याला काहीच अर्थ रहात नाही, शेवटी नामजप, स्तोत्र वा पुस्तके वाचणे, उपवास करणे, व्रते करणे, पूजा पाठ ही सारी साधने, एका ठराविक मर्यादेपर्यत त्यांचे महत्त्व असे मला वाटते. साध्य वेगळेच. ज्याला जे साधन सोपे वाटते, त्याचा अवलंब त्याने करावा.
याविषयी शास्त्र काय म्हणते ते महत्त्वाचे आहे... कारण 'ते' आपणास अजूनही माहीत नसलेल्या अनुभवातून... भूमिकेतून लिहले आहे.
मी शरीर आहे असे मानले तर.. मग सगळाच भेद दिसायला लागतो. आपण वारे म्हणत असू की सगळे एकच आहे..म्हणून आपण खाताना दिसेल ते खात नाही.. किंवा आत्म्यास भूक लागत नाही म्हणून आपण जेवण करायचे रहात नाही. म्हणूनच हे लक्षात घ्यायला पाहीजे की आपण अजूनही ऐलतीरावरच आहोत.... नुसत्या कल्पनेने किंवा तर्काने पैलतीरावरच्या गोष्टिविषयी आपणास बोलता यावयाचे नाही.
'नामजपाविषयी' सविस्तर पहावे लागेल.
आपण काय करतो ... संसाराला 'साध्य' मानतो... म्हणजे कितीही म्हंटले तरीही.. आपला व्यवहार तसाच होतो... आणि तो 'संसार' सुखाचा व्हावा म्हणूनच परमेश्वराला 'साधन' म्हणून वापरतो... पण याने 'संसार' अजून वाढतो.. देहबुद्धी वाढ्ते... 'मी' कर्ता आहे. ही जाणिव वाढते.
आणि परमार्थ तेव्हांच सुरु होतो जेव्हा परमेश्वर 'साध्य' आहे हे कळते आणि संसाराचा उपयोग 'साधन' म्हणून केला जातो. याने 'मी 'त्याचा' आहे' आणि 'तो 'कर्ता' आहे' ही जाणिव वाढीला लागते... आणि मग 'आत्मबुद्धी' वाढू लागते.
म्हणजे शरीर तेच आहे.. संसार तोच आहे... आतली जाणिव बदलते.
मोक्षाच्या अधिकाराविषयी बोलावयाचे झाल्यास... 'मनुष्य' जन्म आहे.. म्हणजे त्या जन्माबरोबरच तो अधिकार ही निसर्गताच मिळालेला असतो.. ! अधिकार आहे म्हणून प्रत्येकासच 'मोक्ष' मिळतो असे दिसून येत नाही... म्हणूनच मो़क्षासाठी अजून काही गोष्टींची जरूरी आहे.
म्हणजेच खरा अधिकार हा फक्त जन्म पाहून ठरविता येत नाही... नाही काय?:)
धन्यवाद!
सगळे मान्य आहे सावट
सगळे मान्य आहे सावट
>>म्हणजेच खरा अधिकार हा फक्त जन्म पाहून ठरविता येत नाही... >> बरोबर. अगदी बरोबर. मग योग्य अधिकारी व्यक्तीस गुरुचरित्र वाचता येऊ नये काय? जन्माने ती व्यक्ती पुरुष/ स्री असल्याने तिच्या अधिकारात बाधा का यावी?
आणि म्हणूनच मग, "शरीर वेगळे असल्यामूळे 'साधन' ही त्या शरीराला अनुसरूनच पाहीजे" हे पटत नाही.
कारण दोनही वाक्ये परस्पर विरोधी आहेत.
शैलजा, >>>तरीही मला सती ह्या
शैलजा,
>>>तरीही मला सती ह्या शब्दाचा उलगडा ज्या प्रकारे झाला आहे ते लिहायचा प्रयत्न करते. जमेल ही शाश्वती नाहीच ...सांगायला नीटसे जमलेले नाही, हे ठाऊक आहे. त्याबद्दल क्षमस्व.
