Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Bhetilaage Jeeva

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » अधिक - ज्येष्ठ » ललित » Bhetilaage Jeeva « Previous Next »

Aditih
Friday, June 08, 2007 - 11:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

औगस्ट २००३ चा काळ. दादा नुकताच दुबई ला नोकरीनिमित्त गेलेला. मनात बाबांची चिंता कायम होती.बाबा गेली ३ वर्ष सतत आजारी असायचे. आणि आजार साधेसुधे नसायचे.त्यांना कित्येको वर्ष मधुमेह होता त्याचाच परिणाम होता तो. डावा पाय गुडघ्यापासुन काढलेला. Diabetic Gangrene झाला होता. त्या शस्त्रक्रियेनंतर नवीन Artificial limb लावेपर्यंत वर्ष लागलं. त्यात शरीरातील ताकद कमी झालेली त्यामुळे तो नवीन पाय लावून चालणं पण अवघड जायचं. Post operation healing was really a difficult part. ऒपरेशन नेहमी नीट व्हायचं त्यांचं. पण पुढचे हाल बघवत नसत. तरी अचाट सहनशक्ती असलेला माणुस. पाय कापल्यावर अशक्य वेदना होत होत्या पण तोंडातुन ब्र नाही निघाला. शांत पणे पडुन रहायचे. पायातुन कळ आलेली फ़क्त चेहरा सांगायचा. आईने अखंड सेवा केली मात्र. काही दिवसांनी ते नवीन पाय लावून बर्यापॆकी चालू लागले.

त्यातुन सावरतात तोपर्यंत दुसरा पायात अशक्य वेदना होऊ लागल्या. सगळ्या तपासण्या झाल्य़ा. त्यातून असं निष्पन्न झालं की त्याही पायात मधुमेहा मुळे रक्त्वाहिन्यात अडथळे निर्माण झालेत. झालं पुन्हा एकदा operation just like angioplasty. फ़क्त पायाची एवढाच काय तो फ़रक. झालं नेहमीची सगळी post operative complications झाली. इतके थकायचे ना ते हे सगळं सहन करुन. एका पायाची शिर काढुन दुसर्या पायात घातली होती. दोन्ही मांड्याना ३०-३० टाके. टाके म्हणजे स्टेपलर च्या पिना होत्या. त्यात औषधांनी तोंडाची चव गेलेली. सगळे सांगताहेत नीट खा नाहीतर ताकद नाही येणार. बिचारे सगळं शांतपणे सहन करायचे. असं होत होत त्यातुनही बरे झाले.

त्याच वेळेस मी अभियांत्रिकी ची पदवी परीक्षा पास झाले होते. नोकरी साठी भटकंती चालू होती. दादाने सुध्दा दोनेक महिन्यात नोकरी बदलली. त्याला नवीन नोकरीला रुजु होऊन कसातरी आठवडा झाला असेल आणि अचानक एक दिवशी बाबांना जोरात थंडी वाजु लागली. रायगर म्हणतात ते. त्याना जागचं हलता येईना आणि ग्लानी आली. मी आमच्या बिल्डींग मधील वॆद्यांना बोलावलं तर ते म्हणाले की लगेच इस्पितळात नेऊ. त्यांनी स्वत: त्यांना खांद्यावरून उचलून खाली गाडीपर्यंत नेलं आणि स्वत:च्याच गाडीतून घेऊन गेले. ह्यावेळेस किड्नी बाई रुसल्या होत्या . बर्याच तपासण्यांनंतर निदान झालं की त्यांच्या किड्नी मध्ये विषारी वायु तयार झाला आहे आणि तो कधीही बाहेर पसरु शकतो. त्यामुळे किड्नी अलगद बाहेर काढणं आवश्यक आहे. भयंकर नळ्या आणि त्यांच्या जाळ्यात ग्लानीत असलेले बाबा. त्या काळातल्या असंख्य रात्री आम्ही धसक्यात घालवल्यात. त्यांनी तर त्या कशा घालवल्या असतील देवच जाणो. एके दिवशी त्यांची ही किडनी सहीसलामत बाहेर निघाली आणि जीवावर बेतलेलं हे संकट तात्पुरतं का होईना टळलं.
त्यातुन ते बरे झाले. हिंडु फिरु लागले. कोकणात आले आमच्याबरोबर. दादासाठी मुलगी पाहायला. लग्न ठरलं, सर्व नातेवाईंकाच्या सहकार्याने छान पार पडलं.

