'शेतकरी आत्महत्यांवर तज्ज्ञांची मुक्ताफळे'

Submitted by अभय आर्वीकर on 27 November, 2009 - 05:37

. शेतक-यांच्या आत्महत्यांच्या समस्येवर सद्ध्या बरीच चर्चा आणि उहापोह सुरु आहे. या समस्येची उकल करतांना अनेक मान्यवरांनी शोधलेली कारणे आणि सुचविलेले उपाय बघितले तर "शेतकरी मरतोय तर मरू द्या पण त्याच्या आत्महत्येची कारण-मीमांसा करणे आणि उपाय सुचविणे बंद करा" अशा स्वरुपाची आत्मक्लेशी प्रतिक्रिया शेतकरी समाजमनात उमटल्याशिवाय राहत नाही. कारण शेतक-यांच्या आत्महत्येच्या दु:खद वेदनांपेक्षा यांच्या प्रतिक्रिया अधिक वेदनादायी असतात.
शेतकरी आळशी किंवा कामचुकार आहे असे वाटते त्या सर्व मान्यवर तज्ज्ञांनी आयुष्यात एकदातरी सलगपणे काही दिवस शेतकरी समाजासोबत (पाटलाच्या वाड्यात किवा राजकीय पुढा-याच्या बंगल्यात नव्हे ) घालवायला हवे. त्याखेरीज शेतकरी कशाला म्हणतात,तो कसे जीवन जगतो आणि किती कष्ट करतो याचा अनुभव येणे अशक्य आहे. ४-५ तास किंवा अर्धा-एक दिवस शेतक-याच्या झोपडीत घालवल्याने जर कुणाला शेतकरी समजला असे वाटत असेल तर खुशाल वाटू दे,पण हा देश आपण कोण्या कामचुकार,आळशी,अलायक तज्ज्ञांचा हातात सोपवला असा प्रश्न जर कोण्या ग्यानबाला पडला,तर त्याच्याशी वाद घालता येईल,मुजोरीही करता येईल पण त्या ग्यानबाच्या प्रश्नाचे समर्पक निराकरण करता येईल.?
झोप,जेवण आणि अन्य शारीरिक विधींसाठी लागणारा काळ सोडला तर उर्वरित वेळात शेतकरी काय करतो? स्विमिंग करायला जातो? क्रिकेट / सिनेमा बघायला जातो? बायकोला घेऊन बागेत फिरायला जातो? बीअरबारवर जातो? बारबालांचे नृत्य बघायला जातो कि इतवारी / बुधवारपेठेत फेरफटका मारायला जातो? मान्यवर तज्ज्ञांनी पहिल्यांदा या प्रश्नांचे उत्तर शोधायला हवे.( आणि जरी का या प्रश्नांचे उत्तर होकारार्थी असेल तरीही बिघडते कुठे? सर्व उपभोगाचा भोग भोगणारी आमच्या सारखी भोगवादी मंडळी कुठे आत्महत्त्या करताहेत? आम्ही जिवंतच आहोत कि अजून.)
औताच्या बैलाला वर्षातून फक्त १२० ते १४० दिवस तर शेतक-याला मात्र ३६५ दिवस काम करावे लागते,बाप मेला सुट्टी नाही,बापाला तिरडीवर तसाच ठेवून बैलाचे शेनगोटा, चारापाणी करायला जावेच लागते.पोरगा तापाने फणफणत असेल किंवा अगदी Gastro जरी झाला तरीही पेरणी थांबवता येत नाही हे वाजवी सत्य तज्ज्ञ मंडळींना कधी कळेल?
तरीही या तज्ज्ञ मंडळींना शेतकरी आळशी आणि कामचुकार दिसत असेल तर त्यांनी खालील प्रमाणे शास्त्रशुद्ध मार्गाचा अवलंब करून स्वत:ची खातरजमा करून घ्यावी.
आत्महत्या झालेल्या शेतकऱ्याच्या घरी जावून ;
१) प्रेताचे वजन करावे व शारीरिक उंची मोजावी. वजन व उंची यांचा रेशो काढावा. तो डॉक्टरला दाखवावा.मय्यत व्यक्ती सुदृढ कि कुपोषित,कष्टकरी कि कामचुकार या विषयी सल्ला घ्यावा.
२) मुखवट्याचा एक क्लोजअप फोटो घ्यावा.त्यावरून मरण्यापूर्वी त्याच्या चेहऱ्यावर काय भाव होते, मरण्यापूर्वी त्याची मानसिक स्थिती काय होती याचा याचा शास्त्रीय दृष्टीकोनातून रिपोर्ट मागवावा.
३) त्याच्या घरातील नेसनीची वस्त्रे,अंथरून-पांघरून,भांडी-कुंडी यांची यादी बनवावी. त्यावरून मय्यत व्यक्ती काटकसरी कि उधळखोर याचा अंदाज काढावा.
४) व्यसनाधीनतेमुळे शेतकरी आत्महत्या करतात असा काहींचा निष्कर्ष आहे.तसे असेल तर तो कोणती दारू पीत होता? गावठी, देशी कि इंग्लिश याचा शोध घ्यावा. गावठी,देशी आणि इंग्लिश मद्याचे अनुक्रमे बाजारभाव माहित करून घ्यावे.(मान्यवरांना गावठी, देशीचे भाव माहित नसणार) दरडोई येणारा खर्च याचा तुलनात्मक तक्ता/गोषवारा बनवावा. बिगरशेतकरी मद्यप्यांमध्ये आत्महत्त्यांचे प्रमाण आणि शेतकरी मद्यप्यांमध्ये आत्महत्त्यांचे प्रमाण याची आकडेवारी गोळा करून तुलना करावी.
५) अज्ञानतेमुळे शेतकरी आत्महत्या करतात असा काहींचा निष्कर्ष आहे.तसे असेल तर बिगरशेतकरी पण अज्ञानी अशा अन्य समुदायातील लोक आत्महत्त्या का करीत नाहीत? किंवा बारामतीचे लोक फारच सज्ञानी आहेत काय?
६) वेडसरपणामुळे शेतकरी आत्महत्या करतात असा काहींचा निष्कर्ष आहे. वेडसर लोक आत्महत्त्या करतात? कुठले? अमेरिकेतील? ब्रिटनमधील? फ्रांसमधील कि पाकिस्तानातील?
७) मनोरुग्णपणामुळे शेतकरी आत्महत्या करतात असा काहींचा निष्कर्ष आहे. त्यासाठी गावागावात मानसोपचार शिबिरे आयोजित करावी असे त्यांना वाटते. पण ग्यानबाला हे पटत नाही.एका दाण्यातून शंभर दाण्याच्या निर्मितीचा चमत्कार घडवणारा व स्वत: अर्धपोटी राहून जगाला पोटभर खाऊ घालणारा शेतकरी मनोरुग्ण कसा काय असू शकतो? कदाचित वैफल्यग्रस्त असू शकतो. मग तो वैफल्यग्रस्त, नाउमेद का झाला याची कारणे शोधावी. ती कारणे सामाजिक कि आर्थिक याचाही शोध घ्यावा? शेतात गाळलेला घाम, दामात का परावर्तीत झाला नाही याचाही शोध घ्यावा. याउलट प्याकेजची रक्कम गिळंकृत करणारे राजकीय पुढारी आणि आत्महत्त्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला मिळणाऱ्या शासकीय मदतीचा चेक काढण्यासाठी लाच खाणारी नोकरशाही मानसिक विकृतीने ग्रासली असून त्यांच्या भावनिक संवेदना बधीर झाल्या आहेत.तेच खऱ्या अर्थाने मनोरुग्ण असून त्यासाठी शासकीय कार्यालयामध्ये, मानसोपचार शिबिरे आयोजित करावी असे ग्यानबाला वाटते. शेतकऱ्याला आत्महत्त्या करायला भाग पाडणाऱ्या या व्यवस्थेचे शुद्धीकरण आणि मतपरिवर्तन होणे गरजेचे आहे,ज्या अर्थी शेतीविषयक धेय्य-धोरणामध्ये मुलभूत बदल होतांना दिसत नाही त्या अर्थी शेतीविषयक धेय्य-धोरणे आखणाऱ्याकडून शेतकरी आत्महत्या बद्दल व्यक्त होणारी चिंता हा वरपांगी देखावा आहे,ज्या अर्थी शेतीला न्याय देणारी कृषी विषयक धोरणे आखण्यासाठी लागणारी कणखरता त्यांच्यामध्ये नाही त्याअर्थी तेही मानसिक दुर्बल असावे असा ग्यानबाचा कयास आहे,त्यासाठी मंत्रालयामध्ये मानसोपचार शिबिरे आयोजित करावी असेही ग्यानबाला वाटते. जे ग्यानबाला उमजते ते या तज्ज्ञांना का उमजू नये? उमजत असेलही कदाचित परंतु शेतकऱ्याला आत्महत्त्या करायला भाग पाडणाऱ्या या व्यवस्थेवर उदरनिर्वाह करणारी मंडळी सिंहासनाच्या इच्छे विरुद्ध काही निष्कर्ष काढतील ही अशक्य कोटीतील बाब आहे,असेही ग्यानबाचे स्पष्ट मत आहे.
८) प्याकेजमुळे आत्महत्त्या थांबत नाही,असा काहींचा निष्कर्ष आहे. परंतु ते प्याकेजच्या स्वरूपावर अवलंबून आहे. क्यांसरच्या रोग्याला प्यारासीटामोलचे प्याकेज द्यायचे,रोगी बरा झाला नाही अथवा दगावला कि रोगी अज्ञानी होता,त्याने औषधे घेण्यात कुचराई केली, असा काहीसा बावळट निष्कर्ष काढण्याचा हा प्रकार आहे. त्या ऐवजी प्याकेजच्या मूळ स्वरूपातच गफलत झाली, रोगाचे निदान करण्यात,औषधांची निवड करण्यात चूक झाली हे कबूल करण्यासाठी लागणारी मानसिक औदार्यता आमच्यामध्येकेव्हा येणार हाच खरा लाख मोलाचा प्रश्न आहे.
मान्यवर तज्ज्ञांनी या प्रश्नांची उत्तरे शोधायलाच हवी. विषयाच्या खोलवर जायला हवे. अभ्यासांती निष्कर्ष काढून सप्रमाण सिद्ध करायला हवे,पण हे होतांना दिसत नाही. पुर्वाग्रह बाजूला सारून त्रयस्थपणे मुद्द्याची उकल केल्याखेरीज निर्दोष निष्कर्ष निघू शकत नाही. परंतु बाटली आणि पंचतारांकित संस्कृती वृद्धिंगत झालेल्या स्वनामधन्य तज्ज्ञांना याची गरज भासत नाही. एरवी शेतकरी आत्महत्या सारख्या संवेदनशील मुद्द्यावर तज्ज्ञांनी येरेगबाळे मतप्रदर्शन करण्यापेक्षा चूप बसने शेतकऱ्यासाठी समाधानाचे ठरेल. आणि कदाचित शेतकरी आत्त्महत्यासारख्या संवेदनशील मुद्द्याची उकल होण्यासाठी प्रामाणिक प्रयत्नांच्या प्रारंभाचे तेच पहिले पाऊल ठरेल.