आपल्याला अशी नम्र विनंती आहे की ... श्रीअनसूया चरित्र ही अवश्य वाचावे. श्रीमातेला श्रीप्रभूंची माता होण्याचे कारण त्यांचे 'पतिव्रता' हे व्रत होते... त्या बाहेर पडल्या की त्या व्रताच्या तपामुळे.. प्रत्यक्ष श्रीसुर्यनारायणही.. त्यांना आपल्या उष्णतेचा त्रास होऊ नये, हे पहात असत.
एका स्रीला ज्यामूळे एवढा महान अधिकार मिळाला... ज्यांचे आपण 'उदाहरण' म्हणून दिले आहे .. त्यानी आचरलेल्या 'साधना' कडे दुर्ल़क्ष करून कसे चालेल?:)
धन्यवाद!
दुर्लक्ष करण्याचे मनातही
दुर्लक्ष करण्याचे मनातही नाही.
पुराणात सांगितलेला पतिव्रता धर्म मातेने आचरलाच, तरीही त्यापलिकडे जाऊनही त्यांना आपल्या शक्तीची, सामर्थ्याची नक्कीच जाणीव असली पाहिजे. नाही का?
शैलजा, >>>शरीर हे तर केवळ
शैलजा,
>>>शरीर हे तर केवळ आत्म्याचे पांघरुण. जीव आत्म्याच्या सहाय्याने परमात्म्यापाशी पोहोचायचा प्रयत्न करतो, शरीराच्या नव्हे. कोणतेही कर्म केवळ शरीर करत नाही, तर जीव करीत असतो. शरीर म्हणजे जसे आपण देहात कपडे चढवतो, तसे जीवाने धारण केलेले आवरण, नाही का?
माझे चुकते आहे का? तसे असल्यास जरुर सांगावे ही विनंती आहे.
मनुष्य शरीर हेच साधन आहे... आत्मा कुठेही जात नाही आणि येत नाही... म्हणूनच मनुष्य शरीर असल्याशिवाय 'मोक्ष' नाही.. अगदी देवानाही त्यांच्या मृत्यूनंतर... मोक्षासाठी मनुष्यदेह घ्यावयासच लागतो.
या साधनाने... 'आत्मा' हाच कर्ता आहे.. हे जाणलेकी... पुढे 'आत्मा हाच परमात्मा' आहे हे कळते.
आत्म्याने शरीर धारण केल्यावर... आणि ते शरीर म्हणजे मीच आहे... अशा समजूतीने व्यवहार करणार्या आत्म्यास... जीवात्मा असे म्हणतात.
धन्यवाद!
शैलजा, >>म्हणजेच खरा अधिकार
शैलजा,
>>म्हणजेच खरा अधिकार हा फक्त जन्म पाहून ठरविता येत नाही... >> बरोबर. अगदी बरोबर. मग योग्य अधिकारी व्यक्तीस गुरुचरित्र वाचता येऊ नये काय? जन्माने ती व्यक्ती पुरुष/ स्री असल्याने तिच्या अधिकारात बाधा का यावी?
म्हणजेच खरा अधिकार हा फक्त जन्म पाहून ठरविता येत नाही... मग योग्य अधिकारी व्यक्तीस गुरुचरित्र वाचता येऊ नये काय?
खरे आहे...पण हा अधिकार हा... अधिकारी व्यक्तीच ठरवू शकते.. हे मागेच ज्या ठिकाणी श्रीगुरुचरित्राचा उल्लेख आला आहे तेथेच पाहीले आहे.
नाहीतर परिक्षेला बसणारा.. आपले पेपर.. आपणच तपासून..मार्क देतोय तसे व्हायचे.
धन्यवाद!
धन्यवाद सावट. आपण लिहित आहात
धन्यवाद सावट.
आपण लिहित आहात त्यातले बरेचसे मला पटते. तरीही आता मी इथे, माझ्या प्रश्नाचे नि:संदिग्ध उत्तर मला मिळालेले नाही, हे नमूद करुन थांबते. 