नागीण, पाठीवर एक कार्बंकल असे काही आजार चालूच होते. एकच किड्नी आहे आता तिच्यावर सगळा भार येणार आणि त्यामुळे तिच्यातही बिघाड होणार हे स्पष्टच होतं. फ़क्त मधे किती काळ जातो हेच काय ते होतं.


दादाला दुबईतली नोकरी सांगुन आली होती. त्याचं करियर आपल्यामुळे रोखलं जातंय म्हणुन बाबा त्याच्या जाम मागे होते की तु जा. ते म्हणायचे "मला बघायचं आहे तुला यश मिळवताना.संधी सारखी मिळत नसते, मी काय आज आहे उद्या नाही, माझी काळजी करत नको बसु". त्यांच्या आग्रहा खातर दादाने ती नोकरी स्वीकारली आणि तो १२ औगस्ट २००३ ला रवाना झाला.
मी , आई, बाबा , मंजु(माझी वहिनी, दादा एकटाच गेला होता, काही महिन्य़ांनी ती जायची होती), मंजूचा भाऊ मिलींद असे पाच जण घरी असायचो. घरातलं वातावरण छान ठेवणे ही बाबांची खुबी होती. इतकी आजारपणं झेलली पण कधी वातावरण सुतकी नव्ह्तं, कारण बाबा.ते खुप मस्त गाणी म्हणायचे. तसं अख्खं घरच संगीतमय असायचं. आई शास्त्रीय संगीताचे क्लास घ्यायची.मजा असायची घरात.

एक महिना तसा नीट गेला. किड्नी हळुह्ळु रंग दाखवत होती. माझे बाबा स्वत: डौक्टर होते त्यामुळे त्यांना पुढे काय याची कल्पना आलेली असायची पण सांगायचे नाहीत. एक दिवशी आईच्या लक्षात आलं की त्याना लघवी होत नाहीये म्हणुन. तेव्हा म्हणाले हो , नाही होत आहे २ दिवस. तुम्ही लगेच इस्पितळात न्याल म्हणुन सांगितलं नाही.त्याच दिवशी त्याना जुलाब चालू झाले. आम्ही दादाला फ़ोन लावला तर त्याला म्हणे "मी मजेत आहे तु नको काळजी करु. हे सगळे उगाच घाबरतात". दादा काय समजायचं ते समजला.

आम्ही बाबांना पुन्हा एकदा इस्पितळात नेलं.डौक्टरनी सांगितलं की त्याच्या किडनीने काम करण बंद केलं आहे नी त्यामुळे लघवी न होता मलमूत्र सगळं एकत्रच मलावाटे बाहेर पडतंय. त्यामुळे दर तासाला त्याना पाण्यासारखे जुलाब व्हायचे.
त्याना जगायला डायलिसीस हा एकमेव उपाय होता.बाबा तयार नव्ह्ते. ते म्हणत होते" मला घरी न्या. आता जास्त दिवस नाहीत माझे. ते मला घरी घालवायचे आहेत.इथे नको वाटतं अगदी.".
तिकडे दादा बाबांना एकदा तरी भेटायचंच म्हणून यायच्या खटपटीत होता.रजा लगेच मंजूर झाली. पण त्याच्या पासपोर्टवर अजुन व्हिसा स्टॆंपिंग व्हायचा होता. नुअकताच गेलेला असल्याने काही सोपस्कार व्हायचे होते त्यापॆकी हा एक. हे काम लवकर व्हावं म्हणून त्याचा मॆनेजर पण बरीच खटपट करत होता. पण नेमकी ३ दिवस जोडुन सुट्टी आली दुबईत. सर्व सरकारी कचेरया बंद. हातावर हात धरून बसण्यापलिकडे कोणीच काही करू शकत नव्हतं.बाबांना भेटायला मिळेल ना? अनिवार इच्छा होती दोघांनाही एक्मेकाला भेट्ण्याची.तळमळत दिवस रात्र कंठत होता,पण येऊ शकत नव्हता.त्याच्या परिस्थितीची कल्पना तेव्हाही करवत नव्हती आणि अजूनही आठवलं तरी खुप त्रास होतो.