. . . गंगाधर मुटे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शेतकर्‍यांनी शेती हा व्यापाराप्रमाणे व्यवसाय समजून केला तर त्यांच्यावर आत्महत्येची वेळ येणार नाही. सगळेच कृषीतज्ज्ञ उंटावरचे शहाणे नसतात, हेही आपण समजून घेतले पाहिजे. दोष आपल्या मानसिकतेत आहे. >> अनुमोदन..

सरकार हे आपण बनवतो. किमान आपल्या भागातला आमदार निवडणे हे तरी आपल्या हातात असते. त्या आमदाराकडून काम करवून घेणे हे देखील आप्ल्याच हातात असते. त्याचबरोबर "मी शेती नामक धंदा करतोय मला जास्तीत जास्त नफा झालाच पाहिजे आणि त्यासाठी मी काय करू?" हे देखील सतत लक्षात ठेवले पाहिजे.

.

जोवर शेतकरी आणि ग्राहक यांच्यात दलाल नावाचा हलकट राक्षस पाय आडवा पसरून बसला आहे तोपर्यंत त्यांच्या मालाला भाव मिळणार नाही.>> यावर कार्पोरेट शेती हा पर्याय चान्गला ठरू शकतो. या दलालानीच मध्यंतरी रिलायन्स व तत्सम रीटेल दुकानावर "बहिष्कार घातला होता" आणि दगडफेकपण केली होती.

मुंबईच्या हायपरसिटी सारख्या मॉलमधे मला कॅप्सिकम ८ रू. पाव किलो मिळते आणि वाशीमधे मात्र भाजीवाल्याकडे १२ ते १४ रू पाव किलो!!! शेतकर्‍यापर्यंत किती जातात ते मला पण माहित नाही Sad

गेल्या ५० वर्षांत आपल्याइथे राजकारणाने नको इतक्या कण्या नासल्या आहेत.>>> या स्वतंत्र भारतामधे कित्येक अनिष्ट गोष्टी शिरल्या, त्यापैकी ही महा अनिष्ट !!

नदिंनीजी ,
>>>>गळ्यात चेन , राजकारण, आणी गाडी हे विधान जे मी केले आहे त्याला काही कारने आहेत .
हे पहा पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी गळ्यात सोनयाची चेन स्कॅरपीयो या गोष्टी बाळगुन आयशोआरामत राह्तो आसे बोलने माझा हेतु नाही तर हे विधान मी माझ्या काही निरक्षणातुन केले आहे .

१ ) पश्चीम महाराष्ट्र :- पुणे , सतारा , कोल्हापुर , सांगली , या जिल्हात महाराष्ट्रातील नव्हे भारतातील सर्वात जास्त साखर कारखाने व दुध उत्पादक संघ आहेत . तसेच माहाराष्ट्रातील सर्वात मोटी धरणे या भागात आहेत , पावसाचे प्रमाण ही खुप आहे .मुम्बई बंगलोर हायवे या भागातुन गेल्या मुळे जमीनीनां प्रचंड भाव आलेला आहे माहाराष्ट्रातील सगळ्यात मोटी एम . आय .डी. सी . या भागात आहे आणी मुम्बई व पुणे बाजार्पेठ जवळ आसल्या मुळे भाजीपाला , दुध , फळे यांना पण चांगला बाजार भाव मीळतो .
एक उदा :- पश्चिम माहाराष्ट्रातील सर्व साखर कारखान्या कोन्त्या भागातील लोक काम करतात ते पाहावे .
दुसरा मुद्दा असा की सर्वच लोक गळ्यात सोन्याची चेन , गाडी , राजकारण , तमाशा या गोष्टी करतात आसे जे मी लीहले आहे त्या बद्दल क्रुपया करुन याचा शब्दशहा अर्थ घेउ नका , माझ्या मते इतर शेतकर्या पेक्षा ही लोक सुखी आहेत एव्हढेच .

२ ) विदर्भ :- गड्या आपला गावच बरा <<<<हे जे मी विधान मी केले आहे त्याला ही काही कारणे आहेत महाराष्ट्रात झपाट्याने प्रगती करणारे जिल्हे , पुणे , ओरंगाबाद , नाशीक , कोल्हापुर , या जिल्ह्यातील जो एम . आय . डी . सी . एरीया आहे तीथे प्रामुख्याने कोकण किंवा मराठवाड्यातील मजुर दीसेल आणी तो पण शेतकरी . या लोकांकडे शेती आसली तरी सगळेच शेती करीत नाहीत एक भाउ शेती सांभाळतो तर दुसरा पोट भरण्यासाटी मुम्बई कींवा पुणे गाटतो .
तुम्ही खरोखरच माहीती काढलीतर तुम्हाला काही गोष्टी ची तुम्हाला माहीती मीळेल , विदर्भातील शेतकरी हा आपली शेती कींवा गाव सोडायला तयारच नाहीत आता ते का नाहीत आसे मला विचारु नका >>> नाहीतर या विषयावर मला पी एच डी करावी लागेल किंवा एक डोक्युमेंटरी बनवावी लागेल

मुम्बई बंगलोर हायवे या भागातुन गेल्या मुळे जमीनीनां प्रचंड भाव आलेला आहे >>> म्हणजे सगळेच शेतकरी जमीनी विकुन , बुडाखाली स्कॉर्पियो घेऊन हिंडतात असं म्हणायचं आहे का ?

पश्चिम माहाराष्ट्रातील सर्व साखर कारखान्या कोन्त्या भागातील लोक काम करतात ते पाहावे . >>> साखर कारखान्याचे गाळप , वर्षातुन किती महीने चालते ते जर लक्षात घेतल तुम्हाला तुमच्या निरिक्षणातला फोलपणा दिसुन येईल .

माझ्या मते इतर शेतकर्या पेक्षा ही लोक सुखी आहेत एव्हढेच . >>> पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी किती सुखी आहेत ते माहीती नाही ,पण ते गरज पडली तर दुसर्‍याच्या शेतात किंवा रो. ह. यो. च्या कामावर जरुर जातात .