कारण मी वाद घालत आहे, असे मला एक - दोन मायबोलीकरांनी कळवले आहे. माझा वाद घालण्याचा वा उत्पन्न करण्याचा कोणताही प्रयत्न वा इच्छा नाही आणि नव्हती, तेह्वा असे कोणाला वाटू नये म्हणून थांबते. यासाठीच मी संपर्कातून मेल करु का विचारले होते. असो.
मला खरोखरच काही प्रश्न आहेत आणि त्याची उत्तरे मिळवायचा मी माझ्या कुवतीनुसार प्रयत्न करत आहे, आज ना उद्या भगवंताची कृपा नक्की होईल. तोवर हा बाफ वाचेन.
आपले अनेक धन्यवाद.
>>>>खरे आहे...पण हा अधिकार हा... अधिकारी व्यक्तीच ठरवू शकते.. > हे नंतर पाहिले. हे मान्य. धन्यवाद.
आदिमाता गायत्री = तरल रुपातील
आदिमाता गायत्री = तरल रुपातील चण्डिका
आदिमाता महिषासुरमर्दिनी = सूक्ष्म रुपातील चण्डिका
आदिमाता अनसुया = स्थूल रुपातील चण्डिका
परमेश्वरीचे कार्यप्रवण रुप = चण्डिका
परमेश्वरीचे अस्पंद रुप = अदिती
पहिला स्पंद = ॐकार = परमात्मा
पहिल्या स्पंदाआधी प्रकटलेला शुभ्र प्रकाश = दिगंबर दत्तात्रेय = दत्तात्रेय (स्थूल रुपात)
अनसुया मातेइतकं पवित्र, सत्वशील दुसरं कुणीच नाही कारण तीच स्वतः आदिमाता आहे. तिने तिच्या ज्येष्ठ पुत्राला म्हणजे दिगंबर दत्तात्रेयांना, दत्तात्रेय रुपाने स्थूलात पुत्र रुपाने जन्म दिला.
अनसुयामातेच्या पातिव्रत्याची शिकवण लक्ष्मी पार्वती व सरस्वतींना घ्यावीशी वाटली त्याला कारण म्हणजे अनसुयामातेच्या आश्रमात तिची सेवा करता करता तिच्या पातिव्रत्याचे, पावित्र्याचे मोडके तोडके का होईना आपल्या कपॅसिटीत बसेल इतके अनुकरण करणारी सती नावाची एक स्त्री. या सतीने अंशतः अनुकरण करुनही तिच्यात एवढं सामर्थ्य आलेलं असतं की तिच्या शापात सुर्याला निष्प्रभ करायचं बळ असतं.
असो, इथे कथा देत बसत नाही.
वाचतेय
शैलजा, दुर्लक्ष करण्याचे
शैलजा,
दुर्लक्ष करण्याचे मनातही नाही.
पुराणात सांगितलेला पतिव्रता धर्म मातेने आचरलाच, तरीही त्यापलिकडे जाऊनही त्यांना आपल्या शक्तीची, सामर्थ्याची नक्कीच जाणीव असली पाहिजे. नाही का?
म्हणूनच श्रीअनसूया चरित्र पहावे लागेल...मग सामर्थ्य अगोदरच होते.. का 'साधन' आचरल्यानंतर मिळाले हे कळेल.
त्याच बरोबर श्रीपरशूराममाता.. श्रीरेणुकामाता यांचे ही श्रीचरित्र अवश्य वाचावे... त्यांनीही हेच 'तप' केले होते... म्हणूनच श्रीदत्तमहाराजांचे शिष्य.. श्रीसहस्त्रार्जुन यांच्याशी युद्ध करावयास.. स्वतः श्रीहरींनी श्री रेणुकामातेच्या पोटी श्रीपरशूराम नावाने अवतार घेतला आहे.
पहा.. आपण श्रीगुरुचरित्राविषयी विचारलेत आणि आणखी दोन नवीन श्रीचरित्रे वाचावयास हवीत हे कळाले.. !
धन्यवाद!
शैलजा... आपलेच अनेक
शैलजा... आपलेच अनेक धन्यवाद!:)
>>>मला खरोखरच काही प्रश्न आहेत आणि त्याची उत्तरे मिळवायचा मी माझ्या कुवतीनुसार प्रयत्न करत आहे, आज ना उद्या भगवंताची कृपा नक्की होईल. तोवर हा बाफ वाचेन.