बाबांना, आता तुम्हाला दादाला भेटायचं ना, तो येतोय..असं सांगुन डायलिसीस साठी तयार केलं.डायलिसीस साठी एक वेगळं दालन होतं. तिथे आम्हाला पेशंट बरोबर थांबायची परवानगी नव्हती.मी मधेच भेटुन येत असे. मी अशीच एकदा आत त्यांना भेटायला गेले होते. त्यांचा हात हातात घेऊन उभी होते. बाबांच्या डोळ्यातुन पाणी ओघळत होतं." आत्ताच तर गेला मंदार, त्याला लगेच माझ्यामुळे यावं लागतंय, मला खुप अपराधी वाटतंय, तुम्हाला सर्वानाच माझ्या आजारपणामुळे खुप त्रास होतो.पण खरं सांगु, मला पण मंदारला भेटायचंय एकदा.कधी पर्यंत येईल तो?".मी काय सांगणार? काही तरी सांगुन वेळ मारुन नेली. तितक्यात त्यांच्या चेहर्यातील बदलाने मला लक्षात आलं की त्यांना पुन्हा शौचाला झालंय.मी त्यांना साफ करण्यासाठी नर्स ला बोलावू लागले.(डायलिसीस च्या दालनात आम्हाला हे करण्याची परवानगी नव्हती)बाबा म्हणे " नको बोलावू कोणाला, मला ती सर्वांसमोर उघडं टाकते साफ़ करताना आणि मला ते खुप दीनवाणं वाटतं, त्यापेक्षा मी असाच अजुन थोडा वेळ काढतो. एकदा रुम मध्ये आलो की कर साफ़". काय काय सहन केलं त्यांनी. अजुनही तेवढंच दु:ख आहे मनात..बाबांचे खुप हाल झाले.आयुष्यभर कोकणात पेशंट्ची सेवा केली. खुप कष्ट काढले पण आजारपण, हाल काही चुकले नाहीत.

२१ सप्टेंबर २००३ , रविवारी त्यांना आम्ही इस्पितळात आणलं होतं. अख्खा आठवडा संपत आला होता.एक दिवसाआड डायलिसीस चालु होता. दुसरा रविवार उजाडला. बाबाना बसवलं होतं बेड वर. आई त्यांचा चहा कपात ओतत होती. दाराचा आवाज झाला म्हणुन पाहिलं तर दारात दादा!!! त्याने धावत येऊन बाबांना कडकडून मिठी मारली.आसवांना मुक्त वाट दिली त्यादिवशी सर्वांनीच.भेटीलागे जीवा लागलीसे आस..खरंच अवर्णनीय होता तो क्षण..आस भागली होती.

बाबा प्रचंड खुष होते. दादाला लगेच सांगुन टाकलं , "तुझ्यासाठी मी २ कामं ठेवली आहेत.एक म्हणजे मोनुचं लग्न आणि मला घरी न्यायचं.हे कोणी माझं ऎकत नाहीत. तु ऎक.मला घरी ने."
माझं आणि अतुलचं लग्न ठरुन दीड वर्ष झालं होत. लवकरच लग्न करणारही होतो पण आता या कारणाने अतुलच्या एका दिवसाच्या सुट्टीत आमचं लग्न मंगळ्वारी ललिता पंचमीच्या मुहुर्तावर पार पडलं. त्याच दिवशी बाबांना घरी पण आणलं.बाबा खुष होते.
त्यानंतर त्यांनी जेवण बंद केलं. डायलिसीस तर बंद्च झाला होता घरी आणल्याने.नकॊ आता काही म्हणायचे.आई,दादा, मी, मंजु सर्वाना बसवुन सांगितलं " मला खरंच तुमच्या सगळ्यां बरोबर रहायचंय पण आता शरीर साथ नाही देतेय.म्हणुन मी देवाकडे प्रार्थना करतोय की मला सोडव आता. तुम्हीही करा माझ्यासाठी."

शनिवारी, ४ औक्टोबर २००३ ,दसर्याच्या पहाटे २ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.


.... मोनाली

Rupali_rahul
Friday, June 08, 2007 - 12:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मोनाली, स्क्रिन धुसर झाली गं... कस सगळं सहन केल असेल त्यांनी....

Nalini
Friday, June 08, 2007 - 1:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मोनाली, देवाचे आभार मानायचे की दादाची आणि त्यांची भेट झाली.

Mrudu
Friday, June 08, 2007 - 3:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हेलावून टाकणारा लेख.
कथनाचा प्रवाह उत्तम जमला आहे, त्यामुळे अधिकच परिणामकारक. बाबांचे आल्या क्षणाला आपला म्हणणारे व्यक्तिमत्व चांगले व्यक्त झाले आहे.