पुणे , ओरंगाबाद , नाशीक , कोल्हापुर , या जिल्ह्यातील जो एम . आय . डी . सी . एरीया आहे तीथे प्रामुख्याने कोकण किंवा मराठवाड्यातील मजुर दीसेल आणी तो पण शेतकरी . >>> तिथे महाराष्ट्रातल्या शेतकर्‍यांचं प्रमाण खुप म्हणजे खुपच कमी आहे , तिथे कर्नाटकचे लोक जास्त दिसतील.

सोलुशन काय? असा प्रश्न पडतोच. पचायतराज व्यवस्थेने गावांना स्वतः निर्णय घेऊन विकास साधता येईल असे तेव्हा वाटले असणार. पुढे ७३व्या घटना दुरुस्तीमुळे या व्यवस्थेला आणखी अधिकार मिळाले. हे सगळं गावांच्या विकासाच्या बाबतीत ठरत असताना या व्यवस्थेचा शेतीवर विपरित परिणाम होऊ शकेल काय हे अभ्यासले गेले नसावे. कारण आज भारताच्या शेतीचा कणा जसा गाव आहे तसा भारतीय राजकारणाचा कणाही गावच आहे. असे असल्याने गाव आणि शेतीचा विकास व्हायला हवा होता. पण तसे झालेले नाही. त्याला कारण ती द्रूष्टी येण्या आधीच गावच्या राजकारण्याला स्वतःची तुंबडी भरण्याचे ज्ञान झाले. जसे अज्ञान मुला- मुलीचे लग्न लाऊन दिल्यावर त्याना समज नसल्याने जे प्रश्न निर्माण होतात तसेच प्रश्न भारतीय राजकारण आणि गावांत निर्माण झालेत. ते आता बदलणार नाहीत. त्यांच्यामूळे शेतीलाही फारसा फायदा होणार नाही. सोलुशन खरच आपण आपलंच उभं रहावं लागणार.

एकदम बराबर पाटील साहेब , आव काही लोक त्याच्यावर काही विचार करयाच सोडुन भलते सलते प्रश्न विचारन्यात धन्याता मानता पन तुमच म्हनन पटल बुवा आपल्याला .

    ( ५ )
      चर्चेच्या ओघात काही दखलपात्र मुद्दे उपस्थित झालेत, त्यावर अधिक चर्चा व्हायला हवी. मी थोडक्यात आढावा घ्यायचा प्रयत्न करतोय.
          १) "पण शेतजमिनीवर इतर उत्पादने घेऊन (उदा, फळबागा, सायाची / सागाची झाडं) ज्याला पाणी कमी लागेल आणि पैसा नियमित मिळेल असे काही उपाय आणता येणार नाही का?" नंदिनी "
            २) "अतिशय डोकं चालवून आणि विचार करून केलेली बागायती, तितक्याच हुशारीने टाकलेली प्रक्रियेची युनिटस आणि तसंच हुशारीने चालवलेलं अॅग्रेसिव्ह मार्केटिंग.उदाहरणं अभ्यास करण्यासारखी आहेत" नीधप
              ३) "अनेकांनी स्ट्रॉबेरी, फुलं इ. ची पण शेती केलीय, पण हे सगळे बाकीच्या शेतकर्यांपर्यंत पोहोचवायला हवे." भाग्यश्री"
              ............... शेतिमध्ये उत्पादन घेन्यायोग्य अनेक पिके आहेत, अगदी फुलझाडापासुन ते फळझाडापर्यन्त्, कड धान्यापासुन ते त्रुणधान्यापर्यन्त,स्ट्रॉबेरी पासुन जेट्रोपा पर्यन्त्,निलगिरिपासुन ते सागवानापर्यन्त, एवढंच नाहीतर तंबाखुपासुन ते अफिम-गांज्यापर्यन्त. घेण्यायोग्य पिके खुप आहेत्,कोणतेही पीक कुठेही क्रुत्रीम वातावरननिर्मीती करुन किंवा हरितग्रुहाच्या सहाय्याने घेता येणे शक्य आहे. प्रश्न जमिनिच्या दर्जाचाही नाही, शेनखत किंवा कंपोस्ट खताचा भरपुर वापर केल्यास नापिक जमिनितही भरघोस उत्पन्न मिळु शकतं. अडचण कौशल्याचिही नाही,ते शेतक-याच्या नसानसात भिनल आहे. कारण शेतकरी हा उत्पादक आहे आणि कौशल्य हा उत्पादकाचा स्थायीभाव आहे. मग प्रश्न हा की घोडं नेमकं अडते कुठे?
                कुठल्याही व्यवसायाचे मुख्यत्वे दोन भाग असतात. उत्पादन आणि विपणन.
                शेतीव्यवसायामध्ये उत्पादन घेण्यात स्वतः शेतकरीच पारंगत आहे. निसर्गावर मात करायची की त्याच्याशी मैत्री करुण समरस व्हायचं हे जेवढं शेतक-याला कळतं, तेवढं कुनालाचं कळतं नाही. क्रुषि विद्यापिठात पीएचडी मिळविणा-या व दररोज व्रुत्तपत्रात अथवा नियतकालीकात शेतिसल्ल्याचे सदर लिहिंणार्‍या क्रुषीतज्ज्ञाच्या घरच्या शेतीपेक्षा गांवातील इतर शेतकर्‍यांची शेती नेहमीच चांगली राहात आली आहे.
                  शेतीव्यवसायामध्ये अडचणीची बाब म्हणजे विपणन (Marketing) .सर्व जगात, सर्व क्षेत्रात, सर्व उद्योग-व्यवसायात Marketing ला अनन्यसाधारन महत्व आहे.उद्योगाचे यश production वर नव्हे तर Marketing वर अवलंबुन असते हा सर्वमान्य सिद्धांत असतांना शेतितील गरिबीचे कारण Marketing सोडुन production मध्ये का शोधले जाते हा माझा मुख्य प्रश्न आहे.
                    या संदर्भात मी माझा स्वःतचा अनुभव नमुद करतो. कॉलेज संपवुन शेती करायला गेलो तेव्हा गावातील इतरांकडे नाही ते ज्ञान आपल्याकडे आहे असा माझा द्रुढ समज होता आणि त्याच अविर्भावात मी शेतीची सुरुवात केली. या सर्व मुर्ख शेतकर्‍यांना स्वानुभावाने शहाने करण्यासाठी भरघोस उत्पन्न घ्यायचे ठरविले. दोन महिण्यात नगदी पैसा मिळ्वुन देणारे पिक म्हणुन वांगीची निवड केली आणि ५ एकरात वांगीची लागवड केली. मेहनत्,जिद्द सर्वस्व पणाला लावलं. मेहनत फळा आली. भरघोस पिक आलं.अन्य शेतकरी घेतात त्याच्या १-२ नव्हे चक्क ५-६ पट उत्पादन मिळालं. आणि इथेच माझे ग्रह फिरले.
                      माझी वांगी बाजारात गेली आणि स्थानिक बाजारात वांगीचे भाव गडगडले.५ रुपयाला पोतं कुणी घेइना. वाहतुक,हमाली,दलाली वजा जाता जो चुकारा मिळाला ते पैसे बसच्या तिकीटालाही पुरले नाहीत. शेतात घेतलेली मेहनत आणी वांगी फुकटात गेली. असे काय झाले ? काहीच कळत नव्हते.प्रारंभीच म्हटल्याप्रमाणे माझ्या नजरेत इतर शेतकरी अडाणी,मुर्ख असल्याने त्यांच्याशी सल्लामसलत करण्याचा प्रश्नच नव्हता.शेवटी निष्कर्श निघाला की मार्केट्मध्ये गरजेपेक्षा जास्त माल गेल्यामुळे भाव पडले.कारण ग्राहकाला जेवढी गरज असेल तेव्हढीच तो खरेदी करेल.माझी वांगी खपावी म्हनुन ग्राहक पोळी,भात,भाकरीऐवजी नुसतीच वांग्याची भाजी खावुन पोट थोडीच भरनार आहे? स्थानिक बाजारात गरज ,मागणीपेक्षा जास्त माल गेल्याने ही स्थिती झाली त्याला जबाबदार मीच होतो. इतर शेतकर्‍यांनी सायकलवर आणलेली अर्धा पोतं वांगी सुद्धा माझ्या मुळे बेभाव गेली होती. सायकलवर अर्धा पोतं वांगी आणुन उदर्निर्वाह करणारे माझ्यामुळे अडचणीत आले.
                        झाली चुक पुन्हा करायची नाही म्हणुन दुसर्‍या खेपेस वांगी आदिलाबादला न्यायचे ठरवले. माझ्या गावाहुन १५० किमी अंतरावर मोट्ठी बाजारपेठ असलेले आंध्रप्रदेश मधिल आदिलाबाद शहर. ६० पोती वांगी न्यायची कशी? स्पेशल वाहनाचा खर्च परवडणार नव्हता म्हनुन माल बैलबंडीने हायवे पर्यंत नेला.रायपुर - हैद्राबाद जाणार्‍या ट्रक थांबवुन माल भरला.तिथे हमाल किंवा कुली नव्हताच त्यामुळे मीच ट्रकड्रायव्हरच्या मदतिने माल चढविला.६० पोती प्रत्येकी वजन ५०-५५ किलो. अनुभव नवा होता.मजा वाटली (?) शेतकरीcumहमाल.Two in One.
                        तिथल्या मार्केटची गोष्टच न्यारी.मार्केटमध्ये पाय ठेवायला जागा नव्हती.
                        वांगेच वांगे.
                        अत्र तत्र सर्वत्र वांगेच वांगे.
                        जिकडे तिकडे चोहीकडे,वांगेच वांगे गडे,आनंदी आनंद गडे.
                        मार्केट वांग्यांनी भरलं होतं.त्या सन्दर्भात एका शेतकर्‍याला विचार विचारले.
                        "यंदा हवामान वांगी साठी फारच अनुकुल असल्याने वांगीच भरघोस उत्पादन आलयं." तो शेतकरी.
                        "भाव काय चाललाय?" माझा प्रश्ऩ.
                        "सकाळच्या लिलावात ५-६ रुपये भाव मिळाला." तो शेतकरी.
                        "किलोला कि मणाला?" माझा प्रश्ऩ.
                        " किलोला? अरे यंदा किलोला विचारतोकोण ?.पोत्याचा हिशेब चालतो." तो शेतकरी.
                        "म्हंजे? पोतंभर वांगीला ५-६ रुपये?" माझा प्रश्ऩ.
                        "पोतंभर वांगीला नाही,पोत्यासहीत पोतंभर वांगीला." तो शेतकरी.
                        "रिकाम्या पोत्याची किंमत बाजारात १५ रुपये असतांना पोत्यासहीत पोतंभर वांगीला ५-६ रुपये?" मी मलाच प्रश्न विचारीत होतो.हे कसं शक्य आहे? विश्वास बसत नव्हता पण सामोर वास्तव होतं.
                        "आता लिलाव केंव्हा होइल?" माझा प्रश्ऩ.
                        "इथे नंबरवार काम चालतं,मी काल आलो,माझा नम्बर उद्द्या येइल कदाचित." तो शेतकरी.
                        "तोपर्यंत वांगी नाही का सडनार?" माझा प्रश्ऩ.
                        यावर तो काहीच बोलला नाही.मुक होता.डोळे पाणावले होते,एवढ्या मेहनती पिकविलेलं वांग सडणार म्हटल्यावर त्याचा जिव कासाविस झाला होता.
                          मी मनातल्या मनात गणित मांडायला सुरुवात केली.आपला नंबर तिन दिवस लागला नाही तर अर्धी वांगी नक्कीच सडणार. उरलेली ३० पोती गुणिला ५ वजा तिन दिवस जेवणाचा,निवासाचा खर्च बरोबर उणे पंधरा ( - १५) म्हनजे वांगी विकण्यासाठी मला जवळुन १५ रुपये खर्च करावे लागनार होते.
                            काय करावे मला सुचत नव्हतं, डोकं काम करीत नव्हतं, माझं सर्व पुस्तकी ज्ञान उताणं झोपलं होतं.
                            आता पुढे काय? निर्णय घेतला वांगीकडे पाठ फिरविली आणि गावाचा रस्ता धरला. गावाजवळ आलो तेव्हा दिवस उतरणीला आला होता.आणि आता मला एका नव्या समस्येने ग्रासले होते. गावांतील शेतकरी मला यासंदर्भात विचारतील त्याला उत्तर काय द्यायचे? मुर्ख शेतकर्‍यांच्या नजरेला नजर भिडविण्याचे धाडस विद्याविभुषीत शहाण्याकडे उरले नव्हते. मग एका चिंचेच्या झाडाखाली विसावलो.तेथेच टाइमपास केला. गावातील सर्व लोक झोपी गेले असतील याची खात्री झाल्यानंतरच गुपचिप चोरपावलाने गावात प्रवेश केला.
                              नंदिनीजी,हे रुपक नाही,कथा नाही,पटकथा नाही आणि कादंबरीही नाही.ही माझी 'आपबीती' आहे. असा अनुभव प्रत्येक शेतकर्‍याला येतोच.तो बीचारा मुका आहे,बोलत नाही आणि लिहितही नाही कारण त्याच ऐकतो कोण? शेतकर्‍याला विचारायला कोणीच येत नाही. जो येतो तो शहाणपण शिकवायलाच येतो.
                                मोजक्या लोकांनी स्ट्रॉबेरी,आवळा लावणे ठिक आहे. त्यात भरपुर पैसेही मिळु शकतात, ही पिके किंवा पिके घेणारे इतरांसाठी मार्गदर्शक किंवा Ideal Model नाही ठरु शकत. कारण स्ट्रॉबेरी,आवळा अशा पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली तर काय होइल? समजा आवळ्याची जागतीक गरज जर १ किलो असेल आणि उत्पादन
                                जर १० टन आलं तर? वांगी ५ रु. पोतं या भावाने तरी खपेल कारण जनावराला,चिमण्या-पाखरांना खावु घालता येइल.पण आवळ्याचं काय करायचं ?
                                  तात्पर्य एवढच कि सबंध शेतकरी समाजाचा विचार करतांना, देशांतर्गत अथवा जागतिक गरज लक्षात घेवुनच पिकांचे उत्पादन घ्यावे लागेल.त्यामुळे सध्या प्रचलित असलेल्या पिकांमध्ये बदल करायला फारसा वाव दिसत नाही.
                                    गंगाधर मुटे

गंगाधरजी, तुमच्या समस्येचं उत्तर द्यायचा प्रयत्न करत नाही पण तरीही सहज सुचलं म्हणून लिहितेय. वरती मी माझ्या काकाबद्दल लिहिले होते. त्याला कालच फोन केला होता. त्याने टोमॅटोचं उत्पन्न काढलय आणी हे सर्व टोमॅटो सॉस बनवणार्‍या कंपन्याना तो करार करून विकतो. (मी दर विचारला नाही. पुढच्या वेळेला नक्की विचारेन)

तुम्ही पाचच्या पाच एकरात वांगीच का लावलीत? एका एकरात वांगी दुसर्‍या एकरात अजून कुठले पीक हे लावले असते तर कदाचित ही वेळ आली नसती. (असे माझे मत.. जाणकार यावर अजून माहिती देतील)

क्रुषि विद्यापिठात पीएचडी मिळविणा-या व दररोज व्रुत्तपत्रात अथवा नियतकालीकात शेतिसल्ल्याचे सदर लिहिंणार्‍या क्रुषीतज्ज्ञाच्या घरच्या शेतीपेक्षा गांवातील इतर शेतकर्‍यांची शेती नेहमीच चांगली राहात आली आहे. >>> या विधानाला फारसा अर्थ नाही. नवनविन प्रयोग करणार्‍याची शेती कायम चांगलीच असते आणि कृषी विद्यापीठामधे शेतमालाचे विपणन हा स्वतंत्र विषय शिकवला जातो.

वांगी ५ रु. पोतं या भावाने तरी खपेल कारण जनावराला,चिमण्या-पाखरांना खावु घालता येइल.पण आवळ्याचं काय करायचं ? >> तुम्ही खरंच शेतकी कॉलेजात शिकलाय? आवळाच जॅम, आवळा सरबत, आवळा सुपारी, मोरावळा, मुखवास आणि कित्येक आयुर्वेदिक औषधे यामधे आवळा वापरला जातो. तुम्ही जर भाजीपाल्याच्या मंडईत आवळा विकायला गेलात तर त्याला कदाचित फारसा भाव येणार नाही. पण वरील उत्पादने बनवणार्‍या कंपन्याना संपर्क केला तर मत्र आवळ्याला नक्कीच योग्य भाव मिळेल. त्या कंपन्या देखील दलालांऐवजी शेतकर्‍याशी डील करणे पसंद करतात कारण त्याचेही पैसे वाचतात. शिवाय या वर्षी अमुक इतके टन आवळे अमुक एका रेटने तू आम्हाला देशील असा करार देखील करतात यामुळे नफा नाही झाला तर किमान तोटातरी होणार नाही याची शेतकर्‍याला खात्री असते.