श्रीभगवंत हे करुणेचा सागर म्हणून सुप्रसिद्ध आहेत. हा करुणेचा वारा सतत एकसंघ वहातच असतो... ज्याने शीड उभा केली...त्याला दिशा मिळतेच... कृपा होतेच. शीड म्हणजे आपण 'अज्ञानी' आहोत असे वाटणे. 'मी' अगोदरच ज्ञानी आहे... मला सर्व कळते.. हा झाला विरुद्ध भाव.. याने अहंकार वाढतो.
आपल्याला प्रश्न पडलेत..याचाच अर्थ आपल्यालाजवळ समाधान कारक 'उत्तर' नाही आहे... आणि त्याचे उत्तर मिळावे अशी आपली प्रामाणिक इच्छा आहे..त्यामूळे खात्री बाळगा उत्तर मिळेलच.
आणि महत्त्वाचे म्हणजे.. शीड उभा करण्याची शक्ती ही परमेश्वराची कृपाच आहे... म्हणजेच आपल्याला प्रश्न पाडणारी 'बुद्धी' ही परमेश्वराबद्द्ल काहीतरी विचारते आहे.. ही त्याची 'कृपा' झाल्याचे लक्षण आहे... असे माझे नाही... शास्त्राचे मत आहे.. आणि तेच योग्य आहे.:)
>>>कारण मी वाद घालत आहे, असे मला एक - दोन मायबोलीकरांनी कळवले आहे. माझा वाद घालण्याचा वा उत्पन्न करण्याचा कोणताही प्रयत्न वा इच्छा नाही आणि नव्हती, तेह्वा असे कोणाला वाटू नये म्हणून थांबते.

वाद आणि संवाद यातले अंतर कल्पित आहे... आज जो 'वाद' वाटतो.. तोच कालांतराने 'संवाद' वाटू शकतो..त्यामूळे त्याची काळजी कृपया करू नये.
>>>>>>>खरे आहे...पण हा अधिकार हा... अधिकारी व्यक्तीच ठरवू शकते.. > हे नंतर पाहिले. हे मान्य. धन्यवाद.
हे पटले ना मग झाले... ! हा अधिकार अंतःकरणाच्या शुद्धतेवर ठरतो. जोपर्यंत अंतःकरण अशुद्ध आहे.. तो पर्यंत बुद्धी वेगळ सांगते.. हे अस आहे... तस आहे.. पण प्रत्यक्षात वागायची वेळ आली की ती बुद्धी या अशुद्ध अंतःकरणानुसार वागते. अंतःकरण शुद्ध म्हणजे काय याचे उदाहरण द्यायचे झाल्यास...
समजा.. एक न चालताही येणारे मूल हात-पाय हालवत खेळते आहे... आणि त्याच्या जवळ एक पैशाची पिशवी पडली आहे. तेवढ्यात तेथे एक चोर येतो.. आणि ती पिशवी घेऊन पळून जातो......
उदाहरण एवढेच आहे... पण अतःकरणाची शुद्धता स्पष्ट करण्यास पुरेसे आहे. बालकाच्या दृष्टीने पाहू गेल्यास.. त्याला पैसे.. त्याचे असणे...नसणे.. चोर यात भेदच दिसत नाही...मग ते पैसे आले काय आणि गेले काय.. त्याचे सुख आणि दुखः या दंद्वातून तो 'मुक्त' च आहे... त्याचा वागणेही तसेच असते.
पण त्या पैशाची अंतःकरणात वासना असणार्या चोराला.. ते पैसे..आपण चोरले तरी बालकाला काही कळणार नाही हे ज्ञान(अज्ञान).. हा पैसे..बालक.. आणि तो स्वतः हा दृष्टीतला भेद..त्याला चोरी करायला लावेल.
