वाढदिवस

Submitted by छाया देसाई on 5 November, 2009 - 02:54

हे रोजचेच जगणे ,जगण्यात वेळ गेला
मागून हर क्षणाच्या पळण्यात वेळ गेला

कळले किती कितीसे ,वळले किती कितीसे
वळल्या न आढ्यतेला जपण्यात वेळ गेला

सारून आडपडदे संवाद साधताना
उडते मुजोर पडदे धरण्यात वेळ गेला

अजमावुनी बळाला इतरास जोखताना
अबलाच राहिले मी ,कळण्यात वेळ गेला

का वाढदिवस देतो मज भान वाढल्याचे
वय लपवता वयाचा लपण्यात वेळ गेला
छाया देसाई

गुलमोहर: 

>>वळल्या न आढ्यतेला जपण्यात वेळ गेला
सुंदर

>>वय -चोरट्या वयाचा लपण्यात वेळ गेला
काही चुकतय का इकडे या वाक्यात?

प्रतिसादाबद्दल सर्वांची आभारी आहे .बुमरँग रचनेत योग्य तो बदल केला आहे '''वय लपवता वयाचा लपण्यात वेळ गेला ''या ओळीचा अर्थ असा ;-
जे खर वय आहे ते न स्विकारता मनाने व शरीराने जास्तीत जास्त तरुण दिसण्याच्या खटाटोपात व्यर्थ
वेळ गेला .वाढत्या वयाने स्वत्;चच वय लपवत तरूण वयाच्या बुरख्यात लपण्याचा अविरत प्रयत्न करत
रहाण ,यातच वेळ घालवण ही खंत .

छान!

सारून आडपडदे संवाद साधताना
उडते मुजोर पडदे धरण्यात वेळ गेला... वा उत्तम शेर आहे! लिहीत रहाणे
-मानस६

सारून आडपडदे संवाद साधताना
उडते मुजोर पडदे धरण्यात वेळ गेला

व्वा वरची ओळ मस्त आली आहे... पण खालची मला कळली नाही Sad
कृपया समजावाल का?

कधी कधी संवाद साधताना आडपडदे सारावे लागतात हा प्रत्येकाचा अनुभव ,तसच सारलेले पडदे हवेच्या भरोसे सोडूनसुद्धा भागत नाही तर ते नियंत्रणातसुद्धा ठेवावे लागतात .हे आडपडदे कुठल्याही प्रकारच्या विषमतेचे ,रितीरिवाजांचे ,ढासळलेल्या कायदा सुव्यवस्थेचसुद्धा असू शकतात .ते सारण्याची नेहमीच गरज असते अस नाही .त्यामुळे जेव्हा गरज असते तेव्हा ते बाजुला सारल्यावर नियंत्रणात ठेवावे लागतात
अन्यथा ते पुन्हा पुन्हा आड येवून व्यत्यय आणू शकतात .या नकोत्या कामात बराच वेळ तसच मानसीक
शक्तीचा व्यय होतो ही खंत .अनेक थोर व्यक्तिमत्वानी हे मुजोर पडदे सक्षमतेने नियंत्रणात ठेवलेले
आहेत .उदाहरणार्थ -स्वातंत्र्यपूर्वकाळात जेव्हा लोकमान्य टीळक स्वराज्य चळवळीत सक्रीय होते तेव्हा
स्त्रीशिक्षण ,सतीपरंपरा ,कुटुंबनियोजन ,बालविवाह ,विधवा विवाह ,जातीभेद ,सामाजीक विषमता ,
अध्यात्म या क्षेत्रात सुद्धा चळवळी सुरू होत्या .स्वराज्य चळवळीत संवाद साधताना टीळकानी
आडपडदे ज्या सक्षमतेने सारले त्याच्याहीपेक्षा जास्त क्षमतेने ते इतर सामाजीक समस्यांच्या आडपडद्यातच
राहिले .याचा अर्थ ते इतर चळवळींच्या विरुद्ध होते अस नाही तर त्यांच साध मतप्रदर्शन सुद्धा स्वराज्याच्या चळवळीच सामर्थ्य कमी करण्यात झाल असत म्हणून त्यानी हे आडपडदे धरूनच ठेवले .
मिलिंद ,प्रतिसादाबद्दल धन्यवाद .

छायाताई.. मस्त विवेचन केलेत.. पण एवढे सगळे त्या खालच्या ओळीतून वाचकांपर्यंत पोचत नाही असे मला वाटते..

चु.भू.द्या.घ्या.

सारून आडपडदे संवाद साधताना
उडते मुजोर पडदे धरण्यात वेळ गेला

अप्रतिम.
निवडक १० मध्ये आहेच.

प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनापासून आभार .
मिलिंद तुझ्या मताचा मी आदर करते पण मला ''वाचकापर्यंत पोचत नाही ''हे पटत नाही .असो .