नंदिनीजी,हे रुपक नाही,कथा नाही,पटकथा नाही आणि कादंबरीही नाही.ही माझी 'आपबीती' आहे. असा अनुभव प्रत्येक शेतकर्‍याला येतोच.तो बीचारा मुका आहे,बोलत नाही आणि लिहितही नाही कारण त्याच ऐकतो कोण? शेतकर्‍याला विचारायला कोणीच येत नाही. जो येतो तो शहाणपण शिकवायलाच येतो. >> मग कय करायला हवे लोकानी??? ते तरी सांगून टाका. तुम्हाला तज्ञाचे सल्ले "मुक्ताफळे" वाटतात. तुम्ही स्वतः मार्केटिंग करत नाही. पारंपारिक शेती सोडून नवे प्रयोग करायला तुमची तयारी नाही.

शेतकरी आत्महत्या करतो ही समस्या नाहिये, शेतकरी कर्ज काड्।अतो ही समस्या आहे आणि ती समस्या शेतकर्‍याने मनावर घेतलं तर तो नक्की सोडवेल.

शेतकर्‍याची सहकार संघटना वगैरे असते ना? मग तिथे शेतमालाचे दर स्वतः शेतकरी का निश्चित करत नाही.

गंगाधर साहेब - तुमचा अनुभव, तुम्ही केलेल्या चुका येथे प्रामाणिक पणे मांडल्याबद्दल धन्यवाद. त्यापासुन माझ्यासारखा बिगरशेतकरी पण शिकेल.

नंदिनी यांचाच प्रश्न मलाही आहे - तुम्ही ५ एकरात २-३ प्रकार (diversification) का नाही लावलेत ?

(6)
<< नंदिनी यांचाच प्रश्न मलाही आहे - तुम्ही ५ एकरात २-३ प्रकार (diversification) का नाही लावलेत ? >>उदय
उदयजी,
हा माझा अगदी शेतीच्या सुरुवातीचा अनुभव आहे. शेतीमध्ये मी केलेला पहिला प्रयोग आणि घेतलेला पहिला अनुभव आहे.
<< कॉलेज संपवुन शेती करायला गेलो तेव्हा गावातील इतरांकडे नाही ते ज्ञान आपल्याकडे आहे असा माझा द्रुढ समज होता आणि त्याच अविर्भावात मी शेतीची सुरुवात केली. या सर्व मुर्ख शेतकर्‍यांना स्वानुभावाने शहाने करण्यासाठी भरघोस उत्पन्न घ्यायचे ठरविले. >>
आज चर्चेच्या अनुषंगाणे आठवन झाली.म्हणुन शब्दात रुपांतरीत झालं.
हा माझा एकट्याचा अनुभव नाही. संपुर्ण भारतवर्षातील शेतकर्‍यांचा आहे हे मी अनुभवलं आहे.

.

वरील खुलासा करतांना मी स्वतःचा अनुभव विषद केला.आणि नंतर लक्षात आले की हा अनुभव म्हणजे एक स्वतंत्र लेखच तयार झालेला आहे.म्हणुन मायबोली वर ललित लेख या सदरात "वांगे अमर रहे" हे शिर्षक देवुन टाकला आहे.
त्यावर चमन यांची प्रतिक्रिया महत्वाची वाटते.
प्रतिक्रियेचा सारांश असा.

हे असे खूप लिलाव मी फार जवळून बघितले आहेत, केलेही आहेत आणि घेतलेही आहेत.
ही साखळीच असते, मागणी-पुरवठ्याचं समीकरण बिघडलं की त्याचे भोग सगळ्यांच्याच नशिबी येतात.
शेतकरीच असं नाही लहान सहान व्यापारीही ह्यात प्रचंड कर्जबाजारी होतात, त्यातल्या त्यात नाशवंत मालाचा क्रय्-विक्रय करणारे.

छान लिहिलंय्..मार्केट आणि मार्केटिंग कमिटीशी संबंधित लोकांना हे अनुभव प्रत्येक ऋतूचक्रात येतातच

साधी गुळाच्या लिलावाची गोष्ट घ्या. कोल्हापुरात बदली रव्याचे प्रकरण. जिल्हाधिकारी निर्ण्य देतात त्याला सुद्धा व्यापारी लोक हरताळ फासत्तात. आणि कोणी काहीही करु शकत नाही. Angry

आसे करायला हावे ? तसे करायला हावे ? फक्त चर्चा ..चर्चा .
त्याने तसे केले याने आसे केले , यांचा आनुभव असा त्यांचा अनुभव तसा ..
आहो ज्यांचा प्रत्यक्ष शेतीशी संबध येतो आसे कीती शेतकरी या चर्चेत सह्भागी आहेत
तुम्ही आम्ही चर्चा करुन काही उपयोग तरी आहे का ?
शेतकरयांना तुम्ही आसले काही सांगत बसलातना तर .. ते म्हण्तील ल्य शाहाना झालास आर आम्च १० पीड्या यात्च गेल्या की ( आमच्या बापाने मला केलेला प्रश्र ? )
मुळात शेतकरी हा परंपरा आणी रीतीरीवाज यातच पुर्ण बुडालेला आहे , नविन काही प्रयोग करायचा म्ह्टले की पहिले नाकाराआर्थी शब्दापासुन सुरवात होते , नाकाराआर्थीचा होकाराआर्थी होण्यासाटी शेतीतला एक हंगाम संपलेला आसतो .

.

एक हंगाम वाया गेला, उदा:दुष्काळ्,किंवा ओला दुष्काळ ई., शेती ५-७ एकर, बाप आजारी , माय तर दुखणं आंगावर काढत असते..., दोन मुली एखादा मुलगा...,बायको घर संभाळुन "त्याला" शेतीत मदत करते,... हळुहळु घर चालवणे "त्याला" अवघड होऊ लागते, दवाखाना, वयात आलेल्या मुलींची चींता (काहीवेळ्स कोर्ट्-कचेर्‍या) अश्या अनेक कारणांसाठी कर्ज काढुन सर्व मार्ग वापरून झालेले असतात.
......शेवट आपल्याला माहीत आहेच.

ही काही चित्रपट कथा नाही, सत्यकथाच आहे. बर्‍याच जणांचे अनुभव थोड्याफार फरकाने का असेना पण असेच आहेत.

आज दवाखाना म्हंटलं कि साध्या -साध्या आजारांवर ५-१० हजार सहज लागतात. त्यात जर ऑपरेशन असेल तर विचारुच नका. गोळ्या-औषधाची तिच तर्‍हा.
एका औषधी दुकानावर गेलो होतो, एक तिस-पस्तीशीतील स्त्री आली. पोषाखावरुन ती खेडुत वाटली. दुकानदाराने औषधांची आधीच किंमत सांगितली, जी जवळ-पास दोन-अडिच हजार होती, त्या बाईकडे तेव्ह्डी रक्कम नव्ह्ती, ति गयावया करु लागली, पण दुकानदार काही ऐकण्याच्या मनस्थीतीत नव्हता, अखेर तिने आपले मंगळसुत्र काढुन सांगितले यात जेव्ह्डे येइल तेव्ह्डे द्या. शेवटी दुकानदाराने एक आठ दिवसांच्या मुदतीवर तिला आर्धा कोर्स दिला.

हे उदा: अश्यासाठीच कि, आज शेतकर्‍यांना प्रचंड खर्चाला सामोरे जावे लागते. विचार करा, ज्या सामान्य पगारी माणसाला सुद्धा आज बर्‍याच गोष्टी आवाक्या बाहेर वाटतात, तेथे शेतकर्‍याची काय कथा. त्याला तर पैसा फक्त हंगामी मिळतो आणि आल्या पैश्याला दोन दिवसात हजार पाय फुटतात.

थोड्क्यात काय तर, अशी अनेक उदाहरणे देता येतील, पण खरी गरज आहे ती सर्वांगाने त्यांच्या परीस्थीतीची मिमांसा करण्याची व कृतीची. (ती अनेक तज्ञ लोक करत असतील हि.)

{ .७. }
<< मुळात शेतकरी हा परंपरा आणी रीतीरीवाज यातच पुर्ण बुडालेला आहे , नविन काही प्रयोग करायचा म्ह्टले की पहिले नाकाराआर्थी शब्दापासुन सुरवात होते >>
.
एसलक्ष्मणजी,निधपजी,
आपण असे हताश होवुन कसे चालेल?
बिचारा शेतकरी आर्थिक विचारात एवढा गुंतलेला असतो की त्याला त्याची कैफियत मांडायला फुरसतच नसते, शेतीत प्रयोग करायचे म्हटले तर त्याचा पुरस्कार 'आत्महत्या' असतो. फरक एवढाच की 'शुभ हस्ते' दोर आवळायला पंतप्रधान किंवा मंत्री येत नाही, ज्याचा दोर त्यालाच आवळावा लागतो. त्याला हे कळते म्हणुन तो फारसा स्वतः आखुन घेतलेल्या परीघाबाहेर जात नाही.
परीघाबाहेर (प्रयोग) जावुन ज्यांनी शेती केली त्यांना कर्ज फेडतांना विकायला घराचे कवेलुही पुरले नाहीत.अशी उदाहरणे प्रत्येक गावात पावलोपावली सापडतात. मग तो जर तो "अंथरुन पाहुन पाय पसरावे" या न्यायाने वागत असेल तर तो त्याचा समजुतदारपणा आहे.
शेतीत नवनवे प्रयोग करु पाहणार्‍या शहाण्यांच्या शहाणपणाचे "धिंडवडे" निघतांना पाहीलेला कोणताही बाप,आपला मुलगा त्या मार्गाने जावु नये,गांवाबाहेर जावुन हमाली केली,रिक्शा चालवला तरी चालेल पण इज्जतीने जगावा अशी अपेक्षा प्रत्येक बाप करित असतो. हे प्रत्येक गावाचे चित्र आहे. मग त्याला नकारार्थी किंवा रुढीवादी कसे म्हणता येइल ?.
लक्ष्मणजी,
शेतकरी त्याच्या आर्थिक हलाखीत एवढा गुरफटला की स्वतःची कैफियत मांडण्याचे बळ त्याच्यात उरलेले नाही. तो आर्थीकरित्या पुर्णपणे पराधिन (गुलाम) झालेला आहे, बँकेचे किंवा सावकाराकडुन कर्ज काढल्याखेरीज, किराना,कापड,क्रुषी केंद्रातुन उधारवाडी नेल्याखेरीज त्याचे नित्याचे व्यवहार चालत नाही. दुसर्‍याच्या दारात गेल्याशिवाय्,पाय धरल्याशिवाय ज्याची चुल पेटत नाही तो स्वत;च्या समस्या कसा मांडणार?
आपण आता शेतकरी राहीलो नाही कारण आपले पोट शेतीवर अवलंबुन नाही पण शेतकरी पुत्र आहोत. गावातील दारिद्र्य आणी गावाबाहेरचे वैभव आपण अनुभवले आहे.त्यामुळे एका बाजुला जनावरासारखे कष्ट करुनही अठराविश्व दरिद्र्य आणी दुसर्‍या बाजुला तुलनेने कमी कष्ट करुनही वैभव असे का घडते याचा शोध घेण्याचे,छडा लावण्याचे प्रयत्न करणे हे आपले प्रथम कर्तव्य समजायला पाहीजे.आणि हे कार्य आपल्या हातुन घडत असेल तर आपण स्वतःला भाग्यशाली समजले पाहिजे.

कशातुन काय घडेल हे कुणालाच माहीत नसते. कधिकधी क्षुल्लक वाटणारी गोष्टच इतिहास घडवुन जात असते.आता हेच बघाना.जर तुम्ही शेतकरी विषयावर लेख लिहिलाच नसता तर मी तो वाचलाच नसता आणि कदाचित मायबोलिवर आलोच नसतो.
मायबोलीवर शेतकरी नसले तरी शेतीशी सहानुभुति ठेवणारे खुप आहेत. आणि महत्वाचे म्हणजे ज्ञानाचा जो एक हिस्सा आपल्याकडे नाही तो हिस्सा यांचेकडे आहे. त्यांच्या व्यवहार ज्ञानाचा उपयोग शेतीशी सबंधित समस्यांची सोडवणुक करतांना होवु शकतो.कधिकधी ज्याचं जळतं त्याच त्याला काहीच दिसत नाही,ते इतरांना अधिक स्पष्ट कळतं,म्हणुन त्यांचे आकलनही अधिक परिणामकारक ठरते. आणि म्हणुन कधिही चर्चेला निरुपयोगी म्हणता येत नाही.
आपण हे कार्य जिवाभावाने करीत राहीले पाहिजे.करता करता एक दिवस नक्किच यांतुन मार्ग निघेल,अशी
आपण आशा करुया.

गंगाधर मुटे

कुटेजी तुम्ही येथे जे म्हणालात << आपण आता शेतकरी राहीलो नाही कारण आपले पोट शेतीवर अवलंबुन नाही पण शेतकरी पुत्र आहोत. गावातील दारिद्र्य आणी गावाबाहेरचे वैभव आपण अनुभवले आहे.त्यामुळे एका बाजुला जनावरासारखे कष्ट करुनही अठराविश्व दरिद्र्य आणी दुसर्‍या बाजुला तुलनेने कमी कष्ट करुनही वैभव असे का घडते याचा शोध घेण्याचे,छडा लावण्याचे प्रयत्न करणे हे आपले प्रथम कर्तव्य समजायला पाहीजे.आणि हे कार्य आपल्या हातुन घडत असेल तर आपण स्वतःला भाग्यशाली समजले पाहिजे.
>>

फार महत्वाचं बोललात. आनंद यादवाच्या एका पुस्तकात एक भाग आहे. त्यात ते गावी आलेले असतात. ते महाविद्याल्यात प्राध्यापक झालेले असतात. पण त्यांचा लहान भाऊ गावाकडेच शेती करतो. तेंव्हा घरी आलेल्या यादवांना गुळाचे पाणी (पातळ पाक) आणि पोळ्या असा स्वंयंपाक करतात. जेवताना आई यादवांनाच आग्रह करते. कारण तो पाहुणा आलेला असतो. यादवांना त्या पाक्-पोळ्यांचं अप्रूप नसतं. पण शेजारी बसलेल्या लहाना भाऊला तो पदार्थ केव्हा तरी मिळणारा. तो मोठ्या नवल्लाईनं तो त्याचा आस्वाद मिळतो. शिवाय तो शेतीत राबणा रा म्हणून त्याचा आहार मोठा. ते यादवांच्या लक्शात येते. ते आपल्या ताटातलं आपल्या भावाच्या ताटात वाढतात.
हे उदाहरण देण्यामागे हेतू हा आहे की, जे शेतीत राबत नाहीत पण शेतकरीपुत्र आहेत अशांनी आपला पैसा बैंकेत कोंबण्यापेक्शा आपल्या शेतकरी बांधवांसाठी कमी व्याजाने दिला पाहीजे. हे आपापल्या गावपातळीवर, घराच्या स्तरावर करता येइल. अशा शेतकरी नोकरदारांनी उदारतेने पुढे येऊन असा पैसा निर्माण केल्यास बरंच काही चांगलं घडू शकेल.

अशा शेतकरी नोकरदारांनी उदारतेने पुढे येऊन असा पैसा निर्माण केल्यास बरंच काही चांगलं घडू शकेल.
>>>>> अगदी हेच वाक्य...
काल इथे टीव्ही वर महंमद युनुस यांची मुलाखत दाखवली.. परवा ते ६९ वर्षांचे झाले म्हणुन!
.....ती मुलाखत! http://www.maayboli.com/node/12509

राम राम मंडळी,

गंगाधर मुटे तुम्ही खुप छान विषय निवडलाय पण तज्ज्ञांची मते वाचुन दुख झाले.

जसे म्हणतात "मी एक हाडाचा पत्रकार आहे" तसा मी पण एक शेतकरी आहे. सध्या पैशाकरीता मुंबईत संगणक अभियंता म्हणुन काम करतोय.

शेतीत नवनवे प्रयोग करु पाहणार्‍या शहाण्यांच्या शहाणपणाचे "धिंडवडे" निघतांना पाहीलेला कोणताही बाप,आपला मुलगा त्या मार्गाने जावु नये,गांवाबाहेर जावुन हमाली केली,रिक्शा चालवला तरी चालेल पण इज्जतीने जगावा अशी अपेक्षा प्रत्येक बाप करित असतो. हे प्रत्येक गावाचे चित्र आहे.

हे अगदी खरच आहे, याच उदाहण मी स्वःताच आहे. याच्यासाठी माझ्या वडिलांनी १ एकर जमीन विकुन माझ शिक्षण पुर्ण केल. शेतीत नवनवे प्रयोग करतात ज्यांच्याकडे पुरेस भांडवल आहे आणि दुसरे उत्पनाचे साधन उपलब्ध आहे.

नंदिनी
मुंबईच्या हायपरसिटी सारख्या मॉलमधे मला कॅप्सिकम ८ रू. पाव किलो मिळते आणि वाशीमधे मात्र भाजीवाल्याकडे १२ ते १४ रू पाव किलो!!! शेतकर्‍यापर्यंत किती जातात ते मला पण माहित नाही

ह्याच कारण आहे ही मधली फळी "स्थानिक व्यापारी---शहरी व्यापारी---दलाल्--भाजीवाले किंवा मॉलवाले"आहे
उदाहरण: कांदे आज भाजीवाल्याकडे किंवा मॉलमध्ये ३० रु किलो ने मिळतात त्याच कांद्यासाठी शेतकर्‍याला ५ रु ते २० रु किलो दर मिळतो, आणि २० रु किलो हा भाव काही सगळ्यांनाच मिळतो अस नाही.

क्रुषि विद्यापिठात पीएचडी मिळविणा-या व दररोज व्रुत्तपत्रात अथवा नियतकालीकात शेतिसल्ल्याचे सदर लिहिंणार्‍या क्रुषीतज्ज्ञाच्या घरच्या शेतीपेक्षा गांवातील इतर शेतकर्‍यांची शेती नेहमीच चांगली राहात आली आहे.
>>> या विधानाला फारसा अर्थ नाही. नवनविन प्रयोग करणार्‍याची शेती कायम चांगलीच असते आणि कृषी विद्यापीठामधे शेतमालाचे विपणन हा स्वतंत्र विषय शिकवला जातो.

ह्या विधानाला खरच अर्थ आहे कारण पुस्तक वाचुन सल्ले देण्यापेक्षा स्वःता शेती करणे अवघड आहे.जेव्हा भर उन्हात काम करायची वेळ येते तेव्हा शेती काय असते ते कळते.

माझ्या गावात साधारणतः वार्षिक २०,०००( साधाराण शेतकरी ) रु ते ७०,००,०००/८०,००,००० (प्रगतीशील शेतकरी )पर्यंत उत्पन्न घेणारे शेतकरी आहेत, परंतु २०,००० कमावणार्‍यात आणि ७०,००,००० कमावणार्‍यात खुपच फरक आहे. तसेच प्रगतीशील शेतकरी सावकार झाला आहे आणि साधाराण शेतकरी त्यांच्याकडुन कर्ज घेतात, कारण भांडवल हा खुप मह्त्वाचा घटक आहे. तसेच हे प्रगतीशील शेतकरी पण असेच कर्ज घेऊन व दुसर्‍या उत्पनामुळे मोठे झालेत.

खुप काही लिहण्यासारखे आहे............

पंकज भामरे

{ .८.}
<< जे शेतीत राबत नाहीत पण शेतकरीपुत्र आहेत अशांनी आपला पैसा बैंकेत कोंबण्यापेक्शा आपल्या शेतकरी बांधवांसाठी कमी व्याजाने दिला पाहीजे. हे आपापल्या गावपातळीवर, घराच्या स्तरावर करता येइल. >> चिंतामण पाटील
..... हा महत्वाचा आणि लक्षात घेण्यायोग्य मुद्दा आहे.
<< प्रगतीशील शेतकरी सावकार झाला आहे आणि साधाराण शेतकरी त्यांच्याकडुन कर्ज घेतात, कारण भांडवल हा खुप मह्त्वाचा घटक आहे. तसेच हे प्रगतीशील शेतकरी पण असेच कर्ज घेऊन व दुसर्‍या उत्पनामुळे मोठे झालेत. >> पंकज भामरे.
..... पंकजजी, तुम्ही फारच महत्वाची गोष्ट बोलून गेलेत.प्रगतीशील शेतकरी दुसर्‍या उत्पनामुळे मोठे झालेत.हे शंभर टक्के सत्य आहे.
या निमित्ताने येथे आपण ज्या शेतकरी घटकाबद्दल चर्चा करतोय,ज्याला केंद्र बिंदू ठेवून चर्चा करतो आहे, त्या " शेतकरी Model " ची व्याख्या करावी लागेल.
जो सावकारकीचा व्यवसाय करतो ,इतर व्यवसाय करतो,खरेदी-विक्री संस्था सदस्य ,कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य ,राजकीय पक्षांचे पुढारी,शाळा - संस्था चालक , सरकारी कर्मचारी यांच्या नावाने ७/१२ असला , तरी त्यांचे पोट शेतीवर अवलंबून राहात नाही. शेतीतील दाहकतेचे चटकेही यांना बसत नाही. शासनात असणारे काही मंत्री सुद्धा शेतकरीच असतात म्हणून कुणी म्हणेल " तो मंत्री सुद्धा शेतकरीच आहे,त्याची शेती जावून बघा कसे भरमसाठ उत्पन्न घेतो आणि कसा हायक्लास जीवन जगतो, त्याचा आदर्श घ्या." तर ते संयुक्तिक ठरणार नाही.शेतीखेरीज अन्य मार्गाने उत्पन्न मिळवून कुणी स्वत:ला प्रगत,आदर्श किंवा कृषीनिष्ठ वगैरे समजत असतील तर समजू द्या पण शेतीच्या दुर्दशेचे मूळ शोधतांना आपण यांना "Model शेतकरी" म्हणून अजिबात निवडू नये असे माझे व्यक्तिगत मत आहे. कारण त्यामुळे आपले निदान आणि निष्कर्ष दोन्हीही चुकीचे ठरू शकते.
म्हणून या चर्चे पुरती " जो निव्वळ शेतीच्या उत्पन्नावर उपजिविका करतो तो शेतकरी." (कदाचित त्याच्या नावाने ७/१२ नसला तरीही ).
अशी ढोबळमानाने व्याख्या करूया. हि व्याख्या या चर्चेपुरतीच.
....... गंगाधर मुटे

{ .९. }
मोहंमद युनुस ह्यांची मुलाखत एबीसी न्युज चॅनेल ने दाखवली.ही मुलाखत चंपक यांनी "मोहंमद युनुस ह्यांची मुलाखत" या शिर्षकाखाली अपलोड केली आहे,अवश्य पहावी.
धन्यवाद चंपकजी...!
" Poverty is not created by the poor people. It is not their fault that they are poor. Poverty is created by the system, imposed on good blooded human beings and we can peel it off. " मोहंमद युनुस.

" Poverty is not created by the poor people. It is not their fault that they are poor. Poverty is created by the system, imposed on good blooded human beings and we can peel it off. " मोहंमद युनुस.>>>

अगदी, अगदी सहमत.

{ .१०. }
१९७८ मध्ये शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी सुद्धा हाच विचार मांडला होता. वाक्य होते...
" गरिबी टिकावी आणि वाढावी म्हणुन शासन जे प्रयत्न करते तेवढे थांबवावेत म्हणजे गरिबी आपोआप हटेल."

{ .११. }
" शेतकर्‍याने काय करावे हे सांगणारा प्रत्येक तज्ञ तुमच्यामते मूर्ख असतो "
नीधपाजी,
शेतकर्‍याने काय करावे हे सांगणारा प्रत्येक तज्ञ मूर्ख असतो,असे मी म्हटलेले नाही. काही तज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या सल्ल्याबाबत माझा आक्षेप आहे,ते मुद्दे कोणते हेही मी स्पष्ट केलेले आहे आणि नेमक्या त्याच सल्ल्यांना मी मुक्ताफळे असा शब्द वापरला आहे.
बहुतांशी गोष्टी सब्सिडाइझ्ड किंवा फुकट असायला हव्यात ही अपेक्षा शेतकर्‍यांची असुच शकत नाही,आणि सब्सिडाइझ्ड किंवा फुकट मिळाल्यामुळे शेतकर्‍यांचा कमी आणि इतरांचाच जास्त फायदा होतो.
सार्वत्रिक कर्जमाफीमुळे शेतकर्‍यांच्या नांवे कागदोपत्री असलेला बोजा तेवढा कमी झाला.प्रत्यक्षात त्याच्या पदरी काय पडले?.
याउलट खरा लाभ बँकानाच झाला. डुबीत रक्कमा ,व्याज मुद्दलासहित बीनखर्चाने एकमुस्त वसुल्या झाल्यात.

गंगाधर, विदर्भातलाच शेतकरी आत्महत्या का करतो? हा खरा कळीचा प्रश्न आहे. माझं गाव पश्चिम महाराष्ट्रात, कायम दुष्काळ,प्यायच्या पाण्याचीही बोंब माझे अनेक मित्र किंवा त्यांचे गावात राहिलेले भाऊबंद शेतकरी आहेत पण आजतागायत कधीही त्यांच्याकडुन फार निराश मते ऐकली नाहीत. ज्यांच्या जमिनी चांगल्या आहेत त्यांचा तर प्रश्नच नाही पण अगदी बेकार,मुरमाड जमिनी असणार्‍यांनी देखील डाळींब,बोर असा वेगळा मार्ग स्विकारुन शेती टिकवली. आमच्या भागातला शेतकरी पैसा आला की जीप घेतो हे तुमचे म्हणणे खरे आहे पण ती जीप तो वडापला लावतो आणि अजून पैसा कसा येईल हे पाहतो. सहकारक्षेत्रात हजार दोष आहेत हे जरी खरे असले तरी शेतकरी आणि राजकारणी यांच्यात एक किमान संवाद त्यामुळेच आहे; आपल्याला एकमेकाची गरज आहे हे भान त्यामुळे सुटत नाही, सरकारी योजना,अनुदाने याची बर्‍यापैकी माहिती आमच्या येथील शेतकर्‍यांना असते हा मुद्दाही लक्षात घेण्यासारखा आहे.

{ .१२. }
<< गंगाधर, विदर्भातलाच शेतकरी आत्महत्या का करतो? हा खरा कळीचा प्रश्न आहे. >>
........विदर्भातलाच शेतकरी आत्महत्या करतो असे नाही.हा पुर्ण देशातील शेतकर्‍यांचा प्रश्न आहे.
फरक एवढाच की विदर्भामध्ये प्रमाण जास्त आहे.

ठि़क आहे, विदर्भात हे प्रमाण जास्त का आहे? यादृष्टिने पाहिले तरी मी वरती उल्लेख केलेल्या मुद्द्यांबद्द्ल तुमचे काय मत आहे?
मी वरती मांडलेल्याच मुद्द्यापैकी एक - सहकार चळवळीने शेतकर्‍यांना एक सपोर्ट सिस्टीम नक्कीच उभी करुन दिली आहे. पश्चिम महाराष्ट्रातला शेतकरी काहीही वेगळं करायला लागला की तो आधी आपल्यासारखे शेतकरी गोळा करून संस्था काढतो त्यामुळे आपण एकटे नसून आपल्यासारखे अनेक आपल्या बरोबर आहेत ही भावना त्यांच्या मनात असते.निवडणूकांच्या वेळी अशा संस्था दबावगटाचे काम करून आपला स्वार्थ पदरात पाडून घेतात.याप्रकाराच्या साधनशुचितेबद्द्ल काथ्याकूट करता येईल,पण यामुळे शेतकरी जास्त आत्मविश्वासाने आस्मानी-सुलतानीला तोंड देतो हा मुद्दा उरतोच.
एक माहिति कोणाकडे असल्यास कृपया द्यावी, विदर्भ आणी पश्चिम महाराष्ट्रात कापूस उत्पादन किती होते आणि या दोन्ही विभागात सूतगिरण्यांची संख्या किती?

<< विदर्भातलाच शेतकरी आत्महत्या का करतो? हा खरा कळीचा प्रश्न आहे.>>
विदर्भातलाच शेतकरी आत्महत्या का करतो? हा प्रश्न या चर्चेदरम्यान अनेकदा उपस्थित झाला पण या विषयाला मी चर्चेत टाळायचा प्रयत्न केला कारण याविषयी जे माझे मत आहे ते अनेकांच्या मनाला दुखावणारे ठरु शकते याची मला जाणिव आहे.म्हणुन असे मुद्दे थोडे बाजुला सारने हिताचे असते.मी सौम्य भाषेत लिहिण्याचा प्रयत्न करतो,तरीपण भावना दुखावल्यास माफी असावी.
विदर्भातलाच शेतकरी आत्महत्या का करतो? हा प्रश्न विचारण्यामागे मला दोन तर्‍हेचे जनमानस आढळते.
त्यामुळे एकाच प्रश्नाचे दोन उत्तरे संभवतात.
१) पहिला प्रश्नकर्ता अभ्यासु आणी जिज्ञासु असतो.त्याचा प्रश्नही प्रामाणिक असतो.परिस्थिती जाणुन घ्यायची इच्छा असते.
२) दुसरा प्रश्नकर्ता खोचक आणि कुत्सित असतो.त्याच्या नजरेत विदर्भातील शेतकरी मागास असतो.
मला असे वाटते कि संपुर्ण देशातील शेतकर्‍यांची परिस्थीती जवळ-जवळ सारखीच आहे.त्यांचे दु:ख,वेदना आणि समस्याही सारख्याच आहेत. फरक असलाच तर "काही शेतकरी सुपात तर काही जात्यात" एवढाच आहे.आज जे सुपात आहेत ते उद्या जात्यात येणारच. म्हणुन कधी शेतकरी आंदोलने युपी मध्ये होतात तर कधी प.बंगालमध्ये,कधी हरयाना- पंजाबमध्ये आंदोलने होतात तर कधी महाराष्ट्रामध्ये.
तसेच पिकातील विविधतेमुळे कधि कापसाचे भाव पडतात तर कधि कांद्याचे, कधि गव्हाचे भाव पडतात तर कधि सोयाबीनचे.
तसेच अवर्षणाबाबत. देशात कधि पुर्व भागात दुष्काळ पडतो तर कधि उत्तरेत्,कधि दक्षिनेत तर कधि पश्चिमेत.
महापुराचे बाबतीतही तेच,जास्त पावसाचे बाबतीत तेच, कमी पावसाचे बाबतीत तेच.आणी अकाली पावसाने होणार्‍या नुकसानीबाबतही तेच.

शेती ही मुख्यत: निसर्गावर अवलंबुन असल्याने देशात एकाचवेळी सर्व शेतकर्‍यांवर समान संकट कोसळत नाही,आळीपाळीने संकटे कोसळत राहातात.
संपुर्ण देशात एकच पिक घेतले जात नाही,विविध पिके घेतली जातात त्यामुळे शेतमालाच्या कोसळलेल्या भावाचा फटका त्या-त्या विभागातील शेतकर्‍यांना बसत असतो.
निसर्गात विविधता म्हणुन शेतकर्‍यांच्या संकटात विविधता म्हणुन आत्महत्याग्रस्त प्रदेशात विविधता.
शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण आज विदर्भात जास्त आहे कारण सततच्या दुष्काळामुळे नापिकी, मध्यंतरीच्या काळात शेतमालाचे विशेषतः कापसाचे पडलेले भाव हेच प्रमुख कारण आहे. बाकी सर्व कारणे ही दुय्यम कारणे आहेत.
शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण विदर्भात जास्त आहे याचा अर्थ उर्वरीत देशातला शेतकरी फारच सुखी आहे असा अजिबात होत नाही, आणि विदर्भातील अडाणी,आळसी व बाकीचे शहाणे,कर्तव्यप्रवीण असा अर्थ तर अजिबात होत नाही.
असा अर्थ काढायचा पुढार्‍यांचा उद्योग आहे."तोडा,फोडा आणि राज्य करा" ही विलायती कुट्निती आमच्या राज्यकर्त्यांनी इंग्रजांकडुन चांगल्यातर्‍हेने हस्तगत केली आहे. ती पुढार्‍यांची जिवणशैली बनली आहे.हे जिथे जिथे जातात तिथे तिथे तुकडे पाडायचेच उद्योग करतात. हे फुट पाडण्यात एवढे उस्ताद की स्वतःवर लगाम लावण्यासाठी स्वतःसाठी, स्वतःच पक्षांतर बंदिचा कायदा करावा लागला.
या देशातल्या शेतकर्‍यांचे आधीच खुप तुकडे करुन झालेत. उदा- लहान शेतकरी, मध्यम शेतकरी,मोठा शेतकरी, कोरडवाहु शेतकरी, बागायतदार शेतकरी, कापुस शेतकरी, सोयाबिन शेतकरी, उस शेतकरी, संत्रा शेतकरी, आदिवासी शेतकरी,कुनबी शेतकरी, मागासवर्गीय शेतकरी,.......... आणखी किती तुकडे करणार?
याउपरही कुणास विदर्भापेक्षा मराठवाडा किंवा पच्छिम महाराष्ट्र किंवा बारामतीचा शेतकरी सुखी आहे असे वाटत असेल तर त्यांनी मागच्या सार्वत्रिक कर्जमाफीची आकडेवारी बघावी त्यावरुन त्यांना स्वच्छ / स्पष्ठ पुरावा मिळेल की कोणत्या विभागातील शेतकरी जास्त कर्जबाजारी होते याचा,कुणाच्या बुडाखाली कीती अंधार आहे याचा.
पुढारी म्हणतात त्याप्रमाणे जर पश्चिम महाराष्ट्रात आनंदी-आनंद असता तर युपी-बिहारचे लोंढे मुंबई ऐवजी
पश्चिम महाराष्ट्राकडे नसते का धावले?

...गंगाधर मुटे

Pages