जे जीवनमुक्त असतात त्यांचे अंतःकरण हे लहान बालका सारखे असते.. ते आत्मज्ञान दृष्टीने पहातात.. त्यामूळे त्यांना जीव.. जगत.. ईश्वर यात भेदच दिसत नाही... सर्व खल्विंद ब्रह्मा.. जे दिसत आहे ते सर्व 'ब्रह्मच' आहे.. अशी ज्ञानमय अवस्था ते भोगत असतात... त्यांच्या दृष्टीने सुख-दुखः.. पाप-पुण्य.. पवित्र-अपवित्र.. मंगल-अमंगल.. चांगले-वाईट... स्वर्ग-नरक..सत्वगुणी-रजोगुणी-तमोगुणी... हे द्वंद्व नष्ट झालेले असते... त्यांचे बाह्य शरीर हे प्रारब्धा वर सोडलेले असते... आणि आतून पुर्ण ज्ञान झालेले असते.
पण आपले अंतःकरण चोरासारखे असते... पैसे नसतील तर आपला व्यवहार ठ्प्प. आपल्याला कळते सगळे.. पण वळत मात्र नाही.. वागायची वेळ आलीकी.. आपल्या हातून चोरीच होते.
शास्त्रानुसार.. जशा अंतःकरणातील वासना... त्यानुसार शरीर मिळते. आणि कोणते शरीर धारण करायचे आपल्या हातात नाही.
त्याच बरोबर ज्यांची अवस्था ही वरील बालका प्रमाणे असते त्यांनी हे शास्त्र लिहले आहे.. त्यांना एका बा़जूला हे माहीत असते ही 'शरीर' हे आत्म्याची उपाधी आहे...आणि दुसर्या बाजूला हेही माहीत असते की अशी उपाधी धारण केलेला 'आत्मा' हा व्यवहारात 'चोरासारखा' वागतो. असा विचित्र परिस्थितीत जर त्या चोरी करणार्या चोराला तू चोर नाहीस हे समजावणे फार कठीण असते... तो चोर पोलिसांना 'मी चोर नाही' असे कितीही सांगत असला.. तरीही आतून आपण चोर आहोत हे त्याला पक्के माहीत असते... परत तुरुंगातून बाहेर पडल्यावर..तीच जूनी वासना त्याला परत चोरी करायला लावते... म्हणजेच मृत्यू नंतरही नवीन शरीर धारण केलेला आत्मा हा..या नवीन जन्मात... जुन्या वासनेनुसार.. चोरासारखाच व्यवहार करतो.
यातून बाहेर पडायचा एकच मार्ग आहे.. तो म्हणजे त्या चोराची..ती वासनाच नष्ट करणे.. आणि ते ही तो चोरासारखा वागत असताना.. त्याला तसे शरीर मिळाले असताना... !
याचाच अर्थ असा आहे की... पुरुष-स्त्री शरीर हे त्या जीवाच्या अंतःकरणातील वासनेनुसारच मिळते... आणि... विरुद्ध अर्थाने पाहील्यास... शरीर वेगळे मिळाले आहे.. म्हणजेच 'वासना' ही वेगळी आहे. हे जर पटले.. तर मग अशी वेगवेगळी असणारी वासना ..आणि त्यामूळे मिळालेले शरीर हे लक्षात घेऊन... जर ती वेगवेगळी वासना नष्ट करण्याकरीता.. उपाय वेगवेगळे सांगितले तर..ते बरोबरच असणार.. नाही काय?
धन्यवाद!
वाद आणि संवाद यातले अंतर
वाद आणि संवाद यातले अंतर कल्पित आहे... आज जो 'वाद' वाटतो.. तोच कालांतराने 'संवाद' वाटू शकतो..त्यामूळे त्याची काळजी कृपया करू नये. >>>
सावट धन्यवाद. थोड्या वेळाने,
सावट धन्यवाद.
थोड्या वेळाने, मनात पुन्हा एकदा आलेले प्रश्न लिहिते. आत्ता काही काम हातावेगळे करायचे आहे.
>.आज जो 'वाद' वाटतो.. तोच कालांतराने 'संवाद' वाटू शकतो.. >> माझ्या बाजूने 'वाद' नाहीच. माझे प्रश्न मी आपल्यापुढे मांडत आहे इतकेच. ज्याची, त्याची पहाण्याची दृष्टी, एवढेच म्हणते
माधव, 'कशापासून जग झाले' याचे
माधव,
'कशापासून जग झाले' याचे मनन सुरु आहे... अवधान आहे ना?
धन्यवाद!
अश्विनी,
....संवाद तो हितकारी"
>>>>>>उत्तर मिळालं तरी ते अंगवळणी पडणे, अनुभवणे यानेच खुंटा बळकट होतो आणि मग वाट आपोआप दिसू लागते व त्या वाटेवर पावलेही पडू लागतात
हे अंगवळणी पडणे.. नुसत्या उत्तर मिळाल्यामूळे शक्य होते का?
याबद्द्ल आता तुमचे काय मत आहे.
धन्यवाद!
उत्तरांनी समाधान होणं हे
उत्तरांनी समाधान होणं हे वरकरणी समाधान न रहाता जेव्हा अंतर्बाह्य प्रसन्नता पसरुन रहाते, जुने विकल्प दूर होतात, नवे निर्माण होणं कमी होतं/थांबतं, विभक्तीचा अंश कमी कमी होत जाऊन भक्ती वाढत जाते, भक्तीच्या प्रमाणात परमात्म्याशी अनुसंधान वाढत रहातं, वावर/वापर या माध्यमांतून सामान्य माणसालाही हे अनुसंधान सातत्याने राखता येतं हे सगळे घडत जातं. अंगवळणी हा शब्द अॅक्च्युअली चपखल नाहिये. पण हा शब्द वापरण्यामागचा माझा भाव तुमच्यापर्यंत नक्की पोहोचला आहे
अनुभवणे यानेच खुंटा बळकट होतो आणि मग वाट आपोआप दिसू लागते व त्या वाटेवर पावलेही पडू लागतात >>> या स्थितीचं हलकं फुलकं वर्णन असं होईल...
मुझे तुम मिल गये भगवन्, सहारा हो तो ऐसा हो |
जिधर देखूं, उधर तुम हो, नजारा हो तो ऐसा हो ||
भगवंताच्या कृपेच्या/प्रेमाच्या प्रवाहात आपण वाळक्या पानाप्रमाणे पडावं आणि तो प्रवाह जसा जसा जाईल तसं तसं त्याच्या बरोबर नि:शंकपणे जात रहावं
व्वा..व्वा... अनेक
व्वा..व्वा... अनेक धन्यवाद!:)
बस्स.. हेच ते... आपला खरा 'आधार' कोणता आहे... हे कळनेच जरूरी आहे... धन्यवाद!
अश्विनी... अपरोक्ष-प्रत्यक्ष.
अश्विनी...
अपरोक्ष-प्रत्यक्ष..आत्मज्ञान व्हायच्या अगोदर होणार्या... या परोक्ष-अप्रत्यक्ष ज्ञानाचा अधिकार फार मोठा आहे बरे!... हाच तो 'ज्ञानयोग'.... श्रवण-मनन-चिंतन.. याच्या अंगाने होणारा...आणि निदीध्यासात रमणारा हाच तो ....!
याविषयी श्रीमाउली फार सुरेख लिहीतात..!
धन्यवाद!
म्हणजेच आपल्याला प्रश्न
म्हणजेच आपल्याला प्रश्न पाडणारी 'बुद्धी' ही परमेश्वराबद्द्ल काहीतरी विचारते आहे.. ही त्याची 'कृपा' झाल्याचे लक्षण आहे...
वाचूनही खूप बरे वाटले!
हा अधिकार अंतःकरणाच्या शुद्धतेवर ठरतो.
होय. आणि तसाच ठरायला हवा, नाही का?
अंतःकरणाला जात -पात, जेंडर वगैरेचे वावडे आहे. नव्हे, ते त्यापलिकडे आहे. कोणत्या शरीरामधे आहे, ह्यावरुन त्याची शुद्धता ठरेल का? आणि तसे असेल, तर मग स्रीचे अंतःकरण हे अधिक शुद्ध, विमल, कोमल ठरायला नको का? निदान मातृरुपे जेह्वा ती वावरते, तेह्वा? हे जरासे अवांतर झाले, पण मला काय म्हणायचे आहे, हे थोडे तरी मी उलगडू शकले आहे का?
कोणते शरीर धारण करायला मिळेल हे निश्चितच आपल्या हातात नाही. परंतु, जर अंतःकरण शुद्ध असेल, तर कोणते शरीर आहे, ह्यापलिकडे जाऊन, जर त्या जिवाला साधना करण्याला मनाई आहे का? मला तरी वाटते, नाही.
इथे मला स्री पुरुष असा वाद मुळीसुद्धा आणायचा नाही, पण केवळ पुरुषाचे शरीर आहे म्हणूनच केवळ एखाद्याला गुरुचरित्र वाचायला वा भगवंताची साधना करण्याचा परवाना मिळून जावा, हे बरोबर वाटत नाही. मला तरी पटत नाही.

आपल्याला कळते सगळे.. पण वळत मात्र नाही.. अगदी, अगदी
तर मग अशी वेगवेगळी असणारी वासना ..आणि त्यामूळे मिळालेले शरीर हे लक्षात घेऊन... जर ती वेगवेगळी वासना नष्ट करण्याकरीता.. उपाय वेगवेगळे सांगितले तर..ते बरोबरच असणार..
प्रत्येकासाठीचे उपाय वेगळे, हे तर नक्कीच. पण केवळ कोणते 'शरीर' धारण केले आहे ह्यावर ते अवलंबून नसावे, नसेल. इतकेच माझे म्हणणे.
कोणते शरीर धारण केले आहे, ह्यावर 'कृपा' कितपत आणि कशी होईल हे ठरते का? भगवंताला असे करुन कसे चालेल? 
आपण माझे म्हणणे ऐकून घेत आहात ह्याबद्दल मनापासून धन्यवाद.
व्वा... शैलजा तुम्ही अगदि
व्वा... शैलजा तुम्ही अगदि योग्य विचार करत आहात...! धन्यवाद.
सावट, आपण हा विश्वास दिल्याने
सावट, आपण हा विश्वास दिल्याने खूप बरे वाटते आहे. धन्यवाद
श्री मातेचे चरित्र वाचायला घेणारच आहे.
शैलजा... >>>शरीर हे तर केवळ
शैलजा...
>>>शरीर हे तर केवळ आत्म्याचे पांघरुण. जीव आत्म्याच्या सहाय्याने परमात्म्यापाशी पोहोचायचा प्रयत्न करतो, शरीराच्या नव्हे. कोणतेही कर्म केवळ शरीर करत नाही, तर जीव करीत असतो. शरीर म्हणजे जसे आपण देहात कपडे चढवतो, तसे जीवाने धारण केलेले आवरण, नाही का?
याविषयी थोडेसे बोलूयात..
१)शरीर हे तर केवळ आत्म्याचे पांघरुण
म्हणजे शरीर वेगळे आणि आत्मा वेगळा झाला...
२)जीव आत्म्याच्या सहाय्याने परमात्म्यापाशी पोहोचायचा प्रयत्न करतो, शरीराच्या नव्हे.
म्हणजे जीव वेगळा... आत्मा वेगळा आणि परमात्मा वेगळा झाला...
३)कोणतेही कर्म केवळ शरीर करत नाही, तर जीव करीत असतो.
म्हणजेच शरीर वेगळे,जीव वेगळा आणि कर्म वेगळे झाले..
म्हणजेच वरील तीन्ही एकत्र केले की... आपण म्हणता त्यानुसार..
शरीर..जीव..आत्मा आणि परमात्मा आणि कर्म हे वेगवेगळे झाले.. !
४)शरीर म्हणजे जसे आपण देहात कपडे चढवतो, तसे जीवाने धारण केलेले आवरण, नाही का?
इथे आपण म्हणता त्याप्रमाणे... जीवाचे आवरण म्हणजे शरीर..! हा झाला जीव आणि शरीर संबंध! मग कर्म..शरीर..जीवाचा..आत्म्याचा आणि परम्यात्म्याचा संबंध आपण कसा सांगाल?