Megha16
Friday, June 08, 2007 - 5:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मोनाली, तुझे बाबा खरच खुप धीराचे होते. नलीनी म्हटल्या प्रमाने देवाचे ही आभार मानायला हवे की त्यांची आणी तुझ्या दादाची भेट झाली.

Arch
Friday, June 08, 2007 - 5:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मोनाली, छान लिहिल आहेस. हे लिहिताना किती जड गेल असेल ह्याची जाणीव आहे. पण तुझ्या वडिलांच्या सहनशक्तिची कमाल आणि त्यातही आनंदी वातावरण घरात रहाव म्हणून केलेल्या धडपडीला सलाम. ह्या लेखावरून तुमची संपूर्ण family संवेदनाशील, प्रेमळ, आणि एकमेकांना धरून रहाणारी दिसते. त्याचही कौतुक वाटल.

Marhatmoli
Friday, June 08, 2007 - 7:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मोनालि,

इतक्या प्रेमळ आणि परोपकारि व्यक्तिच्या नशिबात असे हाल का यावेत कळत नाहित. त्याना अस कणाकणाने जाताना बघण म्हणजे तुमचि सर्वांचि अग्निपरिक्षाच होति. ते dialysis च वर्णन वाचताना पाणि आल डोळ्यात वाचताना, विचार आला तुझि तेंव्हा काय अवस्था झालि असेल.


Dineshvs
Saturday, June 09, 2007 - 4:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मोनाली, या सर्व वेदना सहन करण्याच्या पलिकडच्या असतात. त्या व्यक्तीच्या आणि घरच्यांच्यादेखील.
हे वैद्यकिय उपचारही खुपच वेदनामय असतात. पण उपचार म्हणून ते सहन करावे लागतात. तूमच्या सगळ्यांच्या दुःखात आम्हीही सहभागी आहोत.


Visoba_khechar
Saturday, June 09, 2007 - 6:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाचून खूप त्रास झाला. कुणाच्या नशीबी काय भोग येतील आणि कुणाला कसं मरण येईल या गोष्टी आपल्या हातात नाहीत हेच खरं.

ईश्वर सर्वाना सुखी ठेवो हीच प्रार्थना..

येत्या विजयादशमीच्या दिवशी या घटनेला चार वर्ष पूर्ण होतील तरी वडिलांच्या आजारपणाचा सारा घटनाक्रम आणि त्यांच्या मृत्युचा सल आजही आपल्या मनात तेवढाच ताजा आहे, हे पाहून आपल्यातील संवेदनशीलतेला सलाम करावासा वाटतो!

अनुभवकथन फारच छान केले आहे. पुढील लेखनाकरता अनेकोत्तम शुभेच्छा..

तात्या अभ्यंकर.

Nandini2911
Saturday, June 09, 2007 - 6:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मध्यंतरी माझ्या एका मैतीणीच्या भावाला डायलिसिस घेताना होत असलेल्या वेदना पाहिल्या होत्या. हे असलं दुखणं सहन करायची ताकत माझ्यामधे नाही म्हणूनच कायम अशा लोकांबद्दल आदर वाटत राहतो.

माझी आजीसुद्धा अशीच सगळ्याना भेटून गेली. नातवंडं पणतू लेकी सुना सगळे होते. आता जाईल की नाही अशी परिस्थिती होती, मात्र सगळ्याना तिने घरी जायला सांगितलं, रात्री अकरा वाजता सगळे घरी आले. आजची रात्र तिची पार होईल याची सर्वाना कल्पना होती. पण साडेबाराला आजोबाचा फोन आला. "गाडी घेऊन या." आजी गेली तेव्हा तिची तीनही मुलं.. माझी आई मावशी आणि मामा चक्क झोपले होते.

कुणीतरी म्हणालंच.. आईना ती जाताना लेकराना झोपवून मगच गेली. आजीला आपलं शौचावर नियंत्रण नाही हे लक्षात आल्यावत तिने पाणी घेणं सुद्धा सोडलं.."घाण नको म्हणून" असं सांगितलं.


माझे आजी आणि आजोबा याचं एकमेकावर निर्व्याज प्रेम. आजोबाना हार्ट ऍटॅक आल्यावर तिने "तुमच्या आधी मी जाणार आहे" असं सांगितलं आणि सहा महिन्यात गेली.

आजीला घरी आणल्यावर आम्ही आजोबाना रात्रभर जागू नका,, झोपा असं सांगितलं. आजीला हॉलमधे ठेवलं होतं. तू झोपलीस, मी पण झोपू?" आजोबानी आजीला विचारलं.