आणि
>>>हा अधिकार अंतःकरणाच्या शुद्धतेवर ठरतो.
होय. आणि तसाच ठरायला हवा, नाही का? अंतःकरणाला जात -पात, जेंडर वगैरेचे वावडे आहे. नव्हे, ते त्यापलिकडे आहे. कोणत्या शरीरामधे आहे, ह्यावरुन त्याची शुद्धता ठरेल का?
मग ...
कर्म..शरीर्..जीव..आत्मा आणि परमात्मा आणि हे नवीन आपल्या म्हणण्यानुसार असणारे शरीरात असणारे अंतःकरण यांचा संबंध कसा सांगाल?
>>>मला सगळेच माहित असते तर मी मायबोली वर प्रश्न विचारत बसले असते काय? माहित नाही, कळत नाही, पण जाणून तर घ्यायचे आहे, म्हणून तर जाणून घ्यायचा प्रयत्न. ....माझे चुकते आहे का? तसे असल्यास जरुर सांगावे ही विनंती आहे.
हे तुम्ही सांगून सुद्धा परत विचारतो आहे.. म्हणून क्षमा असावी.
धन्यवाद!
शैलजा, तुझ्या म्हणण्याशी १००%
शैलजा, तुझ्या म्हणण्याशी १००% सहमत. मलाही विटाळ (स्त्रीधर्माचाच नाही तर जातींचाही) ही संकल्पना पटत नाही.
तुला एवढेच सांगावेसे वाटते की तुला नाही ना पटत तर नको पाळूस ती बंधने. पण त्या आधी स्वतःच्या मनात डोकावून बघ. आधी तुला ते १००% बरोबर वाटणार नाही, कारण आपल्यावर असलेला रुढीचा पगडा (आपण रुढी आणि अध्यात्म यांची खूप गल्लत करतो)! पण रुढींचे अडसर पार केल्यावर तुला कळेल (हो नक्की कळते एवढे तर) की तुझेच विचार तुलाच पूर्णपणे मान्य आहेत की नाही. असले मान्य तर कसलीही भिती न बाळगता ते आचरणात आण. पण जर तुझा आतला आवाज तुला सांगत असेल की ते बरोबर नाहीत तर तुझे विचार आपसुकच बदलतील.
माझे विचार बरोबर आहेत हे मला तेंव्हाच पूर्णपणे पटू शकले जेंव्हा 'आम्हा परमहंसास विटाळाची बाधा नसे' असे सांगणारे गुरु लाभले. त्यांना कांदा नैवेद्यात प्रिय आहे. म्हणून घरी गणपती असूनही मी नि:शंकपणे ऋषीपंचमीला झुणका भाकरी बरोबर कांदा ठेवतो नैवेद्याला.
पण असे जरी असले तरी श्री वासुदेवानंद सरस्वती येण्याच्या आधी गजानन महाराजांनी मठ आरशासारखा स्वच्छ करायला आणि सोवळ्याचे पालन करायला आपल्या भक्तांना सांगितले होते. कारण श्री वासुदेवानंद सरस्वती हे पण ब्रह्मपदी पोहचले होते (आपल्या भाषेत सोवळ्याओवळ्याच्या मार्गाने)!
तेंव्हा महाराजांचा आणि स्वामींचा हे दोन्ही मार्ग बरोबर आहेत. तुझा जो मार्ग असेल तो तू निवडशीलच!
माधव सावट, योग्य विचार करत
माधव
शब्दांत उलगडायला जमेल की नाही माहीत नाही, प्रयत्न करते. थोड्या वेळाने लिहिते. आधी स्वत:पुरतेच लिहून पाहते.
सावट, योग्य विचार करत आहात, असे जेव्हा तुम्ही म्हणालात, तेह्वाच पुढे माझ्यासाठी काहीतरी गुगली येणार हे कळाले होते.
योग्य विचार करत आहात, असे
योग्य विचार करत आहात, असे जेव्हा तुम्ही म्हणालात, तेह्वाच पुढे माझ्यासाठी काहीतरी गुगली येणार हे कळाले होते. >>>
अगदी अगदी. सरसावून बसली असशील ना?
Pages