आजीला दमा होता. तिला उदबत्तीचा धुर सहन व्हायचा नाही. आजोबानी ती गेल्यावर सुद्धा उदबत्ती लावू दिली नाही "तिला त्रास होईल म्हणून.."



Zakasrao
Saturday, June 09, 2007 - 6:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वताच्या आजारपणात अस धिराने वागणारा माणुस निराळाच म्हणायचा.
त्याना सलाम माझा.
आणि त्याना जपणार्‍या तुमच्या कुटुंबाला देखिल.


Aditih
Sunday, June 10, 2007 - 5:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रूपाली,नलिनी, म्रुदु,मेघा,आर्च,मर्हाट्मोळी,दिनेशदा,नंदिनी,झकास...सर्वाचे मनापासुन आभार.
नलिनी,मेघा तुम्ही म्हणताय ते खरं आहे दादाची आणि बाबांची भेट झाली यात देवाचेच आभार मानतो आम्ही. तरिही मनात कधी कधी वाटतच की इतक्या सत्जन आणि देवभक्त माणसालाही का असं..तात्या खरंच कोणाला कसं आणि किती वेदनांती मरण यावं हे हातात नसतं हेच खरं.
असो त्यातुन असं पण वाटतं की देवाच्या क्रुपे अभावी ही जीवघेणी दुखणी एवढ्या समर्थपणे आणि संयमाने पेलता येणंही अशक्य़ होतं.
झकास, ते धीराचे होते आणि दिलदार ,उमद्या मनाचेही.त्यांना इस्पितळात भेटायला येणारी व्यक्ती इतकी आनंदी होऊन बाहेर पडायची कि त्यांना वाटावं बाबांना इथे का ठेवलंय, हे तर अजिबात पेशंट वाटत नाहीत. त्यांना लावलेल्या असंख्य नळ्या हाच त्यांचा पेशंट असण्याचा दाखला.वागणं, बोलणं यातून कळणारही नाही.


माझं लिखाण वाचल्याबद्दल खरंच पुन्हा एकदा मनापासुन आभार.


Saee
Monday, June 11, 2007 - 10:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुझ्या दादाची आणि त्यांची भेट झाली ही किती आनंदाची गोष्ट! त्यांना हवं होतं ते सगळं तुम्ही पुर्ण करू शकलात हेही किती महत्वाचं! दुःखात सुख म्हणतात ते हे..

Sneha21
Tuesday, June 12, 2007 - 6:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मोनाली, तुज़्हे बाबा तर ग्रेटच, पन तु केलेल वर्नन वचुन माज़े
डोले पानावले, सारे कुटुम्बिये पन धिराचे....

Sms
Tuesday, June 12, 2007 - 11:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मोनाली : वाचुन डोळे पाणावले.पण positive side बघ की दादाची भेट आणी तुझे लग्न, त्यान्च्या दोन्ही इcचा पुर्या झाल्या.

Jaijuee
Wednesday, June 13, 2007 - 7:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मोनाली,
अगं, माझी आई म्हणते - की सगळे कष्ट देव चांगल्या लोकांनाच देतो, कारण त्यांच्याकडेच परिसस्पर्श असतो - दु:ख़ांना सहन करत "शीतळ" करण्याचा! नि ते समजुतदारपणे देवाकडे कष्ट नि वेदनांचा हिशोब मागत नाहित ना!

तुझ्या बाबांच्या सगळ्या ईच्छा झाल्याच ना पूर्ण? म्हणजे त्यांचही ऐकावं लागलच नियतीला!

तुझं हा लेख लिहीणेच किती धीराचं आहे! मला नसतच जमलं अश्या अनुभवावर लिहायला!

Mandard
Wednesday, June 13, 2007 - 8:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Your father was having great inner strength. May his soul rest in peace.
Diabetics is a silent killer & it is easy to fight if you accept it. Your father had done just that. Instead of cursing life he enjoyed every moment of it and also made all of you to enjoy. But life becomes tough once it catches you. Don’t eat sweet. Restrict salt / oil. Take insulin / medicines daily without fail. Do exercise. Check sugar, BP regularly. It’s a also a costly affair. But once it is managed we can enjoy. I was also very much shocked when I detected diabetics at the age of 30. Only luck was that all my body was functioning well. There were no other troubles. In last three years I managed to control physically and mentally also. Sorry “Vishayantar” zale.

Mandar





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators